अतरापी
अतरापी ह्या गुजराती शब्दाचा अर्थ आहे तिऱ्हाईत. धृव भट्ट ह्यांच्या मी वाचलेल्या चौथ्या कादंबरीचं हे शीर्षक ज्याचा मराठीत अनुवाद केलाय सुषमा शाळीग्राम ह्यांनी.
समुद्रान्तिके (सागरतीरी), तत्वमसि आणि अकूपार ह्या तीन कादंबऱ्या एकाच आकृतीबंधात आहेत. पण अतरापीचं तसं नाही. अतरापी ही एक स्वप्नरंजनात्म्क (fantasy) आकृतीबंधातील कादंबरी आहे. स्वप्नरंजनात्मक अशासाठी की ह्या कहाणीत माणसे व श्वान एकमेकांशी बोलून संवाद साधू शकतात. दोन श्वानबंधूंच्या ह्या कहाणीतून देखील , धृव भट्ट काही जबरदस्त विचार मांडून जातात.
एका श्रीमंत घरात पाळीव असलेल्या सद्भाविनी नावाच्या शुनी (श्वानचे हे स्त्रीलिंगी रुप मला अतरापी वाचूनच कळले). च्या पोटी दोन श्वानबालके जन्म घेतात. मोठा कौलेयक आणि धाकटा सारमेय.
कौलेयक पहिल्यापासूनच आदर्श वर्तनाचा. आई, मालक, मालकीण ह्यांचे व मोठा झाल्यावर त्याचे श्वानप्रशिक्षक ह्या सर्वांच्या सूचनांचे तंतोतंत पालन करत ते देतील ते ज्ञान ग्रहण करत जातो. आपण जातिवंत श्वान आहोत हे त्याच्या मनावर जे लहानपणापासूनच बिंबवले गेले असते त्याप्रमाणे वागून आईला आपला अभिमान वाटेल व आपल्या इतर श्वानबंधूंसाठी आपण कार्य करू हे त्याने ठरवलेलेच असते. त्यानुसार प्रशिक्षकांकडून सगळे शिकून घेतल्यावर तो शहरातल्या मठीत एका आध्यात्मिक गुरूंच्या आश्रयास जाऊन साधक बनतो व तेथे देखील अमाप ज्ञान संपादन करतो. आपल्या श्वानबांधवाना ते ज्ञान देण्याचा प्रयत्न करतो की त्यांनादेखील आपल्यासारखे सन्मार्गावर, मोक्षाच्या मार्गावर चालण्यास योग्य बनवावे.
इकडे धाकटा सारमेय मात्र स्वत:तच मग्न असतो. आपण जन्मजात श्वान असल्यामुळे, ज्या गोष्टी नैसर्गिक प्रेरेणेने करू शकतो त्या प्रशिक्षकांकडून का शिकायच्या, कुंपणाच्या बाहेर का जायचे नाही, इतर कुत्र्यांशी का बोलायचे नाही, आपण जातिवंत श्वान आहोत आणि बाहेरचे इतर कुत्रे तसे नाहीत म्हणजे नक्की काय फरक आहे आपल्यात व त्यांच्यात - सारमेयाला पडणाऱ्या ह्या सर्व प्रश्नांची समाधानकारक उत्तरं ना त्याची आई सद्भाविनी देऊ शकत, ना कौलेयक, ना मालक व ना प्रशिक्षक. त्यामुळे या सर्वांच्या सूचना धाब्यावर बसवत सारमेय त्याच्या उनाडक्या चालू ठेवतो. ह्या सर्व मंडळीत अपवाद दोनच व्यक्ती - एक मालकीण की जी बाकी मंडळी कशाबद्दलही सारमेयला कितीही रागावली तरी स्वत: त्याला न रागावता त्याच्या कलाने वागायची. कुठल्याही सूचना न देता. दुसरा माळीदादा. सारमेयाच्या मस्तीमुळे अनेकदा त्याच्या वाफ्यांची व कुंड्यांची नासधूस होत असूनही, त्या वेळेला त्याला रागावणारा पण नंतर त्याला मायेने जवळ घेणारा माळीदादाच त्याला रोपांचा आवाज ऐकायला शिकवण्यात कारणीभूत होतो. इथून सारमेयाचं आयुष्य एक वेगळं वळण घेतं. तो घराबाहेर पडतो आणि पूर्ण जीवन त्याचा प्रवास कौलेयकाच्या जीवनप्रवासाच्या विपरीत होत रहातो.
ह्या जीवनप्रवासात त्याला जीवनाबद्दल, स्वत:बद्दल, इतरांबद्दल, नात्यांबद्दल जी समज येत जाते ती समजच त्याला घडवत जाते. ह्या प्रवासात त्याला भेटतात शकू, सरमा नावाची शुनी आणि सरमा ज्या मेंढपाळाकडे असते असा मामदू. कुठलीही बंधनं वा विधीनिषेध - जोपर्यंत त्यातील तथ्य स्वबुद्धीला पटत नाही - न मानत जगलेलं सारमेयाचं आयुष्य कुठल्याही लौकिक साधनेशिवायच त्याला कौलेयकाच्याही पुढे घेऊन जातं जे स्वत: कौलेयकाच्या गुरूंचंही मत असतं. अशी काय समज येते सारमेयाला ?
स्वत:मधला स्व म्हणजे जन्माला येतानाचं नैसर्गिक स्वत्व जपावं. निसर्ग आणि ईश्वर ह्यांच्या जवळ रहाण्यात मदत होते. लक्षात घ्या - जवळ जाण्यात नाही. जवळ रहाण्यात. कस्रण दूर गेलोच नाही तर जवळ जायची गरज काय ?
प्राणी म्हणूनच प्रेरणा, संवेदना ह्यांच्या बळावर जगू शकतात. माणसाने भाषेचा शोध लावत संवाद वाढवला, साहित्य निर्माण केलं, कला जोपासल्या पण प्रेरणा व संवेदनांची किंमत मोजून. म्हणूनच कुणालाही शिकवताना तो जसा आहे तसा त्याचा विकास होण्यात अडचण येत नाही इतकच पहावं. त्याला अमुक "बनवू" वा "करू" असा अभिनिवेश आला की शिक्षणाच्या हेतूचा तिथेच पराभव नक्की होतो.
नदी कधीच नसते. कारण एक क्षणापूर्वी पाहिलेली नदी दुसऱ्या क्षणी त्याच जागी नसून पुढे सरकलेली असते. जीवनाचंही तसंच आहे. ते एका क्षणापूर्वी होतं तसच दुसऱ्या क्षणी कधीच नसतं. जशी नदी शेवटी समुद्र बनते तसंच जीवनही जिथून आलं होतं त्याच उर्जास्त्रोतात विलीन होतं.
मंदीरातील सुवर्णपात्र चोरल्याचा खोटा संशय मामदूवर येऊन त्याला अटक करून पोलीस नेत असतात तेव्हा सरमाच्या आता तुम्हाला कुठे नेणार ह्या प्रश्नाला मामदूचं "मी कुठे जातोय वा मला नेतायत ? मी तर आहे तिथेच आहे - माझ्यात" ह्या उत्तरात एक फार मोठं सत्य सामावलेलं आहे.
आपण ज्याला सत्य समजतो ते जीवन हे कदाचित स्वप्न असेल आणि कुठेतरी दुसरीकडेच आपलं सत्य असेल जिथल्या झोपेत आपण हे स्वप्न पहात असू.
सारमेयाच्या जीवनप्रवासात त्याची संगिनी बनलेली व पिल्लांसाठी गुरूजींच्या आश्रमात शेती राखण करणारी सरमा, बंधनात न अडकता मुक्त रहाण्याची सारमेयाची प्रवृत्ती जाणून त्याला मुक्त करते. नात्यातून नाही तर नात्याच्या सारमेयाला वाटणाऱ्या बंधनातून. पुढे अंध झालेली सरमा मृत्यूसमयी गुरूजी व कौलेयकाला सांगते "सारमेयाला सांगा की अंधारच शाश्वत आहे कारण प्रकाशाप्रमाणे तो करावा लागत नाही. तो असतो. त्याला दूर करायला प्रकाश करावा लागतो. ह्या अंधारात मला मी दिसतेय. मीच सरमा आहे. मीच सारमेय. मीच कौलेयक आणि मीच गुरूजी आणि आता मीसुद्धा नाहीशी झाले."
आणि शेवटी "ज्ञान एव बंधनम्" . ज्ञान म्हणजे बंधन. जाणीव, उमज आणि समज ह्या ज्ञान, माहिती ह्यापेक्षा मोलाच्या. त्या सुटल्या की माहिती, ज्ञान, समज, उमज आणि जाणीव असा उलटा प्रवास करावा लागतो ज्यात ज्ञान हाच सगळ्यात मोठा अडथळा ठरतो कारण जाणीवेच्या पातळीवर जे सहजस्वीकार्य होतं अशा प्रत्येक गोष्टीसाठी ज्ञान पुरावा, सिद्धांत, तर्क मागत रहातं.
मात्र इतकी जबरदस्त जाणीव निर्माण करणारे जीवनानुभव घेणाऱ्या सारमेयाला देखील एक समज शेवटी मालकिणीकडून मिळते की पट्ट्याच्या बंधनातून मोकळं व्हायला पट्टा निघायची वा काढून टाकायची गरज नसते. थोडक्यात, बंधनातून सुटण्यासाठी, ते बंधन शारीर / भौतिक पातळीवर दूर व्हायला हवं असं नाही.
असे हे दोघे भाऊ आपापल्या नक्की केलेल्या मार्गाने प्रवास चालू ठेवत जीवनाच्या शेवटच्या टप्प्यावर येतात. कौलेयक, युधिष्ठीराबरोबर सदेह स्वर्गप्रवेश केलेल्या श्वानानंतर, आपल्या जीवनभराच्या साधनेच्या जोरावर असा सदेह स्वर्गप्रवेश करणारे पहिलेच श्वान बनू ह्या दृढ निश्चयाने स्वर्गाच्या दारापर्यंत पोचतो. पुढे काय होतं ? कौलेयकाचा सदेह स्वर्गप्रवेश होतो ? त्याला सारमेय तिथे भेटतो ? सारमेयाचं शेवटी काय होतं ? ह्या सर्व प्रश्नांच्या उत्तरासाठी वाचायला हवी अतरापी.
वरवर पहाता स्वप्नरंजनात्मक आकृतीबंधातील ही कादंबरी एक रुपक आहे. मानवी जीवनाचं. मालकांसारखे कुत्र्याने मालकाचं ऐकायलाच हवं असा विचार करणारे म्हणजे प्रस्थापित समाजव्यवस्था जी प्रत्येकासाठी प्रगती, वाढ, विकास ह्याची एकच व्याख्या नक्की करत असते. प्रशिक्षक हे प्रत्येक विद्यार्थी वेगळा असतो आणि नारळाच्या झाडाला आंबे येणार नाहीत ह्याची जाणीव नसलेली व त्यामुळे नारळाला आंब्यात बदलायला बघणारी शिक्षणपद्धती. मालकीण व गुरूजी हे समाजातील ते घटक ज्याना प्रत्येक व्यक्ती एकमेवाद्वितीय आहे ही जाणीव आहे. शकू, सरमा ह्या आपापल्या मैत्री व जीवनसाथी भूमिकेत असूनही व्यक्तीस्वातंत्र्यावर आणि नाती मुक्त ठेवतात, बंधन वा भार देत नाहीत ह्यावर विश्वास असलेल्या व्यक्ती आहेत. स्वत: कौलेयक आणि सारमेय हे अनुक्रमे, समाजाने ठरवून दिलेल्या व्याख्येप्रमाणे जगणारा व त्यात जीवनाची इतिकार्तव्यता शोधणारा व समाजाच्या व्याख्यांनाच प्रतिप्रश्न करून त्यांची वैधता व योग्यता, सत्य पडताळणारा. स्वत:चं सारमेय हे स्वप्रवृत्तीशी निगडीत नाव सार्थ करणारा.
एका वेगळ्या पद्धतीचं भटांचं हे पुस्तक आपल्याला सुरूवातीपासून शेवटपर्यंत सारमेयाच्या जीवनप्रवासात गुंतवून ठेवतं आणि असा विचार आल्याखेरीज रहात नाही की हा लेखक खरच किती out of the box पद्धतीचे विचार त्याच्या पुस्तकातून मांडतो जे वाचकाला विचार करायला लावतात आणि अंतर्मुख बनवतात.
अतरापी बद्दल बोलायचं तर माणूसपण आणि त्या बरोबर मिळवलेलं ज्ञान, लावलेले शोध, विकसित केलेल्या कला, एका विवक्षित पातळीपर्यंत मिळवलेली निर्मात्याची भूमिका आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे एका संस्कृतीची निर्मिती हे सगळं जरी कौतुकास्पद असलं तरी एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी की संपूर्ण मानवजातीला आपण जन्म , धर्म, जीवनपद्धती, वर्ण, भौगोलिक परिस्थिती इत्यादीनुसार त्यांच्यातील समानता व विरोधाभास ह्याप्रमाणे त्यांचे वर्गीकरण केले तरी एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की प्रत्येकाची वाढ व विकास ही त्याच्या / तिच्या स्वभाव व स्वप्रवृत्तीनुसार होऊन वरीलपैकी कोणत्या वर्गात सामील व्हायचं किंवा कोणातच सामील न होता ॲकला चालो रे म्हणत स्वतंत्रपणे मार्ग काटायचा हे स्वातंत्र्य प्रत्येकाला हवं कारण जगात येताना व जगातून जाताना प्रत्येक जण एक तिऱ्हाईतच असतो. एक अतरापी.
---- मनिष मोहिले
No comments:
Post a Comment