Sunday, September 13, 2020

कृष्ण श्रुंगार

आंतरजालावर मध्यंतरी एक सुरेख चित्र बघितलं. एक छोटीशी सुरेख एकतारी आणि त्याला लगटून असल्याप्रमाणे एक सुरेख मोरपीस.


ते चित्र बघताच मीरा आणि कृष्णच डोळ्यासमोर आले. आपल्या संस्कृतीत ही सुरेख प्रतीकं इतकी खोलवर रुजली आहेत की ते प्रतीक पहाताच नेमकी व्यक्ती वा नातं डोळ्यासमोर येतं. म्हणजे पहा ना की एकतारी म्हटलं की मीरा, बासरी म्हटलं की राधा, प्राजक्त म्हटला की रुक्मिणी. 


पण ह्या चित्रातल्या एकतारी आणि मोरपीसाची जवळीक प्रत्यक्ष आयुष्यात मीरा आणि कृष्ण ह्यांच्या वाट्याला फक्त भावनिक स्तरावरच आली. राधा, द्रौपदी ह्या जशा कृष्णाच्या प्रत्यक्ष संपर्कात आल्या तशी मीरा येऊ शकली नाही आणि तरीही ती कृष्णमय जीवनच जगली.  काय असेल तिची भावावस्था आणि भावभूमिका ह्याच्यामागे ? आणि तसं बघितलं तर राधा, द्रौपदी ह्या सख्यांची सुद्धा कृष्णावरील प्रेमामागची नेमकी मनोभूमिका काय असावी ? आणि एक पत्नी म्हणून रुक्मिणीची ?  


पूर्णपुरुषोत्तम श्रीकृष्णाच्या आयुष्यातील ह्या स्त्रिया की ज्यांनी योगेश्वराच्या मानवावतारातील जीवनात अहम् भूमिका निभावल्या.  त्यांनी जर कधी आपलं मनोगत एकमेकीना आणि जगाला सांगितलच तर काय असेल ते ?


त्यात पराकोटीचं, ओसंडून दुथडी भरून वाहणारं प्रेम आहे ह्याबद्दल वादच नाही. कारण श्रीकृष्णाने स्वत: जीवनभर प्रेमयोगच आचरला. पण त्याच्या आयुष्यातील ह्या स्त्रियांच्या नजरेत तो प्रेमयोग कसा होता ? प्रेम हे श्रुंगाररसाचं मूळ. तेव्हा यातील प्रत्येक नात्यात श्रुंगार तर नक्कीच आहे. मात्र प्रत्येक नात्यात त्या श्रुंगाराचं रुप एकच आहे की भिन्न.


बघूया - त्या काही बोलतात का आपल्याशी ? किंवा त्याहीपेक्षा, आपल्याला त्या बोललेलं ऐकू येतं का ?


मीरा - मी मीरा. राजा रतनसिंहांची कन्या. मेवाडची राजकन्या. उदयपूरच्या राणा संगांची सून आणि राणा भोजांची पत्नी. पण ही सगळी ओळख या जगानी मला दिलेली ओळख आहे. नागाचा पुष्पहार होणं आणि विषाचा प्याला चरणामृतात बदलणं ह्या चमत्कारांनंतर मला जगानी कृष्णभक्त मीराबाईची ओळख दिली.


पण मला स्वत:ला माझी ही ओळख फार लहानपणीच झाली होती जेव्हा एक वरात बघताना मी माझ्या आईला विचारलं होतं की माझा पती कोण ? आणि; ह्यावर उत्तर म्हणून तिने मला श्रीकृष्णाची एक सुरेख मूर्ती दिली होती. त्या एका क्षणात अंतरीची खूण पटली. माझं लहान वय कृष्णमय होण्याच्या आड नाही आलं.  म्हणतात ना की संसारात एक क्षण भाळण्याचा नी बाकी सगळे सांभाळण्याचे. मी त्या एका क्षणात श्रीकृष्णावर भाळले आणि त्याने जीवनभर मला सांभाळलं. 


तुम्ही म्हणाल कृष्णभक्त संत मीराबाई आणि संसार ?? कसं शक्य आहे ? तुम्ही नं शब्दांच्या व्याख्या फार तोकड्या बनवता. कोणी सांगितलं की संसार हा फक्त अग्नीनारायणाच्या साक्षीने विवाहबंधनात बद्ध झालेल्या पतीपत्नीं मध्येच असतो ? मनानी एकमेकात बद्ध होणंही तेवढच किंवा अधिकच महत्वाचं नाही का ? आणि माझ्या श्रीकृष्णाचा तर त्याच्यावर निरपेक्ष प्रेम करणाऱ्या प्रत्येकाबरोबर संसार आहे. तरीही तो प्रत्येकाच्या वाट्याला संपूर्णपणे येतो. शेवटी संसार म्हणजे काय ? आप्तेष्टांची काळजी घेणं आणि त्यांच्यावर प्रेम करणं आणि हे जीवनभर करणं म्हणजेच तर संसार. 


राजस्त्री असूनही किंवा राजस्त्री असल्यामुळेच माझ्या गिरीधरावर प्रेममय भक्ती करण्यापासून मला रोखणाऱ्या माझ्या राजकैदेच्या आयुष्याची कहाणी बघता श्रीकृष्णाइतका इष्ट आप्त दुसरा कोण होता माझ्या जीवनात ? 


माझ्या त्याच्या नात्यातही हे प्रेम, हा श्रुंगार आहेच की. अगदी भरभरून आहे. त्याशिवाय का जीवनभर एकमेकांना प्रत्यक्ष न भेटता आम्ही एकरुप होऊन जगलो ?  श्रुंगार  तर आमच्याही नात्यात आहेच. फक्त तो भक्तीचं रूप घेऊन साकार झालाय. म्हटलं नव्हतं की तुम्ही मंडळी शब्दांच्या फार तोकड्या व्याख्या करता म्हणून ? श्रुंगारातही हीच गल्लत केलीत नं ? 


आमच्यातला हा भक्तीमय श्रुंगार तर युगातीत आहे. म्हणून तर द्वापारातील श्रीकृष्णाबरोबर कलीयुगातली ही मीरा एकरुप झाली नं ?  कारण माझा गिरीधर युगातीत आहे, कालातीत आहे. 


"मेरे तो गिरीधर गोपाल; दुसरा न कोय" हा श्रुंगाराचाच तर आविष्कार आहे. कृष्णमूर्तीतच विलीन होत इहलोकीची माझी यात्रा, मी देवलोकी माझ्या गिरीधराबरोबर कायमसाठी चालू ठेवली हे आमच्यातील श्रुंगाराचच तर सार्थक आहे.


फक्त आमच्यातला हा श्रुंगार एकाच रुपात होता - भक्तीच्या. म्हणून तर कृष्णाच्या बासरीतल्या सूरांना मी माझ्या एकतारीवर साथ दिली. एकच सूर - भक्तीचा. बासरीतल्या सात सूरांवर आधीपासूनच कुणाचा तरी अधिकार आहे आणि तो मला पूर्णपणे मान्य आहे कारण प्रेम म्हणजे स्वीकार. माझ्या एकतारीतून माझा श्रीकृष्ण मला एकटीला पूर्णपणे भेटला. हे काय माझ्या एकतारीला बिलगून त्याचं मोरपीस ऊभं आहे ! 


राधा - नमस्कार मंडळी ! मला ओळखलंत ? आत्ताच मीरा बोलून गेली नं की मुरलीधराच्या बासरीतल्या सूरांवर दुसऱ्या कुणाचा आधीपासूनच अधिकार आहे  म्हणून. मीच ती. माझाच अधिकार आहे त्या सात सूरांवर. माझा .... ह्या राधेचा.


सगळ्या जगाला वेड लावणाऱ्या श्रीहरीच्या वेणूवर 

माझा एकटीचा अधिकार कसा? असा प्रश्न पडलाय नं तुम्हाला ?  हा अधिकार मी प्राप्त करून घेतलाय . माझ्या त्याच्यावरच्या प्रेमाने. मी त्याला दिलेलं मोरपीस जे त्याने आयुष्यभर स्वत:च्या माथ्यावर प्रेमाने वागवलं ती माझ्या त्याच्यावरच्या प्रेमाची खूणच तर आहे. म्हणूनच  गोकुळ सोडून माझा कान्हा जेव्हा भगवान श्रीकृष्ण बनायच्या प्रवासाला निघाला तेव्हा त्याची ती बासरी त्याने मला देऊ केली होती. मीसुद्धा त्याची आठवण, आमच्या प्रेमाची आठवण  म्हणून हक्कानी ती ठेवून घेतली. फक्त तिच्यातले सात सूर मी मोकळेपणानी त्याला दिले. जगात प्रेमाचा प्रसार करायला, त्याच्या अद्भुत वर्तणूकीतून जगात प्रेम व सूर पसरवायला. मगाशी मीरा म्हणाली नं की प्रेम म्हणजे स्वीकार. तसंच प्रेम म्हणजे मुक्तता. म्हणूनच एकदा गोकुळ सोडलेला माझा कान्हा परत येणार नाही हे ठाऊक असूनसुद्धा मी त्याला जाऊ दिलं. त्या मुक्तपणामुळेच केव्हाही तो मला व मी त्याला भेटू शकतो. प्रत्यक्ष संपर्काशिवाय.


आणि; तसा तर मला भरपूर संग लाभला माझ्या कान्हाचा. तो गोकुळात असेपर्यंत अगदी रोज भेटायचो आम्ही. त्याच्या संगतीतले ते त्याच्या निळ्या रंगात, कमलनयनात आणि बासरीच्या सप्तसुरात विरघळून जाणारे कित्येक तास कसे पळांसारखे निघून जायचे. आमच्यातलं प्रेम, आमच्यातला श्रुंगार होताच मुळी तसा. प्रेमानी आणि जीवनानी अगदी रसरसून भरलेला. उत्कट. पण जगानी पुढे त्याला जे आंघोळ करताना कपडे चोरण्याचं वगैरे थिल्लर रूप दिलं ना; तसा थिल्लर मुळीच नव्हता आमचा श्रुंगार. अहो शेवटी मी एक विवाहिता होते. माझा पत्नीधर्म होता अनयाप्रती - माझ्या पतीप्रती. आणि त्याला बाधा येइल असं आमच्या श्रुंगारात काहीच नव्हतं. ना माझ्या कडून ना माझ्या कान्हाकडून. आमचं नातं कळून घ्यायला हे कळून घेतलं पाहीजे की विवाह झाला तरीही पत्नीला सख्याची आणि पतीला सखीची गरज असते. अगदी पतीपत्नीना एकमेकांमध्ये असे सखा सखी लाभले तरी दुसरी व्यक्ती सखा वा सखी असू शकते.  समाज, रुढी, परंपरा, रीतिरिवाज ह्यांच्या चौकटीपलीकडे आणि कोणत्याच एका भूमिकेला चिकटून न रहाणारं असं जे नातं असतं नं ते सखा व सखीचं नातं. त्यात प्रेम असतो, श्रुंगार असतो, परस्परांच्या रूपाचं व गुणांचं आकर्षण असतं आणि तरीही सर्व नात्याना कवेत घेणाऱ्या व इतर सर्व नात्यांचा आदर करणाऱ्या व त्यांचं पावित्र्य अबाधित राखणाऱ्या स्वत:च्या मर्यादा त्या नात्याला ठाऊक असतात. हे तुम्हाला जेव्हा कळेल नं; तेव्हा तुम्हाला राधाकृष्णाचं प्रेम कळेल.  किती रंग, किती सूर आहेत नं ह्या सखा सखीच्या नात्यात. त्याच्या त्या बासरीतल्या सात सूरांसारखेच.  सात छिद्रातून बाहेर निघणारे सात सूर. गोकुळात त्या सात सुरांच्या अनेक सुरावटी मी ऐकल्या. मात्र कान्हा गोकुळ सोडून गेल्यानंतर मी त्या आठव्या छिद्राप्रमाणे जगले. त्यातून कुठलाच सूर निघत नाही. पण त्याच्याशिवाय इतर सात छिद्रदेखील सूर नाही निर्माण करू शकत. ते आठवं छिद्र बनत मी अशा प्रत्येक व्यक्तीत जगले की जी मोक्षप्राप्तीसाठी माझ्या कान्हाकडे , भगवान श्रीकृष्णाकडे आकृष्ट होइल आणि त्यामुळे जगभर बासरीतले सात सूर पसरून आनंद देत राहीले. त्यामुळे आता मी कायमच त्याच्या सहवासात आहे. मी म्हणाले होते नं तुम्हाला की प्रेम म्हणजे बंधन नाही; तर प्रेम म्हणजे मुक्तता. आहे असा दुसरा कुठला मुक्त श्रुंगार तुमच्या पहाण्यात ? 


म्हणून त्या बासरीवर माझाच अधिकार आहे. पुढे ज्या हातात त्याने बासरी धरली होती त्याच हातात त्याने सुदर्शन धरलं तरी बासरीतले ते सात सूर तो जीवनभर आळवत राह्यला. हेच आमच्या राधा कृष्णाच्या श्रुंगाराचं सार्थक.


द्रौपदी - राधेनी सुदर्शनाचा उल्लेख केला आणि मलाही बोलावसं वाटलं. तुम्ही म्हणाल की ही कोण ? आणि हिचा काय संबंध सुदर्शनाशी ? मी - याज्ञसेनी द्रौपदी. कृष्णाची सखी. तशी तर राधा त्याची परमसखी हे मलाही ठाऊक आहे. पण जगासमोर सखी हे संबोधन कृष्णानी मलाच उद्देशून वापरलं. म्हणून तर जगासाठी भगवान, द्वारकाधीश, वासुदेव आणि श्रीकृष्ण असलेल्या त्याला मी मात्र कृष्णच म्हणते.


आमच्या श्यामल वर्णात साम्य होतं. पण आमच्या स्वभावप्रकृती मात्र भिन्न. तो नेहमीच अगदी धीरगंभीर, प्रशांत सागरासारखा किंवा अथांग निळ्या आकाशासारखा. क्वचितच कधी त्याचं प्रलयंकारी रूप दाखवणारा. त्याच्या अगदी उलट मी. यज्ञातून उपजलेली. यज्ञाच्या लवलवत्या अग्नीशिखांसारखी सतत तळपणारी आणि कशाशी तरी झगडणारी.


कशाशी झगडा ? स्वयंवरात अर्जुनाने पण जिंकूनही पाच पतींच्या मध्ये पत्नीधर्म वाटावा लागला ह्या विचाराशी, स्वत:ला हरल्यानंतर माझ्यावर हक्क उरला नसता मला पणावर लावून माझ्या अपमानाला कारणीभूत होणारा  माझा ज्येष्ठ पती व ज्येष्ठ बंधू म्हणून त्याच्या आज्ञेत रहाणारे  माझे  इतर पती ह्याना काय अधिकार होता असं वागण्याचा ह्या विचाराशी , भर सभेत माझ्या वस्त्राना हात घालणाऱ्या अधम हातांशी, उघडी करून दाखवण्यात आलेल्या उन्मत्त मांडीशी आणि अशावेळी मौन पत्करणाऱ्या षंढ पौरूषाशी नी अधर्मी वृद्धत्वाशी. 


कृष्णाच्या गरगर फिरणाऱ्या सुदर्शनाप्रमाणेच माझं जीवनही ह्या संघर्षात / संग्रामात गरगर फिरलं. अर्थात कृष्णाच्या प्रेमानेच माझ्या जीवनभराच्या विविध संघर्षात माझं रक्षण केलं. मला त्या संघर्षाना तोंड द्यायची ताकद दिली. समजून घेण्याची प्रगल्भता दिली. आणि ही प्रेमाची साथ त्याने सुरूवातीपासून ते शेवटपर्यंत दिली.


त्याने समजावलं म्हणून मी पाच पतींची पत्नी होण्यास होकार दिला. त्याच्याच प्रेमामुळे बहुपतीत्व असलेली एकमेव स्त्री असूनही; आजही, पाच पतिव्रतांमध्ये माझं नाव घेतलं जातं हे का मला ठाऊक नाही ? . द्यूतसभेतील भयानक प्रसंगात तर त्याने माझं, समग्र स्त्री जातीच्या सन्मानाचं रक्षण केलं. अर्थात निव्वळ लज्जारक्षणामुळे माझ्यातील याज्ञसेनेच्या मनातील आग विझणार नाही हे ही त्याला माहीत होतं. म्हणून तर प्रचंड पराक्रमी असूनही स्वभावप्रकृती भिन्नत्वामुळे माझ्या प्रतिशोधाला परिणामापर्यंत पोचवण्यात असमर्थ असलेल्या माझ्या पाच पतीना एकत्र करून त्यांच्या मनाचं सारथ्य करत त्याने भारतीय युद्ध पेटवलं आणि माझ्या आत जळणारा प्रतिशोधाचा अग्नी शांत केला. भारतीय युद्ध हे त्याच्या त्या अन्यायाचा समूळ उच्छेद करणाऱ्या सुदर्शन चक्राचच अधिक भव्य विश्वरूप दर्शन नव्हतं का ? म्हणून म्हणाले की सुदर्शन म्हटल्यावर मला बोलावसं वाटलं .


आता तुम्ही म्हणाल की ह्या सर्व संघर्ष व संहारात श्रुंगार कुठे आला ? उत्तर ऐकायचय ? ऐका. आपल्या प्रिय व्यक्तीच्या मनाला अपमानाचा प्रतिशोध घेतल्याची शांती मिळावी म्हणून असं प्रचंड महायुद्ध पेटवणं त्यालाच शक्य आहे ज्याच्या मनात आपल्याबद्दल अपार प्रेम आहे.  आणि लक्षात ठेवा की हे प्रेम सखा व सखीचच आहे. उगीच आमच्या नात्याला भाऊ बहीण ह्यांचं नातं बनवू नका. पती पत्नीखेरीज स्त्री पुरूष ह्यांच्यामधील प्रेमाची मर्यादा, पावित्र्य, सखोलता आणि व्याप्ती असलेलं असं सखा आणि सखीचं हे नातं आहे जे सख्याला, सखीच्या सन्मानासाठी सर्वंकष असं युद्ध पेटवायला ही प्रेरित करू शकतं. 


श्रुंगाराचं हे सर्वस्वी अनोखं असं संरक्षण करणारं रूप आहे. सुदर्शनाप्रमाणेच ते संहारक आहे आणि त्याचवेळी संरक्षक सुद्धा. अजूनही नसेल कळलं तर सांगते की भीमाने सूड घेण्याची प्रतिज्ञा घेतल्यावर सुद्धा मी माझ्या कृष्णाला, मधुसूदनाला, अच्युत, मिलींद, माधवाला शपथ घ्यायला लावली की माझ्या प्रतिशोधाचा प्रवास अंतिम लक्ष्याप्रत नेण्यात तो स्वत: मदत करेल आणि त्याने ती तशी घेतलीसुद्धा. माझ्यावरील प्रेमाखातर. कितीही झालं तरी माझ्या पाच पतींबरोबरच्या एकांतवासाची आचारसंहिता बनवण्यात राजमातेबरोबर सहभागी होण्याइतका मला जवळचा होता तो - माझा कृष्ण. माझा सखा. हा विश्वास आणि परस्परांवरचं हे प्रेम हेच आमच्या नात्यातील श्रुंगाराचं सार्थक आहे.  माझ्या देहाला असणाऱ्या जन्मजात सुगंधासारखा आमच्या नात्यातील श्रुंगार देखील अद्भुत आहे, अलौकिक आहे. माझ्या देहसुगंधापुढे एका पारिजातकाच्या फुलांचा स्वर्गीय सुगंधच काय तो टिकू शकेल. पण एखाद्या नात्यातील श्रुंगाराचं असं विलक्षण अद्वितीय व भव्य रूप इतर कोणत्या नात्यात कसं असेल ?


रुक्मिणी - द्रौपदीनं पारिजातकाचा उल्लेख केला आणि मी आले म्हटल्यावरच तुम्ही मला ओळखलच असेल. बरोबर. अगदी बरोबर. मी रुक्मिणी. द्वारकाधीशांची पहिली पत्नी. माझ्यानंतर सात वेगवेगळ्या स्त्रियांबरोबर ते विवाहबद्ध झाले. पण प्रत्येकीच्या वाट्याला मात्र ते पूर्णपणेच आले. हे असं स्वत:ला समोरच्याला पूर्णपणे देऊन टाकणं त्यांना कसं काय जमत असे मला अजूनही कळत नाही. बरं एकाला पूर्ण मिळाले म्हणून दुसऱ्याला कमी मिळाले असंही नाही. मग त्यात आम्ही आठ पत्नी, झालंच तर राधा, द्रौपदी, उद्धवभावजी, अर्जुन, सुदामाभावजी आणि इतर किती किती जण होते. पण स्वामी प्रत्येकाच्या वाट्याला सारखेच संपूर्णपणे आले. मला ह्यामागचं रहस्य कधीच कळलं नाही. पण त्यांची अर्धांगी म्हणून त्यांच्यासारखं वागायचा प्रयत्न मात्र मी कायम करत राह्यले. माझ्या सातही सवतीना; सवती न मानता धाकट्या बहिणी मानत, सासू सासऱ्याना माता पित्याच्या जागी मानत आणि प्रजेला अपत्यवत मानत जीवन जगण्याचा व द्वारकाधीशांच्या प्रथम पत्नीला साजेसं वागण्याचा प्रयत्न केला. अर्थात आईशी असलेला संपर्क सोडता माहेर जवळपास कायमसाठी सुटलेल्या मला सर्वांकडूनच तितकच प्रेमही मिळालं. अगदी माहेराची आठवणही होऊ नये इतकं. 


अर्थातच, स्वत: स्वामींचं माझ्यावरील निरतिशय प्रेम हे त्यामागील प्रमुख कारण. पतीपत्नीच्या ह्या परमपवित्र नात्यात अतिशय महत्वाचे असलेले परस्परांबद्दलची प्रीती, विश्वास व परस्परसन्मान आमच्या नात्यात काठोकाठ भरून होते. प्रत्यक्ष पूर्णपुरूषाशी विवाहबद्ध झालेली असल्यामुळे सुखी वैवाहिक जीवनाचा पाया असलेलं वैवाहिक सुख मला अपरंपार मिळालं. आजही त्या मधुर मीलनांची आठवण झाली तरी स्वामी समोर उभे असावेत इतकी लज्जा वाटते मला.


प्रेमाच्या या वर्षावाबरोबरच त्यांनी माझ्या बुद्धीचा, व्यक्तिमत्वाचा सन्मान केला.  माझ्यावर विश्वास ठेवला. एखाद्या प्रसंगातील स्वामींच्या वर्तणूकीचा अंदाज करावयास, माझ्याकडून असलेल्या त्यांच्या अपेक्षा ओळखून त्याप्रमाणे वागण्यास मी आपसूकच शिकले. आमच्या एकमेकांवरील प्रीतीने मला ते शिकवलं. स्वामींचा सहेतुक कटाक्ष वा स्मितहास्य वा पसंतीने हलकेच हलवलेली मान ह्यातून मला माझ्या योग्य कृतीची वा उक्तीची पोचपावती मिळायची. मी धन्य व्हायचे.


आणि का नाही होणार ? ऊभ्या त्रिभुवनातील स्त्रियानी हेवा करावा असा पती लाभला होता मला. सार्वजनिक जीवनात विलक्षण शूर, बुद्धीमान, प्रजाहितदक्ष, द्रष्टा असलेला आणि वैयक्तिक जीवनात अतिशय प्रेमळ, कुटुंबदक्ष असलेला पती. तो ही असा लोकविलक्षण की आर्य असून वनवासी राजकन्या जांबवंतीला पत्नीपदी बसवणारा, कामरुपातील सोळा सहस्त्र स्त्रियाना स्वत:च्या नावाचं मंगळसूत्र अर्पण करत मुख्य जीवनप्रवाहात त्यांचं पुनर्वसन करणारा आणि तरीही निगर्वी. का नाही अभिमान वाटणार ?


काय म्हणालात ? सात सवती आणि वर राधा, द्रौपदी इतक्या स्त्रिया त्यांच्या जीवनात असून मला कधीच मत्सर कसा वाटला नाही वा संशय कसा आला नाही ? अहो, प्रत्येक व्यक्ती विविध नात्यांच्या लोलकात जगत असते. नात्यांच्या संदर्भातही जीवन एक आयामी कधीच नसतं. 


पुरूषाला माता, भगिनी, पत्नी, कन्या ह्यांच्याबरोबरच तितकीच प्रिय अशी सखी असूच शकते आणि स्त्रीला पिता, बंधू, पती, पुत्र, ह्यांच्याबरोबरच तितकाच प्रिय सखादेखील असूच शकतो. हा परस्पर विश्वासाचा प्रश्न आहे. या  नात्याच्या मर्यादा ते नातं स्वत:च ठरवतं आणि त्या मर्यादेत राहण्यातच त्या नात्याचं सौंदर्य आहे. 



आता जरूरच काय म्हणाल तर एक सांगू ? विवाह झाला म्हणजे आपल्या सगळ्या अपेक्षा त्या एकाच व्यक्तीने पूर्ण कराव्यात अशी चुकीची अपेक्षा आपण  करतो. ती व्यक्ती प्रेमामुळे शक्य तितके प्रयत्न करते त्या अपेक्षा पूर्ण करण्याचा. पण सगळ्याच पूर्ण करणं स्वाभाविकच शक्य होत नाही. अशा वेगवेगळ्या अपेक्षा बंधू, भगिनी, मित्र, मैत्रीण, गुरू, अशा विविध नात्यात पूर्ण होतात. त्यातीलच एक नातं सखा सखीचं. हे नातं पतीपत्नीच्या नात्याला धोका नसून पूर्णत्व देणारं आहे कारण ते पुरूषाला व स्त्रीला दोघानाही पूर्ण करतं.  हे एकदा कळलं की मग संशय, मत्सर ह्याला जागा रहात नाही.


अर्थात मला माझ्या स्वामींमध्येच माझा सखादेखील मिळाला. पण स्वामीना असलेल्या सख्यांमुळे मला कधीच असुरक्षित वाटलं नाही. कारण आम्ही पती पत्नी होतो आणि त्या नात्यात सखा व सखीचं नातं हे स्वाभाविकपणेच अंतर्भूत असतं.  त्यामुळे दुसऱ्या सखा वा सखीमुळे असुरक्षित वाटण्याची गरजच नसते.


कुठून आला हा विश्वास ? स्वामींवरील प्रेमामुळेच ना ? हा श्रुंगारच तर आहे. पतीपत्नींच्या नात्याचं मूळच तर श्रुंगार आहे.  ह्या श्रुंगाराच्या सुगंधापुढे पारिजातकाच्या देखण्या नाजूक फुलांचा स्वर्गीय सुगंध देखील दुय्यम ठरावा. मी म्हणूनच पारिजातकाचा हट्ट धरला नाही स्वामींपुढे. मात्र चौदा रत्नांपैकी एक असलेल्या त्या दिव्य वृक्षाने माझं मनोगत जणू ओळखलं. भामेच्या बागेत रुजून वाढलेल्या पारिजातकाने माझ्या अंगणात स्वत:ची फुलं वर्षावली ही त्या स्वर्गीय वृक्षाची आमच्या अलोट प्रेमाच्या, विश्वासाच्या आणि श्रुंगाराच्या सुगंधाला दिलेली दाद आहे.


श्रीकृष्ण - नमस्कार मंडळी. मी कृष्ण बोलतोय. अरेच्चा ! इतकं का आश्चर्य वाटलं बरं तुम्हाला ? अहो श्रुंगाराबद्दल बोलतोय आणि ऐकतोय नं आपण ! आत्ताच मीरा, राधा, सखी आणि रुक्मिणी बोलून गेल्या नं तुमच्याशी ? आणि श्रुंगाराचं नातं वा नात्यातला श्रुंगार दोन्ही व्यक्तींच्या नजरेतून कळायला हवा. खरय नं ? 


तसं बघितलं तर प्रेमयोगाचा प्रसार विश्वात करण्यासाठीच जन्मलेल्या माझ्या जीवनात, माता, भगिनी ह्यांच्याशिवाय स्त्रीबद्दलचं प्रेम  प्रथम प्रवेशलं ते राधेच्या पावलांनी. तिच्या निरागस, स्वाभाविक प्रेमाला मी तितक्याच उत्कट प्रेमाने स्वाभाविक प्रतिसाद कधी दिला ते मलाही कळलं नाही. किशोरावस्था, पौगंडावस्था आणि यौवनाचा ऊंबरठा ह्या जीवनातील अशा अवस्था आहेत की तिथे कोणतीही भावना खूप तीव्र असते आणि या वळणावर व्यक्ती घडते किंवा बिघडते. त्यातून स्त्री पुरूष प्रेमासारखी नाजूक आणि तितकीच समर्थ भावना. अशा वेळेस राधेकडून मला ह्या नात्यातील प्रेमाची फार सुरेख पृथ्वीमोलाची भेट मिळाली. तिच्यामुळे स्त्रीत्वाचे एकएक विशेष मला जाणवले. ह्या आविष्काराचा सर्वोच्च बिंदू होता तिने भेट दिलेलं मोरपीस. स्त्रीजीवनातील सर्वोच्च विशेषाचं - तिच्यातील जननशीलतेचं प्रतीक अशा योनीसदृश आकाराचं मोरपीस. ही आगळीवेगळी भेट मला देण्यामागची तिची ईच्छा जाणूनच मी अत्त्युच्च सन्मानाने कायम ते माझ्या माथ्यावर वागवलं - हा संदेश जगाला द्यायला की स्त्रीचा व तिच्या स्त्रीत्वाचा सन्मान करा. म्हणूनच मला शक्तीची - तिच्या स्त्री रुपाची ओळख करून देणारी राधा गोकुळ कायमसाठी सुटल्यावर देखील कायम माझ्या जवळच राह्यली. राधेबरोबरचं माझं प्रेम आणि श्रुंगार म्हणूनच आजही आमच्या दोघांच्याच नाही तर समस्त जगाच्या मनात ताजे आहेत. आज तुमच्यासमोर बोलून आम्ही फक्त त्याच्या मूळ स्वरुपाला तुमच्यापुढे स्पष्ट केलं.


स्त्रीच्या सन्मानाला माथ्यावर स्थान देणाऱ्या मला, माझ्या सखीच्या - द्रौपदीच्या स्त्रीत्वाचा अपमान करणाऱ्या उन्मत्त जीवांना धडा शिकवणं आवश्यकच होतं. ती म्हणाली नं मगाशी की भारतीय युद्ध हे अन्यायसंहारक सुदर्शनाचच भव्य रूप होतं, ते बरोबरच आहे. फक्त एक गोष्ट मला स्पष्ट करावीशी वाटते. एकट्या द्रौपदीच्या अपमानाच्या प्रतिशोधाचा प्रश्न असता तर एकटं सुदर्शन चाललं असतं. पण समस्त स्त्रीत्वाचा प्रश्न असल्यामुळे त्या प्रश्नाची भव्यता जगाला कळावी म्हणून मला त्याचं उत्तरही भव्य शोधावं लागलं - भारतीय युद्धाचं. 

हे करणं हे माझ्यातील सख्याचं दायित्व होतं सखी द्रौपदीप्रती. श्यामलवर्णा, सुगंधी देहाची ही बुद्धिमान व अनुपम लावण्यवती तिच्या ज्वलंत आणि यज्ञशिखेसारख्या व्यक्तिमत्वामुळे मला कायमच  भावली. माझ्या अंत:करणात वसली. स्वत:बद्दल आणि स्वत:च्या निवडीबद्दल ती कायमच चोखंदळ व आग्रही होती. तिच्यामधील हा ज्वलंतपणा मला जसा जाणवला तसा तिच्या पाच पतींनादेखील नाही आणि म्हणूनच, सहजच ती माझी सखी बनली. आजही तिचा आग्रही पण तितकाच प्रेमळ स्वभाव मला आतून साद घालत असल्यासारखा वाटतो.


जगाला ज्ञात अशा माझ्या या दोन  सख्यांशिवाय माझी अजून एक सखी होती व आहे - माझी प्रथम भार्या रुक्मिणी. पण मी ऊघडपणे तिला कधीच सखी म्हणून संबोधलं नाही कारण ती माझी अर्धांगी आहे. तिचं स्थान हे तिचं एकटीचं आहे. माझ्याशी एकरुप होणाऱ्या माझ्या दोन्ही सख्या, माझं अर्धांग वगळून तर एकरुप होऊ शकत नव्हत्या. ही जाणीव त्या तिघीनाही होती आणि म्हणूनच कोणाच्याच मनात संशय, मत्सर निर्माण झाला नाही. संपूर्ण आर्यावर्तातील जीवनाची वाढ आणि विकास व्हावा म्हणून मी जीवनभर आर्यावर्तभर फिरू शकलो कारण माझं घर माझ्या गृहलक्ष्मीच्या हाती सुरक्षित आहे, सुखरूप आहे ही खात्री मला होती म्हणूनच. मला ती पत्नी म्हणून आणि पत्नीमधली सखी म्हणून कायमच सर्वात प्रिय होती व आहे. माझी अर्धांगिनी - माझी रुक्मिणी.


आणि शेवटी राह्यली मीरा. निव्वळ भक्तीरूप प्रेमाच्या बळावर द्वापारातल्या मला तिने कलीयुगात यायला भाग पाडलं आणि ती माझ्यात विलीन झाली ह्यापेक्षा अधिक तिच्या प्रेमाबद्दल काय बोलावं ? भक्तापुढे भगवंत देखील लीन होतो आणि आनंदाने लीन होतो इतकंच म्हणेन मी.


काय म्हणालात ? श्रुंगाराबद्दल मी बोललोच नाही ? अहो, दुतर्फा सारखच उत्कट असल्याखेरीज का प्रेम एव्हढं फुलतं की युगानुयुगं त्या प्रेमाच्या कहाण्या एका पिढीकडून दुसऱ्या पिढीला वारसा म्हणून सांगितल्या जाव्या ?


श्रुंगाराचा दुसरा अर्थ स्त्रीचं सजणं, सजावट करणं. सुंदर बनवणं. माझ्यावरच्या उत्कट आणि निरपेक्ष प्रेमाने ह्या चौघीनी आमची नाती इतकी सुरेख श्रुंगारली आहेत की मी परत परत त्यांच्या आणि आमच्या नात्यांच्या अजूनही रोज नव्याने प्रेमात पडतो. श्रुंगार श्रुंगार तो अजून वेगळा काय असतो ? 

---- मनिष मोहिले 

1 comment:

  1. अप्रतिम लेख. यापेक्षा जास्त प्रतिक्रिया द्यायला शब्द सापडत नाहीत.

    ReplyDelete