Tuesday, November 14, 2023

सृजनशीलता, अष्टोत्तरशत रामायण, स्वत्व आणि स्वाभिमान

 

टीप : या लेखातील अष्टोत्तर शत रामायणाच्या संपूर्ण माहितीचा स्त्रोत आहे आंतर जालावरील ऐसी अक्षरे नामक संकेतस्थळावरील श्री. अरविंद कोल्हटकर ह्यांचा अतिशय अभ्यासपूर्ण लेख. त्याशिवायचे इतर विचार या लेखाच्या लेखकाचे आहेत.

काही दिवसांपूर्वी काहीतरी वाचत असताना, creativity अर्थात सृजनशीलता ह्याची व्याख्या वाचनात आली. ती व्याख्या होती Creativity is the bridge connecting imagination and reality. कल्पनाशक्ती आणि वास्तव ह्यांना जोडते ती सृजनशीलता. किती यथार्थ व्याख्या आहे. निव्वळ कल्पनेच्या भराऱ्या उपयोगी नाहीत. वास्तवाशी जुळलेली नाळ तुटता उपयोगी नाही. ती तशी जुळलेलीच हवी. नाहीतर कल्पना कल्पनाच राहते. ती कल्पना सत्यात उतरवायची म्हणजे असा काही आविष्कार हवा ज्याकडे पहाता हे लगेच लक्षात येईल की अमुक एका कल्पनेचा हा मूर्तीमंत (साक्षात ह्या अर्थी) आविष्कार आहे. कल्पनाशक्तीचा असा आविष्कार जो जन सामान्यांपर्यंत सहज पोहोचेल. किंवा अमुक एक आधीच अस्तित्वात असलेले किंवा माहिती असलेले ज्ञान एका वेगळ्या आविष्कारामधून जगापुढे आणणे ही देखील एक प्रकारची सृजनशीलता म्हणावी लागेल. उदा. त्याच सात सूरांमधून प्रत्येक संगीत निर्देशक, गायक, वादक वेगवेगळ्या चाली, सुरावटी, आलाप, ताना घेऊ शकतो. किंवा एकाच वृत्तामध्ये भिन्न कवी भिन्न काव्यरचना करू शकतात आणि त्या सूरांशी, त्या वृत्ताशी, रचनाबंधाशी त्यांचं नातं हे त्यांचं वास्तवाशी असलेलं नातं.
ह्यामुळेच creativity किंवा सृजनशीलता हा शब्द कलाक्षेत्रात मग ते साहित्य, काव्य, शिल्प, चित्र, संगीत ह्यापैकी कोणतेही कला क्षेत्र असेल, त्यात काम करणाऱ्याबद्दल वापरला जातो. आता कोणत्याही कलेमध्ये कल्पनाशक्ती असणं ही अत्यावश्यक बाब आहे. पण वर बघितल्या प्रमाणे त्याचा वास्तवाशी संबंध बघणं देखील आवश्यक आहे. कलाकाराची विशिष्ट शैली हा त्याचा दृष्याविष्कार. त्या त्या कलाक्षेत्रातील अभ्यासू व्यक्तींना किंवा त्यात रस असणाऱ्या जाणकार रसिकांना ती विशिष्ट शैली अथवा ते बारकावे जाणवू शकतात, समजू शकतात. जिथे ती शैली, त्या शैलीत त्या कलाकाराने केलेल्या कलाविष्काराची ओळखच असते.
ह्याच ओघात इथे ह्या ठिकाणी मी सांगणार आहे साहित्यक्षेत्रात अफाट सृजनशीलतेचं परिमाण असलेली पण कदाचित फारशी प्रसिद्धी न मिळालेली अशी एक साहित्यकृती - अष्टोत्तर शत रामायण ह्याबद्दल.
काय आहे नक्की हे अष्टोत्तर शत रामायण ? नावावरूनच औत्सुक्य निर्माण करणारी ही कलाकृती म्हणजे काव्यरुपातील एकशे आठ रामायणे आहेत जी एकाच कवीने रचली आहेत. त्या अलौकिक प्रतिभावान कवीचं नाव आहे मोरेश्वर रामचंद्र पराडकर अर्थात मयूर पंडीत अर्थात मोरोपंत.
मला स्वतःला मोरोपंत हे त्यांच्या केकावली की ज्यातील एक कविता आम्हाला दहावीला होती त्या केकावली मुळे स्मरणात आहे आणि त्यातील एक द्वी पदी जी त्यातील छंदामुळे आजही लक्षात आहे -
कुरुकटकासी पहाता तो उत्तर बाळ फार गडबडला
स्वपरबळाबळ नेणूनी, बालिश बहु बायकात बडबडला
तर अशा ह्या मोरोपंतांच्या घराण्याचे प्रभू श्रीरामचंद्र हे आराध्य दैवत. तेव्हा ह्या आपल्या आराध्य दैवताची काव्यपूजा बांधण्याचा संकल्प मोरोपंतांनी केला आणि त्यासाठी एक अभिनव मार्ग चोखाळला. काव्यरचनेला व्याकरणाचे नियम, शब्दलालित्य, ह्यातून वेगवेगळ्या प्रकारे हाताळून लहान मोठ्या अशा एकशे आठ भिन्न रचनातून त्यांनी रामायण लिहिले. त्याच काव्य रचनांचा समूह म्हणजे हे अष्टोत्तर शत रामायण.

आता ह्यामध्ये सृजनशीलता ह्या शब्दाच्या व्याख्येप्रमाणे वास्तवाशी संबंध कसा आला ? तर मुळात रामायण महाभारत ही महाकाव्ये भारतीय संस्कृतीची अविभाज्य अशी पुरातन वास्तव ओळख आहे जिची प्रत्यक्ष प्रमाणे अयोध्येतील राम जन्मस्थान, पंचवटी (अर्थात नाशिक), रामसेतू, लंका, कुरुक्षेत्र, इंद्रप्रस्थ (अर्थात दिल्ली) अशा स्वरूपात उपलब्ध आहेत. तर अशा कालातीत महाकाव्यापैकी एक रामायण; ज्यातील अद्भुत कथेला एकशे आठ वेळा वेगवेगळ्या काव्यात सादर करायचं आणि ते करताना रचनेतील लालित्य, वैविध्य, प्रकृती भिन्नत्व जपायचं ह्यासाठी निश्चितपणे प्रतिभा हवी आणि त्याच बरोबर सृजनशीलता देखील.
काय वैशिष्ट्य आहेत किंवा काय प्रकृती भिन्नत्व आहे ह्या रचनांमध्ये. या पाहूया.
सदर रामायण काव्ये मुख्यत: तीन गटात मोडतात. पहिला ज्यात शाब्दिक रचना चातुर्य हे मुख्य लक्षण आहे. दुसरा गट ज्यात श्री राम जय राम जय जय राम हा त्रयोदशाक्षरी मंत्र वेगवेगळ्या प्रकारे गुंफून काव्यरचना केलेली आहे आणि तिसऱ्या गटात प्रसिद्ध आणि अप्रसिद्ध वृत्त आणि स्तोत्र यावर आधारित काव्य आहेत.
पहिला गट - शब्द रचना लालित्य
दिव्य रामायण - ह्यात गीती वृत्तात बांधणी केली आहे ज्यात द्वीपदी असून प्रत्येक पदा मध्ये सोळा अक्षरे आणि तीस मात्रा असा हिशोब वृत्त नियमानुसार बसवला आहे. प्रत्येक चरणात / ओळीत ११ वे आणि १३ वे अक्षर एका मात्रेचे तर बाकी सर्व दोन मात्रांची अशी मांडणी आहे.
सुख रामायण - ह्यात दिव्य रामायणाच्या उलट मात्रा हिशोब आहे. २८ अक्षरे एका मात्रेची तर २९ वे अक्षर दोन मात्रांचे असा ३० मात्रांचा हिशोब बसवलेला आहे.
कविप्रिय रामायण - ह्यात प्रत्येक चरणात एका अक्षराची पुनरावृत्ती पहिल्या, नवव्या आणि सोळाव्या स्थानी होते.
सौम्या रामायण - प्रत्येक चरणात ३२ मात्रा, तसेच प्रथम चरणात १६ गुरू तर द्वितीय चरणात ३२ लघु मात्रा आणि आठव्या चरणात यति असे शब्द रचना लालित्य साधलेले आहे.
निरोष्ठ रामायण - वास्तविक हा सगळा लेखन प्रपंच होण्यास कारणीभूत Instagram वरील एक reel ज्यात मी निरोष्ठ रामायण हा शब्द ऐकला आणि माझी उत्सुकता चाळवली गेली. त्याबाबत अधिक शोध करता मग ही सगळी माहिती मिळत गेली.
ह्या निरोष्ठ रामायणाचे वैशिष्ट्य हे की ह्यात कोणतेही ओष्ठ्य अक्षर नाही. मराठीत उच्चार आधारित ओष्ठ्य (ज्याचा उच्चार करण्यासाठी ओठ मिटावे लागतात, जसे प, फ , ब, भ, म); दंतव्य (ज्याचा उच्चार करताना जीभेचा स्पर्श वरील दातास होतो, जसे त, थ, द, ध, न); तालव्य (ज्याचा उच्चार करताना जीभेचा स्पर्श टाळ्यास होतो, जसे च, छ, ज, झ) आणि कंठ्य (ज्याचा उच्चार कंठातून होतो जसे क, ख, ग, घ) अशा वर्गात वर्ण किंवा अक्षरे विभागली जातात. आता रामायणात मुळात राम हा शब्द ओष्ठ्य असताना निरोष्ठ रामायण काव्य रचना करायची ह्या विचारातच किती सृजनशीलता आहे. त्यामुळे इथे दशरथकुमार इत्यादी सारखी रामाची इतर नावे वापरली गेली आहेत.
दाम रामायण - ह्यात प्रत्येक चरणातील शेवटची तीन अक्षरे पुढील चरणातील पहिली तीन अक्षरे म्हणून वापरली आहेत जेणे करून एक सूत्र, दोरा अर्थात दाम निर्माण होतो.
सन्नामगर्भ रामायण - ह्यातील प्रत्येक चरणात कोणी एक साधू, संत, भक्त, कवी, पुण्यश्लोक राजा अशा व्यक्तींची नावे गुंफलेली आहेत.
संदर्भ रामायण - १५२ अक्षरांचा एक संच ज्यात देव, संत, पूजनीय व्यक्ती ह्यांची नावे आहेत. ह्या संचातील प्रत्येक अक्षराने सुरूवात होणारी १५२ कडवी ह्यात आहेत.
मात्रा रामायण - मराठीत अ ते ज्ञ ह्या ४६ अक्षरांना मात्रा म्हणतात. त्यातील प्रत्येक मात्रेने सुरू होणारा एक चरण अशी काव्यरचना आहे ज्यात फक्त व, लृ, ञ, ङ, तर आणि ळ ह्या मात्रा नाहीत कारण त्याने सुरू होणारे शब्द नाहीत.
१० उमा रामायण - १२१ कडव्यांच्या या रामायणाची खासियत ही की प्रत्येक कडव्याच्या पहिल्या ओळीची सुरूवात ने तर दुसऱ्या ओळीची सुरूवात मा ने होते. अशा प्रकारे, प्रत्येक चरणात उमा हे नाव गुंफलेले आहे.
११ शिव रामायण - या काव्यरचनेत प्रत्येक चरणाच्या पहिल्या ओळीत एकदाच शि आणि दुसऱ्या ओळीत एकदाच योजलेला आहे. अशा प्रकारे, प्रत्येक चरणात शिव हे नाव गुंफलेले आहे.
१२ गंगा रामायण - या काव्यरचनेत ६३ पैकी प्रत्येक चरणाच्या पहिल्या ओळीत एकदाच गं आणि दुसऱ्या ओळीत एकदाच गा योजलेला आहे. अशा प्रकारे, प्रत्येक चरणात गंगा हे नाव गुंफलेले आहे.
१३ काशी रामायण - या काव्यरचनेत ५५ पैकी प्रत्येक चरणाच्या पहिल्या ओळीत एकदाच का आणि दुसऱ्या ओळीत एकदाच शी योजलेला आहे. अशा प्रकारे, प्रत्येक चरणात काशी हे नाव गुंफलेले आहे.
१४ प्रयाग रामायण - या काव्यरचनेत प्रत्येक चरणाच्या पहिल्या आणि दुसऱ्याओळीत मिळून एकदाच प्र, या आणि योजलेला आहे. अशा प्रकारे, प्रत्येक चरणात प्रयाग हे नाव गुंफलेले आहे.
१५ तीर्थ रामायण - या रामायणात प्रत्येक गीतेमध्ये एका पवित्र नदीचे नाव गुंफत ५९ गीती रचल्या आहेत.
१६ ऋषी रामायण - ८९ चरणांच्या ह्या रचनेत, प्रत्येक चरणात एका प्राचीन ऋषींचे नाव गुंफले आहे.
१७ राज रामायण - ८६ चरणांच्या ह्या रचनेत, प्रत्येक चरणात एका प्राचीन राजाचे नाव गुंफले आहे.
१८ परंतु रामायण - या रामायणात प्रत्येक गीती मध्ये परंतु हा शब्द वापरलेला आहे.

दुसरा गट - मंत्राधारीत रामायण
मंत्र रामायण - "श्री राम जय राम जय जय राम" ह्या त्रयोदशाक्षरी मंत्रातील प्रत्येक आद्याक्षराने, ह्यातील प्रत्येक श्लोकाची सुरूवात होते. अशा १३ गीतींचा एक गट असून अशा ६ गटांचे बालकांड रचले आहे. त्रयोदशाक्षरी मंत्रातील प्रत्येक अक्षर द्वितीय स्थानी अशा १३ गितींचा दुसरा गट. अशा ९ गटांचे अयोध्याकांड, तर त्रयोदशाक्षरी मंत्रातील प्रत्येक अक्षर तृतीय स्थानी अशा १३ गितींचा तिसरा गट. अशा ८ गटांचे अरण्यकांड अशी रचली आहेत. त्याचप्रमाणे गटांची संख्या कमी जास्त करत, किषकींधाकांड, सुंदरकांड व उत्तरकांड रचली आहेत.
बाल मंत्र रामायण - हे मंत्र रामायणाकरता लहान असल्याने ह्यास बाल मंत्र रामायण म्हणतात. ह्यात त्रयोदशाक्षरी मंत्र, प्रत्येक कांडात तीन वेळा फिरवला आहे.
३ व ४ सप्त मंत्र रामायणमंत्री रामायण - ह्यांची रचना मंत्र रामायणा सारखीच आहे. फक्त मंत्र प्रत्येक कांडात एकदाच फिरवला आहे; आणि ही अनुष्ठुभ छंदात आहेत.
मंत्रगर्भ रामायण - हे साकी वृत्तात असून मंत्र प्रत्येक कांडा मध्ये एकदाच फिरवला आहे आणि प्रत्येक कांडात १३ साक्या आहेत.
रम्य मंत्र रामायण - ह्याची रचना मंत्रगर्भ रामायणाप्रमाणेच असली तरी फरक हा की प्रत्येक कांडात १३ च श्लोक असले तरी वृत्ते वेगवेगळी आहेत.
मंत्रमय रामायण - ह्यातील २४ गीतींमध्ये त्रयोदशाक्षरी मंत्र प्रत्येक गीतीत पूर्णपणे गुंफलेला आहे.
त्रि:सप्त मंत्र रामायण - २१ श्लोक असलेले हे रामायण शार्दूलविक्रिडीत वृत्तात असून त्रयोदशाक्षरी मंत्र प्रत्येक श्लोकात पूर्णपणे गुंफलेला आहे.
नामांक रामायण - पहिल्या चरणाचे पहिले अक्षर रा आणि दुसऱ्या चरणाचे पहिले अक्षर अशी १३० कडवी आहेत.
१० शिव रामायण - शिवाष्टरोत्तरशत नामावली नामक श्री शंकराच्या १०८ नावांचा उल्लेख असलेले एक स्तोत्र आहे. त्यातील प्रत्येक नाव एका श्लोकात असे १०८ आणि १०९ व्या श्लोकात याबद्दल माहिती असे या काव्य रचनेचे स्वरूप आहे.
११-२० - स्तोत्र रामायण - प्रथम ते दशम - या दहा रामायणात विष्णु सहस्त्रनाम गुंफलेले आहे. सहस्त्र नावांचे १०० नावांचे १० गट पाडून प्रत्येक रामायणात एका गटातील नावे योजलेली आहेत.


तिसरा गट - विविध वृत्ताधारीत रामायण - 

१) आद्यार्यारामायण. २) आर्यागीति. ३) दोहारामायण. दोहावृत्त. ४) घनाक्षररामायण. घनाक्षरी वृत्त. ५) विबुधप्रियरामायण. विबुधप्रिय (हरिनर्तन) छन्द. ६) सवायारामायण. मदिरा वृत्त. ७) अभंगरामायण. ८) मत्तमयूररामायण. मत्तमयूर वृत्त ९) पंचचामररामायण. पंचचामर वृत्त. १०) पुष्पिताग्रारामायण. पुष्पिताग्रा वृत्त. ११) श्रीप्रियरामायण. वैतालीय वृत्त. १२) रमणीयरामायण. सारंग वृत्त. १३) हररमणीयरामायण. तोटक वृत्त. १४) सुरामायण. भुजंगप्रयात वृत्त. १५) श्रीरामायण. शिखरिणी वृत्त. १६) विचित्ररामायण. जलोद्धतगति वृत्त. १७) सद्भक्तसर्वस्वरामायण. वसंततिलका वृत्त. १८) प्रहर्षिणीरामायण. प्रहर्षिणी वृत्त. १९) श्रीगुरुरामायण. विविध वृत्ते २०) रामायणपंचशती. ५०० साक्या. २१) अनुष्टुप् रामायण. अनुष्टुभ् छंद. २२) कन्यारत्न रामायण. स्रग्धरा वृत्त. २३) कल्याण रामायण. पज्झटिका वृत्त. २४) श्रवणामृत रामायण. नर्कुटक वृत्त. २५) वरद रामायण. प्रमिताक्षरा वृत्त. २६) रामायणकथासुधा रामायण. विद्युन्माला वृत्त २७) दोहासोरठा रामायण. २८) सद्रत्नरामायण. अश्वघाटी अथवा अमृतध्वनि छंद. २९) पृथ्वीरामायण. पृथ्वी वृत्त. ३०) स्रग्विणीरामायण. स्रग्विणी वृत्त. ३१) सद्वित्तरामायण. इंद्रवज्रा, उपेन्द्रवज्रा आणि उपजाति वृत्ते. ३२) रामायणपीयूष. मालिनी वृत्त. ३३) भावरामायण. मन्दाक्रान्ता वृत्त. ३४) सच्छ्राव्यरामायण. हरिणी वृत्त. ३५) एकश्लोकीरामायण. एकच श्लोक जलोद्धतगति वृत्तामध्ये.३६) गदघ्नरामायण. रथोद्धता वृत्त. ३७) सूरारामायण/सुरामायण. सूरावृत्त ३८) सत्स्वरामायण. शार्दूलविक्रीडित वृत्त. ३९) पूतरामायण. (अपूर्ण) शार्दूलविक्रीडित वृत्त ४०) तन्वीरामायण. तन्वी वृत्त. ४१) मंचरामायण. क्रौंचपदा वृत्त. ४२) मंजुरामायण. शुद्धकामदा वृत्त. ४३) दंडकरामायण. दंडक वृत्त. ४४) त्रुटितरामायण. अपूर्ण. अनेक वृत्ते. ४५) साररामायण. अपूर्ण अनेक वृत्ते. ४६) धन्यरामायण. अपूर्ण. प्रत्येक गीतीमध्ये ’धन्य’ हा शब्द कमीअधिक वेळा वापरला आहे.

काही अन्य.

१) सीतारामायण. सीतेच्या मुखातून सांगितलेले रामायण. विविध वृत्ते २) हनुमद्रामायण. हनुमान माता अंजनीला सांगत आहे असे रामायण. गीतिवृत्त. ३) श्रीरामचरितभरितश्रीरामचंद्रप्रार्थना ४) अद्भुत रामायण. ह्या गहाळ झालेल्या रामायणाच्या केवळ चार गीति उपलब्ध आहेत. त्यांमध्ये प्रत्येकीच्या दुसर्‍या चरणामध्ये ’अद्भुत’ ह्या शब्दाचा उपयोग केला आहे.

किती अफाट प्रतिभा, भाषेवरील प्रभुत्व आणि सृजनशीलता ही. इतक्या विविध प्रकारे भाषा लालित्य दर्शवीत एका महाकाव्याचे कथासूत्र केंद्रस्थानी ठेवत ते लोकांपर्यंत नेणे हा केवढा अचाट भगीरथ यत्न आहे. असा यत्न करणारा कवी आणि त्याने ज्या भाषेत हे अफाट कर्तृत्व गाजवले ती भाषा, दोघेही थोर.
दुर्दैवाची गोष्ट ही की आपल्या भाषेच्या, संस्कृतीच्या इतिहासात, अभ्यासात ह्या कशाचाही उल्लेख होताना दिसत नाही. आज संपूर्ण जगात शेक्सपिअर, वर्डस्वर्थ, टाॅलस्टाॅय आणि इतर अनेक परदेशी लेखकांच्या नावाचा डंका वाजत असतो. त्यांच्या महानतेबद्दल शंका नाही. परंतु, त्यांच्या तोडीचे किंवा त्याहीपेक्षा कांकणभर सरस साहित्यिक योगदान असलेल्या कवी / साहित्यिक याबद्दल जागतिक सोडाच पण आपल्या राष्ट्रीय/ स्थानिक/भाषिक पातळीवर देखील अनास्था असावी हा दैवदुर्विलास आहे आणि यात आपले व येणाऱ्या पिढ्यांचे नुकसान आहे.
माध्यमिक किंवा उच्च माध्यमिक शाळेतून कमीत कमी अशा कलाकृती बद्दल काही माहिती असावी आणि महाविद्यालयीन अभ्यासक्रमात साहित्य विषयात तरी ह्याचे अधिक परिशीलन व्हावे. पण दुर्दैवाने हे सर्व काळाच्या ओघात नजरेसमोर येणारच नाही अशा पद्धतीचे शिक्षण आपल्याला देण्यात येते. मुघलांच्या दहा पिढ्यांचा इतिहास शाळेत शिकवला जातो परंतु मराठ्यांचा छत्रपती शिवाजी महाराज ते दुसरा बाजीराव हा इतिहास किंवा छत्रसाल बुंदेला, महाराणा प्रताप ह्यांच्या पूर्वज / वंशजांचे इतिहास आपल्याला माहिती नाहीत.
आजही जगातील सात आश्चर्यात भारतातील ताजमहालच्या नावाचाच उल्लेख होतो. मात्र वेरुळचे कैलास लेणे जे एका अखंड डोंगराच्या माथ्या कडून पायथ्या पर्यंत खोदत नेले गेले, ज्याची निर्मिती १३५ वर्ष चालू होती म्हणजेच कमीत कमी आठ ते दहा पिढ्या जी निर्मिती चालू होती, ते खोदकाम, कोरीव काम, स्थापत्य, बांधकाम ह्याचे तंत्र, कौशल्य, ज्ञान हे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे अचूकपणे दिले गेले त्याबद्दल किती भारतीय राज्यात माहिती आहे ? भारतातील कित्येक मंदिरातील स्थापत्य इतके अलौकिक आहे, त्याच्या निर्मितीमध्ये खगोलशास्त्र, भूगोल, इतक्या परिणाम कारक रित्या वापरले गेले आहे आणि त्या काळात वापरले गेले आहे की जेव्हा समग्र पाश्चात्य विश्व प्रगतीच्या वाटेवर रांगत देखील नव्हते. सोमनाथ च्या मंदिराच्या आवारातील एका विशिष्ट स्थानापासून ते दक्षिण धृव्वापर्यंत जमीन नाही तर फक्त समुद्रच आहे आणि तशा अर्थाचा संस्कृत शिलालेख तिथे आहे. पण आम्ही मात्र गझनीच्या महम्मद ने ते सतरा वेळा लुटले हा पराभूत इतिहासच शिकत आलो. कोल्हापूरच्या अंबाबाईच्या मंदिरातील किरणोत्सव आता कायप्पामुळे सर्वांना माहिती झाला. त्यात शिक्षण पद्धतीचे योगदान शून्य. एका मंदिरात प्रत्येक हिंदू महिन्यासाठी एक असे बारा खांब असून त्या त्या महिन्यात फक्त त्या महिन्याच्या विशिष्ट खांबांवरच सूर्यकिरण पडतात. अशी कित्येक काही ना काही अद्भुत खासियत असलेली मंदिरे आहेत ज्यात शिल्पकला, खगोलशास्त्र, भूगोल, भूस्तरशास्त्र इत्यादींचा संगम घडवून अप्रतिम कलाकृती निर्माण केलेल्या आहेत की ज्यातून सृजनशीलता ओसंडून वाहताना दिसते. (आपल्या खर्डे मध्ये विनीत वर्तक ह्याने भारतातील अशा अद्भुत मंदिरे व त्यातील कला आणि विज्ञान ह्यांचा संगम ह्यावर एक अप्रतिम अभ्यासपूर्ण लेखमाला सादर केली होती).
मात्र, आजची पिढी ह्याबाबत पूर्णपणे अनभिज्ञ आहे आणि त्यांना ह्याबद्दल सांगण्याचा प्रयत्न केला तर उदासीनता समोर येते. त्यामुळे नाउमेद न होता सातत्याने याबद्दल त्यांना माहिती देत रहाणं गरजेचं आहे.
सर्वोच्च न्यायालयातील एक वकील श्री. जे साई दीपक ह्यांच्या एका रील मध्ये ते तृतीय पातळीच्या वसाहत वादाबद्दल बोलतात. ही अशी पातळी की जिथे वसाहतीकरण हे जित राष्ट्राच्या राजकीय आणि सैनिकी वसाहती करणापर्यंत सीमित न रहाता त्यांच्या शिक्षण पद्धती पर्यंत पोचते तिथे त्या जित राष्ट्रातील वर्तमान व भावी पिढ्यांना जेत्यांच्या नजरेतून शिक्षण दिले जाते जेणेकरून आपले ते निम्न दर्जाचे आणि जेत्यांचे ते उच्च अशी मानसिकता तयार केली जाते. त्यामुळे जित समाजाची संस्कृती, शिक्षण, परंपरा, हे सर्व हळूहळू पूर्णपणे अंधारात ढकलले जाते. हे वसाहतीकरण सर्वात धोकादायक आहे कारण त्यात स्वत्व, स्वाभिमान, स्वदेशाभिमान हे पूर्णपणे लयास जाते.
ते स्वत्व, तो स्वाभिमान, तो देशाभिमान जागृत व्हावा, आपली अलौकिक कर्तृत्वशाली व समृद्ध संस्कृती, परंपरा यांच्याबद्दल जन जागृती व्हावी ह्यासाठी कौटुंबिक पातळीवर देखील प्रयत्न आवश्यक आहेत जिथून ते अनुक्रमे स्थानिक शिक्षण, राष्ट्रीय आणि जागतिक पातळीवर पोचवता येईल.
दीपावलीच्या आजच्या शुभदिनी ही आशा करूया आणि आपापल्या कुटुंबात तरी त्या दिशेने प्रयत्न करुया.

---- मनीष मोहिले




















No comments:

Post a Comment