Wednesday, September 30, 2020

महाभारत - काही उत्तरे

विनीत, महाभारत - एक प्रश्नोपनिषद ह्या शीर्षकाखालील तुझ्या अभ्यासपूर्ण लेखात तू उभ्या केलेल्या प्रश्नांची उत्तरे  मी माझ्या अल्पमती व समजुतीनुसार देण्याचा प्रयत्न केला आहे.


महाभारत हा एक असा महाग्रंथ आहे जो कालातीत अशा स्वरुपात महर्षी व्यासांनी लिहीला आहे म्हणूनच स्थल, काल, देशमान ह्यात फरक होऊनही तात्विक दृष्ट्या महाभारतातील गुणावगुण आजही कार्यरत आहेत व विविध समांतर प्रसंगांसाठी कारणीभूत होण्यास विद्यमान असू शकतात. ह्या गुणावगुणांचं हे असं कालानुरूप थोडंफार बदलणारं पण मूलत: मानवी स्वभावविशेष असणारं रुप हे युगानुयुगं वेगवेगळ्या स्वरूपात महाभारत घडवू शकते ह्यातच महाभारताची कालातीतता आहे.


१ महाभारत हा दाजी पणशीकरांनी म्हटल्याप्रमाणे मूलत: एक सूडप्रवास आहे जो एक प्रकारे भीष्मांच्या प्रतिज्ञेपेक्षादेखील, त्या प्रतिज्ञेनंतरही कुरूकुलाचे संवर्धन व संरक्षण ह्याचं जे उत्तरदायित्व भीष्मानी स्वत:वर घेतलं होतं; त्यामधून जे अंबा, अंबिका, अंबालिका प्रकरण उद्भवलं त्यातील अंबेच्या सूडापासून सुरू झाला व अश्वत्थाम्याच्या सूडपूर्तीने मुख्य कथाप्रवाहापुरता अंतिम चरणावर पोचला. 

ह्या सूडास पुढे पार्श्वभूमी लाभली ती राज्यसत्ता हव्यासाची. द्रौपदीची द्यूतसभेतील विटंबना ही कामवासनेशी निगडीत नसून, जेत्याच्या राजसभेतील जित दासीचे स्थान अशा सत्तेचा दर्प असलेल्या भावनेशी निगडीत होती. (अर्थात त्यामुळे त्यातील भयानकता, संताप, विवशता व पुढील संहाराची नांदी ह्यांची व्याप्ती व खोली अजिबात कमी होत नाही). पण महाभारताच्या मूळाशी सूड व सत्तालोलुपता ह्याच दोन गोष्टी प्रामुख्याने दिसतात की ज्यानी पुढे अनेक प्रासंगिक विकृती / विसंगतीना जन्म देतात.


२ "अंध पित्याचे पुत्रही अंधच असतात" हे द्रौपदीच्या तोंडचे उद्गार स्वयंवराच्या वेळचे नसून राजसूय यज्ञाच्या वेळचे मयसभेतील आहेत. माझ्या मते मानवी मनोव्यापारास व्यास इथे सुरेखपणेउलगडून दाखवतात. दुर्योधनाने विकृत बुद्धीने खांडववन देऊन देखील आपल्या पतीनी (कृष्णाच्या मदतीने का होइना), तिथे हस्तिनापूरपेक्षाही सुंदर नगरी वसवून दाखवली ह्यातील अभिमानाचे द्रौपदीसारख्या रुपगर्वितेच्या मुखातून असे प्रगटन शक्य आहे आणि मुळातच अविचारी व पांडवद्वेषावरच ज्याचं संपूर्ण जीवन आधारलेलं आहे अशा दुर्योधनाच्या मनाचा पांडवद्वेषाचा पीळ ह्या अपमानकारक उद्गारान्मुळे अधिक घट्ट होणं हे स्वाभाविक आहे. भारतीय युद्ध हा भारतीय महाकाव्याचा शेवटचा सर्वाधिक नाट्यमय प्रसंग (Climax) आहे,ज्याचा build up, ज्याची त्या मुक्कामाकडची वाटचाल अशा छोट्या परंतू सशक्त प्रसंगातून व्यासांनी नक्की केली आहे.


३ लहानपणापासूनच भीमाने खेळाच्या नावाखाली चार चार पाच पाच दुर्योधनबंधूना पाण्याखाली गुदमरवून टाकण्याचे खेळ (???) अनेकदा खेळले होते. त्यामुळे भीमाच्या अचाट बलाबद्दल दुर्योधनासहीत प्रत्येक कौरवाच्या मनात भिती होतीच. शिवाय अर्जुनाचे धनुर्बल. अशा परिस्थितीत दुर्योधनाला नि:शंक विजयाची खात्री फक्त एकच योद्धा देऊ शकत होता - कवचकुंडलधारी कर्ण जो जन्मजात कवचकुंडलांमुळे अवध्य होता. शिवाय त्याचा पराक्रम निखळ व तावून सुलाखून निघालेला होता. कवचकुंडलांशिवायचा कर्ण देखील अशरण होता. खात्रीचा विजय देणारा कर्ण एकमेव हे माहीत असल्यानेच दुर्योधन त्याच्या हिमतीवरच आव्हान देऊ शकत होता. अन्यथा नाही.


४ महाभारतातील कहाण्यांचा आधार घेतला तर पाशुपतास्त्र प्राप्त करताना अर्जुनाने किरात रुपातील प्रत्यक्ष शंकराचा पराभव केला होता. उणीव अर्जुनाच्या पराक्रमात नव्हती तर ती त्याच्या वारंवार ढासळणाऱ्या मनाच्या उभारीत होती. त्यामुळेच, युद्ध सुरू व्हायच्या आधीच श्रीकृष्णाने मी हे महायुद्ध का पेटवतो आहे ही स्वत:ची भूमिका स्पष्ट करूनसुद्धा ऐनवेळी रणांगणात अर्जुनाने कच खाल्ली आणि कृष्णाला गीता सांगावी लागली. युद्ध संपून काही काळ उलटल्यावर अर्जुनास पुन्हा उपदेशाची गरज भासली. तोपर्यंत गीतेतील सटीक उपदेश पूर्ण लक्षात राहिला नव्हता. म्हणून अनुगीतेचा जन्म झाला. (हा भाग मलाही नवा आहे).


५ धर्माचे एकंदर व्यक्तिमत्त्व हे सामोपचाराने समस्या सोडवण्याकडे असायचे. द्यूत खेळताना एक राजा म्हणून द्यूताचे आमंत्रण स्विकारल्यावर शेवटपर्यंत निर्णायक द्यूत खेळणे हा धर्म त्याने निभावला. इतर भावांच्या पराक्रमावर धर्माच्या विवेकाचा अंकुश रहावा म्हणून कुंतीने फार पूर्वीपासून ही अट बाकी पांडवांना घातली होती की युधिष्ठिराच्या उजव्या पायाचा अंगठा वर उचललेला असेल तरच आक्रमण करायचं; अन्यथा नाही. ही अट द्यूतप्रसंगी पांडवांवर उलटली. शिवाय कितीही गुणसंपन्न व्यक्ती असली तरी एका अवगुणामुळे सर्वनाश ओढवू शकतो हे व्यासाना वाचकांच्या मनावर बिंबवायचे असावे आणि भारतीय युद्धाच्या कडे जी मार्गक्रमणा आहे ती नाट्यमय पद्धतीने चालू ठेवायची असावी.

बाकी संपूर्ण महाभारतात द्रौपदीवर सर्वाधिक प्रेम करणारा नवरा भीमच दाखवलेला आहे. त्यामुळेच अर्जुनाने पणात जिंकूनही द्रौपदी भावनिक दृष्ट्या भीमाच्या अधिक जवळ होती.


६ व ७ राज्यात वाटा मिळावा ह्या पांडवांच्या मागणीस उत्तर म्हणून प्रथम खांडववनाचे राज्य त्याना मिळाले. कृष्णाच्या संमतीने ते स्विकारल्यावर युद्धाची आवश्यकता नाहीशी झाली.

खांडववनाला जाळून इंद्रप्रस्थ निर्माण केल्यावर जेव्हा राजसूय यज्ञ पांडवांनी केला तेव्हा पण कौरवांबरोबर युद्धाची गरज नव्हती. आपल्या पूर्वजांचे मूळ सिंहासन असलेल्या हस्तिनापूरास पांडवांनी आक्रमणापासून दूर ठेवले. नंतर मग द्यूत, वनवास, अज्ञातवास हे सर्व प्रसंग आले आणि अज्ञातवासाच्या शेवटी पांडवांनी युद्ध करण्याचे नक्की केले.


८ द्रौपदीचा विवाह झाला आणि तत्कालीन परिस्थितीप्रमाणे तिचे भाग्य सासरशी जोडले गेले. अगदी आजही किती ठिकाणी ही मानसिकता दिसून येते. ह्यापलीकडे ह्यास दुसरे उत्तर नाही. कारण जर पांचालांनी द्रौपदीच्या अपमानाच्या या घटनात हस्तक्षेप करायचा ठरवलाच असता तर कौरवांच्याही आधी पांडवाना का बडवायला नको होते ह्याचे सन्युक्तिक उत्तर नाही.


९ कुंतीचा संघर्ष राज्यप्राप्तीचा नसून तिच्या संततीच्या औरस असण्याचा व त्यामुळे त्यांचा राज्यावरील हक्क मान्य व्हावा याबाबतचा होता. दैववशात्, हा हक्क मान्य केला जाण्याचा, युद्ध करून राज्य मिळवणे हा एकच मार्ग शिल्लक राहिला. मात्र, इतक्या दीर्घ शोकमग्न आयुष्यानंतर राज्य उपभोगण्याची लालसा शिल्लक रहाणे अशक्य होते. तरीही ती धृतराष्ट्र व गांधारी ह्यांच्यासोबत वनवासात गेली कारण शंभर अपत्य्यांच्या मृत्यूनंतर निपुत्रिक झालेल्या त्या दांपत्याचे दु:ख आपल्या दु:खापेक्षा तिला अधिक अवजड प्रतीत झाले.


१० शंभर कौरव असणे आणि त्यातील ९८ भावांना दुर्योधन व दु:शासन ह्या सत्ता हाती केंद्रीत करून घेतलेल्या दोन भावांशिवाय वेगळे अस्तित्व नसणे हा महाभारतातील महाकाव्याचा प्रतीकात्मक भाग वाटतो. दोन्ही माद्रेयाना देखील नाट्याच्या मध्यभागी स्थान नसण्यात हेच तर्कशास्त्र असावे की हा प्रामुख्याने कुंतीचा लढा होता, माद्रीचा नाही. तिने स्वत:पुरते आयुष्य संपवून तो संघर्ष मुळातच निपटला होता. कर्णाला जन्मत: सोडावे लागले ह्या चुकीचे अंशत: परिमार्जन कुंतीने नकुल सहदेवाना पोटच्या पोराप्रमाणे वागवून केले ह्या दुर्गाबाईंच्या वाक्यातून ह्यावर प्रकाश पडतो असं मला वाटतं.


११ महायुद्ध पेटवून काय मिळवले ह्या प्रश्नाचे उत्तर युगंधर मध्ये श्रीकृष्ण जी स्वत:ची युद्ध पेटवण्यामागची मनोभूमिका समजावतो त्यात स्पष्ट होते. द्रौपदीची विटंबना वा पांडवांवरील अन्याय ह्याचा प्रतिशोध, कृष्ण एकटा सुदर्शनाने कौरवाना वधून घेऊ शकला असता. पण मग त्या व्यक्तिनिष्ठ वा एक राजपदनिष्ठ समस्या बनून राहिल्या असत्या. एक युगांत आणि युगांतर होतानाची सत्, असत्, धर्म , अधर्म, योग्य, अयोग्य, ह्यांची संपूर्ण समाजव्यवस्थेच्या स्तरावरील निवड हे जे त्याचं स्वरूप होतं ते कधीच जगासमोर आलं नसतं आणि कलीयुगात आज दिसते त्याहीपेक्षा भयानक परिस्थिती प्रथमपासूनच सामोरे आली असती. म्हणून प्रश्नाची भव्यता जगाला कळण्यासाठी महायुद्धासारखं महाभव्य उत्तर कृष्णाला शोधावं लागलं. 


१२ ब्रह्मास्त्राला थांबवणे मर्त्य मानवाच्या शक्तीपलीकडचे होते त्यामुळे कृष्णाला स्वत:ला ते थांबवावे लागले. भीम प्रथमपासूनच परिणामांचा विचार न करता कृती करण्याबाबत प्रसिद्ध होता.


१४ रामायण हे निश्चितपणे स्त्रीबद्दलच्या मोहातून घडले तर महाभारत हे राज्यसत्तेच्या लालसेतून. हा फरक प्रथमपासूनच स्पष्ट आहे. द्रौपदीच्या विटंबनेमुळे नियतीचे आव्हान अधिक उग्र झाले इतकेच म्हणता येइल.


१५  हा हेतू अंशतः सफल झाला कारण कर्णाने कुंतीला स्वत: किंवा अर्जुन व इतर चार पांडव ह्यांच्या जिवीत रहाण्याविषयी अभय दिले.  अर्जुनाशी लढताना कर्णाकडून त्वेष, स्पर्धा ह्यात तडजोड होणे अशक्य होते कारण पुत्रवध, आयुष्यभराचा अवमान ह्यासोबत "नि:संशय सर्वश्रेष्ठ धनुर्धर कोण?" ह्या प्रश्नाचे उत्तरही दोघांच्या निर्णायक धनुर्युद्धावर अवलंबून होते. मात्र अर्जुन वगळता इतर कोणताही पांडव कर्णासमोर टिकणे अशक्य होते. त्यामुळे दोन भेटीतून चार पांडवांचे जीवनदान कर्णाने देणे हे ह्या भेटीन्मागचे अंशत: साफल्य म्हणायला हवे.


१६ दोन्ही प्रश्नांची उत्तरे होय अशी आहेत.


१७ कुंतीचा कर्णाची भेट घेण्याचा मुख्य हेतू त्यास युद्धापासून परावृत्त करणे हा होता ज्यायोगे युद्ध टळून तिला सहाही पुत्र लाभले असते. अर्जुनासहीत वा शिवाय पाच पुत्रांचे कर्णाने दिलेले जीवनदान हा मैत्रीला शेवटपर्यंत जागणाऱ्या कर्णाने सुचवलेला तोडगा आहे ज्यात मातेचा अपमानही टाळला गेला आहे.


१८ कृष्णावर १७ वेळा आक्रमण केले जरासंधाने. ह्यात जरासंध मथुरेवर चालून आल्यावर दरवेळी विजयी झाला असे नाही. खरं तर नाहीच झाला आणि म्हणून त्याला सतरा आक्रमणे करावी लागली.  जरासंधाचा हेतू मथुरा जिंकायचा नसून कृष्णाला पकडायचा / मारायचा होता - सासरा कंसाच्या वधाचा सूड म्हणून. आपल्याkमुळे मथुरेच्या प्रजेला दरवेळेस त्रास होतो तो टाळण्यासाठी शेवटी कृष्ण पश्चिम सागरकिनारी गेला व द्वारका वसवली. कालयवन हा आर्यावर्ताबाहेरील शासक. जशी जरासंधानी त्याची मदत घेतली कृष्णाने कालयवनाचा वध केला.


१९ हे उत्तर शोधावे लागेल.


२० महाभारत हे महाकाव्य आहे ज्यात साहित्यिक मूल्य ह्या दृष्टीने नाट्यनिर्मिती, संघर्ष, नीतीतत्वांबद्दलचे मूलभूत प्रश्न व त्यांचा उहापोह अध्याहृत आहे व त्यामुळे कथानकात असे धागे असणे संभवते. 


२१ सर्पकुळाचा प्रत्यक्ष नाश अर्जुनाने केला हे एक. दुसरं, यादवांचा निर्वंश गांधारीच्या शापाने होण्यात दाखविण्यात व्यासांनी एक वेगळा काव्यात्मक न्याय दाखवला असं म्हणता येइल.


२२ हा नियम असण्याइतका नियमित असावा असा प्रकार नव्हता. तत्कालीन राजकीय व सामाजिक परिस्थितीत स्वीकार्य अशा पद्धतीने पण जिंकून व हरण करून विवाह घडवणे व राज्याराज्यातील परस्पर राजकीय संबंधांच्या समस्या सोडवणे वा निर्माण करणे हे ह्या पद्धतीचे परिणाम होते.


२३ पुन्हा एकदा एक महाकाव्य, त्यातील नाट्यमूल्य, सुरूवातीपासून प्रतिशोधाने सुरू होणारी महाकथा सूडाच्या अंतिम चरणावर पोचणे ह्यासाठी आवश्यक व योग्य पार्श्वभूमी निर्मिती.


२४ स्वत:चा मृत्यू झाला तरी पांडवाना यशश्री मिळू देणार नाही व त्यानाही मृत्यूमुखी पडायला भाग पाडीन हा दुर्योधनाच्या द्वेषाचा पीळ होता. म्हणूनच चिरंजीव अश्वत्थाम्यावर त्याने पांडवांच्या निर्वंशाचे शेवटचे नीच कर्म सोपवले. दुर्योधनाच्या ह्या पीळामुळेच एक प्रकारे गोष्टी युद्धाच्या थरापर्यंत आल्या होत्या.


२५ कृष्णाच्या अवतारी असण्याच्या एका सोप्या गृहीतकाने ह्या प्रश्नाचे उत्तर मिळू शकते.


माझ्या अल्पमतीप्रमाणे जी उत्तरे मला सुचली व योग्य वाटली ती देण्याचा मी प्रयत्न केला.  हा वादविवाद नाही चर्चा असू शकते.


बाकी रामायण काय वा महाभारत काय - ह्या महाकाव्यांची कालातीतता नि:संशय आहेच आहे व देशकालमानाप्रमाणे बदलत्या परिस्थितीत ही महाकाव्ये नवीन प्रश्न जन्माला घालू शकतात व नवीन उत्तरे देखील शोधू शकतात.


---- मनिष मोहिले








No comments:

Post a Comment