महाभारत - महर्षी व्यासांनी लिहीलेला अभूतपूर्व ग्रंथ. एक अलौकिक ग्रंथ ज्यात मानव जीवनाचं मर्म सामावलेलं आहे. धर्म, अधर्म, वीरश्री, भ्याडपणा, देवत्व, पशुत्व, नैतिकता, अनैतिकता, सत्कृत्य, दुष्कृत्य, निरागसता, कपटीपणा - मानवी जीवनाचे परस्पर विरोधी कंगोरे एका अतीभव्य सर्व संहारक युद्धाच्या पार्श्वभूमीवर उलगडून दाखवणारा आणि त्यात मनुष्याला गुंगवून आणि गुंतवून टाकणारा ग्रंथ. साक्षात श्रीकृष्णाच्या मुखातून कर्मयोग ऐकवणारा ग्रंथ.
अशा या महाभारताची आणि त्यातील सर्व व्यक्तीरेखांची आपल्या संस्कृतीवर, समाजमानसावर एक मोहिनी पडलेली आहे जी अनादि काळापासून आहे आणि अनंत काळापर्यंत राहील - जो पर्यंत वर उल्लेखलेले परस्पर विरोधी भाव भावना आहेत तो पर्यंत महाभारत आपल्याला आकर्षित करत राहील.
त्यामुळेच आजपर्यंत आपल्या वाड़मयात अनेक पुस्तकं महाभारतावर लिहीली गेली. काही विवेचनात्मक होती. उदा. दाजी पणशीकरांचं महाभारत एक सूडाचा प्रवास, आनंद साधल्यांचं हा जय नावाचा इतिहास आहे. तर काही लेखकाना त्यातील व्यक्तीरेखांनी आकर्षित केलं. उदा विं सं खांडेकरांचं ययाति, रणजित देसायांचं
अशा या महाभारताची आणि त्यातील सर्व व्यक्तीरेखांची आपल्या संस्कृतीवर, समाजमानसावर एक मोहिनी पडलेली आहे जी अनादि काळापासून आहे आणि अनंत काळापर्यंत राहील - जो पर्यंत वर उल्लेखलेले परस्पर विरोधी भाव भावना आहेत तो पर्यंत महाभारत आपल्याला आकर्षित करत राहील.
त्यामुळेच आजपर्यंत आपल्या वाड़मयात अनेक पुस्तकं महाभारतावर लिहीली गेली. काही विवेचनात्मक होती. उदा. दाजी पणशीकरांचं महाभारत एक सूडाचा प्रवास, आनंद साधल्यांचं हा जय नावाचा इतिहास आहे. तर काही लेखकाना त्यातील व्यक्तीरेखांनी आकर्षित केलं. उदा विं सं खांडेकरांचं ययाति, रणजित देसायांचं
राधेय किंवा शिवाजी सावंतांचं मृत्यूंजय.
महाभारतातील अशीच एक अत्यंत महत्वाची व्यक्तीरेखा अश्वत्थामा. भारतीय युद्धाचा रक्तलांचछित शेवट करणारा आणि सात भाग्यवान चिरंजीवामधील एकमेव अभागी चिरंजीव. अशा या अश्वत्थाम्याच्या दृष्टीकोनातून संपूर्ण महाभारत सांगण्याचा आणि कलीयुगातही जिवंत राहिलेल्या द्वापारातील त्या चिरंजीवाचा सद्य जीवन प्रवास कल्पिण्याचा प्रयत्न श्री अशोक समेळ यांनी केला आहे त्यांच्या - मी अश्वत्थामा चिरंजीव या कादंबरीतून.
अस्तंबा (सातपुडा पर्वतराजीतील पहिला पर्वत) पर्वतावर राहणारा, विस्मृतीच्या गर्तेत बुडालेला, त्यातच स्वत:च्याही नकळत तिथल्या आदीवासांच्या मनात देव बनलेला कलीयुगातील अश्वत्थामा आपल्या संभ्रमावस्थेतून बाहेर पडण्यासाठी स्वत:च्या शोधात अस्तंब्यावरून खाली उतरून फिरतीवर निघतो आणि त्याच्याबरोबर वाचकही या रोमहर्षक प्रवासाला सुरूवात करतो.
कलीयुगातील वर्तमान आणि द्वापारातील भूतकाळ यांच्यामध्ये आंदोळत अश्वत्थाम्याची स्मृती पूर्ण जागृत होते आणि आपण कोण हे कळल्यानंतर त्याच्या आपण असे का ह्या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी भटकंती सुरू होते. या भटकंतीचा शेवट काय आहे ? अस्तंब्यापासून सुरू झालेली ह्या भटकंतीची अश्वत्थाम्याच्या आत्मसंवादातून आपल्यापर्यंत पोचणारी कहाणी म्हणजेच मी अश्वत्थामा चिरंजीव.
कलीयुगात अश्वत्थाम्याला प्रत्यक्षात भेटलेल्या, बघितलेल्या अनेकांना आलेले आणि अश्वत्थाम्याच्या चिरंजीवित्वाचं गूढ उकलता उकलता वाढवणारे अनुभव, महाभारताच्या अठरा खंडांचं वाचन व आकलन, अनेक संदर्भग्रंथ यातून श्री अशोक समेळ अश्वत्थाम्याची ही कहाणी अतिशय परिणामकारकरित्या आपल्याला सांगतात.
आता श्री समेळ हे मुळात नाटककार, अभिनेते आणि दिग्दर्शक. त्यामुळे नाटककार म्हणून ते प्रस्थापित लेखक असले तरी कादंबरी ची लेखनशैली आणि भाषेचा फुलोरा वेगळा असतो ह्याचं भान ही कादंबरी लिहीताना समेळानी ठेवलंय.
दृपद आणि द्रोण यांच्यातील भांडणापासून सुरू होणारी सूडकथा अश्वत्थाम्यानी केलेल्या अमानुष भ्याड कत्तलीवर संपते. या संपूर्ण कथाकथनात अद्भुतरसाचा वापर करत समेळ आपल्याला महाभारत काळात फिरवून आणतात. पण ही सलग महाभारताची कथा नाही तर मधे मधे वर्तमानातील संभ्रमित अश्वत्थामा आणि त्याच्याशी संबंधित अनुभव व त्याचबरोबर अश्वत्थाम्याची एक नवी परोपकारी धार्मिक मानसिकता व वैचारीक बैठक यांचा विकास हे ही आपण वाचत असतो.
हे वर्तमानातून भूतकाळात आणि भूतकाळातून परत वर्तमानात असं जे कथाकथनाचं कालसंक्रमण आहे ते समेळांनी अतिशय सुरेख व सुलभपणे हाताळलय. कुठेही त्या कालसंक्रमणाचा धक्का न बसता कहाणी पुढे सरकते - भूतकाळातही आणि वर्तमानातही.
आपल्या सर्वाना माहीत असलेलं महाभारत - अश्वत्थाम्याच्या दृष्टीकोनातून. त्यामुळे मी त्यातील घटनांबद्दल बोलणार नाही. मात्र त्यातील व्यक्तिरेखांचं जे चित्रण लेखकाने केलेलं आहे त्याबद्दल थोडसं सांगणं आवश्यक आहे. दुष्ट कौरव आणि सुष्ट पांडव व त्याना सहाय्य करणारा भगवान श्री कृष्ण अशी सरळ सरळ चांगल्या वाईटाची मांडणी आहे आणि हे करताना कौरवांचा दुष्टपणा अधिकाधिक उठून दिसेल आणि पांडवांचं धर्मानुसार केलेलं वर्तन ही उठून दिसेल ही काळजी स्वाभाविकपणे घेतलेली आहेे . मात्र कर्णाचं मद्यपी, कपटी, पळपुटा असं रंगवलेलं व्यक्तिमत्व कुठेतरी पटत नाही. आपल्या मनावरील मृत्यूंजय मधल्या कथानायक कर्णाचा पगडा मान्य केला (तरीही मृत्यूंजय मधे कर्णाच्या द्रौपदी वस्त्रहरणाच्या वेळेच्या अयोग्य वर्तनाचं समर्थन केलेलं नाही) आणि समेळांनी ही कादंबरी लिहीताना निश्चीतपणे कर्णाचं चित्र साधार अशा पद्धतीचं रंगवलं असं गृहीत धरलं तरी कमीत कमी कर्णाच्या शौर्याबद्दल दुमत नसावं. ते जर असतं तर कुंतीनी कर्णाकडून फक्त अर्जुन सोडून इतर पांडवाना अभय द्यायचं वचन घेतलच नसतं. भीष्मानी त्याला अर्धरथी व सूतपुत्र संबोधून त्याचा तेजोभंग करण्याचा प्रयत्न करण्याची आणि त्याला युद्धापासून दूर ठेवण्याचीही गरज नव्हती. असो. हा एक विवाद्य ( माझ्या दृष्टीने) मुद्दा सोडला तर बाकी व्यक्तिरेखांचं चित्रण सुरेख. अश्वत्थाम्याची दुर्योधनाप्रती राजनिष्ठा आणि पांडवाबद्दल चं प्रेम आणि त्यांची बाजू योग्यअसल्यामुळे होणारी मानसिक ओढाताण हे देखील परिणामकारक रित्या दाखवलय.
घटनांची नाट्यमयता छान सांभाळली आहे आणि भारतीय युद्धाच्या अठरा दिवसांचं वर्णन अद्भुत आणि रोमहर्षक.
पण या सगळ्यापेक्षा महत्वाचा एक भाग ज्यावर संपूर्ण कादंबरीचा तोल आहे तो म्हणजे अश्वत्थाम्याला शाप म्हणून मिळालेलं चिरंजीवपद आणि त्याची भळभळणारी दुर्गंधीयुक्त जखम हेच कलीयुगातील मानवी जीवन आणि दस्तुरखुद्द अश्वत्थामा हा स्वत: कलीयुगाचं जिवंत प्रतीक आणि या स्वत:च्या ओळखीला बदलण्यासाठीची त्याची धडपड हा तो भाग.
कपटानी आणि भ्याडपणे अश्वत्थाम्यानी जी अमानुष कत्तल करून भारतीय युद्ध संपवलं आणि पांडवांचा विजयाचा आनंद हिरावून घेतला त्या घटनेचा परिपाक म्हणून द्वापारयुगाचा अंत होऊन सुरू झालेलं कलीयुग आणि अशा दुर्गुण व दुष्कृत्य आणि अधर्मानी बोकाळलेल्या कलीयुगात अश्वत्थाम्याचं बदललेलं उत्तरदायीत्व हे केंद्रस्थानी ठेऊन ही कादंबरी फुलत जाते.
आज अश्वत्थामा, व्यासांचं " ज्या धर्माचं पालन केलं असता अर्थ आणि काम मिळतो अशा धर्माचं पालन करा हे माझं सांगणं कोणी का ऐकत नाही " हे गाऱ्हाणे व्यर्थ जाऊ नये म्हणून, चिरंजीव जखमेसाठी तेल मागत वणवणत धर्माची - मनुष्यधर्माची शिकवण देत फिरतोय. या अवस्थेसाठी त्याचा शीघ्रकोपी अविचारच जरी जबाबदार असला तरी तो त्या पापाचं क्षालन करण्याचा प्रयत्न करतोय - प्रत्यक्ष भगवान कृष्णाच्या आशीर्वादाने, ज्यानी त्याला शाप दिला होता.
जो पर्यंत अश्वत्थाम्याची जखम भळभळतेय तो पर्यंत कलीयुग जिवंत आहे. ज्या दिवशी अश्वत्थाम्याची भळभळणारी जखम तेलाअभावी कोरडी पडेल त्या दिवशी प्रलय होइल हे सांगून लेखक आवाहन करतो की म्हणून अश्वत्थाम्याला तेल देत रहा आणि कलीयुग बुडण्यापासून वाचवा.
वैयक्तिकरित्या माझ्या मते एका व्यक्तीच्या वैयक्तिक दु:खावर ( I know it is symbolic आणि आपण मनुष्यधर्माचं आचरण करावं हेच आवाहन लेखक करतोय ) विसंबून राहून कलीयुग जिवंत ठेवण्यापेक्षा, कलीयुगाचं अस्तित्व वा नष्ट होणं नियतीवर सोडून द्यावं पण मनुष्यधर्माचं पालन करून परत एकदा कृतयुगाला अवतरण्याचं आवाहन करावं हेच अधिक योग्य ठरेल आणि तरच अश्वत्थाम्याची भळभळणारी चिरंजीव जखम आणि वणवण यांचं सार्थक होऊन त्याला मुक्ती मिळेल.
-- मनिष मोहिले
No comments:
Post a Comment