Thursday, November 24, 2016

पता नही

मेरे हर किस्से में तुम आते हो
पता नही मेरे हिस्से में कब आओगे !

वरील शेर वाचून सुचलेली कविता


मेरे हर ख्वाब में तुम आते हो
पता नही हकीकत में कब आओगे !

मेरी हर एहसास में तुम आते हो
पता नही साँस में कब बस जाओगे  !

मेरी हर दुवा में तुम आते हो
पता नही कुबूल कब हो जाओगे !

मेरे हर किस्से में तुम आते हो
पता नही मेरे हिस्से में कब आओगे !

मनिष मोहिले

रात्र

रात्र ही धुंदावलेली, तारकांनी उजळलेली
जागते शेजेवरी, मीलना आतुरलेली

शेज ही गंधाळलेली, पाकळ्यांनी उमललेली
गंध सुमनांचा लेपिते, मलमली कायेवरी

अधीर आतूर ही तनू, अनंगरंगी रंगली
चांदण्याचे वस्त्र त्यागूनी, मुक्त झाली रात्र ही

भान गेले हरपूनी, जादू मनी तनी जाहली
निजलेली अबोध रजनी, उषा सलज्ज जागली

मनिष मोहिले



Monday, November 7, 2016

व्हेंटीलेटर

मराठी सिनेमा वेगवेगळे विषय प्रगल्भ व प्रभावीपणे हाताळू शकतो आणि वास्तववादी रहातानाच मनोरंजन देखील घडवू शकतो ह्याचं अगदी ताजं उदाहरण म्हणजे नुकताच लागलेला व्हेंटीलेटर.

प्रियांका चोप्राच्या Purple Pebbles Pictures ची पहिली मराठी चित्रपट निर्मिती असलेला हा चित्रपट जरूर जरूर बघावा असा.

मुंबई, कोकण, पुणे, कोल्हापूर अशा विविध जागी पसरलेल्या कामेरकर कुटुंबाची -  सख्खे, चुलत , आते, मामे, मावस नातेवाईक - ह्या सगळ्यांची ही गोष्ट.

चित्रपटाची सुरूवात होते तीच मुळी कुटुंबातील सर्वात ज्येष्ठ गजानन कामेरकराना मेंदूची शीर अचानक तुटल्यामुळे अत्यवस्थ अवस्थेत हॉस्पिटलमध्ये अॅडमिट करून व्हेंटीलेटर वर ठेवावं लागतं हे एकेकाला फोनवर बातमी मिळण्यानी.

नंतरचा संपूर्ण चित्रपट म्हणजे गजूभाऊ ना भेटण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणाहून, वेगवेगळे हेतू मनात बाळगून आलेल्या नातेवाईकांचे परस्पर संवाद वा वादविवाद, प्रत्येकाची आपली खासियत, अंतस्थ हेतू, गणपती सुखरूप पार पडतील की सुतक लागेल ही सामायिक चिंता आणि तरीही आत खोलवर कुठेतरी परस्पर सौख्याचा जिव्हाळा, आपुलकी आणि ह्या पार्श्वभूमीवर वडिल आणि मुलगा यांच्या नात्यातील अबोल आणि म्हणूनच बोलके ताणतणाव.  आदर, प्रेम यांच्याबरोबरचे पण त्यापेक्षा अधिक जाणवणारे ताणतणाव.

गजूकाका आणि त्यांचा मुलगा प्रसन्ना (जितेंद्र जोशी) यांच्या नातेसंबंधातला तणाव, मोठा चुलतभाऊ म्हणून जाणून घेताना आणि एका मोठ्या कुटुंबातला कर्ता म्हणून सद्यस्थिती हाताळताना राजा ( आशुतोष गोवारीकर ) च्या मनात तो स्वत: व त्याचे वडिल ( सुरेश आळेकर) यांच्यातील ताण देखील समांतर विचार म्हणून येत राहतात आणि त्याला या नात्याची एक वेगळीच ओळख होते. चित्रपटाच्या शेवटी शेवटी प्रसन्नाला तो हेच समजवायचा प्रयत्न करतो की तुझ्या वडिलांबरोबरच्या नात्याची ती ओळख तू करून घे.
शेवटी काय होतं ? त्यासाठी चित्रपट पहायला हवा.

राजेश म्हापुसकरचं लेखन व दिग्दर्शन सुरेख. छायांकन ( cinematography ) झकास. पहिल्या सीन मधली गणपती तोंडावर आले असतानाची सकाळी जागी होणारी मुंबई अप्रतिम.

राजानी समजावल्यावर गजूकाकाना बाबा म्हणून भेटायला गेलेल्या प्रसन्नाचा monologue,  गजूकाकांचे भाऊ आणि आता कुटुंबात सर्वात ज्येष्ठ असलेले राजाचे बाबा,  प्रसन्ना जेव्हा व्हेंटीलेटर काढायचा असा निर्णय घेतो तेव्हा त्याची कान उघाडणी करतात तो प्रसंग, या सगळ्या प्रकारात राजाला तो स्वत: आणि त्याचे वडिल यांचं नातं उलगडत आणि आकळत जातं हे दाखवणारे प्रसंग असे काही प्रसंग लक्षात राहून जातात.

चित्रपटाच्या पूर्वार्धात वेगवेगळ्या नातेवाईकांच्या प्रतिक्रिया व संवाद वादविवाद विनोदी पद्धतीने सादर करून स्वाभाविक हास्यनिर्मीती साधली आहे. चित्रपटाच्या एकंदरीत गंभीर विषयाला हा विनोद बाधा आणतो अगर तो चित्रपटाचा तोल बिघडवतो असा आक्षेप काही जण घेऊ शकतील. पण माझ्यामते मनुष्य स्वभावाचं दर्शन घडवताना ते गंभीर प्रसंगातून घडवायचं की विनोदी प्रसंगातून ह्याबद्दलचं ते दिग्दर्शकीय व पटकथेचं स्वातंत्र्य असावं.

आशुतोष गोवारीकर, जितेंद्र जोशी, सुकन्या कुळकर्णी, स्वाती चिटणीस, उषा नाडकर्णी, सुरेश आळेकर आणि बाकी विजू खोटे, दीपक शिर्के, राहुल सोलापूरकर - सगळ्यांचीच कामं मस्त. सहज आणि नैसर्गिक. वैयक्तिकपणे मला अश्विनच्या भूमिकेतला तपन भट्ट सर्वात जास्त आवडला. आशुतोष गोवारीकर व जितेंद्र जोशीदेखील उत्तमच.

पण या सगळ्यात सर्वाधिक महत्वाची गोष्ट म्हणजे casting. विविध भूमिकांसाठी केलेली कलाकारांची इतकी अचूक निवड आणि त्यांच्यातील प्रसंगातून मनुष्यस्वभावाचं दर्शन ही या चित्रपटाची खासियत.

आणि सगळ्यात महत्वाचा संदेश - व्हेंटीलेटर वर असलेल्या व्यक्तीला आयुष्य मिळण्याची अगदी नगण्य १% शक्यता असते पण आशा त्या १% वरच असते. आजमितीला बरीचशी नाती ही अशीच व्हेंटीलेटर वर असतात - विशेषकरून कर्त्याच्या भूमिकेत अदलाबदल झालेले मुलगा आणि वडिल हे नातं. त्या नात्याचा व्हेंटीलेटर काढू नका. तिथे शेवटपर्यंत तो १% चा chance देत रहा आणि घेत रहा. कारण व्हेंटीलेटर वरचा माणूस, व्हेंटीलेटर काढल्यावर वाचण्याची शक्यता नगण्य असली तरी नाती जगण्याची शक्यता निश्चितपणे जास्त असते आणि व्यक्ती जिवंत असो वा मृत, नातं चिरकाळ जिवंत राहू शकतं आणि राहतं - व्हेंटीलेटर शिवाय सुद्धा.

---- मनिष मोहिले.

मैत्री आणि परिचय

प्रत्येक नात्याला रुजण्यासाठी खत पाणी आवश्यक असतं. यामध्ये मैत्री पण आली. किंवा विशेषकरून मैत्री आली.

हे खत पाणी असतं संवादाचं. एकमेकांना अधून मधून आठवण्याचं. प्रत्यक्ष भेटण्यासारखं अंतर असेल तर प्रत्यक्ष भेटण्याचं. ते शक्य नसेल तर एखादा फोन, एखादा मेसेज, एखाद्या मेसेजवर दाद, आपल्या मनातल्या गोष्टी समोरच्या व्यक्तीबरोबर वाटून घेण्याचं (sharing your happiness, enthusiasm, good songs, good books, good poems, good jokes, hard feelings everything).

परिचय काय आणि मैत्री काय; दोन्हीचं बीज एकच - ओळख. पण जिथे हे संवादाचं खतपाणी मिळतं तिथे त्या ओळखीच्या बीजाचा मैत्रीचा वटवृक्ष होतो - मैत्रीच्या आपुलकीची हक्काची सावली देणारा, मनमोकळ्या हसण्याच्या पारंब्या मिळतात - गप्पांच्या सूरपारंब्या खेळायला, आणि मी आहे ह्या विश्वासाचा आश्वस्त करणारा भरदार बुंधा पण मिळतो निवांत टेकून थकवा घालवायला. At such maturerd stage, you can even share your grief, anger, frustration. It comes naturally out of the trust that has been built so far.

पण जर हे खतपाणी नाही मिळालं तर ती ओळख परिचयावरच थांबते. तिचं कुंडीतलं रोप होतं - एखादं फुलझाड जे आपल्या फुलानी काही काळ आनंद देतं पण फुलं असतील तरच त्या कडे लक्ष जातं. किंवा नुसतंच शोभेचं बोन्साय. आणि तिथे ईच्छा असो वा नसो, खतपाणी घालावच लागतं नाहीतर रोप मरून जातं.

पण एकदा का विशाल वृक्ष झाला की ह्या दररोजच्या खतपाण्याची गरज रहात नाही. आणि पाऊस पडायला हवा असेल तर झाडंच लागतात. फुलझाडं किंवा बोन्साय पाऊस पाडू शकत नाहीत. सावली झाडच देतं कुंडीतलं रोप नाही.

पण आपल्यासाठी ज्यांची मैत्री वृक्ष  आहे त्यांच्यासाठी आपला परिचय हे कुंडीतलं झाड असेल तर ? तरी काही हरकत नाही. आपण वृक्ष नाही म्हणजे समोरच्याला मैत्रीची किंमत नाही असा होत नाही. त्यांचे वृक्ष वेगळे असतात एवढाच त्याचा अर्थ.

आणि मग हा ही विचार करावा की ज्यांच्यासाठी आपली मैत्री वृक्ष आहे त्यांना आपण कुंडीतल्या झाडासारखं वागवतोय का ?  मग तिथे आपण आपली वर्तणूक, आपले प्रतिसाद बदलायची गरज आहे का ? हे सगळं दोन अधिक दोन चार इतकं सोपं नसतं कारण बीज लावताना माहीत नसतं ह्याचा पुढे वृक्ष होइल की कुंडीतलं रोप.

पण प्रयत्न वृक्ष व्हावेत असा करावा कारण; आपुलकी, मैत्री, हास्य, विश्वास ह्याचा चिंब करून टाकणारा पाऊस असेल तर जास्तीत जास्त वृक्ष असायला हवेत.

--- मनिष मोहिले