Thursday, October 12, 2017

कृष्णायन

नुकताच श्रीमती काजल ओझा लिखित गुजराती पुस्तकाचा मराठी अनुवाद वाचला "कृष्णायन" नावाचा.  महाभारताचा कर्ता करविता असलेल्या कृष्णाची, लेखिका एका वेगळ्याच दृष्टीकोनातून ओळख करून देते आपल्याशी.

पारध्याचा बाण पायाच्या अंगठ्याला लागण्याच्या निमीत्ताने कृष्णानी महाप्रयाण केलं.
ईश्वर असून सुद्धा मानवी देह धारण केल्यामुळे मनुष्याच्या भाव भावनानी ते रुप सुद्धा बांधलं गेलं. तर मृत्यूशय्येवर या मानव अवतारात असलेल्या परमात्म्याचा अंश असलेल्या कृष्णाच्या मनात कोणाकोणाबद्दल काय विचार नी आठवणी आल्या असतील - मुख्यत्वेकरून राधा, रुक्मिणी आणि द्रौपदीबद्दल - असा विषय आहे पुस्तकाचा.

आणि हाच धागा पकडून, कल्पनाविलासाचा आधार घेत पण महाभारताची मुख्य विचारधारा बैठक न सोडता लेखिका कृष्णाच्या आणि त्याच्या
जीवनातील तीन महत्वाच्या स्त्रियांच्या भावनिक संबंधांचा सुरेख शब्दालेख आपल्या समोर आणते.
संपूर्ण स्विकार आणि जीवनातील प्रत्येक क्षणाचा उत्सव साजरा करणं,  ही लेखिकेच्या मते श्रीकृष्णाच्या जीवनगाथेची मर्म असलेली सूत्र या भावसंबंध कथनातून लेखिका आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करते.

तर मला आकळलेल्या या कृष्णायनाला शब्दबद्ध करण्याचा हा प्रयत्न.

कृष्णायन

जीवन जगणे उत्सव असते
क्षणा क्षणाचा उत्सव करते
नदी जशी सागरास मिळते
जन्मातून मोक्षाप्रत जाते

स्वीकारातच जीवन फुलते
विना अटीचे प्रेमही स्फुरते
मात पिता भगिनी अन् भ्राते
प्रिया, सहचरी; सखीचे नाते

जे जे कोमल राधा असते
सखी द्रौपदी मनात वसते
अर्धांगिनी अन् रुक्मिणी असते
कृष्णाशी जी समरस असते

जेव्हा मन अहं ला त्यागते
परमतत्वाशी जुळते नाते
परमानंदे जीवन खुलते
कृष्णाला योगेश्वर बनविते

-- मनिष मोहिले







मैत्री - सखा आणि सखीची

प्रत्येकाला एक सखी नी प्रत्येकीला एक सखा मिळायला हवा
जिथे नि:शंकपणे उघडून दाखवता येइल मनातल्या गुपितांचा ठेवा

पाठीवर कौतुकाची थाप नी खांद्यावर मैत्रीचा हात हवा
अव्यक्त राहून सुद्धा;  मैत्री माझी कायम आहे;  असा विश्वास द्यायला हवा

रुसून बसायचा, हट्ट करायचा मैत्रीनी दिलेला हक्क हवा
एखादा शब्द, नजर वा अबोला सुद्धा न सांगता समजायला हवा

सुंदरशा या नात्यामध्ये, मैत्री, आपुलकी, प्रेम नी  जिव्हाळा हवा
फक्त एकाच व्यक्तीच्या नाही, दोघांच्याही असण्याचा सारखाच सन्मान हवा

आणि कधीतरी तरी

केवळ सख्याच्या वा सखीच्या हक्काचा बाजूला काढलेला वेळ हवा

---- मनिष 

Tuesday, October 3, 2017

मैत्री आणि प्रेम

जन्मासोबत मिळालेल्या नात्यांशिवाय कोणत्याही नात्याची सुरूवात असते एखादी सारखी आवड, सारखी विचारसरणी, सारखा छंद आणि त्यातून निर्माण होणारी वैयक्तिक पातळीवर अधिक संवाद साधण्याची स्वाभाविक ईच्छा.  मैत्रीत ही हा स्वाभाविक क्रम आहे. यात नीटनेटका पेहराव आणि स्वीकार्य पातळीचा physical appearance हा अध्याहृत आहे. ते नैसर्गिक ही आहे.

तर हा संवाद साधला जाऊ लागला की नात्याच्या समाजमान्य परिघाबाहेरची व्यक्ती हळूहळू सामोरी येऊ लागते.  स्वभावविशेष जाणवू लागतात. एखादा कला विशेष, एखाद्या विषयातील पारंगतता वा व्यासंग, विनोदबुद्धी, रंगतदार गप्पा मारायची हातोटी, बहुश्रुतता, चांगल्या गोष्टींचा आस्वाद घेण्याचा रसिकपणा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे समोरच्याचे विचार, बोलणं ऐकायची तयारी.

हे असे सकारात्मक विशेष जाणवले की मैत्री फुलायला लागते. संवाद मोकळा व्हायला लागतो. विषयांची बंधनं शिथील होऊ लागतात. आणि या सगळ्याचा परिपाक म्हणून मैत्रीत एक वेगळाच जिव्हाळा निर्माण होतो. आपुलकी निर्माण होते. प्रेम निर्माण होतं.

दोन पुरूष वा दोन स्त्रिया यांच्यातील मैत्री  आणि एक पुरूष आणि एक स्त्री यांच्यातील मैत्रीचा प्रवास इथपर्यंत सारखाच असतो.

इथून पुढे पुरूष स्त्री मैत्री एका वेगळ्या चष्म्यातून बघितली जाते असा एक अनावश्यक समज आहे की ज्यामुळे समाजच काय पण ते मित्र मैत्रीण स्वत:सुद्धा स्वत:ची मैत्री त्या चष्म्यातून तपासायचा प्रयत्न करतात.

खरंतर काय गरज आहे ? एखादी व्यक्ती आवडत असेल तर निव्वळ ती भिन्न लिंगी आहे म्हणून त्या आवडण्याची चिकित्सा करण्याची काय गरज ? किंबहुना स्त्री साठी मित्र किंवा पुरूषासाठी मैत्रीण हे नातं त्यातील भिन्न लिंगत्वामुळेच अधिक महत्वाचं असतं.

शिव आणि शक्ती, Ying & Yang हा निसर्ग नियम आहे. शारिरीक नातेसंबंधाशिवाय (पती पत्नी - या नात्यात शारिरीक आणि भावनिक दोन्हीची एकरुपतेची गरज वादातीत)  भावनिक नातेसंबंधात देखील हा नियम तितकाच लागू होतो. त्यात प्रस्थापित (पती पत्नी) नात्याशी द्रोह वा त्या नात्यातील भावनिक असंतुष्टता असंही काही असतंच असं ही नाही.

प्रस्थापित नातं आपल्या जागी परिपूर्ण असूनसुद्धा जवळचा मित्र वा मैत्रिण असणं हे सहज शक्य आहे. एक पुरूष आणि एक स्त्री यांच्या भावनिक, मानसिक आणि वैचारिक प्रगल्भतेच्या प्रवासात अशी मैत्री हा एक महत्वाचा टप्पा आहे.

या मैत्रीची चिकित्सा करण्यापेक्षा त्या मैत्रीला खुल्या दिलानं स्विकारणं हे जास्त गरजेचं आहे. डॉ. आनंद नाडकर्णीनी गद्धेपंचविशी मधल्या "मैत्रिणीचं नातं" या लेखात लिहील्या प्रमाणे आपले संस्कार, आपल्याला मिळालेली मूल्य या मैत्रीच्या नात्यातील पूर्णत्वाचा बिंदू आपल्या नकळत निश्चित करत असतात. तो तसा आपला आपला निश्चित होतो आणि मैत्री मधला तो जिव्हाळा आपुलकी आणि प्रेम खऱ्या अर्थानी आकळतं तेव्हा द्रौपदीला कृष्ण आणि कृष्णाला द्रौपदी मिळते.

अर्थात हे असं नातं असणं ही एक स्वाभाविक गरज आहे हे समजून घेणारा जोडीदार (पती / पत्नी) मिळणं हा मात्र थोडा नशीबाचा भाग आहे म्हटल्यास हरकत नाही.

असो. सांगायचा मुद्दा काय की चिकित्सा करू नये असं म्हणून सुद्धा एवढी चिकित्सा केली कारण बरेचदा मैत्री की प्रेम असा जो उहापोह होता त्याऐवजी मैत्रीमधलं प्रेम असा विषय असावा असं वाटलं.

मनिष मोहिले