Tuesday, March 26, 2024

शोले

शोले 

शोले -- हिंदी चित्रपटसृष्टीत अनेक बाबींसाठी मैलाचा दगड ठरलेला हा चित्रपट. जी. पी. सिप्पी आणि रमेश सिप्पी ह्यांच्या मुकुटातला सर्वात मोठ्या मानाचा तुरा. चित्रपट निर्मितीमधील अनेक प्रथमवेलांचा चित्रपट. सेव्हंटी एम एम मध्ये  शूट केला  गेलेला व स्टीरीओफोनिक साऊंड असलेला हा पहिला  चित्रपट. शंभरपेक्षा जास्त चित्रपटगृहात सिल्व्हर ज्युबिली साजरा करणारा आणि मिनर्व्हा मध्ये सलग पाच वर्ष चालत रहाणारा हा पहिला चित्रपट. चित्रपटातील गाण्यांच्या जोडीने किंवा खरं तर त्याहीपेक्षा जास्त लोकप्रिय झालेले संवाद असलेला हा पहिला चित्रपट. नायक वा नायिकेपेक्षा खलनायकाची व्यक्तिरेखा अधिक लोकप्रिय करणारा हा पहिला चित्रपट. 

असा हा शोले, मी पाचेक वर्षांचा असताना मिनर्वालाच पहिल्यांदी पाहिला होता. त्या वेळचा एकच सीन मनावर अजून कोरला गेला आहे - त्या भव्य पडद्यावर, सुरूवातीलाच इंजिनच्या धूडामागोमाग आत शिरणाऱ्या गाडीचा. त्यानंतर थिएटरमध्ये सव्हीस वेळा शोले बघितला. सव्वीसाव्ह्यांदा बघितला मराठा मंदीरला.  पिक्चर सुरू झाला आणि पाच मिनीटात सगळ्याना कळलं की आत असलेल्या जवळपास प्रत्येकाला सगळे संवाद जसे च्या तसे तोंडपाठ आहेत. आजही टी व्ही वर कोणत्याही चॅनलवर शोले लागला असेल तर जिथून बघायला सुरूवात करतो ते शेवटपर्यंत बघितला जातो . अजून पाच वर्षानी वयाची पन्नाशी पूर्ण करणाऱ्या शोलेचं गारूड अजूनही सिनेरसिकांच्या मनात तसंच तरूण आणि ताजं आहे. 

असं काय खास होतं शोलेमध्ये ? सलीम जावेद कडे असलेली फक्त चार ओळींची एक सूडकथा. पण तिच्यावर बनलेल्या ह्या तीन तासापेक्षा अधिक लांबीच्या चित्रपटाने हिंदी चित्रपटसृष्टीतील यश, किर्ती, पैसा ह्याचे मापदंड व मानदंड बदलले. आजही हिंदी चित्रपटसृष्टीतील एक Cult Classic म्हणून ओळखला जाणारा चित्रपट. असं काय खास आहे त्यात ? चित्रपट निर्मितीमधील अत्यावश्यक व अत्यंत महत्वाच्या अशा अंगांच्या दृष्टीकोनातून, एक एक करून बघू या.

कथा व पटकथा - नायक व खलनायक ह्यांच्यांत नायिकेला मिळवण्यासाठी असलेलं वैर, शेवटी नायकाचा जय अशा पठडीतील कथांवर बनणाऱ्या असंख्य चित्रपटांपेक्षा शोलेमधील वैर वेगळं होतं. मूळ चार ओळींच्या कथेला ठाकूरच्या सूडयात्रेची पार्श्वभूमी देत सलीम जावेदनी भव्य बनवलं. आदर्श पटकथालेखन कसं असावं ह्याचा जणू वस्तुपाठ देणाऱ्या शोलेच्या पटकथालेखनातून त्यांनी शोलेची कहाणी रसिकांपर्यंत अतिशय प्रभावी रीतीने पोहोचवली. चित्रपटाच्या व्यावसायिक यशातील पटकथालेखकाचा वाटा ओळखून त्यास योग्य मान देणारा शोले पहिला चित्रपट.

कलाकारांची निवड - ज्याला शुद्ध मराठीत casting म्हटलं जातं ते चित्रपट निर्मितीमधील अजून एक महत्वाचं अंग म्हणजे कलाकारांची निवड. आंतरजालावरील 14 / 18 Unknown Facts about Sholay किंवा Sholay Trivia इत्यादीवरून आत्तापर्यंत आपल्याला सर्वांना माहिती झालं आहे की संजीवकुमारला गब्बरची तर धर्मेंद्रला ठाकूरची भूमिका करायची होती. जाणकारांच्या मते अमिताभसारख्या नवोदित कलाकाराला जयची भूमिका देण्यापेक्षा शत्रूघ्न सिन्हासारख्या अधिक प्रसिद्ध कलाकाराला द्यायला हवी होती. गब्बरसाठी डॅनी डेंझोग्पा चं नाव पुढे होतं. पण ह्या सर्व हमखास ठोकताळ्यांकडे दुर्लक्ष करत रमेश सिप्पी व सलीम जावेद ह्यांनी आपल्या आंतरिक प्रेरेणेला महत्व देऊन कलाकार निवडले आणि नंतर जे घडलं तो इतिहास आहे.

छायाचित्रण व फाईट कोरीगोग्राफी  - सत्तर एम एम च्या चित्रिकरण माध्यामातून एक अत्यंत प्रभावी चित्रीकरण सिनेरसिकांसमोर केलं गेलं. इन्स्पेक्टर बलदेव सिंगला साथ देत धावत्या गाडीतून डाकूंबरोबरच्या जय वीरूच्या फाईट सिक्वेन्समधले कॅमेराचे ॲंगल्स बघा. बेफाम धावणारे घोडे अंगावरचा स्वार गोळी लागून पडल्यावर सुद्धा अंगात भरलेल्या मस्तीमुळे धावत रहातात ते घोड्यांचे शॉट्स बघा. होळीच्या फाईटच्या वेळेस, दौडणाऱ्या घोड्याच्या टापांखालून आपल्या लेकराला वाचवणारी आई, वरकरणी गब्बरच्या पायावर डोकं ठेवायला निघालेल्या जयचे उभ्या घोड्यांच्या पायांच्यामधून घेतलेले शॉट्स  - उत्कृष्ट छायाचित्रण व उत्कृष्ट फाईट कोरीओग्राफीचा अत्त्युत्तम नमुना.

अभिनय - दिग्दर्शकाने स्वत:च्या अंत:प्रेरणेला चिकटून रहात जी कलाकारांची निवड केली त्याला सार्थ ठरवत प्रत्येक कलाकाराने स्वत:च्या वाट्याला आलेल्या व्यक्तिरेखेला पूर्ण न्याय देणारा अभिनयाविष्कार केला.

संजीवकुमार - शोले ही मूळात ठाकूर बलदेवसिंगची सूडकथा. पोलीस अधिकाऱ्याचा करारीपणा, धाडसी वृत्ती, खानदानी ठाकूरपण, प्रेमळ कुटुंबवत्सल असा कुटुंबप्रमुख, जवळपास पूर्ण कुटुंबाच्या हत्येमुळे व स्वत:वर लादल्या गेलेल्या अपंगत्वामुळे शोकाकुल होऊनही प्रतिशोधाच्या आगीने पेटलेला ठाकूर संजीवकुमारमधील समर्थ अभिनेत्याने अप्रतिम साकार केलाय. दोनच उदाहरणं देतो. 
जयच्या मृत्यूच्या वेळी अभागी राधा आपल्या सासऱ्याच्या - ठाकूरच्या छातीवर डोकं टेकवून हमसून रडत असते तेव्हा तिचं सांत्वन करायला, धीर द्यायला, पाठीवरून हात फिरवायची जी एक नैसर्गिक प्रतिक्रिया आहे, ती व्यक्त करण्यातील असमर्थता, त्यामुळे होणारी एका क्षणातील असंख्य भावनांची आंदोलनं व क्षणात स्वत:च्या त्या दु:खावर मात करत सूनेला दिलासा देण्यासाठी निश्चय करत तिच्या माथ्यावर हलकेच ओठ टेकवत तिचं सांत्वन करण्याचा धीरोदात्तपणा ह्या सगळ्या भावना काही सेकंदात ठाकूरच्या चेहेऱ्यावर तरळून जातात. दुसरं, क्लायमॅक्सला गब्बरचे हात नालबंद चढावांच्या खाली चिरडताना जी सूडाची आग, सूड पूर्ण करतानाचं एक समाधान आणि त्यासाठी कराव्या लागलेल्या प्रदीर्घ प्रतिक्षेमुळे जे भावनिक घाव मनावर झालेत त्यातून अधिक प्रज्वलित होणारी, जवळपास शहाणपण सोडून वेडाकडे झुकणारी अशी ती सूडभावना संजीवनी फक्त चेहरा, डोळे व पायापुरती मर्यादित असलेल्या देहबोलीतून अफाटपणे साकारली आहे. त्यातही पहा, शेवटच्या सीनमधले त्याचे विस्फारलेले डोळे आणि आधी गब्बर त्याचे हात कापतो त्या सीनच्या वेळचे; आपले हात कापले जाणार ह्या जाणीवेतून विस्फारले गेलेले डोळे ह्यातही महदंतर आहे. कलाकाराची ताकद इथे जाणवते.

धर्मेंद्र - एरवी आपल्या अभिनयापेक्षा आपल्या देखण्या मर्दानी सौंदर्यासाठी प्रसिद्ध असलेल्या धरमेंद्रने ज्या काही मोजक्या चित्रपटातून आपल्या  अभिनयाची चुणूक दाखवली आहे त्यात सत्यकाम, जीवनमृत्यू ह्याबरोबरच शोलेचं ही नाव घेता येइल. गुन्हेगारीच्या शाळेतून जीवनाचं शिक्षण घेतलेला, बेधडक वृत्तीचा आणि जिगरी दोस्त जयच्या अप्रत्यक्ष अंकुशाखाली चांगल्या वाईटाची पारख करणारा एक गुंड धर्मेंद्रने सुरेख उभा केलाय. गंभीर प्रसंगांपेक्षा दारू पिऊन पाण्याच्या टाकीवर चढून तमाशा केलेल्या विनोदी प्रसंगात त्याच्यातील अभिनेता अधिक सहज वावरतो. पण एकंदरीतच, वीरूची भूमिका तो समर्थपणे निभावतो.

अमिताभ - शतकांचा अभिनेता  - Millenium Star ही अमिताभची ओळख आत्ता आत्ताची. जंजीर आणि दीवार प्रदर्शित होऊन त्याच्या अभिनय सामर्थ्याचं नाणं खणखणीत वाजलेलं असलं तरी शोलेच्या वेळेस तो त्यामानाने नवोदितच होता. वीरूप्रमाणेच गुन्हेगारीच्या शाळेतून जीवनाचं शिक्षण घेतलेल्या जयकडे समतोल विचारशक्ती, चांगल्या वाईटाची जाण हे अधिक असतं. त्याची वृत्ती त्यामुळेच वीरूच्या विपरीत धीरगंभीर अशी आहे. त्याच्या व्यक्तिरेखेचं हे बेअरिंग त्याने संपूर्ण चित्रपट अप्रतिमपणे सांभाळलं आहे. वीरूसाठी मौसीकडे बसंतीला मागणी घालण्याचा सीन आणि शेवटचा मृत्यूचा सीन हे दोन सीन खरा अमिताभ आपल्याला दाखवतात.

हेमा मालिनी - अखंड बडबड करणारी बसंती हेमा मालिनीने सुरेख उभी केलेय. तिच्या व्यक्तिरेखेतून चित्रपटाच्या सतत दडपण ठेवणाऱ्या हाणामारीच्या प्रसंगांच्या गर्दीत व वेगात, एक ताजवा आणणारा झोका येतो. जय वीरू दोघाना ती पहिल्याने ठाकूरच्या हवेलीवर नेते त्या, आमराईतील कैऱ्या पाडायच्या आणि शंकराच्या मूर्तीसमोरचा अशा विविध प्रसंगात हेमा मजा आणते.

जया - हेमाच्या बसंतीच्या एकदम विरुद्ध टोकाची व्यक्तिरेखा जयाने साकारलेल्या राधाची. जवळपास संपूर्ण चित्रपटभर विधवेच्या अतिशय कमी संवाद असलेली राधा, पूर्वायुष्यात जीवनाने किती रसरसलेली असते ते त्या होळीच्या वेळच्या एका दृष्यात दाखवताना राधाच्या जीवनातला विरोधाभास आणि शोकांतिका जया प्रेक्षकांपर्यंत पोचवते.

अमजद खान - गब्बरसिंगची एकमेव भूमिका करून जरी अमजद खान थांबला असता तरी त्याचं नाव आज आहे तसंच अजरामर झालं असतं. "अरे ओ सांभा" आणि "कितने आदमी थे?" ने लोकप्रियतेचे जे उच्चांक गाठले ते अजूनपर्यंत कोणत्याही चित्रपटाच्या संवादाना तर सोडाच; गाण्यांनाही गाठता आलेले नाहीत,असं म्हटलं तर वावगं ठरू नये. होळीच्या दिवशी गावात येऊन गाववाल्याना दम देणारा गब्बर; ठाकूरला बघून जे विकृत हसतो की तुझे तर हात कापून फेकलेत मी; तू काय माझं उखडणार, ते एका विकृत हास्यातून दाखवून अमजदखानने दिग्दर्शकाने आपल्यावर ठेवलेला विश्वास सार्थ ठरवला. बाकी "कितने आदमी थे?" वाला सीन हा हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वश्रेष्ठ सीन्स पैकी एक आहे ह्यात दुमत नसावं. 

सहकलाकार - ह्याशिवाय; जेलरच्या भूमिकेत विकास आनंद, सूरमा भोपाली बनलेला जगदीप, असरानीचा अंग्रेजोंके जमानेका जेलर, केष्टोचा हरीराम नाईक, सत्येन कप्पूचा रामलाल, इफ्तिकारचा नर्मलाल,  सचिनचा अहमद, ए. के. हनगला चा इमामसाहब, विजू खोटेचा कालिया आणि मॅकमोहनचा सांभा - व्यक्तिरेखेची लांबी व तोंडचे संवाद आणि वाट्याला आलेले सीन्स, ह्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवत प्रत्येक कलाकाराने मिळालेल्या भूमिकेला यथार्थ न्याय दिला.

संगीत - शोले सारख्या मारधाडीच्या चित्रपटात खरं तर संगीताला दुय्यम महत्वच मिळायचं. पण चित्रपटाच्या वेगाचा व ताणतणाव ह्यांचा तोल सांभाळताना रमेश सिप्पी ने अचूक जागी पेरलेल्या गाण्यांचा सुरेख उपयोग करून घेतला आहे. त्यासाठी, संगीताची जबाबदारी आर डी च्या समर्थ खांद्यांवर सोपवून तो मोकळा झाला आणि; प्रत्येक गाण्याच्या सिच्युएशन व मूडला साजेसं संगीत देत आर डी ने ती जबाबदारी अप्रतिमरित्या पार पाडली. मोजून पाच गाणी. पण दोस्तीवरची गाणी म्हटलं की ये दोसती हम नही तोडेंगे शिवाय यादी पूर्ण होत नाही. होळीची गाणी म्हटली की होली के दिन दिल खिल जाते हैं हवच हवं. आणि मेहबूबा मेहबूबा चा हेलनचा कॅबरे आजही थिरकायला लावणारा. 

पार्श्वसंगीत - शोलेचं पार्श्वसंगीत म्हटलं की ह्या पाच  गोष्टींचा उल्लेख केलाच पाहिजे. 
पहिली धून - पडद्यावर गब्बर येतानाची धून देताना तो ध्वनीपरिणाम मिळवायला आर डी नी काय आणि कसं वापरलं हे आज सर्वाना माहिती आहे. गब्बरचा विक्षिप्त व सणकी क्रूरपणा, विकृतपणा, दहशत हे सगळं त्या एका ट्यूनमधून साकार केलय आर डी ने.  स्वत: अमजद खानने एका मुलाखतीत 
म्हटल्याप्रमाणे गब्बरच्या *"गब्बर"* म्हणून प्रसिद्ध होण्यात त्या ट्यूनचाही मोठा वाटा आहे. 
दूसरी धून - एकदम वेगळ्या मूडची. दिवस संपून रात्र उतरत असताना व्हरांड्यात माऊथ ऑर्गन वाजवत बसलेला जय आणि एक एक दिवा विझवत आपल्या खोलीकडे जाणारी राधा. दोघेही आपापल्या आयुष्यात एकाकी. ते एकाकीपणच दोघांच्यात एक अदृश्य नाजूक धागा विणत असतं. त्या वेळेचा तो प्रकाश नैसर्गिक आहे. तो प्रकाशपरिणाम मिळवायला रमेश सिप्पीने म्हणे तब्बल दोन वर्षं वाट बघितली. उदास तरीही कुठेतरी थोडीफार आशा असल्यासारखा तो प्रकाश, माऊथ ऑर्गन वाजवणारा जय, दिवे विझवत जाणारी राधा - आणि जोडीला आर डी ची ती माऊथ ऑर्गनची ती अद्वितीय धून. मनावर कोरलं जाणारं एक अद्भुत जादूई दृष्य. 
तिसरं उदाहरण म्हणजे डाकू हेमा मालिनीचा पाठलाग करतात तेव्हा पार्श्वभूमीला आर डी ने वापरलेला पंडीत सामता प्रसादांचा तबला. त्या पाठलाग दृष्यातील सर्व थरार, उत्कंठा, नाट्य त्या तबल्याच्या तुकड्यातून आपल्यापर्यंत पोहोचतं. 
 चौथं उदाहरण - राधा व नोकर रामलाल सोडून बाकी पूर्ण ठाकूर कुटुंब मारलं जातं त्यावेळी ठाकूर बलदेव घरी येतो त्या संपूर्ण प्रसंगातील पार्श्वसंगीत. त्या प्रसंगातील भयानकता, क्रौर्य, कारुण्य - सगळं सगळं त्या अंगावर येणाऱ्या पार्श्वसंगीतामुळे अधिक परिणामकारकपणे जाणवतं.
पाचवं उदाहरण - शोले ची शीर्षक धून. आजही ही धून कानावर पडली की संपूर्ण शोले डोळ्यांसमोर उभा रहातो.

संकलन अर्थात एडीटींग - फिल्मफेअरच्या एकूण ९ नामांकनांपैकी फक्त एकातच शोले ला फिल्मफेअर पुरस्कार मिळाला - संकलनासाठी. नुकत्याच व्हॉट्सॅपवर व्हायरल झालेल्या किरण मानेंच्या पोस्टप्रमाणे माधवराव शिंदे ह्यांनी जवळपास ३ लाख फूट लांबीच्या फिल्ममधील प्रत्येक सीन पाहून संकलन केलं. त्यातही सेंसॉर बोर्डने बदल सुचवल्यावर ते बदल त्यात समाविष्ट केले. It really must have been a herculean task, ably shouldered by माधवराव शिंदे. 

दिग्दर्शन - चित्रपट काय; नाटक काय - ही दिग्दर्शकाची माध्यमं म्हणून ओळखली जातात. शोलेच्या अभूतपूर्व यशामागे दिग्दर्शक रमेश सिप्प्पीचा अर्थातच सिंहाचा वाटा आहे. अभिनेत्यांच्या निवडीपासून ते चित्रपटाच्या कहाणीत व्यक्तिरेखांच्या प्रवासापर्यंत, तो प्रवास दाखवणाऱ्या लोकप्रिय व प्रसिद्ध आणि अप्रसिद्ध दृष्यांपर्यंत - सगळीकडे सिप्पीची जादू जाणवत रहाते.

जय आणि वीरू पहिल्यांदी रामगढला येतात तेव्हा घडणारं रामगढचं दर्शन आणि फ्रेममधून दूर जाणाऱ्या टांग्याबरोबर बसंतीच्या बडबडीचा कमी होत जाणारा आवाज, टांगा ठाकूरच्या हवेली जवळ येतो तेव्हा फ्रेममध्ये कॅमेऱ्याकडे टांगा येताना बसंतीचा मोठा होत जाणारा आवाज.

कालिया व इतर दोन डाकू रामगढमध्ये येतात त्याच्या आधी एखाद मिनिटासाठी दाखवलेली  खेडेगावातील दैनंदिन जीवनाची झलक - लोहार, पिंजारी, पाथरवट, सुतार, धुणं धुणाऱ्या स्त्रिया - किती बारकाईने संपूर्ण खेडं रमेश सिप्पीने उभं केलय.

फाईट सिक्वेन्सची हाताळणी ही शोलेमधली फार महत्वाची बाब आहे. त्यात अर्थातच fight choreographer चा सिंहाचा वाटा असला तरी दिग्दर्शक म्हणून रमेश सिप्पीच्या हाताळणीचाही तितकाच महत्वाचा वाटा आहे. धावत्या गाडीतील सुरूवातीचा फाईट सिक्वेन्स, होळीचा फाईट सिक्वेन्स, ठाकूर गब्बरला पकडतो तो पाठलागाचा सिक्वेन्स, हेमा मालिनीचा पाठलाग होतो तो सिक्वेन्स - सगळे सीन्स फाईट सिक्वेन्स कसा असावा ह्याचे; आज तंत्रज्ञान इतकं आधुनिक होऊनदेखील, आजच्या सिनेनिर्मितीदाठी देखील वस्तुपाठ आहेत.

जय आणि वीरूची दोस्ती दाखवायला ये दोसती गाणं आहे. पण त्याही पेक्षा प्रत्येक मारामारीच्या प्रसंगात ते ज्या प्रकारे शब्दही न बोलता एकमेकांना पूरक हालचाली करतात, कव्हर देतात त्यावरून त्यांची इतक्या वर्षांची गहरी दोस्ती व साथ दिसते. 

बघा - धावत्या गाडीतील पहिली फाईट - वीरू इंजिनकडे जातो तर जय गार्डसाईडचा एंड सांभाळतो ठाकूरबरोबर. त्यातही, शेवटी परत गार्डच्या डब्याकडे येणाऱ्या वीरू समोर चाकू घेऊन आलेल्या डाकूसमोर त्याचे रीफ्लेक्सेस आणि कोणाच्या तरी उडीचा आवाज ऐकून उताणं झोपून छतावरच्या डाकूला गोळी घालणारा जय.

जय वीरूची परीक्षा घ्यायला ठाकूर स्वत:च्याच माणसांकडून त्यांच्यावर अनपेक्षित हल्ला करवतो तेव्हाच्या फाईटमधल्या दोघांच्या सुरूवातीच्या तीन ते चार मूव्ह्ज बघा - so identical & well timed.

कालिया व दोन डाकूना पाणी पाजताना दोघांनी घेतलेल्या पोझिशन्स.

होळीच्या फाईटच्या वेळी गोल खेळण्यातून आतून बाहेरच्या डाकूना मारणारा जय आणि झोपडीआड लपून त्याला कव्हर करणारा वीरू. जय ने गब्बरच्या डोळ्यात रंग फेकल्यावर ताबडतोब त्याला पूरक हालचाल करणारा वीरू आणि ती फाईट संपायला येताना दोघानी घेतलेल्या पोझिशन्स. 

मला तरी जय वीरूची दोस्ती गाण्यापेक्षा जास्त ह्या गोष्टींमधून जाणवते.

भावनिक वा कौटुंबिक प्रसंगात देखील रमेश सिप्पीमधला दिग्दर्शक जाणवत रहातो. गोळी लागून जखमी झालेल्या जयला येताना पाहून सर्वकाही विसरून धावणारी राधा, सासऱ्याला खाली उभा बघून जागीच थांबते तो सीन आठवा. जया आणि संजीव दोघांनी कमाल केलेय. किंवा इंटर्व्हलच्या आधी ठाकूर आपण बंदूक का उचलली नाही ते सांगतो आणि त्याच्या खांद्यावरची शाल खाली पडते. जय आणि वीरूकडे तिरस्काराने कटाक्ष टाकत राधा पुढे होऊन ती शाल परत ठाकूरच्या खांद्यावर टाकून आपली घरंदाज  सूनेची जबाबदारी अबोलपणे पार पाडत खूपकाही बोलून जाते. ह्या सर्व प्रसंगात जयाची एक अभिनेत्री म्हणून ताकद समजते आणि रमेश सिप्पी मधला दिग्दर्शक देखील दिसून येतो.

सत्येन कप्पूचा रामलाल बघा. सुरूवातीचा "अच्छा घर है! काफी बडा है! और कौन कौन रहता है यहाँपे ?" ह्या जयच्या प्रश्नाला तिऱ्हाईत माणसाला झटकावं तसा "चाबी" असं तुटक उत्तर देऊन तोडून टाकणारा रामलाल नंतर स्वत:च "इसे देखता हूँ तो मुझे हमेशा वही याद आता हैं जब मैं ठाकूरके साथ इसके गाव गया था" म्हणत राधाची सगळी कहाणी सांगून म्हणतो "और अब देखो तो सचमें कैसी बेरंग हो गयी हैं इसकी दुनिया" असं म्हणत जय ला आपल्या माणसात जमा करतो.

ह्या सर्व हाणामारीच्या वा भावनिक प्रसंगांच्या मध्ये हुशारीने पेरलेले, प्रेक्षकांना थोडं relax करणारे विनोदी सीन्स - जगदीपच्या सूरमा भोपालीचे, असरानीच्या अंग्रेजोंके जमाने वाल्या जेलरच्या जेलमधले, धरम व अमित चे वर उल्लेखलेले. 

कितने आदमी थे च्या जोडीने बसलेले "अरे ओ सांभा" , "लोहा लोहे को काटता है", सारखे इतर लोकप्रिय आणि "समाज और बिरादरी इन्सान को अकेलेपनसे बचानेके लिए बनाए गये है; उसे अकेला रखनेके लिए नहीं!" सारखे अर्थपूर्ण संवाद.

ह्या व अशा इतर असंख्य गोष्टीतून रमेश सिप्पीची चित्रपटावरची पकड जाणवत रहाते. यशस्वी स्टार, प्रसिद्ध कलाकार, नवोदित कलाकार, अनेक सहकलाकार ह्या सर्वांचं नियंत्रण करत जवळपास साडेतीन तासाच्या ह्या चित्रपटाचं शिवधनुष्य रमेश सिप्पी लीलया पेलतो. कोणाही एकाच कलाकाराला अधिक महत्वाचे वा भाव खायला मिळणारे सीन्स हेतूपुरस्सर न देता तो शोले हे एक टीमवर्क बनवतो. इतकं की गृप सीन्स मध्ये तोंडी जेमतेम एकेक संवाद असलेले शंकर, काशीराम सारखे व नाव नसलेले गावकरीसुद्धा स्मरणात राहतात. गब्बरची व्यक्तिरेखा तर सोडाच. पण आपल्या तोंडी फक्त एक संवाद व आपला कट झालेला सांभाचा  रोल ह्यामुळे चिडलेल्या मॅकमोहनचा  - तू चिंता करू नकोस. तुझ्या कॅरेक्टरला सगळे ओळखतील हे चित्रपट तयार होतानाच छातीठोकपणे सांगणाऱ्या रमेश सिप्पीने असाच दिलासा नव्हता दिला मॅकमोहनला. त्याला त्याच्या नजरेसमोर संपूर्ण शोले दिसत होता - तितकाच स्पष्ट जितका बंगरूळपासून पन्नास किलोमीटर वरचा रामगढचा सेट. ह्याला दिग्दर्शक म्हणतात.

कथा, पटकथा, कलाकारांची निवड, अभिनय, संगीत, पार्श्वसंगीत, छायाचित्रण, फाईट कोरीओग्राफी, संकलन - अर्थात एडीटींग आणि दिग्दर्शन - ह्या प्रत्येक क्षेत्रातील प्रत्येकाच्या अद्वितीय कामगिरीशिवाय एक अजून महत्वाची गोष्ट - शोलेच्या निर्मितीची वेळ जमून आली होती. सगळ्यानी घेतलेल्या प्रचंड मेहनतीला जोड मिळाली होती कोणत्या तरी अनाम दैवी उर्जेची  ज्यामुळे शोले "शोले" बनला.

आजही जर थिएटरला लागला कुठे तर माझी तयारी आहे - सत्तावीस, अठ्ठावीस .... आणि परत परत बघत रहायची - शोले.

----- मनीष मोहिले 

No comments:

Post a Comment