Sunday, September 20, 2020

श्रीमद् भगवद्गीता - अध्याय १ - अर्जुन विषादयोग

भारतात हिंदूंच्या समाजजीवनात, समाजमानसात, राजकीय जीवनात, धार्मिक जीवनात आणि  अध्यात्म जीवनात श्रीमद् भगवद्गीता या ग्रंथाचे स्थान आणि महत्व अनन्यसाधारण आहे.


भारतीय महायुद्धाच्या समयी रणभूमी कुरूक्षेत्रावर भगवान श्रीकृष्णाने आपल्या दिव्य वाणीतून जे उपदेशाचं अमृत शिष्योत्तम अर्जुनाला पाजून त्याला  युद्धकर्माला प्रवृत्त केलं ते बोधामृत अर्थात श्रीमद् भगवद्गीता हा हिंदूंचा धर्मग्रंथ. समस्त हिंदूंच्या जीवनाला एक धार्मिक विचारबैठक व आचारसंहिता देणारा हा ग्रंथ. स्वत: शंकराचार्यांनी भगवद्गीतेचा अर्थ जनास कळावा ह्या हेतूने सांगितलेला आहे. तेव्हा धार्मिक जीवनातील गीतेचं महत्व ह्यातून स्पष्ट होतं.


भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात स्वत:चं सर्वस्व वाहिलेले अनेक क्रांतिकारक छातीशी गीता धरून निधड्या छातीने मृत्यूला सामोरे गेले. आत्म्याच्या अविनाशीत्वाचं ज्ञान जणू त्यांनी पचवलं होतं. अशा प्रकारे राजकीय जीवनात गीतेचं स्वत:चं एक वेगळं स्थान होतं.


आजपर्यंत अनेक समाज सुधारकानी, राजकीय नेत्यांनी आपल्या जीवनाच्या सार्वजनिक व वैयक्तिक लक्ष्याकडच्या वाटचालीत योग्य मार्ग मिळावा, त्यास योग्य वैचारिक, तात्विक व आध्यात्मिक बैठक लाभावी  म्हणून गीतेचा आधार घेतला. साहजिकच, त्यांच्या समाजकारणाचा समाजजीवनावर देखील परिणाम झाला ज्यात प्रत्यक्षाप्रत्येक्षपणे गीतेचे योगदान आहे. लोकमान्यांसारख्या अलौकिक बुद्धी व चारित्र्याच्या राष्ट्रपुरूषाने तर गीतारहस्य लिहीत गीतेचे निवृत्तीपर नव्हे तर कर्तृत्वपर रूप जगासमोर मांडले.


संत ज्ञानेश्वरांसारख्या विभूतीने भावार्थदीपिका लिहीत गीतेचे अध्यात्मजगतातील योगदान सुलभ करून दाखवले.

याशिवाय, तत्वज्ञान, साहित्य, कला या व इतर समाजाभिमुख क्षेत्रातील असंख्य विद्वान लोकांनी आपापल्या परीने गीतेचा अर्थ लावण्याचा व त्यावर भाष्य करण्याचा प्रयत्न केला आहे व तो अजूनही अव्याहतपणे चालू आहे.

ह्या पार्श्वभूमीवर माझ्यासारख्या एका य:कश्चिताने श्रीमद् भगवद्गीतेवर काही लिहायचा विचार करणे धार्ष्ट्याचे व औद्धत्याचे आहे. मात्र सुहृदांच्या प्रेमळ सूचनेपुढे मान तुकवून मी प्रयत्न करीत आहे.


अँ श्रीकृष्णाय नम: ! 


अध्याय पहिला - अर्जुन विषादयोग

समरभूमीवर आपले शत्रू म्हणून समोर आपले आप्त, गुरूजन, इष्टमित्र ह्या सर्वाना पाहून अर्जुनाच्या मनात विचार येतो की आपलेच आप्त, गुरू, मित्र अशा या सर्वांबरोबर युद्ध करून, त्यांचा वध करून मिळणाऱ्या राज्यलक्ष्मीचा काय उपयोग ? त्यापेक्षा भिक्षा मागून जगावं लागलं तरी ते अधिक श्रेयस्कर व योग्य आहे. अर्जुनाच्या मनाला ग्रासलेल्या या नैराश्य, क्लैब्य, यामुळेच श्रीकृष्णाला गीता सांगावी लागली हे आपणा सर्वानाच माहिती आहे.

मात्र ह्या अध्यायात आप्तेष्टांविरुद्ध युद्ध करणे कसे योग्य नाही हे सांगतानाच श्लोक ३८ ते ४४ मध्ये अर्जुन युद्धाच्या अधिक भयावह व सार्वात्रिक दुष्परिणामांबद्दल भाष्य करतो. हे सांगताना तो म्हणतो की युद्धात कुळाचा नाश होइल व त्यामुळे कुळधर्म नष्ट होऊन पाप वाढेल. पाप वाढले म्हणजे कुळातील स्त्रिया वर्णसंकर करतील व अंती कुळनाश होइल.

ह्यातील वर्णसंकरासारख्या आज कालबाह्य वाटणाऱ्या बाबी बाजूला ठेवल्या तरी आजच्या काळातही युद्धादरम्यान व युद्धानंतर जबरदस्तीचे अवैध संबंध, अनौरस संतती, एकूणच वीण उसवलेलं व जागोजागी जीर्ण झालेलं समाजवस्त्र  असे सामाजिक प्रश्न मोठ्या प्रमाणावर दिसून येतात. 

महर्षी व्यासांसारख्या प्रतिभेच्या व्यक्तीकडून जेव्हा लिखाण होतं तेव्हा ते व्यक्तीनिष्ठ वा कालसापेक्ष नसून त्रिकालाबाधित सत्याच्या कसोटीवर उतरेल असंच असणार हे स्वाभाविक आहे.

भारतीय युद्धाच्या सुरूवातीला अर्जुनाच्या मनात निर्माण झालेला संभ्रम, निराशा , क्लैब्य ही  प्रातिनिधिक स्वरुपात प्रत्येक युगात लागू होणारी अवस्था आहे. अर्जुनासारखा "नर" असो वा आपल्यासारखे सर्वसामान्य मानव. प्रत्येकासाठी रोजचे जीवन हाच एक असा संघर्ष आहे जिथे योग्य अयोग्य, सुष्ट दुष्ट, नैतिक अनैतिक, धार्मिक, धर्मबाह्य ( धर्माच्या धारयते इति धर्म: ह्या व्यापक व्याख्येच्या संदर्भात ), संस्कृत असंस्कृत असे असंख्य भेद ओळखून योग्य उक्ती व कृतीचे निर्णय घ्यावे लागतात. अर्जुनासारख्या नरोत्तमासाठी पराकोटीचा संभ्रम व नैराश्य निर्माण होण्यास  महायुद्ध व्हावं लागतं तर आपल्यासारख्यांसाठी दैनंदिन जीवनातील अनेक प्रसंग हेच समरप्रसंग ठरतात आणि नक्की कोणती उक्ती वा कृती योग्य ह्या संभ्रमात आपण पडतो. निराश होतो. ज्या विषादयोगाने अर्जुनास ग्रासले त्याचा अनुभव आपणास देखील अनेकदा होतो. तुकोबांनी म्हटलेलं रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग हे षड्रिपूंबरोबरच सभ्रम, नैराश्य, किंकर्तव्यता याबाबतीत देखील लागू होते. असा विषादयोग निर्माण करणाऱ्या प्रत्येक परिस्थितीत, भगवद्गीता आपल्याला योग्य मार्ग दाखवू शकते. गीतेच्या ह्यापुढील अध्यायात प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णांच्या दैवी वाणीतून निर्माण झालेल्या बोधामृतातून योग्य बोध आपल्याला मिळू शकतो.


----- मनिष मोहिले 

No comments:

Post a Comment