Monday, February 24, 2020

एक उत्तर

बरेच दिवसांपूर्वी व्हॉट्सॅपवरती एक निनावी पोस्ट आली. फॉरवर्ड होत आली माझ्याकडे.
विषय होता श्रीकृष्णाच्या महानिर्वाणानंतर स्वर्गात श्रीकृष्णाची व राधेची भेट झाल्यावर त्यांच्यात झालेला संवाद.

असा संवाद ज्यात राधेनी श्रीकृष्णाला सांगितलं की गोकुळीचा कान्हा ते भारतीय युद्धाचा कर्ता करविता द्वारकाधीश ही खरंतर श्रीकृष्णाची अधोगती आहे.
युगानुयुगं जग, गीता सांगणाऱ्या योगेश्वर कृष्णापेक्षा राधेच्या कृष्णाला जास्त जवळचा मानेल अशा अर्थाचं ते पोस्ट.

ते वाचून माझ्या मनात आलं की योगेश्वर असलेल्या भगवान श्रीकृष्णानी यातील प्रत्येक मुद्द्याला संयुक्तिक उत्तर तर दिलंच असेल. काय उत्तर दिलं असावं बरं ?

आणि ते उत्तर मी माझ्या दृष्टीने शोधण्याचा  प्रयत्न केला.

तर ते उत्तर वाचण्या आधी मूळ उतारा वाचणं अधिक उचित ठरेल.

मूळ उतारा जो whatsapp वर निनावी फॉरवर्ड म्हणून आला तो खाली देत आहे.

श्रीकृष्णाला सगळं जग महाज्ञानी, अत्यंत चतुर, उत्तम वक्ता म्हणून ओळखतं. महाभारतातील कुरुक्षेत्र युद्धाआधी कौरवांकडे युद्ध टाळण्यासाठी म्हणून पांडवांचा दूत बनून श्रीकृष्णच गेला होता. राधा आणि कृष्ण ह्यांचं प्रेम अमर आहे. ह्याच राधेने कृष्णाला 'प्रेम' काय असते ते सांगून निरुत्तर केले त्याची ही कथा …. 

एकदा स्वर्गात कृष्ण आणि राधा समोरासमोर आले. गोकुळातून गेल्यापासून राधा आणि कृष्ण कधीच भेटले नव्हते. अचानक समोर आल्यावर कृष्ण गडबडला आणि राधा शांतचित्त होती. गांगरून कृष्ण काही बोलण्याआधी स्मित वदनाने राधा म्हणाली "कसे आहात द्वारकाधीश !!" जी राधा त्याला 'कान्हा' 'कान्हा' म्हणायची तिने "द्वारकाधीश" असे संबोधल्यावर कृष्ण नाराजीने म्हणाला "राधे, मी आज ही तुझा कान्हाच आहे. तू तरी मला द्वारकाधीश म्हणू नकोस …! खूप दिवसांनी भेटतो आहोत, एकमेकांशी सुख दुःखाच्या गप्पा मारू. एवढ्या धावपळीत मला जेव्हा जेव्हा तुझी आठवण यायची तेव्हा तेव्हा माझ्या डोळ्यातून अश्रूंची धार लागत होती"

राधा म्हणाली " खरं सांगू ? मला असं काहीच होत नव्हतं. मला कधीच तुझी आठवण आली नाही की तुझ्या आठवणीने डोळ्यातून पाणी आले नाही. कारण तुझी आठवण यायला मी कधी तुला विसरलेच नाही. आणि माझ्या नजरेत तूच होतास त्यामुळे अश्रूंबरोबर तू वाहून जावू नयेस म्हणून मी कधी रडलेच नाही. प्रेम विसरून तू मात्र काय काय हरवून बसलास ते सांगू?"

श्रीकृष्ण ऐकतच राहिला. राधा म्हणाली "तुला कदाचित कटू वाटेल पण हे सत्य आहे …. गोकुळातून गेल्यापासून तू आम्हाला कोणाला कधीच भेटला नाहीस, तू खूप मोठा झालास, तुझी कीर्ती तिन्ही लोकांत पसरली. पण ह्या प्रगती मध्ये तुझी किती अधोगती झाली? यमुनेच्या पवित्र, गोड पाण्यानी तुझे आयुष्य सुरु झाले, त्या पाण्यावरच तू वाढलास आणि समुद्राच्या खाऱ्या पाण्यापाशी जावून पोहोचलास ( द्वारका समुद्रकिनारी होती/आहे ). एका बोटावर फिरणाऱ्या सुदर्शन चक्रावर भरोसा ठेवलास पण दहा बोटांनी वाजणाऱ्या बासरीला विसरलास? कान्हा, जेव्हा तू प्रेमाच्या सान्निध्यात होतास तेव्हा एका बोटावर गोवर्धन उचलून हजारो जीव वाचवलेस आणि प्रेमापासून दूर गेल्यावर सुदर्शन चक्राने कित्येक जीव घेतलेस? कान्हा आणि द्वारकाधीश ह्यांत काय फरक आहे सांगू ….? तू कान्हा असतास तर तू सुदामाच्या घरी गेला असतास, सुदामाला तुझ्या घरी झोळी पसरून यावं लागलं नसतं!! प्रेम आणि युद्ध ह्यांत हाच मोठा फरक आहे … 'युद्धात जीव घेतला जातो आणि प्रेमात जीव ओवाळून टाकला जातो'. कान्हा, प्रेमात माणूस स्वतः दुःखी राहू शकतो पण दुसऱ्याला दुःखी करु शकत नाही !! तू तर त्रैलोक्याचा स्वामी आहेस, महान भगवद् गीता तू जगाला सांगितलीस पण तू स्वतः काय निर्णय घेतलास? तू राजा होतास, प्रजेचा पालक होतास आणि तुझे सैन्य तू कौरवांना देवून टाकलेस? तू स्वतः अर्जुनासारख्या महारथीचा सारथी बनलास, त्याचा मार्गदर्शक बनलास, ज्या अर्जुनाने तुझे सैन्य तुझ्यासमोर मारून टाकले? तुझे सैन्य तुझी प्रजा होती ना आणि प्रजा ही स्वतःच्या मुलांप्रमाणे असते ना? तुझ्यातील प्रेम भावना नष्ट झाल्यामुळेच तू असा विनाश बघू शकलास !! इतका तुला अभिमान होता ना तुझ्या सामर्थ्याचा? मग जा, पृथ्वीवर जावून बघ …. तुझी द्वारकाधीशवाली प्रतिमा शोध. नाही सापडणार तुला शोधूनही !! जिथे जाशील तिथे घरांत, मंदिरात सर्वत्र तुझ्या बाजूला तुला मीच उभी असलेली दिसेन. 

"होय, कान्हा मला गीतेचे महत्व माहिती आहे. आज ही पृथ्वीवर गीता माणसांना ज्ञान देते, मार्ग दाखवते. माणसं ही गीतेला पुज्य मानतात पण ते भरवसा मात्र युद्ध करणाऱ्या द्वारकानरेश श्रीकृष्णावर नाही तर प्रेम करणाऱ्या कान्हावर ठेवतात. गीतेमध्ये माझा - राधेचा - तर दुरून ही उल्लेख नाहीये पण आजही लोकं गीतेचा- तुझ्या महान भगवद् गीतेचा- समारोप करताना……… 'राधेकृष्ण राधेकृष्ण' असाच जप करतात !!! हीच ती प्रेमाची खरी ताकद …… !!"

आता यावर मला सुचलेलं, श्रीकृष्णाने दिलेलं उत्तर.

कृष्णाचं राधेला उत्तर - 

वरवर पहाता तू म्हणतेस ते खरय सखी! कान्हा ते द्वारकाधीश ही माझी अधोगती आहे असंच चित्र दिसतं. 

मी सुदाम्याकडे गेलो नाही तर सुदामा माझ्याकडे आला. माझ्या सैन्याला मी कौरवांच्या बाजूने लढायला पाठवलं आणि ते रणांगणात मृत्यूमुखी पडले. मी यमुनेच्या गोडव्यापासून निघालो आणि समुद्राच्या खारट पाण्यापर्यंत पोचलो. 

पण ह्या संपूर्ण विराट नाट्यात, मी जसा लेखक व दिग्दर्शक आहे तसाच एक पात्र देखील आणि त्या पात्राच्या तोंडचे संवाद व त्याची कृत्यं ही मला एकनिष्ठपणे निभावीच लागणार. कारण ह्या विराट नाट्याचा कर्ता धर्ता सबकुछ असलो तरी संहीतेबाहेर जाण्याचं स्वातंत्र्य मलादेखील नाही राधे.

हो, मी सुदाम्याकडे नाही गेलो. हो, सुदाम्याला माझ्याकडे यावं लागलं. पण मी जर असाच त्याच्याकडे गेलो असतो आणि त्याने न मागताच त्याला मदत केली असती तर भगवंत विनासायास प्रसन्न होतात असं झालं असतं. त्याहीपेक्षा, निराश होऊन परतलेल्या सुदाम्याला प्रचंड वैभव मिळालं ह्यात जो अनपेक्षित चमत्कार होता त्यामुळे सुदाम्याचा स्वत:चा आणि संपूर्ण जगाचा माझ्या मैत्रीवर विश्वास जडला की सच्च्या मित्राला वासुदेव वाऱ्यावर सोडत नाही. मी तर मदत करणारच होतो गं राधे ! पण सुदाम्याच्या मैत्रीच्या खरेपणाचं महत्व जनांवर बिबवणं गरजेचं होतं. भगवंताकडे जाण्याचे कष्ट घ्या तरच तो तुम्हाला पावेल. खाटल्यावर हरी मिळणार नाही. तू म्हणतेस तसं मी गेलो असतो स्वत:हून तर ती माझी आणखी एक कथा झाली असती. पण सुदामा माझ्याकडे आला म्हणून आज जग "सुदाम्याची गोष्ट" सांगतं आणि ऐकतं.

हो, मी माझ्या सैन्याला कौरवांच्या बाजूने लढायला पाठवलं आणि ते युद्धात मृत्यूमुखी पडले. पण ते पांडवांकडून माझ्या बाजूने लढले असते तरी परिणाम तोच होणार होता. ते युद्ध हे फक्त कौरव पांडवांचं युद्ध नव्हतं. आर्यावर्तातील प्रत्येक राजाला स्वत:च्या सद्सद्विवेकबुद्धीप्रमाणे योग्य अयोग्य यात निवड करायची होती. हे युद्ध योग्य व अयोग्य, धर्म व अधर्म ह्यातील समतोल साधण्यासाठी होतं.  तुला काय वाटलं की पांडव फक्त धर्मानीच वागले ? नाही. फक्त त्यांच्या योग्य व धर्माच्या बाजूनी केलेल्या कृती ह्या जास्त होत्या आणि त्यामुळे त्यांचं पारडं जड करायला मी त्यांच्या बाजूने होतो. पांडवाच्या बाजूने लढणाऱ्या राजांनाही ह्याची कल्पना होती. म्हणूनच समतोल साधताना आणि युद्धाचा अपरिहार्य परिणाम म्हणून पांडवांच्या सैन्यातही खूप जीवितहानी झाली. 

मग युद्ध हाच एकमेव क्रूर मार्ग शिल्लक होता का ?

तू बरोबर बोललीस सखे की; युगानुयुगं जग, भारतीय युद्धात गीतेद्वारे कर्मयोगाचं महत्व सांगणाऱ्या श्रीकृष्णाला दूर देव्हाऱ्यात वा मंदिरात बसवेल; पण राधेच्या कान्हाला मात्र हृदयात जागा देइल. कारण युद्धातील सर्वंकष विनाशापेक्षा मृत्यूनंतरही शाश्वत रहाणारं प्रेम जगाला अधिक भावेल आणि जवळचं वाटेल. 

अगं वेडे, ते महत्व तसं ठसावं ह्याच साठी तर हा सगळा मांड मांडून मोडावा लागला. अन्यथा वैयक्तिक स्वार्थ, महत्वाकांक्षा, विषयलोलुपता, धर्मबाह्य वर्तन ह्या चिखलात अडकलेल्यांचा अंत सहज होऊन दिला असता तर जगाला त्यातील क्रौर्य व विद्रूपता इतक्या प्रकर्षानी जाणवली असती ? आणि ते इतक्या सहजपणे राधाकृष्णाच्या प्रेमाकडे ओढले गेले असते ?

हो, मी यमुनेचा गोडवा सोडून खारट समुद्राकडे आलो. पण सखे, ती यमुनासुद्धा शेवटी सागरालाच जाऊन भेटते आणि सागरात समर्पित होते. त्याच खारट पाण्याच्या वाफेतून ढग बनतात आणि संपूर्ण वसुधेवर गोड पाण्याची वर्षा घडवतात. यमुनेसारख्या जीवनदायिनी अशा असंख्य नद्यांचा जीवनरस कायम ठेवतात. नदी हे स्त्री रुप आहे आणि म्हणून स्वाभाविकपणे गोड आहे. समुद्र हा "तो समुद्र" आहे आणि म्हणून खारटपणा अंतरात ठेवूनही त्याला तिचा गोडवा सांभाळण्यासाठी ताप सहन करून पाऊस पाडायला कारणीभूत व्हावं लागतं. सागर आहे म्हणून नद्या आहेत आणि नद्या आहेत म्हणून सागर आहे.

ह्यात माझं मोठेपण नाही. प्रत्येकाची प्रकृती आणि कृती ह्यातील समरसता रहावी हा निसर्ग नियम आहे. 

असो. खूप गंभीर वळण लागलं; नाही ?

आता दुसरा मुद्दा - आपलं प्रेम. तिथेही तू म्हणालीस ते खरं - तू कायम मला तुझ्या जवळच ठेवलस आणि म्हणून माझी आठवण काढलीच नाहीस. कारण तू मला विसरलीच नव्हतीस.

पण राधे, मी तुझी आठवण काढत होतो ह्याचा अर्थ असा नाही सखे की मी तुला विसरलो होतो. पण तुझ्या सहवासाची, तुझ्याबरोबरच्या शाब्दिक आणि अबोल पण नजरेच्या संवादाची इतकी सवय झालीये सखे की तू मनात वसत असून सुद्धा जवळ नाहीस हे तीव्रतेनी जाणवत राहतं आणि त्या विरहातून आठवणी अश्रूरुपे वाहू लागतात.

अव्यक्त प्रेम सुरेख असतंच सखे ! पण म्हणून अव्यक्त प्रेमच श्रेष्ठ वा सुंदर आणि व्यक्त झालेलं प्रेम उथळ असं थोडंच आहे ?
असं तर आत्मिक सौंदर्य सर्वश्रेष्ठ. ते व्यक्त होत नाही. आपल्या आत पहावं तेव्हा दिसतं. पण तरीही इतकी सुंदर सृष्टी बनलीच आहे नं गं सखे ? ती सृष्टी का खोटी ? ते सौंदर्य का खोटं ? त्या सौंदर्याचं, प्रेमाचं वर्णन करता यावं म्हणून देवी सरस्वती नी वैखरीचं रुप घेतलं. तिच्या ह्या रुपाच्या पूजेचं साहित्य म्हणजे शब्द. 

सरुपाचं स्वत:च महत्व आहे आणि सरुप आहे म्हणूनच अरुपाला त्याचं महत्व आहे. शब्द आहेत, शब्दांचा संवाद आहे म्हणून अबोलाचा महिमा आहे.

म्हणून कधीतरी नि:संदिग्ध शब्दात प्रेमाचा उच्चार करावा. मला तुझा आठव येतो असं आपल्या प्रिय व्यक्तीला सांगावं. आठव येतो ह्याचा ह्याचा अर्थ हा नाही की मी तुला विसरलो. आणि तू विसरलीच नसलीस मला, तरी माझी आठवण काढणं, मला ते सांगणं, हाक मारून सांगणं ह्यात प्रेम कमी झालं वा प्रेमाची सत्यता कमी झाली असं मानण्याचीही गरज नाही.

म्हणून आता तरी मला " कान्हा " म्हणून शब्दात पुकारून पहा राधे ! हाक देऊन पहा ! मी ओ द्यायच्या आधीच तुझी हाकच तुला सांगेल - मी अजूनही तोच कान्हा आहे - माझ्या राधेचा कान्हा !!  

--- मनिष मोहिले