Monday, September 21, 2020

श्रीमद् भगवद्गीता - अध्याय २ - सांख्ययोग

अध्याय दुसरा - सांख्ययोग 


या अध्यायापासून भगवान श्रीकृष्णाचा अर्जुनाला जागृत करणारा उपदेश सुरू होतो. श्रीकृष्ण सुरूवातीलाच अर्जुनाला सांगतात की ज्यांना वधावे लागेल अशा भयाने तू युद्धापासून परावृत्त झाला आहेस असे तुझे सर्व आप्तेष्ट , गुरूजन, मी स्वत: आणि तू देखील आधी नव्हतो व नंतर नसू असे मुळीच नाही कारण तुला समोर दिसताहेत ती निव्वळ शरीरे आहेत. मात्र त्यांच्या आत वसत असणारा आत्मा अविनाशी आहे. त्याला जन्म नाही, मृत्यू नाही. तो एकदा उत्पन्न झाला म्हणजे परत उत्पन्न होत नाही. तो चिरंतन व सनातन आहे. ज्याप्रमाणे एका शरीरात वसणारा आत्मा शरीराच्या बाल्य, तारुण्य व वार्धक्य ह्या अवस्था पाहतो तोच आत्मा दुसरे शरीरही प्राप्त करून घेतो. असा हा आत्मा अव्यक्त, अचिंत्य, अवध्य, अशोच्य व विकाररहित आहे. त्यामुळेच स्वत:च्या मनातून मी कोणाचा  मृत्यू घडवण्यास कारणीभूत ठरू शकतो हा भ्रम काढून टाक. प्रत्येक जीव जन्मापूर्वी आणि मृत्यूनंतर अप्रकटच असतो. फक्त मध्ये थोडाकाळच तो प्रकट असतो.  थोडक्यात आत्मा हा नित्य आहे तर देह आणि त्याच्या इंद्रियांसमवेत जडलेले सुख दु:ख इत्यादी अनित्य आहेत.


आत्म्याच्या अमरत्वाचे, अविनाशीत्वाचे वर्णन केल्यानंतर पुढे जे श्लोक येतात ते आत्ममा व देह ह्यांच्यातील परस्पर संबंध उलगडून दाखवणारे गीतेतील काही सर्वाधिक प्रसिद्ध श्लोकांपैकी आहेत जसे - वासांसि जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोऽपराणि । तथा शरीराणि विहाय जीर्णान्यन्यानि संयाति नवानि देही ॥२-२२॥ आणि नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः । न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः ॥ २-२३ ॥

थोडक्यात काय तर आत्मा अविनाशी आहे. त्याला शस्त्र मारू शकत नाही. अग्नी जाळू शकत नाही, पाणी भिजवू शकत नाही वा वारा वाळवू शकत नाही. असा हा अविनाशी आत्मा, ज्याप्रमाणे मनुष्य वस्त्रे जुनी झाली की ती त्यागून नवी वस्त्रे धारण करतो त्याप्रमाणे आत्मा, शरीर जीर्ण झाले की जीर्ण शरीर त्यागून नवे शरीर धारण करतो. म्हणूनच जर तू असे मानीत असलास की आत्मादेखील मरण पावू शकतो तर मग हेही तू लक्षात ठेव की जो मृत्यू पावला तो जन्माला येणे निश्चित आहे आणि जो जन्माला आला त्याचा मृत्यू निश्चित आहे. तेव्हा आत्मा असो वा देह, तू कोणालाच (कोणाच्याही अस्तित्वाला) मारू शकत नाहीस.  हा शोक करणे म्हणूनच व्यर्थ आहे.

यानंतर श्रीकृष्ण धर्मानुसार युद्ध करणे हाच क्षत्रियाचा खरा धर्म असे सांगून अर्जुनाला म्हणतात की जर तू युद्धात मृत्यू पावलास तर तुला स्वर्गप्राप्ती होइल आणि जर तू जिंकलास तर पृथ्वीचे राज्य उपभोगशील. जर तू युद्ध टाळलेस तर तुझी अपकिर्ती होइल.  तुला भ्याड म्हटले जाईल आणि कोणाही मानी व्यक्तीस अपकिर्ती मरणापेक्षाही वाईट वाटते.


तेव्हा ज्या आत्म्याला मरण नाही, अथवा जो मृत्यू पावला तरी पुनश्च जन्माला येणार आहे असा अविनाशी व अवध्य आणि म्हणून अशोच्य आहे अशा आत्म्याला तू मारूच शकत नाहीस तेव्हा तुझ्या क्षात्रधर्माप्रमाणे युद्ध कर. 

सुख, दु:ख, जय, पराजय, फायदा तोटा ह्याबद्दल समभाव बाळगून युद्ध केलेस तर तुला पाप लागणार नाही.  अजून एक प्रसिद्ध श्लोक - सुखदुःखे समे कृत्वा लाभालाभौ जयाजयौ । ततो युद्धाय युज्यस्य नैवं पापमवाप्स्यसि ॥ २-३८ ॥


येथपर्यंत भगवान सांख्ययोग वा ज्ञानयोगाच्या सहाय्याने अर्जुनाला आत्मा व देह ह्यातील संबंध आणि आत्म्याच्या अविनाशी, अवध्य, अशोच्य, अव्यक्त, अचिंत्य, अविकार्य, नित्य व सनातन असण्याचे वर्णन करतात व नंतर कर्मयोगाकडे वळतात. कारण नैराश्य व कर्तव्यमूढता यामुळे अर्जुनाचे मन संन्यासमार्गाचा विचार करत होते. त्यामुळे त्या मार्गाप्रमाणे त्याच्या शंका संभ्रम ह्यांचे निरसन करणे योग्य ज्यासाठी सांख्ययोग सुयोग्य आहे. त्यानंतर परत जवळपास संपूर्ण गीतेत कर्मयोगाची उकल करण्याचे कारण असे की सांख्यमार्गानुसार आयुष्यात केव्हा ना केव्हा कर्माचा त्याग करून ज्ञानप्राप्ती आवश्यक असे प्रतिपादन आहे. मग अर्जुनाने त्याचक्षणी युद्ध सोडून संन्यास का घेऊ नये ह्याचे उत्तर सांख्ययोगातून देता येत नाही आणि भगवान,  गीता तर अर्जुनास युद्धास प्रवृत्त करण्यासाठी सांगत होते. म्हणून समभावाने आचरलेला कर्मयोग ज्यात जीवनातील भूमिकेस अभिप्रेत कर्तव्ये समभावाने करत राहूनही ज्ञानप्राप्ती होते त्या कर्मयोगाच्या आधारे भगवंत अर्जुनाच्या शंकांचे निरसन करतात.

(गीतारहस्यातील हा तर्क अगदी पटण्याजोगा. वास्तविक ह्याच प्रश्नामुळे - अमुक श्लोका पर्यंत सांख्य योग व त्यानंतर कर्मयोग असे का - माझा मी गीतेचा मराठी अनुवाद वाचताना अडलो. अडलो म्हणून गीतारहस्य वाचायला घेतला. त्यात हे तार्किक स्पष्टीकरण मिळाले. एक अनुपमेय ग्रंथ.)


आत्म्याचे अविनाशीत्व त्याच्या मनावर ठसवल्यावर भगवान कर्मयोगाकडे वळतात. सांख्ययोग व कर्मयोग ह्या दोहोंच्या मार्गे होणारी ब्रह्मज्ञानप्राप्ती जरी एकच असली तरी कर्मकाण्डे न करता वा स्वधर्मास (धर्म ह्याचा व्यापक अर्थ - स्वत:च्या स्वभाव, संस्कार आणि जीवनातील भूमिका ह्यास अपेक्षित सुयोग्य कृती व उक्ती म्हानजे धर्म) अपेक्षित कर्म समभावाने करत राहून जे ब्रह्मज्ञान प्राप्त होते तो मार्ग अधिक श्रेयस्कर आहे.

आधुनिक काळात ह्यातील धर्माप्रमाणे युद्ध कर हे कसे लागू होते ? तर जीवनात जी भूमिका आपण निभावतो आहोत त्यातील अभिप्रेत कर्तव्ये समभाव व निष्ठेने अशा रितीने पार पाडणे की संस्कार, मूल्य, जीवनाची वाढ व विकास ह्यास बाधा येणार नाही. ह्यात समभाव बाळगणे हा जो भाग आहे तो समभाव आपल्या ठायी निर्माण करण्यात आत्म्याच्या अविनाशीत्वाचे व नित्यत्वाचे ज्ञान आपणास आवश्यक ती वैचारिक व आध्यात्मिक बैठक पुरवू शकते.

कशी ? माझ्यापुरते ह्याचे उत्तर आहे ते असं की आपण दिवसभरात ज्या प्रार्थना करतो की मला आरोग्य, आयु, सुविचार व सद्बुद्धी दे ते आपण देहासाठी न मागता आपल्या आत्म्यासाठी मागावे. दररोज अशा पद्धतीने प्रार्थना केल्यास मनाच्या शक्तीमुळे आपण हळूहळू आत्म्याच्या उन्नयनाकडे वाटचाल सुरू करू शकतो. आधीच्या जन्मातील आपल्या कृतींप्रमाणे ठरलेले प्राक्तन, ह्या जन्मातील कृती व उक्ती ह्यांचे संचित व योग्य गुरूकडून मार्गदर्शन ह्याच्या योगे आपण वर उल्लेखलेला समत्वभाव आपल्या ठायी बाणवू शकतो. ह्या पूर्वतयारीखेरीज कर्मयोग आचरणात आणणे कठीण आहे.


येथून पुढे भगवंत सांगतात की सुख दु:ख, सिद्धी असिद्धी समान मानत मनुष्याने कर्तव्ये केली पाहीजेत. असा समभाव राखण्यासाठी कार्य-अकार्य, सत्-असत्, योग्य-अयोग्य, श्रेयस्कर-अश्रेयस्कर हे समजणारी जी बुद्धी ती बुद्धी स्थिर असायला हवी. स्थिर कशाठायी ? तर कर्मामुळे प्राप्त होणारे सुख दु:ख, त्रिगुणात्मक संसारासाठी आवश्यक कर्मे ही अनित्य असून सर्वव्यापी असा परमात्मा हा त्यापलीकडे आहे ह्या विचाराठायी स्थिर असणे.  त्रिगुणात्मक संसारातील कर्मे म्हणूनच योगक्षेमापुरती पार पाडावीत. बुद्धी त्या कर्मात वा त्याच्या परिणामात अडकता कामा नये. जिथे मनुष्याची बुद्धी अशी अडकते तिथे ती अस्थिर होते व तिला फाटे फुटतात. त्यामुळे जी कर्मे होतात ती सकाम कर्मे होतात जी सद्गती वा मोक्षाच्या मार्गातील अडथळा आहेत. पण स्थिर, निश्चयी बुद्धीने कामनारहीत कर्म करत राहिल्यास संसारात राहून संन्यास न घेताही मोक्षप्राप्ती मिळू शकते. एका नाही तरी अनेक जन्मातील समभावाने केलेल्या कर्मातून.

ह्यानंतर गीतेतील सर्वात प्रसिद्ध श्लोक येतो. अ. २ श्लो. ४७ 

कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन । मा कर्मफलहेतुर्भूर्मा ते सङ्गोऽस्त्वकर्मणि ॥ २-४७ ॥

ह्या श्लोकाचा सर्वमान्य अर्थ जो आपण सामान्यजन जाणतो तो असा  की तू (मानव) फक्त कर्म कर. फळाची आशा धरू नकोस. इतके म्हणून आपण म्हणतो की हाच निष्काम कर्मयोग. 

पण सामान्य व्यक्तीसाठी अशाप्रकारे फळाचा विचार न करता कर्म करणे कसे शक्य आहे ? कारण योगमार्गावर चालायचे एकमेव साधन देह. तो सुस्थितीत रहावा ह्यासाठी योगक्षेम कर्मही आवश्यक.  सांख्याप्रमाणे ज्ञानप्राप्तीसाठी कर्म त्यागावे लागते. मेळ कसा बसणार ? इथेच समत्वबुद्धी महत्वाची ठरते आणि ती कशी बाणवावी ह्याचे उत्तर ह्या श्लोकात आहे.


गीतारहस्यात लोकमान्यांनी स्पष्ट केल्याप्रमाणे या श्लोकात कर्मयोगाची चतू:सूत्री भगवंतांनी सांगितली आहे. ते म्हणतात हे अर्जुना,


१ तुला कर्म करण्याचाच अधिकार आहे.

२ कर्माच्या फलाचा अधिकार नाही.

३ त्यामुळे कर्म करताना तू फलाशा ठेऊ नकोस.

४ मात्र, त्याचबरोबर कर्म करण्याचे सोडू नकोस.


लोकमान्य म्हणतात की फलावर अधिकार नसणे व फलाशा न ठेवता कर्म करणे ह्याचा अर्थ असा नाही की फलाचा त्याग करावा. कर्म कर ह्याचा अर्थ असा नाही की फलाशा धर आणि फलाशा धरू नकोस ह्याचा अर्थ असा नाही की कर्म करणे सोड. फलाशा धरायची नाही पण कर्म करणे सोडायचे नाही. कारण फल मिळणे हे कर्माबरोबरच इतर अनेक गोष्टींवर अवलंबून असते ज्या गोष्टींवर कर्त्याचा ताबा नसतो. हा अर्थ सामान्यजनास कर्माचे फल प्रथम यत्नात मिळाले नाही तरी कर्म करण्यापासून परावृत्त न होता कर्म करत रहाण्यास उद्युक्त करतो. अर्थात त्यात फलाची आशा ठेवा असे सांगितलेले नाही. पान त्याचबरोबर मिळालेल्या फलाचा त्याग करा असेही सांगितलेले नाही. त्यामुळे फलाशा न ठेवता समत्वबुद्धीने कर्म करत राहिल्यास जे फल मिळते त्याचे उत्तरदायित्व कर्त्यावर येत नाही. थोडक्यात तो पाप वा पुण्याचा धनी होत नाही. कारण फलाशा नसलेल्या समत्वबुद्धीने ते कर्म केले आहे. म्हणूनच ही समत्वबुद्धी (येथे बुद्धी म्हणजे ज्ञान नव्हे) कर्मापेक्षा श्रेष्ठ.

असा समत्वबुद्धीने कर्मफलाशा त्यागून कर्म करणारा ज्ञानी पुरूष जन्मबंधनातून मुक्त होऊन, मोहापासून मुक्त होऊन  मोक्षपदास पोचतो. परमात्म्यात विलीन होतो.

यानंतर अर्जुन अशा स्थिरबुद्धी पुरूषाची लक्षणे विचारतो तेव्हा भगवान ५५ ते ७२ या श्लोकात स्थितप्रज्ञ व्यक्तीची लक्षणे सांगतात.


भगवंत म्हणतात की हे पार्था, जो मनुष्य कामनांपासून मुक्त होत आत्मा म्हणूनच आत्म्यातच संतुष्ट असतो तोच स्थितप्रज्ञ होय. जो सुखदुःखादी भावना आणि क्रोध, मोह, मत्सर, काम इत्यादीपासून मुक्त आहे तो स्थिरबुद्धी आहे. ही स्थिरबुद्धी प्राप्त होण्यासाठी मानवाने सर्व इंद्रियांवर ताबा ठेवत माझ्या आधारे ध्यानास बसावे. हा ताबा फक्त इंद्रियसहाय्याने विषयोपभोग थांबवण्यापुरता नसावा तर विषयांची आसक्ती / कामना ह्यापासून मुक्त व्हायला हवे. नाहीतर विषयसेवन नाही पण आसक्ती आहे असे झाल्यास ज्या विषयाची आसक्ती त्याची कामना. कामना पूर्ण न होण्यामुळे क्रोध. क्रोधामुळे अविचार व मूढता. मूढतेमुळे स्मरणशक्ती भ्रष्टता. त्यामुळे ज्ञाननाश व ज्ञाननाशामुळे अध:पात होतो. त्याला शांती मिळत नाही आणि त्यामुळे तो सुखी होऊ शकत नाही.

मात्र ज्याचा इंद्रिये व आसक्ती ह्या दोहोवर ताबा आहे असा साधक राग लोभ ह्याशिवाय इंद्रियानी विषयाचा उपभोग घेत असताही अंत:करणी प्रसन्न राहतो. त्यामुळे त्याची बुद्धी इतर सर्व गोष्टीतून निवृत्त होऊन परमात्म्यात स्थिर होते. थोडक्यात इंद्रिये व मनावर ताबा असलेला स्थिरबुद्धी असतो.

यानंतर अजून एक प्रसिद्ध श्लोक येतो.

या निशा सर्वभूतानां तस्यां जागर्ति संयमी । यस्यां जाग्रति भूतानि सा निशा पश्यतो मुनेः ॥ २-६९ ॥ 

सर्व प्राण्यांच्या दृष्टीने जी रात्रीसारखी असते, अशा नित्य ज्ञानस्वरूप परमानंदाच्या प्राप्तीत स्थितप्रज्ञ योगी जागतो आणि ज्या नाशिवंत सांसारिक सुखाच्या प्राप्तीत सर्व प्राणी जागतात, ती परमात्मतत्त्व जाणणाऱ्या मुनीसाठी रात्रीसारखी असते. ॥ २-६९ ॥

ज्याप्रमाणे सर्व नद्या समुद्रात सामील होतात पण समुद्र विचलीत होत नाही तद्वतच स्थितप्रज्ञ व ज्ञानी पुरूषात सर्व भोग सामावतात पण विकार उत्पन्न करू शकत नाहीत. जो पुरूष अशा प्रकारे कामना, मोह , अहंकार त्यागतो त्यालाच शांती मिळते आणि ब्रह्मज्ञान प्राप्त होऊन अखेरीस तो ब्रह्मात एकरुप होतो.


मी वर केलेल्या ह्या संपूर्ण विवेचनास लोकमान्यांनी गीतारहस्यात फार परिणामकारकपणे दोन शब्दात मांडून मग त्याचे विवेचन केले आहे. ते म्हणतात इंद्रियदमनाऐवजी जो इंद्रियसंयमन करू शकत तो खरा स्थितप्रज्ञ. कारण इंद्रियदमनात विषयोपभोग थांबतो पण विषयवासना निर्माण होणे थांबत नाही. तेच इंद्रियसंयमनामुळे विषयवासनेवर ताबा येतो आणि त्यामुळे कर्मानुरूप इंद्रियसंयोगाने विषयोपभोग घेऊनही मनुष्य त्यापासून नि:संग राहून बुद्धी स्थिर ठेऊ शकतो. असा मनुष्य मनाने विरक्त होऊनही कर्माने सक्रीय राहून लोककल्याणार्थ कार्य करू शकतो. सांख्ययोग्याप्रमाणे त्यास कर्म त्यागण्याची गरज पडत नाही. शेवटी जे ब्रह्मज्ञान सांख्ययोगमार्गावरील स्थितप्रज्ञास मिळते तेच कर्मयोगमार्गावरील स्थितप्रज्ञास मिळते. पण तो कर्म करत राहून ते प्राप्त करतो. त्यामुळे बुद्धी (समत्वबुद्धी) कर्मापेक्षा श्रेष्ठ असली तरी कर्मयोगी स्थितप्रज्ञ हा सांख्ययोगी स्थितप्रज्ञापेक्षा श्रेष्ठ वा श्रेयस्कर आहे. लोकमान्यांच्या मते स्थितप्रज्ञाची ही लक्षणे महत्वाची आहेत कारण तोच कर्मयोगाचा पाया आहे.


आजच्या परिस्थितीत जेव्हा संपूर्ण जग भोगवादी बनत आहे व त्याचे समर्थन करण्याचाही प्रयत्न होतो आहे अशा काळात स्थितप्रज्ञाची ही लक्षणे लक्षात ठेवणे अत्यावश्यक आहे. देहधर्म व जीवनात निभवायच्या भूमिकेत अभिप्रेत कर्म करण्यासाठी इंद्रियानी भोग घ्यावा पण मनात त्या भोगाची आसक्ती नसावी हे आवश्यक तत्व मनावर बिंबले पाहीजे. ह्या आसक्तीमुळेच विविध भोग भोगायची ईच्छा धरून आपण निसर्गतत्वाविरुद्ध जाऊन अनेक गोष्टी करत आहोत. त्यामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडतो आहे. आपल्या बिघडणाऱ्या मानसिक समतोलामुळे आपण त्याची पर्वा करत नाही. त्यामुळे मनाची शांती व स्थिरबुद्धी तर दूर, आपण भौतिक पातळीवर देखील खूप अशांतता व उलथापालथ घडवतो आहोत. बुद्धी स्थिर करण्यासाठी आसक्तीवर ताबा मिळवण्याच्या प्रयत्नाने आसक्ती कमी होऊन कमीतकमी निसर्गतत्वाविरुद्ध जाण्याची प्रवृत्ती कमी झाली तरी बुद्धी स्थिर होण्याच्या दिशेने आधुनिक मानव एक पाऊल पुढे जाइल. कारण निसर्गाशी जवळीक ही अखेर त्या ब्रह्मतत्वाकडे जाण्याचाच एक मार्ग आहे. 

No comments:

Post a Comment