Monday, September 30, 2024

स्वतःला वर देणारा भस्मासूर

 स्वतः ला वर देणारा भस्मासूर


दिनांक २८ सप्टेंबर २०२४ च्या TOI मध्ये एक बातमी होती. ग्लोबल वाॅर्मिंग मुळे अंटार्क्टिका मधले लाखो वर्ष पूर्वी पासून असलेले ग्लेशियर वितळत आहे. ह्याचा अपरिहार्य परिणाम म्हणून ध्रुवीय प्रदेशातील समुद्र पातळीत देखील वाढ होत आहे. काही विशिष्ट पेंग्विन प्रजाती किंवा इतर प्राणी ज्यांच्या अस्तित्वासाठी बर्फ अनिवार्य आहे, अशा प्रजातींसाठी ही मृत्यूघंटा आहे आणि आपल्या कल्पनेपेक्षा खूप लवकर आपल्याला सुद्धा ह्याचे परिणाम भोगावे लागणार आहेत. जागतिक पातळीवर समुद्राच्या पाण्याच्या पातळीत होत असलेली वाढ, पाण्याचे वाढते तापमान ह्यामुळे वर्षानुवर्षांचे वातावरणीय आकृतीबंध बदलणे, ऑस्ट्रेलिया ते दक्षिण अमेरिका इतक्या मोठ्या विस्तारात समुद्री प्रवाळ परिस्थितीकी ला गंभीर इजा होणे ह्या काही भयंकर धोकादायक बाबी गेल्या काही वर्षात नजरेसमोर आल्यात.


अर्थात, विविध प्रकारचे प्रदूषण, नैसर्गिक साधन संपत्तीचा अतोनात वापर ह्या मुळे जागतिक तापमानात होणारी वाढ, पर्यावरणाचे संतुलन बिघडणे ह्या सारख्या वाईट परिणामांची मानवाला कल्पना आलेली आहे आणि त्यामुळेच सेंद्रिय शेती, उद्योगधंद्यात पाण्याचा पुनर्वापर, अक्षय ऊर्जा, इत्यादी तोडग्यांद्वारे मानव जात हा भेडसावणारा प्रश्न सोडवायचा प्रयत्न करत आहे. परंतु, खरोखरच हे उपाय पुरेसे आहेत का ? आणि त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे, हे योजले जाणारे उपाय मुळात खरोखर पर्यावरणासाठी हितावह आहेत का ?


उदाहरणार्थ, अक्षय ऊर्जेचा सगळ्यात मोठा स्त्रोत म्हणजे सौर ऊर्जा; आणि गेल्या काही वर्षात सौर ऊर्जा मोठ्या प्रमाणात वापरण्याचे यशस्वी प्रयत्न होत आहेत. भारतात सुद्धा आता ह्या गोष्टीने जोर पकडलेला आहे. आणि इथेच, २८ सप्टेंबरच्या TOI मधली दुसरी बातमी महत्वाची ठरते. ह्या बातमी प्रमाणे, २०३० साला पर्यंत भारतातील सौर ऊर्जा निर्मिती उद्योगामध्ये जो कचरा (waste टाकाऊ भाग) निर्माण होईल, त्यात ६७% इतकी वाढ होईल. हा कचरा, जमीन (माती) तसेच पाणी हे दोन मुख्य स्त्रोत अथवा दोन मुख्य संसाधने प्रदूषित करू शकतो जर ह्या कचऱ्याचे व्यवस्थापन नीट झाले नाही तर. कारण ह्या कचऱ्यात प्रामुख्याने heavy metals, silicon, फिल्म मध्ये असणारी रासायनिक संयुगे इत्यादी गोष्टी असतात ज्या हे प्रदूषण घडवण्यास कारणीभूत ठरतात. हा कचरा मुख्यत्वे करून निर्माण होतो सौर पॅनल च्या साधारणतः २५ वर्षाच्या उपयुक्त आयुर्मर्यादे नंतर. आता जर हे व्यवस्थापन नीट झाले नाही तर आज हरित किंवा अक्षय ऊर्जा म्हणून किंवा पर्यावरणास अनुकूल असे पर्याय म्हणून आपण ज्या गोष्टीचे कौतुक करतोय त्याच गोष्टी किंवा त्यांचे उत्पादन यातून भविष्यातील पर्यावरण संबंधित समस्या निर्माण होण्याची दाट शक्यता दिसून येते. त्यातल्या त्यात दिलासा देणारी बाब इतकीच आहे की ह्या waste चा पुनर्वापर कसा होऊ शकतो ह्याबद्दल राज्यस्तरीय प्रदूषण नियामक मंडळ आत्तापासून विचार विमर्श करत आहे, उपाय योजना शोधत आहे. 


अशा अनेक गोष्टी आहेत. उदा. आज ज्या EV vehicles (विद्युत चलित वाहने) चा बोलबाला आहे त्यातील विद्युत घट अर्थात battery. एकदा का त्या battery चे उपयुक्त आयुष्य संपले की तिची विल्हेवाट कशी लावायची हा प्रश्न आहेच.


अवकाशातील निरुपयोगी कृत्रिम उपग्रहांच्या अवशेषांचा कचरा, अती दुर्लंघ्य जागा जसे एव्हरेस्ट, उत्तर दक्षिण ध्रुव, महासागरात अती खोल जागी अशा ठिकाणच्या शोध मोहिमेत निर्माण झालेला कचरा ह्या इतर काही चिंतेच्या बाबी.

अर्थात म्हणून ह्या काही गोष्टींचे जे फायदे आहेत ते दुर्लक्ष करावे असे आहेत असे नाही. मात्र, त्यांच्या पासून उत्पन्न होणाऱ्या टाकाऊ गोष्टींची योग्य विल्हेवाट हा एक महत्त्वाचा प्राथमिक निकष मानला गेला पाहिजे अशा प्रकल्पांच्या प्राथमिक मूल्यमापनाच्या (primary evaluation) वेळीच.


नाहीतर, एकीकडे अशा शोधाना वरदान मानत, त्याच वेळेस दुसरीकडे आपण वेगळ्या प्रकारच्या विनाशाची बीजे रोवीत असू कदाचित.


पुराणातील भस्मासूर महादेवाकडून वर मिळून उन्मत्त झाला आणि ज्याचे त्याचे भस्म करीत सुटला. इथे, कलियुगात मानव हाच भस्मासूर आहे जो स्वतःच स्वतःला वैज्ञानिक शोधांचे वर देऊन उन्मत्त होत चालला आहे. ह्या भस्मासुरी प्रवृत्तीचा पराभव करू शकणारी मोहिनी नक्की कोण असेल आणि ती कधी अवतरेल हा आजचा एक महत्त्वाचा प्रश्न आहे.


मनीष मोहिले

Monday, September 2, 2024

भारत आणि छत्रपती शिवाजी महाराजांची बिरुदावली

आज १५ ऑगस्ट २०२४. भारताचा ७८ वा स्वतंत्रता दिन. गेल्या ७८ वर्षात एक स्वतंत्र देश म्हणून आपण काय कमावलं आणि काय गमावलं? काय कमावलं ह्यामध्ये बऱ्याच जणांकडे बरीच आकडेवारी असेल. पण काय गमावलं हा विचार कदाचित कोणाच्या मनातही येत नसेल किंवा फार थोड्या लोकांना असं वाटतं असेल. 

माझ्या मते, जी सगळ्यात महत्वाची गोष्ट आपण गमावली ती म्हणजे अखंड भारताचे अस्तित्व आणि एका सहिष्णु मात्र सशक्त अशी हिंदवी अस्मिता. टिळक, सावरकर, नेताजी, गोडसे ह्यांच्या मनातील अखंड भारत आणि त्यातील जनमानसाची हिंदवी अस्मिता. 

ह्या निमित्ताने विचार करताना अपरिहार्यपणे ह्या सर्वांचे स्फूर्तीस्थान किंवा प्रेरणास्थान असलेल्या, हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराजांची आठवण मनात नव्याने ताजी होणे अपरिहार्य होते. कारण शिवाजी महाराजांच्या काळी प्रामुख्याने एका राजाच्या अधिपत्याखालील प्रदेश अशी सत्ता व्यवस्था असली आणि प्रामुख्याने त्या अधिपत्याचा मूलाधार राजाचा धर्म असा असला (अब्राहमिक धर्माच्या प्रत्येक राजाने स्वतःच्या धर्माचा प्रसार हे एक मुख्य कार्य मानले होते), तरी छत्रपती शिवाजी महाराज हे कमीत कमी नजीकच्या भूतकाळातील पहिले असे द्रष्टे राजे होते ज्यांना प्रदेश, संस्कृती आणि मग धर्म ह्याबाबतीत समान हितसंबंध असलेल्या जनतेच्या राष्ट्रीयत्वाची आणि राष्ट्राची स्पष्ट जाणीव होती आणि ती प्रत्यक्षात उतरवण्यासाठी आवश्यक पात्रता आणि योग्यता होती.

अलेक्झांडर पासून सुरू होऊन पुढे मोगल आणि नंतर इंग्रज अशी जी परकीय आक्रमणं ह्या भारतभूमी वर झाली त्या प्रत्येक आक्रमणात वाढत्या प्रमाणात आपली सामाजिक अस्मिता आणि ओळख ह्यावर आक्रमणं होऊन त्यांचा नायनाट करण्याचे किंवा संपूर्ण स्वरूप बदलून टाकण्याचे आणि आपल्याला, मुळात आपली नसलेली पण आपली आहे असं समाजमनावर बिंबवणारी एक अस्मिता देण्याचे जे षडयंत्र रचले जात होते आणि आहे त्याचा खऱ्या डोळसपणे प्रतिकार महाराजांनी केला असं म्हटलं तर ते वावगं ठरू नये.

खरंतर महाराजांच्या वेळची व्यक्तीप्रधान राजसत्ता आणि आता बहुसंख्य देशात असलेली लोकशाही सत्ताव्यवस्था ह्यात फरक असला तरी कदाचित संपूर्ण समाजात स्वातंत्र्य, समता, नांदावी ह्या व्यापक दृष्टीकोनातून महाराजांनी राबवलेली राजसत्ता, आजच्या बहुसंख्य लोकशाह्यां पेक्षा अधिक प्रजाहितदक्ष होती असं नक्कीच म्हणता येईल.

त्यांच्या मंत्री मंडळात, सल्लागार मंडळात सर्व वर्णांचे लोक होते. तिथे तलवार गाजवणारी ब्राह्मण मंडळी होती तद्वतच दरबारी, सनदी, लेखनिक कामकाजात तज्ज्ञ अशी कायस्थ (क्षत्रिय) मंडळी देखील होती आणि जन्माधारित वर्णव्यवस्थे नुसार नीच वर्णात जन्मलेली मंडळी देखील आपल्या क्षात्रतेजाने स्वतःस सिद्ध करून मोठ्या पदास पोचली होती. तेव्हा महाराजांच्या राज्यव्यवस्थे मध्ये व्यक्तीचे मूल्यांकन हे जन्माधिष्ठीत नसून गुणाधिष्ठीत आणि कर्माधिष्ठीत होते हे नक्की. शिवाय लढ्याचे स्वरूप स्वकीय विरुद्ध परकीय असे होते. प्रसंगवशात परकियांच्या अधिपत्याखाली लढणाऱ्या स्वकीय व्यक्तींविरुद्ध संघर्ष करावा लागला तरी त्याचा मूळ हेतू स्व (कीय) राज्य हा होता. आपल्या वैयक्तिक विरोधकांचे निखंदन हा नव्हे. म्हणून जावळीकर मोरे, खोपडे ह्यांना चूक सुधारण्याची संधी दिली गेली. पण एकदाच. दुसऱ्या चुकीची संधीच त्यांनी दिली नाही.

केवळ राज्य संपादन करून उपयोग नाही तर त्याचे रक्षण आणि संवर्धन करणे तितकेच किंबहुना त्याहूनही महत्त्वाचे आहे हे महाराजांनी ओळखले होते. त्यामुळे, त्यांचा बहुतांश वेळ हा लढण्यात जाऊन सुद्धा त्यांनी जो काही वेळ मिळाला त्यात जमीन महसूल पद्धती, सारा पद्धती ह्यात प्रजेच्या हिताचे बदल घडवून आणले. व्यवस्थापनामध्ये अधिकार आणि जबाबदारी ह्यांच्या योग्य पायऱ्या असाव्यात हे पाहिले. सैन्यात देखील योग्य पदानुक्रम निर्माण केला. पायदळ, घोडदळ ह्या बरोबरच, आरमाराचे महत्व ओळखून बलाढ्य आरमार उभे केले. गिरीदुर्ग जसे सांभाळले, त्याचप्रमाणे जलदुर्गांची निर्मिती केली. स्वतः ला राज्याभिषेक करवून घेण्यात राज्याला अधिकृतता प्राप्त व्हावी (लोकांच्या आणि विशेष करून परकीय सत्ताधीशांच्या नजरेत हा निव्वळ पुंडावा राहू नये), स्वजनांच्या मनी आत्मविश्वास, आत्मतेज, अस्मिता आणि स्वधर्माभिमान जागृत व्हावा हा त्यांचा मूळ उद्देश होता. राज्याभिषेक झाल्यानंतर त्यांनी राज्याभिषेक शक चालू करून ह्या अस्मितेला एक वेगळा आयाम आणि कायम स्वरूप प्राप्त करून देण्याचा प्रयत्न केला. भाषा शुद्धीकरणासाठी भाषाकोश सिद्ध केला. स्वतः ची नाणी चालू करून आर्थिक दृष्ट्या इतर सत्ता संकट आणू शकणार नाहीत हे बघितले. स्वराज्याचा भगवा तर स्वराज्याच्या संस्थापने पासून फडकत होता ज्याला राज्याभिषेकानंतर अधिकृत स्वरूप मिळाले. थोडक्यात आजच्या कोणत्याही स्वतंत्र देशाकडे स्वतःचे सार्वभौमत्व जगाला दाखवण्यासाठी जी जी प्रतीके किंवा क्षेत्रे आहेत ती सर्व महाराजांच्या हिंदवी स्वराज्याकडे होती.

ह्या सर्व पार्श्वभूमीवर महाराजांच्या नावामागे, त्यांच्या ललकारीत उच्चारली जाणारी जी बिरुदावली होती तिचा थोडासा वेगळा विचार करून पाहू.

ती ललकारी होती प्रौढप्रतापपुरंदर, मुघलदल संहारक, गोब्राह्मणप्रतिपालक, सद्धर्मसंस्थापक, क्षत्रियकुलावतंस, सिंहासनाधीश्वर, छत्रपती श्री शिवाजी महाराज.

रूढार्थाने प्रौढप्रतापपुरंदर मधील प्रौढ प्रताप म्हणजे मोठा पराक्रम. मात्र माझ्या मते, हा प्रौढ म्हणजे प्रगल्भ ह्या अर्थी आहे. महाराजांनी जीवन भरात आपल्या इतक्या शत्रूंवर विजय मिळवले पण कुठेही त्यांनी ह्या परक्या राज्यकर्त्यांच्या अधिपत्याखालील प्रजेला मग ती कोणत्याही धर्माची असो, त्रास दिला नाही. ना कधी स्त्रिया, बालके, वृद्ध ह्याना पीडा दिली. अगदी लढणाऱ्या शत्रू सैन्यापैकी देखील जो हत्यार ठेऊन शरण येईल त्यास जीवदान दिले, मग तो कोणत्याही धर्माचा असो आणि ज्याने शस्त्र उगारले त्या सैनिकास कापून काढण्याची आज्ञा दिली मग तोदेखील कोणत्याही धर्माचा असो. मुसलमानांनी हिंदू स्त्रियांवर अत्याचार केले, देवळे फोडली ह्याचा सूड म्हणून मुस्लीम स्त्रियांवर अत्याचार, मशिदी फोडणे असे प्रकार त्यांनी केले नाहीत. तसे करणाऱ्यास उलट कडक शिक्षा होईल हे सर्वांस माहिती होते. ही खरी धर्मनिरपेक्षता आणि हा खरा प्रगल्भ अर्थात प्रौढ प्रताप.

अर्थात धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली बहुसंख्यांक लोकांचे न्याय्य हक्क डावलायचे आणि अल्पसंख्यांक जनतेस फुशारून ठेवायचे हे आजकालच्या विशिष्ट पक्षांचे जे हीन धोरण आहे तशी ही हीन, खोटी धर्मनिरपेक्षता नव्हती.

महाराजांची धर्म निरपेक्षता ही खऱ्या अर्थाने निरपेक्ष होती. धर्म निरपेक्षता म्हणजे स्वतः च्या आणि स्वतःच्या धर्मबांधवांच्या धर्माकडे दुर्लक्ष करायचे वा त्यास सापत्न भाव द्यायचा आणि दुसऱ्या धर्माच्या लोकांचे लांगूलचालन करायचे अशी नपुंसक व्यापारी धर्मनिरपेक्षता त्यांनी कधीच दाखवली नाही. किंवा फक्त मराठ्यांचे हितसंबंध जपायचे आणि बाकी जाती जमातीच्या लोकांना वाऱ्यावर सोडायचे असा प्रकारही त्यांनी केला नाही.

ह्यावर एक असा मुद्दा उपस्थित होऊ शकतो की तेव्हाची व्यक्तिधिष्ठीत राजसत्ता, आणि आताची लोकसत्ताक पद्धती, तेव्हाची जनसंख्या वर्गवारी आणि आताची, ह्यात अशी तुलना होऊ शकत नाही. पण हा मुद्दा उपस्थित करणारे हे विसरतात की कोणत्याही कारणास्तव स्वधर्माचा आणि धार्मिक अस्मितेचा त्याग करणे किंवा त्यावर फक्त टीका करणे, एका धार्मिक ओळखीचा समाज ही ओळख नष्ट होऊ देणे असे होऊ नये यासाठीच त्यांनी स्वराज्य स्थापनेचा महदुद्योग आरंभिला. औरंगजेबाने काशी विश्वेश्वर फोडला तेव्हा तिथे परत त्याची पुनरपि प्राणप्रतिष्ठा करण्याचीच महत्त्वाकांक्षा त्यांनी मनी धरली आणि बोलून व्यक्त केली. तिथे संपूर्ण समाजासाठी उपयोगी एखादी संस्था वा इमारत बांधावी असा वरकरणी धर्मनिरपेक्ष परंतु प्रत्यक्षात धर्मद्रोही असा विचार त्यांनी केला नाही. 

मुघल हेच आपले प्रमुख शत्रू आहेत हे महाराज ओळखून होते आणि हिंदू धर्म आणि हिंदू धर्माची ओळख सांगणारी मंदिरे, विश्व विद्यालये, ग्रंथ, ह्यांचे मुघलांपासून रक्षण करण्यासाठी महाराज कटीबद्ध होते आणि त्यामुळे इतिहासात महाराजांची ओळख ही प्रामुख्याने मुघलदल संहारक अशी आहे. त्यांच्या प्रगल्भ पराक्रमाचा आणि धर्मनिरपेक्ष असण्याचा भाग म्हणून ते मुघल "दल" (सेना) संहारक आहेत. मुघल (मुस्लीम) प्रजा संहारक नाहीत. मात्र आज जेव्हा सामान्य प्रजेतील अनेक मुस्लीम सुद्धा देश विघातक कृत्यांमध्ये सामील असलेले दिसून येतात, अशा परिस्थितीत महाराज असते तर अशा देशबुडव्याना त्यांनी "दलात" समाविष्ट करून त्यांचा उच्छेद केला असता ना की नपुंसक धर्मनिरपेक्षतेचे डांगोरे पिटले असते.


सगळ्यात महत्वाचे म्हणजे ते अभिमानाने स्वतःला हिंदू म्हणवून घेत. असा हिंदू जो सहिष्णु आहे, सर्व धर्मांचा आदर करणारा आहे. मात्र कोणी त्यांच्या अथवा प्रजेच्या हिंदुत्वाच्या कोणत्याही क्षेत्रास धक्का दिल्यास, त्याला एक हिंदू म्हणून जन्माची अद्दल घडवण्याची धमक ज्याच्या मनात आणि मनगटात आहे.

सद्धर्म संस्थापक हे पुढील बिरूद अंशत: ह्यातूनच सिद्ध होते. सर्व धर्मांप्रती समान आदर हे सनातन हिंदू धर्माचे जे उच्चतम तत्व आहे त्याची आदर्श अशी वास्तविक तद्वतच व्यावहारिक अंमलबजावणी महाराजांनीच केली.

गोब्राह्मणप्रतिपालक ह्यातील "गो" स्पष्ट आहे. मात्र, ब्राह्मण हे निव्वळ जन्माने ब्राह्मण असलेल्यांबद्दल नसून, ज्यांना खरोखर ज्ञान आहे अशा व्यक्तींबद्दल आहे. त्याचमुळे सर्व जाती जमातीतील संतांचा (की ज्यांना मोक्षाचे ज्ञान प्राप्त झाले आहे) महाराजांनी कायम आदर आणि प्रतिपाळ केला. त्यात अगदी मुस्लीम संत देखील आले.

क्षत्रिय कुलावतंस ह्यात महाराज क्षत्रिय कुलोत्पन्न होते हे जरी अभिप्रेत असले तरी त्यांच्या पदरी तलवार गाजवणारा प्रत्येक वीर, मग तो जन्माने ब्राह्मण असो किंवा शूद्र, अथवा शहाण्णव कुळी, तो क्षत्रियच गणला जाई.

तर अशा प्रकारे जन्माधिष्ठीत वर्णव्यवस्था न मानता गुणाधिष्ठीत वा कर्माधिष्ठीत मूल्यांकन हे महाराजांच्या सद्धर्म संस्थापक असण्याची ग्वाही देते.

सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे एक राष्ट्रीय अस्मिता महाराजांनी एतद्देशीय जनतेला दिली. स्वतःचा देश, स्वतःचा धर्म ह्याबद्दल जनतेच्या मनात स्वाभिमान उत्पन्न केला. एका व्यक्तीसाठी न लढता, स्वराज्य, स्वधर्म, सद्धर्म, माणूसकी ह्या उच्च मूल्यांसाठी लढायची शिकवण दिली. पुढे जगभरातील शास्त्रीय शोध, सामाजिक बदल इत्यादीबरोबर राष्ट्रीयत्वाची जी बदलती प्रतिमा रूढ झाली तिच्या मूळ रूपाचा पाया महाराजांच्या अस्मिता जागृतीच्या यशस्वी प्रयत्नात होता.

आजच्या वरकरणी धर्मनिरपेक्ष लोकशाही असलेल्या राज्यकर्त्यांनी या शककर्त्या, द्रष्ट्या, पुण्यश्लोक राजाच्या चरित्रातून आणि चारित्र्यातून खूप काही शिकण्यासारखे आहे.


मनीष मोहिले