अमीबाच्या भुतांची भविष्यवाणी
भविष्यवाणी करणारी भुतं आणि त्यातून अमीबांची ! बुचकळ्यात पडलात ? की हसून उडवून लावताय विषय ? पण इतकी घाई करू नका विषय उडवून लावायची. ह्या भुतांच्या अस्तित्वाला आणि त्यांच्या भविष्यवाणीला भरभक्कम शास्त्रीय आधार आहे.
कित्येक दशके खोल व अतीखोल समुद्रात खनन करत राहून त्यातून जी निरीक्षणं मिळाली त्यांचा अभ्यास करत जवळपास २१ शास्त्रज्ञानी मिळून एक संशोधन निबंध प्रसिद्ध केलाय Science ह्या विज्ञानाला वाहिलेल्या जगप्रसिद्ध नियतकालिकात - ह्या भुतांच्या भविष्यवाणी संबंधी. ज्या कालावधीसाठी ही खनन आकडेवारी जमा केली गेली तो कालावधी आहे ६६० लाख वर्षांचा.
काय आहे नक्की हा संशोधन निबंध ? तर गेल्या ६६० लाख वर्षात पृथ्वीच्या वातावरणात जे बदल झाले व त्यामुळे या कालखंडात तिची ऊबदारनिवास (Warmhouse), ऊष्ण निवास (Hothouse), शीतनिवास (Coolhouse) व अतीशीतनिवास (Icehouse) अशी जी रुपांतरे झाली त्याबद्दल भूतकाळातील माहिती गोळा करून व सध्याच्या वातावरणाचा अभ्यास करून अपेक्षित वातावरण बदलाबद्दल भाष्य / भविष्यवाणी करणारा हा संशोधन निबंध.
"दिनासूरांचा नाश व अमीबांची थडगी"
साधारण ६६० लाख वर्षांपूर्वी एक प्रचंड उल्का पृथ्वीवर आदळून पृथ्वीवरील सजीवसृष्टीचा विनाश झाला. अनेक अणूबॉम्बइतकी उर्जा ह्या प्रलयंकारी घटनेत निर्माण झाली आणि पृथ्वीच्या आकाशात मैलोनमैल धूर, धूळ आणि वितळलेल्या दगडांचा व कर्बग्रहवायूचा जणू अभेद्य पडदा तयार झाला. भूतलावरील यच्चयावत जीवसृष्टी - दिनासूरांपासून ते छोट्यात छोट्या जीव व वनस्पतींपर्यंत - नामशेष झाली. मात्र त्यावेळी सुद्धा अतीखोल समुद्रात Foraminifera (Forams in short) नावाचे अमीबा प्रजनन करतच होते. कॅल्शिय्म व इतर समुद्रखनिजांपासून स्वत:भोवती कवचं बनवत बनवत तेदेखील यथावकाश मृत झाले. मात्र समुद्रातील गाळात त्यांचे जीवाश्म बंदिस्त झाले जे विज्ञानाला आज वातावरण बदलाबद्दल उपयुक्त माहिती पुरवत आहेत.
"अमीबांच्या जीवाश्मातून वातावरण बदलाची माहिती"
कशी मिळते ही माहिती ? तर खननात मिळालेल्या कवचात Oxygen 18 व Oxygen 16 ह्या प्राणवायूच्या समस्थानिकांचे (isotopes) एकमेकांशी असलेले प्रमाण जितके जास्त तितका सागराच्या पाण्याचा थंडावा जास्त. त्याचप्रमाणे, या कवचातील Carbon 13 व Carbon 12 ह्या कर्ब समस्थानिकांचे एकमेकांशी असलेले प्रमाण जितके जास्त तितके वातावरणातील Greenhouse gases चे प्रमाण जास्त. जितकं खोल खनन तितकी अधिक थडगी उकरली जातात अमीबांची आणि त्यातून बाहेर निघणारी भुतावळ असं भाकित वर्तवते की सध्याचा जागतिक तापमानवाढीचा वेग असाच राहिला तर पृथ्वी ऊष्ण निवासात (Hothouse) परिवर्तित होण्याचा समय फारच लवकर आपल्यासमोर दत्त म्हणून ऊभा राहील.
"ऊबदार निवास ते ऊष्ण निवास - पृथ्वीची स्थित्यंतरे"
अवकाशातील उल्काखंडाशी पृथ्वीची टक्कर होऊन जीवसृष्टी नष्ट झाली या घटनेपासून ते आजपर्यंतचा ६६० लाख वर्षांचा हा काळ हा नवजीवन युग (Cenozoic Era) म्हणून ओळखला जातो. दिनासूर पृथ्वीतलावरून नामशेष झाल्यानंतर १०० लाख वर्षांनी Paleocene-Eocene Thermal Maximum या नावाने ओळखल्या जाणाऱ्या घटनेमुळे ज्यात उत्तर ॲटलांटीक मधील ज्वालामुखीचा प्रचंड विस्फोट होऊन टनावारी कर्बवायू वातावरणात सोडला गेला तेव्हा पृथ्वी ऊबदार निवास (Warmhouse) अवस्थेमधून ऊष्ण निवास (Hothouse) अवस्थेत गेली. या वेळेचं पृथ्वीवरील सरासरी तापमान स्तर सध्याच्या सरासरी तापमानापेक्षा जवळपास १६ अंश सेल्शियस जास्त होता. पुढील २०० लाख वर्षं वातावरणातील हा कर्बवायू नाहीसा होत होता. त्यानंतर अंटार्क्टिका मध्ये बर्फाचे थर बनण्यास सुरूवात झाली आणि पृथ्वी शीतनिवास (Cool house) अवस्थेत आली. यावेळेसचं सरासरी तपमान हे सध्याच्या तुलनेत ४ अंश सेल्शियस अधिक होतं.
साधारण तीस लाख वर्षांपूर्वी अंटार्क्टिकामधील बर्फाचे थर वितळायला लागले आणि पृथ्वीची अतीशीत अवस्था सुरू झाली. त्यानंतर पुढील बदल होत होत आजमितीला आपण जिथे आहोत तिथे हे चक्र येऊन पोचलं.
वातावरणातील महत्वाचे व दूरगामी परिणाम करणारे बदल हे मुख्यत्वे पृथ्वीच्या अंशाचं कलंडणं (tilting of axis) व तिच्या सूर्याभोवतीच्या भ्रमणकक्षेतील (Orbit) बदल आणि वातावरणातील Greenhouse gases चं प्रमाण ह्यावर अवलंबून असतात.
मात्र, गेल्या ६६० लाख वर्षांच्या गोळा केलेल्या माहितीवरून हे नक्की झालय की अंशाचं कलंडणं वा भ्रमण कक्षेतील बदलामुळे होणारे वातावरणातील बदल हे ठळक व जाणवणारे असले तरी परिणाम ह्या दृष्टीने ते लहान असतात. मात्र तापमानात लक्षणीय वाढ, खूप मोठी वाढ असे बदल हे मुख्यत्वे Greenhouse gases च्या प्रमाणात होणाऱ्या वाढीमुळेच होतात आणि Green house gases मध्ये सध्या ज्या वेगाने वाढ होतेय ते पहाता पृथ्वी अतीऊष्ण निवास (Hothouse) अवस्थेत जायला लक्षावधी नाही तर फक्त काही शेकडो वर्ष पुरतील.
"अमीबाच्या भुतांचा इशारा"
आपल्या पुढील पिढ्यांना ह्या सुंदर वसुंधरेवर रहाता यावं अशी जर आपली ईच्छा असेल तर अमीबांच्या ह्या भुतावळीच्या भविष्यवाणीकडे लक्ष देणं व ती खरी ठरू नये यासाठी वेगानी ठोस पावलं उचलणं अत्यावश्यक आहे.
नाहीतर अवकाशातून दिसणाऱ्या एका सुरेख शांत निळ्या रंगाच्या कुटुंबवत्सल ग्रहाचं एका निर्जीव अशा आगीच्या गोळ्यात होणाऱ्या स्थित्यंतराचं अमीबाच्या भुतांचं भाकीत खरं ठरण्याचा दिवस दूर नाही.
---- मनिष मोहिले
माहिती स्त्रोत - Science ह्या विज्ञानविषयक नियतकालिकाच्या Live Science विभागात प्रसिद्ध झालेला संशोधन निबंध. संशोधक शास्त्रज्ञांच्या नावाची यादी मूळ लेखात आहे व त्या लेखाचा आंतरजाल दुवा खाली दिला आहे.
No comments:
Post a Comment