Wednesday, July 13, 2016

बोलावा विठ्ठल

काल ११ जुलै २०१६ ला पंचम निषाद प्रस्तुत "बोलावा विठ्ठल" कार्यक्रम पाहिला; किंवा ऐकला म्हणणं जास्त संयुक्तिक ठरेल.

देवकी पंडीत, आनंद भाटे आणि रघुनंदन पणशीकर अशा दिग्गज कलाकारांनी सादर केलेले दहा अभंग असा हा कार्यक्रम आषाढ महिन्याच्या निमीत्ताने अहमदाबादला काल संपन्न झाला आणि त्यातील सुरवर्षावाबरोबरच इतके दिवस अहमदाबादला हुलकावण्या देणाऱ्या वरुणराजाने देखील जणू ह्या संगीतसोह्ळ्यासाठी आपली हजेरी लावली.

शशी व्यास ह्यांच्या उत्कृष्ट समयोचित संकलनातून सादर होणाऱ्या या भक्तीरसपूर्ण अभंगसंगीत कार्यक्रमाची सुरुवात झाली रघुनंदन पणशीकर व आनंद भाटे या दोघांनी मिळून गायलेल्या जय जय रामकृष्ण हरी या अभंगानी. अतिशय रसाळपणे हा अभंग सादर करताना एक सुरेख आणि सुरेल जुगलबंदी देखील या गायकद्वयीनी पेश केली.

त्यानंतर रघुनंदन पणशीकरांनी राजस सुकुमार मदनाचा पुतळा, बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल आणि  श्री अनंता कमलाकांता पद्मनाभा नारायणा हे तीन अभंग सादर करून अक्षरशः मोहून टाकलं; तर देवकी पंडीत यांनी अबीर गुलाल, ताटी उघडा   ज्ञानेश्वरा आणि संत फार पंढरीत हे तीन अभंग आपल्या सुरेल आवाजात सादर केले आणि;  सगळ्यात शेवटी आनंद भाट्यांनी अवघाची संसार सुखाचा करीन, तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल आणि जो नित हरी को भजे हे पंडीत भीमसेन जोशींनी अजरामर केलेले अभंग, पंडीतजींचा शिष्य म्हणून परंतु स्वत:ची प्रतिभा दाखवत सादर केले आणि शास्त्रीय संगीताच्या माध्यमातून भक्तीरसात बुडवून काढणारा कार्यक्रम संपला.

ह्या तिनही अतिशय ताकदीच्या गायक कलाकारांना साथे देणारा वाद्यवृंदही तेव्हढ्याच तयारीचा होता. तबल्यावर साई बॅंकर, पखवाज वर प्रकाश शेजवळ, साईड ऱ्हिदम ला सूर्यकांत सुर्वे, पेटीवर (पेटीला संवादिनी हा अतिशय चपखल प्रतिशब्द आहे हे शशी व्यासांकडून कळलं) आदित्य ओक आणि बासरीवर पारसनाथ नावाचा युवा वादक कलाकार - या सगळ्यांनी या संगीतसोहळ्यात अधिकच मजा आणली. विशेष करून पारसनाथनी तर जवळपास प्रत्येक अभंगात आपल्या बासरीतून मंत्रमुग्ध करणारी सुरांची जादू पसरवली. अवघाची संसार मध्ये आदित्य ओक नी संवादिनीमधून गात्या गळ्यातील सुरांशी अत्यंत सुरेख संवाद साधणारे सूर निर्माण केले. साईजी आणि प्रकाशजी यांनी देखील तबल्यावर आणि पखवाजवर सफाईदारपणे पडणाऱ्या हातातून भजनी तालातील सुंदर जागा व वैविध्य दाखवून मजा आणली. बोलावा विठ्ठल या पणशीकरांनी गायलेल्या अभंगात सूर्यकांत सुर्वेंनी शेवटी जी झांज वाजवली ती लाजवाब होती.

दहा वेगवेगळे अभंग - रचणारे संत वेगळे, संगीत देणारे संगीत दिग्दर्शक वेगळे आणि गाणारे तीन कलाकारही वेगवेगळ्या शैलीत गाणारे - पण एक समानधागा - विठ्ठलाला आळवणाऱ्या, त्याला प्रेमानी आवाहन करणाऱ्या प्रेमाचा आणि भक्तीचा.

जुन्या काळातील कर्मठ जातीयवादामुळे, उंबरठ्याशी कैसे शिवू आम्ही जातीहीन; तुझे रुप कैसे पाहू त्यात आम्ही दीन अशी परिस्थिती असून सुद्धा चंद्रभागेच्या पाण्यात अंग अंग न्हाऊन कानड्यावर इतकं प्रेम आणि त्याच्या पायाशी भक्ती की सर्व संतांच्या अभंगातून एकच संदेश - त्या राजस सुकुमार मदनाच्या पुतळ्याला अनंत, कमलकांत, पद्मनाभ, नारायण, कानडा, विठ्ठल कोणत्याही नावानी हाक मारा पण मनी भाव असाच असू द्या आणि जीवन असच जगा की बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीवभावे. आणि मग मोक्षासाठी मुक्तीसाठी परमानंदासाठी वेगळ्या पूजेची तीर्थयात्रेची गरजच राहणार नाही कारण तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल, देव विठ्ठल देवपूजा विठ्ठल.

किती उदात्त संदेश. किती त्या विठूवर आणि स्वत:च्या भक्तीरसपूर्ण प्रेमावर विश्वास - अतूट, अभंग आणि अशा या अभंग विश्वासातून निर्माण झालेली ती - "अभंगवाणी"

आजही हे सगळे अभंग हे तप: सिद्ध कलाकार जेव्हा अभिजात शास्त्रीय हिंदुस्तानी संगीताच्या मनोरम माध्यमातून सादर करतात  तेव्हा ते ऐकताना संगीत या कलेच्या आस्वादाबरोबरच, तो संदेश सुद्धा मनात हलकेच रुजतो. कार्यक्रम चालू असताना आणि नंतरही मनात कळत नकळत "ठ्ठल विठ्ठल विठ्ठल" चा गजर अखंड निनादत रहातो. अतिशय व्यवहारी पातळीवर जगल्या जाणाऱ्या आजच्या आपल्या जीवनशैलीत देखील निव्वळ काही तासात हे भावतरंग उमटण्यात ती अभंगवाणी, त्यातील भक्तीरस आणि ज्या माध्यमातून हे आपल्यापर्यंत पोचते ते अभिजात शास्त्रीय संगीत या तिन्हींचा सहयोग आहे.

संगीताला "नादब्रम्ह" का म्हणतात ह्याची ओळख करून देत मनाला गाण्यातून परब्रह्म भेटवणारा - बोलावा विठ्ठल - एकदा जरूर ऐकावाच.

-------- मनिष मोहिले 

No comments:

Post a Comment