Saturday, March 12, 2022

भिन्न षड्ज आणि सहेला रे

काही वर्षांपूर्वी प्रशांत जोशी ह्या माझ्या जीवश्च कंठश्च मित्राकडून भिन्न षड्ज ह्या अमोल पालेकर दिग्दर्शित वृत्तपटाबद्दल ऐकलं होतं. गानसरस्वती किशोरीताई आमोणकर ह्यांच्या वरील हा वृत्तपट. त्यावेळेस तो बघायचा राहून गेला ह्या ना त्या कारणाने. मात्र, काल एकदम आठवण झाली आणि तासाभराचा तो वृत्तपट बघितला आणि थरारून गेलो.

वास्तविक पहाता, ह्या वृत्तपटात किशोरीताई मुलाखीदरम्यान बऱ्यापैकी वेळ शास्त्रीय संगीतातील बारकावे त्यांच्या तप:सिद्ध स्थानावरून उलगडून दाखवतात जे माझ्यासारख्या शास्त्रीय संगीताच्या श्रवण विद्याभ्यासात बिगरीला असलेल्या व्यक्तीस कठीण आणि कंटाळवाणं वाटू शकतं. पण ते तसं वाटत नाही कारण त्याबरोबर उलगडतो किशोरीताईंचा गानप्रवास आणि त्यामागची त्यांची मनोधारणा आणि विचारधारा. जोडीला तानपुरा वा संवादिनीच्या साथीने असलेला वातावरण भारून टाकणारा तो स्वर्गीय सूर.

अभिजात शास्त्रीय संगीताचा त्यांचा अभ्यास, मनन, चिंतन, त्यासहीत होणारा रियाज आणि त्यातून उमलणारं त्यांचं संगीत हा एक अविस्मरणीय दैवी प्रवास आहे हे आपल्याला जाणवत रहातं.

लयीच्या गतीने चालणारी, दोन श्वासांच्या मध्ये सामावणारी आलापी, शक्य तेवढे निखळ सूर, जे सूर नाहीत ते शक्य तेवढं टाळणं, शुद्ध आणि अचूक शब्दोच्चार जे सूरांच्या सौंदर्याला निखरवतील पण कमी करणार नाहीत असं गाणं ही, किशोरी ताईनी विषद केल्याप्रमाणे जयपूर अत्रौली घराण्याची गान शैली. वृत्तपटातील इतर दिग्गज कलावंतांच्या मुलाखतीतून  समजलेलं वास्तव हे की किशोरी ताईंच्या गाण्याची खासियत होती ती ही; की ह्या मुख्य नियमांना सांभाळल्यानंतर, निव्वळ घराण्याचं तथाकथित निखळपण जपण्यासाठी स्वतंत्र शैली, स्वतंत्र गानविचार ह्याना दूर न सारता, शास्त्रीय संगीतातील अभिजातपणा जपत त्यांनी उलट ह्या स्वातंत्र्याचा स्वीकार केला, किंबहुना त्या त्याच्या प्रणेत्या होत्या.

त्यांनी स्वतःच म्हटल्याप्रमाणे, आहत नादाकडून अनाहत नादाकडे त्यांचा जो प्रवास होता त्या प्रवासाचा परिपाक हे ती स्वतंत्रता आहे. आणि म्हणूनच एका रागातील रिषभ दुसऱ्या रागात कसा श्रवण परिणाम देईल किंवा एका रागात अल्प असलेला पंचम तसाच अल्प ठेऊनही इतर स्वरांच्या लालित्यातून काही वेगळा ध्वनीपरिणाम साधता येईल का असा विचार त्या करायच्या. जवळपास एक दशक, आवाज गेल्यामुळे (गाणं सोडा, बोलणं देखील बंद), बाहेर ऐकू येईल असं गाणं गाता येत नसताना संगीतावरील अतीव श्रद्धा व प्रेमामुळे स्वतःच्याआतमध्ये गान साधना त्यांनी चालू ठेवली. शास्त्रीय संगीताचं मनन, चिंतन व अध्ययन केलं आणि गान तपस्विनी म्हणून ते दशक त्यांनी व्यतीत केलं म्हणून त्या गानसरस्वती होऊ शकल्या.

गाताना श्रोत्यांचे मनोरंजन नाही तर आत्मरंजन व्हायला हवं ह्या एका वाक्यातून त्यांची शास्त्रीय संगीत सादर करण्यामागची मनोभूमिका प्रत्ययास येते. संगीत हे नाद "ब्रह्म" आहे आणि आत्म्याची ब्रह्माशी एकरूपता हेच ह्या आत्मरंजनात अभिप्रेत आहे हा विचारच किती शुद्ध आणि उदात्त आहे.
भिन्न षड्ज मध्ये झाकीर हुसैन म्हणतात त्याप्रमाणे संगीतातून निर्वाणाप्रत स्वतः पोचणे आणि श्रोत्यांना बरोबर नेणे हा एक अत्यंत अनगड प्रवास आहे आणि तो प्रवास करून निर्वाणाप्रत पोचणे हे किशोरी ताईंसारख्या तप:पूत कलावंतांच्या बाबतीतच शक्य आहे.

तपस्या, साधना याशिवाय नादब्रह्म अनुभूती शक्य नाही हे त्यांच्यावरील ह्या वृत्तपटातील प्रदीर्घ मुलाखती मधून त्या ज्या व्यक्त झाल्या त्यातून कळतं. कार्यक्रम नक्की करतानाच त्या दिवशी कोणता राग गायचा हे नक्की करून, कार्यक्रमाच्या दिवसापर्यंत त्याचा सराव त्या करत कारण ती वातावरण सिद्धता (निर्मिती नव्हे) करायची. आणि हे सगळं कधी तर बिभासचा सराव सहा महिने, भूपाचा सहा वर्ष अशी साधना प्रत्येक रागामागे केल्यावर. आणि तरीही त्या म्हणतात की मंचावर गायला सुरुवात करताना त्या देवाला प्रार्थना करीत की हा अमुक राग ऊभा करायला, भूपाचा स्वयंभू गंधार लावायला तूच ये. अशी साधना, अशी श्रद्धा, अशी भक्ती असते सूरांवर तेव्हाच कलावती सरस्वती पदाला पोहोचू शकते.

संपूर्ण वृत्तपटात जी सतत जाणवत रहाते ती त्यांची त्यांच्या आई वरील प्रीती आणि गुरू असलेल्या आईवरील भक्ती व आदर. म्हणूनच त्या म्हणतात की माई म्हणायची की षड्जाचा सराव करा. कारण षड्ज म्हणजे सहा सूरांना जन्म देणारा जो सूर तो षड्ज. सा नसेल तर रे आणि रे नसेल तर ग हे ही षड्ज होऊ शकतात. किंबहुना २२x३ अशा सर्व ६६ श्रुती (https://maharashtratimes.com/editorial/samwad/22-shrutis/amp_articleshow/58430691.cms) षड्ज होऊ शकतात आणि म्हणून षड्जाचा सराव करायचा.आयुष्यभर करायचा. असा करायचा की तो षड्ज आता मी षड्ज लावते किंवा लावतो म्हणून काही वैयक्तिक गान क्रिया केल्याच्या आविर्भावात येता कामा नये गाण्यात तर तो त्या रागाचं अविभाज्य अंग म्हणून सहजतेने आला पाहिजे गळ्यातून आणि तसा तो येतो तेव्हा तो स्वर दैदिप्यमान स्वर म्हणून अवघी मैफील भारून आणि थरारून सोडतो.

आता ह्या पार्श्वभूमीवर मी जेव्हा सहेला रे ऐकतो तेव्हा ती बंदिश मला एका वेगळ्याच पद्धतीने आकळते. बंदिशीचे शब्द बघा

सहेला रे, आ मिल गाये; सप्तसुरन की भेद सुनाये !
जनम-जनम को संग न भुले; अब के मिले सो बिछूड ना जाये!

वरवर पहाता,  बऱ्याच काळानंतर भेटलेल्या सख्याच्या जोडीने गायचं, सूरा सूरातील भेद जाणून त्यातील सौंदर्याचं प्राशन करत गायचं. आणि परत त्या सहेलाला ही जाणीव ही द्यायची की आता भेटलो तर परत दूर नको जाऊस - असा ह्या बंदिशीचा शब्दार्थ आणि भावार्थ देखील. मित्र  मैत्रीण,सखा सखी ह्यांच्यातील त्या तरल प्रीतीभावाचा एक अप्रतिम संगीताविष्कार. मैत्रीणीसाठी हिंदीमध्ये जो सहेली शब्द आहे, त्या सहेलीच्या पुरूष रुपासाठी सहेला हा एक वेगळाच अप्रचलित शब्द तिथे आलाय जो काव्यातील शब्दलाघवाचा आनंद देतो तो वेगळाच.

पण भिन्न षड्ज वृत्तपट बघितल्यावर मला असं वाटतं की किशोरी ताईना अभिप्रेत असलेला तो सहेला हा इतर कोणी नसून तो षड्ज आहे. किती काळानंतर तो भेटला आहे. कारण कितीही तप:सिद्ध कलाकार वा कलावती असली आणि तो दैदिप्यमान षड्ज कारकीर्दीत कितीही लवकर प्रथम भेटला असला तरी प्रत्येक वेळेस तो भेटावा यासाठीची तळमळ आणि सराव आयुष्यभराचे असल्यासारखेच असावे लागतात. कारण कलाकाराच्या प्रत्येक कलाविष्कारा साठी त्या कलाकाराला दर वेळेस तितकीच मेहनत करावी लागते. सराव लागतो. रियाज लागतो. आणि त्यानंतर जेव्हा तो षड्ज भेटतो तेव्हा बऱ्याच  काळाने भेटलेल्या सहेल्या प्रमाणेच भासतो.

आणि सहा सूरांना जन्म देणाऱ्या षड्जा खेरीज दुसरा कोणता अधिक सुयोग्य सहेला असू शकतो जो सात सूरांमधील भेद उलगडून दाखवू शकेल ? कारण तो फक्त सप्तकात खालीच नाही तर वर देखील आहे.  खालच्या सा पासून वर चढत जाणारे आणि वरच्या सा पासून खाली उतरत येणाऱ्या सूरांचं लालित्य, त्यांच्यातील समन्वय आणि त्यांच्यातील भेद दाखवणारा तो सखा सहेला.

आणि त्याची त्या बाकीच्या सूरांबरोबरची साथ जन्मजन्मांतरीची. त्या इतर सहा सूरांना जन्म देणारा तो षड्ज. तशीच जन्मजन्मांतरीची साथ त्या गानसरस्वती बरोबरची. तिच्या ईश्वरदत्त तसेच तप:सिद्ध गळ्यातून उमटणारा तो षड्ज. आणि; म्हणून आता भेटलास तर परत विरह नको ही तळमळ अंत:करणात कायम असावी त्यांच्या.

सहेला रे, आ मिल गाये; सप्तसुरन की भेद सुनाये !
जनम-जनम को संग न भुले; अब के मिले सो बिछूड ना जाये!

अर्थात सहा सूरांचा जन्मदाता षड्ज आणि साक्षात गानसरस्वती हे आणि हेच एकमेकांचे जन्मोजन्मीचे सहेली आणि सहेला असू शकतात.

---- मनिष मोहिले.