अख्तरी फैजाबादी, उर्फ बेगम अख्तर साहिबा मुंबईत कार्यक्रम करून गाडीने लखनौला निघाल्या होत्या. गाडी मुंबईला फलाटावर उभी होती. गाडी सुटण्याची वेळ जवळ येत होती आणि त्याचवेळी एक तरुण शायर, प्रत्येक डब्यात बेगम साहिबाना शोधत फिरत होता. शोधत शोधत तो बेगम साहिबांच्या डब्या जवळ आला. खिडकीत बसलेल्या त्या गझल सम्राज्ञी ला पाहून त्याच्या जीवात जीव आला आणि गडबडीने त्याने हातातला कागद बेगम साहिबांच्या हातात घाईघाईने दिला आणि गाडी सुटली. बेगम साहिबानी शांतपणे तो घडी करून आपल्या पर्स मध्ये ठेऊन दिला. दुसऱ्या दिवशी गाडी भोपाळच्या आसपास असताना त्यानी आपली पट्टशिष्या असलेल्या शांती देवींकडून तो कागद पर्स मधून काढून घेतला आणि त्या कागदावरील शायरी वाचत, सहजच त्या भैरवीच्या सूरात ते शब्द गुणगुणू लागल्या. थोड्याच वेळात त्यांनी आपली पेटी मागवून ती शायरी सूरबद्ध करायला सुरूवात केली आणि आपल्या सर्व साजिंद्यांसहीत, गाडी लखनौला पोहोचेपर्यंत संपूर्ण गझल तयार केली आणि लखनौच्या आपल्या कार्यक्रमात त्यांनी ती गाऊन पेश सुद्धा केली. त्या अप्रतिम आणि अर्थपूर्ण शब्दांनी सजलेल्या त्या गझलेच्या शेवटच्या कडव्यात शायर चे नाव आले - शकील. हिंदी चित्रपट सृष्टीतील एक प्रथितयश गीतकार म्हणून पुढे प्रसिद्धी पावलेला तोच हा शकील बदायुनी. आणि;
सुप्रसिद्ध गीतकार शकील बदायुनीने लिहिलेल्या आणि बेगम अख्तर साहीबांच्या अद्भुत आवाजात अजरामर झालेल्या त्या गझलेचे शब्द - ए मोहब्बत तेरे अंजाम पे रोना आया !
स्वतः शांती देवींच्या शब्दातला हा अद्भुत किस्सा मी ऐकला तुषार भाटियांच्या तोंडून - ग्रामोफोन क्लबच्या संगीत रजनीमध्ये. कोणाही संगीत प्रेमीच्या अंगावर रोमांच उभे करणारा हा किस्सा. आणि त्यानंतर आपल्या अद्भुत आवाजात डॉ. सुप्रिया जोशींनी ही गझल सादर केली आणि पाठोपाठ सादर केली त्याच चालीवर मदनमोहन ने संगीतबद्ध केलेली आणि लताने गायलेली अगर मुझसे मोहब्बत है, मुझे अपने ये हम दे दो ही अप्रतिम गझल.
दोन अद्भुत काव्यरचना. साधर्म्य असलेले संगीत आणि अलौकिक गायकी. अंगावर रोमांच आणि डोळ्यात अश्रू उभे न राहिले तरच नवल. मात्र कार्यक्रम पुढे सरकत होता तरी माझं मन मात्र त्या ओळींभोवतीच फिरत होतं.
प्रेमाबद्दल अगदी आतून आलेल्या त्या रचना. एकीत असफल प्रेमाबद्दल उरी दाटून आलेले दु:ख तर दुसऱ्यात आपल्या प्रिय व्यक्तीच्या वाटणीची दु:खे स्वतः साठी मागून त्या व्यक्तीला सुखी बघण्याची मनीषा. मात्र दोन्ही ठिकाणी प्रेमाची भावना तितकीच उत्कट. ह्या भावनेत उथळ शारीरिक आकर्षण इत्यादी ला स्थान नाही. तर त्या नात्यातील जिव्हाळा, आपुलकी आणि सर्वात महत्त्वाची म्हणजे स्वैच्छिक बांधिलकी, भावनिक गुंतवणूक ह्या सर्वात महत्त्वाच्या गोष्टी. त्या काव्यात, त्या संगीतात आणि त्या गायकीत ते जाणवतंआणि म्हणूनच आज कित्येक वर्षे लोटून देखील श्रोते अजून ह्या गीतांच्या प्रेमात आहेत.
एकंदरीतच, जुन्या गाण्यांमध्ये, प्रेमाची भावना हळूवारपणे श्रोते वा प्रेक्षकांपर्यंत पोचवणे हा हेतू असायचा. प्रेमाच्या त्या भावनेशी निगडीत शारीर किंवा दृश्य स्पर्श ह्यापेक्षा, भावनिक पातळीवर एकमेकांबद्दल असलेली आपुलकी, जवळीक, जिव्हाळा आणि आकर्षण ह्यावर भर असायचा. प्रेमात अभिप्रेत असलेली शारीरिक जवळीक वा एकरूपता ही त्या भावनिक जवळीकीचा, एकरुपतेचा परिपाक असून ते अध्याहृत ह्या स्वरूपात राहायचं. प्रत्यक्ष समोर यायचं नाही. त्यामुळे गीताचे शब्द, संगीत, स्वरमेळ, वाद्यवृंद, गायकी ह्यांचा बाज देखील हळूवार, सुखदायी असायचा. चित्रपटात देखील गीताचं चित्रीकरण त्याप्रमाणे शालीन, सूचक असं असायचं. तो दृक् श्राव्य अनुभव कधीही भडक, अतीस्पष्ट नसायचा. काही बाबी प्रेक्षकांच्या कल्पनाशक्ती वर सोडलेल्या असायच्या. त्यामुळे ती भावनिक एकरूपता अधिक महत्त्वाची ठरायची. जशी हाताळणी प्रेमातील साफल्याची तशीच वैफल्याची देखील - हळूवार. निराशा, दु:ख हे त्या व्यक्तीरेखेपुरते मर्यादीत. उगीच आक्रस्ताळे पणा नाही. भडक प्रदर्शन नाही.
परंतु आजकालच्या एकंदरीत परिस्थितीचा, वृत्ती आणि दृष्टीकोनाचा विचार करता वाटतं की प्रेमासारख्या मूलभूत भावनेत सुद्धा आता उपयुक्ततावाद, वैयक्तिक स्वातंत्र्याच्या अतिरेकी कल्पना आणि त्यास दिले जाणारे अवास्तव महत्त्व ह्या गोष्टींची भेसळ झाली आहे आणि होत आहे. तरल भावनिक एकरूपता, जवळीक, आपुलकी, जिव्हाळा आणि आकर्षण ह्याचा परिपाक म्हणून होणारी शारीर एकरूपता हा प्रवास उलटी कडून म्हणजे शारीरिक एकरुपते कडून सुरू होतोय आणि बरेचदा तिथेच संपतोय. चित्रपट हा समाज मनाचा आरसा आहे असं मानलं जातं. स्वाभाविकरित्या, चित्रपटातील गीताचं संगीत आणि चित्रीकरण ह्यात देखील ह्या बदलत्या समाज मनाचं प्रतिबिंब उमटतं आहे. गाणी भडक, उथळ होत चालली आहेत. संगीत सुद्धा तात्पुरतं लक्ष वेधून घेणारं बनत आहे. जुनी गाणी जशी कालौघात टिकून राहिली, अजूनही जी कानी पडली की जी आपोआप शब्दांसकट आठवतात, चाली आपोआप गुणगुणल्या जातात, तसं नवीन गाण्यांच्या बाबतीत होत नाही. शब्द तर सगळ्यात कमी महत्त्वाचे असल्यासारखे बाजूला फेकले गेलेले. सगळी नाती तात्पुरती, तेव्हढ्या पुरती हवी. जे वास्तव जीवनात, तेच प्रतिबिंबित होतं गाण्यात, संगीतात. तात्पुरती लोकप्रिय होणारी पण लगेच विस्मरणात जाणारी गाणी. संगीत तसेच. बदलत्या मूल्य व्यवस्थेचं जाणवणारे रूप.
ह्याचाच परिपाक म्हणून ग्रामोफोन क्लबच्या संगीत रजनीला असणारा बहुतांश श्रोतृवर्ग हा पन्नाशीच्या पुढचा असतो. तरुणाई जवळपास नसतेच म्हटलं तर वावगं ठरू नये. थोडक्यात जुन्या मूल्यव्यवस्थेशी जवळीक सांगणारं संगीत आणि गीतं, यांच्यावरील प्रेम हा पन्नाशी पुढच्या वयाचा श्रोता जिवंत आहे तोपर्यंतच अस्तित्वात असेल. नंतर मग क्षणभंगुर उपयुक्ततावाद, अतिरिक्त व्यक्तिस्वातंत्र्यवाद , भोगवाद ह्यांचं प्रतिबिंब असलेलं संगीत. आवड बदलू शकते, मान्य. परंतु मूल्य इतकी आमूलाग्र बदलावीत हे समजणं कठीण.
आणि म्हणून मग माझ्या सारख्या रसिकाला वाटत राहतं की जे संगीत अजरामर आहे असं वाटून आपण त्या संगीतावर, गीतांवर प्रेम केलं, मोहब्बत केली, त्या गीत संगीताचा, त्यातून व्यक्त होणाऱ्या तरल भाव भावनांचा देखील हाच शेवट का ? हाच अंजाम ? आमच्या पिढीच्या मनात घर केलेल्या भावनिक एकरूपतेला महत्त्व देणाऱ्या प्रेमाचा, मोहब्बत चा हाच अंजाम? त्या जुन्या संगीतावरच्या मोहब्बतचा सुद्धा हाच अंजाम ?
ऐ मोहब्बत तेरे अंजाम पे रोना आया, हे अशा अर्थी खरं ठरू नये.
मनीष मोहिले
No comments:
Post a Comment