बोलावा विठ्ठल - जुलै २०१८
पंचम निषाद प्रस्तुत "बोलावा विठ्ठल" चा
अहमदाबाद मधला चौथा प्रयोग काल २१ जुलै २०१८ रोजी संपन्न झाला.
दरवर्षी प्रमाणेच अहमदाबादला उशीरापर्यंत हुलकावणी देत रहाणाऱ्या पर्जन्यराजाने दोन दिवसापासून अहमदाबादला मुक्काम ठोकला होता. जणू स्वत: पाऊस देखील बोलावा विठ्ठलच्या भक्तीरसपूर्ण संगीतात चिंब भिजण्याची वाट बघत थांबला होता.
आणि पर्जन्यराजाचे तसेच सर्वसामान्य रसिकांचे हे वाट पहाणे सार्थकी लागावे असाच हा कार्यक्रम झाला.
देवकी पंडीत, राहुल देशपांडे व आनंद भाटे यांच्या तप:सिद्ध गळ्यातून निघणाऱ्या सूरब्रह्मानी मिळणाऱ्या अलौकिक आनंदाचे वर्णन करायला नवीन शब्द, उपमा कुठून शोधून आणाव्या ? अप्रतिम, अद्भुत, अलौकिक - अभिजात शास्त्रीय संगीताच्या तप:पूत माध्यामातून दैदीप्यमान ऐश्वर्य भक्तीरसातून श्रोत्यांना लाभावे अशी ही कलासाधना - त्यात त्याना साथ करणारा, तितक्याच तोलामोलाचा वाद्यवृंद - संवादिनीवर आदित्य ओक, तबल्यावर प्रसाद पाध्ये, पखवाजवर सुखद मुंडे , बासरीवर वरद कथापूरकर आणि झांज व इतर सहाय्यक तालवाद्यांवर सचिन भांगरे या सर्वानी मिळून मूर्तीमंत नादब्रह्माला सभागृहात पाचारण केले म्हटल्यास अतिशयोक्ती ठरू नये.
प्रत्येक गायकाने स्वत:च्या शैलीत सादर केलेले विविध अभंग आणि अप्रतिम वाद्यमेळ या साऱ्यातून या वर्षी एक रसिक म्हणून मिळणाऱ्या संगीतानंदाशिवाय मला एक माणूस म्हणून काय मिळालं - तर माझ्या अल्पमतीप्रमाणे एका समान धाग्याचं आकलन / समज - तोच धागा, ज्या धाग्याने सर्व संतमंडळी देखील एकत्र ओवली गेली - ईश्वरावर असलेली आत्यंतिक भक्ती - जो ईश्वर सर्व संतांनी विठ्ठलाच्या स्वरुपात बघितला आणि काल संगीताच्या माध्यमातून सर्व रसिकांच्या मनात भरून राहिला.
असा ईश्वर ज्याचा अंत व पार वेदांना देखील नाही लागला. सृष्टीच्या निर्मितीपासून अनेक शास्त्रीय व आध्यात्मिक अंगांचे रहस्य बुद्धीच्या अंगाने जाणून घेऊन ईश्वरप्राप्तीचा मार्ग दाखवणाऱ्या आणि निखळ बुद्धीचं प्रतीक मानल्या गेलेल्या वेदांच्याही आकलनापलीकडले हे निराकार आणि निर्गुण ईशतत्व संताना मात्र सहजप्राप्त झाले - इतके की त्या संतांसाठी त्या निराकार निर्गुण ईशतत्वाने पंढरीच्या विठ्ठलाच्या रुपात स्वत:स साकार केले. वरकरणी कटीवर हात ठेवून विटेवर मूक उभे रहातानाच ह्या कानड्याने कुणाची खीर चाखली, कुणाची गुरे राखली तर कुणासाठी राजदरबारी द्रव्याच्या राशी ओतून आपल्या भक्ताच्या भक्तीची आणि स्वत:च्या ऐश्वर्याची बूज राखली आणि मूक मूर्तीरुपातून साक्षात चैतन्य साकार केले. संतांच्या मनीचे हे साकार भावरूप आजही लाखो करोडो भक्तांसाठी शेवटचे विश्वासस्थळ आहे.
ज्ञानाची प्राप्ती हीच ईश्वरप्राप्ती असली आणि ज्ञान मिळवणे हा त्यासाठीचा ईश्वरानेच सांगितलेला मार्ग असला तरी त्या मार्गावर अनेक अडथळे आहेत - प्राप्त झालेल्या ज्ञानाला अंतिम ज्ञान समजण्याची चूक, ज्ञानमार्गावर प्राप्त झालेल्या सिद्धींमध्ये अडकून अंतिम साध्यापासून मार्गच्युत होण्याची शक्यता, निव्वळ चौकसपणात अडकून ईश्वरीय तत्वाबद्दलच अविश्वास निर्माण होण्याची शक्यता - या व अशाच इतर अनेक अडथळ्यातून मार्ग काढत शेवटपर्यंत चिकाटीने प्रयत्न करत राह्यलास या मार्गावर देखील ईश्वर भेटू शकतो.
पण संतांनी यापेक्षा सोपा मार्ग शोधला - भक्तीचा. त्या परम ईशतत्वाच्या चरणी अनन्यसाधारण भक्ती. आयुष्यातील सुख दु:ख अनुभवतानादेखील त्याच एका भक्तीच्या आणि विश्वासाच्या आधारावर सर्व प्रसंगातून पार पडण्यासाठी त्याच ईश्वरावर निखळ भक्ती ठेवत संतांनी ईश्वरप्राप्ती करून घेतली. अहं ब्रह्मास्मि हे ज्ञान या मार्गावर त्यांना सहजप्राप्त झाले - अशा रितीने की ते परब्रह्म स्वत: संतांच्या भक्तीमुळे त्यांना येऊन भेटले. आणि ईश्वरभेटीमुळे लाभलेल्या स्वाभाविक आत्मानंदातून लाभलेल्या ज्ञानाचा परिपाक म्हणजे हे परम ज्ञान, आत्मानंद स्वत:च्या मुक्तीपुरते मर्यादित न ठेवता अखिल मानवजातीच्या कल्याणासाठी संतांनी प्रयत्न केले - स्वत:च्या वागणूकीतून मार्गदर्शन केले, स्वत:ची भकीसाधना अभंगान्मधून सर्वसामान्य जनांपर्यंत पोहोचवण्याचा अथक उद्योग केला.
हे सगळं शक्य झालं कारण संत स्वत: त्या ईशतत्वाशी समरस झाले, एकरूप झाले; आणि ही समरसता / एकरूपता त्याना शक्य झाली कारण ते ईश्वराच्या चरणाशी समर्पित झाले होते - लक्ष्मी वल्लभा - सुख तुझे पायी, तेथेच आम्हा ठेव ही ती समर्पणाची भावना.
समर्पण असल्याखेरीज समरस होता येत नाही, एकरूप होता येत नाही. आणि तेच समर्पण असलं की अशी एकरूपता होते की वेगळं अस्तित्व ऊरत नाही.
हे आकलन, ही समज जेव्हा आपल्या आचरणाचा एक भाग बनतात तेव्हा त्या भक्तीमार्गावर आपला प्रवास सुरू होतो - त्या अंतिम सत्याप्रत पोहोचण्याचा.
ज्ञान अथवा भक्ती - मार्ग भिन्न आहेत - मुक्काम एकच आहे. पण भक्तीमार्ग अनुसरला तर अक्षरओळख नसली तरी निव्वळ भावाच्या जोरावर भवसागर तरून जाता येते - अशा ईश्वराप्रत ज्याचा अंत वा पार योग्य त्या भावाशिवाय प्रत्यक्ष वेदांनाही नाही कळला.
हे माझं भाग्य की एक रसिक आणि एक माणूस म्हणून प्रत्येकवेळी मला स्वत:ला समृद्ध व प्रगल्भ बनवणारा हा संगीतानुभव घेण्याची संधी मला सातत्याने तीन वर्ष मिळाली.
ही अशी श्रवणभक्ती हे कदाचित त्या परमात्म्याने आपल्यासाठी ठरवलेल्या मार्गावरचं एक पाऊल असू शकेल. ह्या पावलांची मजल वाढत जावो हीच त्या विठ्ठलाच्या चरणी प्रार्थना.
ठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल !!
------ © मनिष मोहिले
पंचम निषाद प्रस्तुत "बोलावा विठ्ठल" चा
अहमदाबाद मधला चौथा प्रयोग काल २१ जुलै २०१८ रोजी संपन्न झाला.
दरवर्षी प्रमाणेच अहमदाबादला उशीरापर्यंत हुलकावणी देत रहाणाऱ्या पर्जन्यराजाने दोन दिवसापासून अहमदाबादला मुक्काम ठोकला होता. जणू स्वत: पाऊस देखील बोलावा विठ्ठलच्या भक्तीरसपूर्ण संगीतात चिंब भिजण्याची वाट बघत थांबला होता.
आणि पर्जन्यराजाचे तसेच सर्वसामान्य रसिकांचे हे वाट पहाणे सार्थकी लागावे असाच हा कार्यक्रम झाला.
देवकी पंडीत, राहुल देशपांडे व आनंद भाटे यांच्या तप:सिद्ध गळ्यातून निघणाऱ्या सूरब्रह्मानी मिळणाऱ्या अलौकिक आनंदाचे वर्णन करायला नवीन शब्द, उपमा कुठून शोधून आणाव्या ? अप्रतिम, अद्भुत, अलौकिक - अभिजात शास्त्रीय संगीताच्या तप:पूत माध्यामातून दैदीप्यमान ऐश्वर्य भक्तीरसातून श्रोत्यांना लाभावे अशी ही कलासाधना - त्यात त्याना साथ करणारा, तितक्याच तोलामोलाचा वाद्यवृंद - संवादिनीवर आदित्य ओक, तबल्यावर प्रसाद पाध्ये, पखवाजवर सुखद मुंडे , बासरीवर वरद कथापूरकर आणि झांज व इतर सहाय्यक तालवाद्यांवर सचिन भांगरे या सर्वानी मिळून मूर्तीमंत नादब्रह्माला सभागृहात पाचारण केले म्हटल्यास अतिशयोक्ती ठरू नये.
प्रत्येक गायकाने स्वत:च्या शैलीत सादर केलेले विविध अभंग आणि अप्रतिम वाद्यमेळ या साऱ्यातून या वर्षी एक रसिक म्हणून मिळणाऱ्या संगीतानंदाशिवाय मला एक माणूस म्हणून काय मिळालं - तर माझ्या अल्पमतीप्रमाणे एका समान धाग्याचं आकलन / समज - तोच धागा, ज्या धाग्याने सर्व संतमंडळी देखील एकत्र ओवली गेली - ईश्वरावर असलेली आत्यंतिक भक्ती - जो ईश्वर सर्व संतांनी विठ्ठलाच्या स्वरुपात बघितला आणि काल संगीताच्या माध्यमातून सर्व रसिकांच्या मनात भरून राहिला.
असा ईश्वर ज्याचा अंत व पार वेदांना देखील नाही लागला. सृष्टीच्या निर्मितीपासून अनेक शास्त्रीय व आध्यात्मिक अंगांचे रहस्य बुद्धीच्या अंगाने जाणून घेऊन ईश्वरप्राप्तीचा मार्ग दाखवणाऱ्या आणि निखळ बुद्धीचं प्रतीक मानल्या गेलेल्या वेदांच्याही आकलनापलीकडले हे निराकार आणि निर्गुण ईशतत्व संताना मात्र सहजप्राप्त झाले - इतके की त्या संतांसाठी त्या निराकार निर्गुण ईशतत्वाने पंढरीच्या विठ्ठलाच्या रुपात स्वत:स साकार केले. वरकरणी कटीवर हात ठेवून विटेवर मूक उभे रहातानाच ह्या कानड्याने कुणाची खीर चाखली, कुणाची गुरे राखली तर कुणासाठी राजदरबारी द्रव्याच्या राशी ओतून आपल्या भक्ताच्या भक्तीची आणि स्वत:च्या ऐश्वर्याची बूज राखली आणि मूक मूर्तीरुपातून साक्षात चैतन्य साकार केले. संतांच्या मनीचे हे साकार भावरूप आजही लाखो करोडो भक्तांसाठी शेवटचे विश्वासस्थळ आहे.
ज्ञानाची प्राप्ती हीच ईश्वरप्राप्ती असली आणि ज्ञान मिळवणे हा त्यासाठीचा ईश्वरानेच सांगितलेला मार्ग असला तरी त्या मार्गावर अनेक अडथळे आहेत - प्राप्त झालेल्या ज्ञानाला अंतिम ज्ञान समजण्याची चूक, ज्ञानमार्गावर प्राप्त झालेल्या सिद्धींमध्ये अडकून अंतिम साध्यापासून मार्गच्युत होण्याची शक्यता, निव्वळ चौकसपणात अडकून ईश्वरीय तत्वाबद्दलच अविश्वास निर्माण होण्याची शक्यता - या व अशाच इतर अनेक अडथळ्यातून मार्ग काढत शेवटपर्यंत चिकाटीने प्रयत्न करत राह्यलास या मार्गावर देखील ईश्वर भेटू शकतो.
पण संतांनी यापेक्षा सोपा मार्ग शोधला - भक्तीचा. त्या परम ईशतत्वाच्या चरणी अनन्यसाधारण भक्ती. आयुष्यातील सुख दु:ख अनुभवतानादेखील त्याच एका भक्तीच्या आणि विश्वासाच्या आधारावर सर्व प्रसंगातून पार पडण्यासाठी त्याच ईश्वरावर निखळ भक्ती ठेवत संतांनी ईश्वरप्राप्ती करून घेतली. अहं ब्रह्मास्मि हे ज्ञान या मार्गावर त्यांना सहजप्राप्त झाले - अशा रितीने की ते परब्रह्म स्वत: संतांच्या भक्तीमुळे त्यांना येऊन भेटले. आणि ईश्वरभेटीमुळे लाभलेल्या स्वाभाविक आत्मानंदातून लाभलेल्या ज्ञानाचा परिपाक म्हणजे हे परम ज्ञान, आत्मानंद स्वत:च्या मुक्तीपुरते मर्यादित न ठेवता अखिल मानवजातीच्या कल्याणासाठी संतांनी प्रयत्न केले - स्वत:च्या वागणूकीतून मार्गदर्शन केले, स्वत:ची भकीसाधना अभंगान्मधून सर्वसामान्य जनांपर्यंत पोहोचवण्याचा अथक उद्योग केला.
हे सगळं शक्य झालं कारण संत स्वत: त्या ईशतत्वाशी समरस झाले, एकरूप झाले; आणि ही समरसता / एकरूपता त्याना शक्य झाली कारण ते ईश्वराच्या चरणाशी समर्पित झाले होते - लक्ष्मी वल्लभा - सुख तुझे पायी, तेथेच आम्हा ठेव ही ती समर्पणाची भावना.
समर्पण असल्याखेरीज समरस होता येत नाही, एकरूप होता येत नाही. आणि तेच समर्पण असलं की अशी एकरूपता होते की वेगळं अस्तित्व ऊरत नाही.
हे आकलन, ही समज जेव्हा आपल्या आचरणाचा एक भाग बनतात तेव्हा त्या भक्तीमार्गावर आपला प्रवास सुरू होतो - त्या अंतिम सत्याप्रत पोहोचण्याचा.
ज्ञान अथवा भक्ती - मार्ग भिन्न आहेत - मुक्काम एकच आहे. पण भक्तीमार्ग अनुसरला तर अक्षरओळख नसली तरी निव्वळ भावाच्या जोरावर भवसागर तरून जाता येते - अशा ईश्वराप्रत ज्याचा अंत वा पार योग्य त्या भावाशिवाय प्रत्यक्ष वेदांनाही नाही कळला.
हे माझं भाग्य की एक रसिक आणि एक माणूस म्हणून प्रत्येकवेळी मला स्वत:ला समृद्ध व प्रगल्भ बनवणारा हा संगीतानुभव घेण्याची संधी मला सातत्याने तीन वर्ष मिळाली.
ही अशी श्रवणभक्ती हे कदाचित त्या परमात्म्याने आपल्यासाठी ठरवलेल्या मार्गावरचं एक पाऊल असू शकेल. ह्या पावलांची मजल वाढत जावो हीच त्या विठ्ठलाच्या चरणी प्रार्थना.
ठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल !!
------ © मनिष मोहिले
No comments:
Post a Comment