Wednesday, July 29, 2020

हेल्लारो

हेल्लारो

हेल्लारो ह्या गुजराती शब्दाचा अर्थ आहे हवेचा / वाऱ्याचा जोरदार झोत. नोव्हेंबर २०१९ मध्ये प्रदर्शित झालेल्या हेल्लारो ह्या गुजराती सिनेमाने सर्वोत्कृष्ट फिल्मचा राष्ट्रीय पुरस्कार मिळवत गुजराती सिनेसृष्टीत देखील एक ताज्या संवेदनशील व तरीही व्यावसायिक चित्रपटाच्या अपेक्षांना पुरून उरणारा चित्रपट ह्या रुपाने एक ताजा विचारझोत आणला.

कच्छ च्या रणात दूरवर वसलेल्या, स्वत:च स्वत:चं जग असल्याप्रमाणे जगणाऱ्या एका खेड्यात, १९७० च्या दशकात घडणारी ही कथा.  खेडं तरी कसलं ! वस्ती म्हणावी इतकी मोजकी पंधरा वीस घरं आणि अंबा मातेवर विश्वास ठेऊन, तिला मावडी म्हणून साकडं घालणारे, दरवर्षी नियमितपणे रणातील अतिशय अनियमित आणि अपुऱ्या पावसाच्या आगमनाकडे डोळे लावून बसणारे नी वर्षानुवर्षांच्या रुढी परंपरा जपत जगणारे वस्तीवाले ही ह्या कथेची पार्श्वभूमी.
वस्तीच्या सर्व रुढी परंपरा पुरूषप्रधान संस्कृतीच्या अटळ प्रभावाखाली शेकडो वर्षं चालत आलेल्या. पुरषांच्याच काय, स्त्रियांच्याही मनात रुजल्या गेलेल्या. त्याविरुद्ध जाणं म्हणजे पाप. वस्तीच्या निर्णयाची सत्ता मुखीबापाकडे आणि घराघरातील एकाधिकारी निर्णयसत्ता घरातल्या पुरूषाकडे. ते ठरवतील त्या निर्णयाला प्रतिप्रश्न नाही. रुढींचं तर विचारायचच नाही. इतकं की जो गरबा प्रत्येक गुजराती स्त्री पुरूषाच्या धमन्यातून सळसळत वाहत असतो आणि ज्याचा ताल व ठेका ते आईच्या पोटातूनच शिकून येतात, जो शे पाऊणशे किलोमीटर वरच्या भुजसारख्या मोठ्या गावात पोरीबाळी देखील सर्वांसह आनंदाने करतात तो करायला वस्तीतल्या स्त्रियांना मात्र सक्त मनाई. कारण काय तर तसं केलं तर अंबा माता, माऊली (स्थानिक भाषेत मावडी) कोपेल आणि शाप देइल, अडचणी येतील, पाऊस पडणार नाही. 

चित्रपटाची सुरूवातच होते ती मुळी ह्या वर्षीदेखील अर्धा पावसाळा उलटून गेला तरी दर्शन न दिलेल्या वरुणराजानी कृपा करावी म्हणून मातेला साकडं घालण्यासाठी पुरूषांचा गरबा असतो त्या रात्रीपासून.  गोल फेर धरून नाचणाऱ्या बाप्यांचा तलवारींसहीतचा गरबा आणि बाप्यांच्या गरब्याचा ताल, आवाज  आणि गाणं ऐकत घराघरातून 
मन मारून झोपायचा प्रयत्न करताना स्त्रिया पडद्यावर दिसतात आणि पार्श्वभूमीला अर्थपूर्ण गाणं चालू असतं - सपना विना नी रात. - तू तुझ्या नदीला वळवून घे, वीजेला विझवून टाक, पायातले पैंजण थांबवून धर आणि वाटेवर बाभूळ लाव. पण मला स्वप्नाशिवायची रात्र दे. त्या वस्तीच्या स्त्रियांच्या जीवनाचं हुबेहुब चित्र ते गीत आपल्यासमोर उभं करतं. मायेचा ओलावा नाही, नाचऱ्या पावलात वीज नाही, पैंजणांचं सुद्धा संगीत नाही आणि वाटेवर काटेरी बाभळीसारख्या रुढी आणि परंपरा. अशा रुक्ष जीवनात मला कोरी रात्र दे. स्वप्नांशिवायची कारण जाग आली की त्या स्वप्नांची उध्वस्त थडगीच तर दिसणार. त्यापेक्षा स्वप्नच नकोत. 

पहिल्यापासूनच  चित्रपट पकड घेतो आणि कथा पुढे सरकू लागते. पुरूषप्रधान समाजव्यवस्थेमध्ये रहाताना स्वप्नसुद्धा बघण्याचं स्वातंत्र्य नसलेल्या वस्तीवरल्या सर्व स्त्रियांसाठी एकच विरंगुळा असतो - सकाळी उठून वस्तीपासून दूर असलेल्या तळ्यावरून पाणी आणायची वेळ. ह्या थोडक्या वेळातच त्याना; बायको, सून, आई ह्या भूमिकातून  बाहेर पडून एकमेकींशी सुखदुःखाच्या गोष्टी बोलता येत असतात.
अशा त्या प्रभातफेरीत सामिल होते, सैन्यात नोकरी करणाऱ्या अर्जनची नववधू मंजिरी. भुजसारख्या ठिकाणी राहून सातवीपर्यंत शिकलेली मंजिरी स्वतंत्र विचारांची, व्यवहारी, बुद्धीमान असते. त्यामुळे नवरा तर सोडाच ; बाकीच्या बायकानासुद्धा सुरूवातीला ती नाकापेक्षा मोती जड वाटते पण लवकरच त्यांना तिच्या बोलण्यात, विचारात तथ्य जाणवू लागतं. जणू मंजिरीचं त्या वस्तीत आगमन आणि तिचं इतरांपेक्षा वेगळा विचार करणं एका ताज्या सुखद झुळकीसारखा जाणवतो सर्व स्त्रियांना. ह्या सर्व मूळ प्रवाहाबरोबर विधवा झालेल्या केसरच्या उपकथेचा एक छोटा प्रवाहदेखील मिळतो जो मंजिरी व केसर ह्या दोघींच्या व्यक्तिरेखांवर प्रकाश टाकतो.

अशा ह्या अगदी मळल्या पायवाटेसारखं रुळलेलं जीवन जगणाऱ्या स्त्रियांच्या जीवनात हवेचा एक जबरदस्त झोका येतो मूळजी ढोलकियाच्या रुपाने. रणात वणवण फिरत असता तहानेने व्याकूळ होऊन तलावाच्या वाटेवर जवळपास मूर्छित पडलेल्या  मूळजीला मंजिरी व इतर स्त्रिया पाणी पाजून वाचवतात आणि त्यांच्या उपकाराची परतफेड म्हणून तो त्याच्याकडची एकमेव वस्तू त्यांना भेट करतो - त्याचं ढोलवादन.

वस्तीपासून इतक्या दूर, कुणी पहात नाही ही जवळपास खात्रीच असताना कानी पडलेला ढोलाचा आवाज; त्या सर्व स्त्रियांच्यात पिढ्यानपिढ्या भिनलेल्या गरबा नृत्याला, त्यांच्या पायातल्या पैजणांना आणि नाचऱ्या वीजेला, त्यांच्यातल्या खळाळत्या जीवनसरीतेला आवाहन करतो आणि न रहावून त्यांचे पाय मंजिरीच्या पुढाकाराने गरब्याच्या वर्तुळात पदन्यास करू लागतात.  फेर धरला जातो. अचूक तालावर टाळ्या पडू लागतात. पहिला दिवस. दुसरा दिवस.  पहिल्याचीच पुनरावृत्ती. गरबा घुमू लागतो. गाता गळा गात जातो - ढोल वाजतोय. माझ्या खारट रणात ढोल वाजतोय. एका घट्ट पिंजऱ्याची दारं रुंद झालेत  आणि  त्या ढोलाबरोबर हवेत उडू पहाणाऱ्या मला स्वत:ला मीच झेलून घेतेय. खरं तर नाचून मला दमायला होतय. पण नवीनच  मिळालेल्या  ह्या मुक्तीची स्वप्न पहायची आहेत. त्यामुळे मी रात्री न झोपता जागीच रहाते. गाणं चढत जातं. गरबा रंगत जातो.

सुरूवातीला रुढीच्या दडपणाखाली, हे पाप केलं तर मावडी कोपेल ह्या भितीने, वस्तीवर पुरूषांना कळलं तर काय होइल ह्या धास्तीने काही स्त्रिया दूर रहातात. पण दोन तीन दिवसातच ती भिती, धास्ती खाली दबते, पिढ्यानपिढ्या रक्तात भिनलेला गरब्याचा ताल आणि पायातली वीज त्या भितीला बाजूला सारते आणि सर्व स्त्रिया ह्या प्रभातफेरीच्या गरब्यात सामील होतात.
एक उत्फुल्ल, ताजा, मोकळा श्वास - एक हेल्लारो -  जणू त्यांच्यात फुंकर घालून नवचैतन्य जागवतो. आता रोजचा सूर्य उगवतो तो ह्याचसाठी की कधी एकदा तळ्याजवळ पोचतो आणि कधी एकदा गरबा करतो.  मध्यभागी उभा राहून देहभान विसरून मूळजी ढोल वाजवत जातो आणि सगळ्या बायका जगाला, स्वत:ला विसरून गरबा खेळत जातात. वेगवेगळे पदन्यास, मंडलं, तालावर पडणारे पाय आणि फिरणारे हात आणि पार्श्वभूमीला गाणं वाजत असतं - ज्याच्या हातावर माझ्या मनाची घुंगरं वाजतात, ज्याच्या ढोलावरच्या थापेनी माझ्या पायातली वीज चमकते; असा स्वार आला आहे. मी तर जणू त्याच्या डमरूवरची धूळ असल्यासारखी थिरकते. जणू मुक्या भुंग्यांची धाड पडावी तशा त्याच्या ढोलकावरच्या थापा पडतात. जणू तो खारट रणात झाड लावतोय. तो जणू (त्या ढोलावरच्या थापातून) स्वप्न बनवून माझ्या मनाच्या ताटात  वाढतोय आणि मी बसल्या बसल्या त्यांचा आकंठ स्वाद घेतेय. (उघड्या डोळ्यांनी ती अनुभवतेय). तो ताल देतोय नी मी टाळी देतेय. 
किती आमूलाग्र बदल होतो त्या सगळ्यांच्या जीवनात. किती मोकळेपणा, स्वातंत्र्य, स्वप्न आणि आशा यानी भरलेला ताज्या हवेचा झोका येतो त्यांच्या जीवनात - हेल्लारो. आणि तो आणणारा मूळजी - ज्याने अशाच स्त्री पुरूष, उच्च नीच भेदभावांच्या रुढीमुळे आपली पत्नी आणि लहान मुलगी - रेवा, गावकऱ्यांनी लावलेल्या आगीत गमावलेली असते असा मूळजी -  त्या सर्व स्त्रियांच्या नाचणाऱ्या पावलात, फिरून ताल आणि टाळी देणाऱ्या हातात, चेहऱ्यावरच्या आनंदात आणि विमुक्त नाचण्यात शोधत असतो आणि बघत असतो फक्त एकच चेहरा - रेवाचा, त्याच्या लहान मुलीचा. तो गरबा त्याच्यासाठी पण एक स्मरणांचा भावनांचा हेल्लारो घेऊन येतो. नवरात्रींच्या दिवसात तर घरोघरच्या मावड्या त्या जगन्मातेला साक्षी मानून वस्तीपासून दूर पाणवठ्याजवळ धुंद नृत्य करतात. 

पण कुणाची तरी नजर लागल्यासारखं होतं आणि नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी ह्या मुक्तीनृत्याची खबर गावकऱ्यांना लागते. एका वेडपट रुढीपरंपरेपाठी ते रक्तासाठी पेटून उठतात. मूळजीला पकडतात आणि रात्री गरबा सुरू करायच्या आधी त्याचा बळी द्यायचं नक्की करतात. घरोघरच्या बायका आपापल्या नवऱ्याकडून मार खातात. 

रात्री बळी जायच्या आधी मूळजी एकदा शेवटचा ढोल वाजवून द्यावा अशी शेवटची ईच्छा व्यक्त करतो आणि असा ढोल वाजवतो, असा ढोल वाजवतो की ..... घरो घरच्या स्त्रिया, पुरूषप्रधान समाजव्यवस्थेची कुलूपं तोडून सगळ्या वस्तीसमोर गरबा करायला येतात आणि काही बरंवाईट घडायच्या आधीच मावडी मुसळधार पाऊस आणते. मुखीबापा आणि इतर पुरूषाना तो संकेत समजतो आणि भर पावसात विमुक्त गरबा करणाऱ्या स्त्रियांच्या गरगर गिरक्या सुरू होतात.

स्त्रीरुपातील देवतत्वाची पूजा करणाऱ्या, कौल मागणाऱ्या पुरूषाना आपल्या घरच्या स्त्रीमधल्या माऊलीला, त्याच स्त्रीतत्वाला  ओळखण्यासाठी शेवटी कौलाचा चमत्कार व्हावा लागतो. पण तसा तो घडतो आणि स्त्रियाना गरब्याचा, छोट्या आनंदाचा, स्वप्न बघण्याचा, देवाची मनोभावे नाचून अर्चना करण्याचा असे छोटे छोटे आनंद नाकारणाऱ्या सगळ्या रुढी परंपरांना आसमानात उडवून लावणारा एक नवविचारांचा, समविचारांचा झंझावात येतो - ताजा, मोकळा, स्वतंत्र, निर्भय आणि आशावादी हेल्लारो. 

पार्श्वभूमीला गाणं चालू असतं - 

आता मी उंबरठा ओलांडला आहे आणि वस्तीचं पालं पण.  सगळ्या पांघरलेल्या रुढींच्या झुलींचं जंजाळ सोडलं आहे.  नाव, गाव, पत्ता सोडलाय. सीमेवरचं शेवटचं रुढींचं गाव सोडलय. आणि पोचलेय त्या झाडाखाली जिथे माझ्या पैजणांना बोलायची सूट आहे. जिथे माझ्या पैंजणांना बोलायची सूट आहे.  ........  इथे चित्रपट संपतो.

एका गुजराती लोककथेला चित्रपट माध्यमातून प्रभावीपणे जनतेपर्यंत पोचवण्यात निर्माता, दिग्दर्शक, लेखक, पटकथालेखक अभिषेक शहाचा सिंहाचा वाटा आहे. कथालेखनाची वीण घट्ट आहे.  चित्रपटाच्या माध्यमातून कथा पोचवण्याची पटकथालेखनाची जबाबदारी देखील अभिषेक ने व्यवस्थित निभावली आहे. कथेचा काळ, कथा जिथे घडते ती जागा हे लक्षात घेऊन दिग्दर्शक म्हणून त्याने वेषभूषा, रंगभूषा, स्थानिक बोली, ह्यांच्याशी प्रामाणिक रहात चित्रपट बनवलाय. कलात्मक स्वातंत्र्याच्या नावाखाली काहीही प्रेक्षकांच्या माथी मारायचा प्रयत्न नाही केलेला. चित्रीकरण रणातच झालं आहे व  छायाचित्रकार त्रिभुवन बाबू सादीनेनी त्याच्या नजरेतून रखरखीत, रुक्ष व तरीही सुंदर भासणारं रण अतिशय नैसर्गिक, अस्सल व प्रभावी दृष्यप्रतिमांमधून आपल्यासमोर जिवंत करतो. विशेषत: सूर्योदय व सूर्यास्ताची दृष्य आणि वस्तीवरच्या  मशाली व तेलदिव्यांनी उजळलेल्या रात्री. 
सौम्य जोशींच्या अद्भुत लेखणीतून उतरलेल्या,  अर्थपूर्ण, चित्रपटात कथेच्या ओघात येणाऱ्या व  चपखल बसणाऱ्या गीतांना तितकंच सुरेख संगीत दिलय मेहुल सूरतीने. सगळी गरबागीते आहेत आणि पारंपरिक गरबा नृत्यातील अनोखे पदन्यास नृत्यदिग्दर्शक समीर टन्नाने सुरेख सादर केलेत. ह्या सर्व नृत्यांचे चित्रीकरण फारच सुरेख. नादमय. तालमय. पहिल्यापासून शेवटपर्यंत चित्रपट बांधून ठेवतो ह्यात दिग्दर्शकाच्या हाताळणीबरोबरच प्रमुख कलाकार श्रद्धा डांगर (मंजिरी) व जयेश मोरे (मूळजी) ह्या दोघांचा संयत तरीही प्रभावी, संवेदनशील अभिनयाचा देखील महत्वाचा वाटा  आहे. इतर सहकारी कलाकारांची देखील यथाशक्ती साथ आहे.

असा हा हेल्लारो.  रुढींच्या रखरखत्या रणात रुक्ष जीवन जगणाऱ्या स्त्रियांच्या जीवनात येणाऱ्या ताज्या, स्वतंत्र, मुक्त विचारांच्या स्वातंत्र्यझोताची कथा सांगणारा हेल्लारो - जरूर जरूर बघावा असा.

---- मनिष मोहिले.




No comments:

Post a Comment