Sunday, July 10, 2022

वारी आणि जात्रा - धर्म, संस्कृती, परंपरा आणि अध्यात्म

आषाढी एकादशी. आजच्या दिवशी संपूर्ण महाराष्ट्रामधील वारकरी जवळपास वीस एकवीस दिवसांची दिंडी चालून विठूनामाच्या गजरात, ज्ञानोबा, तुकोबांच्या आशीर्वादाने पंढरीला पोचतात, त्या सावळ्या विठूला कडकडून भेटायला, चंद्रभागेत स्नान करून तिच्या वाळवंटात टाळ चिपळ्यांच्या तालावर नाचत इतर वारकऱ्यांची उराउरी भेट घ्यायला. गेली हजारो वर्षे ही दिंडी दरवर्षी नित्यनेमाने पंढरीची वाट चालत आली आहे. अगदी ज्ञानोबा माऊलींच्या देखील कित्येक वर्षे आधीपासून. अशी ही हजारो वर्षांची परंपरा असलेली दिंडी महाराष्ट्राच्या धार्मिक, सांस्कृतिक, पारंपारिक आणि अध्यात्मिक जीवनाचे एक अविभाज्य अंग आहे.

त्याच प्रमाणे गुजरात मधील बनासकांथा जिल्ह्यात, गुजरात राजस्थानच्या सीमेवर असलेल्या अंबामातेच्या मंदिरात भरणारी जात्रा हे गुजरातच्या धार्मिक, सांस्कृतिक, पारंपारिक आणि अध्यात्मिक जीवनाचे अविभाज्य अंग आहे.

वास्तविक पहाता; धर्म, संस्कृती, परंपरा आणि अध्यात्म ह्या एकमेकांशी संबंधित असल्या तरी एकमेकांपासून भिन्न अशा गोष्टी. निदान वरकरणी तरी. मग एकच वारी हे महाराष्ट्राच्या धार्मिक, सांस्कृतिक, पारंपारिक आणि अध्यात्मिक जीवनाचे अंग कसे ? किंवा हेच गुजरातच्या संदर्भात अंबाजी जात्रेच्या बाबतीत कसे लागू पडते ?

"धार्मिक" : भक्त पुंडलीकाच्या काळापासून अस्तित्वात असलेला हा वारकरी संप्रदाय; ज्याला अधिक लोकाभिमुख करत, सर्व जातीजमातीच्या लोकांना त्यात सामावून घेण्याचे आणि त्याचा प्रसार करण्याचे काम माउलींनी आणि तुकोबांनी केले ज्यास एकनाथ महाराजांनी पुढे नेले. एक साधा भक्तीमार्ग. अगदी सामान्यातील सामान्य संसारी व्यक्तीला, मग ती व्यक्ती स्त्री असो किंवा पुरुष, केवळ भक्तीमार्ग अनुसरून, दैनंदिन कर्तव्य करता करता नामजप करत भगवंताला भेटता येऊ शकते, त्याच्याशी एकरूप होता येते हा दिलासा आणि विश्वास जनमानसात दृढ करण्याचे अमूल्य काम वारकरी संप्रदायाने केले. त्या दिलाश्याचा, त्या विश्वासाचा ऊद् घोष म्हणजे वारी. ह्या दृष्टीने बघता पंढरीची वारी ही धार्मिक आहे. 

कारण धारयते इति धर्म:, अशी जरी भगवंतांनी धर्माची व्याख्या केली असली तरी प्रत्येक धर्माचे अंतिम ध्येय त्या वैश्विक शक्तीमध्ये एकरूप होणे हाच आहे. परंतु,

स्वतःच्या जीवनशैलीमध्ये धर्म आकलन होणे आणि ती जीवनशैली अनुसरणे ह्याच माध्यमातून ईश तत्वाशी एकरूप होणे हे सामान्य जनांसाठी दुष्कर कर्म आणि म्हणून स्वतः पासून वेगळी दिसणारी ईश प्रतिमा आवश्यक होऊन जाते. वारकरी संप्रदायाने विठ्ठलाच्या प्रतिमेत ते ईश तत्व पाहिले आणि दैनंदिन जीवनशैलीत राहून त्याप्रत पोचण्यास त्यातल्या त्यात सोपा म्हणून भक्तीमार्ग सुचवला. ह्या मार्गात काही नावीन्य असावं, वैविध्य असावं, समान मार्गावर चालणाऱ्या भक्तांनी एकत्र यावं ह्या हेतूने वारी सुरू झाली. धर्माने सांगितलेल्या मोक्षाप्रत जाण्याचा एक सोपा मार्ग.


ह्याच दृष्टीकोनातून पहाता, शक्तीरुपी देवतत्वाची प्रामुख्याने आराधना करणाऱ्या गुजरात मध्ये, ५१ शक्तीपीठांमधील प्रमुख पीठांपैकी एक असलेल्या अंबाजी मंदिरात जाऊन देवीची आराधना करणे हा धार्मिक जीवनाचा अविभाज्य भाग आहे हे स्वाभाविक आहे. हिंदू धर्मातील शक्तीचे महात्म्य ध्यानात घेता, माता सतीचे हृदय ज्या ठिकाणी पडले, त्या स्थानी शक्ती तत्वाची आराधना, भक्ती ह्या खेरीज धार्मिकतेची अधिक चांगली ओळख कोणती असू शकेल ? धारयते इति धर्म: ह्या व्याख्येनुसार, ज्या जीवन शैलीमध्ये जगदंबेच्या रुपातील मातृतत्व आणि देवत्व ह्यांची भक्ती व आराधना हीच जगण्याची पद्धती आहे आणि त्या भक्तीमार्गानेच मोक्षाप्रत पोचण्याची शक्यता देखील.


"सांस्कृतिक" : वर्षानुवर्षे सुरू असलेल्या ह्या वारीच्या पदयात्रेत गावोगावचे, वेगवेगळ्या जातीजमातींचे लोक सामील होतात त्यात एकमेकांच्या आचारविचार जवळून बघितले जातात. विचारांप्रमाणे आचारांची देखील देवाण घेवाण होते. गावोगावचे लोक दिंडीत आपली फुल ना फुलाची पाकळी असा सहभाग असावा ह्या हेतूने वारकऱ्यांना जमेल तितकी मदत करतात ज्यातून स्नेहभाव वाढीस लागतो. गावोगावी स्थानिक पातळीवर नेतृत्व, नियमन आणि कृती अशी एक व्यवस्था निर्माण होत जाते जी वारीव्यातिरिक्त देखील समाजजीवनात अनेक महत्त्वाच्या भूमिका बजावू शकते. कित्येक जण आपल्या अंगीच्या कलाकौशल्य इत्यादींचे जगाला दर्शन व्हावे म्हणून वारीत सामील होतात आणि जनास ते कौशल्य दाखवितात. ह्यातून कलेबरोबरच ज्ञान, माहिती ह्यांचा प्रसार होऊ शकतो. बरं, ह्या सगळ्यास भक्तीचे अनुष्ठान असते.  वर्षानुवर्षे हे जेव्हा सातत्याने होत रहाते, तेव्हा संपूर्ण समाजाचे ते एक कृतीशील रूप बनून सामोरे येते. काही जबाबदाऱ्या ह्या पिढी दर पिढी नित्याने स्वीकारल्या जातात आणि प्रामाणिक कळकळीने निभावल्या जातात. हे असे एकमेकांच्या सहकार्याचे, एकमेकांना प्रोत्साहन देण्याचे, एक विशिष्ट समान हेतू उरी बाळगून एखादे कार्य पूर्णत्वाला नेण्याचे एक पर्व सुरू होते हे त्या समाजाची ओळख बनते. संस्कृती ह्यातूनच जन्म घेते आणि फुलत जाते, बहरत जाते. महाराष्ट्रातील ही पंढरीची वारी आणि त्यात सामान्यजनांची वारकऱ्यांप्रतीची प्रीती, त्यांना मदत करण्याची प्रेरणा आणि;  नर्मदापरिक्रमा करणाऱ्याना मदत करणाऱ्या सामान्य जनांच्या मनीची प्रेरणा ही एकाच संस्कृतीची देणगी आहे. म्हणजे आपापल्या भौगोलिक स्थानी राहून, एकाच ध्येयाप्रत पोचण्याचा प्रयत्न करणाऱ्या बांधवास मदत करणे ही संस्कृती - मग ती नर्मदाकिनारीची वाट चालत असो किंवा आळंदी/देहू हून पंढरीची वाट चालत असो. 


हेच तर्कशास्त्र लागू पडते अंबाजी जात्रेत केल्या जाणाऱ्या गरब्यात. विशेष करून नवरात्रीच्या वेळेस अंबाजी मंदीर परिसरात होणाऱ्या गरब्याचे महत्व काही आगळेच. मुळात गर्भ ह्या शब्दाचे गरबा हे भाववाचक. त्यामुळे केवळ देवत्वाचेच नाही तर देवत्वामधील मातृतत्वाचे आणि मातृत्वातील मांगल्याचे महत्व उत्सव रुपात साजरे करणे ही भारतीय संस्कृतीची शिकवण मध्ये मातृत्वाचे लोकांच्या मनावर उत्सव रूपातून बिंबवणे, रुजवणे हेच ह्या जात्रेचे सांस्कृतिक अंग. आजच्या आधुनिक काळात देखील गुजरातची मुख्य सांस्कृतिक ओळख गरबा (The Longest Dance Festival in The World), हीच आहे.  शतकानुतकं चालत आलेला हा नृत्योत्सव गुजराती संस्कृतीचे दर्शन जगाला घडवतो.


"पारंपारिक" :  अशी ही वारी जेव्हा हजारो वर्षे चालत रहाते, तेव्हा आपसूक तिला एका उदात्त परंपरेचे रुपदेखील प्राप्त होते. इथे वारी आणि परिक्रमा ह्यात फरक दिसून येतो. कारण परिक्रमा ही अजूनही वैयक्तिक पातळीवर आहे. तिला वारीसारखे सार्वत्रिक सामाजिक रूप लाभलेले नाही. मात्र वारीची परंपरा ही सुदैवाने अजून बाह्यरुपी तरी कर्मकांडामध्ये अडकून शबलित झालेली नाही. पुंडलिकाच्या भक्तीचा वारसा, त्याच्याकडून माऊली, तुकोबा, एकनाथ महाराज असा प्रवास करीत जनसामान्यांपर्यंत पोहोचून आजच्या काळी देखील कृतीशील आहे हे एक प्रकारे वारीच्या परंपरेचे यश म्हणावे लागेल. उलट कर्मकांडात न अडकता, आजच्या काळी सुद्धा समाजास भक्तीमार्ग दाखवून त्याची ईशतत्वाप्रत जाण्याची वाट सुकर करण्यास ही परंपरा मदत करते असे म्हणावे लागेल. 


अंबाजीची जात्रा ही देखील एक अशीच प्राचीन परंपरा आहे जी देवीच्या भक्तीत एका विशिष्ट धर्मस्थालाकडे चालत जाणे आणि तेथे पोचून आराधना करणे, उत्सव करणे आणि समाज जीवनातील परंपरेचे एक आगळे सौंदर्यपूर्ण दर्शन घडवणे ह्या उदात्त हेतूस मनी ठेऊन साजरी होते. मातृत्वाची आराधना करणारा धर्म, त्या धर्माचे उत्सवरुप निर्माण करणारी संस्कृती आणि ते उत्सवरूप पिढ्यान् पिढ्या जातं करणारी, वारसा म्हणून पुढील पिढीकडे देणारी परंपरा.


"अध्यात्मिक" : अशा ह्या वाटेवर वर्षानुवर्षे जे चालतात, त्यांचे अध्यात्मिक उन्नयन इतरेजनांपेक्षा सहसुलभ आहे हे नक्की. माझ्यामते, अध्यात्माची, अध्य+आत्म अशी फोड असावी.  अध्य - अध्ययन आणि आत्म - आत्म्याचे वा स्वतःचे. नामजप करत भक्तीमार्ग अनुसरताना, कधीतरी स्वतःची ओळख होते. कमीत कमी एक झलक आणि मग अहम् ब्रह्मास्मि वा तत्वमसी ही जाणीव होऊ लागते. हाच भक्तीमार्ग चालत जाऊन माउलींना पैसाच्या खांबाशी अवकाश आणि काल ह्यातील परस्परसंबंध आणि अद्वैत ह्याचे आत्मज्ञान झाले तर तुकोबा सदेह वैकंठाला गेले. अगदी आजच्या कलीयुगात सुद्धा कित्येक संत सज्जन आहेत ने ह्या मार्गावर मार्गक्रमणा करणाऱ्या लोकांना मार्गदर्शन करून ईशतत्वाशी एकरूप होण्यास मदत करताहेत. आणि जे ह्या वारीची वाट चालताहेत, त्यांना ही मदत मिळण्याची शक्यता अधिक आहे. मात्र, वारीतील सहभाग मनापासून हवा. वारी व्यतिरिक्त देखील सत्वगुणी आचरण हवे. अध्यात्माच्या त्या आकाशात माऊली व तुकोबांसारखे जे शीतल प्रकाश देणारे ज्ञानसूर्य प्रकाशत आहेत, त्यांच्या ठायीचे प्रकाशतत्व आणि वारीच्या रस्त्यावर सातत्याने भक्तीने चालत  खूप पुढे आलेल्या सामान्य जनांच्या ठायी असलेले प्रकाश तत्व एकच आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, दैनंदिन जीवन कर्तव्ये पार पाडत, कर्मकांडात न अडकता, भक्तीलाच जीवनशैली आणि स्वधर्म बनवत ही मार्गक्रमणा शक्य आहे. एकदा हे आकळले की ईश तत्वाच्या वेगळ्या बाह्य दृश्य रुपाची आवश्यकता नाहीशी होते. इथे वारी धार्मिक न रहाता आध्यात्मिक होते. मी म्हणजेच तो आणि तो म्हणजेच मी ही जाणीव झाली की मोक्षप्राप्तीची देखील ईच्छा उरत नाही. 


वर्षानुवर्ष ही परंपरा जोपासत, सांस्कृतिक वारसा पुढे नेणाऱ्या वारकरी मंडळींपैकी काही, कळत नकळत, धार्मिक मोक्षप्राप्ती ची वाट सोडून अध्यात्मिक उन्नतीच्या मार्गाकडे वळतात जिथे स्वतः मध्येच त्यांना पंढरीच्या कर कटीवर ठेवलेल्या त्या सावळ्याचे रूप दिसते आणि जीवन हीच एक वारी बनते - देहाकडून आत्म्याकडे चालणारी वारी जिथे आत्म्यात वसलेला तो विठू नित्य कडकडून भेटत असतो. स्वतःलाच मायेच्या मिठीत घेत असतो.


अंबाजी जात्रे मध्ये अंबे माते की जय असा उद्घोष करणाऱ्या असंख्य कंठातून हा उद्गोष बाहेर तेव्हाच पडतो जेव्हा अंत:करणा मध्ये मा अंबेविषयी उदंड प्रेम, विश्वास आणि श्रद्धा असते. अशी श्रद्धा की जी प्रापंचिक जीवनाला जगण्यात तर मदत करतेच पण त्याच बरोबर मनुष्य आणि देवत्व ह्यांच्यातील त्या अदृश्य अशा भावबंधास अंतर्मनात जागृत करते आणि ज्या जगन्मातेच्या कुशीतून ह्या विश्वाची उत्पत्ती झाली त्या देवस्वरुप मातृरुपाशी एकरूप होण्याच्या मार्गावरील प्रवासात मनुष्य मात्रास मार्गदर्शन करते. शेवटी पितृरूप असो की मातृरूप. ईशतत्व एकच आहे. कदाचित म्हणूनच बाह्यत:पुरुष रुपात असलेल्या विठ्ठलाला सुद्धा संत माऊलीच्या रुपात बघतात.


दैनंदिन जीवन जगत असता असे आचरण करण्याची, ह्या पारंपारिक सांस्कृतिक माध्यमातून धार्मिकता आणि अध्यात्म ह्या मार्गावरील प्रवास सुरू करण्याची सद्बुद्धी तुम्हा आम्हास लाभो आणि आपली अंतरीची वारी नामजपाच्या गजरात किंवा आपली मोक्षाकडची जात्रा जगदंबेच्या जयजयकारात चालू राहो हीच त्या पांडुरंगा चरणी आणि जगदंबे चरणी प्रार्थना. 


---- मनिष मोहिले 



 

Friday, July 8, 2022

पंचम - चित्रपट संगीत जगतातील देव माणूस

पंचम लेखमालेतील माझा हा पाचवा लेख. पहिल्या लेखात एस डी चा मुलगा असूनही, केवळ एस डी चा मुलगा बनून न रहाता स्वतःची आर डी उर्फ पंचम अशी जगाला ओळख करून देणाऱ्या, एक उद्गाता संगीत दिग्दर्शक बनलेल्या पंचम च्या कारकीर्दीचा थोडक्यात आढावा मी घेतला होता. दुसऱ्या लेखात ब्रह्मानंद सिंग यांच्या पंचम अनमिक्स्ड ह्या अप्रतिम वृत्तपटाच्या आधारे पंचमच्या सांगीतिक बुद्धिमत्ता व प्रतिभा आणि त्या आधारे त्याने केलेले संगीत चमत्कार ह्याबद्दल लिहिलं होतं; तर तिसऱ्या लेखात पंचमच्या, माझ्या खास आवडीच्या काही निवडक गाण्यांबद्दल लिहिलं होतं. चौथ्या लेखात एक वेगळाच धागा मी पकडला होता. RD negating the idea of form, constantly - थोडक्यात, एका साच्यात किंवा शैलीत किंवा आकृतीबंधात न अडकणारे संगीत देणाऱ्या पंचम ची ओळख करून देण्याचा प्रयत्न केला ज्यात माधव विजयच्या चित्रफितींची खूप मदत झाली.

मात्र, इतकं सगळं लिहून देखील पंचमच्या अद्भुत संगीत जीवनातील कित्येक अमूल्य गोष्टी किंवा आठवणी सांगायच्या बाकीच रहातात, ज्यामधून त्याच्या प्रतिभेच्या इतर पैलूंवर प्रकाश पडतो जसे पंचम ची चित्रपटाला संगीत देताना, एक माध्यम म्हणून चित्रपट माध्यमाविषयीची समज, शास्त्रीय संगीतावर असलेली त्याची पकड, संगीतातून विशिष्ट परिस्थिती किंवा मनस्थिती रसिकांपर्यंत पोहोचवायची त्याची अद्भुत हातोटी, गीतकाराच्या शब्दांबद्दलची त्याची समज आणि इतर अनेक. आणि त्या सगळ्यातून एक जाणवत राहतं की राहुल देव बर्मन हा खरच देवाघरचा माणूस होता. एक संगीतकार म्हणून तर होताच, कारण इतकी अफाट प्रतिभा देवाचा लाडका असलेल्यालाच मिळू शकते. पण एक माणूस म्हणून देखील तो फार मोठा होता. हे दोन्ही पैलू तपासून बघू.

चित्रपटाच्या कथेमध्ये जिथे गाणं येतं, ती परिस्थिती, पात्रांची मनस्थिती ह्याप्रमाणे अचूक आणि सुरेल संगीत देण्यात पंचम चा हात धरणारा विरळाच कोणी असेल. त्यामधून चित्रपट माध्यमाबद्दल पंचम ची जी समज होती, ती समज दिसून यायची.
हे चित्रपटातील situation प्रमाणे संगीत द्यायचे हा जो पंचम चा गुणविशेष आहे त्याचं उत्कृष्ट उदाहरण आहे प्यार का मौसम मधलं तुम बिन जाऊ कहाॅं, हे किशोर आणि रफीचे tandem.
एकाच tune वरच्या (चालीवरच्या)गाण्याची चार भिन्न रूपं four different versions - जी चित्रपटात चार भिन्न situations ला आहेत. आता ह्या चार versions मध्ये फक्त arrangement अर्थात वाद्यमेळ बदलून पंचम नी काय करामत केलीय बघा.

पहिली situation - गायक किशोर. पडद्यावर भारत भूषण मोकळ्या माळरानावर घराच्या अंगणात बसून मेंडोलिन वर गातोय. समोर मुलगा आणि बाजूला बायको - निरुपा रॉय. तिथे मेंडोलिन आणि इतर सहाय्यक तालवाद्य आणि yodeling effect - कारण मोकळ्या वर आहे गाणं.
दुसरी situation - घरापासून दूर आणि बायको मुलाशी फाटाफूट झालेला भणंग भारत भूषण. अंत:करणात दु:ख आहे. तिथे फक्त तंतू वाद्य आणि दु:खी सुरावट. गायक पुन्हा किशोर.
तिसरी situation - शशी कपूर आणि आशा पारेख चा रोमान्स. गायक रफी. वाद्य - मेंडोलिन, ॲकॉरडियन आणि इतर. पण त्या मेंडोलिन, ॲकॉरडियन मधून रोमँटिक मूड ची निर्मिती.
चौथी situation - शशी व आशा पारेख मधील तणाव. एक dramatic situation. गायक परत रफी. पण ह्यावेळेस पियानो आणि ऊंच सूरातील व्हायोलिन. भावनिक उलघाल त्या संगीतातून समोर येते.

एक चाल. दोन गायक. चार situations. चार versions आणि फक्त वाद्यमेळ (arrangement) बदलून पिक्चरमधल्या त्या त्या situation ला साजेसं संगीत जे त्या situation चा मूड, पात्रांची मानसिक
स्थिती आपल्यापर्यंत पोचवते. पंचम वर देवी सरस्वती चा वरदहस्त होता तो असा.

निव्वळ हेच नाही तर एखादा मूड देखील पंचमच्या संगीतातून रसिकांपर्यंत पोचत असे. उदाहरणार्थ एखादी अशी situation जिथे पडद्यावरील कलाकार नशेत आहे. आता ही नशा, पंचमच्या संगीतातून जाणवायची. त्यातही, ज्या पद्धतीची नशा, ती नशा दाखवणारे संगीत. विश्वास नाही बसत ? ही बघा उदाहरणं.

चित्रपट आप की कसम. गाणं - जय जय शिव शंकर. आता ह्या गाण्यात राजेश खन्ना आणि मुमताज भांग पिऊन झिंगतात आणि त्यावेळेस हे गाणं आहे. पंचम नी, फक्त ढोलक, बगलबच्चा आणि काही तालवाद्ये ह्यांच्या मदतीने असं काही डोलायला लावणारं संगीत दिलंय की त्या तालातून खरोखर नजरेसमोर भांग घोटली जात असल्याची जाणीव रसिक मनाला होते. भांगेची अशी नशा की; जिच्या प्रभावाखाली माणूस स्वत:च्या ताब्यात असतोही  आणि नसातोही ती नशा त्या ठेक्यातून जाणवत राहते. तो ठेका, भांगेच्या नशेप्रमाणेच एक मस्तीभरी नशा कानसेन रसिकांना देतो. तो ठेका ऐकून श्रोता देखील डोलू लागतो जणू भांगेच्या नशेत डुलतोय. ते घोटणं, ते डुलणं - सगळं त्या ठेक्यात आहे.
चित्रपट हरे रामा हरे कृष्णा. गाणं दम मारो दम. इथे नशा आहे ड्रग्सची. चरस, गांजा अशा अंमली पदार्थांची. त्या नशेची जात वेगळी. अंमली पदार्थांचे सेवन करणाऱ्याला; सुन्न करणारी, त्याच्या जाणीवा एका वेगळ्याच जगात घेऊन जाणारी आणि तरीही आपण आनंदात तरंगत आहोत असं त्याला वाटायला लावणारी ती नशा.  गाण्याच्या सुरूवातीचा तो आवाज आणि त्यानंतर चा strings चा effect. असं वाटतं की जणू एखाद्या चरस पिणाऱ्या व्यक्तीच्या मेंदूत बसून ते ध्वनी परिणाम आपण ऐकतोय - as a result of the pot being inhaled by that person. तो परिणाम अधिक परिणामकारकपणे जाणवावा ह्यासाठी आशाताई नी सुद्धा त्या संगीत ध्वनी सारखा आवाज काढत गाणं म्हटलंय - दम मारो दम ssss आ असं.
भांग झाली. चरस, गांजा झाले. आता राहिली व्हिस्की. चित्रपट चंदन का पलना. गाणं शराबी मेरा नाम. गायिका चक्क लता. इथे पंचम नी असा विचार केला की व्हिस्कीच्या नशेतला माणूस, एक पाऊल तिरकं पडलं की परत मागे घेऊन मग सरळ पाऊल टाकतो. तर हा त्याचा पॅटर्न तीन beats मध्ये बसतो ज्यात तो झिंगून पाऊल तिरकं टाकतो - एक. मग स्वतः ला थांबवून पाऊल मागे घेतो - दोन आणि मग इच्छित पाऊल टाकतो - तीन. म्हणून ह्या तीन beats मधला, दोन नंबरचा अर्थात मधला beat महत्त्वाचा. तेव्हा त्या गाण्यात पंचम नी waltz च्या तीन beats च्या ठेक्याला एका वेगळ्या पद्धतीने वाजवत व्हिस्कीची नशा रसिकांच्या मनात जागवली.
पंचम ची गाणी ऐकताना म्हणूनच कधी बाह्य नशा, अनिवार्य नसते. खरं तर गरजच नसते बाह्य नशेची. ज्याच्या संगीतात इतकी मदभरी नशा ठासून भरलेय, त्याचं संगीत ऐकताना बाह्य नशेची गरज काय ?  काय एक एक नशीली गाणी दिलीत पंचम नी.

पंचम ची अतिशय प्रसिद्ध झालेली गाणी तर आहेतच जशी ऑंधी, इजाजत, अमरप्रेम, किनारा, खुशबू, लिबास, खूबसूरत, ग्रेट गॅम्बलर, हम किसी से कम नही, कुदरत, गोलमाल, सत्ते पे सत्ता, शोले, मासूम ई. चित्रपटातील. पण इतरही अनेक आहेत जशी बहुत दूर मुझे चले जाना हैं (हीरा पन्ना), ऐसा समा ना होता (जमीन आसमान), रोज रोज ऑंखो तले एक ही सपना पले (जीवा), मौसम प्यार का रंग बदलता रहे, मेरी तरह अल्ला करे तेरा किसी पे आये दिल, चंद रोज और मेरी जाॅं चंद रोज, तुम दिलवालोंके आगे (सितमगर), ऐसा कभी हुवा नही, तू, तू हैं वही (यह वादा रहा), कहीं ना जा आज कहीं मत जा (बडे दिलवाला),  तुम से मिलके जिंदगी को यूॅं लगा (चोर पोलीस), फिर से आइयो बदरा बिदेसी (नमकीन), अच्छी नहीं सनम दिल्लगी दिले बेकरारसे (राखी और हथकडी), ऐ सागर की लहरों, यह कोरी करारी कुॅंवारी नजर, रंग ए मेहफिल (समुंदर) आणि अशीच कितीक.
बरं, फक्त संगीताकडेच लक्ष द्या किंवा फक्त situation कडेच लक्ष द्या असं ही नाही. शब्दांकडे सुद्धा त्याचं तितकाच लक्ष असायचं. गीतकाराचे शब्द आपल्या संगीतावर कसे परिणाम करू शकतील किंवा त्या गीतकाराच्या शब्दांसाठी आपलं संगीत कसं हवं हा विचारदेखील असायचा गाण्यास संगीत देताना. अगदी बारीक गोष्टींचा देखील त्यात विचार असायचा.
आता हेच बघा ना. यह वादा रहा मधलं तू, तू हैं वही दिल ने जिसे, हे एक अतिशय मधुर आणि सुश्राव्य गीत. आता हा पिक्चर बनवण्याचे मुळात रमेश बहलला सुचले ते The Promise नावाचा इंग्रजी सिनेमा बघून. गोष्ट अशी की रमेश बहल, गुलशन बावरा आणि पंचम तिघे आठवड्यातून दोन तीन वेळा रमेश बहल कडे सपत्नीक जमून डिनर करत आणि नंतर एक इंग्रजी पिक्चर बघत. त्यात हा The Promise त्यांनी दोनतीनदा बघितला. त्यावर हिंदी पिक्चर बनवायचा हे ठरलं. आता तो इंग्रजी पिक्चर बघताना एकदा आर डी एकदम विचारात गढून गेलेला पाहून गुलशन नी त्याला विचारलं की काय झालं. त्यावर पंचम म्हणाला की माझ्या डोक्यात काही notes (सूर) येताहेत हे इंग्रजी संगीतातील सूर आहेत. पण आपल्या ह्या पिक्चर मध्ये बघ मी ते कसे अस्सल हिंदुस्तानी रुपात पेश करतो ते. आणि हा किस्सा कळल्यावर तू, तू हैं वही ची सुरुवात ऐकताना ते जाणवतं. हे गाणं बसवताना, पंचम नी गुलशन बावरा ला गाऊन दाखवली सुरावट - ला लारा लारा ला, लाह लाह ला लाला ला ला; ला लाला ला ला, ला ला ला ला ला. आणि तो म्हणाला की हे ला ला ऐकून इथे कहा वगैरे नको लिहूस. इथे vowel म्हणजे सूरच हवा आणि म्हणून गुलशन बावरा नी लिहिलं - तू, तू हैं वही.
दुसरं उदाहरण जुर्मानाचं. गीताचे बोल आहेत सावन के झुले पडे हैं. ह्या गीतात मुखडा संपतो तो तुम चले आओ ह्या ओळीनी आणि ही ओळ चार वेळा गायली जाते. आता ह्यात जी त्या ओळीची फेक आणि चाल आहे ती चारही वेळा गाण्याच्या तीव्रतेमध्ये भिन्न आहे. पहिल्यांदा फक्त बोलावणे आहे तर दुसऱ्या वेळी ती साद आहे. तिसऱ्या वेळी ती आतून, मनापासून घातलेली साद आहे तर चौथ्या वेळी ही जाणीव होऊन की तो कदाचित येणार नाही, ती एक स्वगत ओळ आहे. आता हे भावनेच्या तीव्रतेमधील फरक, पंचम ने ज्या पद्धतीने ती ओळ चार वेगळ्या प्रकारे पेश केलीय, त्यातून जाणवतात. ह्याला म्हणतात संगीत रसिकांपर्यंत पोचवणे.
तिसरं उदाहरण - चित्रपट ऑंधी. गीत - इस मोड से जाते हैं. आता ह्या गाण्यात एक ओळ आहे ऑंधीसी तरह उडकर, एक राह गुजरती हैं, शरमाती हुई कोई  कदमोंसे उतरती हैं. इथे ऑंधीसी तरह उडकर, एक राह गुजरती हैं, हा सगळा भाग high notes अर्थात वरच्या सूरात आहे आणि ऑंधी वर एक फिरत आहे. तर दुसरा भाग शरमाती हुई कोई  कदमोंसे उतरती हैं हा लो notes अर्थात खालच्या सूरात आहे. ह्याला म्हणतात शब्दांमधले बारकावे अचूक टिपत संगीत देणे.

असं असून सुद्धा आर डी म्हणजे पाश्चात्य संगीताचे अनुकरण असं समीकरण बरेच दिवस होतं. किंबहुना, पंचम इहलोकीतून गेल्यावरच त्याच्यावर अधिक स्तुतीसुमने उधळली गेली. मान्य की त्याच्या बऱ्याच गाण्यांच्या वाद्यमेळ्यावर पाश्चात्य संगीताचा प्रभाव होता पण म्हणून आर डी म्हणजे फक्त पाश्चात्य संगीत असं सरसकट विधान करणे अगदी चुकीचे आहे.

असा आरोप करणाऱ्या व्यक्तीने भारतीय शास्त्रीय संगीतात आर डी ने बांधलेली गाणी ऐकली नाहीत हाच ह्याचा अर्थ होतो. माझ्या लेख मालेतील पहिल्याच लेखात मी अशा गाण्यांपैकी दहा एक निवडक गाण्यांची यादी दिली होती. ती यादी पाहूनच लक्षात येते की शास्त्रीय संगीताचा गाढा अभ्यास असल्याखेरीज हे काम अशक्य आहे. आता माधव विजयच्या चित्रफिती पाहून समजलेल्या काही करामती सांगतो पंचमच्या.

चित्रपट नमकीन. गीत - राह पे राहते हैं. ह्यात मुखड्यानंतर आणि अंतऱ्या आधी कोरस आहे - साम, साम साम असा. ह्यातला जो सा आहे तो वास्तविक सरगम मधला पा आहे. तसा तो कोरस चा पहिला बीट/ सूर म्हणून षड्जाच्या जागी आहे पण तो आहे पा.
आणि असं फक्त हे एकच गाणं नाही. मुसाफिर नामक एक प्रदर्शित न होऊ शकलेला चित्रपट. रेखावर चित्रीत झालेले एक गीत. इथे सावन साॅंवरी अँंखिया हे गाण्याचे बोल आहेत ज्यात सावन चा सा हा पहिला असला, गाणं त्याने सुरू होत असलं तरी तो सरगम मधला नी आहे.
पहिल्या गाण्यात पा हा सा आहे तर दुसऱ्या गाण्यात नी हा सा आहे. थोडक्यात किशोरीताईंच्या आई  म्हणाल्या होत्या त्याप्रमाणे सरगम मधला कोणताही सूर षड्ज बनू शकतो. पंचम नी ते करून दाखवलं.  आता हे ज्याची शास्त्रीय संगीतावर कमालीची पकड आहे तोच करू शकतो. कोणी इतर असा विचारही करू शकणार नाही.
शास्त्रीय संगीतातील मींड, किताब मधील धन्नो की ऑंखोंमे ची सुरुवात होते तीच मुळी मींड घेत. हूजूर इस कदर भी ना (मासूम) मध्ये सुरूवातीची आलापी आणि मुखड्याची सुरूवात ह्यात पंचम नी मूर्च्छनेचा (modes in Jazz / modulations in wester classical) फार सुरेख उपयोग केला आहे. ह्यात आलापी आसावरी मध्ये आहे तर मुखडा कल्याण मध्ये. सूर तेच ठेवले. फक्त सा ची जागा बदलली. सप्तक बदललं.

अमरप्रेमचं रैना बीती जाये, परिचयचं बीती ना बिताये रैना, छोटे नवाबचं घर आजा घिर आये बदरा, दिल पडोसी हैं मधलं भीनी भीनी भोर, भोर आयी - ही नमुन्यादाखल ची काही गाणी आणि वर दिलेली उदाहरणं ह्यातून दिसणारा शास्त्रीय संगीताचा पंचमचा अभ्यास अफाट आहे.

आता ही इतकी सांगीतिक बुद्धिमत्ता असायला आणि ती वापरण्याचं कौशल्य असायला माणूस देवाघरचाच असायला हवा. हो ना?

असा हा देवाघरचा माणूस मनानी देखील तसाच होता. जितकं त्याचं संगीत निर्मळ, साफ, मनस्वी, अद्भुत; तसंच त्याचं मन आणि वागणं. कोणाला टाकून बोलणं नाही. कोणाची निंदा नाही. दुसऱ्याचं मोठेपण, चांगुलपणा, गुण जाणणारं, नुसतं जाणणारं नाही तर जगाला देखील ते सांगण्याइतकं मोठं मन. टीम मधल्या कोणाची आर्थिक अडचण असेल तर डाव्या हाताला कळायचं नाही, उजव्या हाताने केलेली मदत.

राजाराम वागळे - नमकहराम चे निर्माते. आपल्या चित्रपटांच्या संगीतासाठी ते कायम शंकर जयकिशन ला घेत कारण जयकिशन ही त्यांची कायम पहिली निवड असायची. पण नमकहराम सुरू करायच्या आधीच जयकिशन हे जग सोडून गेला होता. तरी त्यांनी शंकरदा ना चित्रपट करण्याविषयी गल घातली. पण शंकरदा, आपला मित्र आणि पार्टनर गमावल्याच्या दु:खात होते. त्यांनी नकार दिला आणि पंचमचे नाव सुचवले. त्याप्रमाणे, वागळे पंचम कडे आले. त्यांनी पंचमला सांगितले की मी शंकरजींची परवानगी घेऊन तुमच्याकडे आलोय. पण तरी, पंचम स्वतः जाऊन शंकरजीना भेटले आणि स्वतः त्यांच्याकडून परवानगी घेऊनच मग वागळेना होकार दिला.
मग प्रश्न निघाला मानधनाचा. पंचम त्यावेळेस हिंदी चित्रपट सृष्टीतील सर्वात आघाडीचा संगीत दिग्दर्शक होता. वागळे म्हणाले की मानधन किती घेणार ते आधी सांगा. पंचम नी विचारलं की तुम्ही मला आर डी म्हणून चित्रपट करू देताय की जयकिशन नाही म्हणून ? वागळे नी तितकंच स्पष्ट उत्तर दिलं की जयकिशन नाही म्हणून. तेव्हा पंचम म्हणाला की तर मग मी मानधन न घेता तुमच्या चित्रपटाला संगीत देईन. कारण मी जयकिशनजींचा प्रतिनिधी म्हणून इथे आहे. पंचम म्हणून नाही. आता पैसे घेणे मला शोभणार नाही. हे संगीत माझ्याकडून जयकिशनजीना श्रद्धांजली आहे. आणि वागळेंकडे काम करताना पुढील बावीस वर्ष पंचम ह्याच तत्वाला जागला. बरं काम यथा तथा केलं असं ही नाही हे नमक हराम ची गाणी ऐकून कळतं.

ह्याच पंचम नी वागळेंचीच एक मराठी मालिका करताना नंदू भेंडेंकडून अपेक्षित गायकी घेता येत नाही ह्यासाठी गायक बदलला पण आधी ह्या बद्दल नंदू ची माफी मागितली की मला तुमच्याकडून हे गीत हवं तसं गाऊन घेता येत नाही. आपण नंतर कधी एकत्र काम करू आणि मगच गायक बदलला.

शम्मी कपूर ला, RD बसवत असलेली एक tune आवडली म्हणून त्याला ती देऊन टाकली की यह tune तुम्हारी. पुढे ती प्रत्यक्ष वापरली गेली वीसेक वर्षानी जेव्हा शम्मी बापाचा रोल करत होता. चित्रपट जमीर. गीत - तुम भी चलो हम भी चले. मानधन शून्य. श्रेय नामावलीत संगीत दिग्दर्शक म्हणून सपन चक्रवर्ती कारण जमीर चे संगीत दिग्दर्शक ते होते. शम्मी घरचा. सपन घरचा. असा होता पंचम. साफ दिलाचा, निर्मळ मनाचा, मनस्वी. त्याच्या संगीता सारखा.
चित्रपट संगीत क्षेत्रातला देवाघरचा माणूस.

---- मनिष मोहिले.




Saturday, July 2, 2022

Pancham Extended

 P for पंचम extended

काल परत एकदा "पंचम अनमिक्स्ड" बघत होतो रात्री. माझा anytime विरंगुळा आहे तो. जरी तो वृत्तपट अनेक वेळा बघितला असला मी; तरी त्यातील वेगवेगळ्या गाण्यांच्या निर्मितीच्या वेळचे पंचमच्या अफलातून अद्भुत सृजनशीलतेचे, कलात्मक निर्मितीक्षमतेचे, मला तितकेच कौतुक वाटत रहाते. संगीत क्षेत्रातील विविध दिग्गजांनी उलगडून दाखवलेले त्याच्या संगीत बुद्धिमत्तेचे विविध पैलू आणि कंगोरे ह्यांचा तितकाच अचंबा वाटत रहातो. दरवेळी त्याच्या एक से एक बढकर गाण्यांच्या जन्मकथा ऐकताना मी तितक्याच तल्लीनतेने ऐकतो. दरवेळी तोच काटा माझ्या अंगावर येतो. काही गाण्यांचे संगीत वा धून ऐकताना डोळ्यांच्या कडा नकळत ओलावतात. कुणी ह्यास वेडेपण म्हणेल पण त्यातच माझं माणूस असणं दडलेले आहे.


तर काल हा वृत्तपट परत एकदा पाहताना शांतनू मोइत्रा चं एक वाक्य "रजिस्टर" झालं. तो म्हणतो की "RD was constantly negating the idea of form." म्हणजेच, पंचम सतत आपलं संगीत एक विशिष्ट शैली किंवा आकृतीबंध ह्यात अडकून राहू नये ह्यासाठी विचारशील व प्रयत्नशील असायचा. हे वाक्य ऐकले आणि मला एकदम माझ्याच "पिकासो व ज्ञानेश्र्वर" ह्या माझ्या आधीच्या एका लेखाची आठवण झाली. त्यात पिकासोच्या एका जगप्रसिद्ध वक्तव्याबद्दल (quote), मी लिहिलं होतं. पिकासो म्हणतो "मी चार वर्षांच्या सरावानंतर हुबेहूब राफाएलच्या शैलीत चित्र काढण्यात यशस्वी झालो पण एका लहान मुलासारखं चित्र काढण्यासाठी पूर्ण आयुष्य खर्ची घालावं लागेल असं वाटतं."  थोडक्यात पिकासो देखील हेच अधोरेखित करू इच्छित होता की प्रत्येक कलाविष्कार हा नित्यनूतन हवा. त्यासाठी कलाकाराची सृजनशील विचारप्रक्रिया जी प्रत्येक कलाविष्काराची जन्मदात्री असते ती सतत नवनवोन्मेषशालिनी असायला हवी. ती जर एक विशिष्ट शैली वा आकृतीबंध ह्यात अडकत नसेल, प्रेरणा, प्रकटन यासंदर्भात साच्यात अडकत नसेल तर निर्माण होणारा कलाविष्कार नित्यनूतन असेल जसे बालकांचे मन व त्यामुळे नित्यनूतन असलेले त्यांचे विचार आणि प्रकटन.


इकडे पंचम बद्दल बोलताना त्याचे सहकलाकार व सुहृद हेच सांगत की त्याच्यात लहान मूल कसं दडलेले होते. मनात येईल ते करून टाकायचं. त्यामुळेच अजरामर ठरलेल्या कित्येक गीतांचे संगीत देणारा हा मनस्वी संगीत दिग्दर्शक, आपल्या recording studio मध्ये, लुंगी नेसून ह्या टोकापासून ते त्या टोकापर्यंत नाच करताना लाजायचा नाही. हेच मूलपण, हीच मनस्विता त्याच्या संगीतात दिसून येते. गुलझार नी सांगितल्याप्रमाणे, किताब मधल्या " अ, आ, इ, ई, मास्टर जी की आयी चिठ्ठी" गाण्याचं रेकॉर्डिंग करताना त्याने चक्क शाळेतल्या खऱ्याखुऱ्या बाकड्याना वाजवून हवा तो ध्वनी परिणाम साधला होता. 


पंचम वरील माझ्या आधीच्या लेखात दिलेली सर्व उदाहरणे, ज्यात त्याने प्रत्येकवेळी कसे नावीन्यपूर्ण प्रयोग केले हे सांगितलेले आहे, त्या सर्व प्रयोग करण्यामागची ही एक विचारधारा शांतनूच्या त्या वाक्यातून स्पष्ट होते.


"Pancham Unmixed" मध्ये गौतम राजाध्यक्ष सांगतो त्याप्रमाणे मुळात monophonic म्हणजेच एकध्वनीत्व हा स्वभाव असलेल्या भारतीय संगीतात, पंचम ने polyphonic अर्थात बहुध्वनीत्व पद्धतीच्या संगीताचा उपयोग करून एक नवीन परिणाम साधला आणि भारतीय चित्रपट संगीतात एक नवे पर्व सुरू केले. प्रस्थापित साचा वा शैली नाकारण्याच्या पंचमच्या प्रवासाची ही सुरुवात म्हणता येईल.


त्यानंतर मग, वेगवेगळ्या परिणामांना साधण्यासाठी त्याने वेगवेगळी तंत्र व क्लृप्त्या वापरल्या. मग तो गायक / गायिकेचा आवाज असेल - (दुनिया मे लोगोंको मधला स्वतःचा आवाज, सत्ते पे सत्ता मधल्या बाबूच्या एन्ट्री ला असलेल्या पार्श्वसंगीतात, Annnette ला गुळण्या करत गायला लावून साधलेला परिणाम), किंवा दररोजच्या आयुष्यातील वस्तूंचा वाद्य म्हणून  केलेला उपयोग असेल (मेहबूबा मेहबूबा गाण्यातील सुरूवातीला अर्ध्या भरलेल्या बियर बाटल्यांत फूंका मारून साधलेला परिणाम किंवा शोलेमध्येच जेव्हा जेव्हा गब्बर पडद्या वर येतो तेव्हाचे ते विशिष्ट पार्श्वसंगीत, जोशिले मधला हे साबा गाण्यात वापरलेला नंदीबैलाच्या बुगु वुगु बगु चा उपयोग).

किंवा एखाद्या गाण्यास कशा पद्धतीचे संगीत असावे ह्यामधील आगळा प्रयोग असेल (मेरा नाम है शब्बो ह्या गाण्यात संवादात्मक गीताला दिलेले संगीत किंवा हम किसी से कम नहीं मधली चार अफलातून गाण्यांची ती सुप्रसिद्ध medly), रेकॉर्डिंग चे तंत्रज्ञान वापरण्यातील प्रयोग असेल (जसा क्या जानू सजन, जानें जा ढूॅंढता फिर रहा, छोटी सी कहानी से, आओ आओ जानें जहाॅं ह्या गीतात वापरलेले twin track तंत्रज्ञान) किंवा एकाच गाण्यात अगदी खालची पट्टी ते अगदी वरची पट्टी असा गायक /गायिकेच्या गळ्याचा (आवाजाचा) प्रवास असेल (पडोसन मधील मै चली मैं चली मध्ये शेवटी एकदम वरची पट्टी, जानें जा ढूॅंढता फिर रहा मधला तो मंद्र ते तार सप्तकातील प्रवास किंवा प्यार हमे किस मोड पे ले आया मधला तोच प्रवास).


किंवा गाण्याच्या मूड (स्वभावलहर) प्रमाणे बदलणारे संगीत असेल - प्यार हमे किस मोड पे ले आया मधलं पहिल्या कडव्याचे संगीत ऐका जिथे सगळे भाऊ आता आपल्या प्रेमाची नैय्या पार कशी होणार म्हणून निराश आणि हिरमुसले झालेले आहेत आणि तेच दुसऱ्या कडव्याचे संगीत ऐका ज्यात मार्ग सापडल्यामुळे त्यांच्यात जो जोश,उत्साह भरलेला आहे - हे दोन्ही मूड निव्वळ पंचमच्या संगीतातून रसिकांपर्यंत पोचतात. दिल पडोसी है मधल्या रात चुपचाप दबे पाॅंव चली जाती है च्या चालीतील आणि संगीतातील ती मन व आसमंत भरून टाकणारी निष्क्रीय निराशा त्या संगीतातून मनात झिरपते. त्याच album मधल्या कोई दिया जले कही चं haunting music एक अनामिक हुरहुर, अस्वस्थता आपल्यापर्यंत पोचवते. दम मारो दम मधली नशेबाजांचे नशेत गुंगून डोलणं आणि थिरकणं त्या संगीताच्या प्रकृतीत आहे. तेरे बिना जिंदगी से कोई शिकवा तो नहीं मधलं आयुष्य जाणल्यानंतर आणि आपापल्या वाटा चोखाळल्यानंतर एकमेकांवरील प्रेमाच्या जाणीवेतून होणारी भावनिक उलघाल, पंचम इतक्या प्रभावीपणे, क्वचित कोणी पोचवू शकला असता रसिकांपर्यंत. अशी अनंत उदाहरणं असतील. चित्रपटाची कथा, पात्रांचे कथेतील स्थान आणि प्रवास आणि गाण्याची situation व शब्द ह्याना एका धाग्यात बांधत धून, ताल, ठेका, लय, स्वरसंमेलन, स्वरमेळ, वाद्यवृंदाचा तोल सांभाळत असं गीत द्यायचं जे वर उल्लेखलेल्या वैशिष्ट्यांना अधोरेखित करत त्या अद्भुत संगीत कलाविष्काराचे वेगळेपण दाखवेल पण गाण्याच्या चित्रपटातील स्थानाला आणि चित्रपटाच्या कथेला धक्का ना लावता उलट पूरक ठरेल. हे इतक्या लीलया साध्य करण्यासाठी दरवेळी त्या त्या प्रसंगाशी, मनस्थितीशी एकरूप होणं अत्यंत आवश्यक आहे आणि त्यासाठी एक शैली किंवा साचा, आकृतीबंध ह्यात न अडकणे हे तितकेच आवश्यक आहे. हे जेव्हा कलाकार सहज पणे करण्याइतका प्रतिभावंत असतो तेव्हा मेरा कुछ सामान तुम्हारे पास पडा है, दिन जा रहे है के रातोंके साये, एक ही ख्वाब कई बार, हुजूर इस कदर भी ना, लकडी की काठी, फिर से आईयो बदरा बिदेसी, कुछ ना कहो कुछ भी ना कहो, धन्नो की ऑंखोंमे, पिया बावरी, आजा आजा मैं यूॅं प्यार तेरा अशी संपूर्ण वेगवेगळ्या मूड्सची; धून, लय, ताल, छंद, ठेका, स्वरसंमेलन, स्वरमेळ आणि वाद्यवृंद ह्यांची जादू रसिक मनावर दशकांसाठी पसरवणारी गाणी जन्माला येतात. 


काहीं मध्ये rhythm महत्त्वाचा, तर काहींमध्ये melody, तर काहींमध्ये side rhythm, तर इतर काहींमध्ये ह्यांचे combination. आता ह्या ठरलेल्या साच्यापासून दूर जात आर डी ने किती वेगवेगळे प्रयोग केले आणि दरवेळी किती यशस्वीपणे ते केले हे बघुयात. A constant negation of the idea of form.


असं बघा की कोणतं ही गाणं हे प्रामुख्याने तीन गोष्टींचा परिपाक असतं - ताल (rhythm), सुरावट (melody) आणि पार्श्वभूमी मधील chords अर्थात स्वरमेळ (harmony). प्रत्येकाचं आपलं नेमून दिलेलं काम असतं, भूमिका असते. गाणं एका अथवा अधिक तालात असतं. हा झाला Rhythm section. ह्या विभागासाठी तालवाद्य असतात. गायकी आणि चाली प्रमाणे वा पूरक असे काही music pieces असतात - मग ते बासरीवर असतील, पेटीवर असतील, व्हायोलिन वर असतील किंवा गिटार वर. ही झाली मेलडी. थोडक्यात, ह्या विभागाची वाद्य देखील निश्चित असतात. आता पार्श्वभूमी ला वाजणाऱ्या chords (base guitar, Spanish guitar) ही झाली harmony अर्थात स्वरमेळ. प्रत्येक विभाग आणि त्यासाठीची वाद्य ह्यांच्या निश्चित भूमिका ठरलेल्या. 

मात्र पंचम ने हे प्रस्थापित नियम धाब्यावर बसवत Rhythm ला Harmony चे काम दिले तर Harmony ला Rhythm चे. कधी Harmony ला Melody च्या रुपात पेश केलं. तर कधी Rhythm मधून melody चा परिणाम साधला. ही बघा काही उदाहरणं.


घर च्या   तेरे बिना जिया जाये ना मध्ये पंचम  नी मादल ह्या तालवाद्याचा उपयोग तंतूवाद्यासारखा / chord सारखा केलाय. त्याच वेळी जो सुरूवातीचा स्पॅनिश गिटार आहे तो ताल देण्याचं काम करतोय.  थोडक्यात तालवाद्याला स्वरमेळ्याच्या (harmony) भूमिकेत काम बजावायचे आहे आणि तंतूवाद्याला तालाची (rhythm) भूमिका बजावायची आहे. वाद्य आणि त्यांचे प्रस्थापित विभाग ह्यांचे ठरलेले आडाखे बाजूला ठेऊन एक आगळा प्रयोग पंचम नी

केला आणि अप्रतिम सुरेख पद्धतीने केला आणि हे करतानाच एक अप्रतिम सुश्राव्य गाणं दिलं. आजही, तेरे बिना जिया जाये ना हे मधुर प्रणय रम्य गाण्यांच्या यादीत फार वरच्या क्रमांकावर येतं.

दुसरं उदाहरण आहे अंगूर चित्रपटातील प्रीतम आन मिलो चे. ह्यात तबल्यासारखे तालवाद्य वापरून मेलडी निर्माण केली आहे. म्हणजेच तालातून सुरावटीचा परिणाम साधलाय. 

तिसरं उदाहरणं आहे सत्ते पे सताच्या प्यार हमे किस मोड पे ले आया ज्यात फक्त chords चा वापर करत सुरावटी चा परिणाम साधलाय. म्हणजेच harmony मधून melody. बरं, परत गाण्यात काही ठिकाणी harmony, स्वतः चे म्हणजेच harmony चे देखील काम करते.

आणि चौथे उदाहरण आहे जिथे गाण्यातील जो कोरस आहे तो ताल देण्याचे काम करतो म्हणजेच Rhythm देतो. गाणं आहे हम बेवफा हरगीज ना थे आणि चित्रपट आहे शालीमार.


कधी ताला कडून स्वरमेळा चे काम, तर स्वरमेळा कडून तालाचे, कधी तालाकडून सुरावटी चे काम तर कधी त्याच कामाला स्वरमेळा ला लावायचे तर कधी समूह पार्श्वगायना मधून तालाचा परिणाम. A constant negation of the idea of form.


बरं, फक्त ठरल्यापेक्षा वेगळ्या भूमिकेत एखादं वाद्य वाजवायचे असंच फक्त नाही;  तर, एखादं वाद्य, दुसऱ्या वाद्या प्रमाणे वाजवता येईल का ह्याचं उत्तरासुद्धा पंचमदा नी फार सुरेल आणि सुरेख गाण्यातून दिलेलं आहे.


चित्रपट इजाजत. गाण्याचे बोल - खाली हाथ शाम आई हैं. आता ह्यात जी संतूर वाजवलेली आहे ती चौघड्या चा ध्वनी परिणाम देईल अशा पद्धतीने वाजवलेली आहे. चौघडा (चंडा) जसा एक विशिष्ट पद्धतीने वाजवला असता जो ध्वनी परिणाम देतो तसा ध्वनी परिणाम संतूरच्या सहाय्याने साधत एक अतिशय सुंदर गाणं पंचम नी आपल्याला दिलंय.

आता हाच चंडा उर्फ चौघडया चा ध्वनी परिणाम तबल्याच्या सहाय्याने पंचम नी साधलाय तो १९४२ अ लव्ह स्टोरी मधील प्यार हुआ चुपके से ह्या गाण्यात.  Again, constant negation of the idea of form.


ह्या सर्वांपेक्षाही पूर्णपणे वेगळा असा एक प्रयोग. चित्रपट हरजाई आणि गाणं आहे तुझसा हसीं देखा ना कही. ह्यात पंचम

नी मेलडी म्हणून एखाद्या वाद्याची सुरावट  वापरलेलीच नाही. किशोरच्या अफलातून आवाजाबरोबर किंवा पार्श्वभूमीला आहे फक्त orchastration म्हणजेच वेगवेगळ्या वाद्यांवर वाजणारे वेगवेगळे संगीत तुकडे. परत एकदा, एक शैली किंवा आकृतीबंध ह्यात न अडकता एक संपूर्ण वेगळा, स्वयंभू आणि जबरदस्त यशस्वी प्रयत्न. Again, constant negation of the idea of form. 


आणि अशा ह्या अद्वितीय संगीतकाराच्या शेवटच्या चित्रपटामधील ते अद्भुत गाणं - एक लडकी को देखा तो ऐसा लगा - ज्यात chord साठी स्पॅनिश गिटार न वापरता पंचम नी सितार वापरली आहे; आणि फक्त एका melody भवती एक अफलातून सुंदर व सुरेल असं  सूरविश्र्व  उभारले आहे - a proof that true genius lies in simplicity. 

इथे परत पिकासो येतो. कलाविष्कार हा सहज असला पाहिजे. असा सहज की ज्यात सरलता असेल. सराव असेल; रियाज असेल; पण तो जाणवणारा नसेल. द्रृष्य नसेल. प्रत्येक कलाविष्काराला जन्म देणारी सृजनशीलता ही साच्यात न अडकणारी,  सरल आणि सहज असली पाहिजे. तशी ती असते तेव्हाच निर्माण होणारी कलाकृती कायम स्मरणात राहते. अर्थात त्यात कौशल्य, सराव किंवा रियाज ह्यातून येणारा सफाईदारपणा हे अदृश्यपणे, तर उच्च कलात्मक मूल्य आणि काळाच्या कसोटीवर उतरून कालौघात टिकणारी प्रतिभा हे इतर घटक तितकेच महत्त्वाचे. आणि ह्या सगळ्यांचा परिपाक म्हणून जेव्हा कलाकृती जन्म घेते तेव्हा ती अजरामर होते.


जवळपास तीन दशकं संगीत आणि संगीतच जगलेल्या पंचम चा हा कलाविष्कार त्याच्यातल्या अभिजात नैसर्गिक संगीतकार पंचम बरोबरच अतिशय सरळ व निष्कपट मनाच्या एका सज्जन माणसाचं दर्शन घडवतो. सह + ज - जो बरोबर जन्माला येतो तो सहज. पंचम नी कायम स्वतःच्या स्वभावानुसार, प्रकृतीनुसार आणि जात्याच चौकस आणि निराळी वाट धरण्याच्या वृत्तीनुसार प्रामाणिक संगीत दिलं. जणू त्याच्या बरोबरच ते जन्माला आलं होतं आणि म्हणून प्रत्येक गाण्याबरोबर तो परत जन्म घेत होता - अधिक कल्पनांसहीत, अधिक उत्स्फूर्त बनत. अधिक सरल बनत. आणि आडाखे, साचे, शैली, आकृतीबंध ह्यांच्या सीमा, नियम नाकारत. Constantly negating the idea of form.


आज पंचमच्या जयंतीच्या निमित्ताने, चित्रपट संगीतातील माझ्या देवाला - आर डी ला वाहिलेली ही श्रद्धांजली. One of the finest composers, who constantly negated the idea of form.


---- मनिष मोहिले