Monday, August 24, 2020

तत्वमसि

 तत्वमसि


(मूळ गुजराती लेखक - धृव भट्टमराठी अनुवाद - अंजनी नरवणे)


सहसा एखाद्या पुस्तकाबद्दल आपण लिहीतो तेव्हा पुस्तकाच्या विषयाबरोबरच, लेखनाची शैली, पात्र असल्यास पात्रांच्या स्वभावाचे विश्लेषण, पुस्तकातील जाणवणारं साहित्यसौंदर्य, दुसऱ्या एखाद्या साहित्यकृतीशी समानता वा विरोधाभास असे काही मुद्दे आपण विचारात घेतो.


मात्र; काही पुस्तकातील मूळ विचार वा सार इतकं अस्सल, मूलगामी, विचार करायला प्रवृत्त करणारं आणि भारून टाकणारे असतात की ह्या सगळ्या बाकीच्या गोष्टी निमित्तमात्र ठराव्यात. त्या पुस्तकाचं सगळं सौंदर्य त्या सारसर्वस्वात, त्या मूलगामी विचारात असतं . तो विचारच इतका प्रभावी असतो की तुम्ही त्या पुस्तकाबद्दल बोलू लागलात की त्या विचारापुढे इतर गोष्टी आपोआप दुय्यम ठरतात. माझ्या बाबतीत तरी असं होतं.


अर्थात, वर्ण्यविषय असलेल्या पुस्तकाची ओघवती शैली, मूळ गुजराती भाषेतील रसास्वाद, मराठी अनुवाद वाचताना त्यात अजिबात बाधा वा कमीपणा येऊ नये अशा पद्धतीने केलेला मराठी अनुवाद, वाचकाला गुंगवून ठेवायची कथानकाची व लेखकाची ताकद ह्या सर्व गोष्टी निश्चितच स्पृहणीय व कौतुकास्पद. मूळ गुजराती पुस्तकाला गुजराती साहित्य अकादमीचं मिळालेलं पारितोषिक व इतर पुरस्कार ह्याबद्दल ग्वाही देतातच. पण ह्या सर्वांपेक्षा जी विचारधारा पुस्तकातून दिसते त्या अप्रतिम विचारधारेबद्दल लेखकाला त्रिवार वंदन.

सुरूवातीलाच आभारप्रदर्शन केल्यासारखा हा भाग मी आधीच उद्धृत केला कारण पुस्तकाबद्दल बोलायला सुरूवात केल्यावर मध्ये वा ते संपल्यावर शेवटी - इतर कोणत्याही गोष्टीकडे लक्ष देणे शक्य नाही आणि अशा पुस्तकाच्या बाबतीत उचितही नाही.


तत्वमसि 

भारतात मुंबईत झालेला जन्म, लहान असतानाच आईचं देहावसान, एखाद वर्ष गुजरातमधील एका खेड्यात आजीजवळ घालवलेलं एक वर्ष आणि त्यानंतर वडिलांबरोबर परदेशी जाऊन तिथेच शिक्षण घेतलेला, स्थायिक झालेला, मानव संसाधन क्षेत्राशी संबंधित नोकरी करणारा अशा पार्श्वभूमीचा कथानायक, वरीष्ठांच्या ईच्छेपुढे मान तुकवून बराचसा अनिच्छेनेच भारतात परत येतो - नर्मदेच्या किनाऱ्यावरील घनदाट जंगलातून रहाणाऱ्या आदिवासी लोकांच्या विकासासाठी, त्यांच्या जीवनशैलीचा अभ्यास करून त्याना विकासाभिमुख बनवण्यासाठी. ह्या कथानायकाच्या तोंडून, त्याच्या ह्या वास्तव्याची व त्या दरम्यानच्या आदिवासी जीवनशैलीच्या निरीक्षणाची  व त्यातूनच सुरू झालेल्या आत्मशोधाची कथा म्हणजे धृव भट्ट लिखित तत्वमसि.  


पुस्तकाच्या सुरूवातीलाच लेखक पुस्तकाचं सार सांगून जातो आणि तरीही, कथानायकाच्या रोजनिशीतील प्रथमपुरूषी कथनाच्या आकृतीबंधात सादर केलेल्या ह्या कहाणीत आपल्याला सुरूवातीपासून शेवटपर्यंत गुंतवून ठेवतो. 


लहानपणापासून परदेशात राहून, शिक्षण घेऊन कळत नकळत उपयुक्ततावादी बनलेला, आपला धर्म, संस्कृती, परंपरा ह्यांना फारसं महत्व न देणारा पण तरीही कुठेतरी त्याची बैठक मनात असलेला,  कथानायक कामानिमित्त नर्मदेच्या काठच्या जंगलातील आदिवासी आणि त्यांच्यासाठी काम करणारी व त्या कार्यालाच जीवन वाहिलेली आधुनिक सुशिक्षित तरुण सुप्रिया भारतीय, तिचे वैचारिक, नैतिक व नैष्ठिक गुरू असल्यासारखे असलेले शास्त्रीजी, व्यवसायाने सावकार पण वृत्तीने समाजसेवी असे गुप्ताजी, एका चर्च मधील फादर,आदिवासीना  मधुमक्षिकापालन शिकवण्याचा प्रयत्न करणारा लक्ष्मण शर्मा, स्वत:च्या पोटाला चिमटा घेऊन ह्या जंगलात आदिवासींसाठी शाळा चालवण्याचा प्रयत्न करणारे व वणवा विझवण्यात मदत करणारे विष्णू आणि विद्या, नर्मदा परिक्रमा करणारे एक दोन परिक्रमावासी, आदिवासींपैकीच जणू एकाच व्यक्तीचं वा जागेचं नाव असावशा नावाचे वाटणारे बित्तुबंगा नावाचे भाऊ, एक आदिवासी तरुणी पूरिया, वेडा फकीर आणि कालेवाली माँ ह्या सर्वांना भेटतो आणि आत्तापर्यंतच्या आयुष्यात विकास आणि संस्कृती ह्याबद्दल ज्या कल्पना त्याच्या मनात असतात त्यातील काहींना समूळ हादरे बसतात तर काही बदलायला लागतात.


भगवान शंकराने आपल्या लाडक्या मुलीसाठी, नर्मदेसाठी खेळाय बागडायला घनदाट अरण्य निर्माण केलं आणि मग पार्वतीला सांगितलं की अरण्यातील सर्व वृक्ष झाडं झुडूपं आणि प्राणी पक्षी ह्यांच्या रक्षणासाठी एक वृक्षप्रमुख नेम. त्या आदेशानुसार पार्वतीने अरण्याच्या मध्यभागी चारी बाजूला टेकड्या असलेल्या एका मैदानातील एका ऊंच पर्वतावर ऐन माथ्यावर एक सागाचं रोप लावलं जो आज नर्मदा काठच्या अरण्यातील सर्वात ऊंच विशाल असा सागाचा वृक्ष आहे जो संपूर्ण वर्ष हिरव्यागार पानांनी बहरलेला रहातो व सर्व प्राणी पक्षी ह्यांचं व निष्पाप माणसांचं रक्षण करतो ह्यासारख्या पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या दंतकथेतील जिंदा सागबान बघितल्यावर, शहरातील माणसं सोडाच पण इतर आदिवासींमध्ये सुद्धा न मिसळणाऱ्या साठसाली लोकांच्या मृग नक्षत्र, व्याधाचा तारा ह्याबद्दलचं आधुनिक खगोलशास्त्रीय माहितीशी मिळतजुळतं ज्ञान ह्या गोष्टी कथानायकाला अजून अंतर्मुख बनवत जातात. 


आदिवासींची वरवर अडाणी व अशिक्षित आणि आधुनिक शहरी समाजाच्या दृष्टीकोनातून जंगली वाटणारी संस्कृती प्रत्यक्षात निसर्गाच्या किती जवळ आणि मूलभूत नैसर्गिक चांगुलपणाशी नाळ टिकवून आहे हे जसजसं नायकाला कळतं तसतसं शास्त्रीजींनी त्याला विचारलेला प्रश्न - "तुला किंवा मला ह्या आदिवासींना 'सुधारण्याचा' खरोखर अधिकार आहे का?" हा प्रश्न त्याला कळू लागतो.  प्रामाणिकपणा, सहज प्रेमातला धर्म, अतिथी ला देव मानणं ह्या संकल्पना त्यांच्या जीवनात किती सहज आहेत, त्यांना शिकायची वा शिकवायची गरज नाही हे त्याला कळतं काही प्रसंगातून - आठवड्याच्या बाजाराला अर्ध्या रस्त्यापर्यंत येऊन (कारण शहरात वावरताना बावरायला होतं) भले खरेदी काही न करता पण कर्जाऊ रकमेची मध, धान्य अशा रुपात परतफेड करायला गुप्ताजींच्या जीपची वाट बघत थांबणारे आदिवासी बघून त्याला कळतं की प्रामाणिकपणे जगतात कसे ते.

दुसरा प्रसंग - आई लहानपणीच गेल्यावर लहान भाऊ बंगाला आई बनून वाढवलेला बित्तु, ज्या वाघिणीच्या हल्ल्यात बंगा मरतो त्या वाघिणीला, तिला मारून बंगाच्या मृत्यूचा सूड उगवण्याची शपथ घेतलेली असूनसुद्धा; सोडून देतो कारण तिचे बच्चे जंगलात आईविना राहू शकणार नाहीत. हाच बित्तु,वाघिणीला सोडलं म्हणून चर्च मध्ये जाऊन कन्फेशन देऊ ईच्छितो की धाकट्या भावाला मारणाऱ्या वाघिणीला मी सोडलं. भावाच्या मारेकरी वाघिणीला मारायचं की बच्च्यांची आई असलेल्या त्याच वाघिणीला सोडायचं ही अतिशय कठीण निवड करून वाघीण व मृत भाऊ दोघांच्या प्रती प्रेम आणि प्रामाणिकपणा राखायचा अशा पद्धतीने जीवन जगायला शिकवणाऱ्या संस्कृतीपुढे जगातील कोणता धर्म श्रेष्ठ ठरेल तरी का ?

तिसरा प्रसंग - नायक, सुप्रिया, वेडा फकीर एकदा जंगलातून जात असता दुपारी जेवायच्या वेळेला एका म्हाताऱ्या आदिवासीच्या झोपडीजवळ येतात. मूर्तीमंत दारिद्र्याचं दर्शन असा तो आदिवासी, दारी आलेल्या अतिथीना भुकेलं जाऊ द्यायचं नाही म्हणून हट्टाने थांबवून मडक्यातली दारू आणि मीठ देतो तो प्रसंग. केंद्राच्या एका कारखान्यात काम करणाऱ्या एका आदिवासीचा हात कापला जातो तेव्हा पैशाची मदत मागणारी त्याची पत्नी ज्या प्रामाणिकपणे मजूरी करून त्या कर्जाची परतफेड करायची तयारी दाखवते तो प्रामाणिकपणा.


एक ना दोन अनेक प्रसंगातून नायकाला प्रश्न पडत रहातात की वरवर पहाता इतकं मागासलेलं, अंधश्रद्धेवर आधारलेलं, कठीण व दरिद्री जीवन जगणाऱ्या ह्या आदिवासींकडे हा मूलभूत पक्का व चांगुलपणा असलेला नैतिक जीवनाचा पाया कुठून आला ?


अनेक प्रश्न त्याला पडत रहातात. सुप्रिया, शास्त्रीजी ह्यांच्याबरोबरच्या संवादातून ह्या प्रश्नांची उत्तरं मिळाल्यासारखी वाटतात आणि नाहीदेखील.


शास्त्रीजी म्हणतात त्याप्रमाणे अनेक धर्म, जाती, पंथ ह्यात वरवर पहाता विभागले गेलेले, अडाणी अशिक्षित आदिवासी ते प्राचीन काळचे ॠषी व अर्वाचीन काळचे अत्याधुनिक प्रगत लोक इतक्या विशाल सामाजिक स्तरावर पसरलेले हे कोट्यावधी लोक एक देश म्हणून राहू शकतात कारण त्यांना एकत्र ठेवते त्यांची संस्कृती जी धर्मापेक्षा अध्यात्माला महत्व देते. ही संस्कृतीच त्यांना निसर्गाच्या जवळ व निसर्गाच्या नियमाप्रमाणे रहायला शिकवते. त्यासाठी असंख्य परंपरा निर्माण करते, धर्माला लवचिक बनवते. कारण आपणा सर्वातील निसर्गतत्व, ईशतत्व एकच आहे ह्या जाणीवेचा आध्यात्मिक सांस्कृतिक वारसा कळत नकळत पिढ्यानपिढ्या जन्मजात ह्या जनतेकडे चालत आला आहे.


म्हणूनच सुप्रिया म्हणते की ती परिक्रमावासींची नाही तर परिक्रमेची सेवा करते. ती आणि तिच्यासारखे नर्मदाकाठचे असंख्य लोक जे परिक्रमावासी पुरूष की स्त्री, त्याचा वा तिचा धर्म, जात ह्याचा विचार न करता त्या परिक्रमावासीला आपल्याकडून होइल ती सर्व मदत - अन्न, वस्त्र, निवारा ह्याची करतात; कारण त्यांना परिक्रमेची परंपरा जीवंत ठेवायची आहे. तुम्ही नर्मदा मातेवर श्रद्धा ठेऊन परिक्रमा उचललीत तर नर्मदामाई तुम्हाला कधीच काही कमी पडू न देता तुमची परिक्रमा पूर्ण करवेल हा विश्वास ही ह्या संस्कृतीची व परंपरेची देणगी आहे. ह्याच मुळे कित्येक लोक आजही रात्री दाराबाहेर तेलाची वाटी ठेवतात की अश्वत्थामा आलाच जखमेवर लावायला म्हणून तेल शोधायला तर त्याला तेल मिळावं. ह्यातील चिरंजीवित्वाच्या कल्पनेपेक्षा, अश्वत्थामा येवो वा न येवो, आपण  सांस्कृतिक परंपरेने दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे निभावायची ही जी जीवनपद्धती आहे ती जास्त विलोभनीय व उदात्त आहे.


त्याचमुळे सुप्रियाला व शास्त्रीजीना एकाच गोष्टीची काळजी आहे की बदल, विकास व परिवर्तन ह्या नावाखाली ह्या जनतेला त्यांच्या ह्या सुसंस्कारित जीवनपद्धतीत बदल करायला भाग पाडलं जातय वस जाईल. ती जीवनपद्धती, संस्कृती हीच ह्या देशाची खरी ओळख आहे जी अनादि अनंत कालाच्या अग्नीपरीक्षेला पूर्णपणे उतरली आहे. 

म्हणूनच शास्त्रीजी म्हणतात की धर्माचं काय होइल ह्याची मला चिंता नाही. पण सध्या जे चाललय त्यामुळे ह्या देशातील लोकांच्या  जीवनपद्धतीत, जीवनाकडे बघण्याच्या दृष्टीकोनात फरक पडत चालला आहे त्यामुळे संस्कृतीची त्यांना चिंता वाटते.

सुप्रियाला प्रश्न पडतो की नष्ट होण्याच्या मार्गावर असलेल्या एखाद्या पक्ष्याच्या वा प्राण्याच्या प्रजातीबद्दल तथाकथित सुशिक्षित व आधुनिक लोक इतके जागरुक असतात व त्यांचं अस्तित्व टिकावं ह्यासाठी लोकजागृतीसहीत प्रत्यक्ष कृतीचे प्रयत्न करतात तेच लोक एखाद्या जनसमूहाची संस्कृती, परंपरा, जीवनपद्धती ह्यांचा नाश होत असेल तर त्याला परिवर्तन वा विकास असं नाव देऊन ह्या नाशाची भलावण का करतात ?


ईच्छा नसताना अंगावर पडलेलं हे काम पटकन ऊरकून पुन्हा परत जावं असा बेत करून आलेला कथानायक ह्या सगळ्या परीकथेसारख्या वाटणाऱ्या कथा, परीकथेतल्यासारखे वाटणारे पण जीवनाचा खरा अर्थ समजल्यासारखे वाटणारे बित्तुबंगा, पूरीया सारखे आदिवासी, वेषभूषा, भाषा, शिक्षण इत्यादी बाबतीत नायकासारखेच असलेले पण प्रत्यक्षात ज्यांची नाळ अजून ह्या आदिवासींशी व इथल्या संस्कृती व परंपरांशी आणि अध्यात्माशी अधिक जुळलेली आहे अशा सुप्रिया, शास्त्रीजी, लक्ष्मण शर्मा, विष्णू आणि विद्या इत्यादीना आणि ह्या दोहोंच्या पलीकडले असे वेडा फकीर, कालेवाली माँ आणि अनोळखी परिक्रमावासी ह्यांच्या भेटी व त्यांच्या बरोबरीची संभाषणे ह्यातून नायकाला ओढ लागते ती सत्यशोधनाची. पुरातन काळापासून ज्या नर्मदेच्या सदेह अस्तित्वाला आणि पर्यायाने ईशतत्वाला ही संस्कृती मानत आली आहे त्या नर्मदेने सदेह दर्शन देऊन स्वत:च्या तोंडून स्वत:ची ओळख दिली तर हे सगळं - ह्या कथा, परंपरा, संस्कृती आपण खरी मानू असा विचार त्याच्या मनात बळावत जातो. 


दैववशात्, त्याच्यावर निष्कांचन अवस्थेत, नेसल्या वस्त्रानिशी नर्मदाकाठाने प्रवास करायची वेळ येते. पण खरच दैववशात् की सत्याशी ओळख व्हायची त्याची वेळ होते म्हणून ? कारण; आत्तापर्यंत त्याच्या खाती आदिवासींसाठी जे काही काम केलं ते काम आणि मनातील प्रचंड खळबळ आणि ह्या जीवनसंस्कृतीला जीवंत ठेवणाऱ्या तत्वाची ओळख करून घ्यायची प्रचंड ओढ इतकी पुंजी तर जमा झालेली असते.


आणि अशा वळणावर परिक्रमेच्या मार्गावर भिल्ल जे लूट करतात त्याचा अनुभव त्याला येतो. अगदी नेसती वस्त्र सुद्धा त्याच्याकडून ते भिल्ल काढून घेतात. ते त्याला हुकूम देतात " दे, दे, देऊन टाक." 

शहराजवळ जाऊन पैसा अडका न लुटता, आडवाटेच्या वाटसरूचे अंगावरचे कपडे हे लोक का लुटतात हा प्रश्न त्याला पडतो आणि आत्तापर्यंत घेतलेल्या अनुभवातून, केलेल्या विचारमंथनातून त्याच्या समोर ह्या प्रश्नाचं विराट उत्तर उभं रहातं. हा हुकूम ते भिल्ल स्वत: देत नाहीत. त्यांच्या तोंडून स्वत: माता नर्मदा देतेय. इथल्या हजारो वर्षांची परंपरा आणि संस्कृती देतेय. तुझ्या जवळचं सगळं देऊन टाक आणि नि:संग हो म्हणून. 

अंगावर कपडा नाही, पोटात अन्नाचा कण नाही असा तो काही अंतर चालून जातो आणि बेशुद्ध पडतो. शुद्धीवर येतो तो एका छोट्या मुलीच्या आवाजाने, जी हातातलं मक्याचं कणीस पुढे करून त्याला सांगत असते " घे, हे घे". त्या मुलीला तो विचारतो की "माई , तू कोण आहेस ?"  आणि जागृती व बेशुद्धीच्या सीमारेषेबरच्या त्याला कुठूनतरी खोल पण स्पष्ट अशा संपूर्ण आसमंत भरून टाकणाऱ्या आवाजात उत्तर मिळतं 

" रेssवा"


स्वत:ला "दे - त्यागून दे" आणि ईशतत्वाला "घे - अंगिकार" ह्या दोन शब्दात आणि मूलभूत तत्वात ही संस्कृती आहे आणि म्हणूनच इतके बदल, परिवर्तन होत असूनसुद्धा ती टिकून आहे.


अध्यात्म मार्गावर प्रगती असेल तर "अहम् ब्रह्मास्मि" ची जाणीव होऊ शकेल ज्यात जाणीवेचा भर, अहम् वर नसून ब्रह्मावर असेल. पण अध्यात्ममार्गावर फार प्रगती नसताना देखील आत्मशोध व सत्यशोधाची तळमळ ही जाणीव नक्कीच करून देऊ शकते की " हे जे सर्वकाही सजीव निर्जीव जग तुला दिसतय त्यात भरून असलेलं ब्रह्मतत्व तूच तर आहेस - तत् त्वम् असि.  तत्वमसि ! 


-- मनिष मोहिले 


3 comments:

  1. सुंदर रसाळ रसग्रहण!

    ReplyDelete
  2. सुंदर रसाळ रसग्रहण मनीष !

    ReplyDelete
  3. सुंदर रसाळ रसग्रहण मनीष !

    ReplyDelete