Tuesday, May 31, 2016

मृद् गंध

परवा रविवारी  संध्याकाळी अहमदाबादला ग्रीष्मानंतरचा पहिला पाऊस पडला. गेले जवळपास दीड दोन महिने अती कडक उन्हाळ्यात भाजून निघालेल्या कोणालाही गार वाऱ्यासहित आलेला तो पाऊस वरदान वाटावं यात नवल ते काय !

आणि त्या ओल्या गारव्या बरोबर आला पहिल्या पावशाशी  युगानुयुगं निगडित असलेला - मृद् गंध - मातीचा सुगंध.

ग्रीष्माच्या प्रखर तापात पोळून निघालेल्या पृथ्वीला आणि समस्त जीवितमात्राना आश्वासक भासणारा जीवनदान देणारा  तो सुगंध .

इंग्रजीत त्यासाठी Petrichor असा शब्द आहे असं मला माझ्या भाचीकडून कळलं. मी आंतरजालावर शोध घेतला तेव्हा कळलं की पहिल्या पावसानंतर मातीचा सुगंध का येतो ह्यावर संशोधन करणाऱ्या एका शास्रज्ञद्वयीने हा शब्द शोधला आहे.

हा शब्द बनलाय petra (stone) आणि ichor (the fluid that flows in the veins of the Gods in Greek mythology) या दोन ग्रीक शब्दांपासून.
मातीच्या सुगंधाचं शास्त्रीय कारण शोधणाऱ्या त्या शास्रज्ञद्वयीने शब्द शोधलाय मात्र एकदम काव्यात्म. जमीन आणि देवांच्या नसान्मधील दैवी द्रव्य यांच्या संयोगातून हा जीवनाचं आणि जीवंतपणाचं आश्वासन देणारा मोहवून टाकणारा बेभान करणारा सुगंध उत्पन्न व्हावा ही कल्पनाच किती सुरेख आणि उदात्त सौंदर्यानी भरलेली आहे !

दरवेळी मृद् गंध अनुभवताना प्रत्ययी येणारा अनिर्वचनीय आनंद आणि petrichor या शब्दाची व्युत्पत्ती या दोन्हीतून काही ओळी स्फुरल्या --

" मृद् गंध "

तप्त हो आकाश आणि; तप्त होई ही धरा
भाजतो वैशाख वणवा, दाह अंगी हा पहा

कुठूनशी मग झुळूक येइ, थंडगारशी हवा
तनूसवे सुखवी मनाला सुखदसा तो गारवा

अमृतासम वर्षते मग, जल नभातूनी पहा
मोहरूनी गंधाळते, सुगंधी होतसे धरा

शिंपती भूमीवरी नभ, अमर संजीवन सडा
टवटवीत होई धरा अन् पालवी फुटते मना

मीलन होइ मातीचे अन् दैवी ओजाचे अहा
सुगंध सृजनाचा फुले, मृद् गंध मोहवे मना


------ मनिष मोहिले
३१ मे २०१६

सोचो तो

यूँ तेरा नजरे मिलाना
और मिलते ही चुराना
सोचो तो बहोत कुछ हैं
सोचो तो कहा कुछ हैं

यूँ तेरा नजरोंसे कहना
बात को फिर पलट देना
सोचो तो बहोत कुछ हैं
सोचो तो कहा कुछ हैं

दामन का तेरे यूँ लहरना
छूके मुझको और फिसलना
सोचो तो बहोत कुछ हैं
सोचो तो कहा कुछ हैं

यूँ महसूस करना अपने जहम में
एहसास एक हसीन हम में
सोचो तो बहोत कुछ हैं
सोचो तो बहोत कुछ हैं

---- मनिष मोहिले 

आता वाटते की

आता वाटते की तुला गुणगुणावे
तुला गुणगुणाया तुझे ओठ व्हावे

या ओळीवरून मला सुचलेल्या काही पंक्ती --

आता वाटते की तुला फुलवावे
तुला फुलवण्या मोगरा बनून जावे

आता वाटते की तुला खुलवावे
तुला खुलवण्या खळी तुझी बनावे

आता वाटते की फक्त तुला ऐकावे
तुला ऐकण्या तुझेच हास्य व्हावे

आता वाटते की फक्त तुला पहावे
तुला पाहण्या परी माझेच नेत्र व्हावे

---- मनिष मोहिले 

दुरून तुला बघताना

दुरून तुला बघताना
शब्द उचंबळून येतात
समोर तू येता क्षणी
ओठांवरच थबकून जातात

दुरून तुला बघताना
नजर असते बिनधास्त
नजरभेट होता क्षणी
डोळे पापण्यात दडतात

दुरून तुला बघताना
श्वासात अश्व उधळतात
तू नजीक येता क्षणी
श्वास अर्ध्यातच अडतात

हे अंतर आपल्यामधलं
कधी होइल का कमी ?
दिसेल का कधी तुला
तुझ्यात हरवलेला मी ?

---- मनिष मोहिले 

Monday, May 2, 2016

उत्तराखंड वणवा

गेला जवळपास आठवडाभर, रोज वर्तमानपत्रात उत्तराखंडच्या प्रचंड प्रमाणावर भडकलेल्या वणव्याबद्दल बातम्या येतायत.

वाळकी पानं आणि केरकचरा नियंत्रित पद्धतीने जाळताना एका क्षणी गावकऱ्यांचं आगीवरचं नियंत्रण सुटल्यामुळे हा वणवा भडकला अशा मूळ  वृत्ताला आज गावकरी व लाकूड माफिया यांच्या संगनमताने तर हे घडलं नाही ना अशा संशयाच्या फांद्या फुटल्यात.

पण मला आत्ता मांडायचाय तो मुद्दा कारणाविषयीचा नसून उपाययोजनेसंबंधीचा आहे. एक असा वणवा जो गेला जवळपास आठवडाभर भडकतोय, ज्यात जवळपास 1500-2000 हेक्टर जंगल होरपळून जातंय त्या वणव्याला आटोक्यात आणण्यासाठी जे प्रयत्न चालू आहेत ते पुरेसे आहेत का हा प्रश्न आहे.

उन्हाळ्यातील तपमान, कोरडे वातावरण यामुळे वणवा भडकून व्यापक परिसरात पसरला अशी कारणमीमांसा देण्यात येतेय. त्याच प्रमाणे या वणव्यामुळे निर्माण झालेला धूर आणि राख यामुळे हिमनद्या वितळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

पण मग हे संभाव्य धोके व परिणाम आधीच ओळखू शकणारा एकही विद्वान पर्यावरणवादी / भू शास्त्रज्ञ आपल्याकडे नाहीये का ? जर हे संभाव्य परिणाम आधी वर्तवले असते तर आपल्या उपाययोजनेत व ज्या स्तरावर या समस्येची हाताळणी होतेय त्या स्तरात काही फरक पडला असता ?

वणवा भडकून प्रमाणाबाहेर मोठ्या परिसरात पसरल्यावर लष्कराला बोलावून हॅलिकॉप्टर ने हजारो लिटर पाणी एकदम ओतून वणवा विझवण्याचा प्रयत्न चार पाच दिवसांनी केला गेला व अपयशी ठरला काऱण प्रचंड धुरामुळे हॅलिकॉप्टर दुसरं उड्डाण भरूच शकलं नाही. हाच प्रयत्न सुरूवातीच्या एखाद दिवसात केला गेला असता तर कदाचित मर्यादित परिसरातील आगीवर यशस्वी नियंत्रण मिळवता आलं असतं.

आज हजारो हेक्टर जंगल जळत असताना प्रशासन, रोम जळताना सारंगी वाजवत बसणाऱ्या निरो प्रमाणे बसलय का ?

National Disaster Management Agencies आपल्याकडे आहेत. मग त्यांच्या सेवा राबवल्याच जात नाहीयेत का ? की त्या agencies सुद्धा असमर्थ आहेत ?

मुळात ह्या समस्येकडे आपण राष्ट्रीय समस्या म्हणून पाहतोय का ? की एका राज्यातलं जंगल जळतय नं - ठीक आहे. ती आग विझवायचे प्रयत्न करा पण त्या पेक्षा अधिक महत्व त्याला द्यायची गरज नाही अशी मानसिकता प्रशासनाच्या पातळीवर आहे का ?

कमीत कमी आता तरी युद्ध पातळीवर प्रयत्न करून ही आग विझवणं अत्यंत गरजेचं आहे.  कारणांचा पंचनामा नंतर करता येइल.

ते करताना सुद्धा एकमेकाना दोष देण्याचा पुरातन खेळ खेळण्यापेक्षा अशी परिस्थिती परत उद्भवू नये आणि जर उद्भवलीएच तर कमीत कमी हानी कशी होइल यावर लक्ष केंद्रीत करणं गरजेचं आहे.

या वणव्याच्या हिमनद्यांवर होऊ शकणाऱ्या संभाव्य परिणामांबरोबरच तेथील एकंदर परिस्थितीकी ज्यात वनस्पती, प्राणी, मानव सर्वच येतात त्यांच्यावरील नजीकच्या व दूरच्या भविष्यात होणारे परिणाम, एका संपूर्ण राज्यातील या परिस्थितीमुळे देशाच्या एकंदर पर्यावरणावर होणारे परिणाम व त्यावरील शक्याशक्य उपाय योजना या बद्दल विचार आत्तापासूनच व्हायला हवा.

जर कुणी वैयक्तिक स्वार्थासाठी हे करत असेल तर त्यांच्या विरुद्ध कडक उपाययोजना आणि त्याहून महत्वाचं त्या विरोधात जागरूक जनमत तयार करण्याच्या दृष्टीने प्रयत्न हवेत.

मात्र यासाठी सगळ्यात आधी आपली मानसिकता व प्राथमिकता बदलायला हव्यात.

-- मनिष मोहिले