Monday, May 11, 2020

लोक माझे सांगाती - पुस्तक परिचय व समीक्षण

लोक माझे सांगाती - पुस्तक परीक्षण

राजकारण हा काही माझा अत्यंत आवडीचा विषय आहे असं म्हणता येणार नाही. म्हणजे सद्य राजकीय स्थितीची माहिती असावी व कुठेही विषय निघाला तर आपण अगदीच अनभिज्ञ आहोत असं होऊ नये इतपत मी राजकारणाबद्दल वाचतो. काही गत घटना व सद्यस्थिती यांचा एकत्र अन्वयार्थ माझ्या परीने लावण्याचा यत्न देखील करतो. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय राजकारणातील अत्यंत महत्वाच्या घटनांचा वृत्तपत्रातून, इंटरनेटद्वारे माग ठेवतो. पण ते तेव्हढच. काही मंडळी जशी 24x7 राजकारणावर गप्पा मारू शकतात तसं नाही.

त्यामुळेच श्री. शरद पवारांचं राजकीय आत्मचरित्र "लोक माझे सांगाती" जेव्हा हातात आलं तेव्हा हे पुस्तक मी वाचून पूर्ण करू शकीन का अशी एक पुसटशी शंका मनात होती. पण पुस्तक वाचायला घेतलं आणि मग मात्र त्यात रंगून गेलो. पुस्तक वाचून संपलं आणि मला असं वाटलं की राजकारणात फारसा रस नसलेल्या माझ्यासारख्याला गुंगवून टाकणाऱ्या या पुस्तकाबद्दल काही लिहायला हवं, सांगायला हवं आणि त्यातून हा लेखनप्रपंच.

एक गोष्ट मी सुरूवातीलाच स्पष्ट करू ईच्छितो की हे श्री शरद पवारांच्या राजकीय आत्मचरित्र असलेल्या पुस्तकाचं समीक्षण आहे आणि कोणत्याही राजकीय पक्षाचं / व्यक्तीचं वा धारणेचं समर्थन वा खंडन नाही.
तसेच लेखकाच्या राजकीय व वैयक्तिक आयुष्याबद्दल जी मतमतांतरे जनसामान्यात आहेत त्याबद्दल देखील चर्चा वा ऊहापोह या लेखात नाही. एका साहित्यकृतीचे माझ्या वैयक्तिक दृष्टीकोनातून केलेले (कोणत्याही राजकीय धारणेशिवाय ) समीक्षण आहे आणि हे आत्मचरित्र असल्यामुळे समीक्षण करण्याच्या प्रक्रियेचा स्वाभाविक परिपाक म्हणून लेखकाच्या एक व्यक्ती म्हणून पुस्तकातून मला दिसलेल्या / जाणवलेल्या  काही वैशिष्ट्यांचा उल्लेख इतकेच ह्या लेखाचे स्वरूप आहे.

तर जवळपास पाच दशके स्वत:ची राजकीय कारकीर्द यशस्वीपणे पार पाडणाऱ्या व अजूनही सक्रीय राजकारणात सहभागी असलेल्या श्री पवारांनी हे राजकीय आत्मचरित्र लिहीताना एक लेखक म्हणून देखील उत्कृष्ट कामगिरी करत एका नव्या क्षेत्रात यशस्वी सुरूवात केली आहे असं म्हणता येइल.

पुस्तक लिहीताना हे राजकीय आत्मचरित्र आहे ह्या गोष्टीचं त्यांचं भान कुठेही सुटत नाही आणि त्यामुळेच स्वत:चं बालपण, कौटुंबिक पार्श्वभूमी, शैक्षिणक जीवन इत्यादींबद्दल ते मोजकी व नेमकी माहिती देतात आणि लवकरच वाचकाला सक्रीय राजकारणातील प्रवेशाच्या कालखंडापाशी आणतात.

आणि तिथून सुरू होते एक सलग, ओघवते, सुसंबद्ध, निश्चित विचाराधिष्ठीत राजकीय जीवनप्रवासाचे कथन - रोचक, वाचकाला गुंगवून ठेवणारे, गतेतिहास ते सद्यस्थिती असे सक्रीय राजकारणाच्या राज्य व राष्ट्रस्तरावरील पटलावरच्या एका प्रमुख व्यक्तिमत्वाच्या नजरेतून केलेल्या स्वप्रवासाचे आत्मकथन. अनेक पडद्यामागच्या घडामोडींचे कथन.
हे आत्मकथन वाचताना काही गोष्टी प्रामुख्याने जाणवत रहातात.

श्री. पवारांची लेखनशैली अतिशय ओघवती आणि सरल आहे. पाच दशकांपेक्षा अधिक कालखंडातील असंख्य आठवणी व घटनांची सुसंलग्नता फार नेमकेपणाने राखलेली आहे. पुस्तकातील प्रकरणांची कालानुरूप मांडणी ही सुसंलग्नता राखण्यात निश्चितच मदत करते. राजकारणासारखा रुक्ष विषय असूनदेखील पुस्तक कुठेही जरासुद्धा कंटाळवाणे वा नीरस होत नाही.

पन्नासहून अधिक वर्षांच्या आपल्या राजकीय कारकिर्दीत, सत्ताधारी तसेच विरोधी पक्षात विविध पदांवर कार्यरत असताना आलेल्या अनुभवांच्या कथनातूनच ते विविध कालखंडातील राजकारण, समाजकारण, अर्थकारण, त्यामधील परस्परसंबंध, त्यातील बदलते प्रवाह, बदलती विचारसरणी, बदलती कार्यपद्धती, बदलते जनमानस हे सर्व फार सहज सोप्या रितीने वाचकापुढे उलगडून दाखवतात. हे सर्व कथन व विवेचन आणि विश्लेषण कंटाळवाणे व रुक्ष होऊ नये यासाठी त्यात सामान्यांना आत्तापर्यंत माहीत नसलेल्या अनेक किश्श्यांचा, घटनांचा, संभाषणांचा खुबीने वापर करतात आणि त्यातूनच एक व्यक्ती म्हणून त्यांची ओळखदेखील वाचकाला होत जाते.

या सर्व राजकीय प्रवासात त्यांचे स्वत:चे एक कार्यकर्ता ते नेता असे व्यक्तिमत्व घडत असताना व त्यानंतर देखील ज्या व्यक्तींचा त्यांच्यावर , त्यांच्या घडणीवर प्रभाव पडला त्यातील वरीष्ठ नेत्यांबद्दलचा निखळ आदर, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय राजकारणातील इतर नेते, सहकारी व मित्रपरिवाराबद्दलचे प्रेम, राजकीय विरोधक व त्यांच्याबरोबरचे संबंध ह्याचे एक राजकीय नेता याबरोबरच एक माणूस म्हणून त्यांनी केलेले वर्णन या पुस्तकाला एक सहजता व मार्दव देतात. या संपूर्ण कथनात त्यांची सुसंस्कृतता ठळकपणे दिसते. कारण त्यांनीच कथन केल्याप्रमाणे, त्यांच्या राजकीय विरोधकांपैकी देखील बहुतेकांबरोबर त्यांचे वैयक्तिक पातळीवर अतिशय जिव्हाळ्याचे संबंध होते. पण जिथे ते तसे नव्हते त्यांच्याबद्दल देखील पुस्तकात कुठेही आक्रस्ताळी सूरदेखील आढळत नाही.

इतक्या प्रदीर्घ कालावधीत एक यशस्वी राजकीय नेता म्हणून त्यांनी जी अनेक कामे केली त्यातील काही कामे अशी आहेत की पक्षीय राजकारण बाजूला ठेवूनदेखील त्या कामांचा / उपलब्धींचा उल्लेख जरूर व्हावयास हवा - संरक्षणमंत्री असताना आतंकवादाने घडी विस्कटवलेल्या पंजाबातील परिस्थिती रुळावर आणण्यासाठी केलेले प्रयत्न, संरक्षण साहित्याचे उत्पादन करणाऱ्या कारखान्यांसाठी उत्पादनक्षमतेचा पूर्ण उपयोग होइल असे धोरणात्मक बदल, राष्ट्रीय स्तरावर उर्जा नीती ठरवण्यातील त्यांचा सहयोग, मुंबई बॉबस्फोट व किल्लारी भूकंप या मानवनिर्मित व नैसर्गिक अशा दोन प्रकारच्या आपत्तीत त्यांनी दाखवलेल्या प्रशासकीय कार्यक्षमतेमुळे राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन समितीची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली जाणं, केंद्रीय कृषीमंत्री म्हणून काम करताना देशातून विक्रमी कृषीउत्पादन होणे व देश कृषीमालाच्या आयातदार भूमिकेतून निर्यातदार भूमिकेत येणे, क्रीडाक्षेत्रातील निवृत्त खेळाडूंसाठी घेतलेले काही निर्णय व सांस्कृतिक क्षेत्रातील त्यांचा सहभाग ह्या उपलब्धी माझ्या मते राजकारणातीत आहेत.

आणि ह्या सर्व प्रवासात त्यांची काही  वैशिष्ट्ये जाणवत रहातात आणि ती म्हणजे एखाद्या विवाद्य विषयाला न कचरता हात घालताना लोकमतास योग्य मान देऊन पण लोकमताचा अयोग्य वा अस्थानी ताण न घेता स्वत:ला पटलेल्या मताचं प्रतिपादन करण्याची व त्याप्रमाणे कृती करण्याची क्षमता व आत्मविश्वास, शक्यतोवर सहमती व समन्वयाचे राजकारण करण्याची ईच्छाशक्ती व तयारी आणि केंद्रस्थानी देशकारणाच्या आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक अशा  सर्वांगीण विकासाचा विचार.

पुस्तकातील राजकीय प्रवासाशी निगडीत प्रकरणे पूर्ण झाल्यावर एका प्रकरणात , या प्रदीर्घ कालावधीत त्यांचा ज्यांच्या ज्यांच्याशी संबंध आला अशा राजकीय, सामाजिक, क्रीडा, सांस्कृतिक व वैयक्तिक अशा विविध क्षेत्रातील दिग्गज व्यक्तींपैकी काही जणांशी संबंधित खास आठवणी मुद्दामहून नमूद केल्या आहेत. ह्यात गेली कित्येक वर्षे त्यांच्या गाडीचा चालक म्हणून काम करणाऱ्या व्यक्तीचा ही उल्लेख
आहे हे विशेष.

इतक्या वर्षात बारामती म्हणजे शरद पवार हे समीकरण कसं बनले ह्याची  उत्सुकता वाचकाच्या मनात असेल हे ताडून त्याची रोचक कहाणी देखील त्यांनी सांगितली आहे.

आणि सरतेशेवटी येणाऱ्या नजीकच्या व दूरच्या भविष्यकाळात भारतीय राजकारणात देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय पातळीवर कोणत्या बदलांची व गोष्टींची जाणीव ठेवत देशातील राजकीय पक्षांनी व नेतृत्वाने काय काळजी घेतली पाहीजे ह्याचा ऊहापोह करून ते त्यांच्यातील दूरदृष्टीतेची देखील जाणीव करून देतात व अखेरीस भारतीय जनतेवर असलेल्या विश्वासाचा पुनरुच्चार करत या कथनाला पूर्णविराम देतात.

कोणत्याही नेत्याची सक्रीय राजकारणात पाच दशकांहून अधिक काळाची यशस्वी कारकीर्द तेव्हाच होऊ शकते जेव्हा त्याची सामान्य लोकांबरोबरची नाळ जुळलेली असते आणि लोक,  त्याला आपले प्रश्न जाणून घेऊन सोडवण्याचे प्रयत्न करणारा म्हणून ओळखत असतात.

त्यादृष्टीने पहाता, शेवटी मी इतकेच म्हणीन की लोक माझे सांगाती ह्या शीर्षकाची यथार्थता वाचकाला पटवून देण्यात हे राजकीय आत्मचरित्र पुरेपूर कसोटीस उतरते.

---- मनिष मोहिले 

पनघट चलती नार कोई

इंटरनेटवर व्हायरल झालेल्या एका फोटोवरून सुचलेली ही कविता



पाणवठ्यावर कुणी चालली अलबेली नार
घागरीच्या अन् आधाराला नाजूकशी कंबर

वक्षावरती खुला सोडला विपुल केशसंभार
मुक्त केश वा मोहक वळसे ठरते ना नजर

सजणभेटीसी आतूर झाली लगबग चाले नार
कंटक रुतला पायामध्ये, रुधिराची मग धार

साद सख्याची कानी परि, आर्त आर्त हळूवार
मुडपे पाऊल काढे काटा, विनाशब्द अलवार

टिपे नेमकी तिच प्रतिमा अनाम प्रतिमाकार
पनघट चलती नार कोई, बनली अजरामर 


---- मनिष मोहिले

Friday, May 8, 2020

माझं पक्षीप्रेम

साधारण सहा सात वर्षांपूर्वी खर्डेची दोनेक ई झिन प्रकाशित केली होती आपण. छान झाली होती.

नंतर तिसऱ्या ई झिन चं काम काही कारणास्तव रेंगाळलं. या अप्रकाशित इ झिन मध्ये, पक्षी निरीक्षणाबद्दलचा माझा एक लेख प्रकाशित करण्याबद्दल मी खूप उत्सुक होतो.

फार काही लंबा चौडा वा खूप शास्त्रीय नाव व संज्ञा ह्यांनी भरलेला नव्हता तो लेख अजिबात.

एकदम सोप्या भाषेत मला आणि माझ्या पत्नी व मुलीला  पक्षीनिरीक्षणाचा छंद जडल्यावर निरीक्षण काळात बघायला मिळालेले पक्षी व त्यांचे मी काढलेले फोटो ह्याबद्दल तो लेख.

प्रत्येक छायाचित्राबरोबर पक्ष्याचे इंग्रजी व माहीत असेल तिथे मराठी नाव, त्याचं कुटुंब (Family), आढळण्याचे मुख्य इलाके, निवासी / स्थलांतरीत, प्रमुख शरीर वैशिष्ट्ये अशी थोडक्यात माहिती देण्याचा प्रयत्न केला होता.

उद्देश हा की हे वाचून व बघून इतर काही वाचकांच्या मनात देखील ह्या निसर्गाशी नातं जोडणाऱ्या सुरेख छंदाशी किमान तोंडओळख व्हावी.

ई झिनसाठी तो लेख word file format मध्ये बनवला होता. तीच फाइल इथे फॉरवर्ड करतोय.

आशा आहे की सर्वाना हा एक वेगळा लेखन प्रयत्न आवडेल व त्याहीपेक्षा पक्षीनिरीक्षणाबाबत किमान कुतूहल जागृत होइल.

आम्हा तिघांच्या बाबतीत बोलायचं झालं तर हा छंद आता आयुष्यभरासाठी आम्हाला भरभरून आनंद देत रहाणार आहे.


-- मनिष मोहिले