युगंधर आणि व्यासपर्व
प्रस्तावना
लेखाचं शीर्षक दोन अप्रतिम पुस्तकांच्या शीर्षकाने बनलेलं असलं तरी हा लेख म्हणजे काही ह्या दोन पुस्तकांची तुलना करायचा प्रयत्न नाही. हे ह्या साहित्यकृतींचं रसग्रहण वा समीक्षण देखील नाही. श्री. शिवाजी सावंत व श्रीमती दुर्गा भागवत ह्यांच्यासारख्या ज्येष्ठ व श्रेष्ठ आणि सिद्धहस्त साहित्यिकांच्या कलाकृतीबद्दल तौलनिक अभ्यास करण्याइतकं, रसग्रहण वा समीक्षण करण्याइतकं ज्ञान तर सोडाच, माझं तितकं वाचनही नाही. त्यामुळे ते औद्धत्य मी करू धजत नाही.
प्रासंगिकता इतकीच आहे की लहानपणापासून मृत्यूंजयची पारायणं केलेल्या मी; युगंधरसारखं पुस्तक आत्ता, वयाच्या जवळपास पन्नाशीला आल्यावर वाचलं आणि मग त्याबद्दल काही लिहावं असा विचार आल्यावर आणि सुदैवाने व्यासपर्व घरीच असल्याने त्याचाही परामर्श परत घेऊन मग दोन्हीबद्दल एकत्रच लिहावं म्हणून व्यासपर्व परत वाचलं आणि लिहायचं ठरवलं.
एक पुस्तक म्हणजे भारतीय युद्धाचा खरा प्रणेता व सारथी असलेल्या श्रीकृष्णाच्या जीवनावरची कादंबरी, ज्यात भारतीय युद्ध व कौरव पांडव यांच्यातील वैरात पांडवांच्या सख्याची भूमिका निभावणाऱ्या श्रीकृष्णाचं जीवन, हे महाभारतापेक्षा देखील कितीतरी अधिक कसं होतं हे उलगडून दाखवलेलं आहे तर दुसरं पुस्तक महाभारतासारख्या कालातीत महाकाव्यातील निवडक व्यक्तीरेखांचं विश्लेषण करणाऱ्या वैचारिक लेखांचा लघुसंग्रह आहे. मात्र दोन्ही या ना त्या प्रकारे महाभारताशी जोडलेली आहेत.
तेव्हा एक समान विषय पण भिन्न प्रकृती असलेल्या ह्या साहित्यकृती एक सामान्य वाचक म्हणून मला जशा कळल्या तशा त्या मांडण्याचा हा प्रयत्न. अस्तु.
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*
युगंधर
शिवाजी सावंत म्हटलं की अगदी स्वाभाविकपणे पहिलं नाव मनी येतं ते मृत्यूंजय चं, ज्यायोगे महाभारतातील कर्ण मराठी घराघरात आणि मनामनात पोहोचला. महाभारतात जीवनभर उपेक्षित राहून मृत्यूनंतर महत्पदाला पोचलेला कर्ण मृत्यूंजयमुळे रसिकांच्या मनात कायमसाठी महानायक बनून गेला. हे यश श्री शिवाजी सावंतांच्या महाभारत व त्यासंबंधी इतिहास, भूगोल, संस्कृती, परंपरा, लोककथा, मान्यता ह्यांच्या सखोल अभ्यासाचं व सिद्धहस्त लेखणीचं.
महाभारतातील सर्वच व्यक्तीरेखा आपापल्या परीने नाट्यमय व संघर्षमय जीवन जगल्या असल्या तरी त्यातील काही व्यक्तीरेखांचे संघर्ष हे इतरांपेक्षा अधिक मनोज्ञ, अंत:करणाला भिडणारे व त्याच बरोबर महाकथेचं बीज बनण्याची पात्रता असलेले दिसतात. कर्णाच्या व्यक्तीरेखेला, उच्चकुळ असूनही नियतीच्या भोवऱ्यात अडकून नीचकुळीचा, म्हणून जी उपेक्षा झेलावी लागते त्यामुळे त्यातील नाट्य अधिक प्रतीत होऊन श्री. सावंतांनी प्रथम कर्णाच्या व्यक्तिरेखेला हात घातला असावा.
मात्र, कर्ण हातावेगळा झाल्यावर, संपूर्ण भारतीय युद्धाचा जो खरा अध्वर्यू, त्या श्रीकृष्णाच्या जीवनातील परमनाट्य व संघर्ष; जे दोन्ही मानवी पातळी ओलांडून पारलौकिक पातळीवर पोहोचले; त्याचे आकर्षण श्री. सावंताना मोहवून गेले ह्यात नवल ते काय !!
नवल ह्यात की मृत्यूंजयच्या अफाट यशानंतर, श्री सावंतांनी, मृत्यूंजयच्याच आकृतीबंधात (format), महाभारतातीलच अजून एका व्यक्तीरेखेवर एक महाकादंबरी लिहीली आणि साहित्यिक मूल्य व लोकप्रियता ह्या दोन्ही मानदंडांवर ही महाकादंबरी देखील यशस्वी करून दाखवली. माझ्यामते ह्या यशाचं रहस्य आहे, ते श्रीकृष्ण हा केवळ भारतीय युद्धापुरता मर्यादित नसून; महाभारताव्यतिरिक्त बाकीचे जीवन तो ज्या समग्रतेने, निभवाव्या लागलेल्या प्रत्येक भूमिकेशी समरसून पण त्याचवेळी समदर्शीभावनेने जगला आणि युगानुयुगांसाठी जे आदर्श ठेऊन गेला, त्या त्याच्या पूर्णपुरूष योगेश्वर प्रतिमेचं जे चित्रण श्री सावंतांनी केलय, त्यात आहे.
मृत्यूंजयचाच आकृतीबंध स्विकारलेल्या ह्या महाकादंबरीतील वक्ते - स्वत: श्रीकृष्ण, त्याची सर्वात प्रिय पत्नी रुक्मिणी, सारथीसखा दारुक, सखी द्रौपदी, परमसखा अर्जुन, सखा सात्यकी आणि भावविश्वस्त (श्री सावंतांनी वापरलेलाच शब्द मी वापरतोय) उद्धव.
हेच वक्ते का निवडले ह्याबद्दल युगंधरच्या प्रस्तावनेतच श्री शिवाजी सावंतांनी त्यांची भूमिका व मनोगत विशद केले आहे. एक वाचक म्हणून, अमुकच प्रसंग लेखकाने अमुकच वक्त्याकडून का कथन करवले आहेत, त्यापेक्षा कमी वा जास्त का नाही ह्याचे माझ्या अल्पमतीला जे स्पष्टिकरण योग्य वाटले ते मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. श्रीकृष्णासारख्या परमात्म्याचं रुप असलेल्या पण मानवी देह धारण करणाऱ्या व्यक्तीरेखेचं, विज्ञानाचा आधार शक्यतो न सोडता; मानवी पातळीवरून अद्वितीयत्व दाखवायला अशाच व्यक्तीरेखा हव्यात, ज्याना सखा वा सखी म्हणून प्रत्यक्ष श्रीकृष्णाने स्विकारलं; कारण त्यांची ती पात्रता त्याला दिसली की जी कृष्णाला अनुसरून जगलेल्या स्वत:च्या जीवनातूनदेखील येणाऱ्या युगांना जीवनाचा तो अर्थ बोलून वा अबोलपणी समजावू शकतील जो श्रीकृष्णाला अभिप्रेत होता. ह्यात रुक्मिणी एकटीच अशी आहे की जिला कृष्णाने सखी म्हणून संबोधलेलं नाही. पण प्रथम व सर्वात प्रिय पत्नी बनलेली रुक्मिणी ही श्रीकृष्णाशी आचार विचारानी किती एकरुप झाली होती हे बघितल्यावर पत्नीच्या रुपात सहज मिसळलेलं पण वेगळं दिसून न येणारं तिचं सखीपण आपल्याला दिसतं.
श्रीकृष्ण - श्री. सावंतांनी श्रीकृष्णाच्या स्वत:च्या तोंडून गोकुळातील बाल्यापासून ते कंस वध, द्वारकानिर्मिती व रुक्मिणीहरण इथपर्यंतचीच कथा
ऐकवलेली आहे ज्यात मुख्य भाग आहे त्याच्या गोकुळातील बालपणाचा. युगानुयुगं कविकल्पना व आख्यायिका ह्यातून अनेक रंगरुपातून आपल्या समोर सादर झालेलं कृष्णाचं गोकुळातील बालपण, त्याचं व राधेचं प्रेम, ज्या नंद यशोदा ह्यांचा पुत्र म्हणून तो लहानाचा मोठा झाला त्या पालक मात्यापित्यांबरोबरचे व पूर्ण कुटुंबाबरोबरचे त्याचे भावबंध व इतर गोपसवंगड्यांबरोबरचं मैत्रीचं नातं ह्याचं मानवीय पातळीवरून व चमत्काराना टाळणारं एक सुरेख वर्णन आहे. चमत्काराना टाळणारं अशासाठी की गोवर्धन पर्वत उचलण्याचा प्रसंग व कालियामर्दन प्रसंग हे लेखकाने अतिशय व्यावहारिक रित्या उलगडून दाखवत मानवी शक्तीच्या शक्यतेच्या पातळीवर आणून बसवले आहेत. कंसवधाच्या वर्णनातदेखील श्रीकृष्ण व बलराम ह्यांची मल्लयुद्ध व मुष्टीयुद्ध ह्यातील पूर्वतयारीची पार्श्वभूमी तयार करून त्याच्या कौशल्यपूर्ण उपयोगाचं वर्णन केले आहे.
ह्या संपूर्ण भागात दोनच गोष्टी सर्वात महत्वाच्या - कृष्णाच्या आयुष्याचं सार असा प्रेमयोग - भवतालच्या सर्व जीवांप्रती निरपेक्ष व समदर्शी प्रेम जे त्यानी आयुष्यभर जे जे त्याच्या संपर्कात आले त्या सर्वाना दिलं आणि राधेच्या रुपाने स्त्रीत्वाच्या विविध स्थितींची ओळख - ज्यातील सर्वात महत्तम व पूजनीय असं सृजनात्मक स्थितीचं प्रतीक असलेली योनी - तिचं प्रतीक जे मोरपीस - ते जन्मभर आपल्या माथ्यावर वागवण्याइतकं वंदनीय मानून ते माथ्यावर वागवत त्याला सर्वोच्च सन्मान देणं. आपल्या संपूर्ण आयुष्यात आपल्या दोन्ही माता, सख्या, पत्नी, आत्या किंवा अगदी गांधारी आणि कामरुपातील सोळा सहस्त्र स्त्रिया - ह्या सर्वाना कृष्णाने अतीव सन्मान दिला. त्या त्याच्या मनोभूमिकेचं प्रतीक ते मोरपीस आणि ही जाणीव त्याला राधेनी दिली म्हणून त्यांचं प्रेम अमर. नाहीतर रा म्हणजे मिळो / लाभो व धा म्हणजे मोक्ष - राधा म्हणजे मोक्ष मिळो अशी प्रार्थना करणारा जीव अशी राधेची लिंगनिरपेक्ष व्याख्या प्रस्तावनेतच करून श्री सावंतांनी, चिंतनाच्या पातळीवर अध्यात्मिकतेची एक वेगळीच पायरी गाठलेली आहे. पण साहित्यकृतीमध्ये ते राधेचं स्त्रीरुपच दाखवतात कारण श्रीकृष्णाने स्त्रीत्वाला आयुष्यभर दिलेला सर्वोच्च सन्मान त्याना वाचकांपर्यंत पोचवायचा होता.
गोकुळातील बाल्य, कंसवध, द्वारकानिर्मिती व रुक्मिणीहरण इतकच चरीत्र श्रीकृष्णाच्या स्वत:च्या तोंडून ऐकवण्यात काय भूमिका असेल लेखकाची ? माझ्या मते ज्या घटनेमुळे कृष्णाचं अद्वितीयत्व संपूर्ण जगाला दृग्गोचर झालं की नात्याचा विचार न करता अन्यायाविरुद्ध लढा म्हणून श्रीकृष्णाने मामा असलेल्या कंसाचा वध केला तिथपर्यन्तच कृष्णाला स्वत:ला स्वत:बद्दल बोलू देणं योग्य आहे. कारण ह्यापुढील त्याचं जे संपूर्ण मानवजातच काय पण विश्वालाही व्यापून दशांगुळे वर उरणारं व्यक्तिमत्व आहे ते तो स्वत: बोलून सांगणं शक्यच नाही व उचितही नाही. त्याने इतरांपेक्षा अधिक शूर योद्धा, बुद्धिमान शासक, तत्वज्ञ, राजकारणपटू ह्या विविध भूमिकातून जी अद्भुत कृत्ये केली ती मानवदेहात राहूनच. त्यातील देवत्व वा पारलौकिकत्व जाणवलं ते त्याच्या गोतावळ्यातील इतर मनुजाना. त्यामुळे श्रीकृष्णाच्या देवत्वाचं, त्याला देवत्व प्रदान करणाऱ्या घटनांचं वर्णन त्याच्याशिवाय इतरांच्या तोंडून व्हावं हे योग्यच आहे. बाकीच्या सातही वक्त्यांच्या कथनात श्रीकृष्ण नक्की कोण आहे हा प्रश्न अनेक प्रसंगात आपल्याला कसा पडला व त्याचं पूर्ण समाधानकारक उत्तर कधीच कसं मिळालं नाही हा कथनाचा जो एक समान धागा आहे तो श्रीकृष्णाचं देवत्व खऱ्या अर्थाने वाचकाना जाणवून देतो. द्वारकानिर्मिती करून, बंदर उभारून श्रीकृष्णाने एक अजोड निर्मिती करून दाखवली. पण ते कर्तृत्व श्रीकृष्ण जरासंधाला घाबरून पळाला अशा अपप्रचाराने श्रीकृष्णाला प्रदान केलेल्या रणछोडदास ह्या उपाधीमुळे थोडंसं झाकोळलं गेलं. पण जरासंधाच्या आपल्या (कृष्ण या व्यक्तीबरोबरच्या) वैरामुळे मथुरेतील समस्त यादव प्रजेला जरासंधाच्या सतरा आक्रमणांचा सामना करावा लागला, जीवितहानी झाली, हे पुढे तरी टळावं व आपल्यामुळे सामान्य यादव प्रजेला हानी सोसावी लागू नये ही भूमिका श्रीकृष्णाच्याच तोंडून ऐकवून त्याच्या युगंधर व्यक्तिमत्वातील प्रजाहित व पालन ह्या महत्वाच्या गुणाचं दर्शन घडवलेले आहे. कारण प्रजेच्या हितापुढे श्रीकृष्णाने वैयक्तिक मानहानी गौण मानली.
रुक्मिणी - रुक्मिणीच्या बोलण्यातून एक पती, एक पिता, एक भाऊ, एक मुलगा, एक दीर व द्वारकेचा प्रजाहितदक्ष शासक (कारण कृष्ण कधीच अभिषिक्त राजा म्हणून कुठल्याच सिंहासनावर बसला नाही) म्हणून कसा होता हे फार सुरेखपणे दिसून येतं.
रुक्मिणीच्या कथनाचा हा भाग कृष्ण तिचं हरण करून द्वारकेत आणून विवाह करतो तिथून सुरू होतो. त्यात पुढे तिच्या सात सवतींचा ती आपल्या वैवाहिक आयुष्यात भगिनी म्हणून मनापासून कसा पूर्ण स्विकार करते, स्यमंतक मण्याच्या आख्यानातील ताण तणाव श्रीकृष्ण कशा हुशारीने हाताळतो, नरकासुराचा वध, त्याच्या कारावासातील सोळा सहस्त्र स्त्रिया; तत्कालीन सामाजिक परंपरा व संकेतांनुसार त्याना नाकारली गेलेली सामाजिक प्रतिष्ठा पूर्ववत बहाल करण्यासाठी श्रीकृष्णाचा त्या सर्व स्त्रियांबरोबर प्रतिकात्मक विवाह व पुनर्वसन, पांडवाना इंद्रप्रस्थाचं निर्माण करण्यात द्वारकेतर्फे सक्रिय मदत, अर्जुनाकरवी सुभद्रा हरण ज्याचं दिग्दर्शन श्रीकृष्णानेच केले आहे त्या सुभद्रा अर्जुन विवाहापर्यंत येऊन थांबतो.
प्रपंचात राहून, प्रापंचिकाची व गृहस्थधर्माची तसेच राजधर्माची सर्व कर्तव्ये अचूक पार पाडूनदेखील त्यात अडकून न रहाता, जिथे म्हणून जीवनाची वाढ व विकास खुंटून जीवन साचून राहिले ते वाहते करण्यासाठी आवश्यक ते ते सर्व श्रीकृष्णाने केले. ह्या सर्व उद्योगांकडे पहाताना बुद्धिमान असलेल्या व कृष्णावर मनोमन प्रेम करणाऱ्या रुक्मिणीच्या न सांगताच लक्षात येते की तिच्या प्रत्येक सवतीबरोबरच्या विवाहामागे श्रीकृष्णाची नक्की काय मनोभूमिका होती. क्षत्रिय असून आदिवासी कुळातील जांबवंतीशी लग्न करून एक जगावेगळं पाऊल उचलणाऱ्या कृष्णाला बघून रुक्मिणीला जाणवलं की इतर कुणाही क्षत्रिय राजात / शासकात असं क्रांतिकारी पाऊल उचलण्याची हिम्मत नाही. आपल्या वैयक्तिक आयुष्याशी निगडित वर्तणुकीतूनच समभाव सर्वत्र असायला हवा ही शिकवणच जणू कृष्णाने जगाला दिली. नरकासुराचा वध करून सोळा सहस्त्र स्त्रियांचं पुनर्वसन हे तर आजच्या युगातही युगप्रवर्तक ठरेल अशी कृती आहे. हे बघतानाच रुक्मिणीला जाणवलं की आपला पती कोणी सामान्य पुरूष वा मानव नाही. त्याचं युगंधर असणं तिला जाणवलं निश्चितच असावे कारण एखाद्या विलक्षण परिस्थितीत (कारण कृष्णाच्या वर उल्लेखलेल्या बहुतेक सर्व कृती विलक्षण असल्यामुळे निर्माण होणारी परिस्थितीदेखील विलक्षणच असायची) आपल्या पत्नीने कसे वागावे ह्याबाबत कृष्णाच्या अपेक्षा त्याने बोलून न दाखवता ती अचूक पूर्ण करते. जेव्हा अंतरात्मा तादात्म्य पावतो तेव्हाच हे शक्य असतं. श्रीकृष्ण आर्यावर्तात न्याय प्रस्थापित करण्यासाठी व सुदृढ आणि विकासशील सत्तासमतोल टिकवण्यासाठी आर्यावर्तभर गरगर फिरत असताना घरातील कर्ती स्त्री व कृष्णाची अर्धांगी म्हणून रुक्मिणी तितक्याच समर्थपणे उभी रहाते व ही जबाबदारी उत्तमरित्या पार पाडते. रुक्मिणीची थोरवी इथे दिसून येते. मात्र सर्वच भूमिका समदर्शी समरसतेने निभावणाऱ्या व तरीही कशातच न अडकून रहाणाऱ्या आपल्या पतीचं संपूर्ण स्वरुप तिला अर्धांगी असूनही समजलेलं नाही.
दारुक - जीवनप्रवासात प्रपंचरथाच्या समतोल व सरलपणे चालण्यात जे महत्वाचं स्थान अर्धांगिनीचं; तेच प्रत्यक्ष प्रवासात रथ्याच्या सारथ्याचं. त्यातून श्रीकृष्णासारख्या अश्वांच्या तद्वतच मनुष्यमात्रांच्या जीवनाचं सारथ्य करण्यात अतीकुशल असलेल्या प्रत्यक्ष योगेश्वराचं सारथ्य करणारा सारथीदेखील स्वत:च्या व्यवसायात अतिशय कुशल व पारंगत तर असायलाच हवा; पण त्याशिवाय अतिशय महत्वाचा जो गुण त्याच्या अंगी हवी तो स्वामीभक्तीचा आणि रहस्य स्वत:च्या पोटात ठेवण्याचा. मितभाषीपणा सुद्धा. ह्या सर्व गुणांनी युक्त अशा दारुकाची श्रीकृष्णाप्रती असलेली अनन्यसाधारण भक्तीच त्याला फक्त सारथी न ठेवता प्रत्यक्ष श्रीकृष्णाचा सखा बनवते. सारथी म्हणून सर्वात जास्त काळ श्रीकृष्णाच्या नजीक व सान्निध्यात राहिलेल्या दारुकाच्या तोंडून जरासंध वध, पांडवांचा राजसूय यज्ञ, त्यावेळेसचा शिशुपाल वध, त्यानंतरचे शाल्व वध, वासुदेव म्हणवून घेणाऱ्या पौंड्रकाचा वध, आतेबंधू असलेल्या दंतवक्र व विदूरथ यांचे वध ह्या प्रसंगांच्या प्रत्यक्ष कथनाबरोबरच (प्रत्यक्ष अशासाठी की ह्या सर्व वेळेस दारुक श्रीकृष्णासह घटनास्थळी उपस्थित होता), कौरवांची द्यूतसभा व द्रौपदी वस्त्रहरण ह्या प्रसंगांचे देखील अप्रत्यक्ष कथनही केले आहे. हे अप्रत्यक्ष अशासाठी की कृष्णाने ज्यावेळेस हा समाचार ऐकला तेव्हा तिथे दारुकही होता. उपरोक्त सर्व प्रत्यक्ष कथन केलेल्या प्रसंगातून आपल्याला एका अतिशय मुत्सद्दी, राजनीतिज्ञ, दूरदृष्टी असलेल्या, न्यायप्रिय, सत्यप्रिय व प्रेमयोगाचे आचरण करणाऱ्या द्रष्ट्या शासकाचे दर्शन होते. दारुकासारख्या सारथी म्हणून कृष्णाच्या सतत सान्निध्यात असलेल्या त्याच्या भक्त सख्याच्या तोंडून ते आल्यामुळे त्याला एक आगळी भव्यता येते. द्यूत व द्रौपदीवस्त्रहरणाचा समग्र वृत्तांत ऐकून प्रत्यक्ष कृष्ण व्यथित होऊन घोर अंगिरस ॠषींच्या आश्रमात कायमचा जाण्यासाठी द्वारका सोडतो तो फक्त उद्धव व दारुक ह्यांच्या समवेत. त्याचा विषादयोग निवारण्यासाठी ॠषी अंगिरस त्यास ब्रह्मज्ञान देतात त्याकाळात दारुकासही आश्रम सहाध्यायी म्हणून रहाता येते. ज्याला आपला म्हटले त्याच्या सर्वांगीण उन्नयनासठी सतत प्रयत्न करणे ह्या श्रीकृष्णाच्या प्रेमयोगाचा अनुभव दारुकाने देखील घेतला आहे. त्याला दिसणारा त्याचा स्वामी एकीकडे प्रत्यक्ष आतेभावंडाना वधताना मागेपुढे बघत नाही आणि दुसरीकडे त्याच्यासारख्या सारथ्याला एका थोर ॠषींच्या आश्रमात सहाध्यायी म्हणून स्विकारतो व सखा म्हणून संबोधतो. त्यामुळेच आपला स्वामी नक्की काय आहे / कोण आहे हा संभ्रम त्याच्या मनात राहतोच पण श्रीकृष्णाच्या पायाशीच आपल्या जीवनाचे साफल्य व कल्याण आहे हे ही त्याला माहिती असतं.
द्रौपदी -- महाभारतातील सर्वात प्रमुख स्त्री व्यक्तिरेखा. एक प्रकारे द्रौपदीच्या अपमानाचा सूड हे भारतीय युद्ध होण्यामागचं एक प्रमुख कारण. अशी ही द्रौपदी कृष्णाची प्रिय सखी. ती कशी सखी बनते कृष्णाची ?
स्वयंवराला येऊनही स्वत: भाग न घेता; मृत मानल्या गेलेल्या पांडवाना ओळखून, कृष्ण अर्जुनाला पणात द्रौपदीला जिंकण्याची संधी देतो व तुझ्यासारख्या लावण्यवतीच्या रक्षणासाठी पाच पतींचा एकत्रित पराक्रम आवश्यक आहे हे कृष्ण तिला पटवून देतो त्याक्षणीच तिला त्याचं वेगळेपण जाणवलेलं असतं.
कृष्णाच्या डोळ्यातील निर्मळ प्रेमभाव त्यांच्यात सख्य निर्माण करून ते वाढवतो आणि द्रौपदी कृष्णाची सखी बनते. पुढे खांडववनातून इंद्रप्रस्थ निर्माण करण्यात कृष्णाचं बुद्धीचातुर्य, योजकता, कल्पकता, दूरदृष्टी, मुत्सद्देगिरी, पांडव व कुंतीप्रतीचे त्याचे प्रेम आणि स्वत:प्रती सख्य तिला जाणवत रहातं आणि कृष्णाबरोबर तिचं एक वेगळच अबोल नातं निर्माण होतं. कृष्णाचं पारलौकिकत्व, देवत्व तिलादेखील जाणवतं आणि त्यांच्या मैत्रीला, सख्याला भक्तीचा एक अधिक आयाम जडतो. त्यामुळेच द्रौपदीच्या पाच पतींबरोबरच्या एकांताची आचारसंहिता बनवण्यात कुंतीइतकाच वाटा श्रीकृष्णाचा आहे कारण द्रौपदीमधल्या सखीच्या विश्वासाने कृष्णामधील सख्याला तो अधिकार दिला आहे.
कृष्ण कधीही आपल्याला एकटं सोडणार नाही ह्या विश्वासातूनच, वस्त्रहरणप्रसंगी ती निर्वाणीचा धावा श्रीकृष्णाचा करते आणि कृष्णदेखील तो विश्वास सार्थ ठरवतो. (ह्या प्रसंगातील वस्त्र पुरवठा आणि शिशुपाल वध वा शृगालवध ह्यावेळेस उपयोगात आणलेल्या सुदर्शन चक्राचं प्रगट होणं व अंतर्धान पावणं ह्याला लेखक चमत्कारापासून दूर करू शकलेला नाही.) पुढे पांडवांचा वनवास व अज्ञातवास निव्वळ कृष्णाच्या बुद्धी व धूर्तपणा ह्यामुळे शक्य होतो. ह्या तेरा वर्षांच्या कालावधीत पांडवांच्या निवासस्थान बदलांपासून ते अज्ञातवासातील त्यांच्या भूमिका व वर्तणुकीतील बारकाव्यांबद्दल कृष्ण जे मार्गदर्शन करतो, त्यातून त्याचें जे बुद्धीचातुर्य प्रकट होतं ते सांगण्यासाठी जिला ह्या गोष्टींचं सर्वात जास्त महत्व आहे अशा सखी द्रौपदीशिवाय दुसरी योग्य व्यक्ती कोण मिळणार ?
वस्त्रहरण प्रसंगापासूनच द्रौपदीला हे प्रकर्षाने जाणवतं की प्रचंड पराक्रमी अशा पाच पतींची आपण पत्नी असूनही , कृष्णाच्या अद्वितीय बुद्धीशिवाय, दूरदृष्टीशिवाय, निव्वळ पराक्रमाच्या जोरावर तिचे पती तिच्या अंत:करणातील आग विझवू शकणार नाहीत. म्हणूनच युद्ध होइलच हे नक्की करण्यासाठी ती प्रत्यक्ष श्रीकृष्णाच्याच मुखातून युद्धाची घोषणा होइल हे बघते. तिच्यातील सखीचा तो अधिकार श्रीकृष्णालाही सखा म्हणून मान्य असतो आणि म्हणून तो ही तिला तिच्या सूडपूर्तीचं आश्वासन देतो. पण निव्वळ एका स्त्रीची वैयक्तिक सूडपूर्ती ह्यापेक्षा खूप वेगळी अशी सखोल व विशाल मनोभूमिका घेऊन कृष्ण भारतीय युद्धाकडे बघत असतो. त्याच्यातील युगंधरासाठी ती भूमिका तशी विशाल असणं अत्यावश्यक आहे. कदाचित द्रौपदीलाही हे जाणवलेलं असावं . पण नक्की फरक तिला कळत नसावा आणि म्हणून , कृष्णाचं संपूर्ण स्वरुप आपल्याला कळलेलं नाही असं तिलाही रास्तपणे वाटत रहातं.
अर्जुन -- द्रौपदी जशी कृष्णाची प्रिय सखी तसा अर्जुन त्याचा परमप्रिय सखा. "नारायण" रुप श्रीकृष्णाच्या ठायी असलेली अर्जुनाची अनन्यसाधारण भक्ती व निष्ठा आणि अर्जुनाच्या ठायी श्रीकृष्णाला दिसणारे सर्वोत्तम "नरा" चे गुण ह्यामुळे दोघांचं सख्य स्वाभाविक आहे. ते सख्य व भक्ती ह्यामुळेच स्वत:च्या पत्नीबरोबरचं श्रीकृष्णाचं सख्य अर्जुनामधल्या वा कोणाही पांडवातील पतीला खटकत नाही. कृष्णाच्या कापलेल्या बोटाला बांधण्यासाठी द्रौपदी भरजरी शालू फाडते ही कथा ह्या पुस्तकात अर्जुनाच्या तोंडून सांगवून अर्जुन, द्रौपदी व श्रीकृष्ण ह्यांच्यातील एक वेगळाच भावत्रिकोण लेखकाने दर्शवला आहे.
युगंधर मध्ये अर्जुनाकडून मुख्यत्वे युद्धभूमीवरील श्रीकृष्णाने सांगितलेल्या अजरामर श्रीमद्भगवद्गीताकथनाचा प्रसंग विस्ताराने सांगितला गेला आहे. गीतेच्या श्रवणाने ज्याच्या मनाचं क्लैब्य, शैथिल्य, नैराश्य, संभ्रम, भय, कृतीपऱांगमुखता पार दूर पळून गेलं, त्याच्यातील क्षात्रतेज जागृत झालं, अपमानित पत्नीच्या पती म्हणून असलेल्या कर्तव्याची जाणीव जागृत झाली आणि स्वत:च्या शौर्याला, किर्तीला शोभेलसं युद्ध करायला तो तयार झाला त्या शिष्योत्तम अर्जुनाने, आपल्या गुरू व सखा असलेल्या गुरूच्या अमृतमय वाणीतून निघालेला गीतोपदेश सांगावा हेच योग्य. ह्यातून एक रुपकदेखील साधलं गेलं आहे की मानवाला जेव्हा जेव्हा कर्म व फलनिष्पत्ती, धर्म व अधर्म, योग्य व अयोग्य ह्याबद्दल संभ्रम निर्माण होइल तेव्हा तेव्हा उत्तरासाठी त्याने अर्जुनाच्या नम्रतेने व श्रद्धेने गीता अनुसरावी. त्यास योग्य तो मार्ग मिळेल. गीता सरळ सरळ समस्येचं समाधान करत नाही तर योग्य उत्तराकडे जाण्याचा मार्ग दाखवते. अर्थात आपल्या बुद्धी व मनाच्या कौलाप्रमाणे वागण्याचं जे स्वातंत्र्य कृष्ण कृतवर्म्याला देतो ते तो अर्जुनाला देत नाही. कारण ज्या क्षणाला अर्जुन संभ्रमित झाला त्या क्षणी युद्ध किंवा संन्यास ही निवड शिल्लकच नव्हती. मार्ग नक्की झाला होता. आता फक्त नियोजित मार्गावर चालणं जरुरी आहे व तेच काम यथायोग्य व्हावं म्हणून कृष्ण गीता सांगतो. कारण अर्जुनाच्या धनुर्विद्येचा व शौर्याचा उपयोग करून घेऊन कृष्णाला फार मोठे कार्य साधायचे असते. प्रश्न फक्त पाच पांडवांच्या राज्यावरील हक्काचा वा द्रौपदीच्या अपमानाचा नाही. तसं असतं तर सुदर्शन चक्राचा वापर करून कृष्ण एकटाच कौरवांचं निर्दालन करून तो प्रश्न सोडवू शकला असता . पण प्रश्न व्यापक होता. द्वापार युग समाप्ती व कलियुग आरंभ अशा उंबरठ्यावर असलेल्या जगात निर्णायकपणे हे ठसवायचं होतं कृष्णाला की पांडवांवरील अन्याय किंवा द्रौपदीचा अपमान ह्या आज केवळ व्यक्तीनिष्ठ असलेल्या समस्या उद्या सामाजिक समस्या बनू शकतात. समस्येचं हे विशाल रुप उलगडून दाखवण्यासाठी श्रीकृष्णाला भारतीय युद्धाचा महायज्ञ प्रज्वलित करावा लागला. युद्ध सुरू होण्याआधी ही भूमिका त्याने पांडवांना विशद केलेली असूनसुद्धा अर्जुनाने ऐनवेळेस कच खाल्ली आणि म्हणून श्रीकृष्णाने गीता सांगून त्याला जागृत व निवडलेल्या मार्गावर चालण्यास तत्पर केले. निष्काम कर्मयोगाचं महत्व विषद करणाऱ्या गीतेला तोच समजू शकला ज्याने गीतेने सुचवलेल्या मार्गावर चालण्याचं कर्म केलं. ह्याच शिकवणीतून अर्जुन युद्धाला तयार झाला आणि पांडवांनी भारतीय युद्ध जिंकलं. पण; इतकं असूनदेखील, प्रत्यक्ष श्रीकृष्णाच्या तोंडून गीता ऐकूनदेखील त्याच्या संपूर्ण स्वरुपाचं आकलन अर्जुनालासुद्धा होत नाही वा झालेलं नाही. कृष्णाचं आपल्याशी असलेलं सख्याचं नातं वेगळं. द्रौपदीबरोबरचं सख्याचं नातं वेगळं. आपले भाऊ व माता ह्यांच्याबरोबरच्या नात्याचा एक वेगळा आयाम . आणि असा हा कृष्ण गीता सांगून म्हणतो की तू फक्त युद्ध कर. परिणामाची चिंता सोड. युद्धात तू जे वध करशील त्या सर्व पापातून मी तुला मुक्त करीन. म्हणूनच अर्जुनाला सुद्धा कृष्णाचं खरं रुप पूर्णपणे कळत नाही.
सात्यकी -- यादवांचा हा प्रखर पराक्रमी सेनापती जो श्रीकृष्णाची प्रत्येक आज्ञा एकही प्रश्न / शंका उपस्थित न करता पाळणारा एक स्वामिनिष्ठ म्हणून श्रीकृष्णाचा अजून एक प्रिय सखा बनला. एक योद्धा असंच व्यक्तिमत्व असलेल्या सात्यकीच्या तोंडून लेखकाने फसलेली कृष्णशिष्टाई व संपूर्ण भारतीय युद्धाचं वर्णन करवलं आहे. एक योद्धा व सेनापती म्हणून श्रीकृष्णाबरोबर प्रत्येक युद्धात भाग घेतलेला सात्यकी श्रीकृष्णाच्या युद्धकौशल्याबद्दल दारुकाप्रमाणे बोलतोच. पण त्याही पलीकडे त्याला जाणवतं की अन्यायी वृत्तीचं निखंदन केल्यावर कृष्ण प्रेमयोगच आचरणात आणतो. ज्या अन्यायी शासकाचं निखंदन केलं त्याच्या राज्यातील सुयोग्य वारस नेमून तो राज्याचं स्वातंत्र्य अबाधित ठेवतो आणि प्रेमयोगाबरोबरच आर्यावर्तभर मित्रराज्यांची संख्या वाढवण्याची मुत्सद्देगिरीदेखील दाखवतो.
माझ्यामते कृष्णाच्या आयुष्यातील भारतीय युद्धाखेरीजच्या सर्व युद्धांचं वर्णन लेखक दारुकाकरवी करवतो कारण सारथी म्हणून तो प्रत्यही कृष्णाबरोबर होता तर सात्यकी सेनापती ह्या नात्याने इतर जबाबदाऱ्यान्चा उत्तरदायी असल्याने प्रत्येक ठिकाणी नसावा. पण भारतीय युद्धासारख्या महायुद्धात तो कृष्णाबरोबर असणं आणि एका सेनापतीच्या पातळीवरून ह्या युद्धाचं कथन होणं हे लेखकास अधिक संयुक्तिक वाटलं असावं. त्यातून श्रीकृष्ण स्वत:च अर्जुनाचं सारथ्य करत असल्यामुळे, दारुक रणांगणावर असण्याची शक्यतादेखील नाही. तर आपल्या स्वामीचं, भारतीय युद्धात नि:शस्त्र सारथ्याची भूमिका करूनही, युद्धाचा परिणाम निर्णायकरित्या पांडवांकडे झुकवण्यातलं एक वेगळं कौशल्य सात्यकी बघतो आणि सांगतो. भारतीय युद्धात कृष्ण नि:शस्त्र असा पांडवांच्या बाजूने असतो. त्याचा सखा सात्यकी देखील स्वाभाविकपणे आपल्या सर्व सामर्थ्यानिशी पांडवांची पाठराखण करतो. पण दुर्योधनाला सैन्यबळाची मदत करण्याचं श्रीकृष्णाने कबूल केलेलं असल्याने तो यादवास युद्धातील पक्ष निवडीचं स्वातंत्र्य देतो. त्यामुळेच कृतवर्मा कौरवांच्या बाजूने युद्धात उतरतो व प्रसंगी त्याचं व सात्यकीचं देखील घनघोर युद्ध होतं. माझ्या मते इथे एक फार महत्वाची शिकवण कृष्ण देतो की धर्म , अधर्म, न्याय , अन्याय, सत्य, असत्य हे ज्याने त्याने स्वत:च्या बुद्धी व मनाचा कौल लावूनच पारखायचं असतं आणि आपला मार्ग निश्चित करायचा असतो.
युद्ध संपल्यानंतर अश्वत्थाम्याने प्रक्षेपित केलेल्या अस्त्राचा उत्तरेच्या गर्भावरील प्रभाव निष्प्रभ करत पांडवांचा वंश निर्वंश होण्यापासून वाचवताना श्रीकृष्णाचं जे अद्भुत दैवी दर्शन होतं तिथे सात्यकी थांबतो. इथे उद्धव जेव्हा म्हणतो की अठरा अक्षौहिणी (चाळीस लाख) सैन्याचा नाश करणाऱ्या भारतीय युद्धसमाप्तीनंतर केवळ दहाच योद्धे जिवंत राहिले तेव्हा दहावा योद्धा कोण हे पांडवांच्या लक्षात येत नाही. परंतु, पाच पांडव, कृप, अश्वत्थामा, कौरवांकडून लढलेला यादव कृतवर्मा आणि स्वत: सात्यकी ह्याशिवाय नि:शस्त्र असूनही पांडवांच्या गळ्यात यशश्रीची माला पडण्यास कारणीभूत ठरणारा श्रीकृष्ण हा दहावा योद्धा हे सात्यकीमधला योद्धा व सखा ओळखतो पण आयुष्यभर स्वत:युद्ध करणारा कृष्ण व भारतीय युद्धात नि:शस्त्र राहूनदेखील सर्वात परिणामकारक युद्ध करणारा कृष्ण यातील नेमका फरक त्याला कळत नाही आणि म्हणून त्यालादेखील एक कोडं सुटत नाहीच - श्रीकृष्ण नक्की कोण आहे ?
उद्धव -- उद्धव हा श्रीकृष्णाचा नुसता चुलत व आतेबंधूच नाही तर त्याचा सर्वात जवळचा सखा आहे. श्री सावंतांनी म्हटल्याप्रमाणे भावविश्वस्त. हा केवळ एक शब्द नाही. कारण भावविश्वस्त म्हणजे अशी व्यक्ती जिच्याकडे आपल्या सर्व भाव भावना, अंत:करणातील सर्व ईच्छा, आकांक्षा सर्व काही सोपवता येतील अशी व्यक्ती - ते सुरक्षित राहील, त्या भावविश्वस्ताकडे स्वत:कडेच राहील हा विश्वास ह्या नात्यात अतिशय महत्वाचा. तिथे अंत:करणांची खूण पटणं गरजेचं. त्यामुळे भावविश्वस्त ही खूप मोठी जबाबदारी आहे. त्यातून कृष्णासारखा युगंधर जेव्हा उद्धवाला भावविश्वस्त म्हणतो तेव्हा त्याचं परिमाणच बदलतं. श्रीकृष्णासारख्या पराक्रमी, चक्रवर्ती शासकाचा हा भाऊ युद्धावर अजिबात विश्वास न ठेवणारा, भौतिक ईच्छा आकांक्षातून मुक्त असा अवधूत पदाला पोचला आहे कारण त्याच्या साधनेमागे मोक्ष मिळावा हीदेखील अभिलाषा नाही. म्हणूनच तो श्रीकृष्णाचा भावविश्वस्त आहे. जीवनातील सर्व महत्वाच्या प्रसंगांच्या आधी वा नंतर कृष्ण उद्धवाशी मन मोकळे करून बोलतो कारण आपल्या लोकविलक्षण कृत्यान्मागील कार्यकारणभाव व युगंधरी मनोभूमिका कळण्याची पात्रता फक्त त्याचीच आहे हे कृष्ण जाणतो. सांदीपनी ॠषींच्या आश्रमापासून ते श्रीकृष्णाच्या अवतारसमाप्ती पर्यंत उद्धव त्याच्या बरोबर आहे. जणू युगंधराचं कृतीशील रुप श्रीकृष्णाचं नी मनन चिंतन करणाऱ्या मनाची छाया म्हणजे उद्धव.
उद्धवाच्या मुखातून मुख्यत्वे ऐकायला मिळते ते भारतीय युद्धानंतरचे श्रीकृष्णाच्या भावविश्वाचे श्रवणदर्शन.
युगंधर म्हणून , द्वापार व कलीयुगांच्या सांध्यावर जीवनातील नीती, धर्म, सत्य, ज्ञान, संस्कृती ह्यांचं भवितव्य नक्की करणारं महायुद्ध प्रज्वलित करून, व त्यात सत्य, धर्म व न्याय यांचा विजय घडवून आणूनसुद्धा त्या युगंधरालादेखील वैराग्य अवस्था प्राप्त झाल्यासारखी होते ह्यात युद्धाचे अटळ व कायमस्वरूपी विनाशक परिणाम सर्वानाच प्रभावित करतात, त्यातून देवत्वालाही सुटका नाही हेच दाखवलं आहे. त्यातून श्रीकृष्णाचं अवतारकार्य पूर्ण झालं आहे. त्यामुळे गांधारीच्या शापाच्या निमित्ताने श्रीकृष्णाची विरक्ती व त्यातूनच द्वारकेचं शासन सैल पडून यादवांचा निर्वंश आणि अखेरीस श्रीकृष्णाची अवतारसमाप्ती हा भाग उद्धव कथन करतो. अवतारसमाप्तीपूर्व श्रीकृष्ण उद्धवाला जे परमज्ञान देतो ते माझ्या मते भगवंताचं स्वत:च गीतेबद्दलचं आकलन काय असावं ते आहे असं मला वाटतं. श्री सावंतांच्या अभ्यासाला व श्रीकृष्णाच्या चरित्र आकलनाला इथे सलाम करावाच लागतो. आणि म्हणूनच; आयुष्य ज्याच्या बरोबर काढलं, ज्याच्या मनातील विचार न बोलता ओळखले आणि गीतेचही सार असं जीवनज्ञान ज्याने अनंतात विलीन होण्यापूर्वी काही क्षण दिलं, व त्यातून ज्याच्या व्यक्तिमत्वाची अंशतः खरी ओळख झाली असं उद्धवास वाटलं; तो श्रीकृष्ण नक्की कोण होता हा प्रश्न भावविश्वस्त असलेल्या उद्धवालाही पडतो.
असा हा युगंधर श्रीकृष्ण. त्याच्या जीवनकालात जितके म्हणून त्याच्या सान्निध्यात आले त्या प्रत्येकाला तो विविध रुपात परिपूर्णतेने जाणवला - नंद, यशोदा, वसुदेव, देवकी ह्याना पुत्र म्हणून, बलरामाला भाऊ म्हणून, गोपांना व सुदाम्याला मित्र म्हणून, राधेला व द्रौपदीला सखा म्हणून, रुक्मिणी व इतर सात पत्नी ह्याना पती म्हणून, पांडव व कुंती ह्याना सुहृद व आप्त म्हणून, अर्जुनाला सखा व गुरू म्हणून, दारुक, सात्यकी ह्याना स्वामीरुपातील सखा म्हणून तर उद्धवाला स्वत:चंच रुप असल्यासारखा म्हणून, आणि आर्यावर्ताला चक्रवर्ती द्वारकाधीश म्हणून. आणि तरीही कोणालाच तो संपूर्ण कळला नाही. त्याने क्षत्रिय असून वनकन्येशी लग्न केलं, सोळा सहस्त्र पतित स्त्रियांचं सन्मानपूर्वक पुनर्वसन केलं, जीवनाला नीतीतत्वांवर व अंतिम सत्यावर घासून पारखणारं महायुद्ध प्रज्वलित केलं व त्याचं उचित सारथ्य केलं आणि सर्वात महत्वाचं हे करण्यामागे प्रेमयोगाचा प्रसार हा हेतू कायम ठेवला. जीवनाची वाढ व विकास हा हेतू कायम ठेवला. म्हणून तो युगंधर.
महर्षी व्यासांच्या अलौकिक प्रतिभेतून जे महाकाव्य महाभारत निर्माण झालं त्या महाकाव्यातील सर्वात सशक्त, आकर्षक, समतोल व मोहक अशा श्रीकृष्णाच्या व्यक्तिरेखा चित्रणासाठी श्री सावंतांनी केलेला व्यासंग प्रत्येक पानात जाणवतो. भारतीय युद्धाशिवायही श्रीकृष्णाचं जीवन किती रसरसलेलं, विविधरंगी घटनांनी भरलेलं, सर्वसमावेशक, प्रेरक व युगप्रवर्तक होतं ते श्री सावंत महाकादंबरीच्या ललितरुप साहित्यकृतीतून यशस्वीपणे वाचकांपर्यंत पोचवतात. जाणीवपूर्वक योजलेले तत्कालीन शब्दप्रयोग, प्रदेशांची नावे, यात सातत्य राखत ते निर्माण केलेलं वातावरण कायम राखतात. श्रीकृष्णासारख्या योगेश्वराच्या जीवनात जे असंख्य स्त्री पुरूष येऊन गेले त्यातील नेमक्या व्यक्तींच्या निवडीपासून ते तर्कशुद्धपणे कोणते प्रसंग कोणाच्या कथनात ठेवावेत ह्याबाबत निर्णय घेत व कादंबरी ह्या साहित्यिक आकृतीबंधाचं साहित्यिक सौंदर्य व नियम जपत ते युगंधर श्रीकृष्णाचं युगप्रवर्तक जीवनदर्शन वाचकाना घडवतात.
व्यासपर्व
युगंधर वाचून संपलं. पाठोपाठ व्यासपर्व देखील वाचलं. एका महाकादंबरीच्या नुकत्याच केलेल्या वाचनानंतर समान धागा असलेल्या विषयावरील ह्या दुसऱ्या पुस्तकाचं पुनर्वाचन एक अवर्णनीय वाचानानुभव देऊन गेलं.
श्रीकृष्णाचं जीवनचरित्र सांगणारं युगंधर ही जवळपास हजार पृष्ठांची एक महाकादंबरी तर महाभारतातील निवडक दहा व्यक्तिरेखा वैचारिक लघुलेखातून उलगडून दाखवणारं व्यासपर्व जेमतेम सव्वाशे दीडशे पानांचा लेखनप्रपंच.
व्यासपर्व वाचताना सर्वात अधिक वेळ मला लागला तो त्याची प्रस्तावना वाचताना. वीसेक पानांची ही प्रस्तावना हा; प्रस्तावना कशी असावी आणि निवडलेल्या विषयाचा व्यासंग कसा सर्वांगीण असावा ह्या दोहोंचा आदर्श आहे. महाभारतासारख्या महाकाव्यातील दहा व्यक्तिरेखा निवडून त्या दीडशे पृष्ठांच्या आतच व्यवस्थित उलगडून दाखवायच्या हेच किती कठीण काम. अतिशय सखोल व सर्वांगीण अभ्यास आणि त्यावर चिंतन, मनन ह्याशिवाय असं आकलन शक्य नाही.
श्रीमती भागवतांनी लिहीलेल्या प्रस्तावनेतील महाभारत हे काव्य कसं, त्यात काव्याबरोबरच नाट्यमयता कशी आहे हे वाड़मयाच्या व व्याकरणाच्या नियमांवर तर दाखवून दिलेच आहे, पण त्याचबरोबर इतर पौराणिक वाड़मय व महाभारत ह्याची रसास्वादाच्या दृष्टीकोनातून तुलना देखील केलेली आहे. जसं रामायण वा बौद्ध पौराणिक कथात व्यक्तींचे काळे व पांढरे रंग स्पष्ट दिसतात. ह्या दोन्ही ठिकाणी; धर्म व अधर्म, न्याय व अन्याय ह्याच्या सीमारेषा स्पष्ट आहेत. पण महाभारतात तसं नाही. करडा / राखाडी हा कृष्णधवल रंगांचा मिलाफ होऊन येणारा रंग हा महाभारतातील सर्व व्यक्तिरेखांचा स्वाभाविक रंग आहे. इथे न्याय, अन्याय , धर्म, अधर्म ह्यांच्या सीमारेषा एकमेकीत मिसळत दूर होतात. महाभारतातील नाट्य हे कदाचित त्यामुळेच अधिक प्रकर्षाने जाणवतं. ग्रीक पुराणकथात देवांच्या गुण अवगुणांची झळ माणसाला लागते. पण महाभारतात देवत्व मनुष्यरुपात वावरून मनुष्यमात्रासाठी असलेल्या नियतीच्या नियमांचे पालन करते आणि मनुष्यच असलेले स्वत:मधील सूरत्व वा असूरत्व ह्यांचं प्रसंगाप्रसंगातून दर्शन घडवतात. महाभारताचा कर्ता असलेल्या व्यासांचं प्रत्येक व्यक्तिरेखेला न्याय द्यायचं काम म्हणूनच अतिशय अवघड आहे. तर अशा ह्या महाकाव्यातील ह्या दहा व्यक्तिरेखा ज्या श्रीमती भागवतांनी उलगडून दाखवल्यात. त्यातही खासियत ही की त्यांनीच लिहील्याप्रमाणे जेव्हा एखादी व्यक्तिरेखा त्यांना आकळते तेव्हा ती भासमान प्रतीकांमधून त्याना प्रतीत होते. उदा. बाह्य रेखाकृती, फक्त डोळे, सुंदर हात, ओठ, एखादा नाद, विवक्षित गंध अशाप्रकारे. या पार्श्वभूमीवर आता ह्या व्यक्तिरेखा बघू.
श्रीकृष्ण - पूर्णपुरूष योगेश्वर श्रीकृष्ण लेखिकेला आकळतो तो एका विशाल आकाश व्यापणाऱ्या नीलाकृतीत जिला एक तीव्र उत्तेजक अंध आहे - विश्वातील सर्व नरांच्या प्राणशक्तीच्या गंधात अनेक अनोळखी फुलांचा सुगंध मिसळल्यास येइल तसा आणि त्या गंधकुपीच्या गाभ्यात बासरीच्या सुरांचा एक लसलसता कोंब जाणवत रहातो. श्रीकृष्ण हा पूर्णपुरूष योगेश्वर. निखळ पुरूषत्वाचं प्रतीक असूनही त्याने जीवनातील सौंदर्याची नाजूक संवेदनशीलतेने जोपासना केली. स्वत:चा अंश असलेल्या ब्रह्मज्ञानाला बासरीच्या सुरांची जोड देऊन मवाळ, सृजनशील रुप दिलं. हे सगळं लेखिका एका प्रतीकातून सांगते. अवतार असलेल्या श्रीकृष्णाने जन्मापासून मृत्यूपर्यंत, गोतावळ्यातील सर्वाना प्रेम दिले पण स्वत: त्यात न अडकता तो पुढे जात राहिला. गोकुळातील बालपण व गोपांची संगत, कंसवधानंतर मथुरेचा त्याग, भारतीय युद्धात आरंभीपासून शस्त्रत्याग, यादवांचा त्याग आणि शेवटी विजनवासात एकाकीपणे देह ठेवत अवतारी भूमिकेचा त्याग. फक्त श्रीमती भागवत राधाकृष्ण प्रेमाला एक पुरूष व स्त्री मधील प्रेम म्हणूनच बघतात. मात्र त्यात त्या उच्छृंखल प्रणय नाही तर कोवळी, हळूवार प्रीती पहातात जी पारंपरिक स्त्रीपुरूष नात्याच्या बाहेर असूनही दोन्ही जीवांचा व प्रेमाचा सन्मान कायम ठेवते.
युगंधरमधला समदर्शी श्रीकृष्ण जो समरसतेने पण अडकून न पडता जीवन जगतो व व्यासपर्वमधला हा श्रीकृष्ण - एकाच अवताराच्या दोन शब्दचित्रकाराना प्रतीत झालेल्या दोन प्रतिमा - ज्यात खूप साम्य आहे. तरीही त्या स्वतंत्र आहेत आणि तरीही आतील तत्व एकच आहे.
एकलव्य - महाभारतातील सर्वात मोठे दु:ख एकलव्याचे कारण उजव्या हाताचा अंगठा द्रोणाना गुरूदक्षिणेत देऊन एकलव्य निघून जातो व तिथेच त्याची कथा संपते ह्या एका वाक्यात श्रीमती दुर्गा भागवत, महाभारताचे त्यांचे स्वत:चे असे जे आकलन आहे ते दाखवून वाचकाला स्तिमित करतात. एकलव्याची व्यथा द्रोण आयुष्यभर उरी वागवत जगतात (कारण आपन एकलव्यावर अन्याय केला आहे ही जाणीव त्याना आहे) आणि अश्वत्थाम्याच्या रुपाने ती चिरंजीव होते ह्या एका वाक्यातून महाभारतातील सर्वव्यापी सर्वस्पर्शी दु:ख आपल्या जाणीवाना पिंजत आतल्या गाभ्यापर्यंत पोचते. म्हणून लेखिकेला द्रोण व एकलव्य ह्यांच्या संदर्भात मोहरीतील ठिणगी जाणवते. तडतडणा ऱ्या मोहरीतून क्वचितच विशाळ ज्वाळा निघते. पण परत मोहरी तेव्हढीच रहाते.
स्वतंत्र प्रतिभा नसलेल्या पण सत्तेच्या जवळ असलेल्या तथाकथित बुद्धीवाद्यांनी निसर्गदत्त गुण व कौशल्य ह्यांना डावलण्याची सुरूवात द्रोणानी केली ती आजतागायत चालूच आहे हा एकलव्याच्या कथेचा उत्तरभाग असल्याचं दाखवून लेखिका आपल्याला अंतर्मुख बनवते.
अश्वत्थामा - एकलव्य हा जसा द्रोणांचा सर्वात उपेक्षित शिष्य तसा अश्वत्थामा हा सर्वात प्रिय शिष्य. अर्जुनापेक्षा देखील कारण तिथे द्रोणांमधील पित्याने त्यांच्यातल्या गुरूवर मात केली. मात्र ह्या पितृप्रेमाने अश्वत्थाम्याच्या व्यक्तिमत्व विकासाचं क्षितिज सीमित केलं. दारिद्र्याच्या भीतीपोटी सत्तेकडे गहाण पडलेल्या त्यांच्या ज्ञानाने अश्वत्थाम्याची अर्जुनाबरोबर जी सहज मित्रता होती तिला परिस्थितीवश शत्रूतेमध्ये बदलायला भाग पाडले. लहानपणी दूध न मिळाल्याने त्याचा मूलपणाचा संताप व आपल्या पित्याला पांडव व धृष्टद्युम्न ह्यांनी अधर्माने मारले म्हणून विचार न करता सर्वसंहारक अस्त्राचा प्रयोग व क्रूरपणे पांडवांचा वंशच्छेद व धृष्टद्युम्नाचा वध करण्यातील संताप ह्याची जातकुळी एक आहे कारण दोन्ही ठिकाणी आपल्याला फसवलं गेल्याची भावना आहे. पण संतापाच्या भरात अविचारी कृत्य करण्याची परिणिती ही शेवटी चिरंजीव जखमी दु:ख वागवण्यात होते. ह्यामुळेच लेखिकेला अश्वत्थामा म्हटलं की भंग पावलेला आरसा दिसतो - अनेक तुकडे असूनही प्रत्येक तुकड्यात एकच चित्र दाखवणारा.
दुर्योधन - महाभारतातील अधर्म, अन्याय, अविचार, हट्ट ह्यांचं प्रतीक असलेला दुर्योधन, लेखिकेला कायम कमरेखाली अचेतन असलेली विशाल बांध्याची व्यक्तिरेखा जाणवून देतो. आपल्या वाट्याची सत्ता जाऊ नये म्हणून नियोगपद्धतीतून जन्माला आलेल्या पांडवांचा वारसाहक्काचा दावा अमान्य करणारा दुर्योधन, एक शासक म्हणून प्रजेची काळजी घेणारा, स्वार्थापोटी कर्ण व अश्वत्थाम्यासारखे मित्र जोडले तरी मैत्रीला जागणारा असा होता. मृत्यूच्या भितीने तो जलाशयात लपून बसला तरी प्रत्यक्ष मृत्यू आला तेव्हा त्याने धीराने त्या प्रसंगाला तोंड दिले. अश्वत्थाम्याला सेनापती बनवून पांडवांचा सूड उगवण्याची सूचना त्याला देऊन त्याने प्राण सोडला . पांडवांबद्दलच्या ह्या पराकोटीच्या आत्यंतिक द्वेषामुळे त्याचे इतर स्वभावविशेष महाभारतात जाणवलेच नाहीत . म्हणूनच लेखिका त्याला व्यक्तिरेखा हरवलेला माणूस म्हणते.
कर्ण - व्यक्तिरेखा हरवलेल्या दुर्योधनाने ज्याला अंगराज बनवून त्याची जन्मभराची मैत्री संपादन केली व ज्याच्या बळावर पांडवाना युद्धाचे आव्हान दिले तो कर्ण ही लेखिकेच्या मते महाभारतातील h सुस्पष्ट व देखणी दिसणारी सघन अशी व्यक्तिरेखा. कृष्णाप्रमाणेच निखळ पौरूषाचं प्रतीक असलेला, असीम सामर्थ्यशाली, अजोड धनुर्धर , प्रचंड तेजस्वी, सूर्यपूत्र असा कर्ण नियतीच्या भोवऱ्यात अडकला आणि आयुष्यभर अवहेलना सहन करत जगला. जन्माने पांडवांचा सख्खा ज्येष्ठ बंधू असूनदेखील, त्याची जन्मकथा रहस्यच राहिल्याने वारंवार पांडवांकडून अपमानित झाला आणि त्यामुळेच त्याचं वैर हे अतिशय प्रखर आतून आलेलं वैर आहे. पितामह, द्रोण ह्यांच्यासारखं वरकरणी शत्रूत्व व पोटी पांडवप्रेम असं नाही. असीम शौर्याच्या जोडीला जीवनभर उपेक्षा सहन करण्याचं तप व सूर्यसाधना ह्यामुळे कर्ण पांडवासाठी निर्विवादपणे धोकादायक होता. कृष्ण पांडवांच्या बाजूने नसता तर कर्णाचा पराजय करून युद्धात विजय मिळवणं पांडवांना शक्य नव्हतं. अगदी ककचकुंडलांशिवायचा कर्ण असला तरी. एका विवक्षित दुर्बल क्षणी मनातील अंगार बाहेर पडताना कर्णाने द्रौपदीचा अपमान केला व अभिमन्यूवर एकत्रित हल्ला करणाऱ्या सहा योद्ध्यान्मध्ये एक तो होता. पण तरीही त्याचं जीवन तप:पूत होतं नी त्याचं सत्य पांडवांनाच काय,, जगाला न पेलणारं. पण दानवीर होता तो आणि म्हणूनच तो स्वत: किंवा अर्जुन आणि बाकीचे चार भाऊ जिवंत राहतील ह्या आश्वासनातून त्याने अप्रत्यक्षपणे अर्जुनाच्या जीवाचं दान माता कुंतीला दिलं होतं. कृष्ण विरोधात असताना पराभव नक्की आहे हे माहीत असून तो मैत्रीला जागून शेवटपर्यंत लढला युद्धात पडला. फक्त दुर्गाबाईनी म्हटल्याप्रमाणे त्याचं पार्थिव मृत्यूनंतरही सतेज होतं कारन स्वत:चं मूर्तीमंत पौरूष असं सौंदर्य त्याला सर्वात प्रिय होतं. त्या एका गोष्टीला कुणी ना उपेक्षू शकलं ना त्याच्या रुपाची अवहेलना करू शकलं . त्याची ती जाणीवच त्याच्या सतेज मृतदेहाला प्रतीक बनवून गेली.
अर्जुन - वनवासातील जन्म, लहान वयातच पित्याचा देहांत, स्पर्धेचं बालपण, अंगच्या गुणांमुळे धनुर्विद्येत अव्वल प्रतीचं प्राविण्य, स्वत:च्या पराक्रमाच्या जोरावर पत्नी मिळवणं, वनात राज्य उभे करण्यात सिंहाचा वाटा, पुन्हा नशीबी आलेल्या वनवासात खलनायकी प्रवृत्तीविरूद्धच्या अंतिम लढाईसाठी अस्त्रप्राप्ती आणि शेवटी महायुद्धात प्रत्यक्ष भगवंताच्या मुखातून गीतोपदेश ऐकून, क्लैब्य त्यागून विरोचित युद्धकर्म व विजयप्राप्ती. दुर्गाबाईंनी अशा प्रकारे अर्जुनाची जीवनकहाणी सांगून त्याला परीकथेचं नायकत्व बहाल केलं आहे. मात्र ह्यया नायकाला कार्यप्रवण करणारा कृष्णासारखा तत्वज्ञ मार्गदर्शक दरेक महत्वाच्या प्रसंगी लाभला व त्यातून त्याचा संभ्रम दूर होत त्याची कृती सिद्ध झाली. त्यामुळे लेखिकेला तो अधोमुख दिसतो किंवा पाठमोरा कार्यमग्न दिसतो. मात्र, भारतीय युद्धाच्या सर्वंकष संहारानंतर त्याच्या जीवनातील परीकथेची रम्यता लयास जाऊन तिची जागा वास्तवाने घेतली आणि अर्जुन खऱ्या अर्थी प्रौढ झाला. म्हणूनच कदाचित, जीवनाचा संग्राम समजून घेण्यासाठी त्याने कृष्णाला पुनश्च गीतोपदेश करण्याची विनंती केली आणि त्यातून अनुगीतेचा जन्म झाला. इतर व्यक्तिरेखांच्या तुलनेत मला अर्जुनाची व्यक्तिरेखा सर्वाधिक सरल भासते.
युधिष्ठिर - युधिष्ठिराबद्दल लिहीताना दुर्गाबाई एकंदरीतच पांडवांमधील बंधूत्वाचा ऊहापोह करतात. ह्याच संदर्भात महाभारतात एका कोपऱ्यात, प्रकाशझोतापासून दूरराहिलेल्या व वरकरणी दुय्यम भूमिका निभावणाऱ्या नकुल व सहदेवाच्या व्यक्तिरेखा देखील दुर्गाबाई फार मोजक्या शब्दात सुरेख नेटकेपणाने रंगवतात. माद्रेय नकुल व सहदेवाचे स्वत:च्या पुत्रांप्रमाणे कुंतीने केलेले संगोपन हे एकप्रकारे कर्णाच्या बाबतीत तिच्याकडून घडलेल्या चुकीचे / अपराधाचे परिमार्जन हा दुर्गाबाईंचा विचार त्यांचे स्वत:चे ह्या महाकाव्याचे आकलन किती सखोल आहे ह्याची परत एकदा जाणीव करून देतो.
ज्येष्ठ पांडव त्यांना दिसतो तो गोरा, उंच, प्रमाणबद्ध स्नायूंचा व विशाल वक्षस्थल असलेला ज्यात सर्व दु:ख साठवण्याची क्षमता आहे. इतर पांडवांच्या कृतीशीलतेला चिंतशीलतेचे आव्हान देऊन कृतीनंतर निर्माण होणारी पोकळी भरून काढणारा असं त्यांनी त्याचं वर्णन केलं आहे.
गुणी, भीमार्जुनाइतका नसला तरी शूर, पण शक्यतो समेट व सामोपचाराने समस्या सोडवण्यावर विश्वास ठेवणारा असा युधिष्ठिर - सर्वात ज्येष्ठ औरस (?) पांडव. मात्र द्यूतातील अनियंत्रित रस ह्या एका अवगुणापायी भारतीय युद्ध घडण्यामागे द्रौपदीच्या अपमानाची पार्श्वभूमी निर्माण करण्यातला एक प्रमुख वाटेकरी. तरीदेखील सदेह स्वर्गात जाणारा तो एकमेव पांडव. हे असं कसं ? कारण व्यासांनी रंगवलेल्या युधिष्ठिराला लौकिक गोष्टींच्या पलीकडच्या परम शांतीची जी ओढ होती, तिचा जीवनभर शोध घेण्याची व त्यानुसार वर्तन करण्याची त्याची निष्ठा अभंग होती. ह्या शांतीप्रातीच्या हेतूने झालेल्या त्याच्या वर्तनाची त्याच्या पती, बंधू अशा भूमिकेतून अपेक्षित असलेल्या वर्तनाशी विसंगती आढळत असली तरी स्वत:लाही न आकळणाऱ्या ह्या परमशांतीच्या शोधाच्या त्याच्या जीवनयात्रेशी मात्र पूर्ण सुसंगती आहे आणि त्यामुळेच त्याच्या जीवनाची वाट ही अजातशत्रू असूनही एकाकी आहे. फक्त स्वर्गात प्रवेश करताना एका श्वानासमवेत तो प्रवेश करतो ही त्याच्या जीवनाची ईतिकर्तव्यता. म्हणून दुर्गाबाई म्हणतात की माणसाची (श्रेयस शोधण्याप्रतीची) निष्ठा श्वानाच्या निष्ठेइतकीच अभग असावी हा अमर युधिष्ठिराने जगाला दिलेला संदेश. मर्त्यलोकीच्या देहासहीत स्वर्गप्रवेश करून स्वर्गसुखे त्याच देहाने उपभोगणे हे एक वेगळे अमरत्व असं त्या म्हणतात.
पितामह भीष्म - आजन्म ब्रह्मचर्याची भीष्मप्रतिज्ञा व्रतस्थपणे जीवनभर पाळून देखील महाभारतातील पितामह असलेले भीष्म हे वृद्धत्वाचे जणू प्रतीकच असं दुर्गाबाई म्हणतात. खरच, स्वत:चा संसार न करतादेखील संपूर्ण कुरूकुलाचा संसार आपल्या खांद्यावर पेलणारे भीष्म महाभारतात प्रथमपासूनच शेवटपर्यंत पितामह म्हणूनच व्यासांनी दाखवले आहेत. स्वत:चे कुटुंब नसतानाही वरकरणी माया ममतेच्या कृती न करणारे पितामह कुरूकुलाचा प्रतिपाळ अतिशय कुटुंबवत्सलतेने करतात. प्रत्यक्ष गंगेचे पुत्र, गुरू भगवान परशुरामांचादेखील पराभव करू शकणारे व भारतीय युद्धापर्यंत अशरण असलेले शौर्य, निष्कलंक चारित्र्य, अनुभवांची शिदोरी असे आदर्श वार्धक्याचे सर्व गुण असूनदेखील ते द्रौपदीला अभिप्रेत असे सभेतील आदर्श वृद्ध बनत नाहीत कारण पित्याला दिलेल्या कुरूंच्या राजगादीचे निष्ठापूर्वक संरक्षण करण्याचं मिंधेपण त्यांच्याकडे आले आहे. म्हणूनच शरीराने कौरवांच्या बाजूने पण मनाने पांडवांच्या बाजूने असे ते युद्धात उतरतात. असं असूनही ते अशरणच आहेत आणि म्हणून महाभारतात पितामहांच्या तारुण्याचा एकमेव उल्लेख असलेल्या अंबा प्रकरणातील अंबेच्या पुनर्जम्न घेतलेल्या सूडवृत्तीचा आश्रय घेत श्रीकृष्ण; शिखंडीच्या आडून लढणाऱ्या अर्जुनाकरवी युद्धात त्यांचे पतन घडवून आणतो. भीष्मपतनाच्या वेळेस कौरव, पांडवांसहीत कर्णदेखील शोकाकुल होतो ह्यातच भीष्मांच्या खऱ्या अर्थाने पितामह असण्याची पावती मिळते.
विदुर - विदुराबद्दल लिहीताना दुर्गाबाई त्याला माणसात विरलेला माणूस म्हणतात. हीच बहुतेक त्यांच्या मनीची त्याची प्रतिमा असावी.
एका अंध राजाबरोबर आयुष्य व्यतीत करणारा व त्याची अंतापर्यंत सोबत करणारा त्याचा सावत्र भाऊ विदुर हा एक दासीपुत्र. उच्चनीचतेच्या सामाजिक व्याख्यांनी उपेक्षिलेला कर्ण एकटाच नाही तर काही प्रमाणात विदुरही होता. पण कर्णाच्या बाबतीत अतीदाहक असलेली ही उपेक्षा विदुराच्या वाट्यास खूप सौम्यप्रकारे आली की तो राजा बनू शकत नव्हता. पण त्याच्या पांडित्याचा गौरव सर्वत्र होता. आणि राजा होण्याची विदुराची ईच्छा देखील नसावी कारण सत्तेशिवायच्या चांगुलपणाचे तो प्रतीक होता. म्हणूनच कितीही सामर्थ्यशाली व्यक्तिरेखा विदुरनीतीपुढे निरुत्तर होते. निव्वळ चांगुलपणासाठी चांगुलपणा ह्यात जी ताकद आहे ती ह्यातून दिसते असं दुर्गाबाई म्हणतात. म्हणूनच विदुराचा अंत होताना त्याचा अंतरात्मा युधिष्ठिराच्या अंतरात्म्यात विलीन होतो व विदुर देह ठेवतो. ह्यात दोघांच्या व्यक्तिमत्वातील परमशांतीचा ध्यास हा समान धागा व्यास पुन्हा एकदा दाखवून देतात. पण म्हणजेच एक प्रकारे तो देखील युधिष्ठिराबरोबर स्वर्गात जातो व अमर होतो. सामान्य माणसाने हा आदर्श समोर ठेवल्यास त्यालादेखील हे शक्य आहे असं दुर्गाबाईना वाटतं.
द्रौपदी - दूरवर दिसणारी, नीलकांतीची कमनीय नायिका हे दुर्गाबाईंना प्रतीत झालेलं द्रौपदीचं रुप. वास्तविकपणे द्रौपदीचा अपमान हे भारतीय युद्धामागचं एक प्रमुख कारण. पण ते केंद्रस्थानी असलेलं कारण नव्हतं. संघर्षाच्या केंद्रस्थानी आहे राजसत्ता. पाच पतींची पत्नी असूनही पतिव्रता गणली जाणारी पंचकन्यातील एक द्रौपदी. पणदुर्गाबाईंच्या म्हणण्याप्रमाणे, परंपरांनी जसे सीतेला किंवा सावित्रीला स्त्रीजीवनाशी चिरंतनपणे जोडले तसे द्रौपदीला नाही. संघर्षाच्या वेळी मात्र स्त्रीमनात जागृत होते ती द्रौपदी. कदाचित म्हणूनच ती त्याना दूरची कमनीय नायिका वाटते.
अत्यंत रुपवान व सुगंधी देह लाभलेली द्रौपदी आणि श्रीकृष्ण ह्याचा भावबंध हा एक अतिशय नाजूक धागा व्यासांनी हेतूपुरस्सर अधिक भाष्य न करता कल्पनारम्यतेवर सोडला आहे. कृष्णाच्या व तिच्या वर्णातील साम्य एकरुपतेचं एक वेगळ प्रतीक असावं. अर्जुनसुद्धा निळ्या वर्णाचा असला तरी तो पती हे स्पष्ट आहे. श्रीकृष्णाबरोबरच्या नात्याला असं निश्चित रूप नाही. भाऊ बहीण हे परंपरांनी ह्या नात्याला दिलेलं रुप आहे. व्यासांनी दिलेलं नाही.
अशी ही द्रौपदी रुपवान आहे तशीच बुद्धिमान, तेजस्वी, स्वत:ची निर्णयशक्ती असलेली आहे. तिच्या वासना प्राकृतिक असल्या तरी वृत्ती चोखंदळ आहे आणि म्हणूनच पाच पतींची पत्नी असूनही ती व्यभिचारी न बनता पतिव्रता बनलेली आहे. तिच्यातील जाज्वल्य अभिमान तिचं याज्ञसेनी हे नाव सार्थ करतो आणि म्हणूनच तिच्या स्त्रीसुलभ अभिमानाचा अपमान होतो तेव्हा ती ज्वालेसारखी उफाळून येते, सर्व द्यूतसभेला निरुत्तर करणारे अजरामर वचन बोलून जाते - ज्यात वृद्ध नाहीत ती सभा नाही. जे धर्माचरण करत नाहीत ते वृद्ध नाहीत. जो सत्याचे रक्षण करत नाही तो धर्म नाही आणि जे कपटाचरणी आहे ते सत्य नाही. दुर्गाबाई लिहीतात त्याप्रमाणे झंझावात असेपर्यंत झुंझारपणे फडफडत तेवणारी व झंझावात शांत होताच शांतपणे विझणारी अशी ही द्रौपदी.
ह्या दहा व्यक्तिरेखा रंगवताना एक महाकाव्य म्हणून महाभारताचा उलगडा व महर्षी व्यासांच्या अद्भुत प्रतिभेचं विश्लेषण करत दुर्गाबाई एक साहित्यकृती व त्याचा कर्ता साहित्यिक ह्यांचे सर्व गुणविशेष आपल्यासमोर मांडतात.
श्री. शिवाजी सावंत व श्रीमती दुर्गा भागवत. दोघेही ज्येष्ठ व सिद्धहस्त साहित्यिक. युगंधर काय किंवा व्यासपर्व काय ! दोघांचाही व्यासंग पानापानावर जाणवत रहातो. पण अशा व्यासंगातून एकाने एका व्यक्तिरेखेवर साहित्याची प्रचंड व अनुपम सुंदर बाग फुलवली तर दुसऱ्याने जणू मोजक्या फुलांचा छोटासाच पण तितकाच अनुपम सुंदर गुच्छ रसिकांपुढे ठेवला. दोन्ही साहित्यकृती वाचताना मिळणारा आनंद मात्र अवर्णनीय व अतुलनीय.
एकाने कादंबरीसारख्या ललित साहित्यबंधातून योगेश्वराच्या जीवनाचं तत्वज्ञान उलगडून दाखवायचा प्रयत्न केला तर दुसऱ्याने वैचारिक व तत्वचर्चात्मक लघुलेखमालेतून महाभारतातील प्रमुख व्यक्तिरेखांचं अंतरंग उलगडून दाखवतानाच व्यासांच्या प्रतिभेतील काव्यमूल्य, नाट्यमूल्य , विचारमूल्य व एकंदरीतच साहित्यमूल्य ह्यांची ओळख करून देण्याचा प्रयत्न केला.
महर्षी व्यासांसारख्या अद्भुत प्रतिभासंपन्न ॠषींनी लिहीलेलं महाकाव्य, युगांतर झाल्यावर देखील प्रतिभाशाली, अभ्यासू व सिद्धहस्त साहित्यिकांना किती वेगवेगळ्या प्रकारे प्रेरित करते व त्यातून दोन सुरेख साहित्यकृती कशा निर्माण होतात हेच ह्या दोन पुस्तकातून आपल्याला दिसून येते.
--्-- मनिष मोहिले
brilliant exposition...!!!
ReplyDelete