दिनांक २ ऑक्टोबर २०२३. भारतीय गिर्यारोहक आणि भारतीय गिर्यारोहण क्षेत्र यांच्यासाठी हा दिवस एक महत्त्वाचं लक्ष्य पूर्ण करणारा दिवस म्हणून अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण १६ ऑक्टोबर २०२२ रोजी सुरू झालेली एक अभिनव गिर्यारोहण मोहीम, जवळपास एक वर्षानंतर २ ऑक्टोबर २०२३ रोजी यशस्वीरित्या पूर्ण झाली. भारतीय लष्कराचे कर्नल रणवीर सिंग जमवाल ह्यांच्या मार्गदर्शन v नेतृत्वाखाली यशस्वीरित्या पार पाडल्या गेलेल्या ह्या अभिनव गिर्यारोहण मोहिमेचे नाव आहे हर शिखर तिरंगा.
काय आहे ही हर शिखर तिरंगा मोहीम ? तर भारताच्या सर्व म्हणजे २८ राज्यातील प्रत्येक राज्यात जे सर्वोच्च शिखर आहे ते शिखर पादाक्रांत करण्याचे उद्दीष्ट असलेली ही मोहीम. ज्याप्रमाणे प्रत्येक खंडातील सर्वोच्च शिखर पादाक्रांत करणे हा आंतरराष्ट्रीय गिर्यारोहण क्षेत्रातील एक आत्यंतिक महत्त्वाचा मानांक आहे त्याप्रमाणे भारतीय गिर्यारोहण क्षेत्रात हा एक समांतर मानांक निर्माण झाला आहे आणि हा मानांक निर्माण व स्थापित करण्याचे श्रेय जाते कर्नल रणवीर सिंग जमवाल ह्यांच्याकडे. अरुणाचल प्रदेश मधील दिरांग येथे स्थित असलेल्या National Institute of Mountaineering and Adventure Sports ह्या संस्थेच्या संचालक पदी असलेले कर्नल रणवीर हे स्वतः एक प्रथितयश गिर्यारोहक आहेत ज्यांनी सातही खंडातील सर्वोच्च शिखरे तर पादाक्रांत केलेली आहेतच. शिवाय जगातील सर्वोच्च शिखर माऊंट एव्हरेस्ट तीन वेळा सर केलेले आहे.
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त काहीतरी विशेष योगदान दिले पाहिजे ह्या विचाराच्या मंथनातून संपूर्ण भारत भरातील सर्व म्हणजे २८ राज्यातील प्रत्येक राज्याचे सर्वोच्च शिखर सर करण्याची एक जंगी मोहीम आखायाची हा अभिनव प्रकल्प जन्मास आला आणि कर्नल रणवीर सिंग ह्यांच्या अथक प्रयत्नांनी तो सिद्धीस देखील गेला.
भारतीय पर्यावरण आणि भूगोल ह्यातील अतिऊंच प्रदेशातील भौगोलिक वैविध्य जगापुढे आणणे, गिर्यारोहणासारख्या साहसी खेळाला आणि पर्यावरण संरक्षण व संवर्धन ह्यास प्रोत्साहन देणे आणि भारतीय तिरंग्याला भारताच्या प्रत्येक राज्यातील सर्वोच्च शिखरांवर फडकावणे ही या मोहीम प्रकल्पामागील काही प्रमुख उद्दीष्टे.
ह्या मोहिमेसाठी कर्नल जमवाल ह्यांनी टीम बनवली. प्रत्यक्षात मोहिमेत सहभागी होणाऱ्या सदस्यां शिवाय पडद्यामागे काम करणारे सदस्यही तितकेच; किंबहुना अधिक महत्त्वाचे होते कारण त्यांच्याकडे संपूर्ण logistics सांभाळणं हे काम होतं. त्यात मोहिमेचा route ठरवणे अर्थात कुठून सुरुवात करून कुठे शेवट करायचा (कारण हिमालयातील ऊंच शिखरे, वर्षाच्या काही विशिष्ट कालावधीतच सर केली जाऊ शकली असती), प्रत्येक ठिकाणचे मार्ग, रेशन (शिधा), स्थानिक गाईड्स, स्थानिक गिर्यारोहण क्लब बरोबर समन्वय, हवामान माहिती, अशी खूप कामे समाविष्ट होती.
हा सगळा आराखडा नक्की करत १६ ऑक्टोबर २०२२ ला अरुणाचल प्रदेशमधील गोरीचेन (६८५८ मी.) सर करून मोहिमेचा नारळ फोडण्यात आला आणि २ ऑक्टोबर २०२३ ला सिक्कीम मधील जोंगसोंग (७४६२ मी.) (Kanchenjunga is closed for climbing) सर करून इतिश्री करण्यात आली. हे शिवधनुष्य उचलणं अजिबात सोपं नव्हतं.
संपूर्ण भारतभर जवळपास ३०-३१००० कि. मी. चा प्रवास करावा लागला. कित्येक ठिकाणी जाण्याचा नक्की मार्ग माहिती नव्हता तर कित्येक ठिकाणी भाषेच्या अडचणीमुळे स्थानिक लोकांची मदत मिळण्यास देखील अडचण येत होती. काही राज्यातील नक्षलवादी प्रभावामुळे जीवाशी गाठ होती. मात्र ह्या सर्वांवर मात करत Core team ने कर्नल जमवाल ह्यांच्या नेतृत्वाखाली हा मोहीम प्रकल्प यशस्वीपणे पार पाडला.
वरील अडचणींशिवाय प्रत्यक्ष गिर्यारोहण करताना देखील अनेक अडचणी आल्या. उदा. हिमाचल प्रदेशातील रियो पूर्गील (Reo Purgyil - ६८१६ मी.) चे शेवटचे ४०० मी. अत्यंत कठीण होते कारण अतीऊंच व अतिशीत वातावरणात प्रस्तरारोहण अर्थात Rock Climbing करावे लागले. नंदादेवी off limits असल्याने (being World Heritage Sight and Biosphere reserve) उत्तराखंड मधील दुसऱ्या क्रमांकाचे कामेत (७७५६ मी.) सर करताना बर्फ आणि खडकाळ जागी चाल (traverses), बर्फ आणि खडक असे मिश्र प्रस्तरारोहण, निसटणारे खडक अशा अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले. गोव्यातील सोंसोगोर (१०२६ मी.) च्या वेळेस जवळपास १२ तासांच्या संततधार पावसाने मार्गक्रमणा कठीण बनवली तर सर्वात छोट्या अशा (८७४ मी.) सोमेश्वर फोर्ट ह्या बिहार मधील शिखरावर जाताना अतिशय घनदाट जंगल आणि हिंस्त्र श्वापदे ह्या अडचणीवर मात करावी लागली. सगळ्यात शेवटी जोंगसोंग सर करताना the window for clear climate was very small. पण हिंमत करून रात्री दहा ते सकाळी दहा अशा बारा तासांच्या summit push मध्ये त्यांनी यशस्वी चढाई केली आणि दुसऱ्याच दिवशी म्हणजे ३ ऑक्टोबर ला सिक्कीम मध्ये नुकत्याच आलेल्या flash floods मध्ये अडकण्याची शक्यता त्यांना भेडसावली. मात्र चांगल्या गिर्यारोहकांची तीक्ष्ण संवेदना आणि समयोचित निर्णय व कृती ह्यामुळे ते बचावले.
अशा पद्धतीने मोहीम यशस्वी रित्या पार पाडत कर्नल रणवीर आणि त्यांच्या टीम ने भारतीय गिर्यारोहणाचा एक नवीन आणि अभिनव मानांक स्थापित केला. ह्याचा काय फायदा होईल ? तर भारतीय गिर्यारोहकांना देशातेल्या देशात अतीऊंच भागात, विविध प्रकारच्या भूस्तर प्रदेशात गिर्यारोहण करण्यास संधी मिळून आपले तंत्र अधिक चांगले बनवता येईल. एक मोठी गिर्यारोहण मोहीम कशी आखावी त्याचे प्रशिक्षण मिळेल. ह्या सर्वांचा आंतरराष्ट्रीय पातळीवर गिर्यारोहण करताना फायदाच होईल. शिवाय स्थानिक पातळीवर ह्या धाडशी खेळात तरुणांना रस निर्माण होईल. आज कित्येक शिखरांना योग्य नाव आणि त्यामुळे ओळख नाही. (उदा. पंजाबमधील नैनादेवी पर्वतरांगांमध्ये असलेले शिखर) ती शिखरे नावासहीत भारतीय गिर्यारोहण नकाशावर अस्तित्वात येतील. हे सारं शक्य व्हावं म्हणून कर्नल जमवाल ह्या मोहिमेतील आपल्या अनुभवांना शब्दबद्ध करून पुस्तक रूपाने जगासमोर घेऊन येणार आहेत.
भारतीय गिर्यारोहण क्षेत्रात कर्नल रणवीर सिंग जमवाल ह्यांच्या जिद्द आणि प्रयत्नांनी एक नवीन अध्याय सुरू झालेला आहे. त्या अध्यायातून पुढे महाकाव्य लिहिले जाईल आणि ज्या तिरंग्याच्या माना करीता त्यांनी हे शिवधनुष्य उचलले, तो तिरंगा अधिकाधिक मानाने अधिक ऊंच फडकत राहील अशी आशा करूया.
---- मनीष मोहिले
माहिती स्त्रोत - आंतरजाल.
छायाचित्र स्त्रोत - कर्नल रणवीर सिंग जमवाल ह्यांच्या Instagram account वरून
No comments:
Post a Comment