Thursday, August 31, 2023

द्वारकेचा राणा - पैस - रूपक आकलन

 दुर्गा भागवतांनी लिहिलेलं "पैस" पुन्हा एकदा वाचायला घेतलंय. प्रत्येक लेख नव्याने आकळतो आहे असं वाटतं.

"द्वारकेचा राणा" वाचताना लक्षात आलं की अभ्यासू तसेच संवेदनशील आणि प्रतिभावान व्यक्तीची आकलनशक्ती किती प्रगल्भ असू शकते.

सोन्याची द्वारका समुद्रात बुडाली आणि ही पार्थिव द्वारका भूतली शिल्लक राहिली ज्याला दुर्गाबाई "मर्त्य" द्वारका असे संबोधतात. ऐहिक सुखाच्या परमोच्च शिखरावर असलेल्या संपूर्ण कुळाचा आणि शहराचा निर्वंश करत श्रीकृष्णाने भूलोकीचा अवतार संपवला. तो निर्वंश देखील इतका समूळ की युगांतर होऊन गेल्यावर कलियुगातील मनुजांसाठी जी द्वारका शिल्लक आहे त्यातही जुन्या काळाची खूण म्हणजे फक्त कृष्ण मूर्तीरुपात तिथे असणं. बाकी तेथील निसर्ग देखील जणू त्या निर्वंश होण्याच्या शापाची सावली पडल्यासारखा.

ज्या गोमती नदीमधून कृष्ण पश्चिम सागर किनारी द्वारका वसवायला आला ती गोमती आता पाण्याची नदी न रहाता वाळूची नदी बनली आहे आणि ती मिळते खाऱ्या पाण्याच्या सागराला. समुद्रावरून येणारे वारेसुद्धा सुखविण्यापेक्षा वाळूचे कोरडे लोट उठवत कोरडेपणा वाढवतात. फक्त क्षितीजावर सुंदर रंगसंगतीचा खेळ सुरू असतो.


इतकी सुरेख रूपके वापरतात दुर्गाबाई. नदीचा आकार तसाच राहूनही त्यात वाहते पाणी नसून असलेली वाळू ही जणू मनुष्य जीवनाची निदर्शक - राग, लोभ, मोह, मत्सर, माया, आशा,निराशा रुपी वाळूनी व्यापलेलं मनुष्य जीवन जे जन्मजात सहज "जीवन" न रहाता वालुकामय होतं. धारयते इति धर्म: ह्या सहज व्याख्येत राहून परमात्मा रुपी सागरात विलीन होण्या ऐवजी भाकड धर्मकल्पना, रूढी, परंपरा ह्यांच्या खाऱ्या पाण्यात मिसळून स्वतःला खारे आणि कोरडे बनवत जन्म मृत्यूच्या चक्रात अडकलेला मनुष्य.

मात्र जर तो खारा सागर (भवसागर) पार केला तर मात्र परमात्म्याच्या अथांगतेचे रूपक असलेल्या आकाशाशी क्षितिजा जवळ अप्रतिम रंगसंगती अर्थात अद्वैताचे अमूल्य संचित.

आणि ह्या प्रवासात मित्राप्रमाणे मदतीचा हात धरणारा तो सखा - श्रीकृष्ण. मात्र द्वारकेला मंदिरात जाऊन तेथील मूर्तीला नमस्कार करून तो भेटत नाही. आणि इथे परत दुर्गाबाई कमाल करतात की ज्याचा त्याचा देव त्यानेच शोधायचा आणि घडवायचा असतो. तुलसी दासाने राम घडवला तर तुकारामांनी पांडुरंग. तद्वत मीरेने गिरीधर नागर बनवला.

तेव्हा आपला देव आपण शोधायचा आणि घडवायचा. त्यात पुन्हा कृष्णाने सांगून ठेवलेलं आहे की माझ्या भक्तांच्या वाटेला सुख न येता दु:खच यावं हे मी पहातो. कृष्ण म्हणतो की भक्ताच्या मनात कसलीही आशा शिल्लक राहू नये ह्याचा मी प्रयत्न करतो कारण जेव्हा भक्त पूर्ण निराश होतो तेव्हाच तो ह्या स्थितीला येत की आता भगवंता खेरीज दुसरा आसरा नाही आणि तेव्हाच तो पूर्णपणे शरण येतो. तिथे भक्त आणि भगवंत एक होऊन परमसुखाचा कोंब लवलवू लागतो. आणि बहुतांशी उदाहरणं पहाता हे खरं देखील वाटतं. अर्थात काही अशा संतांची देखील उदाहरणं आहेत की जे सुखाचे ऐहिक जीवन जगून देखील परमात्म्याशी एकरूप झाले. हा नियमाला अपवाद की हे त्या व्यक्तींचे स्वतःचा देव शोधण्यातले आणि घडवण्यातले कौशल्य ?


हे कौशल्य आणि हे भान आपणा सर्वाँना लाभो आणि त्या द्वारकेच्या राणा ने भवासागरापार क्षितिजा वर जी मोक्षाची - ह्या जन्मीच्या सुकृताचा मोक्ष - सुवर्ण द्वारका उभारली आहे ती लाभो.


मनीष मोहिले


No comments:

Post a Comment