२०/०८/२०२२ ते ०७/०९/२०२३
गेल्या वर्षीच्या जन्माष्टमीला, मी हा लेख लिहायला घेतला होता. मात्र साधारण दोन तृतीयांश लेख एकटाकी लिहून झाल्यावर काही कारणाने विचारशृंखला तुटली आणि मग लेख नाही तो नाहीच झाला पूर्ण. त्यातून गेल्या जवळपास वर्षभरात मुळात लिखाण बाजूलाच पडल्यामुळे लेख पूर्ण करून झाला नाही. मात्र आता परत माझी खर्डेघाशी सुरू झाली तेव्हा आज जन्माष्टमीच्या निमित्ताने हा लेख पूर्ण करून आता इथे पोस्ट करत आहे.
श्रीराम, श्रीकृष्ण आणि प्रतीके
काल जन्माष्टमी होती. श्रावण वद्य अष्टमी. जन्माष्टमी च्या निमित्ताने बरीच पोस्ट वाचली व्हॉट्सॲप आणि फेसबुक वर. त्यात एक माझा मित्र विनीत जोशी ह्यानी त्याच्या अनुदिनीवर लिहिलेलं एक पोस्ट होतं ज्यात भगवान विष्णूच्या राम आणि कृष्ण ह्या दोन अवतारांचे तुलनात्मक निरीक्षण मांडले होते. दुसरा एक लेख दुर्गाबाई भागवत ह्यांचा होता ज्यात सुरूवातीलाच दुर्गाबाई म्हणतात की कृष्ण म्हटला की एक मोरपीसच डोळ्यासमोर येतं. त्याचबरोबर मला त्यांचं व्यासपर्व आठवलं ज्यात त्या म्हणतात की कृष्ण म्हटला म्हणजे डोळ्यासमोर आकाशाची निळाई येते.
हे सगळे लेख डोक्यात फिरत असतानाच एक विचार मनात आला की कृष्णाशी निगडीत अशी ही किती वेगवेगळी प्रतीकं; किती वेगवेगळ्या प्रतिमा आहेत; नाही? कृष्ण म्हटला की मोरपीस, बासरी, सुदर्शन चक्र ही प्रतीकं, लोण्याच्या गोळ्यानी तोंड माखलेला बाळकृष्ण, कदंब वृक्षाखाली राधे बरोबर मुरली वाजवणारा मोहन, द्रौपदीला वस्त्रपुरवठा करणारा अच्युत, सुदर्शनधारी वासुदेव आणि अर्जुनाच्या नंदिघोषाच्या अश्र्वांचे वेग हाती धरलेला, अर्जुनास गीता सांगणारा भगवान श्रीकृष्ण. आणि मग वाटलं की इतकी प्रतीकं, इतक्या प्रतिमा केवळ कृष्णाच्याच आहेत. राम, परशुराम ह्यांच्या नाहीत. आपल्या त्या तशा ध्यानातही येत नाहीत. का बरं असं असावं?
तसे तर हे सगळे दशावतारातील अवतार. त्यातील मत्स्य, कूर्म, वराह, नरसिंह हे तर प्राणी सृष्टीशी निगडीत. नरसिंह हा "उंबरठयावर" असलेला अवतार ज्यात प्राणी आणि मनुष्य ह्यांचा संकर आहे. नंतर वामनावतार येतो जो पहिला मनुष्यावतार. मग येतो परशुराम. नंतर राम आणि मग कृष्ण. त्यातही सगळी प्रतीके, प्रतिमा कृष्णाशी निगडीत.
मला तरी वामन म्हटलं की बळीच्या डोक्यावर ठेवण्यासाठी उचललेलं तिसरं पाऊल जे विराट स्वरूपात दिसतं, तेवढी एकच प्रतिमा नजरेसमोर येते. परशुराम म्हटलं की प्रतिमा किंवा प्रतीक येतच नाही नजरेसमोर. फक्त मनात कुठेतरी भासमान होत रहातो उगारलेला परशू आणि परशुरामाने निर्मिलेली प्रतिसृष्टी अर्थात कोकण.
मात्र तरीही, हे सर्व अवतार प्रामुख्याने पुराणातील कथा आणि अद्भुतिका इथपर्यंतच मर्यादित रहातात. जनसामान्यांवर, त्यांच्या दैनंदिन आचरणावर प्रभाव टाकू शकणारे, सण उत्सव ह्यातून सामाजिक जीवनाचा भाग बनलेले अवतार म्हणजे राम आणि कृष्ण.
तरीही, राम जरी म्हटला तरी रामपंचायतनातील कुटुंबवत्सल राजा हीच प्रतिमा चटकन डोळ्यासमोर येते. मात्र प्रतीक एकही नाही. अगदी कोदंडधारी राम म्हणालो तरी तो सहसा पटकन नजरेसमोर येत नाही. पुण्यात्म्यांना होणारे देवदर्शन ह्या रुपात होत असल्याच्या गोष्टी स्मरतात. वास्तविक पहाता मर्यादा पुरुषोत्तम, आदर्श राजा, अजोड धनुर्धर अशा त्याच्या व्यक्तिमत्त्वाच्या विविध ओळखी असून देखील प्रतीके वा प्रतिमा ह्यातील जी विविधता कृष्णाच्या वाट्यास आली ती रामाच्या नाही. तो देवत्वाच्या उच्च पायारीवरच राहिला. किंबहुना जनांकडून त्यास तिथून उतरूनच दिले गेले नाही. त्याचं जीवन देखील त्याच्या धनुष्यातून सुटलेल्या बाणा प्रमाणेच एक दिशा पकडून जगल्या सारखं वाटतं. वास्तविक रामाच्या आयुष्यातील बहुतांश घटना ह्या सरल आहेत अशा अर्थी की त्यात चमत्कार फारसे नाहीत. आहे ते निखळ सुख, दु:ख, शोक, शौर्य. कांचन मृग, लंका दहन, संजीवनी औषधी, सीता भूमिगत होणे हे काही चमत्कृतीपूर्ण प्रसंग प्रत्यक्ष रामाशी सरळ निगडीत नाहीत आणि तरीही त्यामुळे त्याच्या देवत्वाला कुठे बाधा किंवा कमीपणा येत नाही. किंबहुना, चमत्कार न घडवता वडील धाऱ्यांचे आज्ञापालन, तत्व नियमांचे पालन, करड्या रंगाला थारा न देता, सफेद रंगाला शिरोधार्य मानून जगताना काळया रंगाशी सामना करायचा आणि हे सहज असल्यागत करायचे ह्यातच ते देवत्व प्रस्थापित होत असेल.
मात्र कृष्णाच्या आयुष्यात अगदी अर्भकावस्थेत असल्यापासून ते देहत्याग करेपर्यंत चमत्कार भरभरून आहेत आणि तरीही मनुष्य आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर जे जे करेल, ते ते कृष्ण करताना दिसतो आणि त्यामुळेच मानवजातीला तो अगदी जवळचा भासून देखील, त्या चमत्कारांमुळे तो भगवान आहे हे ही पटत रहातं. मात्र, हा असा भगवान वाटतो की ज्याच्या हातात हात घालून सहज जोडीने चार पावलं चालता येईल.
लहानपणीचा लोणी चोरण्याचा निरागस खोडकरपणा, गोपांबरोबर गुरे चारताना केलेली मस्ती, कदंब वृक्षाखाली उभे राहून वाजवलेली मधुर बासरी की ज्यानी राधेचे आणि कित्येक गोपींचे भान हरपले, सांदीपनी ऋषींच्या आश्रमात राहून केलेला विद्याभ्यास ह्या सर्व गोष्टी कृष्णाला मानव असण्याच्या जवळ आणतात. मात्र त्या प्रत्येक टप्प्यावर उघड्या मुखात विश्वदर्शन, कालियामर्दन, गोवर्धन पर्वत उचलणे, कंस मर्दन असे चमत्कार देखील आहेत. कृष्ण त्यामुळेच दैवी चमत्कार करू शकणारा मित्र, सखाच वाटत आला सर्वाँना. अगदी त्याचं आणि राधेचं नातं हा देखील एक चमत्कार आहे आणि तो अशासाठी की स्त्री व पुरुष ह्यांच्यात भाऊ बहीण आणि पती पत्नी ह्यांच्या मध्ये असलेलं, स्वतःच्या मर्यादेत राहून ह्या दोन नात्यांचा आदर करणारे नाते असू शकते हे त्याने सिद्ध केले.
नंतरच्या काळात मथुरा सोडून द्वारका निर्मिती, खांडववनाच्या जागी इंद्रप्रस्थ निर्मितीत पांडवांना सहाय्य, सुदर्शन चक्र वापरून शिशुपाल वध, द्रौपदी वस्त्रहरण प्रसंगी नाट्यमय वस्त्रपुरवठा, भारतीय युद्धाचा अध्वर्यू असणे हे चमत्कार घडवताना, बव्हंशी एक प्रजाहितदक्ष शासक, पती, पिता म्हणून त्याच्या भूमिकाही तो यथायोग्य निभावत गेला. हे सगळं एकाच वेळी मानव जन्म आणि दैवी चमत्कार ह्यांची सांगड घालत साध्य करताना जणू त्याने गीतेमध्ये सांगितलेल्या तत्वज्ञानाला अनुसरून जीवन कसे जगावे ह्याचा वस्तुपाठच जगाला दाखवून दिला.
आणि तो वस्तुपाठ येणाऱ्या पिढ्यांसाठी स्मरणात ताजा रहावा म्हणून जणू काही प्रतीकं त्याने जगाला दिली.
मोरपीस - बालपणी कोमलता, मार्दव, सौंदर्य ह्याचं प्रतीक असलेलं हे मोरपीस जे अर्भकाप्रमाणेच स्वतःच्या कोमल, मृदू, रंगीत अस्तित्वाने सर्वाँना आनंद देते. पौगंडावस्थेत एका अनामिक प्रीती भावनेचे प्रतीक जे मनाला रंगांची भुरळ घालत कोमल भावना फुलवत रहाते. युगंधर मध्ये श्री. शिवाजी सामंतानी म्हटल्याप्रमाणे, मोरपीस हे त्याच्या विशिष्ट आकारामुळे साक्षात स्त्रीत्वाचे प्रतीक आहे जे राधेने त्याला दिले. आयुष्यातील अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावर माता, भगिनी ह्याशिवाय आणि पत्नीपेक्षा वेगळी अशी स्त्रीच्या सखी रुपाची ओळख राधेने त्याला दिली आणि स्त्रीत्व कायम सन्मानित करायला हवे ही जाणीव दिली आणि म्हणून राधेचे नाव कृष्णाशी एका आगळ्या जवळिकेने जोडले गेले. पुढील संपूर्ण जीवनात ते हा संदेश देत रहाते की जीवन सर्वांगाने, समरसून जगा की ज्यामुळे ते मोरपिसाप्रमाणे सुंदर रंगीबेरंगी होईल. काहींना त्यात राम कथेचा धागा सापडतो जो रामावरील मोराच्या उपकाराच्या परतफेडीचे प्रतीक बनून कृष्णाच्या मस्तकावर विराजमान होतो.
बासरी - राधे एव्हढीच किंवा कदाचित तिच्यापेक्षाही अधिक प्रिय अशी बासरी जी कायम गोपाळाच्या ओठा जवळ असायची. ह्याच बासरीतून निघणाऱ्या मधुर सूरानी ह्या बासरीतून कृष्णाने प्रेमाचे सप्तसूर तो गेला तिथे स्वतः बरोबर नेले. ह्या बासरी ने त्या जादूमयी सप्तसुरांची पखरण फक्त मानवी मनावरच नव्हे तर मुक्या प्राण्यांवर देखील केली. मानव आणि इतर जीव आणि निसर्ग यांच्यामधील समतोलाचे हे एक आगळे प्रतीक.
धर्म, राजधर्म, शस्त्र, शास्त्र, चार आश्रम, नीती, वेद आणि एकंदरीतच जीवन ह्यांचं जे प्रचंड ज्ञानभांडार कृष्णाजवळ होतं ते फक्त ज्ञानच असतं तर कोरडे रुक्ष वाटू शकले असते. परंतु, त्याच्या ओठी असलेल्या बासरीतील संगीताने ह्या ज्ञानाला कलेची जोड दिली आणि एक आगळेच मार्दव दिले. निव्वळ ज्ञान हे विध्वंसक बनू शकते मात्र त्याला कलेची जोड असली की ते कायम विधायक बनते. संगीत ही तर एक अशी कला की ती जगाला मोहित करतानाच कलाकारासहीत जगाला देखील अंतर्मुख होत, स्वतःच्या आत डोकावून पाहायला लावते. त्या सतत चालू असलेल्या स्पंदनांचे त्या सात सूरांशी असलेले अदृश्य नाते उलगडत राहते. ही बासरी सुद्धा बालपणी मित्रांबरोबर खेळताना, गुरे राखताना कृष्णासहीत होती, तशीच पुढे राधेला साद घालताना देखील तिनेच कृष्णाची मदत केली. ही रूपके त्यातील हळूवारतेने कालातीत बनून राहिली.
मृत्यूंजय मध्ये, श्री सावंत, द्रौपदी वस्त्रहरण प्रसंगाचे वर्णन करताना म्हणतात की, संपूर्ण सभागृहात फक्त बासरीचे भयाण वाटणारे सूर ऐकू येत रहातात. एरवी जीवनासक्त असलेले संगीत प्रसंगी भयाण वाटू शकते, हे पटण्यासारखे अशासाठी आहे की शेवटी ते नादब्रह्म आहे आणि म्हणूनच कायम विधायक आणि कलात्मक असलेल्या ह्या ब्रह्माचा, निर्वाणीचा असा एक वेगळा अवतार आहे. एका वेगळ्या अर्थाने, कृष्णाच्या बाबतीत हा एक आगळा चमत्कार आहे. मात्र, संपूर्ण जगाला त्याची बासरी प्रतीकात्मक जाणीव देत राहते ती फक्त प्रेम आणि कला ह्यांचीच.
सुदर्शन चक्र - जगातील वाईट वृत्तींचा संहार करून चांगल्या वृत्तीची जपणूक करणारे हे सुदर्शन चक्र जे कृष्णाच्या उत्तरायुष्यातील व्यक्तिमत्त्वाचा एक महत्त्वपूर्ण भाग आहे. असे शस्त्र की ज्याची स्वार्थासठी कामना केली म्हणून अश्वत्थामा सुदर्शन चक्र उचलू शकला नाही. मात्र तेच सुदर्शन लीलया पेलत, त्या अच्युताने मात्र धरणी वरचा पापाचा भार अनेकदा कमी केला. आज सुद्धा सुदर्शन म्हणजे तेज, गती आणि प्रगती ह्याचं प्रतीक वाटते. नर रुपातील नारायणाचे तेज, त्याच्या युगातीत आणि कृतिशील विचारांची गती आणि त्यानीच साधली जाणारी प्रगती - अर्थहीन कालबाह्य विचार, परंपरा, मूल्ये ह्यांचे खंडन करत होणारी मात्र शाश्र्वत चांगुलपणा, माणूसकी ह्याना जपणारी प्रगती. मात्र मोरपीस, बासरी ही प्रतीके जशी कृष्णाच्या प्रतिमेशी कायम स्वरुपी जोडलेली आहेत तसे सुदर्शन चक्राचे नाही. ते फक्त श्रीकृष्णाच्या योद्धा रूपातच नजरेसमोर येते. किंवा कुरुक्षेत्रावर दिलेल्या विराट दर्शनात. जेव्हा जेव्हा श्रीकृष्णाच्या दैवी रूपाचे, चमत्कृतीपूर्ण दैवी सामर्थ्याचे दर्शन होते तेव्हा सुदर्शन दृश्यमान होते. नाहीतर, त्याच्या अधिक मानवीय रूपात मोरपीस, बासरी हेच दिसून येतात.
सारथी कृष्ण - वैयक्तिक रित्या पहाता, माझ्या मते भारतीय युद्धात अर्जुनाच्या नंदिघोषाचे सारथ्य करणारा सारथी, ही जी कृष्णाची प्रतिमा आहे ते अखिल मानवजाती साठी आजही एक अत्यंत मोलाचे प्रतीक आहे. श्रीकृष्णाची ती प्रतिमा, ते युद्ध हे रूपके आहेत. प्रत्येक मानवाचं जीवन हे एक महायुद्ध असतं ज्यात अष्टौप्रहर तो सुष्ट, दुष्ट, चांगले, वाईट, नैतिक, अनैतिक, योग्य, अयोग्य, व्यवहार्य, अव्यवहार्य ह्यांच्या द्वंद्वात सापडलेला असतो. त्या चक्रव्यूहातून त्याला बाहेर पडायचं असतं. अशावेळी कृष्णाने सांगितलेले आणि जगून दाखवलेले तत्वज्ञान जर जीवनाचं सारथ्य करत असेल तर हे युद्ध लढणं आणि त्यात पराभूत न होणं अथवा जिंकणं शक्य आहे. मनुष्यमात्राच्या जीवनातील प्रत्येक प्रश्नाचे उत्तर गीतेत आहे, शोधल्यास तिथे ते सापडू शकतं असं गीतेचा अभ्यास केलेल्या जवळपास प्रत्येक महान व्यक्तीचे मत आहे. अर्थात गीता ही काही सुलभ मार्गदर्शक ह्यासारख्या नावाचे गाईड नाही की प्रश्न आणि खाली उत्तर असं परीक्षेत गुण मिळवायची किल्ली मिळेल हातात. मी स्वतः गीता वाचलेली नाही. म्हणजे गीतेचे अध्याय शब्दार्थासहीत वाचले आहेत. पण हे गीता वाचन नव्हे. मुळात जीवनातील प्रश्न समजण्यासाठी नक्की कुठले प्रश्न विचारायला हवेत ही समाज सुद्धा कदाचित गीता वाचून येत असावी आणि ती सुद्धा तीजवरील संदर्भग्रंथ, टीका टिप्पणी ह्यासहीत वाचल्यावर. मात्र जो ग्रंथ हातात घेऊन अनेक क्रांतिकारक फासावर चढले, त्या ग्रंथात नक्कीच असं काही आहे जे वाचून व समजून मनुष्याला जीवनाचा अर्थ गवसत असेल की ज्यामुळे न भिता मृत्यूचा सामना या मंडळींनी केला असेल.
तर असा हा श्रीकृष्ण की जो भगवान असून मानव म्हणून अधिक जवळचा वाटतो, त्याच्या आयुष्याच्या सुरूवातीच्या टप्प्यांवर त्याने केलेल्या कृतींची सांगड सामान्य मनुष्य स्वतःच्या जीवनातील त्या त्या टप्प्यावरील कृतींशी घालू शकतो. श्रीकृष्णाने त्याच्या नंतरच्या आयुष्यात ज्या दैवी कृती केल्या त्या मानवी क्षमतेच्या पलीकडील असल्या तरी ज्या पद्धतीने सुष्ट, योग्य, धार्मिक आणि नैतिक बाजूला न्याय मिळावा यासाठी तो जसे वागला, मुख्य ध्येय लक्षात घेऊन क्वचित प्रसंगी तो वरकरणी तरी शुद्ध रुपातील मूल्यांच्या विपरीत वागला असं वाटू शकेल त्यामागची मुख्य ध्येयाच्या विशुद्ध रुपामुळे पटू शकणारी मानसिकता ह्या गोष्टींची समज पडण्यासारखी आहे. आणि बासरीचे संगीत आणि मोरपिसाची रंगसंगती आणि मृदूता हे तर कोणालाही समजणे, आकलन होणे शक्य आहे.
- मनिष मोहिले
No comments:
Post a Comment