Wednesday, September 16, 2020

सागरतीरी

सागरतीरी - समुद्रान्तिके 


समुद्रान्तिके ही खरं तर धृव भट्ट ह्यांची पहिली कादंबरी. त्यानंतर तत्वमसि लिहीली त्यांनी. मात्र, माझा स्वत:चा वाचनाचा क्रम थोडा ऊलटसुलट झाला. मी तत्वमसि पहिले वाचली. मग अकूपार आणि त्यानंतर समुद्रान्तिके अर्थात सागरतीरी. म्हणजे लेखकाच्या मानसिक प्रवासाप्रमाणे माझा वाचनप्रवास झाला नाही. अर्थात त्यामुळे वाचनाच्या आनंदात काहीच बाधा आली नाही, आणि त्यांच्या विचारशृंखलेला मी माझ्यापुरतं समजून घेण्याचा प्रयत्नदेखील केला आहे. पण ते नंतर पाहू. आधी समुद्रान्तिके अर्थात सागरतीरी विषयी.


शहरातील एक तरुण इंजिनीयर, दोन वर्षांच्या बेकारीनंतर मिळालेल्या नोकरीनिमित्त अगदी दूरच्या समुद्रकिनारी वसलेल्या एका गावी येतो. अतिशय उजाड अशा त्या जागी फारच थोडी झाडी व शेतजमीन असते. त्यामुळे तिथे रसायन निर्मितीचा कारखाना उभारण्याचे नक्की झालेले असते आणि जागेची पहाणी, मोजमाप, नकाशे बनवणे ह्या कामावर कथानायकाची नेमणूक होते.


अनिच्छेने व नाईलाजाने त्या ठिकाणी आलेला कथानायक, पुढील तीनेक वर्षं कशी जाणार अशा चिंतेत व निराशाजनक मनस्थितीत तेथील वास्तव्याची सुरूवात करतो आणि नंतर अशा काही व्यक्ती त्याला भेटतात की त्या उजाड जागेत लपलेलं निसर्गाचं आणि तेथील माणसांचं सौंदर्य, वेगळेपण त्याला जाणवतं. जसजसे दिवस जातात तसतशी त्याला त्या जागेबद्दल, त्या व्यक्तींबद्दल एक वेगळीच आपुलकी वाटायला लागते आणि एक नैतिक प्रश्न त्याला सतवायला लागतो की भले उजाड असेल, पण ह्या जागी विषारी रसायनांचा कारखाना उभारणं कितपत योग्य आहे ? 


उजाड का होइना पण स्वत:च्या मालकीचा जमिनीचा तुकडा असावा अशी ईच्छा असलेला हातावर पोट असलेला, मिळेल ते काम करणारा सबूर, बालपणीच्या जंगलाना आठवत, उजाड सागरतीरीच्या बाभळीच्या वनात पक्षी निरीक्षाणाचा छंद जीवंत ठेवणारा नूरभाई, विक्षिप्त वाटणारा व कधीतरी अगम्य बोलणारा बंगाली बाबा, दर्याशी गुजगोष्टी करणारा निधड्या छातीचा कृष्णा तांडेल, एका गावाचा सरपंच आणि उन्हाळ्यात रोजंदारीवर रस्ता दुरूस्ती कामावरचा मजूर अशा सर्वस्वे भिन्न भूमिका स्थितप्रज्ञाप्रमाणे जगणारा खेरा गावचा सरपंच, स्थानिक लोकांच्या कथातून दृष्टीस पडणारे हादाभट की ज्यांच्या हवेलीत कथानायकाचं वास्तव्य असतं आणि त्या हवेलीशी काहीतरी जवळचं नातं असलेली पण हवेलीच्या बाजूला झोपडीत रहाणारी अवल.


दिवसाच्या प्रत्येक प्रहरागणिक रूप बदलणारा समुद्र आणि माथ्यावरचं आकाश, त्या यक्षभूमीच्या नैसर्गिक सौंदर्याचे जितके विभ्रम दाखवतं; तितकीच ही सर्व माणसं त्या निसर्गात राहून जगणाऱ्या मनुष्यस्वभावाचे अनेकविध पैलू कथानायकाला दाखवतात. शहरातला नायक आणि निसर्गपुत्र व कन्या असल्यासारखे जगणारे हे स्त्री पुरूष ह्यांच्या एकमेकांशी होणाऱ्या भेटी, परिचय आणि संवाद ह्यातून समुद्रान्तिकेची कथा उलगडत जाते.


नूरभाईची पक्षीसृष्टीशी असलेली जवळीक आणि त्यातून त्याने सांगितलेली माहिती जी नायकाला ह्या विचारात पाडते की कोतवाल पक्ष्याप्रमाणे आपल्यापेक्षा बलवानाना न घाबरणारी आणि आपल्यापेक्षा दुर्बलाना न घाबरवणारी अशी किती माणसं असतील ?


निसर्गाशी मैत्री म्हणजे निसर्गतत्वाशी इतकं एकरुप होणं की जणू तो आपल्याशी बोलतोय हे सहजपणे दाखवणारा कृष्णा तांडेल. 


आपल्याला कळलं नाही तरी निसर्ग त्याच्या भाषेत आपल्याशी कायमच संवाद साधत असतो हे सांगणारे आणि कथेच्या शेवटी फार वेगळ्या व परिणामकारकपणे ते पटवून देणारे बंगाली बाबा नायकाला सांगतात की तू तुझं काम कर. तू काही निर्माण करू शकत नाहीस वा काही नष्ट करू शकत नाहीस. काल असीम आहे. अनंत आहे. एकीकडे काही नष्ट झालं तर काही नवीन निर्माणही होतंच.


बंगाली बाबाची ही गूढवाणी कथेच्या शेवटी नायकाला समजावून सांगणारी सबूरची भगीरथ गाथा.


धर्म आणि संवेदनशील तत्वनिष्ठा ह्याचं मूर्तीमंत उदाहरण अशी हादाभटांची जीवनकहाणी आणि त्यांच्या व स्वत:ला पटणाऱ्या, ऐकायला सोप्या पण त्यानुसार जगायला अतीशय कठीण अशा तत्वांनुसार जीवन जगणारी, बुद्धीमान, सुशिक्षित अवल.


आणि ह्या सर्व प्रकारात मूकपणे नायकाची साथ करणारा कबीरा.


एखाद्या दुर्गम प्रदेशातील, निसर्गाच्या कुशीत जगणारं व स्पंदणारं मानवी जीवन, शहरी सुखांच्या तुलनेत तेथील कठीण जीवनक्रम, तुटपुंजी संपत्ती आणि तरीही आनंदी, समाधानी, परस्पर प्रेम व सहकार्याचं जीवन जगणारी, साध्या शब्दात अफाट तत्वज्ञान सांगून जाणारी माणसं व त्यातून नायकाचं होणारं विचारमंथन व त्याच्यात घडणारं परिवर्तन हा धृव भटांच्या आत्तापर्यंत वाचलेल्या तीनही पुस्तकांचा आकृतीबंध. शिवाय मुख्य व्यक्तीरेखांचं साधर्म्य हा अजून एक मुद्दा. शहरात वाढलेला आणि  दुर्गम व दूरस्थ जागी येऊन रहाणारा कथानायक - जसा तत्वमसि मधला परदेशात राहून मनुष्यविकास व संसाधन क्षेत्रात काम करणारा नायक मध्यप्रदेशच्या नर्मदेकाठच्या जंगलातील आदिवासींमध्ये काम करायला येतो किंवा अकूपार मधला चित्रकार जो गीरच्या जंगलात पृथ्वीचं तत्वरुप शोधून चित्रबद्ध करायला येतो किंवा समुद्रान्तिकेचा हा रसायन कारखान्यात नोकरी करणारा नायक जो सागरतीरी येतो.  कथानायकाच्या मनात तात्विक व चिंतशील पातळीवर खळबळ माजवणारी तरुण, तत्वनिष्ठ, बुद्धीमान, स्वतंत्र विचार व व्यक्तीमत्वाची नायिका जिच्याबद्दल नायकाला सुप्त आकर्षण आहे पण ते शारीर नसून आंतरिक पातळीवरचं आहे. जशी तत्वमसि मधली सुप्रिया भारत, अकूपार मधली सांसाई आणि समुद्रान्तिके मधली अवल. याशिवाय एक वयोवृद्ध व्यक्तीरेखा जी आयुष्याच्या शाळेत असं काही शिकली आहे की तिच्या साध्या साध्या वाक्यातून जीवनाचं तत्वज्ञान उलगडत जातं आणि ते ही सोप्या शब्दात. तत्वमसि मधले शास्त्रीजी, अकूपार मधल्या आईमा आणि सागरतीरी मधले बंगाली बाबा ही एकाच मानसिक अवस्थेची भिन्नभिन्न शारिरीक रुपे वाटतात.


मात्र कथेची पार्श्वभूमी असलेल्या प्रदेशाचं भौगोलिक रूप भिन्न, नायकाची विचारयात्रा व शोधयात्रा वेगळ्या रस्त्यावरची पण शेवटी कुठेतरी आत्मशोधापाशी येऊन पोचणारी.


समुद्रान्तिके अर्थात सागरतीरी ह्या पहिल्या कादंबरीच्या मध्ये नायकाला प्रश्न पडतो की भौतिक सुखसोयी, संपत्ती ह्यांची इतकी कमतरता असताना समोरच्याला सच्चाई जाणवेल अशा एका विलक्षण आंतरिक समाधान व आनंदाने माणसं कशी जगू शकतात आणि लौकिकार्थाने गरीब लोकच श्रीमंतांपेक्षा दानशूर / समोरच्याचा विचार करून कसे जगू शकतात ? माझ्या मते ह्यातील दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे की  शहरात पैशानी मिळणाऱ्या सुखाची व पैशात मोजल्या जाणाऱ्या संपत्तीची खरी किंमत आहे त्यासाठी गमावलेला वेळ, निसर्गापासून दूर जाणं आणि सहानुभूतीला पारखं होणं. म्हणून शहरी माणूस सहसा आत्मकेंद्रीत असतो. 


जो आनंद व समाधानाचा पहिला प्रश्न आहे तो निसर्गाच्या सान्निध्यात राहिलं की आपोआप  उलगडायला लागतो आणि काही अंशी दुसऱ्या  प्रश्नाच्या उत्तरात त्याचंही उत्तर दडलय.


समुद्रान्तिकेतला हा प्रश्न तत्वमसि ह्या दुसऱ्या कादंबरीमध्ये पुढच्या टप्प्यावर येतो की जीवनातील मोठं तत्वज्ञान सोप्या भाषेत सांगून जाणाऱ्या अशिक्षित वा अल्पशिक्षित लोकांचा संस्कृतीशी नक्की काय संबंध ? 


तर अकूपार मध्ये हा प्रश्न अजून थोडा बदलतो की निसर्गाकडून जर ही मंडळी हे भन्नाट जीवनविषयक तत्वज्ञान शिकतात तर ही माणसं आणि निसर्ग ह्यांच्यातला समतोल व समन्वय नेमका कशामुळे आहे.


हा अन्वयार्थ लावणं माझ्यासाठी आवश्यक होतं कारण मी उलटसुलट क्रमाने त्यांची पुस्तकं वाचली. 


फक्त एकच गोष्ट माझ्या अन्वयार्थाच्या तर्कात बसवायला वेळ लागला व ती म्हणजे अनुवादाचं शीर्षक.  मूळ गुजराती कादंबरीचं शीर्षक समुद्रान्तिके आहे ज्याचा मी लावलेला अर्थ समुद्रात अंत होतो अशी ती. प्रत्येक नदी शेवटी समुद्राला मिळते. त्याचप्रमाणे प्रत्येक जीवनसरिता ही कालाच्या अथांग समुद्रात विलीन होते. पण हा अंत नाही. कारण बंगाली बाबा म्हणतो त्याप्रमाणे ह्या असीम कालात काही नष्ट होतानाच काही निर्माण होतं. सागरालासुद्धा जेव्हा एका किनाऱ्यावर ओहोटी लागते तेव्हा विरुद्ध बाजूला भरती सुरू असते. त्याचप्रमाणे आत्म्याच्या अमरत्वावर विश्वास ठेवणाऱ्या भारतीय संस्कृतीप्रमाणे अंत हा अंत नसून शरीररुपी वस्त्राचा बदल आहे आणि आधुनिक विज्ञानाच्या उर्जा अक्षय्यतेच्या नियमानुसार उर्जेचे रुपांतरण आहे.  हा जीवनाचा व कालचक्राचा नियम आहे. मात्र प्रत्येक नदीचं सागरात वा जीवनाचं असीम कालात विलीन होणं आणि नवीन जीवन सुरू होणं हे निश्चित आहे. समुद्रान्तिके ह्या शीर्षकात हे अध्याहृत आहे. सागरतीरी ह्या मराठी नावात अंत शब्दामुळे निर्माण  होऊ शकणारा संभम टाळला आहे. अर्थात ही संपूर्णपणे माझी समज आहे.


एक गोष्ट मात्र खरी की लेखनाच्या क्रमाप्रमाणे वाचनाचा क्रम नसला तरी तत्वमसि मधील नर्मदातटी घडणाऱ्या व अकूपार मधील गीरच्या जंगलात सिंहांच्या सहवासात घडणाऱ्या कथेप्रमाणेच, समुद्रान्तिकेची ही सागरकिनारी घडणारी कथा आपल्याला तितकीच अंतर्मुख करते आणि तितकीच भावते.


---- मनिष मोहिले 

No comments:

Post a Comment