Monday, January 11, 2016

नटसम्राट

काल नटसम्राट बघितला. चित्रपट पाहून बाहेर पडताना संमिश्र प्रतिक्रिया मनात येत होत्या.

म्हणजे "कट्यार" बघून बाहेर पडताना जसा मी त्या चित्रपटानी पूर्णपणे भारावून जाऊन बाहेर पडलो होतो तसं "नटसम्राट" पाहून बाहेर पडताना नाही वाटलं. हो, निश्चीतपणे काही प्रसंग डोक्यात पक्के बसले होते, डोळ्यासमोर घोळत होते पण एक परिपूर्ण चित्रपटानुभव जसा "कट्यार" नी दिला तसा "नटसम्राट" नी नाही दिला एव्हढं खरं.

आता तुम्ही म्हणाल की दोन सर्वस्वी वेगळ्या धर्तीच्या चित्रपटांची तुलना मुळातच कस करावी ? आता हे जरी मान्य की दोन्ही सर्वस्वी भिन्न स्वभावाचे चित्रपट आहेत तरी एक समान धागा आहे आणि तो म्हणजे दोन्ही चित्रपट हे दोन गाजलेल्या प्रथितयश नाटकांची चित्रपट रुपांतरे आहेत आणि त्यामुळे काही प्रमाणात तुलना होणे अपरिहार्य आहे.

तर माध्यम बदलल्यामुळे पटकथेमध्ये काही बदल होणे हे स्वाभाविक असले तरी ते मूळ संहितेपासून किती फारकत घेतात हे बघणे आवश्यक असते. कट्यार मध्ये पटकथेत जे स्वातंत्र्य घेतले आहे ते फक्त चित्रपटासारखं एक नाटकापेक्षा अधिक लवचिक माध्यम हाती लागल्यामुळे काही जास्तीची दृष्ये, काही प्रत्यक्ष स्थळावरची दृष्ये, काही नवीन गाणी या स्वरुपात आहे आणि ते मूळ नाट्यसंहितेला धोका न पोचवता चित्रपटाच्या माध्यमातून कथा अधिक परिणामकारकपणे पुढे नेण्यास मदत करते.

नटसम्राट च्या बाबतीत असं होताना दिसत नाही. मूळ नाटकात नसलेली राम ही मित्राची भूमिका चित्रपटात आहे . एका सहकलाकार मित्राच्या नजरेतून गणपतराव बेलवलकरांची ओळख करुन द्यायचा प्रयत्न हे कारण जरी गृहीत धरलं तरी त्या जीवश्च कंठश्च मित्राच्या मनात परस्पर तुलना व गणपतराव नटसम्राट असण्याबद्दल शंका असणं आणि तरीही त्यांची इतकी दाट मैत्री असणं पटत नाही. एक मात्र नक्की की पटकथेत या  उपऱ्या असणाऱ्या भूमिकेला विक्रम गोखलेनी आपल्या जबरदस्त व सहज अभिनयानी पूर्ण न्याय देऊन ती विश्वासार्ह बनवण्याचा प्रयत्न केला आहे.

तशीच अजून एक खटकणारी गोष्ट म्हणजे ज्या अनोळखी सिद्धार्थ बरोबरच्या गप्पातून चित्रपट पुढे सरकतो त्या अमेरिकेहून परत आलेल्या मुलाची एका चहाच्या टपरीवर गणपतरावांशी ओळख होते आणि तो त्यांच्या मागे लावतो यासाठी टपरीमध्ये एखाद दोन स्वगतं घालणं कदाचित संयुक्तिक ठरलं असतं व अधिक पटलं असतं.

त्याचप्रमाणे कलाकाराची मनस्विता व बेभानपणे मनात येइल ते करुन टाकण्याची वृत्ती दर्शविण्यासाठी जे प्रसंग दाखवले आहेत त्यातील काही मनाला खटकतात. उदाहरणार्थ मुलाबरोबर घरात रहाताना सुद्धा बाहेर उधारी करणे, स्वस्त प्रतीच्या दारुच्या गुत्त्यावर जाणे. मुलीच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशी, हातभट्टीची दारु गाळणाऱ्या गुंडाबरोबर बसून भरमसाठ दारु पिऊन पार्टीत येणे या प्रसंगात गणपतरावांबद्दल सहानुभूती वाटण्या ऐवजी त्यांच्या अपत्यांची बाजू बरोबर वाटते आणि त्यामुळे पुढील शोकांतिकेची परिणामकारकता कमी होते. त्या ऐवजी सुनिल बर्वेचा समंजस जावई मनाला अधिक पटतो.

मात्र मुलीकडे चोरीचा आळ येतो त्या प्रसंगापासून मग शेवटपर्यंत चित्रपट चांगली पकड ठेवतो.

बाकी अभिनयाच्या बाबतीत बोलायचं झालं तर सर्वानी आपापल्या भूमिका उत्तम निभावल्यात असं मला वाटतं. विशेष करून सरकारच्या भूमिकेत मेधा मांजरेकर व विद्याच्या भूमिकेत मृण्मयी देशपांडे उल्लेखनीय.  सुनिल बर्वे छान.

आणि मग उरतात दोन दिग्गज कलावंत - विक्रम गोखले आणि नाना पाटेकर.

राम्या च्या भूमिकेत विक्रम गोखलेनी जान ओतलीये. आपल्या प्रथितयश नटसम्राट मित्राचा खास मित्र, त्याच्याबरोबर कळत नकळत स्वत:ची तुलना, तरीही मित्राबद्दलचं प्रेम, जागरुक व्यवहारी सल्ले, बायको गेल्यानंतरचा आतून मोडून पडलेला राम आणि शेवटी मृत्यूशय्येवर स्वत:च्या अभिनय सामर्थ्याची चुणूक दाखवणारा राम विक्रम गोखलेनी प्रचंड ताकदीने उभा केलाय.

आणि शेवटी नटसम्राट गणपतराव बेलवलकरांच्या भूमिकेत नाना - तो अक्षरश: भूमिका जगलाय. त्याचा चेहरा, डोळे, हावभाव, हातवारे, देहबोली - सगळ्या सगळ्यातून आपल्याला गणपतराव दिसतात. आणि अभिनयाच्या या सर्व हत्यारांपेक्षा एक अत्यंत प्रभावी हत्यार नानाने अतिशय प्रभावीपणे वापरलय आणि ते म्हणजे आवाज - त्याचे आवाजातील चढ उतार, बोलण्याची पद्धत , ढब आणि विशेष करून त्याचे नाटकातील उतारे - पडद्यावर चित्र नसेल आणि बंद पडद्या आडून निव्वळ नानाला ऐकवला तरी त्या नटसम्राटाची व्यथा आपल्यापर्यंत पोचेल अशा ताकदीने नानाने गणपतराव उभा केलाय ( पडद्यावर श्रेयनामावली येतानाचा नानाच्या तोंडचा संवाद हा याचा पुरावा म्हणता येइल ) आणि म्हणूनच काही प्रसंग खटकून देखील नानामुळे आपणास एकंदर चित्रपट पहाण्यायोग्य वाटतो. Hats off to Nana.

शेवटी माझ्यासमोर घोळतायत विक्रम गोखले आणि नानाचा रामच्या मृत्यूशय्येवरचा सीन, गणपतराव सरकाराना त्यांनी न पाहिलेल्या नाटकातील संवाद म्हणून दाखवतात तो सीन, नाटक पहायला गेलेले गणपतराव सर्व विसरून प्रेक्षागारातच ऑथेल्लो बनतात तो सीन, कुणी घर देतं का मधला रस्त्यावरच्या कुत्र्याला कुरवाळणारा नाना आणि शेवटचा मी आहे ऑथेल्लो, मी आहे प्रतापराव ..... आणि मी आहे गणपत रामचंद्र बेलवलकर - नटसम्राट हा सीन.

ही काही दृष्ये आणि विक्रम गोखले व नाना पाटेकर यांच्यासाठी एकदा बघावाच असा नटसम्राट.

------ मनिष मोहिले 

No comments:

Post a Comment