Monday, November 7, 2016

मैत्री आणि परिचय

प्रत्येक नात्याला रुजण्यासाठी खत पाणी आवश्यक असतं. यामध्ये मैत्री पण आली. किंवा विशेषकरून मैत्री आली.

हे खत पाणी असतं संवादाचं. एकमेकांना अधून मधून आठवण्याचं. प्रत्यक्ष भेटण्यासारखं अंतर असेल तर प्रत्यक्ष भेटण्याचं. ते शक्य नसेल तर एखादा फोन, एखादा मेसेज, एखाद्या मेसेजवर दाद, आपल्या मनातल्या गोष्टी समोरच्या व्यक्तीबरोबर वाटून घेण्याचं (sharing your happiness, enthusiasm, good songs, good books, good poems, good jokes, hard feelings everything).

परिचय काय आणि मैत्री काय; दोन्हीचं बीज एकच - ओळख. पण जिथे हे संवादाचं खतपाणी मिळतं तिथे त्या ओळखीच्या बीजाचा मैत्रीचा वटवृक्ष होतो - मैत्रीच्या आपुलकीची हक्काची सावली देणारा, मनमोकळ्या हसण्याच्या पारंब्या मिळतात - गप्पांच्या सूरपारंब्या खेळायला, आणि मी आहे ह्या विश्वासाचा आश्वस्त करणारा भरदार बुंधा पण मिळतो निवांत टेकून थकवा घालवायला. At such maturerd stage, you can even share your grief, anger, frustration. It comes naturally out of the trust that has been built so far.

पण जर हे खतपाणी नाही मिळालं तर ती ओळख परिचयावरच थांबते. तिचं कुंडीतलं रोप होतं - एखादं फुलझाड जे आपल्या फुलानी काही काळ आनंद देतं पण फुलं असतील तरच त्या कडे लक्ष जातं. किंवा नुसतंच शोभेचं बोन्साय. आणि तिथे ईच्छा असो वा नसो, खतपाणी घालावच लागतं नाहीतर रोप मरून जातं.

पण एकदा का विशाल वृक्ष झाला की ह्या दररोजच्या खतपाण्याची गरज रहात नाही. आणि पाऊस पडायला हवा असेल तर झाडंच लागतात. फुलझाडं किंवा बोन्साय पाऊस पाडू शकत नाहीत. सावली झाडच देतं कुंडीतलं रोप नाही.

पण आपल्यासाठी ज्यांची मैत्री वृक्ष  आहे त्यांच्यासाठी आपला परिचय हे कुंडीतलं झाड असेल तर ? तरी काही हरकत नाही. आपण वृक्ष नाही म्हणजे समोरच्याला मैत्रीची किंमत नाही असा होत नाही. त्यांचे वृक्ष वेगळे असतात एवढाच त्याचा अर्थ.

आणि मग हा ही विचार करावा की ज्यांच्यासाठी आपली मैत्री वृक्ष आहे त्यांना आपण कुंडीतल्या झाडासारखं वागवतोय का ?  मग तिथे आपण आपली वर्तणूक, आपले प्रतिसाद बदलायची गरज आहे का ? हे सगळं दोन अधिक दोन चार इतकं सोपं नसतं कारण बीज लावताना माहीत नसतं ह्याचा पुढे वृक्ष होइल की कुंडीतलं रोप.

पण प्रयत्न वृक्ष व्हावेत असा करावा कारण; आपुलकी, मैत्री, हास्य, विश्वास ह्याचा चिंब करून टाकणारा पाऊस असेल तर जास्तीत जास्त वृक्ष असायला हवेत.

--- मनिष मोहिले

No comments:

Post a Comment