मी गेली वीस वर्ष नोकरी निमीत्त अहमदाबादमध्ये आहे. Although, for all practical purposes, I got adjusted & adapted quite quickly, culturally it was difficult. कारण मराठी साहित्य, मराठी रंगभूमी, मराठी गीतं, मराठी चित्रपट या सगळ्याच बाबतीत अहमदाबादमध्ये उपलब्धतेचे वांधे होते. मात्र, सुदैवाने इथे मिळालेली मराठी मित्रमंडळी, वर्षभरात आठ दहा मराठी नाटकं व एखाद दुसरा मराठी गाण्यांचा कार्यक्रम करणाऱ्या कलाश्री नामक संस्थेचे सभासदत्व आणि आता ऑनलाईन उपलब्ध असलेल्या पुस्तक व संगीतामुळे ही सांस्कृतिक गरज बऱ्याच प्रमाणात पूर्ण झाली असं म्हणता येइल.
पण एका गोष्टीची उणीव अजूनही जाणवते आणि ती म्हणजे ट्रेकींग. १९८७ च्या दहावीच्या सुट्टीत मी पहिली हाइक केली आणि ती अफलातून नशा कायमसाठी माझ्यावर सवार झाली. १९९६ साली मी अहमदाबादला आलो तो पर्यंत हा छंद जोपासत होतो. साधारण ७०-८० किल्ले पाहीले. त्यातील काही तीन चार वेळा देखील. उन्हाळ्यातील जीवघेणी तहान, पावसाळ्यातील अंगावर अक्षरश: लागणारा पाऊस, थंडीतली डोंगरमाथ्यावरची थंडी अशा सगळ्या ऋतूत आम्ही हाइक केल्या आणि प्रत्येक ऋतू मधील वेगवेगळं दिसणारं सह्याद्रीचं रांगडं मर्दानी सौंदर्य आणि त्याला नाजूकपणे सजवणारी हिरवाई मनसोक्त पाहिली. एकदा अवचितपणे गारांचा वर्षाव अनुभवला. पाचेक वर्षे तर ३१ डिसेंबर ची रात्र वेगवेगळ्या गडावर घालवत आम्ही नवीन वर्षाचं स्वागत सह्याद्रीच्या कुशीत राहून केले. या गिरीदुर्ग भ्रमणातील काही संस्मरणीय स्थळे व स्मृती.
पहिली म्हणजे दहावीच्या सुट्टीतली हाइक होती किल्ले राजमाची. आम्हा सगळ्या मित्रांचा पहिलाच अनुभव. त्यामुळे लोणावळ्यावरून १६ किमी ची सपाटीवरची ( चढ नसलेली ) वाट आम्ही पकडली. ते जंगलातून, माळावरून चालणं, आजूबाजूची निसर्गशोभा, राजमाची गावच्या लक्ष्मण उंबरे ह्यांच्या घरात रहाण्याचा अनुभव, त्यांच्याकडचं कुळथाचं पिठलं, नागलीची भाकरी, मिरचीचा ठेचा आणि ताक हे साधंच पण अतिशय रुचकर जेवण, श्रीवर्धन आणि मनरंजन या दोन बालेकिल्ल्यांवरची भटकंती, मनरंजन वरून बघितलेला सूर्यास्त, रात्री खळ्यात बसून केलेल्या बिबट्याच्या गोष्टी, उतरताना कर्जत बाजूला सतत अडीच एक तास उतरत राहिल्यामुळे व पहिलीच वेळ असल्यामुळे दुखणारे गुडघे - आजही सगळं मनात तस्संच्या तस्सं ताजं आहे. सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यान्शी पहाडांशी ओळख करून देणारी नी त्यांचा लळा लावणारी आमची पहिली हाइक - पहिलीच म्हणून चिरकाल स्मृतीत ताजी राहिलेली.
त्यानंतरची स्मरणात रहाणारी हाइक भीमाशंकरची. कर्जत वरून भीमाशंकर ला जायला तीन वाटा - पाच तासाची गणेश घाटाची किंवा कमी वेळ घेणाऱ्या पण चढणीच्या दोन वाटा - शिडीचा रस्ता अथवा ओघळाचा रस्ता. आम्ही शिडीच्या वाटेनी वर चढलो होतो. छातीवर येणारे चढ, काही ठिकाणी खोल दरीच्या काठानी वळून जाणारी वाट, अडचणीच्या दोन जागी चढण्यासाठी रोवलेल्या ओबडधोबड शिड्या, सर्वदूर दिसणारं सह्याद्रीचं रांगडं हिरवंगार सौंदर्य, दमछाक करायला लावणारा शेवटचा अर्ध्या तासाचा चढ आणि तो संपताच लागणाऱ्या तळ्याच्या काठी पालथं पडून तोंड लावून गटगट प्यायलेलं पाणी.
मग भीमाशंकराचं दर्शन घेउन भीमेचं उगमस्थल पाहून आम्ही परतलो ते ओघळाच्या वाटेनी. पावसाळ्यात ज्या वाटेनी ओढे व नाले वाहतात ती ही वाट म्हणून ओघळाची वाट. मोठमोठे धोंडे अस्ताव्यस्त पडलेले, असमान उंचीच्या नैसर्गिक पायऱ्या, कुठे कुठे तर पुरूष उंचीच्या - अशा त्या वाटे भोवती घनदाट जंगल. त्यात आम्ही बघितलं एक कोळ्याचं जाळं जे जमिनीपासून माझ्या डोक्यावर फूटभर उंच होतं. सापाची कात पाहिली आणि पाहिली देवखार - Giant Flying Squirelle - that too in action - पुढच्या पायापासून मागील पायापर्यंत शरीराला जोडून असलेले कातडे पसरून त्याचा तरंगण्यासाठी उपयोग करत एका झाडावरून दूरवरील दुसऱ्या झाडावर उडी घेताना. माझ्या मनावर कायमसाठी कोरला गेलेला चित्रसंस्कार. अजून एक अविस्मरणीय हाइक.
असेच एकदा पावसाळ्यात मी, रोहित आणि अमित आम्ही तिघं तिकोन्यावर गेलो होतो. काही कारणानी आम्हाला उशीर झाला आणि संध्याकाळी सूर्य मावळताना आम्ही गडावर पोचलो. खाली धरणाच्या पाण्याचा विस्तार मावळत्या किरणात सोन्याचा मुलामा बनून पसरला होता. अंधार पडायच्या आत आम्ही गुहेपाशी पोचलो आणि पायऱ्यांच्या जवळच असलेल्या त्या गुहेत वटवाघळांच्या विष्ठेचा असहनीय दुर्गंध आम्हाला आला. आता इथे रहाणे शक्य नव्हते म्हणून आम्ही तसेच वर माथ्यावर असलेल्या शंकराच्या एका छोट्याशा देवळाकडे आसऱ्यासाठी निघालो आणि पावसानी आम्हाला गाठलं. सह्याद्रीतला तो अचाट पाऊस - त्यानी आम्हाला उभं आडवं तिरपं झोडपून काढायला सुरूवात केली. मुश्किलीनी अंधारात धडपडत आम्ही देवळाजवळ गेलो तर देऊळ म्हणजे एक अगदी छोटी खोली जिच्या तीन बाजूला भिंती आणि चौथ्या बाजूला बिन दरवाजाचं दार. मध्य शंकराची पिंड आणि दाराच्या समोरच्या भिंतीवर एक मोठा झरोका. त्या उघड्या डोंगरमाथ्यावर त्या अफाट कोसळणाऱ्या पावसात तेव्हढाच आडोसा होता आम्हाला. आम्ही नखशिखांत चिंब भिजलेले. प्लॅस्टीकच्या आवरणाखालूनही सॅक्स भिजलेल्या. तरीही पूर्ण ओलं रहायचं नाही म्हणून अर्धवट ओल्या टॉवेल्सनी अंग पुसून अर्धे कोरडे अर्धे भिजलेले कपडे अंगावर चढवून आम्ही गुडघ्यांस मिठ्या मारून बसलो. जेवण बनवण्यासाठी जवळ शिधा होता, पावसाळा म्हणून स्टोव्ह होता पण काड्यापेटी ओली झालेली. आम्ही तिघेही सिगरेट न पिणारे. त्यामुळे लायटर नाही. शेवटी तसंच उपाशीपोटी झोपण्याचा निर्णय घेतला.
पण उघड्या डोंगरमाथ्यावरचा तो कोसळणारा प्रचंड पाऊस, सुसाट वाहणारा वारा आणि कडाडणाऱ्या विजा झोप लागू देइनात. त्यातोन उघड्या दारातून आणि झरोक्यातून पावसाचे तुषार आत येत होते. झरोक्यातून आत येणारा वारा घूं घूं असा हॉरर मूव्हीत शोभणारा आवाज करत अथक वहात होता. तशाही स्थितीत आमच्या या अवस्थेला हसत आम्ही गप्पा मारण्याचा प्रयत्न करत होतो पण पावसाचे थंडगार तुषार, बर्फाळ गार वारा आणि पावसाचं थैमान यामुळे गारठून जाऊन थोड्याच वेळात आम्ही गप्प झालो आणि मुटकुळं करून त्यातल्या त्यात ऊब मिळवायचा प्रयत्न करत उपाशीपोटी झोपायचा प्रयत्न करत राहिलो. पण झोप कशी येणार ? कितीतरी वेळ ते थैमान ऐकत तसेच कधीतरी ग्लानीत झोपलो. सकाळी जाग आली तर स्वच्छ सूर्यप्रकाश होता. रात्री जणू काही घडलच नव्हतं रात्री इतकं स्वच्छ वातावरण. आम्ही लगेच खाली उतरलो आणि पहिल्या गावी बकाबका चहा बिस्कीटं खाऊन पोटाला आधार दिला आणि मग परतीचा प्रवास. आश्चर्य म्हणजे जवळपास रात्रभर भिजलेल्या अवस्थेत काढून देखील आम्हा तिघांपैकी कोणालाही साधं पडसं सुद्धा झालं नाही.
पण अशी भयंकर रात्र मी अजूनपर्यंत दुसरी अनुभवली नाही. पण ह्यामुळे डोंगर दऱ्यान्वरचं आमचं प्रेम जराही कमी झालं नाही. उलट त्या अनुभवानी आम्हाला ताकद दिली - अधिकाधिक हाइक्स करण्याची.
(क्रमश:)
------ मनिष मोहिले
तिकोन्याच्या त्या पावसाळी हाइक नंतरची दुसरी लक्षात रहाणारी हाइक म्हणजे राजगडची. ही हाइकपण आम्ही पावसाळ्यात केली होती. पुण्याला मंदार नावाच्या माझ्या मित्राच्या घरी आम्ही तीन मित्र जमा झालो. चौथा एक मित्र रात्री येणार होता. दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही राजगडला जायला निघणार होतो. जो चौथा मित्र येणार होता तो मोठी सॅक आणणार होता की ज्यात आमच्या दोघांचं सामान राहील. त्या मित्रानी आयत्या वेळी टांग दिली आणि अस्मादिकांवर सुटकेस घेऊन राजगड चढण्याची पाळी आली. त्यातून मी शहाणपणा करून स्लीपर्स घातल्या होत्या. वाजेघर हून पाली दरवाजाच्या सोप्या रस्त्यानी आम्ही चढणार होतो हीच त्यातल्या त्यात जमेची बाब. एकीकडे आयत्या वेळी टांग दिलेल्या मित्राला शिव्या घालता घालता सुटकेस हातात घेऊओन चढताना स्वत:वर हसू पण येत होतं. सुदैवाने वर पोचेपर्यंत पर्जन्यराजाने मेहरबानी केली आणि आम्ही पद्मावती माचीवर पद्म्वावती देवीच्या देवळात पोचलो. तो दिवस आणि दुसरा दिवस मात्र गडावर अफलातून मजा आली. ऐन पावसाळ्यात राजगडावरून दिसणारा हिरवागार आसमंत, तोरणा, सिंहगड, राजगडाची मोक्याची जागा, स्वत: राजगडाचं नैसर्गिक बेलागपण, त्याच्या तीन सोंडा आणि त्याना तटबंदी बांधून बनलेल्या पद्मावत्ती, सुवेळा आणि संजीवनी माची, संजीवनीची चिलखती तटबंदी, सुवेळावरचं नेढं (डोंगरास आरपार असलेलं नैसर्गिक भोक) या सगळ्या गोष्टी बघता महाराजांच्या दूरदृष्टीपुढे आपण आपोआप नतमस्तक होतो. आणि सगळ्यात कमाल गडाचा बालेकिल्ला. उभ्या कड्यात फक्त हाताच्या आणि पायाच्या बोटाना जागा मिळेल अशा खोबण्या करून बनवलेला रस्ता हा वर जायचा एकमेव मार्ग. पहिली पंचवीस वर्ष स्वराज्याची राजधानी असलेला - गडांचा राजा आणि राजांचा गड. मराठेशाहीच्या इतिहासातील एक अद्वितीय तीर्थक्षेत्र. ते दोन दिवस आम्ही पूर्ण भारावून गेलो होतो. उतरायच्या वेळेला तर आम्ही चोर दरवाजाच्या अवघड वाटेनी उतरलो - माझ्या स्लीपर्स व सुटकेस सहित.
नंतरची स्मरणीय हाइक म्हणजे गडदच्या भैरीची. गडद म्हणजे गुहा. गुहेतील भैरोबा. ढाकच्या किल्ल्याला लागून भैरीचा सुळका आहे आणि ढाकच्या किल्ल्याच्या एका बाजूस उभ्या कड्यात असलेल्या नैसर्गिक गुहेत ह्या भैरीचा मुक्काम आहे.
कर्जतजवळील वदप गावावरून साधारण अडीच तीन तासाच्या छातीवर येणाऱ्या चढानंतर येतं गारूबाईचं पठार. तीनेक किलोमीटर लांबीच्या या पठाराच्या वदप बाजूकडे टोकावर गारूबाईचं देऊळ आहे. उजव्या हाताला ढाकचा किल्ला आहे. त्याला समांतर चालत राहीलं की साधारण तासाभरानी आपण ढाकचा किल्ला आणि भैरीचा सुळका यामधील फटीत येतो. डावीकडे भैरीचा सुळका व उजवीकडे ढाकचा किल्ला यामधून एक साधारण सत्तर ऐंशी फुटाचा एक उतार आहे ज्यावर "स्क्री", म्हणजे ज्यावरून पाय सहज सरकतात असे मातीचे बारके खडे, आहे. हा उतार जिथे संपतो तिथे जेमतेम तीन साडेतीन फुटाची जागा आहे नी त्यानंतर काही शे फुट खोल दरी. जर चुकून पाय घसरला तर स्क्री वर ब्रेक लावणं अत्यंत मुश्किल. मग ती तीन फुटी जागा आपली घरंगळणारी गाडी थांबवायला तशी निरुपयोगीच. तिथपर्यंत आलं की उजवीकडे ढाकच्या किल्ल्याच्या नैसर्गिक भिंतीवर ट्रॅव्हर्स करत जावं लागतं - जवळपास पन्नास साठ फूट. समोर दगडी सपाट कडा आणि पाठीशी काहीशे फूट खोल दरी. पाय ठेवायला जेमतेम पायाची बोटं मावतील अशी ledge. तो पार करायची एकच पद्धत - दरीकडे पाठ करून कड्याच्या भिंतीवर हात टेकायचे आणि एक एक पाऊल सरकत जायचं. नजर ज्या बाजूला जायचं तिकडे. उगीच खाली बघून आत्मविश्वास डळमळीत करण्यात काय फायदा ?
हा रस्ता पार केला की जरा मोकळा श्वास घेण्यासारखी जागा येते. त्यानंतर येतो एक रॉक पॅच. तो चढून वर गेलं की शेवटचं दिव्य समोर येतं - एका छोट्या खड्ड्यात एक झाडाचं खोड रोवलेलं आहे - पंधरा वीस फूट . त्याच्या दोन्ही बाजूस वर खाली फांद्या आहेत ज्याचा उपयोग पायऱ्या म्हणून व हात धरण्यासाठी करता येतो. ते खोड जिथे संपते तिथे अजून वर चढण्यासाठी एक वेल त्या खोडाला बांधलेली असते जिचे वरचे टोक गुहेत बांधलेले आहे. खोड चढून वेल लागला की वेल हातानी पकडून समोर कड्यावर पाय ठेवत वर जायचं हे सर्व चढून जायचं समोर कडा नी पाठीशी दरी घेऊन. इथे चुकीला जागा नाही. पण हे सगळं पार करून वर गेल्यावर स्वत:वरच आपण खूष होतो आणि आपल्याला बक्षीस मिळतं गुहेतून दिसणाऱ्या विहंगम दृष्याचं आणि गुहेच्या टाक्यातील थंडगार गोड पाण्याचं. तिथेच पाठपिशवीतून आणलेलं जेवण जेवावं आणि ते पाणी पिऊन तृप्त व्हावं. दरवर्षी भरणाऱ्या जत्रेला गावकरी पाठीला बळीचा बकरा बांधून चढतात. शिवाय दर ठराविक काळानी ( मला वाटतं वर्षभरानी ) ते खोड आणि वेल बदलण्याचा कार्यक्रम असतो.
तर असा हा थरारक गडदचा भैरी. ह्या जागी मी तीनदा जाऊन आलो आहे आणि पहिल्या दोन्ही वेळा अतिशय सहजपणे मी वर चढलो आणि उतरलो. तिसऱ्या वेळी चढताना सहज वर गेलो पण उतरताना काय माहिती कसा काय्व्पण त्या वेलावर एके ठिकाणी मी अडकलो - म्हणजे पुढची स्टेप नक्की कुठे कशी खाली टाकावी ह्या संभ्रमात पडलो. अशा जागी जो पर्यंत तुम्ही निर्णयाबद्दल नक्की नसता तो पर्यंत पाऊल पुढे टाकण्यात अर्थ नसतो. त्या मुळे मी तिथेच वेलीला धरून पाय कड्यावर, पाठीला सॅक आणि खाली दरी अशा त्रिशंकू अवस्थेत लटकलो. जसजसा वेळ जाऊ लागला तसतशी हाताला रग लागायला लागली. कितीही नाही बघायचं ठरवलं तरी लक्ष खाली दरीकडे जाऊ लागलं आणि त्याचा परिणाम म्हणून आत्मविश्वास डळमळला आणि माझे पाय थरथर कापायला लागले. बरं त्या वेलावर एकावेळी एकापेक्षा अधिक व्यक्ती येणं शक्य व योग्य नसल्याने माझे मित्रपण वरून किंवा खालून सूचना देण्यापलीकडे काहीच करू शकत नव्हते. अखेरीस जवळपास आठ दहा मिनीटानंतर ( हा कालावधी नंतर मित्रांनी सांगितल्यावर कळला - माझ्यासाठी ती कित्येक युगं होती ) मी कसंतरी स्वत:ला सावरलं आणि हिय्या करून पुढचं पाऊल टाकलं. त्या एका पावलाचीच गरज होती कारण पुढील मार्ग मी परत सराइतपणे पार करून खाली आलो. पण आजही माझ्या डोळ्यापुढे ती वेलावर लटकताना खाली खोल दिसणारी दरी येते.
त्यानंतरही मी अनेक हाइक्स केल्या. कित्येक नवीन वर्षं गडावर साजरी केली. पुढे नोकरीच्या निमीत्ताने गुजरातमध्ये आलो आणि सह्याद्रीची साथ सुटली.
पण आजही ते काळे कभिन्न डोंगर कडे, ती माती, दाट झाडी, रणरणत्या उन्हातील दमवणूक नी तहान, वर पोचल्यावर प्यायलेलं टाक्यातलं थंडगार पाणी, सर्वांगाला सुखावणारा गार वारा, झोडपून काढणारा पाऊस, धबधब्या खाली केलेल्या आंघोळी, तीन दगड मांडून केलेली चूल आणि त्यावरचं मसाला खिचडी किंवा कांदा बटाटा रस्सा भाजी नी भातचं जेवण, गडाच्या कानाकोपऱ्यातून आपल्यात भिनणारा महाराजांचा इतिहास, सूर्यास्ताच्या वेळी गडमाथ्यावर बसून गायलेल्या जय जय महाराष्ट्र माझा आणि वेडात मराठे वीर दौडले सात चे दऱ्याखोऱ्यातून घुमून येणारे प्रतिध्वनी आणि निसर्गाच्या रौद्र पण तरीही सुंदर रुपाच्या सान्निध्यात ते ऐकताना इतिहासाच्या स्मरणाने अंगावर उभे राहिलेले रोमांच - सग्गळं सगळं माझ्या स्मृतीत चिरतरुण असल्या प्रमाणे ताजं आहे आणि ताजा आहे माझा स्मृतीतला सखा - सह्याद्री.
---- मनिष मोहिले
पण एका गोष्टीची उणीव अजूनही जाणवते आणि ती म्हणजे ट्रेकींग. १९८७ च्या दहावीच्या सुट्टीत मी पहिली हाइक केली आणि ती अफलातून नशा कायमसाठी माझ्यावर सवार झाली. १९९६ साली मी अहमदाबादला आलो तो पर्यंत हा छंद जोपासत होतो. साधारण ७०-८० किल्ले पाहीले. त्यातील काही तीन चार वेळा देखील. उन्हाळ्यातील जीवघेणी तहान, पावसाळ्यातील अंगावर अक्षरश: लागणारा पाऊस, थंडीतली डोंगरमाथ्यावरची थंडी अशा सगळ्या ऋतूत आम्ही हाइक केल्या आणि प्रत्येक ऋतू मधील वेगवेगळं दिसणारं सह्याद्रीचं रांगडं मर्दानी सौंदर्य आणि त्याला नाजूकपणे सजवणारी हिरवाई मनसोक्त पाहिली. एकदा अवचितपणे गारांचा वर्षाव अनुभवला. पाचेक वर्षे तर ३१ डिसेंबर ची रात्र वेगवेगळ्या गडावर घालवत आम्ही नवीन वर्षाचं स्वागत सह्याद्रीच्या कुशीत राहून केले. या गिरीदुर्ग भ्रमणातील काही संस्मरणीय स्थळे व स्मृती.
पहिली म्हणजे दहावीच्या सुट्टीतली हाइक होती किल्ले राजमाची. आम्हा सगळ्या मित्रांचा पहिलाच अनुभव. त्यामुळे लोणावळ्यावरून १६ किमी ची सपाटीवरची ( चढ नसलेली ) वाट आम्ही पकडली. ते जंगलातून, माळावरून चालणं, आजूबाजूची निसर्गशोभा, राजमाची गावच्या लक्ष्मण उंबरे ह्यांच्या घरात रहाण्याचा अनुभव, त्यांच्याकडचं कुळथाचं पिठलं, नागलीची भाकरी, मिरचीचा ठेचा आणि ताक हे साधंच पण अतिशय रुचकर जेवण, श्रीवर्धन आणि मनरंजन या दोन बालेकिल्ल्यांवरची भटकंती, मनरंजन वरून बघितलेला सूर्यास्त, रात्री खळ्यात बसून केलेल्या बिबट्याच्या गोष्टी, उतरताना कर्जत बाजूला सतत अडीच एक तास उतरत राहिल्यामुळे व पहिलीच वेळ असल्यामुळे दुखणारे गुडघे - आजही सगळं मनात तस्संच्या तस्सं ताजं आहे. सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यान्शी पहाडांशी ओळख करून देणारी नी त्यांचा लळा लावणारी आमची पहिली हाइक - पहिलीच म्हणून चिरकाल स्मृतीत ताजी राहिलेली.
त्यानंतरची स्मरणात रहाणारी हाइक भीमाशंकरची. कर्जत वरून भीमाशंकर ला जायला तीन वाटा - पाच तासाची गणेश घाटाची किंवा कमी वेळ घेणाऱ्या पण चढणीच्या दोन वाटा - शिडीचा रस्ता अथवा ओघळाचा रस्ता. आम्ही शिडीच्या वाटेनी वर चढलो होतो. छातीवर येणारे चढ, काही ठिकाणी खोल दरीच्या काठानी वळून जाणारी वाट, अडचणीच्या दोन जागी चढण्यासाठी रोवलेल्या ओबडधोबड शिड्या, सर्वदूर दिसणारं सह्याद्रीचं रांगडं हिरवंगार सौंदर्य, दमछाक करायला लावणारा शेवटचा अर्ध्या तासाचा चढ आणि तो संपताच लागणाऱ्या तळ्याच्या काठी पालथं पडून तोंड लावून गटगट प्यायलेलं पाणी.
मग भीमाशंकराचं दर्शन घेउन भीमेचं उगमस्थल पाहून आम्ही परतलो ते ओघळाच्या वाटेनी. पावसाळ्यात ज्या वाटेनी ओढे व नाले वाहतात ती ही वाट म्हणून ओघळाची वाट. मोठमोठे धोंडे अस्ताव्यस्त पडलेले, असमान उंचीच्या नैसर्गिक पायऱ्या, कुठे कुठे तर पुरूष उंचीच्या - अशा त्या वाटे भोवती घनदाट जंगल. त्यात आम्ही बघितलं एक कोळ्याचं जाळं जे जमिनीपासून माझ्या डोक्यावर फूटभर उंच होतं. सापाची कात पाहिली आणि पाहिली देवखार - Giant Flying Squirelle - that too in action - पुढच्या पायापासून मागील पायापर्यंत शरीराला जोडून असलेले कातडे पसरून त्याचा तरंगण्यासाठी उपयोग करत एका झाडावरून दूरवरील दुसऱ्या झाडावर उडी घेताना. माझ्या मनावर कायमसाठी कोरला गेलेला चित्रसंस्कार. अजून एक अविस्मरणीय हाइक.
असेच एकदा पावसाळ्यात मी, रोहित आणि अमित आम्ही तिघं तिकोन्यावर गेलो होतो. काही कारणानी आम्हाला उशीर झाला आणि संध्याकाळी सूर्य मावळताना आम्ही गडावर पोचलो. खाली धरणाच्या पाण्याचा विस्तार मावळत्या किरणात सोन्याचा मुलामा बनून पसरला होता. अंधार पडायच्या आत आम्ही गुहेपाशी पोचलो आणि पायऱ्यांच्या जवळच असलेल्या त्या गुहेत वटवाघळांच्या विष्ठेचा असहनीय दुर्गंध आम्हाला आला. आता इथे रहाणे शक्य नव्हते म्हणून आम्ही तसेच वर माथ्यावर असलेल्या शंकराच्या एका छोट्याशा देवळाकडे आसऱ्यासाठी निघालो आणि पावसानी आम्हाला गाठलं. सह्याद्रीतला तो अचाट पाऊस - त्यानी आम्हाला उभं आडवं तिरपं झोडपून काढायला सुरूवात केली. मुश्किलीनी अंधारात धडपडत आम्ही देवळाजवळ गेलो तर देऊळ म्हणजे एक अगदी छोटी खोली जिच्या तीन बाजूला भिंती आणि चौथ्या बाजूला बिन दरवाजाचं दार. मध्य शंकराची पिंड आणि दाराच्या समोरच्या भिंतीवर एक मोठा झरोका. त्या उघड्या डोंगरमाथ्यावर त्या अफाट कोसळणाऱ्या पावसात तेव्हढाच आडोसा होता आम्हाला. आम्ही नखशिखांत चिंब भिजलेले. प्लॅस्टीकच्या आवरणाखालूनही सॅक्स भिजलेल्या. तरीही पूर्ण ओलं रहायचं नाही म्हणून अर्धवट ओल्या टॉवेल्सनी अंग पुसून अर्धे कोरडे अर्धे भिजलेले कपडे अंगावर चढवून आम्ही गुडघ्यांस मिठ्या मारून बसलो. जेवण बनवण्यासाठी जवळ शिधा होता, पावसाळा म्हणून स्टोव्ह होता पण काड्यापेटी ओली झालेली. आम्ही तिघेही सिगरेट न पिणारे. त्यामुळे लायटर नाही. शेवटी तसंच उपाशीपोटी झोपण्याचा निर्णय घेतला.
पण उघड्या डोंगरमाथ्यावरचा तो कोसळणारा प्रचंड पाऊस, सुसाट वाहणारा वारा आणि कडाडणाऱ्या विजा झोप लागू देइनात. त्यातोन उघड्या दारातून आणि झरोक्यातून पावसाचे तुषार आत येत होते. झरोक्यातून आत येणारा वारा घूं घूं असा हॉरर मूव्हीत शोभणारा आवाज करत अथक वहात होता. तशाही स्थितीत आमच्या या अवस्थेला हसत आम्ही गप्पा मारण्याचा प्रयत्न करत होतो पण पावसाचे थंडगार तुषार, बर्फाळ गार वारा आणि पावसाचं थैमान यामुळे गारठून जाऊन थोड्याच वेळात आम्ही गप्प झालो आणि मुटकुळं करून त्यातल्या त्यात ऊब मिळवायचा प्रयत्न करत उपाशीपोटी झोपायचा प्रयत्न करत राहिलो. पण झोप कशी येणार ? कितीतरी वेळ ते थैमान ऐकत तसेच कधीतरी ग्लानीत झोपलो. सकाळी जाग आली तर स्वच्छ सूर्यप्रकाश होता. रात्री जणू काही घडलच नव्हतं रात्री इतकं स्वच्छ वातावरण. आम्ही लगेच खाली उतरलो आणि पहिल्या गावी बकाबका चहा बिस्कीटं खाऊन पोटाला आधार दिला आणि मग परतीचा प्रवास. आश्चर्य म्हणजे जवळपास रात्रभर भिजलेल्या अवस्थेत काढून देखील आम्हा तिघांपैकी कोणालाही साधं पडसं सुद्धा झालं नाही.
पण अशी भयंकर रात्र मी अजूनपर्यंत दुसरी अनुभवली नाही. पण ह्यामुळे डोंगर दऱ्यान्वरचं आमचं प्रेम जराही कमी झालं नाही. उलट त्या अनुभवानी आम्हाला ताकद दिली - अधिकाधिक हाइक्स करण्याची.
(क्रमश:)
------ मनिष मोहिले
तिकोन्याच्या त्या पावसाळी हाइक नंतरची दुसरी लक्षात रहाणारी हाइक म्हणजे राजगडची. ही हाइकपण आम्ही पावसाळ्यात केली होती. पुण्याला मंदार नावाच्या माझ्या मित्राच्या घरी आम्ही तीन मित्र जमा झालो. चौथा एक मित्र रात्री येणार होता. दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही राजगडला जायला निघणार होतो. जो चौथा मित्र येणार होता तो मोठी सॅक आणणार होता की ज्यात आमच्या दोघांचं सामान राहील. त्या मित्रानी आयत्या वेळी टांग दिली आणि अस्मादिकांवर सुटकेस घेऊन राजगड चढण्याची पाळी आली. त्यातून मी शहाणपणा करून स्लीपर्स घातल्या होत्या. वाजेघर हून पाली दरवाजाच्या सोप्या रस्त्यानी आम्ही चढणार होतो हीच त्यातल्या त्यात जमेची बाब. एकीकडे आयत्या वेळी टांग दिलेल्या मित्राला शिव्या घालता घालता सुटकेस हातात घेऊओन चढताना स्वत:वर हसू पण येत होतं. सुदैवाने वर पोचेपर्यंत पर्जन्यराजाने मेहरबानी केली आणि आम्ही पद्मावती माचीवर पद्म्वावती देवीच्या देवळात पोचलो. तो दिवस आणि दुसरा दिवस मात्र गडावर अफलातून मजा आली. ऐन पावसाळ्यात राजगडावरून दिसणारा हिरवागार आसमंत, तोरणा, सिंहगड, राजगडाची मोक्याची जागा, स्वत: राजगडाचं नैसर्गिक बेलागपण, त्याच्या तीन सोंडा आणि त्याना तटबंदी बांधून बनलेल्या पद्मावत्ती, सुवेळा आणि संजीवनी माची, संजीवनीची चिलखती तटबंदी, सुवेळावरचं नेढं (डोंगरास आरपार असलेलं नैसर्गिक भोक) या सगळ्या गोष्टी बघता महाराजांच्या दूरदृष्टीपुढे आपण आपोआप नतमस्तक होतो. आणि सगळ्यात कमाल गडाचा बालेकिल्ला. उभ्या कड्यात फक्त हाताच्या आणि पायाच्या बोटाना जागा मिळेल अशा खोबण्या करून बनवलेला रस्ता हा वर जायचा एकमेव मार्ग. पहिली पंचवीस वर्ष स्वराज्याची राजधानी असलेला - गडांचा राजा आणि राजांचा गड. मराठेशाहीच्या इतिहासातील एक अद्वितीय तीर्थक्षेत्र. ते दोन दिवस आम्ही पूर्ण भारावून गेलो होतो. उतरायच्या वेळेला तर आम्ही चोर दरवाजाच्या अवघड वाटेनी उतरलो - माझ्या स्लीपर्स व सुटकेस सहित.
नंतरची स्मरणीय हाइक म्हणजे गडदच्या भैरीची. गडद म्हणजे गुहा. गुहेतील भैरोबा. ढाकच्या किल्ल्याला लागून भैरीचा सुळका आहे आणि ढाकच्या किल्ल्याच्या एका बाजूस उभ्या कड्यात असलेल्या नैसर्गिक गुहेत ह्या भैरीचा मुक्काम आहे.
कर्जतजवळील वदप गावावरून साधारण अडीच तीन तासाच्या छातीवर येणाऱ्या चढानंतर येतं गारूबाईचं पठार. तीनेक किलोमीटर लांबीच्या या पठाराच्या वदप बाजूकडे टोकावर गारूबाईचं देऊळ आहे. उजव्या हाताला ढाकचा किल्ला आहे. त्याला समांतर चालत राहीलं की साधारण तासाभरानी आपण ढाकचा किल्ला आणि भैरीचा सुळका यामधील फटीत येतो. डावीकडे भैरीचा सुळका व उजवीकडे ढाकचा किल्ला यामधून एक साधारण सत्तर ऐंशी फुटाचा एक उतार आहे ज्यावर "स्क्री", म्हणजे ज्यावरून पाय सहज सरकतात असे मातीचे बारके खडे, आहे. हा उतार जिथे संपतो तिथे जेमतेम तीन साडेतीन फुटाची जागा आहे नी त्यानंतर काही शे फुट खोल दरी. जर चुकून पाय घसरला तर स्क्री वर ब्रेक लावणं अत्यंत मुश्किल. मग ती तीन फुटी जागा आपली घरंगळणारी गाडी थांबवायला तशी निरुपयोगीच. तिथपर्यंत आलं की उजवीकडे ढाकच्या किल्ल्याच्या नैसर्गिक भिंतीवर ट्रॅव्हर्स करत जावं लागतं - जवळपास पन्नास साठ फूट. समोर दगडी सपाट कडा आणि पाठीशी काहीशे फूट खोल दरी. पाय ठेवायला जेमतेम पायाची बोटं मावतील अशी ledge. तो पार करायची एकच पद्धत - दरीकडे पाठ करून कड्याच्या भिंतीवर हात टेकायचे आणि एक एक पाऊल सरकत जायचं. नजर ज्या बाजूला जायचं तिकडे. उगीच खाली बघून आत्मविश्वास डळमळीत करण्यात काय फायदा ?
हा रस्ता पार केला की जरा मोकळा श्वास घेण्यासारखी जागा येते. त्यानंतर येतो एक रॉक पॅच. तो चढून वर गेलं की शेवटचं दिव्य समोर येतं - एका छोट्या खड्ड्यात एक झाडाचं खोड रोवलेलं आहे - पंधरा वीस फूट . त्याच्या दोन्ही बाजूस वर खाली फांद्या आहेत ज्याचा उपयोग पायऱ्या म्हणून व हात धरण्यासाठी करता येतो. ते खोड जिथे संपते तिथे अजून वर चढण्यासाठी एक वेल त्या खोडाला बांधलेली असते जिचे वरचे टोक गुहेत बांधलेले आहे. खोड चढून वेल लागला की वेल हातानी पकडून समोर कड्यावर पाय ठेवत वर जायचं हे सर्व चढून जायचं समोर कडा नी पाठीशी दरी घेऊन. इथे चुकीला जागा नाही. पण हे सगळं पार करून वर गेल्यावर स्वत:वरच आपण खूष होतो आणि आपल्याला बक्षीस मिळतं गुहेतून दिसणाऱ्या विहंगम दृष्याचं आणि गुहेच्या टाक्यातील थंडगार गोड पाण्याचं. तिथेच पाठपिशवीतून आणलेलं जेवण जेवावं आणि ते पाणी पिऊन तृप्त व्हावं. दरवर्षी भरणाऱ्या जत्रेला गावकरी पाठीला बळीचा बकरा बांधून चढतात. शिवाय दर ठराविक काळानी ( मला वाटतं वर्षभरानी ) ते खोड आणि वेल बदलण्याचा कार्यक्रम असतो.
तर असा हा थरारक गडदचा भैरी. ह्या जागी मी तीनदा जाऊन आलो आहे आणि पहिल्या दोन्ही वेळा अतिशय सहजपणे मी वर चढलो आणि उतरलो. तिसऱ्या वेळी चढताना सहज वर गेलो पण उतरताना काय माहिती कसा काय्व्पण त्या वेलावर एके ठिकाणी मी अडकलो - म्हणजे पुढची स्टेप नक्की कुठे कशी खाली टाकावी ह्या संभ्रमात पडलो. अशा जागी जो पर्यंत तुम्ही निर्णयाबद्दल नक्की नसता तो पर्यंत पाऊल पुढे टाकण्यात अर्थ नसतो. त्या मुळे मी तिथेच वेलीला धरून पाय कड्यावर, पाठीला सॅक आणि खाली दरी अशा त्रिशंकू अवस्थेत लटकलो. जसजसा वेळ जाऊ लागला तसतशी हाताला रग लागायला लागली. कितीही नाही बघायचं ठरवलं तरी लक्ष खाली दरीकडे जाऊ लागलं आणि त्याचा परिणाम म्हणून आत्मविश्वास डळमळला आणि माझे पाय थरथर कापायला लागले. बरं त्या वेलावर एकावेळी एकापेक्षा अधिक व्यक्ती येणं शक्य व योग्य नसल्याने माझे मित्रपण वरून किंवा खालून सूचना देण्यापलीकडे काहीच करू शकत नव्हते. अखेरीस जवळपास आठ दहा मिनीटानंतर ( हा कालावधी नंतर मित्रांनी सांगितल्यावर कळला - माझ्यासाठी ती कित्येक युगं होती ) मी कसंतरी स्वत:ला सावरलं आणि हिय्या करून पुढचं पाऊल टाकलं. त्या एका पावलाचीच गरज होती कारण पुढील मार्ग मी परत सराइतपणे पार करून खाली आलो. पण आजही माझ्या डोळ्यापुढे ती वेलावर लटकताना खाली खोल दिसणारी दरी येते.
त्यानंतरही मी अनेक हाइक्स केल्या. कित्येक नवीन वर्षं गडावर साजरी केली. पुढे नोकरीच्या निमीत्ताने गुजरातमध्ये आलो आणि सह्याद्रीची साथ सुटली.
पण आजही ते काळे कभिन्न डोंगर कडे, ती माती, दाट झाडी, रणरणत्या उन्हातील दमवणूक नी तहान, वर पोचल्यावर प्यायलेलं टाक्यातलं थंडगार पाणी, सर्वांगाला सुखावणारा गार वारा, झोडपून काढणारा पाऊस, धबधब्या खाली केलेल्या आंघोळी, तीन दगड मांडून केलेली चूल आणि त्यावरचं मसाला खिचडी किंवा कांदा बटाटा रस्सा भाजी नी भातचं जेवण, गडाच्या कानाकोपऱ्यातून आपल्यात भिनणारा महाराजांचा इतिहास, सूर्यास्ताच्या वेळी गडमाथ्यावर बसून गायलेल्या जय जय महाराष्ट्र माझा आणि वेडात मराठे वीर दौडले सात चे दऱ्याखोऱ्यातून घुमून येणारे प्रतिध्वनी आणि निसर्गाच्या रौद्र पण तरीही सुंदर रुपाच्या सान्निध्यात ते ऐकताना इतिहासाच्या स्मरणाने अंगावर उभे राहिलेले रोमांच - सग्गळं सगळं माझ्या स्मृतीत चिरतरुण असल्या प्रमाणे ताजं आहे आणि ताजा आहे माझा स्मृतीतला सखा - सह्याद्री.
---- मनिष मोहिले
ट्रेकिंग करताना येणारे अनुभव आपल्याला समृद्ध करतात. खूप नवे नवे मित्रही होतात
ReplyDeleteसुंदर लेख मनिष
लेख वाचून परत ट्रेक ची इच्छा झाली. आपण सगळे शाळकरी मित्र कधीतरी जाऊया.
ReplyDelete