Monday, December 2, 2019

हिशोब

तुझे लाजरे स्मित पाहूनी, भान हरपले;  माझे होते
माध्यान्हीच्या उन्हात जणू की, हळूच चांदणे हसले होते

नशा जरा ना आली, जरी मी रिते पयाले केले होते
नजरेशी तव नजर भेटता,  मदीर मन हे झाले होते

वसंतातले वैभव कितीदा, पुन्हा पुन्हा अनुभवले होते
शिशिरातही परि स्पर्शे तुझिया, शरीरी वसंत फुलले होते

किती जागलो रात्री जरी मी, हिशोब माझे चुकले होते
अवसेच्या राती मी जेव्हा, मुखबिंब तुझे देखियले होते

------ मनिष मोहिले

Thursday, August 1, 2019

ऋतू श्रावण हिरवा

ऋतू श्रावण हिरवा
ओला कोवळा ताजवा
नव नवेल्या क्षमेला
सोन हळद चढवा

ऋतू श्रावण हिरवा
कोंब आशेचा रुजावा
वर नभाच्या कमानी
इंद्र तोरण चढवा

ऋतू श्रावण हिरवा
मनी गुलाबी गोडवा
रात्र मंगळागौरीची
मनी साजण जागावा

ऋतू श्रावण हिरवा
पान्हा धरेला फुटावा
सणवारांनी पवित्र
मास शुचिर्भूत व्हावा

------ मनिष मोहिले

Sunday, July 7, 2019

बोलावा विठ्ठल - वर्ष पाचवे

बोलावा विठ्ठल - वर्ष पाचवे

दिनांक ५ जुलै २०१९ - आषाढ द्वितीया. आषाढ म्हटलं की विठ्ठल, वारी, वारकरी, अभंग आणि पंढरी प्रकर्षाने आठवतात.
अर्थात अहमदाबाद सारख्या जागी ह्या सर्व गोष्टी जवळून अनुभवायला मिळणं शक्य नसतं.

पण ह्या सर्वांसाठी एक तितकाच सुरेख अनुभव देणारा आणि तितक्याच तोलामोलाचा दुसरा एक पर्याय कलाश्री या मराठी सांस्कृतिक संस्थेच्या सहयोगाने उपलब्ध असतो आणि तो म्हणजे पंचम निषाद प्रस्तुत बोलावा विठ्ठल चा प्रयोग. संतांचे अभंग सुश्राव्य रितीने रसिकांपर्यंत पोचवणारे सांगितिक वारीचे गायक, बरोबरचे श्रवणभक्त वारकरी, नादब्रह्मातून ईश्वराची प्रचिती आणि त्यायोगे पंढरीशी आणि विठूशी साधली जाणारी जवळीक - अहमदाबादसारख्या ठिकाणी वारीचा यापेक्षा अधिक जिवंत अनुभव मिळणं कठीण.

या वर्षीचा शुभारंभाचा प्रयोग अहमदाबादला होता आणि गायक कलाकार होते जयतीर्थ मेवुंडी आणि रंजनी गायत्री भगिनी.

प्रथेप्रमाणे जय जय रामकृष्ण हरी या नांदीने कार्यक्रमाला सुरुवात झाली आणि जयतीर्थ व रंजनी गायत्री गायक त्रयीने ती नांदी अप्रतिम रित्या रंगून आणि रंगवून सादर केली. शास्त्रीय संगीताची चमत्कृतीपूर्ण ताकद इथे जाणवते. दरवर्षी तीच नांदी पण प्रत्येक गायक कलाकाराच्या गायकी प्रमाणे दरवेळी तितक्याच नव्याने आपल्याला ऐकायला मिळते.

कार्यक्रमाच्या पूर्वार्धात रंजनी गायत्री अभंग सादर करणार होत्या. या बहिणींच्या गाण्याबद्दल खूप ऐकलं होतं मी पण त्यांचं गाणं ऐकायची ही पहिलीच वेळ.

रूप पाहता लोचनी हा संत ज्ञानेश्वरांचा  अभंग आपल्याला परिचित असलेल्या चालीपेक्षा वेगळ्या चालीत आणि वेगळ्या गायकी ढंगात सादर करत रंजनी गायत्री भगिनींनी श्रीगणेश केला.

भक्तीमार्गाची सुरुवात ईश्वराच्या सगुण साकार दर्शनाने व्हावी हे स्वाभाविकच.
विठू माऊलीच्या ह्या रुपदर्शनाने अपार  सुख तर मिळतेच आणि त्याच बरोबर जीवाला एक आस लागून राहते - विठूच्या भेटीची. हीच आस ज्यांचं जीवन होतं असे तुकोबा तळमळीने बोलते झाले "भेटी लागी जीवा लागलीसे आस."

अशी ही आस भक्ताना नादावून सोडते. मग ते विठू माऊलीच्या भक्तीत रंगलेले संत आणि वारकरी असोत वा विठूच्याच कृष्णरुपात स्वत:ला विसरून गेलेली मीरा असो. त्या सावळ्याच्या फक्त नामोल्लेखावरच ही मीरा पायात घुंगरू बांधून स्वत:ला विसरून नृत्यब्रह्मातून आपल्या कृष्णाशी एकरूप होऊन जाते - "पग घुंगरू बांध मीरा नाचे रे". तिथे देवाच्या सगुण रुपाचा, भाषेचा फरक आड येत नाही. फक्त एक भाव - एकरुपतेचा.

हाच तो भाव असतो ज्यामुळे संत तुकारामांना सर्वत्र विठ्ठल दिसतो आणि ते लिहून जातात बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीवभाव.

त्या कानडु विठूबरोबर जीव आणि भाव असे सहज एकरुप होऊन जातात कारण पंढरीचं हे विठू नावाचं भूत त्या वाटेला आल्या गेल्या प्रत्येकाला झपाटतं. आणि असं झपाटतं की त्यातून सुटका नाही. तुकोबा म्हणतात "तेथे जाऊ नये कोणी ! गेले नाही आले परतोनी!"  कारण "पंढरीचे भूत मोठे".
पंचमहाभूतांची  एकरुपता म्हणजेच ईश्वरीय तत्व. रुप विठोबाचं. त्याला तुकोबा महाभूत म्हणतात. पंढरीच्या वाटेला त्यांनीच जावं ज्यांना परतायची ईच्छा नाही. "तुका पंढरीसी गेला ! पुन्हा जन्मा नाही आला !" ही ओळ रंजनी गायत्रीनी अशा काही आर्ततेने गायली की ते सूर आणि त्या ओळींमधील अभिप्रेत मोक्षाची कल्पना ह्यामुळे अंगावर काटा आणि डोळ्यात पाणी आलं.

मनाच्या त्या उन्मनी अवस्थेतच एक छोटं मध्यांतर आलं आणि सुरगंगेचा प्रवाह पुन्हा वाहू लागला जयतीर्थच्या गळ्यातून. भक्तीमार्गावरील सूरप्रवासाचं एक आवर्तन पूर्ण झालं होतं आणि दुसरं सुरू.

त्यामुळे पुन्हा एकदा सगुण साकार रुपदर्शनाने प्रवास सुरू झाला. तुकोबांना दिसलेलं विठूचं राजस सुकुमार आणि मदनाप्रमाणे देखणं रुप जयतीर्थने त्याच्या सुरातून दृगोच्चर केलं.

या देखण्या देवदर्शनानंतर ऐहिक गोष्टींची मातब्बरी वाटेनाशी होते. त्या विठूच्या चरणी संत तुकोबा मग एकच प्रार्थना करतात - "पोटापुरते देइ विठ्ठला" - कारण देह आहे तो पर्यंत भक्ती करण्यासाठी तो जगवायला हवा म्हणून. पण भक्तीशिवाय इतर कोणत्याही ऐहिक गोष्टीच्या संग्रहाची ईच्छा नाही.

सूरप्रवासाच्या या टप्प्यावर जयतीर्थने एक वळण घेतलं आणि विष्णूच्या रामरुपाचं गुणगान आळवायला घेतलं - नरेंद्र शर्मांच्या "राम का गुणगान करीये" या शब्दात. विठूच्या लडिवाळ घरगुती रुपापेक्षा थोडं वेगळं - भद्रता आणि युगायुगांची सभ्यता ह्यांचं प्रतीक अशा प्रभु रामांचं रुप.

तिथून सूरगंगा परत पंढरीकडे वळली; कारण वारकरी संप्रदायासाठी ईश्वरीय तत्व एकच असलं तरी त्याचं सर्वात आवडतं दृष्य रूप माऊली असलेल्या विठोबाचं. हा एकमेव देव असा जो पुरूष असून भक्तांनी त्याला माऊलीचा दर्जा दिला. आईच्या प्रेमाप्रमाणेच सर्वसमावेशक आणि सर्वत्र असणारे रूप. आणि म्हणूनच संत नामदेव म्हणाले होते "तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल देव विठ्ठल देवपूजा विठ्ठल".

संत कान्होपात्रानी वैकुंठीचा राणा, विठ्ठल, वसुदेवनंदन, गोविंद, रखुमाईचा कांत अशा विविध नावांनी त्याचा धावा केला की मला सांभाळ. परन्तु नावं वेगवेगळी असली तरी शेवटी तोच एक विठ्ठल सखया आणि म्हणूनच गदिमा म्हणतात त्याप्रमाणे इंद्रायणी काठची आळंदी हेच एकमेव सुखनिधान.

संतांच्या विठ्ठलप्रेमातून उचंबळून आलेल्या साध्या सोप्या भाषेतल्या पण अतिशय परिणामकारक अशा अभंगांची अस्सल शास्त्रीय संगीताच्या माध्यमातून चाललेली ही अद्वितीय श्रवणगाथा जवळजवळ संपत आली. पण इतक्या सुरेख सूरप्रवासाची सांगता देखील तशीच देखणी व्हायला हवी. ईश्वरीय तत्व अखेरीस एकच असलं तरी शिव आणि शक्ती , विष्णू आणि लक्ष्मी ही देवाची पुरूष व स्त्री रुपं  सृष्टीतील समता व समतोल ह्यांचं प्रतीक आहे हे लक्षात घेता तो समतोल साधला गेला जयतीर्थचा खास स्वत:चा ठसा असलेल्या "सौभाग्यदा लक्ष्मी वारम्मा" या देवीच्या प्रशंसा गीताने. जय जय रामकृष्ण हरी ने श्री गणेशा झालेल्या सूरप्रवासाची सांगता सौभाग्यदा लक्ष्मी ने झाली आणि आम्हा भाग्यवान श्रोत्यांच्या कानात ही अप्रतिम श्रवणगाथा गुंजत राहिली.

ह्या पूर्ण गानसोहळ्यात वाद्यवृंदातील साई बॅंकरचा तबला, आदित्य ओकची पेटी, एस आकाशची बासरी, सूर्यकांत सुर्वेची झांज, डफली, चिपळ्या आणि प्रकाश शेजवळचा पखवाज ह्या सर्वांची अफलातून साथ लाभल्यामुळे अधिकच मजा आली. संगीतानंदात श्रोत्यांप्रमाणेच किंवा त्यांच्यापेक्षा देखील अधिक रंगून जाऊन कला सादर करणाऱ्या या कलाकारांचे प्रफुल्लित चेहरे पहात कानात सूर साठवता साठवता ही सांगितिक वारी संपल्याचं लक्षात येण्यासही वेळ लागला.

कार्यक्रम संपला तेव्हा रंजनी गायत्रीची वेगळ्या ढंगाची गायकी, त्यांच्या  सफाईदार मराठी उच्चारांचं कौतुक, त्यांचा  एकत्र गातानाचा सुरेख ताळमेळ, रंजनीच्या आवाजातील एक स्वाभाविक बसकेपण तर गायत्रीची सटकन जाणारी तान, जयतीर्थचा दमदार गळा, मैफिलीच्या सांगतेसाठी त्याने गायलेलं सौभाग्यदा लक्ष्मी, वाद्यवृंदाने दिलेली अप्रतिम साथ आणि शशी व्यासचं समयोचित नेमकं निवेदन हे सगळं तर आठवत होतंच. पण; वैयक्तिक रित्या मी एका ओळीने झपाटलो गेलो होतो - तुका पंढरीसी गेला ! पुन्हा जन्मा नाही आला !

त्या पंढरीच्या भूतानी मलाही असं झपाटावं की मी पुन्हा जन्मा येऊ नये - अपवाद फक्त "बोलावा विठ्ठल" च्या गान सोहळ्याचा असावा.

- मनिष मोहिले





Wednesday, May 15, 2019

तुम सी

कभी बेपनाह बरस पडे
कभी गुम सी हैं
यह बारिश भी
कुछ-कुछ तुम सी हैं

या वरून

कभी बेपनाह बरस पडे
कभी गुम सी हैं
यह बारिश भी
कुछ-कुछ तुम सी हैं

कितनी भी मिन्नते करो
दस्तक फिर भी देती नही
बिन बुलाये आती कभी
यह यादें भी कुछ तुम सी हैं

कभी पलकें भारी कर दे
और कभी मिटने न दे
यह जो नींद हैं
यह भी कुछ तुम सी हैं

कभी भीड में तन्हा रक्खें
तनहाईमें मेला कभी
यह जो आशिकी हैं
यह भी कुछ तुम सी  हैं

सबसे ज्यादा जरुरत हो जब
मिलने कभी आते नहीं
कभी बेवजह ही टपक पडे
यह अश्क भी कुछ तुम से हैं

दिनो तक मिलना न हो
मानो की रमदान हैं
मिलते ही मिठी इफ्तारी
यह ईद भी कुछ तुम सी हैं

--  © मनिष मोहिले