अकूपार
अकूपार. वाचूनच ऊत्सुकता निर्माण होते. काय आहे हे ? नाव ? विशेषण ? की अजून काही ? अर्थ काय अकूपारचा ?
महाभारताच्या वनपर्वात पुष्कळ कथा आहेत. त्यातील एका कथेत इंद्रद्युम्न राजाला त्याचा पुण्यसंचय संपतो म्हणून स्वर्गातून बाहेर जाण्यास सांगण्यात येते. देवदूत म्हणतात की जर तू पुरावे वा साक्षीदारांच्या सहाय्याने हे सिद्ध करू शकलास की भूतलावरील तुझ्या काही कृत्यांचा पुण्यसंचय अजूनही तुझ्या गाठीशी आहे; तर तुला स्वर्गात पुन:प्रवेश मिळेल.
इंद्रद्युम्न राजा अशा साक्षीदारांच्या शोधात कित्येक युगांनंतर पृथ्वीवर येतो. बरेच जण स्वाभाविकपणे त्याला ओळखत नाहीत. शेवटी तो ह्याला विचार त्याला विचार करत करत अकूपार नावाच्या कासवापर्यंत येऊन पोचतो. जवळपास चिरंजीव असावं इतक्या आयुष्याचं ते कासव त्याला ओळखतं. इंद्रद्युम्नच्या घोडदळाच्या टापांमुळे तयार झालेल्या सरोवरात राहणारे अकूपार त्याच्या पुण्यकृत्यांची साक्ष देते आणि इंद्रद्युम्नाला स्वर्गात सन्मानाने पुन:प्रवेश मिळतो.
गीरचं जंगल व आसपासच्या प्रदेशात अशी मान्यता आहे की पृथ्वी ज्या शेषनागाच्या फण्यावर स्थित आहे, तो शेषनाग स्वत: एका कासवाच्या पाठीवर स्थित आहे. पृथ्वीला शेषनागासहीत स्वत:च्या पाठीवर तोलणारं कासव चिरंजीव असंच असणार. तर असा हा कासव, त्याच्या पाठीवर शेषनाग आणि त्याच्या फण्यावर पृथ्वी हा डोलारा तोपर्यंत स्थिर आहे जोपर्यंत शेषनाग आणि कासव पृथ्वीवरील पापांचा भार सहन करू शकतात. हा भार निर्माणच होऊ नये वा वाढू नये हे बघणं हे काम माणसाचं कारण भार वाढवणारा तोच. गीरने ह्या बिकट समस्येवर फार साधं सोपं उत्तर शोधलं आहे. म्हणून गीरच्या जंगलातील जंगली श्वापदं - विशेषकरून सिंह जो येथील जंगलाचा राजा आहे आणि तेथील रहिवासी ह्यांच्या एका विशेष अशा प्रकारच्या सहजीवनावर आधारितअशा ह्या धृव भट्ट लिखित कहाणीचं शीर्षक आहे अकूपार. अंजनी नरवणे ह्यांनी मराठी अनुवादाचं शीर्षकदेखील तेच ठेवलं आहे - अकूपार.
अकूपारची कहाणी थोडक्यात अशी की राजकोट मध्ये रहाणारा एक चित्रकार एका वास्तू सुशोभन प्रकल्पांतर्गत त्याच्याकडे आलेल्या चित्र काढण्याच्या कामाच्या निमित्ताने गीरला भेट देतो. ह्या भेटीदरम्यान व नंतर काय होतं ह्याची कहाणी म्हणजे अकूपार.
चित्र काढायला गीरपर्यंत का लांब जायचं ? तर चित्रमालिकेचा विषय असतो तत्वरुपा पृथ्वीची चित्रं काढायची. पंचमहाभूतांपैकी एक अशा पृथ्वीचं तत्वरुप दाखवायचं तर मुळात ते तत्व काय आहे ते समजायला हवं आणि त्यासाठी निसर्गाच्या जवळ जायला हवं. म्हणून गीर.
विस्तीर्ण पसरलेलं मुख्यत्वे सागाच्या झाडांचं जंगल, मधून मधून असलेल्या टेकड्या, तीस पस्तीस किलोमीटरवरचा समुद्रकिनारा आणि अशा बहुरंगी बहुढंगी जमिनीवर वास्तव्य करून असलेली जीवसृष्टी व त्याच जीवसृष्टीचा भाग बनून असलेली माणसं. म्हणून गीर.
कथानायक गीरमध्ये येतो आणि विविध व्यक्तींशी त्याचा परिचय होतो. पहिल्याच दिवशी त्याला नकळतपणे सिंहांच्या जवळ जात असण्यापासून वाचवणारी सांसाई नावाची तरुणी जी वरकरणी तडकफडक बोलणारी पण गीरची जमीन, तिथली वन्यजीव सृष्टी, विशेषकरून सिंह आणि तिथला निसर्ग ह्यांच्याशी एकरुप झालेली आहे. निसर्गाशी असलेली ही एकरुपता, सिंहांबद्दलचं स्वाभाविक प्रेम / आपलेपण हे सांसाईकडे तिच्या अंध पणजोबांकडून वंशपरंपरागत चालत आलेलं आहे.
दुसऱ्या आईमा. ऐंशीच्या पुढच्या वयाच्या ह्या वृद्धेकडे असलेला पारंपारिक कथांचा खजिना, त्या कथांना वाट देणारी तिची चित्रकला आणि निसर्गाच्या सान्निध्यात इतकं आयुष्य घालवल्यामुळे आयुष्याची असलेली एक आगळी समज.
त्याशिवाय मग जंगलखात्यात बीटगार्डची नोकरी करणारे अहमद व धानू, गुराखी विक्रम, सांसाईची मैत्रीण लाजो, रविभा, गोविंदभाई व कोळ्यांची सरपंच राणी अशा इतर अनेक व्यक्ती.
मात्र ह्या सगळ्यांच्यामध्ये नायकाला एक समान धागा दिसून येतो आणि तो म्हणजे गीरबद्दल, तिथल्या जमिनीबद्दल, निसर्गाबद्दल, प्राणीसृष्टीबद्दल व परस्परांबद्दल असलेली आपुलकी व अहेतुक प्रेम.
इथे कोणीही माणूस अल्प परिचयावर किंवा कोणा ओळखीच्या व्यक्तीचा संदर्भ घेऊन आला तरी जेवू घालायला, रहायला जागा द्यायला लोक अनमान न करता तयार होतात. अशा व्यक्तीसमोर स्वत:च्या दैनंदिन आयुष्याचा पट, एखाद्या जुन्या आठवणीसहीत उलगडून दाखवण्यात देखील ते कचरत नाहीत. हे कसं शक्य आहे ? शहरी औपचारिक रिवाजांची सवय असलेल्याना तर हे विचित्रच वाटेल. पण ही आहे एक प्रकारची लोभस अनौपचारिकता. माणसातील चांगूलपणावर विश्वास असला की आपोआप आतून येणारी. एकमेकांचा सहज स्वीकार असला की येणारी.
बरं, हा स्वीकार फक्त मनुष्यापुरता मर्यादित नाही तर तेथील इतर प्राणी व सजीव सृष्टीबद्दल देखील आहे. म्हणूनच गीरच्या जंगलात एकमेकांच्या इतक्या जवळ राहून सुद्धा सिंह व माणूस दोघेही गुण्यागोविंदाने राहतात कारण ते एकमेकांच्या अस्तित्वाचा आदर करतात. शक्यतो दुसऱ्याच्या जीवनात ढवळाढवळ करत नाहीत. कर्मधर्मसंयोगाने क्वचित असा प्रसंग आलाच तर नाईलाज म्हणून हे घडलं असेल व क्वचितच असं कधी घडू शकतं, त्यामुळे परस्पर विश्वास व आदर गमावण्याची गरज नाही हे प्राण्यांना तर अंत:प्रेरणेने कळतच पण स्वत:च्या बुद्धीवर जास्तच विश्वास असलेल्या मानवाच्या गीरमधल्या प्रतिनीधींना देखील कळतं.
म्हणूनच लाजोच्या लाडक्या गाईवर सिंहीण हल्ला करते तेव्हा लाजो विचार करते की सिंहीणीच्या हल्ल्यात जखमी गाय वाचवली तरी हाल होऊन मरेल. त्यापेक्षा, पोटाला काही हवं म्हणून शेवटचा पर्याय म्हणून सिंहीणीने गायीवर हल्ला केला असेल तेव्हा तो घास तिच्या तोंडून काढून घेऊ नये.
एका प्रवाशाच्या बेजबाबदार वर्तनामुळे, त्याच्यावर हल्ला करणाऱ्या सिंहाच्या समोर धानू जीवावर उदार होत स्वत:ला घालतो आणि जखमी होतो तेव्हा त्याच्या मनात सिंहाबद्दल वा प्रवाशाबद्दल यत्किंचीतही कटूपणा नसतो. तो म्हणतो प्रवासी त्याला वागायचं होतं तसं वागला आणि सिंह त्याच्या नैसर्गिक प्रेरणेप्रमाणे. पण सिंहाला मला मारायचं नव्हतं म्हणून खांदा पकडला माझा, गळा नाही.
पिल्लांना जन्म देण्यासाठी गीरजवळच्या समुद्रकिनारी येणाऱ्या व्हेल शार्कना मच्छीमारांनी पकडू नये व त्यांच्या संवर्धनात मदत करावी हे त्याना समजावताना सरपंच असलेली राणी अगदी सोप्या शब्दात सांगते की बाळंतपणासाठी माहेरी आलेल्या मुलीला तुम्ही माराल का ?
सांसाई तर गीरची कन्या असल्यासारखीच लहानाची मोठी झालेली. कुवांडिया नावाचं गुरांना व इतर प्राण्याना चरण्यास लायक नसलेलं गवत गीरमध्ये उगवताना दिसतं तेव्हा परंपरागत कथेनुसार ज्या टेकडीवर गुरं चरायला नाही न्यायची तिथे कोणीतरी गुरं चरायला नेली म्हणून सगळीकडे कुवांडिया उगवतय म्हणून सांसाई चिडते त्यात परंपरेबरोबरच गीरमधील निसर्गाने जो समतोल सांभाळला आहे तो समतोल ढळण्याची शक्यता आहे ह्याची ती चीड आहे.
जंगलातील पुष्कळ सिंहाना स्वत: ठेवलेल्या नावांनी ओळखणाऱ्या सांसाईला ते सिंह सुद्धा ओळखतात इतकी ती गीरच्या जीवसृष्टीशी एकरुप झालेली आहे. गीरची ही निसर्गकन्या जणू गीरची ओळख आहे कारण निसर्गाशी असलेल्या एकरुपतेचा वारसा तिच्याकडे पिढीजात चालत आला आहे.
निसर्गाशी असलेली ही एकरुपता जी सांसाईकडे जन्मजात आहे तीच आईमांकडे पण आलेली आहे त्यांच्या दीर्घ आयुष्यातील अनुभवातून. सूर्य सुद्धा जन्माला यायच्या आधी उत्पत्ती मातेनी अवतार घेऊन जग निर्माण केलं आणि गीरच्या भूमीत सिंह आणि माणूस ह्या दोघांना एकमेकांचा योग्य आदर राखून रहायची परवानगी दिली ह्या आईमांच्या कथेत विलोभनीय दंतकथेबरोबरच मनुष्य व इतर प्राणीसृष्टी व सजीवसृष्टी ह्यांच्या सहजीवनातून समतोल साधण्याचं जे शास्त्रीय सत्य आहे त्याची पण रोजच्या जीवनातून मनात भिनलेली जाणीव आहे. अशी जाणीव ज्यामुळे सांसाई सिंहीणींना एखादी व्यक्ती व्यक्तीला ओळखेल तशी ओळखू शकते वा राणी व्हेल शार्कच्या माद्यांची बरोबरी सहजपणे बाळंतपणाला माहेरी येणाऱ्या मुलीशी करू शकते.
त्याचबरोबर हीदेखील जाणीव आहे की हा समतोल टिकवणं हे ह्या भूमीवरील जीवनासाठी अत्यावश्यक आहे. नाहीतर पापांचा भार वाढेल आणि कासव तो भार पेलू शकणार नाही. म्हणूनच तो समतोल सांभाळण्याची निसर्गाने, उत्पत्ती मातेनी दिलेली जबाबदारी ते पिढ्यानपिढ्या आत्मीयतेने पुरी पाडत जगतात.
ह्या निसर्गाने दिलेल्या जाणीवेनुसार जगण्यामुळेच भौतिक सुखाच्या कमतरतेमध्ये देखील गीरच्या लोकात परस्पर आपुलकीआहे, स्वीकार आहे, अनौपचारिकता आहे. तीच प्राण्यांबद्दल ही आहे. म्हणूनच कोणाला आयत्या वेळी जेवायला बोलावण्यात वा रहायला जागा देण्यात, इंजिनला नवस बोलण्यात तेथील लोकाना शंका येत नाहीत. त्यांच्या जीवनातील विश्वास व श्रद्धा हे अजून कायम आहेत जे भौतिकदृष्ट्या कठीण जीवन सहज व सोपं करून जगायची प्रेरणा त्याना देतात.
इतक्या सर्व मंडळीना भेटल्यावर. त्यांच्याशी बसल्या बोलल्यावर कथानायकाला जाणवतं की हे नैसर्गिक सहजीवन व समतोल हेच पृथ्वीचं तत्वरूप. बहुप्रसवा मेदिनीचं तत्वरुप म्हणजे विविध प्रकारात फुललेलं हे जीवन.
जेव्हा हे त्याला कळतं तेव्हा त्याला हे जाणवतं की सुरूवातीला चाचपडणारा त्याचा कुंचला जसजशी त्याची स्थानिक लोकांशी व गीरच्या भूमीशी ओळख होत गेली तस तसा तो कुंचला अशा सफाईदारपणे
कॅनव्हासवर फिरायला लागला की जणू त्या जागेची, त्या व्यक्तीची, त्या प्रसंगाची कहाणी त्याच्यासमोर कुणी उलगडत न्यावी.
अशा ह्या आतून जाणवलेल्या तत्वरुपा पृथ्वीची त्याची चित्र तो विकतो की नाही ? तत्वरुपा पृथ्वीचं सर्वात सुंदर प्रतीक वाटावं अशा गीरशी त्याचा भावनिक ॠणानुबंध किती खोलवर रुजला आहे ह्याची उत्तरं मिळतात धृव भट्ट लिखित अकूपार मध्ये.
धृव भट्ट ज्या प्रादेशिक पार्श्वभूमीवर लिहीतात त्या प्रदेशात ते स्वत: जाऊन राहतात. तेथील मूळ व स्थानिक लोकांशी संवाद साधतात. त्यांच्या रुढी, परंपरा, चालीरीती, परंपरागत चालत आलेल्या कथा ह्यांची माहिती करून घेतात आणि मग त्या प्रदेशाच्या भूगोलाचं बारकाव्यांसहीत वर्णन करत, तिथे भेटलेल्या व्यक्तींना / स्वभावविशेषांना आपल्या कहाणीत गुंफत, त्यांच्या परंपरागत कथांशी आपल्या कथेचा धागा बेमालूमपणे असा काही मिसळत जातात की वाचकाला जणू ते त्या प्रदेशाच्या भूगोलातून फिरवता फिरवता त्या त्या व्यक्तींशी समक्ष भेटवतात आणि वर्तमानातील आपल्या जाणीवा व समज ह्याना पुरातन काळापासून निसर्गाने शिकवलेल्या पण आता विस्मरणात जाऊ लागलेल्या जाणीवांचा धक्का देत वाचकाला विचार करायला प्रवृत्त करतात. अद्भुताचा, कल्पनारम्यतेचा वेश धारण करून आलेलं वास्तव एखाद्या वाक्यातून अचानक समोर येत वाचकाला जबरदस्त धक्का देत अंतर्मुख बनवतं. ही त्यांची शैली अगदी खास त्यांचीच.
गीरला मी स्वत: चार वेळा गेलोय आणि प्रत्येक सफारीत जंगलचा राजा सिंहाचं त्याच्या राण्या व युवराज युवराज्ञी अशा पूर्ण कुटुंबकबिल्यासमवेत वा कधी एकटाच मस्तीत असा फिरताना मनसोक्त दर्शन घेतलं आहे. स्वत:च्या राजा असण्याची जाणीव त्याच्या रुबाबदार चालीतून व आजूबाजूच्या उपस्थितांच्या न घेतल्या गेलेल्या दखलीतून जाणवत राहते. आणि तरीही वाटतं की आपल्या प्रत्येक हालचालीवर त्याचं लक्ष आहे. आपण त्याच्या राज्यात आहोत. हा अनुभव अद्भुत आहे. तो तिथे जाऊनच मिळेल.
पण ह्या चारही भेटीत मी प्रवाशाच्या नजरेतून गीर अनुभवलं. गीरच्या भूमीपुत्रांच्या व भूमीकन्यांच्या नजरेतून जसं गीरदर्शन धृव भट्टानी अकूपार मध्ये घडवलं आहे ते अनुभवणं हा एक आगळाच अनुभव असेल.
स्वर्गातील प्रवेशाबद्दल मला आत्ता फार काही उत्सुकता नाही. मात्र गीरच्या भूमीतील कथात भरून राहिलेल्या अकूपारला भेटायची ऊत्सुकता मात्र आता अपार आहे.
---- मनिष मोहिले
No comments:
Post a Comment