ज्ञानियांचा मोगरा
दोन तीन दिवसापूर्वी रात्री माझ्या मामाचा फोन आला होता. मटा मधील एका लेखाबद्दल मला सांगायला.
उपरोक्त लेखात पावसानंतरच्या सृष्टीतील सृजनाचे आपल्या लेखणीतून वेगवेगळे सादरीकरण करणाऱ्या ख्यातनाम कवी व साहित्यिकांनी कशाप्रकारे हे वर्णन केले आहे ह्याचे वर्णन होते. ह्या लेखाचा शेवट ज्ञानेश्वरांच्या एका ओवीने केला होता ज्यात ते म्हणतात "जैसे भूमीचे मार्दव, सांगे कोंबाची लवलव". भूमीचं बहुप्रसवा असणं आणि सृजनातील कोवळेपणा हळूवारपणा हा त्या नाजूक कोंबाच्या लवलवीतून साकार होताना जाणवून ती जाणीव इतक्या मोजक्या शब्दात शब्दबद्ध करायला
ज्ञानेश्वरांचीच प्रतिभा हवी.
निसर्गाचा ज्ञानेश्वरांवर असलेला प्रभाव त्यांच्या अजून एका अशाच ओवीतून दिसून येतो - मोगरा फुलला, फुले वेचिता बहरू कळीयांसी आला - ह्या त्या ओळी.
ह्या ओळींची ओळख खूप लहान असतानाच ऐकलेल्या लताच्या अप्रतिम आवाजातील अभंगगीतातून झाली आणि तेव्हापासूनच ह्या ओळी हृदयात एक अढळ जागा घेऊन बसल्या. पण आधी त्या ओळींचा रसास्वाद हा फक्त त्या ओळी नजरेसमोर जो दृष्यसंस्कार उभा करतात त्याच्यापुरताच मर्यादित होता. अर्थात तो दृष्यसंस्कार देखील केवळ अवर्णनीय असाच आहे ह्यात वादच नाही. एखादं झाड इतकं फुलावं, बहरावं की त्याचा तो बहर वेचता वेचता इतका वेळ जावा की तोपर्यंत, त्याच्या कळ्या पूर्ण फुलून पुन्हा बहर यावा ही कल्पनाच किती सुंदर आणि सृष्टीच्या अफाट सृजनशीलतेबद्दल, नेमक्या शब्दात बोलकं वक्तव्य करणारी आहे; नाही !!
पण आज असं वाटतं की स्वत: ज्ञानदेवांच्या संतकवी मनातील कल्पनादेखील अशाच अमाप ओसंडून जाणाऱ्या बहरासारख्या अनावर झाल्या असतील हे लिहीताना. पैसाच्या खांबाशी बसून ज्या सत्पुरुषाला अवकाश व काल ह्यांचं अध्यात्ममार्गाने ज्ञान प्राप्त झालं आणि आत्मज्ञानी बनून ज्याने जगाला ज्ञानेश्वरी व पसायदान दिलं त्यांच्या बाबतीत आणि त्यांच्याच बाबतीत प्रेम व भक्ती ह्या दोन सरळ मार्गाने मनुष्याला जीवन समजावून सांगणाऱ्या कल्पनांचा असा बहर शक्य आहे.
पण मग मोगराच का दिसला त्यांना ? इतरही अनेक झाडांना व वेलीना फुलांचे असे प्रचंड बहर येतात. मग मोगराच का ? ह्या प्रश्नाचं माझ्या अल्पमतीला जे उत्तर योग्य वाटलं वा जो संबंध मी लावला तो म्हणजे ह्याचं उत्तर मोगऱ्याचा सुगंध, उपयोगिता आणि वर्ण ह्याचा आहे.
मोगऱ्याचा धुन्द करणारा सुगंध हा जवळपास प्रत्येकाने अनुभवला असेल. त्याचं शब्दात वर्णन करणं केवळ अशक्य आहे. ही अनुभव आणि अनुभूती घ्यायची गोष्ट आहे. सांगून समजावता येणार नाही आणि ऐकून समजणार नाही. तो सुगंध अनुभवायलाच हवा. माझ्या बाबतीत ह्याची एक कायमसाठी श्वासात सामावून गेलेली सुगंधखूण आहे.
बरेच वर्षांपूर्वी कामानिमित्त मी कोइंबतूरला गेलो होतो. सकाळी लवकर उठून दिंडीगुलला जायचं होतं. तीन साडेतीन तासाचा प्रवास लवकर सुरू करावा म्हणून सकाळी सातला निघालो. चालक गाडी घेऊन तयार होता. मी गाडीचं दार उघडलं आणि आतल्या सुखद वातानुकूलित गारव्यासहीत जाणवला मोगऱ्याचा स्वर्गीय सुगंध. चालकाने पुढे ताज्या टपोऱ्या मोगऱ्याचा गजरा टांगला होता आणि त्याचा तो अप्रतिम सुगंध कोंदून राहिला होता गाडीत. जगातील कुठलेही अत्तर वा परफ्यूम त्यापुढे फिक्कं होतं. तो संपूर्ण दिवस गाडीत त्या अद्भुत सुगंधाचा आनंद घेत मी प्रवास केला. आजही, मोगरा म्हातलं की तो सुगंध माझ्या श्वासात मला जाणवतो. माझ्यासाठी आयुष्यभर मनात ताजी राहील अशी ही सुगंधखूण.
असा हा मोगऱ्याचा सुगंध. अर्थात सुगंधी तर कितीतरी फुलं असतात. इथेच येते मोगऱ्याची उपयोगिता. मोगरा हे एक फूल असं आहे की जे अनेकविध ठिकाणी उपयोगात येतं. ते स्त्रीच्या केसात माळल्या जाणाऱ्या गजऱ्याच्या रुपात शृंगारसाधन आहे. कलेच्या दालनात कलास्वाद घेताना रसिकांच्या श्रवणेंद्रीयाना सुगंधाची साथ करणारं कलासक्त फूल आहे. संसाराचं अतिमहत्वाचं अंग असलेली "सोज्वळ" शय्यादेखील मोगऱ्याला निषिद्ध नाही आणि; असा हा मोगरा देवाला पूजेत सुद्धा भक्तीभावाने वाहिला जातो. स्वत: संन्यासी असले तरी सामान्यजनाना जीवनाचं मर्म सांगणाऱ्या ज्ञानेश्वराना; साकल्याने जीवन जगण्याचं प्रात्यक्षिक देणारा मोगरा नजीकचा भासावा ह्यात नवल ते काय ?
सुगंध आणि उपयोगिता ह्यांच्या बरोबरच किंवा त्याहीपेक्षा महत्वाचा मोगऱ्याचा वर्ण.
काय आहे असं मोगऱ्याच्या वर्णात ? साधा पांढरा तर आहे रंग. त्यापेक्षा कितीतरी अधिक आकर्षक रंगांची विविधरंगी फुलं आहेत जगात.
पण शुभ्र वर्ण ही रंगांची उणीव वा अनुपस्थिती नसून तो सर्व रंगांचा मिलाफ आहे. वर मोगऱ्याची जी उपयोगिता वर्णन केली ती जीवनातील ज्या विविध अंगांशी व आश्रमांशी संबधित आहे, त्या त्या बाबतीतील कर्तव्य यथायोग्य पार पाडून जीवन पूर्णत्वाने जगल्यावर जी सार्थकता लाभते त्या सार्थकतेसारखा शुभ्र व पवित्र. जेव्हा अध्यात्माच्या व आत्मज्ञानाच्या लोलकातून ह्या शुभ्रवर्णी जीवनाकडे बघावं तेव्हा सर्व कला, कौशल्य, ज्ञान ह्या विविधरंगी जीवनसाहित्यांचे सर्व रंग उत्फुल्ल होऊन दृगोच्चर होतात. असा हा शुभ्र वर्ण.
एका मोगऱ्याचं फूल किती विविधस्पर्शी आहे. मोगऱ्याच्या सुगंधातून सृष्टीतील सौंदर्य, त्याच्या उपयोगितेतून जीवनाची विविध अंग आणि त्याच्या वर्णातून साकल्य हे ज्ञानदेवाना जाणवलं असावं आणि म्हणून जीवनाच्या विविध अंगांचा विचार करत त्याचे मर्म सामान्यांना समजावू पहाणाऱ्या व साकल्याने सर्वरंगी मिलाफाचे पवित्र शुभ्र जीवन कसे जगावे ह्याची जगाला शिकवण देणाऱ्या ज्ञानेश्वरांच्या सुंदर संतकवीकल्पना जेव्हा अनावर बहरून आल्या असतील तेव्हा त्यांच्या मनात प्रथम मोगराच आला असेल.
माऊलींच्या विचारां ना समजण्याइतकी माझी पात्रता नाही, बुद्धी नाही हे मला माहिती आहे. पण निखळ सौंदर्यापुढे अनासक्तपणे नतमस्तक होत मी माझे हे विचार मांडले आहेत आणि त्यामुळे हा औद्धत्याचा अपराध माऊली नक्कीच पोटात घालतील.
जगात सद्विचारांचा मोगरा असाच फुलत रहावा आणि त्याचा बहर इतका अनावर व्हावा की आपले बोल सार्थ झाल्याचा आनंद माऊलीनाही व्हावा ही प्रार्थना माऊलींच्याच चरणी करत हा लेखनप्रपंच आवरता घेतो.
श्री ज्ञानदेवार्पणमस्तु !
---- मनिष मोहिले
दोन तीन दिवसापूर्वी रात्री माझ्या मामाचा फोन आला होता. मटा मधील एका लेखाबद्दल मला सांगायला.
उपरोक्त लेखात पावसानंतरच्या सृष्टीतील सृजनाचे आपल्या लेखणीतून वेगवेगळे सादरीकरण करणाऱ्या ख्यातनाम कवी व साहित्यिकांनी कशाप्रकारे हे वर्णन केले आहे ह्याचे वर्णन होते. ह्या लेखाचा शेवट ज्ञानेश्वरांच्या एका ओवीने केला होता ज्यात ते म्हणतात "जैसे भूमीचे मार्दव, सांगे कोंबाची लवलव". भूमीचं बहुप्रसवा असणं आणि सृजनातील कोवळेपणा हळूवारपणा हा त्या नाजूक कोंबाच्या लवलवीतून साकार होताना जाणवून ती जाणीव इतक्या मोजक्या शब्दात शब्दबद्ध करायला
ज्ञानेश्वरांचीच प्रतिभा हवी.
निसर्गाचा ज्ञानेश्वरांवर असलेला प्रभाव त्यांच्या अजून एका अशाच ओवीतून दिसून येतो - मोगरा फुलला, फुले वेचिता बहरू कळीयांसी आला - ह्या त्या ओळी.
ह्या ओळींची ओळख खूप लहान असतानाच ऐकलेल्या लताच्या अप्रतिम आवाजातील अभंगगीतातून झाली आणि तेव्हापासूनच ह्या ओळी हृदयात एक अढळ जागा घेऊन बसल्या. पण आधी त्या ओळींचा रसास्वाद हा फक्त त्या ओळी नजरेसमोर जो दृष्यसंस्कार उभा करतात त्याच्यापुरताच मर्यादित होता. अर्थात तो दृष्यसंस्कार देखील केवळ अवर्णनीय असाच आहे ह्यात वादच नाही. एखादं झाड इतकं फुलावं, बहरावं की त्याचा तो बहर वेचता वेचता इतका वेळ जावा की तोपर्यंत, त्याच्या कळ्या पूर्ण फुलून पुन्हा बहर यावा ही कल्पनाच किती सुंदर आणि सृष्टीच्या अफाट सृजनशीलतेबद्दल, नेमक्या शब्दात बोलकं वक्तव्य करणारी आहे; नाही !!
पण आज असं वाटतं की स्वत: ज्ञानदेवांच्या संतकवी मनातील कल्पनादेखील अशाच अमाप ओसंडून जाणाऱ्या बहरासारख्या अनावर झाल्या असतील हे लिहीताना. पैसाच्या खांबाशी बसून ज्या सत्पुरुषाला अवकाश व काल ह्यांचं अध्यात्ममार्गाने ज्ञान प्राप्त झालं आणि आत्मज्ञानी बनून ज्याने जगाला ज्ञानेश्वरी व पसायदान दिलं त्यांच्या बाबतीत आणि त्यांच्याच बाबतीत प्रेम व भक्ती ह्या दोन सरळ मार्गाने मनुष्याला जीवन समजावून सांगणाऱ्या कल्पनांचा असा बहर शक्य आहे.
पण मग मोगराच का दिसला त्यांना ? इतरही अनेक झाडांना व वेलीना फुलांचे असे प्रचंड बहर येतात. मग मोगराच का ? ह्या प्रश्नाचं माझ्या अल्पमतीला जे उत्तर योग्य वाटलं वा जो संबंध मी लावला तो म्हणजे ह्याचं उत्तर मोगऱ्याचा सुगंध, उपयोगिता आणि वर्ण ह्याचा आहे.
मोगऱ्याचा धुन्द करणारा सुगंध हा जवळपास प्रत्येकाने अनुभवला असेल. त्याचं शब्दात वर्णन करणं केवळ अशक्य आहे. ही अनुभव आणि अनुभूती घ्यायची गोष्ट आहे. सांगून समजावता येणार नाही आणि ऐकून समजणार नाही. तो सुगंध अनुभवायलाच हवा. माझ्या बाबतीत ह्याची एक कायमसाठी श्वासात सामावून गेलेली सुगंधखूण आहे.
बरेच वर्षांपूर्वी कामानिमित्त मी कोइंबतूरला गेलो होतो. सकाळी लवकर उठून दिंडीगुलला जायचं होतं. तीन साडेतीन तासाचा प्रवास लवकर सुरू करावा म्हणून सकाळी सातला निघालो. चालक गाडी घेऊन तयार होता. मी गाडीचं दार उघडलं आणि आतल्या सुखद वातानुकूलित गारव्यासहीत जाणवला मोगऱ्याचा स्वर्गीय सुगंध. चालकाने पुढे ताज्या टपोऱ्या मोगऱ्याचा गजरा टांगला होता आणि त्याचा तो अप्रतिम सुगंध कोंदून राहिला होता गाडीत. जगातील कुठलेही अत्तर वा परफ्यूम त्यापुढे फिक्कं होतं. तो संपूर्ण दिवस गाडीत त्या अद्भुत सुगंधाचा आनंद घेत मी प्रवास केला. आजही, मोगरा म्हातलं की तो सुगंध माझ्या श्वासात मला जाणवतो. माझ्यासाठी आयुष्यभर मनात ताजी राहील अशी ही सुगंधखूण.
असा हा मोगऱ्याचा सुगंध. अर्थात सुगंधी तर कितीतरी फुलं असतात. इथेच येते मोगऱ्याची उपयोगिता. मोगरा हे एक फूल असं आहे की जे अनेकविध ठिकाणी उपयोगात येतं. ते स्त्रीच्या केसात माळल्या जाणाऱ्या गजऱ्याच्या रुपात शृंगारसाधन आहे. कलेच्या दालनात कलास्वाद घेताना रसिकांच्या श्रवणेंद्रीयाना सुगंधाची साथ करणारं कलासक्त फूल आहे. संसाराचं अतिमहत्वाचं अंग असलेली "सोज्वळ" शय्यादेखील मोगऱ्याला निषिद्ध नाही आणि; असा हा मोगरा देवाला पूजेत सुद्धा भक्तीभावाने वाहिला जातो. स्वत: संन्यासी असले तरी सामान्यजनाना जीवनाचं मर्म सांगणाऱ्या ज्ञानेश्वराना; साकल्याने जीवन जगण्याचं प्रात्यक्षिक देणारा मोगरा नजीकचा भासावा ह्यात नवल ते काय ?
सुगंध आणि उपयोगिता ह्यांच्या बरोबरच किंवा त्याहीपेक्षा महत्वाचा मोगऱ्याचा वर्ण.
काय आहे असं मोगऱ्याच्या वर्णात ? साधा पांढरा तर आहे रंग. त्यापेक्षा कितीतरी अधिक आकर्षक रंगांची विविधरंगी फुलं आहेत जगात.
पण शुभ्र वर्ण ही रंगांची उणीव वा अनुपस्थिती नसून तो सर्व रंगांचा मिलाफ आहे. वर मोगऱ्याची जी उपयोगिता वर्णन केली ती जीवनातील ज्या विविध अंगांशी व आश्रमांशी संबधित आहे, त्या त्या बाबतीतील कर्तव्य यथायोग्य पार पाडून जीवन पूर्णत्वाने जगल्यावर जी सार्थकता लाभते त्या सार्थकतेसारखा शुभ्र व पवित्र. जेव्हा अध्यात्माच्या व आत्मज्ञानाच्या लोलकातून ह्या शुभ्रवर्णी जीवनाकडे बघावं तेव्हा सर्व कला, कौशल्य, ज्ञान ह्या विविधरंगी जीवनसाहित्यांचे सर्व रंग उत्फुल्ल होऊन दृगोच्चर होतात. असा हा शुभ्र वर्ण.
एका मोगऱ्याचं फूल किती विविधस्पर्शी आहे. मोगऱ्याच्या सुगंधातून सृष्टीतील सौंदर्य, त्याच्या उपयोगितेतून जीवनाची विविध अंग आणि त्याच्या वर्णातून साकल्य हे ज्ञानदेवाना जाणवलं असावं आणि म्हणून जीवनाच्या विविध अंगांचा विचार करत त्याचे मर्म सामान्यांना समजावू पहाणाऱ्या व साकल्याने सर्वरंगी मिलाफाचे पवित्र शुभ्र जीवन कसे जगावे ह्याची जगाला शिकवण देणाऱ्या ज्ञानेश्वरांच्या सुंदर संतकवीकल्पना जेव्हा अनावर बहरून आल्या असतील तेव्हा त्यांच्या मनात प्रथम मोगराच आला असेल.
माऊलींच्या विचारां ना समजण्याइतकी माझी पात्रता नाही, बुद्धी नाही हे मला माहिती आहे. पण निखळ सौंदर्यापुढे अनासक्तपणे नतमस्तक होत मी माझे हे विचार मांडले आहेत आणि त्यामुळे हा औद्धत्याचा अपराध माऊली नक्कीच पोटात घालतील.
जगात सद्विचारांचा मोगरा असाच फुलत रहावा आणि त्याचा बहर इतका अनावर व्हावा की आपले बोल सार्थ झाल्याचा आनंद माऊलीनाही व्हावा ही प्रार्थना माऊलींच्याच चरणी करत हा लेखनप्रपंच आवरता घेतो.
श्री ज्ञानदेवार्पणमस्तु !
---- मनिष मोहिले
No comments:
Post a Comment