आषाढी एकादशी. आजच्या दिवशी संपूर्ण महाराष्ट्रामधील वारकरी जवळपास वीस एकवीस दिवसांची दिंडी चालून विठूनामाच्या गजरात, ज्ञानोबा, तुकोबांच्या आशीर्वादाने पंढरीला पोचतात, त्या सावळ्या विठूला कडकडून भेटायला, चंद्रभागेत स्नान करून तिच्या वाळवंटात टाळ चिपळ्यांच्या तालावर नाचत इतर वारकऱ्यांची उराउरी भेट घ्यायला. गेली हजारो वर्षे ही दिंडी दरवर्षी नित्यनेमाने पंढरीची वाट चालत आली आहे. अगदी ज्ञानोबा माऊलींच्या देखील कित्येक वर्षे आधीपासून. अशी ही हजारो वर्षांची परंपरा असलेली दिंडी महाराष्ट्राच्या धार्मिक, सांस्कृतिक, पारंपारिक आणि अध्यात्मिक जीवनाचे एक अविभाज्य अंग आहे.
त्याच प्रमाणे गुजरात मधील बनासकांथा जिल्ह्यात, गुजरात राजस्थानच्या सीमेवर असलेल्या अंबामातेच्या मंदिरात भरणारी जात्रा हे गुजरातच्या धार्मिक, सांस्कृतिक, पारंपारिक आणि अध्यात्मिक जीवनाचे अविभाज्य अंग आहे.
वास्तविक पहाता; धर्म, संस्कृती, परंपरा आणि अध्यात्म ह्या एकमेकांशी संबंधित असल्या तरी एकमेकांपासून भिन्न अशा गोष्टी. निदान वरकरणी तरी. मग एकच वारी हे महाराष्ट्राच्या धार्मिक, सांस्कृतिक, पारंपारिक आणि अध्यात्मिक जीवनाचे अंग कसे ? किंवा हेच गुजरातच्या संदर्भात अंबाजी जात्रेच्या बाबतीत कसे लागू पडते ?
"धार्मिक" : भक्त पुंडलीकाच्या काळापासून अस्तित्वात असलेला हा वारकरी संप्रदाय; ज्याला अधिक लोकाभिमुख करत, सर्व जातीजमातीच्या लोकांना त्यात सामावून घेण्याचे आणि त्याचा प्रसार करण्याचे काम माउलींनी आणि तुकोबांनी केले ज्यास एकनाथ महाराजांनी पुढे नेले. एक साधा भक्तीमार्ग. अगदी सामान्यातील सामान्य संसारी व्यक्तीला, मग ती व्यक्ती स्त्री असो किंवा पुरुष, केवळ भक्तीमार्ग अनुसरून, दैनंदिन कर्तव्य करता करता नामजप करत भगवंताला भेटता येऊ शकते, त्याच्याशी एकरूप होता येते हा दिलासा आणि विश्वास जनमानसात दृढ करण्याचे अमूल्य काम वारकरी संप्रदायाने केले. त्या दिलाश्याचा, त्या विश्वासाचा ऊद् घोष म्हणजे वारी. ह्या दृष्टीने बघता पंढरीची वारी ही धार्मिक आहे.
कारण धारयते इति धर्म:, अशी जरी भगवंतांनी धर्माची व्याख्या केली असली तरी प्रत्येक धर्माचे अंतिम ध्येय त्या वैश्विक शक्तीमध्ये एकरूप होणे हाच आहे. परंतु,
स्वतःच्या जीवनशैलीमध्ये धर्म आकलन होणे आणि ती जीवनशैली अनुसरणे ह्याच माध्यमातून ईश तत्वाशी एकरूप होणे हे सामान्य जनांसाठी दुष्कर कर्म आणि म्हणून स्वतः पासून वेगळी दिसणारी ईश प्रतिमा आवश्यक होऊन जाते. वारकरी संप्रदायाने विठ्ठलाच्या प्रतिमेत ते ईश तत्व पाहिले आणि दैनंदिन जीवनशैलीत राहून त्याप्रत पोचण्यास त्यातल्या त्यात सोपा म्हणून भक्तीमार्ग सुचवला. ह्या मार्गात काही नावीन्य असावं, वैविध्य असावं, समान मार्गावर चालणाऱ्या भक्तांनी एकत्र यावं ह्या हेतूने वारी सुरू झाली. धर्माने सांगितलेल्या मोक्षाप्रत जाण्याचा एक सोपा मार्ग.
ह्याच दृष्टीकोनातून पहाता, शक्तीरुपी देवतत्वाची प्रामुख्याने आराधना करणाऱ्या गुजरात मध्ये, ५१ शक्तीपीठांमधील प्रमुख पीठांपैकी एक असलेल्या अंबाजी मंदिरात जाऊन देवीची आराधना करणे हा धार्मिक जीवनाचा अविभाज्य भाग आहे हे स्वाभाविक आहे. हिंदू धर्मातील शक्तीचे महात्म्य ध्यानात घेता, माता सतीचे हृदय ज्या ठिकाणी पडले, त्या स्थानी शक्ती तत्वाची आराधना, भक्ती ह्या खेरीज धार्मिकतेची अधिक चांगली ओळख कोणती असू शकेल ? धारयते इति धर्म: ह्या व्याख्येनुसार, ज्या जीवन शैलीमध्ये जगदंबेच्या रुपातील मातृतत्व आणि देवत्व ह्यांची भक्ती व आराधना हीच जगण्याची पद्धती आहे आणि त्या भक्तीमार्गानेच मोक्षाप्रत पोचण्याची शक्यता देखील.
"सांस्कृतिक" : वर्षानुवर्षे सुरू असलेल्या ह्या वारीच्या पदयात्रेत गावोगावचे, वेगवेगळ्या जातीजमातींचे लोक सामील होतात त्यात एकमेकांच्या आचारविचार जवळून बघितले जातात. विचारांप्रमाणे आचारांची देखील देवाण घेवाण होते. गावोगावचे लोक दिंडीत आपली फुल ना फुलाची पाकळी असा सहभाग असावा ह्या हेतूने वारकऱ्यांना जमेल तितकी मदत करतात ज्यातून स्नेहभाव वाढीस लागतो. गावोगावी स्थानिक पातळीवर नेतृत्व, नियमन आणि कृती अशी एक व्यवस्था निर्माण होत जाते जी वारीव्यातिरिक्त देखील समाजजीवनात अनेक महत्त्वाच्या भूमिका बजावू शकते. कित्येक जण आपल्या अंगीच्या कलाकौशल्य इत्यादींचे जगाला दर्शन व्हावे म्हणून वारीत सामील होतात आणि जनास ते कौशल्य दाखवितात. ह्यातून कलेबरोबरच ज्ञान, माहिती ह्यांचा प्रसार होऊ शकतो. बरं, ह्या सगळ्यास भक्तीचे अनुष्ठान असते. वर्षानुवर्षे हे जेव्हा सातत्याने होत रहाते, तेव्हा संपूर्ण समाजाचे ते एक कृतीशील रूप बनून सामोरे येते. काही जबाबदाऱ्या ह्या पिढी दर पिढी नित्याने स्वीकारल्या जातात आणि प्रामाणिक कळकळीने निभावल्या जातात. हे असे एकमेकांच्या सहकार्याचे, एकमेकांना प्रोत्साहन देण्याचे, एक विशिष्ट समान हेतू उरी बाळगून एखादे कार्य पूर्णत्वाला नेण्याचे एक पर्व सुरू होते हे त्या समाजाची ओळख बनते. संस्कृती ह्यातूनच जन्म घेते आणि फुलत जाते, बहरत जाते. महाराष्ट्रातील ही पंढरीची वारी आणि त्यात सामान्यजनांची वारकऱ्यांप्रतीची प्रीती, त्यांना मदत करण्याची प्रेरणा आणि; नर्मदापरिक्रमा करणाऱ्याना मदत करणाऱ्या सामान्य जनांच्या मनीची प्रेरणा ही एकाच संस्कृतीची देणगी आहे. म्हणजे आपापल्या भौगोलिक स्थानी राहून, एकाच ध्येयाप्रत पोचण्याचा प्रयत्न करणाऱ्या बांधवास मदत करणे ही संस्कृती - मग ती नर्मदाकिनारीची वाट चालत असो किंवा आळंदी/देहू हून पंढरीची वाट चालत असो.
हेच तर्कशास्त्र लागू पडते अंबाजी जात्रेत केल्या जाणाऱ्या गरब्यात. विशेष करून नवरात्रीच्या वेळेस अंबाजी मंदीर परिसरात होणाऱ्या गरब्याचे महत्व काही आगळेच. मुळात गर्भ ह्या शब्दाचे गरबा हे भाववाचक. त्यामुळे केवळ देवत्वाचेच नाही तर देवत्वामधील मातृतत्वाचे आणि मातृत्वातील मांगल्याचे महत्व उत्सव रुपात साजरे करणे ही भारतीय संस्कृतीची शिकवण मध्ये मातृत्वाचे लोकांच्या मनावर उत्सव रूपातून बिंबवणे, रुजवणे हेच ह्या जात्रेचे सांस्कृतिक अंग. आजच्या आधुनिक काळात देखील गुजरातची मुख्य सांस्कृतिक ओळख गरबा (The Longest Dance Festival in The World), हीच आहे. शतकानुतकं चालत आलेला हा नृत्योत्सव गुजराती संस्कृतीचे दर्शन जगाला घडवतो.
"पारंपारिक" : अशी ही वारी जेव्हा हजारो वर्षे चालत रहाते, तेव्हा आपसूक तिला एका उदात्त परंपरेचे रुपदेखील प्राप्त होते. इथे वारी आणि परिक्रमा ह्यात फरक दिसून येतो. कारण परिक्रमा ही अजूनही वैयक्तिक पातळीवर आहे. तिला वारीसारखे सार्वत्रिक सामाजिक रूप लाभलेले नाही. मात्र वारीची परंपरा ही सुदैवाने अजून बाह्यरुपी तरी कर्मकांडामध्ये अडकून शबलित झालेली नाही. पुंडलिकाच्या भक्तीचा वारसा, त्याच्याकडून माऊली, तुकोबा, एकनाथ महाराज असा प्रवास करीत जनसामान्यांपर्यंत पोहोचून आजच्या काळी देखील कृतीशील आहे हे एक प्रकारे वारीच्या परंपरेचे यश म्हणावे लागेल. उलट कर्मकांडात न अडकता, आजच्या काळी सुद्धा समाजास भक्तीमार्ग दाखवून त्याची ईशतत्वाप्रत जाण्याची वाट सुकर करण्यास ही परंपरा मदत करते असे म्हणावे लागेल.
अंबाजीची जात्रा ही देखील एक अशीच प्राचीन परंपरा आहे जी देवीच्या भक्तीत एका विशिष्ट धर्मस्थालाकडे चालत जाणे आणि तेथे पोचून आराधना करणे, उत्सव करणे आणि समाज जीवनातील परंपरेचे एक आगळे सौंदर्यपूर्ण दर्शन घडवणे ह्या उदात्त हेतूस मनी ठेऊन साजरी होते. मातृत्वाची आराधना करणारा धर्म, त्या धर्माचे उत्सवरुप निर्माण करणारी संस्कृती आणि ते उत्सवरूप पिढ्यान् पिढ्या जातं करणारी, वारसा म्हणून पुढील पिढीकडे देणारी परंपरा.
"अध्यात्मिक" : अशा ह्या वाटेवर वर्षानुवर्षे जे चालतात, त्यांचे अध्यात्मिक उन्नयन इतरेजनांपेक्षा सहसुलभ आहे हे नक्की. माझ्यामते, अध्यात्माची, अध्य+आत्म अशी फोड असावी. अध्य - अध्ययन आणि आत्म - आत्म्याचे वा स्वतःचे. नामजप करत भक्तीमार्ग अनुसरताना, कधीतरी स्वतःची ओळख होते. कमीत कमी एक झलक आणि मग अहम् ब्रह्मास्मि वा तत्वमसी ही जाणीव होऊ लागते. हाच भक्तीमार्ग चालत जाऊन माउलींना पैसाच्या खांबाशी अवकाश आणि काल ह्यातील परस्परसंबंध आणि अद्वैत ह्याचे आत्मज्ञान झाले तर तुकोबा सदेह वैकंठाला गेले. अगदी आजच्या कलीयुगात सुद्धा कित्येक संत सज्जन आहेत ने ह्या मार्गावर मार्गक्रमणा करणाऱ्या लोकांना मार्गदर्शन करून ईशतत्वाशी एकरूप होण्यास मदत करताहेत. आणि जे ह्या वारीची वाट चालताहेत, त्यांना ही मदत मिळण्याची शक्यता अधिक आहे. मात्र, वारीतील सहभाग मनापासून हवा. वारी व्यतिरिक्त देखील सत्वगुणी आचरण हवे. अध्यात्माच्या त्या आकाशात माऊली व तुकोबांसारखे जे शीतल प्रकाश देणारे ज्ञानसूर्य प्रकाशत आहेत, त्यांच्या ठायीचे प्रकाशतत्व आणि वारीच्या रस्त्यावर सातत्याने भक्तीने चालत खूप पुढे आलेल्या सामान्य जनांच्या ठायी असलेले प्रकाश तत्व एकच आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, दैनंदिन जीवन कर्तव्ये पार पाडत, कर्मकांडात न अडकता, भक्तीलाच जीवनशैली आणि स्वधर्म बनवत ही मार्गक्रमणा शक्य आहे. एकदा हे आकळले की ईश तत्वाच्या वेगळ्या बाह्य दृश्य रुपाची आवश्यकता नाहीशी होते. इथे वारी धार्मिक न रहाता आध्यात्मिक होते. मी म्हणजेच तो आणि तो म्हणजेच मी ही जाणीव झाली की मोक्षप्राप्तीची देखील ईच्छा उरत नाही.
वर्षानुवर्ष ही परंपरा जोपासत, सांस्कृतिक वारसा पुढे नेणाऱ्या वारकरी मंडळींपैकी काही, कळत नकळत, धार्मिक मोक्षप्राप्ती ची वाट सोडून अध्यात्मिक उन्नतीच्या मार्गाकडे वळतात जिथे स्वतः मध्येच त्यांना पंढरीच्या कर कटीवर ठेवलेल्या त्या सावळ्याचे रूप दिसते आणि जीवन हीच एक वारी बनते - देहाकडून आत्म्याकडे चालणारी वारी जिथे आत्म्यात वसलेला तो विठू नित्य कडकडून भेटत असतो. स्वतःलाच मायेच्या मिठीत घेत असतो.
अंबाजी जात्रे मध्ये अंबे माते की जय असा उद्घोष करणाऱ्या असंख्य कंठातून हा उद्गोष बाहेर तेव्हाच पडतो जेव्हा अंत:करणा मध्ये मा अंबेविषयी उदंड प्रेम, विश्वास आणि श्रद्धा असते. अशी श्रद्धा की जी प्रापंचिक जीवनाला जगण्यात तर मदत करतेच पण त्याच बरोबर मनुष्य आणि देवत्व ह्यांच्यातील त्या अदृश्य अशा भावबंधास अंतर्मनात जागृत करते आणि ज्या जगन्मातेच्या कुशीतून ह्या विश्वाची उत्पत्ती झाली त्या देवस्वरुप मातृरुपाशी एकरूप होण्याच्या मार्गावरील प्रवासात मनुष्य मात्रास मार्गदर्शन करते. शेवटी पितृरूप असो की मातृरूप. ईशतत्व एकच आहे. कदाचित म्हणूनच बाह्यत:पुरुष रुपात असलेल्या विठ्ठलाला सुद्धा संत माऊलीच्या रुपात बघतात.
दैनंदिन जीवन जगत असता असे आचरण करण्याची, ह्या पारंपारिक सांस्कृतिक माध्यमातून धार्मिकता आणि अध्यात्म ह्या मार्गावरील प्रवास सुरू करण्याची सद्बुद्धी तुम्हा आम्हास लाभो आणि आपली अंतरीची वारी नामजपाच्या गजरात किंवा आपली मोक्षाकडची जात्रा जगदंबेच्या जयजयकारात चालू राहो हीच त्या पांडुरंगा चरणी आणि जगदंबे चरणी प्रार्थना.
---- मनिष मोहिले