Saturday, April 3, 2021

अरे अरे ज्ञाना झालासी पावन

लहानपणीच्या माझ्या आठवणीं मधील एक आठवण म्हणजे शाळेसाठी सकाळी लवकर उठायचो तेव्हा आकाशवाणीवर ऐकू येणारी अभंगवाणी - सकाळी सहा सव्वासहाला कानावर पडणारे ते सूर - बहुतांशी लताच्या दिव्य आवाजातले. ज्ञानेश्वर, तुकाराम ह्यांच्या भक्तीरसाने ओथंबलेल्या अभंगांना लताच्या दैवी आवाजात ऐकताना तेव्हासुद्धा अंगावर नकळत रोमांच उभे रहायचे. नक्की का ते तेव्हा कळायचं नाही. मात्र जाणवायचं की हे जे शब्द आणि सूर एकत्र हातात हात गुंफून येताहेत् भेटीला ते काहीतरी अद्भुत् अन् दिव्य आहे. आज त्या ध्वनीपरिणामाच्या पलीकडे जाऊन अभंगाचं अन्तस्थ सौंदर्य जाणवतं आणि जाणवते एक अनामिक साद - ईशतत्वाच्या जवळ बोलावून नेणारी. त्या सूरांच्या माध्यमातून शब्दां मध्ये असलेलं "ऐश्वर्य" आपल्यापर्यन्त पोहोचवणारी.

अशा काही अप्रतिम अभंगांपैकी एक - अरे अरे ज्ञाना झालासी पावन. माऊलींच्या अनेक अप्रतिम रचनांपैकी एक अत्युत्तम अभंगरचना.

संपूर्ण विश्वासाठी पसायदान मागणाऱ्या माऊली जेव्हा आत्मज्ञान प्राप्त झालेल्या  त्या क्षणाबद्दल लिहीतात तेव्हा किती सहज शब्दात स्वत:ला त्रयस्थाच्या नजरेतून बघतात आणि म्हणतात

*अरे अरे ज्ञाना झालासी पावन
तुझे तुज ध्यान कळो आले !!१!!
तुझा तूची देव तुझा तूची भाव
मिटला संदेह अन्यतत्वी !!२!!*

आध्यात्मिक शिक्षणातील सर्वोच्च पदवी प्राप्त करून घेताना स्वत:ला सहज एखाद्या बिगरीतील विद्यार्थ्याप्रमाणे ज्ञाना म्हणून सन्बोधत त्रयस्थ बनून तो क्षण अवलोकायचा हे अवतारी व्यक्तीलाच शक्य आहे.
हे असं स्वतःमधून स्वतःला बाजूला करून बघायचं आणि मिळालेल्या आत्मज्ञानाची
जाणीव करुन द्यायची की तुला तुझी स्वत:ची ओळख पटली ना आता ! आजपर्यंत तू जगभर शोधत राहिलास त्या परमात्म्याला - मूर्तीत,तसबीरीत. पण तो तर तूच आहेस. अरे तूच तुझा देव आहेस ज्याची तू भक्तीभावाने आराधना करत होतास. तो देवही तूच आहेस आणि त्याला तुझ्या जाणीवेत, चित्तात, आत्म्यात प्रकट व्हायला लावणारा तो भाव - तोदेखील तूच. तुझं ईशतत्वाबरोबरचं हे जे अद्वैत तुला आता आकळलं आहे नं; त्यामुळे तुझंअस्तित्व पावन झालं आहे. ह्या चार ओळीं मधून माऊली, नावापुरताही अहंं न ठेवता, अहं ब्रह्मास्मि ची जाणीव,  तत्वमसिच्या मार्गाने किती सुरेख पद्धतीने करून देतात.

*मुरडूनिया मन उपजलासे चित्ते
कोठे तुज रिते न दिसें रया !!३!!*

विविध विषयांच्या अधीन असलेल्या चंचल मनाला मुरड घालून हे ब्रह्मतत्व जेव्हा तिथे प्रगट होते तेव्हा अशी एकही जागा रहात नाही मनात की जी त्या परमतत्वावाचून रिकामी / रिती राहिली असेल. त्या ब्रह्मतत्वाची मनाशी अशी एकरुपता होते की एरवी सतत वेगवेगळय़ा विषयांकडे धावणारे मन, ब्रह्मतत्व द्रुगोच्चर झाल्यावर पूर्णपणे त्या परमतत्वातच मिसळून जाते. जणू मनात एकही जागा, कोनाडा, कोपरा असा रहात नाही जिथे ब्रह्मतत्वाशिवाय इतर कुठल्या विचार, ईच्छा, वासना, कामना ह्यांना थारा असेल. आजच्या तारखेला देखील जे अध्यात्ममार्गावर, ईश्वराबरोबरची आत्म्याची अद्वैत अवस्था जाणून व प्राप्त करुन स्थिर आहेत, अशा जनांच्या बोलण्यात वा लेखनात नीलबिंदूच्या अनुभवाचा व त्या अनुभवाशी निगडीत असीम अवर्णनीय आनंदाचा उल्लेख येतो तो ऐकताना वा वाचताना देखील आपण अन्तर्बाह्य थरारून जातो. जे चराचरात भरून आहे अशा ईशतत्वानी मन, चित्त पूर्ण भरून आणि ारून जाण व अस्तित्व पावन होणं हे स्वाभाविकच आहे.

*दीपकी दीपक मावळल्या ज्योती
घरभर वाती शून्य झाल्या !!४!!*

ज्ञानाचा दीपक अज्ञानाचा अंधार दूर करतो. मनुष्याच्या आयुष्यात पाच ज्ञानेंद्रिये जाणीव करून देतात आणि बुद्धी त्या जाणीवरुपी माहितीतून ज्ञान मिळवते. पंचेंद्रिये ह्या वाती, बुद्धीचे इंधन आणि त्यातून ऊजळणारा ज्ञानाचा दिवा जो अज्ञानाचा अंधार दूर करतो. पण माणसाचं मन हे ह्या सर्वांपेक्षा अधिक शक्तीशाली व कुशल असते; आणि जेव्हा ते मन आत्माज्ञानाने आतून उजळून निघते तेव्हा ज्ञानेंद्रियांची व किंबहुना बुद्धीचीही गरज रहात नाही. मनरुपी दीपकच अखंड प्रकाशाचा स्त्रोत बनून उजळत रहातो. जेव्हा संपूर्ण दीपकच स्वयंप्रकाशी बनतो तेव्हा ज्ञानेंद्रियांच्या वाती वा बुद्धीचे इंधन ह्याची गरज उरत नाही. ह्यात पंचेंद्रिये वा बुद्धी ह्यांचे महत्व कमी होत नसून मनाच्या मूळच्या व परमतत्वाबरोबर एकरुप होऊन जे प्राप्त होते त्या सामर्थ्याचे महत्व प्रतिपादित करण्याचा उद्देश आहे. असा हा मनरुपी दीपक स्वयंप्रकाशित होतो तेव्हा ज्यात त्या मनाचा निवास असतो ते अस्तित्व पावन होते.

*वृत्तीची निवृत्ती आपणांसकट
अवघेची वैकुंठ चतुर्भुज !!५!!*

आता जीव हाच शिव झाला. दुजाभाव म्हणून उरला नाही. मग जेव्हा अस्तित्वच एक झाले तेव्हा वेगळी वृत्ती कुठून शिल्लक रहाणार ? त्या वृत्तीची सहजनिवृत्ती होणे स्वाभाविकच आहे. अशी जेव्हा जीवा शिवाची एकात्मता होऊन वृत्तीची निवृत्ती होते तेव्हा त्या वैकुंठाच्या राणाशी हे क्षुद्र अस्तित्व जणू चतुर्भुज होते. हे मीलन युगानुयुगांचेच नाही तर अनंत काळासाठी कायमसाठी आहे. ह्या ब्रह्मांडातील दरेक जीव जेव्हा त्या वैकुंठीच्या राणाशी चतुर्भुज होईल तो खरा आनंदाचा दिनु. पण एक एक जीव शिवरुप होणे, विठ्ठलमय होणे हीच त्या दिवसाप्रतीची वाटचाल. जीवामधील ब्रह्मा विष्णू महेश आणि आदिमाता, जगदंबा ह्यांच्या एकरुपतेची जाणीव होत ब्रह्मतत्वात विलीन होणे हाच तो चतुर्भुज होण्याचा सोहळा.

*निवृत्ती परम अनुभव नेमो
शांतीपूर्ण क्षमा ज्ञानदेवो !*

वडीलबंधू निवृत्तीनाथांनी दाखवून दिलेल्या मार्गाने जात नित्यनेमाने साधना केल्यामुळेच हा परमानंदाचा परमसुखाचा अनुभव आपल्याला प्राप्त झाला ही नम्र जाणीव ज्ञानेश्वर ठेवतात - ह्यासाठी की अध्यात्ममार्गावर चालत राहून अंतिम ध्येयाप्रत पोहोचण्यात सद्गुरूंचे मार्गदर्शन किती अमोल आहे हे जनांच्या मनावर ठसावे. आणि त्या ध्येयाप्रत पोहोचताना अंगी दया, क्षमा, शांती हे सद्गुण सहजच अंगी बाणले जावेत. किंवा ज्ञानेश्वरांसारखा अवतारी पुरूष अगदी सहज ह्या मार्गावर मार्गक्रमणा करताना कळत नकळत होणाऱ्या चुकांच्या परिमार्जनार्थ शांतीपूर्ण क्षमेची प्रार्थना करण्याचेही ह्या ओळीं मधून दर्शवित असेल. किंबहुना तसेच असावेसे मला वाटते. अन्यथा पोटी अमाप दया, क्षमा, शांती व करुणा असल्याखेरीज व ह्रुदयी परमानंद असल्याखेरीज आणि अस्तित्व विठ्ठलमय ज़ालेले असल्याखेरीज अवघ्या विश्वासाठी "पसायदान" मागता येणे सर्वथैव अशक्य आहे.

*अरे अरे ज्ञाना झालासी पावन*

अध्यात्म आणि मोक्ष - ह्यांचा नेमका शब्दानुभव देणारा हा अद्भुत अभंग.

पण आजच्या भौतिकवाद, चंगळवाद ह्यांचा बुजबुजाट असलेल्या ह्या युगात आपल्यासारख्याला ही एवढी प्रचंड विचारझेप शक्य आहे ?

माझ्या मते भौतिक सुखांच्या मागे लागून आपण जी मन:शांती गमावून बसलो आहोत त्याची जाणीव होऊन आपल्याला खरोखर कशामध्ये आनंद मिळतो, समाधान मिळते, मन:शांती मिळते इतक्यापुरता जरी आपण "स्व" चा शोध लावला किंवा ते प्रयत्न चालू ठेवले तरी खूप. मोठे घर, मोठी गाडी, अधिकाधिक चैनीच्या वस्तू ह्यात सुख व समाधान नाही हे कळून कोणत्या गोष्टीँमध्ये, छंदांमध्ये आपल्याला ते मिळते हे कळले तरी वैकुंठीच्या राणाशी चतुर्भुज होण्याच्या दिशेने एक पाऊल आपण पुढे टाकले असे म्हणता येईल.

त्या "ध्यानाचे" परमतत्वाबरोबर असलेले एकात्म वा अद्वैत जाणवणे ही फार पुढची पायरी झाली महाराजा. सजगपणे चालत राहू तेव्हा आपलें पूर्वजन्मीचे संचित, ह्या जन्मीची कर्मे आणि सद्गुरूंची कृपा ह्यांच्या आधारे हा भवसागर तरून जाऊ तेव्हा जाऊ. पण तोपर्यन्त "स्व" शी प्रामाणिक राहिलो तरी अस्तित्व पावन होईल ही खात्री बाळगायला हवी.

तोपर्यंत रोजच्या जीवनातील छोट्या गोष्टीं मधला आनंद शोधू ज्यात आपल्याला समाधान आहे, शांती आहे आणि आपण "स्वस्थ" राहू ह्याची खात्री आहे.  स्वस्थ म्हणजे काय तर जो स्वत:मध्ये स्थिर आहे - मला स्वतःला खरे सुख व आनंद कशात आहे हे कळून त्यात स्थिर रहाणे म्हणजेच "स्वस्थ" रहाणे.

त्या अर्थाने आपण "स्वस्थ" झालो तरी आपण म्हणू शकतो की

*अरे अरे ज्ञाना झालासी पावन
तुझे तुज ध्यान कळो आले !

---- मनिष मोहिले