Wednesday, July 24, 2024

ऋतूचक्र

नुकतंच दुर्गाबाई भागवतांचे ऋतूचक्र वाचून संपवलं. म्हटलं तर खूप उशीरच झाला वाचायला. पण काही वेळेला काही पुस्तकं उगीचच वाचायची राहून जातात. त्यातलंच हे एक.

खरं तर ऋतूचक्र नाव कित्येक वर्षांपूर्वीच कानावर पडलं होतं. नुसतं कानावर पडलं होतं असं नाही तर नजरेखालून देखील गेलं होतं. आम्हाला मराठीला (बहुतेक दहावीला) एक श्रावण म्हणून दुर्गाबाईंचा धडा होता ज्यात ऋतूचक्र मधील "श्रावण साखळी" मधील काही भाग होता. त्यात श्रावणातील सूर्याचं वर्णन करताना त्या म्हणतात श्रावणातील सूर्यबिंब सुद्धा किती सुरेख मवाळ रुपेरी असतं. नुसत्या डोळ्यांनी सूर्य ह्याच वेळी बघू शकतो. आणि खरोखर तो तसा पहाता येतो. मी स्वतः कित्येकदा बघितला आहे. ते रुपेरी सूर्यबिंब तेव्हापासून मनात घर करून बसलं होतं. 

अखेरीस ऋतूचक्र वाचलं आणि संपूर्ण श्रावण दुर्गाबाईंच्या नजरेतून बघितला. श्रावणच का? बाराही महिने त्यांच्या नजरेतून बघितले. बघितले, वाचले आणि अवाक झालो. अवाक झालो दुर्गाबाईंची अफाट निरीक्षण शक्ती पाहून.

बाराही महिने आणि त्यातील दोन दोन महिन्यांच्या जोडीचे सहा ऋतू - ऋतूचक्र आणि त्यात निसर्गात घडणारे बदल. आकाशाचे रंग, त्यातील तारे आणि त्यांच्या जागा, वेळा, सूर्यबिंब आणि चंद्रबिंब आणि त्यांची अनेकविध रूपे, अमावस्येच्या आणि पौर्णिमेच्या रात्रीचे विरोधाभासी सौंदर्य, ऋतूंप्रमाणे बदलणारी दिवसांची लांबी आणि रूपे, सावल्यांचे खेळ, ढगांनी केलेली गंमत, ढगांचे रंग आणि आकार आणि सगळ्यांची मिळून रंगपंचमी, त्यात जमीन आणि झाडं ह्यांची मिळणारी साथ, झाडांच्या हिरवाईचा कॅलिडोस्कोप, कोवळी पालवी, भरगच्च पर्णराजी, निष्पर्ण फांद्या, वेगवेगळी फुले, त्यांचे रंग, सुगंध, नाजूक नक्षी आणि नखरे, फळांचे मोसम, त्या फुलांवर आणि फळांवर येणारे किडे, पक्षी, त्यांचे प्रणयाचे, विणीचे हंगाम, काही किड्यांच्या बाबतीत घडणारे मृत्यू आणि ह्या सगळ्यातून उभे होणारे निर्मिती, विकास आणि विनाश ह्यांचे अनादी अनंत निसर्ग नाट्य, त्या नाट्यात वारे, समुद्र आणि आकाश ह्यांचे पार्श्वसंगीत आणि पार्श्वभूमी. इतकं अप्रतिम वर्णन आणि इतक्या ओघावत्या शैलीत. जणू संपूर्ण ऋतूचक्र त्या आपल्या डोळ्यांसमोर उभे करतात. एका विराट नाट्याचा दरवेळी वेगळे प्रवेश असलेला पण मूळ संहिता कायम असलेला नित्यनूतन प्रयोग.

पण आज मी हे लिहीतो आहे, हे ह्या पुस्तकाचं रसग्रहण किंवा आढावा ह्याबद्दल नाही तर ह्यातील दोन तीन शब्द योजना आणि काही कल्पना, लोककथांचे उल्लेख ह्याबद्दल आहे. तसं तर शब्दयोजना म्हटलं तर प्रत्येक महिन्याची ओळख करून देणारे प्रकरण शीर्षक जसे वसंतह्रदय चैत्र, चैत्रसखा वैशाख, मेघश्याम आषाढ, श्रावण साखळी, पुष्पमंडीत भाद्रपद, सोनेरी अश्विन, संध्यारांजित कार्तिक, प्रशांत आणि प्रक्षुब्ध मार्गशीर्ष, तालबद्ध पौष, मायावी माघ, रुपधर फाल्गुन - किती सुरेख नावं आहेत. पण मी बोलतोय ते शब्द वेगळे.

पहिला शब्द जो मला खोलवर जाणवला तो म्हणजे गर्भछाया. निर्मितीच्या सर्वसमावेशक असण्याचे इतके यथार्थ वर्णन एकाच शब्दात इतक्या चपखलपणे दुसऱ्या कुठल्याच शब्दाने होत नसेल. जन्माला येणाऱ्या जीवाची, जन्म देणाऱ्या जीवावर कशी छाया असते, शारिरीक असेल, भावनिक असेल आणि अस्तित्वाशी संलग्न देखील असेल. त्यात फक्त नवनिर्मितीचा आनंदच नाही तर प्रसवाच्या आगामी वेदनांची जाणिव देखील आहे. एखाद्या किड्याच्या जीवनचक्रातील निर्मितीनंतरच्या लगोलग येणाऱ्या मृत्यूचे दर्शन आहे. आणि तरीही, व्यापून उरणारी जाणीव अथवा भावना ही नवनिर्माणाचीच आहे. ह्या एका शब्दात सौंदर्य आणि गांभीर्य दोन्ही समतोल पणे आहेत.

दुसरा एक मला अतिशय भावलेला शब्द म्हणजे camouflage ह्या इंग्रजी शब्दासाठी दुर्गाबाईंनी योजलेला मराठी प्रतिशब्द. तसा तर छद्मवेष हा शब्दकोशात दिलेला अर्थ किंवा प्रतिशब्द आपल्याला माहिती आहे. पण तो वाचायला जसा ओबडधोबड, छद्मी, कबरी रंगाचा वाटतो तसाच ऐकायला देखील थोडा खरखरीत वाटतो. पण दुर्गाबाई मात्र रंगगोपन हा अतिशय सुरेख, सुडौल, नेटका, आणि अचूक शब्द वापरतात जो ऐकायला सुद्धा नादमधुर वाटतो. Camouflage मध्ये नेमके डोळ्यांसमोर असून देखील लपलेले असण्याचे जे कलात्मक कौशल्य अभिप्रेतआहे ते रंगगोपन ह्या शब्दात तंतोतंत उतरलेले आहे. मला तरी हा अतिशय चपखल असा प्रतिशब्द वाटतो. पुढच्याच दोन तीन ओळीत दुर्गाबाई स्वतःच रंग सादृश्य असा शब्द देखील वापरतात. पण रंगगोपन ची मजा रंग सादृश्य मध्ये नाही.

वर मी म्हटलं की ऐकायला सुद्धा रंगगोपन नादमधुर वाटतो. आता नादमधुर साठी सुद्धा दुर्गाबाई श्रुतिमनोहारी असा एक वेगळाच शब्द वापरतात. नेहमीच्या वापरातील; श्रवणीय, नादमधुर ह्यापेक्षा वेगळाच असा हा शब्द की जो निव्वळ त्याच्या वेगळेपणामुळे, त्यातील नाविन्यामुळे मला आवडून गेला. त्यातल्या "मनोहारी" मुळे कुठेतरी ते श्रवण सुंदर असल्याचा एक अदृश्य चित्र संस्कार आपल्या कानातून मनावर होतो. आणि पुस्तकात ज्या ज्या ठिकाणी हे शब्द येतात, त्या जागा पहाता असं वाटतं की लिखाणाच्या आणि विचारांच्या ओघात सहजपणे हे शब्द दुर्गाबाईंच्या मनातून लेखणीत आणि लेखणीतून कागदावर उतरले असतील. ते शब्द इतके सहजपणे आपल्यासमोर येणं ह्या सहजतेत त्यांच सौंदर्य अधिक खुलून येतं.

ह्या शब्दांबरोबर, अतिशय बारकाईने केलेल्या निसर्ग वर्णनाबरोबरच अजून एक गोष्ट मला भावली आणि ती म्हणजे दुर्गाबाईंच्या लिखाणात सहज डोकावून आपल्याला मोहून टाकणाऱ्या, विचार करायला लावणाऱ्या कल्पना, लोककथा इत्यादी.

पहिली कल्पना श्रीमद्भगवद्गीते मधली की जिथे भौतिक संसार हा असा अश्वत्थ वृक्ष मानला गेलास आहे की ज्याची मुळे स्वर्गात आहेत आणि भूलोकात फांद्या आणि पानांचा डेरेदार घेर आहे आणि जिथे पाने ही वेद आहेत. अश्वत्थ वृक्ष हा एकंदरीत पुराण काळापासून पवित्र मानला गेलेला, शास्त्रीय दृष्ट्या अधिक प्रमाणात प्राणवायू उत्सर्जित करत असल्यामुळे महत्वाचा असलेला असा वृक्ष. जी ए नी देखील "माणसे अरभाट आणि चिल्लर" मध्ये अश्र्वत्थाचा अतिशय मनोज्ञ उल्लेख केला आहे. मात्र, श्रीकृष्णाला दिसलेल्या ह्या उर्ध्व मूल अध: शाखं रुपाबद्दल मी विचारमग्न झालो. महिन्यांमध्ये मी मार्गशीर्ष आहे आणि वृक्षात मी अश्वत्थ आहे म्हणणाऱ्या श्रीकृष्णाची नक्की काय विचारधारा असेल ह्या मागे ? वरती मुळे, आणि खाली फांद्यांचा पसारा. त्या फांद्यांवर असलेली पाने म्हणजे वेद असे हे भौतिक संसाराचे रूप जो जाणतो तो वेद जाणतो. संपूर्ण जगाची उत्पत्ती आकाशस्थ परमेश्वरा पासून होते आणि त्या जगाची चैतन्याची विविध रूपे भूलोकी पाहायला मिळतात. वेदांमध्ये साऱ्या प्रश्नांची उत्तरे आहेत असे म्हणतात. वेदांच्या जन्मकालापासून ते आजपर्यंत वरवर पहाता भौतिक जगात अनेक स्थित्यंतरे आली. प्रश्नांचे स्वरूप बदलले पण वेदातील उत्तरे कालातीत राहिली जी आज देखील लागू पडतात. असे असेल तर पानांचे उत्पत्ती, विकास, विनाश आणि पुन्हा उत्पत्ती हे चक्र देखील कालातीत आहे आणि म्हणून ती वेदांप्रमाणे आहेत असे तर म्हणायचे नाही ना? आणि हे चक्र आणि त्याचे निरंतरत्व ज्यास उमगले तो "जाणता" झाला असा तर अर्थ अभिप्रेत नाही ?? आणि पिंपळ पानावरची नक्षी ? जीवनरस निघून जाऊन शुष्क झालेल्या पानाचे रुप देखील त्या नक्षीने सुंदर दिसावे ह्यात कुठेतरी तथाकथित अंतानंतरच्या सौंदर्याचा संकेत कुठे लपला आहे का ? 

नेमका अर्थ काय आणि अचूक उत्तर म्हणून तो मिळावा ह्यासाठी नेमका व अचूक प्रश्न कोणता विचारायचा हे ज्ञान कधी आणि कसे होणार ?

दुसरी जी लोककथा आहे ती इतकी मूलगामी आणि तत्त्वज्ञानी नसून खूप आर्त आणि प्रणय रम्य आहे. एका आदिवासी लोककथे प्रमाणे पृथ्वी आणि आकाश ह्यांचे एकमेकांवर प्रेम असते पण दैववशात् पृथ्वी आणि सूर्याचे लग्न होते आणि आकाशाचे दु:ख पावसाच्या रूपाने बाहेर पडते. निसर्ग चक्रातील एखाद्या इतक्या विशाल घटनेला अशा साध्या पण प्रणय करुण रुपात पहायचं हे किती विलक्षण आहे ! आता ही लोककथा मनात घर करून बसली कायमची. दरवेळी आता पाऊस पडताना क्षमेचा विरही सखा आकाश मन भरून राहील. 

अशीच एक आदिवासींची मान्यता की ज्यात ते काटे सावरीच्या निष्पर्ण झाडाला कौमार्याचे प्रतीक मानतात. दुर्गाबाई म्हणतात की अजिबात शृंगार नसलेले आणि पूर्णतया नग्न (निष्पर्णतेमुळे) अशा मीलानोत्सुक कुमारी सौंदर्याचे इतके सुंदर प्रतीक निसर्गाशी एकरूप झालेल्या समाजातच असू शकते.

एरवी व्यासपर्व किंवा पैस सारखी प्रचंड वैचारिक, तत्त्वज्ञान आणि विश्लेषण भरून असलेली पुस्तकं लिहिणाऱ्या दुर्गाबाई ऋतूचक्र च्या रूपाने एक आगळेच विश्व आणि लेखनशैली आपल्यासमोर खुली करतात आणि त्यांच्या दर्शनाने देखील आपण तितकेच भारावून जातो.

ऋतूचक्र वाचलं आणि लहानपण मनात पुन्हा जागं झालं. लहानपणी पाहिलेले ते ते ऋतू त्यांच्या त्यांच्या सौंदर्या सह डोळ्यांसमोर पुन्हा साकार झाले. आज इतक्या वर्षांनंतर नैसर्गिक जंगल झाडीची जागा काँक्रिटच्या जंगलांनी घेतली असताना सुद्धा पुन्हा नव्या उमेदीने त्यातून दिसणारा निसर्ग पहायची उभारी मनाला मिळाली. निसर्गाचं आणि पशुपक्ष्यांचे निरीक्षण करण्याचे असेही वेड मला आहे. पण त्यात आता झाडांच्या बदलांची आणि बारकाव्यांची भर पडली. 

लोहगडाच्या माळावर खुल्या आभाळाखाली झोपून ताऱ्यानी खच्चून भरलेल्या अमावस्येच्या रात्रीचं मन:पूत घेतलेले दर्शन कायम साठी मनावर कोरले गेलेले आहे. ऑगस्ट महिन्यातील कूर्ग सहलीत पाहिलेल्या हिरवाईच्या विविध छटा मनाच्या कॅनव्हास वर ताज्या आहेत. पक्षांची ओळख (आयडी) करून घ्यायचा कायमस्वरूपी सुरेख छंद सुदैवाने लागलेला आहे. त्यात गुलमोहर, पांगारा, बहावा ह्यांचा उत्कट आणि भरून वाहणारा बहर मनाला मोहवत आणि शांतवत आला आहे. पण झाडं आणि पालवी, झाडावरून गळणारी पानं आणि निष्पर्ण फांद्यांचे धांदोरे ह्यांचं सौंदर्य आणि त्यातील जीवननाट्य अधिक सजगतेने बघण्याची दृष्टी आता लाभेल असा माझा मलाच विश्वास वाटतो आहे.

बालपणीच्या आठवणी ताज्या होणं, एक नवीन दृष्टी मिळणं आणि जोडीला अद्भुत कल्पना आणि लोककथा स्मृती संग्रहात येणं - एका छोट्याशा पुस्तकाने दिलेल्या किती ह्या भेटी !! पण मग ती तर दुर्गाबाईंच्या लिखाणाची खासियत आहेच.

निखळ आनंद ही गोष्ट दिवसेंदिवस दुर्मिळ होत चालली आहे असं आपण म्हणत असतो. पण ऋतूचक्र सारखं एखादं पुस्तक वाचनात येतं आणि आयुष्यातील सगळ्या ऋतूना भरभरून जगण्याची दृष्टी मिळते आणि मिळतो निखळ आनंद.


मनीष मोहिले 

No comments:

Post a Comment