Tuesday, December 14, 2021

निम्स पुर्जा - प्रोजेक्ट पॉसिबल

 

निर्मल निम्स पुर्जा - जवळपास अशक्य भासणारी कामगिरी, स्वतः:ची ईच्छाशक्ती आणि आत्मविश्वासाच्या जोरावर सहजसाध्य करून दाखवणारा एक आगळा किमयागार.

जगात आठ हजार मीटर पेक्षा अधिक ऊंचीची एकूण चौदा शिखरे आहेत. एव्हरेस्ट, K2 (पाकिस्तान), कांचनजुंगा, ल्हाहोत्से, मकालू, चो ओयू, धौलागिरि, मनास्लू, नंगा पर्वत (पाकिस्तान),  अन्नपूर्णा,  गॅशरब्रम १ (पाकिस्तान चीन सीमेवर), ब्रॉड पिक (पाकिस्तान), गॅशरब्रम २ (पाकिस्तान)आणि शिष पांगमा (तिबेट) - बाकी सर्व नेपाळ मध्ये -  १४ ची १४ हिमालयात आहेत. 

जागतिक पातळीवर गिर्यारोहणाच्या क्षेत्रातील बाप मानला जाणारा राईन हाल्ड मेसनर हा पहिला गिर्यारोहक ज्याने सर्व चौदाच्या चौदा एट थाऊजंडर्स यशस्वीरित्या पादाक्रांत केली. ही विक्रमी कामगिरी करायला त्याने सोळा वर्ष घेतली. साऊथ कोरियाच्या किम चांग हो ने सात वर्ष १०महिन्यात हा पराक्रम केला. 

पण निर्मल निम्स पुर्जा ह्या नेपाळी वंशाच्या, इंग्लंड मध्ये स्थायिक असलेल्या अफाट माणसाने फक्त सात महिन्यात हा भीमपराक्रम करून दाखवत गिर्यारोहण क्षेत्रातील अनेक नवे विश्व विक्रम प्रस्थापित केले. त्याच्या अद्भुत यशाची गाथा सांगणारा वृत्तपट - 14 Peaks - Nothing is Impossible.


हा भीमपराक्रम करताना निर्मल ने जे विश्व विक्रम प्रस्थापित केले त्यातील काही ठळक विक्रम असे -

* सर्व ८००० मीटर पेक्षा अधिक ऊंचीची शिखरे सर्वात जलद (कमीत कमी वेळात) पादाक्रांत करणे (सहा महिने सहा दिवस)
* सागरमाथा उर्फ एव्हरेस्ट, ल्हाहोत्से व मकालू ही तीन शिखरे ४८ तासांच्या कालावधीत सर करणे
* गिर्यारोहणाच्या उन्हाळी सत्रात सहा एट थाऊजंडर्स सर करणे
* १९८७ नंतर हिवाळी सत्रात K2 यशस्वीरित्या सर करणे

निर्मल पुर्जाने हायब्रीड पद्धतीने (८००० मीटर ऊंची पर्यंत विना ऑक्सिजन आणि त्यावरच्या डेथ झोन मध्ये Bottled Oxygen वापरून ही अशक्यप्राय मोहीम शक्य आणि यशस्वी करून दाखवली. अर्थात ह्या बाबतीत देखील काहींच्या मते, त्याने अल्पाईन पद्धतीने चढाई न करता (पूर्णपणे ऑक्सिजन शिवाय) ही मोहीम केली असल्याने हे खरे विक्रम नव्हेत असे प्रवाद निर्माण झाले. 

पण फक्त डेथ झोन मध्ये च bottled oxygen वापरून, केवळ सहा महिने सहा दिवसात सर्व १४ शिखरे सर करणे हे भगीरथ प्रयत्न च आहेत. किंबहुना, अशक्यप्राय अशा काल मर्यादेचे जे आव्हान निर्मलने स्वतः समोर ठेवले होते ते अशा हायब्रीड पद्धतीच्या चढाई तंत्राशिवाय पेलणे शक्यच नव्हते. खुद्द राईन हाल्ड मेसनरनेच ह्या मुद्द्याला पाठींबा दिलाय म्हटल्यावर अजून काय हवं ?

सहा महिने सहा दिवस चाललेल्या या अद्भुत मोहीमेच्या आधीची निर्मल ची तयारी, हा प्रवास सुरू करण्या आधी आणि तो चालू असताना निर्मल समोर उभी ठाकलेली नैसर्गिक तशीच भावनिक आव्हाने आणि त्याने त्यावर मात करत संपादलेले अभूतपूर्व यश या सर्वाची अद्भुतरम्य कहाणी 14 Peaks या वृत्त पटातून आपल्यासमोर येते. निर्मल ने स्वतः निर्माता व छायाचित्र निर्देशक अशी दुहेरी भूमिका ह्या वृत्त पटात निभावत आपली कहाणी जगासमोर योग्य पद्धतीने यावी ही काळजी घेत एक सुरेख वृत्त पट दिला आहे. एक आवर्जून बघायलाच हवा असा वृत्तपट.


मात्र मला स्वतःला भावलेल्या आणि भिडलेल्या गोष्टी म्हणजे हा प्रकल्प राबवताना ज्या अजोड चारित्र्याचे दर्शन निर्मल आणि त्याच्या टीमने दाखवले तो भाग आणि ज्या हेतू ने निर्मल ने हे शिवधनुष्य ऊचलण्याचे ठरवले तो हेतू आणि सहा महिने सहा दिवसांच्या ह्या अद्भुत प्रवासाची यशस्वी सांगता करताना तो त्या हेतू शी कसा प्रामाणिक राहिला हा भाग.


मोहिमेच्या पहिल्या शिखरावरील अन्नपूर्णा वरील यशस्वी चढाई करून बेस कॅम्पला परतल्यावर दुसऱ्याच दिवशी सकाळी निर्मल आणि त्याची टीम दुसऱ्या एका टीमच्या वर अडकून पडलेल्या गिर्यारोहक सदस्याच्या सुटकेसाठी परत वर गेले आणि त्याला सुखरूप खाली घेऊन आले.
एका झटक्यात बेस कॅम्प ते समिट असा छाती दडपून टाकणारा यशस्वी प्रयत्न करत कांचनजुंगा पादाक्रांत करून निर्मल व त्याची टीम खाली येत होती तेव्हा, ऑक्सिजन संपल्यामुळे वर अडकून पडलेल्या एका गिर्यारोहकाला त्यांनी आपल्याकडच्या ऑक्सिजन चा पुरवठा करत जगवण्याचा प्रयत्न केला. मात्र खालच्या कॅम्प वरून कोणीही मदतीस न आल्यामुळे / न येऊ शकल्यामुळे निर्मल च्या समोर तो गिर्यारोहक मृत्यू पावला. 

रणांगण असो किंवा पर्वत - कोणालाही मागे सोडून पुढे यायचे नाही हा बाणा असलेल्या निर्मल ला ह्यामुळे अतोनात दु:ख झाले. स्वतः जवळपास अकरा तास बिना ऑक्सिजन राहिल्यामुळे त्याला स्वतःला HACE - High Altitude Cerebral Edema चा त्रास सुरू झाला आणि तरी तशा परिस्थितीत, HACE चाच त्रास होत असलेल्या दुसऱ्या गिर्यारोहकाला मदत करत तो खाली घेऊन आला आणि एक गिर्यारोहक मदती विना मरण पावला ह्या बोचऱ्या जाणीवेतून तो अंशत: स्वतः ला समजावू शकला कदाचित.


K2 सर करताना निर्मल आणि त्याच्या टीम ने बेस कॅम्प वर निराश होऊन बसलेल्या इतर गिर्यारोहकांचं मनोधर्यच फक्त ऊंचावलं असं नाही तर त्यांच्या टीम ने फिक्स केलेल्या रोप्स मुळे पुढील दोन दिवसात 24 गिर्यारोहकांना हिवाळी सत्रात K2 पादाक्रांत केल्याचा गौरवास्पद विजय मिळाला.


मानवता, संघटन, संघसदस्यांची  काळजी ह्या गोष्टी विक्रमापेक्षा मोठ्या आहेत हे या घटनांमधून निर्मल ने न बोलता स्वतःच्या कृतीमधून दाखवून दिले.


निर्मल ने जेव्हा सात महिन्यात हा भीमपराक्रम करण्याचे नक्की केले तेव्हा जवळपास सर्वांनी त्याला वेड्यात काढण्याचे बाकी ठेवले. सगळीकडून एकच सूर होता - हे अशक्य आहे. म्हणूनच मानवी क्षमता, जिद्द आणि ईच्छाशक्ती ह्यावर आणि स्वतःवर जबर विश्वास असलेल्या निर्मल ने प्रकल्पाचे नावच ठेवले प्रोजेक्ट पॉसिबल.
ही जिद्द, चिवटपणा, ईच्छाशक्ती ह्याच्या सहाय्याने त्याने नैसर्गिक तसेच गिर्यारोहण परवाने मिळण्यात येणाऱ्या प्रशासकीय अडचणी, आर्थिक बाजू, चढाई चालू असतानाचे आईचे आजारपण या सर्व अडचणींचा देखील यशस्वी सामना करत सर्व पातळ्यांवर मानवी क्षमता किती अफाट असू शकते हे सिद्ध केले.


दुसरा आणि महत्त्वाचा हेतू. अगदी एडमंड हिलरी पासून आजपर्यंत सर्व यशस्वी अयशस्वी गिर्यारोहण मोहिमातून अत्यंत महत्त्वपूर्ण जबाबदारी निभावणाऱ्या आणि योगदान देणाऱ्या शेर्पा मंडळींची निव्वळ शेर्पा म्हणून जगापुढे येणारी ओळख बदलणे. प्रत्येक शेर्पा ला स्वतः चे नाव आहे, एक व्यक्तिविशिष्ट ओळख आहे. तो त्या नावानिशी जगापुढे यायला हवा. 

निर्मलच्या मते नेपाळी गिर्यारोहक हे जगातील सर्वश्रेष्ठ गिर्यारोहकांपैकी असून जगाला व त्यांना स्वतःला ही ओळख करून देणे आवश्यक आहे. म्हणूनच त्याच्या टीम मधील सर्व  गिर्यारोहक सदस्य - मिंग्मा डेव्हीड शेर्पा, गेलजेन शेर्पा, गेसलन तमांग, लाकपा देंडी, तेनसी कसांग हे नेपाळी शेर्पा होते. प्रोजेक्ट पॉसिबल यशस्वी झाल्यावर ह्या टीममधील नेपाळी गिर्यारोहकांपासून इतर नेपाळी गिर्यारोहक सुद्धा स्फूर्ती घेतील आणि स्वतःचे आयुष्य बदलू शकतील हा तो दुसरा हेतू. 

निर्मल चा १० तास १५ मिनिटात एव्हरेस्ट आणि ल्हाहोत्से सर करण्याचा विक्रम मिंगमा दोरची शेर्पा ने सहा तास एक मिनिटांच्या नवीन विश्व विक्रमी वेळात ही दोन शिखरे सर करून मोडीत काढत नवीन विक्रम प्रस्थापित केला. तसेच दहा वर्षांपूर्वी एव्हरेस्ट सर करून जवळपास निम्सच्या पुढे मागे सर्व चौदा शिखरे पादाक्रांत करणारा मींगमा ज्ञाबू शेर्पा सर्वात लहान वयात सर्व चौदा शिखरे सर करणारा गिर्यारोहक बनला ही दोन्ही उदाहरणे बदलत्या परिस्थितीचा द्योतक आहेत. आज निम्सच्या नावाने गूगल सर्च करताना ही नावे सुद्धा पुढे येतात ही एक प्रकारे प्रोजेक्ट पॉसिबलच्या हेतूची यशस्वी पूर्तता म्हणायला हवी.


मानवी क्षमतेवर प्रचंड विश्वास असलेल्या निर्मल निम्स पूर्जाच्या अफाट कर्तृत्वाला सादर नमन.

-- मनिष मोहिले.





Wednesday, July 14, 2021

अहमदाबादची वृक्षसृष्टी - २

आज दिनांक १३ जुलै २०२१. आज सकाळी ऑफीसला जाताना नेहमीप्रमाणे रेडीओवर ध्वनितचा कार्यक्रम ऐकत होतो. पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे त्याचा वार्षिक ट्री इडियट चा सहावा मौसम सुरू झाला आहे. त्याच संदर्भात रिझवान कादरी ह्या इतिहासकारांची मुलाखत सुरू होती ज्यात ते अहमदाबादच्या वृक्षसृष्टीच्या इतिहासाबद्दल बोलत होते. नवताड समोशांसाठी प्रसिद्ध असलेल्या नवताड ह्या भागात एकेकाळी नऊ ताडाची झाडे होती. इतकंच नाही तर काही संत्र्यांची झाडं देखील होती हे ऐकून मी अचंबित झालो.

दुर्दैवाने वेळेच्या अभावी पूर्ण मुलाखत ऐकू शकलो नाही पण  Instagram वरच्या ट्रीज ऑफ अहमदाबादची पुन्हा एकदा आठवण झाली. संध्याकाळी घरी आल्यावर ट्रीज ऑफ अहमदाबादच्या इन्स्टा पेजला भेट दिली -- नवीन पोस्ट बघायला. 

थलतेजचा अमृतालाल 

थलतेज विभागातील श्री. मिस्त्री ह्यांच्या बंगल्याच्या आवारात जवळपास पन्नास वर्ष जुने एक कडुनिंबाचे झाड आहे. जणू मिस्त्री कुटुंबातील एक सदस्यच. त्याचं नाव आहे अमृतलाल. 

१९७८ साली जेव्हा बंगला बांधायला घेतला तेव्हा जे रोपटे लावले त्याचा आज विशाल असा वृक्ष झाला आहे ज्याच्या खोडाचा घेर आहे २.७५ मीटर आणि पर्णसंभाराचा व्यास साधारण २० मीटर. घरातल्या नातवंडांसाठी ते अमृतलाल अंकल आहेत. ह्या विशाल वृक्षाच्या आशीर्वादाने बहरलेली स्वत:ची अशी एक परिस्थितीकी आहे. बंगल्याबाहेरचे डांबरी रस्ते, आजूबाजूची वाढती वस्ती ह्यामुळे अमृतलाल ची मुळे बरेचदा वर येतात. त्याच्या सावलीत इतर कुठलंही झाड वाढू शकत नाही. त्याच्या फांद्या बरेचदा मोडून खाली पडतात. पण तरीही त्याचा एक रुबाब आहे. एक मान आहे. आपुलकी आहे. त्याच्या सावलीत जगणारी पक्षी, प्राणी ह्यांची एक छोटी परिस्थितीकी आहे. जणू एखाद्या कुटुंबवत्सल गृहस्थाचे कुटुंब असावे तशी.  ह्या झाडाचे फोटोज् बघितले की आपल्या घरातही असा एखादा वडीलाधारा वृक्ष असावा असं वाटतं. 




मोटेरा स्टेडियम रोडचा वड - 

अहमदाबादमधील एक अजून मोठ्ठा वृक्ष. Trees of Ahmedabad ची स्वयंसेवक मंडळी अहमदाबादच्या वृक्षासृष्टीचा जो नकाशा बनावताहेत त्यात वेगवेगळ्या प्रकारचे नकाशे ह्या अंतर्गत वर्गीकरण करण्याचा प्रयत्न देखील ते करत आहेत. उदा. आपल्या प्रजातीची कमाल उंची गाठलेली झाडे, पक्ष्यांच्या घरट्यावर आधारीत, सर्वात जुनी झाडे इत्यादी. ह्यातील सर्वात जुने वृक्ष ह्या वर्गात त्यांनी विशेष उल्लेख केला आहे मोटेरा स्टेडियम रोडवरील वडाचा. ८.७५ मीटर घेराच्या ह्या विशाल वटवृक्षाचा पर्णसंभार आहे २७.९ मीटरचा. त्या विस्तारात रहाणारी काही मंडळी ह्या वडाला देवस्थानी मानतात. हे झाड कोणी कापण्याचा प्रयत्न करत नाही ह्याबद्दल सर्वच जागरूक असतात. इतके की ही स्वयंसेवक टोळी झाडाची मापे घेत असताना सर्वाँना प्रथम हे झाड तोडण्याचा कार्यक्रम योजून मापे घेतआहेत का अशी शंका येऊन त्यांना अटकाव सुद्धा झाला. अजूनही विशेष झाडांबद्दल तरी जनतेला आपुलकी आहे हे त्यातल्या त्यात बरं आहे.






रेडीओवर मुलाखतीत ऐकलेला अहमदाबादच्या वृक्षसृष्टीचा इतिहास ह्या विषयाची ह्या गटाच्या कामाशी संगती लावण्याचा प्रयत्न करत असता माझ्या लक्षात आलं की ही मंडळी तर सद्यपरिस्थितीमधील वृक्षसृष्टीचे नकाशेच नाही तर पुरावे तयार करताहेत - भविष्यात हे आजचे नकाशे इतिहासाचे पुरावे बनतील. बरं, ही उत्साही तरुण मंडळी फक्त नोंद करून इतिकर्तव्यता मानत आहेत असं नाही. ते सक्रिय योगदान सुद्धा देऊन इतिहास बनवत आहेत. एखाद्या विभागातील माती, हवामान यानुसार जी स्थानिक झाडे आहेत त्यांची लागवड व जतन करून अहमदाबादची वृक्षसंपदा वाढवण्याबरोबरच पर्यावरणास जपत आहेत.


-- मनिष मोहिले.







Sunday, July 11, 2021

छंद नवे.


*छायासृजन - Shadowlogy*

लहान असताना दिवे गेल्यावर मेणबत्त्यांच्या प्रकाशात भिंतीवरती बोटांच्या हालचाली करुन हरीण किंवा ससा बनवायचा खेळ आपण बहुतेक सगळे जण खेळलो असू. लहानपणी ज्या गोष्टीची गंमत वाटायची, पुढे आयुष्याच्या रोजच्या रहाटगाडग्यात ती

गंमत आणि तो खेळ कुठल्याकुठे हरवूनही गेले असं म्हणायला हरकत नाही. जास्तीत जास्त मुलं लहान असताना त्यांना दिवे गेले असताना manage करायला एक विकल्प म्हणून भिंतीवर सावल्यातून आकार बनवले असतील तेव्हढीच ऐक पुनर्भेट. त्यातही आजकाल कुमारावस्थेत असलेल्या पिढीला आपल्या लहानपणी दाखवलेली ही गंमत आठवतही नसेल. म्हणजे पुढच्या पिढीकडे हा खेळ जाण्याची शक्यता खूपच कमी.


अशा काळात एका व्यक्तीने दररोज कमीत कमी एक कलाकृती बनवीन असा संकल्प करत २०१६ पासून ते आत्तापर्यंत दैन्ंदिन आयुष्यातील वस्तूंच्या सावल्या व त्याभोवती रेखाटलेली रेखाचित्रे ह्यातून हजारो कलाकृती बनवल्या आहेत. रोज एक हा त्याचा संकल्प अजूनही अबाधित आहे. ह्या कलाकाराचं नाव आहे व्हिन्सेन्ट बाल आणि त्याच्या ह्या अनोख्या छंदाचं नाव आहे Shadowlogy अर्थात छायासृजन.


व्हिन्सेन्ट बाल हा एक बेल्जियन चित्रपट दिग्दर्शक आहे जो त्याच्या The Zigzag Kid, Tour de France, The Bloody Olive इ. चित्रपटांसाठी नावजला गेलेला आहे. आपल्या एका कधीच ना बनलेल्या चित्रपटाबद्दल विचार करत बसलेला असताना चहाच्या कपाच्या सावलीत हत्तीचा आभास त्याला झाला आणि तिथून

 छायासृजनाच्या त्याच्या अनोख्या प्रवासाला सुरूवात झाली. त्यावर त्याने Shadowlogy नावाचं पुस्तकदेखील लिहीलं.


ह्या व्हिन्सेन्ट बालच्या मुलाखतीची एक तीन साडेतीन मिनीटांची चित्रफीत नुकतीच माझ्या पहाण्यात आली. त्यात तो म्हणतो की छायासृजन करताना पूर्वग्रह वा पूर्वकल्पना मनात न ठेवता विचार करणे खूप गरजेचे आहे. सुरुवातीला नवीन कल्पना सुचायला अडचण येत नाही. पण काही काळानंतर पुनरावृत्ती होणार नाही ह्याकडे लक्ष द्यावं लागतं. शिवाय नैसर्गिक प्रकाश वापरुन छायासृजन करताना, 

प्रकाशाचा कोन आणि त्यामुळे निर्माण होणारी सावली हे स्थल काल सापेक्ष असल्यामुळे, त्या विशिष्ट जागी, एका विवक्षित वेळेवर अगदी छोट्या कालावधीत निर्माण झालेली छाया आणि हाताशी असलेली सामग्री ह्यान्चा विचार करून पटकन एखादी रेखाकृती वा कलाकृती बनवणे हा सृजनात्मक दृष्ट्या आव्हानात्मक भाग आहे. अर्थात ह्यावर उत्तर हे आहे की अंधार करून वीजेच्या दिव्याचा वापर करणे. ह्यात तो वस्तू ठेवायची जागा, पद्धत व् वीजेच्या दिव्याचा कोन ह्यात फेरफार करुन रेखाचित्रे निर्माण करतो. ह्यामागील भूमिती वा शास्त्र ह्यान्चा विचार करुन व्हिन्सेन्टने ह्या छन्दाला नाव दिले Shadowlogy. छायासृजन हे पर्यायी मराठी नाव हे मला सुचलेले नाव आहे ज्यात ह्या छन्दातील सृजनशीलतेवर भर आहे. 

अर्थात त्यातही व्हिन्सेन्ट म्हणतो त्याप्रमाणे एखादा दिवस खूप छान असतो कारण कित्येक रेखाचित्रे बनतात तर कित्येकदा तासचे तास घालवून सुद्धा एकही कलाकृती निर्माण करता येत नाही.

एक अजून महत्वाची गोष्ट म्हणजे निवडलेली वस्तू आणि तिच्या सावलीतून निर्माण केलेली रेखाचित्रे ही सर्वस्वी भिन्न असतात - कारण त्या रेखाचित्राची जन्मदात्री ही  कलाकाराची सृजनशील विचारक्रिया असतें. 


एक वेगळा छंद ज्यातून निखळ समाधान व आनंद मिळू शकतो.


https://youth.be/JX-1D663QtA


*सूर्यचित्रकला - Heliography


लहान असताना खेळलेला दुसरा खेळ म्हणजे भिंगातून कागदावर एककेन्द्रीत केलेले किरण पाडत कागद जाळणे वा त्याला भोक पाडणे. पण हेच तन्त्र वापरत मोठेमोठी चित्रे बनवता येतात आणि ह्या कलेचे नाव आहे सूर्यचित्रण / सूर्यलेखन - Heliography.


छायासृजनाशी बऱ्यापैकी विरोधाभासी असणारा हा दुसरा छंद - सूर्यचित्रकला वा सूर्यलेखन. विरोधाभासी अशा अर्थाने की ह्यात सावलीऐवजी भिंग / पत्रा / वीजेच्या दिवा ह्यावर पडणारे सूर्यकिरण एककेन्द्रीत करून canvas वर पाडून, त्या ठिकाणचा canvas जाळत चित्रनिर्मिती करायची ह्यात छायेऐवजी एककेन्द्रीत प्रकाशकिरणान्चा वापर आहे, ऐनवेळी चित्राचा विचार करण्याऐवजी, सम्पूर्ण चित्र मनात तपशीलासहीत तयार हवं आणि प्रत्येक चित्रनिर्मितीमागे पुष्कळ अधिक वेळ लागणे. 


फेसबुकवर एका कलाकाराला अशा पद्धतीने सूर्यचित्रे बनवतानाचा व्हीडीओ पाहून मी अवाक झालो. Canvas वर उतरणारी टी सर्व चित्रे, सर्व तपशील आणि canvas ची परिमाणे ह्यान्च्या संदर्भात त्याच्या मनात किती स्पष्ट रेखाटलेली आहेत हे बघून अचन्बित व्ह्यायला होते. 


छायासृजनाच्या तुलनेत सूर्यचित्रण / सूर्यलेखन हा फक्त छंद राहात नसून व्यावसायिक कला देखील असू शकते. हेलीओग्राफी ह्या नावावर गूगल सर्च केल्यावर Niceopher Niepce च्या नावाने एक सम्पूर्ण नवे दालन आपल्यापुढे खुले होते.


https://www.facebook.com/amazing.w1/videos/695632337497667/?sfnsn=wiwspwa


छंद आपल्याला सर्वांनां असतात. मात्र, त्यातील वेगळेपणामुळे उठून दिसणारे आणि माझ्या साठी नवीन असलेले हे दोन - 


छायासृजन व सूर्हचित्रण / सूर्यलेखन.


---- मनिष मोहिले








Saturday, April 3, 2021

अरे अरे ज्ञाना झालासी पावन

लहानपणीच्या माझ्या आठवणीं मधील एक आठवण म्हणजे शाळेसाठी सकाळी लवकर उठायचो तेव्हा आकाशवाणीवर ऐकू येणारी अभंगवाणी - सकाळी सहा सव्वासहाला कानावर पडणारे ते सूर - बहुतांशी लताच्या दिव्य आवाजातले. ज्ञानेश्वर, तुकाराम ह्यांच्या भक्तीरसाने ओथंबलेल्या अभंगांना लताच्या दैवी आवाजात ऐकताना तेव्हासुद्धा अंगावर नकळत रोमांच उभे रहायचे. नक्की का ते तेव्हा कळायचं नाही. मात्र जाणवायचं की हे जे शब्द आणि सूर एकत्र हातात हात गुंफून येताहेत् भेटीला ते काहीतरी अद्भुत् अन् दिव्य आहे. आज त्या ध्वनीपरिणामाच्या पलीकडे जाऊन अभंगाचं अन्तस्थ सौंदर्य जाणवतं आणि जाणवते एक अनामिक साद - ईशतत्वाच्या जवळ बोलावून नेणारी. त्या सूरांच्या माध्यमातून शब्दां मध्ये असलेलं "ऐश्वर्य" आपल्यापर्यन्त पोहोचवणारी.

अशा काही अप्रतिम अभंगांपैकी एक - अरे अरे ज्ञाना झालासी पावन. माऊलींच्या अनेक अप्रतिम रचनांपैकी एक अत्युत्तम अभंगरचना.

संपूर्ण विश्वासाठी पसायदान मागणाऱ्या माऊली जेव्हा आत्मज्ञान प्राप्त झालेल्या  त्या क्षणाबद्दल लिहीतात तेव्हा किती सहज शब्दात स्वत:ला त्रयस्थाच्या नजरेतून बघतात आणि म्हणतात

*अरे अरे ज्ञाना झालासी पावन
तुझे तुज ध्यान कळो आले !!१!!
तुझा तूची देव तुझा तूची भाव
मिटला संदेह अन्यतत्वी !!२!!*

आध्यात्मिक शिक्षणातील सर्वोच्च पदवी प्राप्त करून घेताना स्वत:ला सहज एखाद्या बिगरीतील विद्यार्थ्याप्रमाणे ज्ञाना म्हणून सन्बोधत त्रयस्थ बनून तो क्षण अवलोकायचा हे अवतारी व्यक्तीलाच शक्य आहे.
हे असं स्वतःमधून स्वतःला बाजूला करून बघायचं आणि मिळालेल्या आत्मज्ञानाची
जाणीव करुन द्यायची की तुला तुझी स्वत:ची ओळख पटली ना आता ! आजपर्यंत तू जगभर शोधत राहिलास त्या परमात्म्याला - मूर्तीत,तसबीरीत. पण तो तर तूच आहेस. अरे तूच तुझा देव आहेस ज्याची तू भक्तीभावाने आराधना करत होतास. तो देवही तूच आहेस आणि त्याला तुझ्या जाणीवेत, चित्तात, आत्म्यात प्रकट व्हायला लावणारा तो भाव - तोदेखील तूच. तुझं ईशतत्वाबरोबरचं हे जे अद्वैत तुला आता आकळलं आहे नं; त्यामुळे तुझंअस्तित्व पावन झालं आहे. ह्या चार ओळीं मधून माऊली, नावापुरताही अहंं न ठेवता, अहं ब्रह्मास्मि ची जाणीव,  तत्वमसिच्या मार्गाने किती सुरेख पद्धतीने करून देतात.

*मुरडूनिया मन उपजलासे चित्ते
कोठे तुज रिते न दिसें रया !!३!!*

विविध विषयांच्या अधीन असलेल्या चंचल मनाला मुरड घालून हे ब्रह्मतत्व जेव्हा तिथे प्रगट होते तेव्हा अशी एकही जागा रहात नाही मनात की जी त्या परमतत्वावाचून रिकामी / रिती राहिली असेल. त्या ब्रह्मतत्वाची मनाशी अशी एकरुपता होते की एरवी सतत वेगवेगळय़ा विषयांकडे धावणारे मन, ब्रह्मतत्व द्रुगोच्चर झाल्यावर पूर्णपणे त्या परमतत्वातच मिसळून जाते. जणू मनात एकही जागा, कोनाडा, कोपरा असा रहात नाही जिथे ब्रह्मतत्वाशिवाय इतर कुठल्या विचार, ईच्छा, वासना, कामना ह्यांना थारा असेल. आजच्या तारखेला देखील जे अध्यात्ममार्गावर, ईश्वराबरोबरची आत्म्याची अद्वैत अवस्था जाणून व प्राप्त करुन स्थिर आहेत, अशा जनांच्या बोलण्यात वा लेखनात नीलबिंदूच्या अनुभवाचा व त्या अनुभवाशी निगडीत असीम अवर्णनीय आनंदाचा उल्लेख येतो तो ऐकताना वा वाचताना देखील आपण अन्तर्बाह्य थरारून जातो. जे चराचरात भरून आहे अशा ईशतत्वानी मन, चित्त पूर्ण भरून आणि ारून जाण व अस्तित्व पावन होणं हे स्वाभाविकच आहे.

*दीपकी दीपक मावळल्या ज्योती
घरभर वाती शून्य झाल्या !!४!!*

ज्ञानाचा दीपक अज्ञानाचा अंधार दूर करतो. मनुष्याच्या आयुष्यात पाच ज्ञानेंद्रिये जाणीव करून देतात आणि बुद्धी त्या जाणीवरुपी माहितीतून ज्ञान मिळवते. पंचेंद्रिये ह्या वाती, बुद्धीचे इंधन आणि त्यातून ऊजळणारा ज्ञानाचा दिवा जो अज्ञानाचा अंधार दूर करतो. पण माणसाचं मन हे ह्या सर्वांपेक्षा अधिक शक्तीशाली व कुशल असते; आणि जेव्हा ते मन आत्माज्ञानाने आतून उजळून निघते तेव्हा ज्ञानेंद्रियांची व किंबहुना बुद्धीचीही गरज रहात नाही. मनरुपी दीपकच अखंड प्रकाशाचा स्त्रोत बनून उजळत रहातो. जेव्हा संपूर्ण दीपकच स्वयंप्रकाशी बनतो तेव्हा ज्ञानेंद्रियांच्या वाती वा बुद्धीचे इंधन ह्याची गरज उरत नाही. ह्यात पंचेंद्रिये वा बुद्धी ह्यांचे महत्व कमी होत नसून मनाच्या मूळच्या व परमतत्वाबरोबर एकरुप होऊन जे प्राप्त होते त्या सामर्थ्याचे महत्व प्रतिपादित करण्याचा उद्देश आहे. असा हा मनरुपी दीपक स्वयंप्रकाशित होतो तेव्हा ज्यात त्या मनाचा निवास असतो ते अस्तित्व पावन होते.

*वृत्तीची निवृत्ती आपणांसकट
अवघेची वैकुंठ चतुर्भुज !!५!!*

आता जीव हाच शिव झाला. दुजाभाव म्हणून उरला नाही. मग जेव्हा अस्तित्वच एक झाले तेव्हा वेगळी वृत्ती कुठून शिल्लक रहाणार ? त्या वृत्तीची सहजनिवृत्ती होणे स्वाभाविकच आहे. अशी जेव्हा जीवा शिवाची एकात्मता होऊन वृत्तीची निवृत्ती होते तेव्हा त्या वैकुंठाच्या राणाशी हे क्षुद्र अस्तित्व जणू चतुर्भुज होते. हे मीलन युगानुयुगांचेच नाही तर अनंत काळासाठी कायमसाठी आहे. ह्या ब्रह्मांडातील दरेक जीव जेव्हा त्या वैकुंठीच्या राणाशी चतुर्भुज होईल तो खरा आनंदाचा दिनु. पण एक एक जीव शिवरुप होणे, विठ्ठलमय होणे हीच त्या दिवसाप्रतीची वाटचाल. जीवामधील ब्रह्मा विष्णू महेश आणि आदिमाता, जगदंबा ह्यांच्या एकरुपतेची जाणीव होत ब्रह्मतत्वात विलीन होणे हाच तो चतुर्भुज होण्याचा सोहळा.

*निवृत्ती परम अनुभव नेमो
शांतीपूर्ण क्षमा ज्ञानदेवो !*

वडीलबंधू निवृत्तीनाथांनी दाखवून दिलेल्या मार्गाने जात नित्यनेमाने साधना केल्यामुळेच हा परमानंदाचा परमसुखाचा अनुभव आपल्याला प्राप्त झाला ही नम्र जाणीव ज्ञानेश्वर ठेवतात - ह्यासाठी की अध्यात्ममार्गावर चालत राहून अंतिम ध्येयाप्रत पोहोचण्यात सद्गुरूंचे मार्गदर्शन किती अमोल आहे हे जनांच्या मनावर ठसावे. आणि त्या ध्येयाप्रत पोहोचताना अंगी दया, क्षमा, शांती हे सद्गुण सहजच अंगी बाणले जावेत. किंवा ज्ञानेश्वरांसारखा अवतारी पुरूष अगदी सहज ह्या मार्गावर मार्गक्रमणा करताना कळत नकळत होणाऱ्या चुकांच्या परिमार्जनार्थ शांतीपूर्ण क्षमेची प्रार्थना करण्याचेही ह्या ओळीं मधून दर्शवित असेल. किंबहुना तसेच असावेसे मला वाटते. अन्यथा पोटी अमाप दया, क्षमा, शांती व करुणा असल्याखेरीज व ह्रुदयी परमानंद असल्याखेरीज आणि अस्तित्व विठ्ठलमय ज़ालेले असल्याखेरीज अवघ्या विश्वासाठी "पसायदान" मागता येणे सर्वथैव अशक्य आहे.

*अरे अरे ज्ञाना झालासी पावन*

अध्यात्म आणि मोक्ष - ह्यांचा नेमका शब्दानुभव देणारा हा अद्भुत अभंग.

पण आजच्या भौतिकवाद, चंगळवाद ह्यांचा बुजबुजाट असलेल्या ह्या युगात आपल्यासारख्याला ही एवढी प्रचंड विचारझेप शक्य आहे ?

माझ्या मते भौतिक सुखांच्या मागे लागून आपण जी मन:शांती गमावून बसलो आहोत त्याची जाणीव होऊन आपल्याला खरोखर कशामध्ये आनंद मिळतो, समाधान मिळते, मन:शांती मिळते इतक्यापुरता जरी आपण "स्व" चा शोध लावला किंवा ते प्रयत्न चालू ठेवले तरी खूप. मोठे घर, मोठी गाडी, अधिकाधिक चैनीच्या वस्तू ह्यात सुख व समाधान नाही हे कळून कोणत्या गोष्टीँमध्ये, छंदांमध्ये आपल्याला ते मिळते हे कळले तरी वैकुंठीच्या राणाशी चतुर्भुज होण्याच्या दिशेने एक पाऊल आपण पुढे टाकले असे म्हणता येईल.

त्या "ध्यानाचे" परमतत्वाबरोबर असलेले एकात्म वा अद्वैत जाणवणे ही फार पुढची पायरी झाली महाराजा. सजगपणे चालत राहू तेव्हा आपलें पूर्वजन्मीचे संचित, ह्या जन्मीची कर्मे आणि सद्गुरूंची कृपा ह्यांच्या आधारे हा भवसागर तरून जाऊ तेव्हा जाऊ. पण तोपर्यन्त "स्व" शी प्रामाणिक राहिलो तरी अस्तित्व पावन होईल ही खात्री बाळगायला हवी.

तोपर्यंत रोजच्या जीवनातील छोट्या गोष्टीं मधला आनंद शोधू ज्यात आपल्याला समाधान आहे, शांती आहे आणि आपण "स्वस्थ" राहू ह्याची खात्री आहे.  स्वस्थ म्हणजे काय तर जो स्वत:मध्ये स्थिर आहे - मला स्वतःला खरे सुख व आनंद कशात आहे हे कळून त्यात स्थिर रहाणे म्हणजेच "स्वस्थ" रहाणे.

त्या अर्थाने आपण "स्वस्थ" झालो तरी आपण म्हणू शकतो की

*अरे अरे ज्ञाना झालासी पावन
तुझे तुज ध्यान कळो आले !

---- मनिष मोहिले