Saturday, December 21, 2024

ऐ मोहब्बत तेरे अंजाम पे रोना आया

अख्तरी फैजाबादी, उर्फ बेगम अख्तर साहिबा मुंबईत कार्यक्रम करून गाडीने लखनौला निघाल्या होत्या. गाडी मुंबईला फलाटावर उभी होती. गाडी सुटण्याची वेळ जवळ येत होती आणि त्याचवेळी एक तरुण शायर, प्रत्येक डब्यात बेगम साहिबाना शोधत फिरत होता. शोधत शोधत तो बेगम साहिबांच्या डब्या जवळ आला. खिडकीत बसलेल्या त्या गझल सम्राज्ञी ला पाहून त्याच्या जीवात जीव आला आणि गडबडीने त्याने हातातला कागद बेगम साहिबांच्या हातात घाईघाईने दिला आणि गाडी सुटली. बेगम साहिबानी शांतपणे तो घडी करून आपल्या पर्स मध्ये ठेऊन दिला. दुसऱ्या दिवशी गाडी भोपाळच्या आसपास असताना त्यानी आपली पट्टशिष्या असलेल्या शांती देवींकडून तो कागद पर्स मधून काढून घेतला आणि त्या कागदावरील शायरी वाचत, सहजच त्या भैरवीच्या सूरात ते शब्द गुणगुणू लागल्या. थोड्याच वेळात त्यांनी आपली पेटी मागवून ती शायरी सूरबद्ध करायला सुरूवात केली आणि आपल्या सर्व साजिंद्यांसहीत, गाडी लखनौला पोहोचेपर्यंत संपूर्ण गझल तयार केली आणि लखनौच्या आपल्या कार्यक्रमात त्यांनी ती गाऊन पेश सुद्धा केली. त्या अप्रतिम आणि अर्थपूर्ण शब्दांनी सजलेल्या त्या गझलेच्या शेवटच्या कडव्यात शायर चे नाव आले - शकील. हिंदी चित्रपट सृष्टीतील एक प्रथितयश गीतकार म्हणून पुढे प्रसिद्धी पावलेला तोच हा शकील बदायुनी. आणि; 

सुप्रसिद्ध गीतकार शकील बदायुनीने लिहिलेल्या आणि बेगम अख्तर साहीबांच्या अद्भुत आवाजात अजरामर झालेल्या त्या गझलेचे शब्द - ए मोहब्बत तेरे अंजाम पे रोना आया !

स्वतः शांती देवींच्या शब्दातला हा अद्भुत किस्सा मी ऐकला तुषार भाटियांच्या तोंडून - ग्रामोफोन क्लबच्या संगीत रजनीमध्ये. कोणाही संगीत प्रेमीच्या अंगावर रोमांच उभे करणारा हा किस्सा. आणि त्यानंतर आपल्या अद्भुत आवाजात डॉ. सुप्रिया जोशींनी ही गझल सादर केली आणि पाठोपाठ सादर केली त्याच चालीवर मदनमोहन ने संगीतबद्ध केलेली आणि लताने गायलेली अगर मुझसे मोहब्बत है, मुझे अपने ये हम दे दो ही अप्रतिम गझल. 

दोन अद्भुत काव्यरचना. साधर्म्य असलेले संगीत आणि अलौकिक गायकी. अंगावर रोमांच आणि डोळ्यात अश्रू उभे न राहिले तरच नवल. मात्र कार्यक्रम पुढे सरकत होता तरी माझं मन मात्र त्या ओळींभोवतीच फिरत होतं.

प्रेमाबद्दल अगदी आतून आलेल्या त्या रचना. एकीत असफल प्रेमाबद्दल उरी दाटून आलेले दु:ख तर दुसऱ्यात आपल्या प्रिय व्यक्तीच्या वाटणीची दु:खे स्वतः साठी मागून त्या व्यक्तीला सुखी बघण्याची मनीषा. मात्र दोन्ही ठिकाणी प्रेमाची भावना तितकीच उत्कट. ह्या भावनेत उथळ शारीरिक आकर्षण इत्यादी ला स्थान नाही. तर त्या नात्यातील जिव्हाळा, आपुलकी आणि सर्वात महत्त्वाची म्हणजे स्वैच्छिक बांधिलकी, भावनिक गुंतवणूक ह्या सर्वात महत्त्वाच्या गोष्टी. त्या काव्यात, त्या संगीतात आणि त्या गायकीत ते जाणवतंआणि म्हणूनच आज कित्येक वर्षे लोटून देखील श्रोते अजून ह्या गीतांच्या प्रेमात आहेत.

एकंदरीतच, जुन्या गाण्यांमध्ये, प्रेमाची भावना हळूवारपणे श्रोते वा प्रेक्षकांपर्यंत पोचवणे हा हेतू असायचा. प्रेमाच्या त्या भावनेशी निगडीत शारीर किंवा दृश्य स्पर्श ह्यापेक्षा, भावनिक पातळीवर एकमेकांबद्दल असलेली आपुलकी, जवळीक, जिव्हाळा आणि आकर्षण ह्यावर भर असायचा. प्रेमात अभिप्रेत असलेली शारीरिक जवळीक वा एकरूपता ही त्या भावनिक जवळीकीचा, एकरुपतेचा परिपाक असून ते अध्याहृत ह्या स्वरूपात राहायचं. प्रत्यक्ष समोर यायचं नाही. त्यामुळे गीताचे शब्द, संगीत, स्वरमेळ, वाद्यवृंद, गायकी ह्यांचा बाज देखील हळूवार, सुखदायी असायचा. चित्रपटात देखील गीताचं चित्रीकरण त्याप्रमाणे शालीन, सूचक असं असायचं. तो दृक् श्राव्य अनुभव कधीही भडक, अतीस्पष्ट नसायचा. काही बाबी प्रेक्षकांच्या कल्पनाशक्ती वर सोडलेल्या असायच्या. त्यामुळे ती भावनिक एकरूपता अधिक महत्त्वाची ठरायची. जशी हाताळणी प्रेमातील साफल्याची तशीच वैफल्याची देखील - हळूवार. निराशा, दु:ख हे त्या व्यक्तीरेखेपुरते मर्यादीत. उगीच आक्रस्ताळे पणा नाही. भडक प्रदर्शन नाही.

परंतु आजकालच्या एकंदरीत परिस्थितीचा, वृत्ती आणि दृष्टीकोनाचा विचार करता वाटतं की प्रेमासारख्या मूलभूत भावनेत सुद्धा आता उपयुक्ततावाद, वैयक्तिक स्वातंत्र्याच्या अतिरेकी कल्पना आणि त्यास दिले जाणारे अवास्तव महत्त्व ह्या गोष्टींची भेसळ झाली आहे आणि होत आहे. तरल भावनिक एकरूपता, जवळीक, आपुलकी, जिव्हाळा आणि आकर्षण ह्याचा परिपाक म्हणून होणारी शारीर एकरूपता हा प्रवास उलटी कडून म्हणजे शारीरिक एकरुपते कडून सुरू होतोय आणि बरेचदा तिथेच संपतोय. चित्रपट हा समाज मनाचा आरसा आहे असं मानलं जातं. स्वाभाविकरित्या, चित्रपटातील गीताचं संगीत आणि चित्रीकरण ह्यात देखील ह्या बदलत्या समाज मनाचं प्रतिबिंब उमटतं आहे. गाणी भडक, उथळ होत चालली आहेत. संगीत सुद्धा तात्पुरतं लक्ष वेधून घेणारं बनत आहे. जुनी गाणी जशी कालौघात टिकून राहिली, अजूनही जी कानी पडली की जी आपोआप शब्दांसकट आठवतात, चाली आपोआप गुणगुणल्या जातात, तसं नवीन गाण्यांच्या बाबतीत होत नाही. शब्द तर सगळ्यात कमी महत्त्वाचे असल्यासारखे बाजूला फेकले गेलेले. सगळी नाती तात्पुरती, तेव्हढ्या पुरती हवी. जे वास्तव जीवनात, तेच प्रतिबिंबित होतं गाण्यात, संगीतात. तात्पुरती लोकप्रिय होणारी पण लगेच विस्मरणात जाणारी गाणी. संगीत तसेच. बदलत्या मूल्य व्यवस्थेचं जाणवणारे रूप.

ह्याचाच परिपाक म्हणून ग्रामोफोन क्लबच्या संगीत रजनीला असणारा बहुतांश श्रोतृवर्ग हा पन्नाशीच्या पुढचा असतो. तरुणाई जवळपास नसतेच म्हटलं तर वावगं ठरू नये. थोडक्यात जुन्या मूल्यव्यवस्थेशी जवळीक सांगणारं संगीत आणि गीतं, यांच्यावरील प्रेम हा पन्नाशी पुढच्या वयाचा श्रोता जिवंत आहे तोपर्यंतच अस्तित्वात असेल. नंतर मग क्षणभंगुर उपयुक्ततावाद, अतिरिक्त व्यक्तिस्वातंत्र्यवाद , भोगवाद ह्यांचं प्रतिबिंब असलेलं संगीत. आवड बदलू शकते, मान्य. परंतु मूल्य इतकी आमूलाग्र बदलावीत हे समजणं कठीण.

आणि म्हणून मग माझ्या सारख्या रसिकाला वाटत राहतं की जे संगीत अजरामर आहे असं वाटून आपण त्या संगीतावर, गीतांवर प्रेम केलं, मोहब्बत केली, त्या गीत संगीताचा, त्यातून व्यक्त होणाऱ्या तरल भाव भावनांचा देखील हाच शेवट का ? हाच अंजाम ? आमच्या पिढीच्या मनात घर केलेल्या भावनिक एकरूपतेला महत्त्व देणाऱ्या प्रेमाचा, मोहब्बत चा हाच अंजाम? त्या जुन्या संगीतावरच्या मोहब्बतचा सुद्धा हाच अंजाम ?


ऐ मोहब्बत तेरे अंजाम पे रोना आया, हे अशा अर्थी खरं ठरू नये.


मनीष मोहिले

Monday, September 30, 2024

स्वतःला वर देणारा भस्मासूर

 स्वतः ला वर देणारा भस्मासूर


दिनांक २८ सप्टेंबर २०२४ च्या TOI मध्ये एक बातमी होती. ग्लोबल वाॅर्मिंग मुळे अंटार्क्टिका मधले लाखो वर्ष पूर्वी पासून असलेले ग्लेशियर वितळत आहे. ह्याचा अपरिहार्य परिणाम म्हणून ध्रुवीय प्रदेशातील समुद्र पातळीत देखील वाढ होत आहे. काही विशिष्ट पेंग्विन प्रजाती किंवा इतर प्राणी ज्यांच्या अस्तित्वासाठी बर्फ अनिवार्य आहे, अशा प्रजातींसाठी ही मृत्यूघंटा आहे आणि आपल्या कल्पनेपेक्षा खूप लवकर आपल्याला सुद्धा ह्याचे परिणाम भोगावे लागणार आहेत. जागतिक पातळीवर समुद्राच्या पाण्याच्या पातळीत होत असलेली वाढ, पाण्याचे वाढते तापमान ह्यामुळे वर्षानुवर्षांचे वातावरणीय आकृतीबंध बदलणे, ऑस्ट्रेलिया ते दक्षिण अमेरिका इतक्या मोठ्या विस्तारात समुद्री प्रवाळ परिस्थितीकी ला गंभीर इजा होणे ह्या काही भयंकर धोकादायक बाबी गेल्या काही वर्षात नजरेसमोर आल्यात.


अर्थात, विविध प्रकारचे प्रदूषण, नैसर्गिक साधन संपत्तीचा अतोनात वापर ह्या मुळे जागतिक तापमानात होणारी वाढ, पर्यावरणाचे संतुलन बिघडणे ह्या सारख्या वाईट परिणामांची मानवाला कल्पना आलेली आहे आणि त्यामुळेच सेंद्रिय शेती, उद्योगधंद्यात पाण्याचा पुनर्वापर, अक्षय ऊर्जा, इत्यादी तोडग्यांद्वारे मानव जात हा भेडसावणारा प्रश्न सोडवायचा प्रयत्न करत आहे. परंतु, खरोखरच हे उपाय पुरेसे आहेत का ? आणि त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे, हे योजले जाणारे उपाय मुळात खरोखर पर्यावरणासाठी हितावह आहेत का ?


उदाहरणार्थ, अक्षय ऊर्जेचा सगळ्यात मोठा स्त्रोत म्हणजे सौर ऊर्जा; आणि गेल्या काही वर्षात सौर ऊर्जा मोठ्या प्रमाणात वापरण्याचे यशस्वी प्रयत्न होत आहेत. भारतात सुद्धा आता ह्या गोष्टीने जोर पकडलेला आहे. आणि इथेच, २८ सप्टेंबरच्या TOI मधली दुसरी बातमी महत्वाची ठरते. ह्या बातमी प्रमाणे, २०३० साला पर्यंत भारतातील सौर ऊर्जा निर्मिती उद्योगामध्ये जो कचरा (waste टाकाऊ भाग) निर्माण होईल, त्यात ६७% इतकी वाढ होईल. हा कचरा, जमीन (माती) तसेच पाणी हे दोन मुख्य स्त्रोत अथवा दोन मुख्य संसाधने प्रदूषित करू शकतो जर ह्या कचऱ्याचे व्यवस्थापन नीट झाले नाही तर. कारण ह्या कचऱ्यात प्रामुख्याने heavy metals, silicon, फिल्म मध्ये असणारी रासायनिक संयुगे इत्यादी गोष्टी असतात ज्या हे प्रदूषण घडवण्यास कारणीभूत ठरतात. हा कचरा मुख्यत्वे करून निर्माण होतो सौर पॅनल च्या साधारणतः २५ वर्षाच्या उपयुक्त आयुर्मर्यादे नंतर. आता जर हे व्यवस्थापन नीट झाले नाही तर आज हरित किंवा अक्षय ऊर्जा म्हणून किंवा पर्यावरणास अनुकूल असे पर्याय म्हणून आपण ज्या गोष्टीचे कौतुक करतोय त्याच गोष्टी किंवा त्यांचे उत्पादन यातून भविष्यातील पर्यावरण संबंधित समस्या निर्माण होण्याची दाट शक्यता दिसून येते. त्यातल्या त्यात दिलासा देणारी बाब इतकीच आहे की ह्या waste चा पुनर्वापर कसा होऊ शकतो ह्याबद्दल राज्यस्तरीय प्रदूषण नियामक मंडळ आत्तापासून विचार विमर्श करत आहे, उपाय योजना शोधत आहे. 


अशा अनेक गोष्टी आहेत. उदा. आज ज्या EV vehicles (विद्युत चलित वाहने) चा बोलबाला आहे त्यातील विद्युत घट अर्थात battery. एकदा का त्या battery चे उपयुक्त आयुष्य संपले की तिची विल्हेवाट कशी लावायची हा प्रश्न आहेच.


अवकाशातील निरुपयोगी कृत्रिम उपग्रहांच्या अवशेषांचा कचरा, अती दुर्लंघ्य जागा जसे एव्हरेस्ट, उत्तर दक्षिण ध्रुव, महासागरात अती खोल जागी अशा ठिकाणच्या शोध मोहिमेत निर्माण झालेला कचरा ह्या इतर काही चिंतेच्या बाबी.

अर्थात म्हणून ह्या काही गोष्टींचे जे फायदे आहेत ते दुर्लक्ष करावे असे आहेत असे नाही. मात्र, त्यांच्या पासून उत्पन्न होणाऱ्या टाकाऊ गोष्टींची योग्य विल्हेवाट हा एक महत्त्वाचा प्राथमिक निकष मानला गेला पाहिजे अशा प्रकल्पांच्या प्राथमिक मूल्यमापनाच्या (primary evaluation) वेळीच.


नाहीतर, एकीकडे अशा शोधाना वरदान मानत, त्याच वेळेस दुसरीकडे आपण वेगळ्या प्रकारच्या विनाशाची बीजे रोवीत असू कदाचित.


पुराणातील भस्मासूर महादेवाकडून वर मिळून उन्मत्त झाला आणि ज्याचे त्याचे भस्म करीत सुटला. इथे, कलियुगात मानव हाच भस्मासूर आहे जो स्वतःच स्वतःला वैज्ञानिक शोधांचे वर देऊन उन्मत्त होत चालला आहे. ह्या भस्मासुरी प्रवृत्तीचा पराभव करू शकणारी मोहिनी नक्की कोण असेल आणि ती कधी अवतरेल हा आजचा एक महत्त्वाचा प्रश्न आहे.


मनीष मोहिले

Monday, September 2, 2024

भारत आणि छत्रपती शिवाजी महाराजांची बिरुदावली

आज १५ ऑगस्ट २०२४. भारताचा ७८ वा स्वतंत्रता दिन. गेल्या ७८ वर्षात एक स्वतंत्र देश म्हणून आपण काय कमावलं आणि काय गमावलं? काय कमावलं ह्यामध्ये बऱ्याच जणांकडे बरीच आकडेवारी असेल. पण काय गमावलं हा विचार कदाचित कोणाच्या मनातही येत नसेल किंवा फार थोड्या लोकांना असं वाटतं असेल. 

माझ्या मते, जी सगळ्यात महत्वाची गोष्ट आपण गमावली ती म्हणजे अखंड भारताचे अस्तित्व आणि एका सहिष्णु मात्र सशक्त अशी हिंदवी अस्मिता. टिळक, सावरकर, नेताजी, गोडसे ह्यांच्या मनातील अखंड भारत आणि त्यातील जनमानसाची हिंदवी अस्मिता. 

ह्या निमित्ताने विचार करताना अपरिहार्यपणे ह्या सर्वांचे स्फूर्तीस्थान किंवा प्रेरणास्थान असलेल्या, हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराजांची आठवण मनात नव्याने ताजी होणे अपरिहार्य होते. कारण शिवाजी महाराजांच्या काळी प्रामुख्याने एका राजाच्या अधिपत्याखालील प्रदेश अशी सत्ता व्यवस्था असली आणि प्रामुख्याने त्या अधिपत्याचा मूलाधार राजाचा धर्म असा असला (अब्राहमिक धर्माच्या प्रत्येक राजाने स्वतःच्या धर्माचा प्रसार हे एक मुख्य कार्य मानले होते), तरी छत्रपती शिवाजी महाराज हे कमीत कमी नजीकच्या भूतकाळातील पहिले असे द्रष्टे राजे होते ज्यांना प्रदेश, संस्कृती आणि मग धर्म ह्याबाबतीत समान हितसंबंध असलेल्या जनतेच्या राष्ट्रीयत्वाची आणि राष्ट्राची स्पष्ट जाणीव होती आणि ती प्रत्यक्षात उतरवण्यासाठी आवश्यक पात्रता आणि योग्यता होती.

अलेक्झांडर पासून सुरू होऊन पुढे मोगल आणि नंतर इंग्रज अशी जी परकीय आक्रमणं ह्या भारतभूमी वर झाली त्या प्रत्येक आक्रमणात वाढत्या प्रमाणात आपली सामाजिक अस्मिता आणि ओळख ह्यावर आक्रमणं होऊन त्यांचा नायनाट करण्याचे किंवा संपूर्ण स्वरूप बदलून टाकण्याचे आणि आपल्याला, मुळात आपली नसलेली पण आपली आहे असं समाजमनावर बिंबवणारी एक अस्मिता देण्याचे जे षडयंत्र रचले जात होते आणि आहे त्याचा खऱ्या डोळसपणे प्रतिकार महाराजांनी केला असं म्हटलं तर ते वावगं ठरू नये.

खरंतर महाराजांच्या वेळची व्यक्तीप्रधान राजसत्ता आणि आता बहुसंख्य देशात असलेली लोकशाही सत्ताव्यवस्था ह्यात फरक असला तरी कदाचित संपूर्ण समाजात स्वातंत्र्य, समता, नांदावी ह्या व्यापक दृष्टीकोनातून महाराजांनी राबवलेली राजसत्ता, आजच्या बहुसंख्य लोकशाह्यां पेक्षा अधिक प्रजाहितदक्ष होती असं नक्कीच म्हणता येईल.

त्यांच्या मंत्री मंडळात, सल्लागार मंडळात सर्व वर्णांचे लोक होते. तिथे तलवार गाजवणारी ब्राह्मण मंडळी होती तद्वतच दरबारी, सनदी, लेखनिक कामकाजात तज्ज्ञ अशी कायस्थ (क्षत्रिय) मंडळी देखील होती आणि जन्माधारित वर्णव्यवस्थे नुसार नीच वर्णात जन्मलेली मंडळी देखील आपल्या क्षात्रतेजाने स्वतःस सिद्ध करून मोठ्या पदास पोचली होती. तेव्हा महाराजांच्या राज्यव्यवस्थे मध्ये व्यक्तीचे मूल्यांकन हे जन्माधिष्ठीत नसून गुणाधिष्ठीत आणि कर्माधिष्ठीत होते हे नक्की. शिवाय लढ्याचे स्वरूप स्वकीय विरुद्ध परकीय असे होते. प्रसंगवशात परकियांच्या अधिपत्याखाली लढणाऱ्या स्वकीय व्यक्तींविरुद्ध संघर्ष करावा लागला तरी त्याचा मूळ हेतू स्व (कीय) राज्य हा होता. आपल्या वैयक्तिक विरोधकांचे निखंदन हा नव्हे. म्हणून जावळीकर मोरे, खोपडे ह्यांना चूक सुधारण्याची संधी दिली गेली. पण एकदाच. दुसऱ्या चुकीची संधीच त्यांनी दिली नाही.

केवळ राज्य संपादन करून उपयोग नाही तर त्याचे रक्षण आणि संवर्धन करणे तितकेच किंबहुना त्याहूनही महत्त्वाचे आहे हे महाराजांनी ओळखले होते. त्यामुळे, त्यांचा बहुतांश वेळ हा लढण्यात जाऊन सुद्धा त्यांनी जो काही वेळ मिळाला त्यात जमीन महसूल पद्धती, सारा पद्धती ह्यात प्रजेच्या हिताचे बदल घडवून आणले. व्यवस्थापनामध्ये अधिकार आणि जबाबदारी ह्यांच्या योग्य पायऱ्या असाव्यात हे पाहिले. सैन्यात देखील योग्य पदानुक्रम निर्माण केला. पायदळ, घोडदळ ह्या बरोबरच, आरमाराचे महत्व ओळखून बलाढ्य आरमार उभे केले. गिरीदुर्ग जसे सांभाळले, त्याचप्रमाणे जलदुर्गांची निर्मिती केली. स्वतः ला राज्याभिषेक करवून घेण्यात राज्याला अधिकृतता प्राप्त व्हावी (लोकांच्या आणि विशेष करून परकीय सत्ताधीशांच्या नजरेत हा निव्वळ पुंडावा राहू नये), स्वजनांच्या मनी आत्मविश्वास, आत्मतेज, अस्मिता आणि स्वधर्माभिमान जागृत व्हावा हा त्यांचा मूळ उद्देश होता. राज्याभिषेक झाल्यानंतर त्यांनी राज्याभिषेक शक चालू करून ह्या अस्मितेला एक वेगळा आयाम आणि कायम स्वरूप प्राप्त करून देण्याचा प्रयत्न केला. भाषा शुद्धीकरणासाठी भाषाकोश सिद्ध केला. स्वतः ची नाणी चालू करून आर्थिक दृष्ट्या इतर सत्ता संकट आणू शकणार नाहीत हे बघितले. स्वराज्याचा भगवा तर स्वराज्याच्या संस्थापने पासून फडकत होता ज्याला राज्याभिषेकानंतर अधिकृत स्वरूप मिळाले. थोडक्यात आजच्या कोणत्याही स्वतंत्र देशाकडे स्वतःचे सार्वभौमत्व जगाला दाखवण्यासाठी जी जी प्रतीके किंवा क्षेत्रे आहेत ती सर्व महाराजांच्या हिंदवी स्वराज्याकडे होती.

ह्या सर्व पार्श्वभूमीवर महाराजांच्या नावामागे, त्यांच्या ललकारीत उच्चारली जाणारी जी बिरुदावली होती तिचा थोडासा वेगळा विचार करून पाहू.

ती ललकारी होती प्रौढप्रतापपुरंदर, मुघलदल संहारक, गोब्राह्मणप्रतिपालक, सद्धर्मसंस्थापक, क्षत्रियकुलावतंस, सिंहासनाधीश्वर, छत्रपती श्री शिवाजी महाराज.

रूढार्थाने प्रौढप्रतापपुरंदर मधील प्रौढ प्रताप म्हणजे मोठा पराक्रम. मात्र माझ्या मते, हा प्रौढ म्हणजे प्रगल्भ ह्या अर्थी आहे. महाराजांनी जीवन भरात आपल्या इतक्या शत्रूंवर विजय मिळवले पण कुठेही त्यांनी ह्या परक्या राज्यकर्त्यांच्या अधिपत्याखालील प्रजेला मग ती कोणत्याही धर्माची असो, त्रास दिला नाही. ना कधी स्त्रिया, बालके, वृद्ध ह्याना पीडा दिली. अगदी लढणाऱ्या शत्रू सैन्यापैकी देखील जो हत्यार ठेऊन शरण येईल त्यास जीवदान दिले, मग तो कोणत्याही धर्माचा असो आणि ज्याने शस्त्र उगारले त्या सैनिकास कापून काढण्याची आज्ञा दिली मग तोदेखील कोणत्याही धर्माचा असो. मुसलमानांनी हिंदू स्त्रियांवर अत्याचार केले, देवळे फोडली ह्याचा सूड म्हणून मुस्लीम स्त्रियांवर अत्याचार, मशिदी फोडणे असे प्रकार त्यांनी केले नाहीत. तसे करणाऱ्यास उलट कडक शिक्षा होईल हे सर्वांस माहिती होते. ही खरी धर्मनिरपेक्षता आणि हा खरा प्रगल्भ अर्थात प्रौढ प्रताप.

अर्थात धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली बहुसंख्यांक लोकांचे न्याय्य हक्क डावलायचे आणि अल्पसंख्यांक जनतेस फुशारून ठेवायचे हे आजकालच्या विशिष्ट पक्षांचे जे हीन धोरण आहे तशी ही हीन, खोटी धर्मनिरपेक्षता नव्हती.

महाराजांची धर्म निरपेक्षता ही खऱ्या अर्थाने निरपेक्ष होती. धर्म निरपेक्षता म्हणजे स्वतः च्या आणि स्वतःच्या धर्मबांधवांच्या धर्माकडे दुर्लक्ष करायचे वा त्यास सापत्न भाव द्यायचा आणि दुसऱ्या धर्माच्या लोकांचे लांगूलचालन करायचे अशी नपुंसक व्यापारी धर्मनिरपेक्षता त्यांनी कधीच दाखवली नाही. किंवा फक्त मराठ्यांचे हितसंबंध जपायचे आणि बाकी जाती जमातीच्या लोकांना वाऱ्यावर सोडायचे असा प्रकारही त्यांनी केला नाही.

ह्यावर एक असा मुद्दा उपस्थित होऊ शकतो की तेव्हाची व्यक्तिधिष्ठीत राजसत्ता, आणि आताची लोकसत्ताक पद्धती, तेव्हाची जनसंख्या वर्गवारी आणि आताची, ह्यात अशी तुलना होऊ शकत नाही. पण हा मुद्दा उपस्थित करणारे हे विसरतात की कोणत्याही कारणास्तव स्वधर्माचा आणि धार्मिक अस्मितेचा त्याग करणे किंवा त्यावर फक्त टीका करणे, एका धार्मिक ओळखीचा समाज ही ओळख नष्ट होऊ देणे असे होऊ नये यासाठीच त्यांनी स्वराज्य स्थापनेचा महदुद्योग आरंभिला. औरंगजेबाने काशी विश्वेश्वर फोडला तेव्हा तिथे परत त्याची पुनरपि प्राणप्रतिष्ठा करण्याचीच महत्त्वाकांक्षा त्यांनी मनी धरली आणि बोलून व्यक्त केली. तिथे संपूर्ण समाजासाठी उपयोगी एखादी संस्था वा इमारत बांधावी असा वरकरणी धर्मनिरपेक्ष परंतु प्रत्यक्षात धर्मद्रोही असा विचार त्यांनी केला नाही. 

मुघल हेच आपले प्रमुख शत्रू आहेत हे महाराज ओळखून होते आणि हिंदू धर्म आणि हिंदू धर्माची ओळख सांगणारी मंदिरे, विश्व विद्यालये, ग्रंथ, ह्यांचे मुघलांपासून रक्षण करण्यासाठी महाराज कटीबद्ध होते आणि त्यामुळे इतिहासात महाराजांची ओळख ही प्रामुख्याने मुघलदल संहारक अशी आहे. त्यांच्या प्रगल्भ पराक्रमाचा आणि धर्मनिरपेक्ष असण्याचा भाग म्हणून ते मुघल "दल" (सेना) संहारक आहेत. मुघल (मुस्लीम) प्रजा संहारक नाहीत. मात्र आज जेव्हा सामान्य प्रजेतील अनेक मुस्लीम सुद्धा देश विघातक कृत्यांमध्ये सामील असलेले दिसून येतात, अशा परिस्थितीत महाराज असते तर अशा देशबुडव्याना त्यांनी "दलात" समाविष्ट करून त्यांचा उच्छेद केला असता ना की नपुंसक धर्मनिरपेक्षतेचे डांगोरे पिटले असते.


सगळ्यात महत्वाचे म्हणजे ते अभिमानाने स्वतःला हिंदू म्हणवून घेत. असा हिंदू जो सहिष्णु आहे, सर्व धर्मांचा आदर करणारा आहे. मात्र कोणी त्यांच्या अथवा प्रजेच्या हिंदुत्वाच्या कोणत्याही क्षेत्रास धक्का दिल्यास, त्याला एक हिंदू म्हणून जन्माची अद्दल घडवण्याची धमक ज्याच्या मनात आणि मनगटात आहे.

सद्धर्म संस्थापक हे पुढील बिरूद अंशत: ह्यातूनच सिद्ध होते. सर्व धर्मांप्रती समान आदर हे सनातन हिंदू धर्माचे जे उच्चतम तत्व आहे त्याची आदर्श अशी वास्तविक तद्वतच व्यावहारिक अंमलबजावणी महाराजांनीच केली.

गोब्राह्मणप्रतिपालक ह्यातील "गो" स्पष्ट आहे. मात्र, ब्राह्मण हे निव्वळ जन्माने ब्राह्मण असलेल्यांबद्दल नसून, ज्यांना खरोखर ज्ञान आहे अशा व्यक्तींबद्दल आहे. त्याचमुळे सर्व जाती जमातीतील संतांचा (की ज्यांना मोक्षाचे ज्ञान प्राप्त झाले आहे) महाराजांनी कायम आदर आणि प्रतिपाळ केला. त्यात अगदी मुस्लीम संत देखील आले.

क्षत्रिय कुलावतंस ह्यात महाराज क्षत्रिय कुलोत्पन्न होते हे जरी अभिप्रेत असले तरी त्यांच्या पदरी तलवार गाजवणारा प्रत्येक वीर, मग तो जन्माने ब्राह्मण असो किंवा शूद्र, अथवा शहाण्णव कुळी, तो क्षत्रियच गणला जाई.

तर अशा प्रकारे जन्माधिष्ठीत वर्णव्यवस्था न मानता गुणाधिष्ठीत वा कर्माधिष्ठीत मूल्यांकन हे महाराजांच्या सद्धर्म संस्थापक असण्याची ग्वाही देते.

सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे एक राष्ट्रीय अस्मिता महाराजांनी एतद्देशीय जनतेला दिली. स्वतःचा देश, स्वतःचा धर्म ह्याबद्दल जनतेच्या मनात स्वाभिमान उत्पन्न केला. एका व्यक्तीसाठी न लढता, स्वराज्य, स्वधर्म, सद्धर्म, माणूसकी ह्या उच्च मूल्यांसाठी लढायची शिकवण दिली. पुढे जगभरातील शास्त्रीय शोध, सामाजिक बदल इत्यादीबरोबर राष्ट्रीयत्वाची जी बदलती प्रतिमा रूढ झाली तिच्या मूळ रूपाचा पाया महाराजांच्या अस्मिता जागृतीच्या यशस्वी प्रयत्नात होता.

आजच्या वरकरणी धर्मनिरपेक्ष लोकशाही असलेल्या राज्यकर्त्यांनी या शककर्त्या, द्रष्ट्या, पुण्यश्लोक राजाच्या चरित्रातून आणि चारित्र्यातून खूप काही शिकण्यासारखे आहे.


मनीष मोहिले 





Wednesday, July 24, 2024

ऋतूचक्र

नुकतंच दुर्गाबाई भागवतांचे ऋतूचक्र वाचून संपवलं. म्हटलं तर खूप उशीरच झाला वाचायला. पण काही वेळेला काही पुस्तकं उगीचच वाचायची राहून जातात. त्यातलंच हे एक.

खरं तर ऋतूचक्र नाव कित्येक वर्षांपूर्वीच कानावर पडलं होतं. नुसतं कानावर पडलं होतं असं नाही तर नजरेखालून देखील गेलं होतं. आम्हाला मराठीला (बहुतेक दहावीला) एक श्रावण म्हणून दुर्गाबाईंचा धडा होता ज्यात ऋतूचक्र मधील "श्रावण साखळी" मधील काही भाग होता. त्यात श्रावणातील सूर्याचं वर्णन करताना त्या म्हणतात श्रावणातील सूर्यबिंब सुद्धा किती सुरेख मवाळ रुपेरी असतं. नुसत्या डोळ्यांनी सूर्य ह्याच वेळी बघू शकतो. आणि खरोखर तो तसा पहाता येतो. मी स्वतः कित्येकदा बघितला आहे. ते रुपेरी सूर्यबिंब तेव्हापासून मनात घर करून बसलं होतं. 

अखेरीस ऋतूचक्र वाचलं आणि संपूर्ण श्रावण दुर्गाबाईंच्या नजरेतून बघितला. श्रावणच का? बाराही महिने त्यांच्या नजरेतून बघितले. बघितले, वाचले आणि अवाक झालो. अवाक झालो दुर्गाबाईंची अफाट निरीक्षण शक्ती पाहून.

बाराही महिने आणि त्यातील दोन दोन महिन्यांच्या जोडीचे सहा ऋतू - ऋतूचक्र आणि त्यात निसर्गात घडणारे बदल. आकाशाचे रंग, त्यातील तारे आणि त्यांच्या जागा, वेळा, सूर्यबिंब आणि चंद्रबिंब आणि त्यांची अनेकविध रूपे, अमावस्येच्या आणि पौर्णिमेच्या रात्रीचे विरोधाभासी सौंदर्य, ऋतूंप्रमाणे बदलणारी दिवसांची लांबी आणि रूपे, सावल्यांचे खेळ, ढगांनी केलेली गंमत, ढगांचे रंग आणि आकार आणि सगळ्यांची मिळून रंगपंचमी, त्यात जमीन आणि झाडं ह्यांची मिळणारी साथ, झाडांच्या हिरवाईचा कॅलिडोस्कोप, कोवळी पालवी, भरगच्च पर्णराजी, निष्पर्ण फांद्या, वेगवेगळी फुले, त्यांचे रंग, सुगंध, नाजूक नक्षी आणि नखरे, फळांचे मोसम, त्या फुलांवर आणि फळांवर येणारे किडे, पक्षी, त्यांचे प्रणयाचे, विणीचे हंगाम, काही किड्यांच्या बाबतीत घडणारे मृत्यू आणि ह्या सगळ्यातून उभे होणारे निर्मिती, विकास आणि विनाश ह्यांचे अनादी अनंत निसर्ग नाट्य, त्या नाट्यात वारे, समुद्र आणि आकाश ह्यांचे पार्श्वसंगीत आणि पार्श्वभूमी. इतकं अप्रतिम वर्णन आणि इतक्या ओघावत्या शैलीत. जणू संपूर्ण ऋतूचक्र त्या आपल्या डोळ्यांसमोर उभे करतात. एका विराट नाट्याचा दरवेळी वेगळे प्रवेश असलेला पण मूळ संहिता कायम असलेला नित्यनूतन प्रयोग.

पण आज मी हे लिहीतो आहे, हे ह्या पुस्तकाचं रसग्रहण किंवा आढावा ह्याबद्दल नाही तर ह्यातील दोन तीन शब्द योजना आणि काही कल्पना, लोककथांचे उल्लेख ह्याबद्दल आहे. तसं तर शब्दयोजना म्हटलं तर प्रत्येक महिन्याची ओळख करून देणारे प्रकरण शीर्षक जसे वसंतह्रदय चैत्र, चैत्रसखा वैशाख, मेघश्याम आषाढ, श्रावण साखळी, पुष्पमंडीत भाद्रपद, सोनेरी अश्विन, संध्यारांजित कार्तिक, प्रशांत आणि प्रक्षुब्ध मार्गशीर्ष, तालबद्ध पौष, मायावी माघ, रुपधर फाल्गुन - किती सुरेख नावं आहेत. पण मी बोलतोय ते शब्द वेगळे.

पहिला शब्द जो मला खोलवर जाणवला तो म्हणजे गर्भछाया. निर्मितीच्या सर्वसमावेशक असण्याचे इतके यथार्थ वर्णन एकाच शब्दात इतक्या चपखलपणे दुसऱ्या कुठल्याच शब्दाने होत नसेल. जन्माला येणाऱ्या जीवाची, जन्म देणाऱ्या जीवावर कशी छाया असते, शारिरीक असेल, भावनिक असेल आणि अस्तित्वाशी संलग्न देखील असेल. त्यात फक्त नवनिर्मितीचा आनंदच नाही तर प्रसवाच्या आगामी वेदनांची जाणिव देखील आहे. एखाद्या किड्याच्या जीवनचक्रातील निर्मितीनंतरच्या लगोलग येणाऱ्या मृत्यूचे दर्शन आहे. आणि तरीही, व्यापून उरणारी जाणीव अथवा भावना ही नवनिर्माणाचीच आहे. ह्या एका शब्दात सौंदर्य आणि गांभीर्य दोन्ही समतोल पणे आहेत.

दुसरा एक मला अतिशय भावलेला शब्द म्हणजे camouflage ह्या इंग्रजी शब्दासाठी दुर्गाबाईंनी योजलेला मराठी प्रतिशब्द. तसा तर छद्मवेष हा शब्दकोशात दिलेला अर्थ किंवा प्रतिशब्द आपल्याला माहिती आहे. पण तो वाचायला जसा ओबडधोबड, छद्मी, कबरी रंगाचा वाटतो तसाच ऐकायला देखील थोडा खरखरीत वाटतो. पण दुर्गाबाई मात्र रंगगोपन हा अतिशय सुरेख, सुडौल, नेटका, आणि अचूक शब्द वापरतात जो ऐकायला सुद्धा नादमधुर वाटतो. Camouflage मध्ये नेमके डोळ्यांसमोर असून देखील लपलेले असण्याचे जे कलात्मक कौशल्य अभिप्रेतआहे ते रंगगोपन ह्या शब्दात तंतोतंत उतरलेले आहे. मला तरी हा अतिशय चपखल असा प्रतिशब्द वाटतो. पुढच्याच दोन तीन ओळीत दुर्गाबाई स्वतःच रंग सादृश्य असा शब्द देखील वापरतात. पण रंगगोपन ची मजा रंग सादृश्य मध्ये नाही.

वर मी म्हटलं की ऐकायला सुद्धा रंगगोपन नादमधुर वाटतो. आता नादमधुर साठी सुद्धा दुर्गाबाई श्रुतिमनोहारी असा एक वेगळाच शब्द वापरतात. नेहमीच्या वापरातील; श्रवणीय, नादमधुर ह्यापेक्षा वेगळाच असा हा शब्द की जो निव्वळ त्याच्या वेगळेपणामुळे, त्यातील नाविन्यामुळे मला आवडून गेला. त्यातल्या "मनोहारी" मुळे कुठेतरी ते श्रवण सुंदर असल्याचा एक अदृश्य चित्र संस्कार आपल्या कानातून मनावर होतो. आणि पुस्तकात ज्या ज्या ठिकाणी हे शब्द येतात, त्या जागा पहाता असं वाटतं की लिखाणाच्या आणि विचारांच्या ओघात सहजपणे हे शब्द दुर्गाबाईंच्या मनातून लेखणीत आणि लेखणीतून कागदावर उतरले असतील. ते शब्द इतके सहजपणे आपल्यासमोर येणं ह्या सहजतेत त्यांच सौंदर्य अधिक खुलून येतं.

ह्या शब्दांबरोबर, अतिशय बारकाईने केलेल्या निसर्ग वर्णनाबरोबरच अजून एक गोष्ट मला भावली आणि ती म्हणजे दुर्गाबाईंच्या लिखाणात सहज डोकावून आपल्याला मोहून टाकणाऱ्या, विचार करायला लावणाऱ्या कल्पना, लोककथा इत्यादी.

पहिली कल्पना श्रीमद्भगवद्गीते मधली की जिथे भौतिक संसार हा असा अश्वत्थ वृक्ष मानला गेलास आहे की ज्याची मुळे स्वर्गात आहेत आणि भूलोकात फांद्या आणि पानांचा डेरेदार घेर आहे आणि जिथे पाने ही वेद आहेत. अश्वत्थ वृक्ष हा एकंदरीत पुराण काळापासून पवित्र मानला गेलेला, शास्त्रीय दृष्ट्या अधिक प्रमाणात प्राणवायू उत्सर्जित करत असल्यामुळे महत्वाचा असलेला असा वृक्ष. जी ए नी देखील "माणसे अरभाट आणि चिल्लर" मध्ये अश्र्वत्थाचा अतिशय मनोज्ञ उल्लेख केला आहे. मात्र, श्रीकृष्णाला दिसलेल्या ह्या उर्ध्व मूल अध: शाखं रुपाबद्दल मी विचारमग्न झालो. महिन्यांमध्ये मी मार्गशीर्ष आहे आणि वृक्षात मी अश्वत्थ आहे म्हणणाऱ्या श्रीकृष्णाची नक्की काय विचारधारा असेल ह्या मागे ? वरती मुळे, आणि खाली फांद्यांचा पसारा. त्या फांद्यांवर असलेली पाने म्हणजे वेद असे हे भौतिक संसाराचे रूप जो जाणतो तो वेद जाणतो. संपूर्ण जगाची उत्पत्ती आकाशस्थ परमेश्वरा पासून होते आणि त्या जगाची चैतन्याची विविध रूपे भूलोकी पाहायला मिळतात. वेदांमध्ये साऱ्या प्रश्नांची उत्तरे आहेत असे म्हणतात. वेदांच्या जन्मकालापासून ते आजपर्यंत वरवर पहाता भौतिक जगात अनेक स्थित्यंतरे आली. प्रश्नांचे स्वरूप बदलले पण वेदातील उत्तरे कालातीत राहिली जी आज देखील लागू पडतात. असे असेल तर पानांचे उत्पत्ती, विकास, विनाश आणि पुन्हा उत्पत्ती हे चक्र देखील कालातीत आहे आणि म्हणून ती वेदांप्रमाणे आहेत असे तर म्हणायचे नाही ना? आणि हे चक्र आणि त्याचे निरंतरत्व ज्यास उमगले तो "जाणता" झाला असा तर अर्थ अभिप्रेत नाही ?? आणि पिंपळ पानावरची नक्षी ? जीवनरस निघून जाऊन शुष्क झालेल्या पानाचे रुप देखील त्या नक्षीने सुंदर दिसावे ह्यात कुठेतरी तथाकथित अंतानंतरच्या सौंदर्याचा संकेत कुठे लपला आहे का ? 

नेमका अर्थ काय आणि अचूक उत्तर म्हणून तो मिळावा ह्यासाठी नेमका व अचूक प्रश्न कोणता विचारायचा हे ज्ञान कधी आणि कसे होणार ?

दुसरी जी लोककथा आहे ती इतकी मूलगामी आणि तत्त्वज्ञानी नसून खूप आर्त आणि प्रणय रम्य आहे. एका आदिवासी लोककथे प्रमाणे पृथ्वी आणि आकाश ह्यांचे एकमेकांवर प्रेम असते पण दैववशात् पृथ्वी आणि सूर्याचे लग्न होते आणि आकाशाचे दु:ख पावसाच्या रूपाने बाहेर पडते. निसर्ग चक्रातील एखाद्या इतक्या विशाल घटनेला अशा साध्या पण प्रणय करुण रुपात पहायचं हे किती विलक्षण आहे ! आता ही लोककथा मनात घर करून बसली कायमची. दरवेळी आता पाऊस पडताना क्षमेचा विरही सखा आकाश मन भरून राहील. 

अशीच एक आदिवासींची मान्यता की ज्यात ते काटे सावरीच्या निष्पर्ण झाडाला कौमार्याचे प्रतीक मानतात. दुर्गाबाई म्हणतात की अजिबात शृंगार नसलेले आणि पूर्णतया नग्न (निष्पर्णतेमुळे) अशा मीलानोत्सुक कुमारी सौंदर्याचे इतके सुंदर प्रतीक निसर्गाशी एकरूप झालेल्या समाजातच असू शकते.

एरवी व्यासपर्व किंवा पैस सारखी प्रचंड वैचारिक, तत्त्वज्ञान आणि विश्लेषण भरून असलेली पुस्तकं लिहिणाऱ्या दुर्गाबाई ऋतूचक्र च्या रूपाने एक आगळेच विश्व आणि लेखनशैली आपल्यासमोर खुली करतात आणि त्यांच्या दर्शनाने देखील आपण तितकेच भारावून जातो.

ऋतूचक्र वाचलं आणि लहानपण मनात पुन्हा जागं झालं. लहानपणी पाहिलेले ते ते ऋतू त्यांच्या त्यांच्या सौंदर्या सह डोळ्यांसमोर पुन्हा साकार झाले. आज इतक्या वर्षांनंतर नैसर्गिक जंगल झाडीची जागा काँक्रिटच्या जंगलांनी घेतली असताना सुद्धा पुन्हा नव्या उमेदीने त्यातून दिसणारा निसर्ग पहायची उभारी मनाला मिळाली. निसर्गाचं आणि पशुपक्ष्यांचे निरीक्षण करण्याचे असेही वेड मला आहे. पण त्यात आता झाडांच्या बदलांची आणि बारकाव्यांची भर पडली. 

लोहगडाच्या माळावर खुल्या आभाळाखाली झोपून ताऱ्यानी खच्चून भरलेल्या अमावस्येच्या रात्रीचं मन:पूत घेतलेले दर्शन कायम साठी मनावर कोरले गेलेले आहे. ऑगस्ट महिन्यातील कूर्ग सहलीत पाहिलेल्या हिरवाईच्या विविध छटा मनाच्या कॅनव्हास वर ताज्या आहेत. पक्षांची ओळख (आयडी) करून घ्यायचा कायमस्वरूपी सुरेख छंद सुदैवाने लागलेला आहे. त्यात गुलमोहर, पांगारा, बहावा ह्यांचा उत्कट आणि भरून वाहणारा बहर मनाला मोहवत आणि शांतवत आला आहे. पण झाडं आणि पालवी, झाडावरून गळणारी पानं आणि निष्पर्ण फांद्यांचे धांदोरे ह्यांचं सौंदर्य आणि त्यातील जीवननाट्य अधिक सजगतेने बघण्याची दृष्टी आता लाभेल असा माझा मलाच विश्वास वाटतो आहे.

बालपणीच्या आठवणी ताज्या होणं, एक नवीन दृष्टी मिळणं आणि जोडीला अद्भुत कल्पना आणि लोककथा स्मृती संग्रहात येणं - एका छोट्याशा पुस्तकाने दिलेल्या किती ह्या भेटी !! पण मग ती तर दुर्गाबाईंच्या लिखाणाची खासियत आहेच.

निखळ आनंद ही गोष्ट दिवसेंदिवस दुर्मिळ होत चालली आहे असं आपण म्हणत असतो. पण ऋतूचक्र सारखं एखादं पुस्तक वाचनात येतं आणि आयुष्यातील सगळ्या ऋतूना भरभरून जगण्याची दृष्टी मिळते आणि मिळतो निखळ आनंद.


मनीष मोहिले 

Tuesday, March 26, 2024

शोले

शोले 

शोले -- हिंदी चित्रपटसृष्टीत अनेक बाबींसाठी मैलाचा दगड ठरलेला हा चित्रपट. जी. पी. सिप्पी आणि रमेश सिप्पी ह्यांच्या मुकुटातला सर्वात मोठ्या मानाचा तुरा. चित्रपट निर्मितीमधील अनेक प्रथमवेलांचा चित्रपट. सेव्हंटी एम एम मध्ये  शूट केला  गेलेला व स्टीरीओफोनिक साऊंड असलेला हा पहिला  चित्रपट. शंभरपेक्षा जास्त चित्रपटगृहात सिल्व्हर ज्युबिली साजरा करणारा आणि मिनर्व्हा मध्ये सलग पाच वर्ष चालत रहाणारा हा पहिला चित्रपट. चित्रपटातील गाण्यांच्या जोडीने किंवा खरं तर त्याहीपेक्षा जास्त लोकप्रिय झालेले संवाद असलेला हा पहिला चित्रपट. नायक वा नायिकेपेक्षा खलनायकाची व्यक्तिरेखा अधिक लोकप्रिय करणारा हा पहिला चित्रपट. 

असा हा शोले, मी पाचेक वर्षांचा असताना मिनर्वालाच पहिल्यांदी पाहिला होता. त्या वेळचा एकच सीन मनावर अजून कोरला गेला आहे - त्या भव्य पडद्यावर, सुरूवातीलाच इंजिनच्या धूडामागोमाग आत शिरणाऱ्या गाडीचा. त्यानंतर थिएटरमध्ये सव्हीस वेळा शोले बघितला. सव्वीसाव्ह्यांदा बघितला मराठा मंदीरला.  पिक्चर सुरू झाला आणि पाच मिनीटात सगळ्याना कळलं की आत असलेल्या जवळपास प्रत्येकाला सगळे संवाद जसे च्या तसे तोंडपाठ आहेत. आजही टी व्ही वर कोणत्याही चॅनलवर शोले लागला असेल तर जिथून बघायला सुरूवात करतो ते शेवटपर्यंत बघितला जातो . अजून पाच वर्षानी वयाची पन्नाशी पूर्ण करणाऱ्या शोलेचं गारूड अजूनही सिनेरसिकांच्या मनात तसंच तरूण आणि ताजं आहे. 

असं काय खास होतं शोलेमध्ये ? सलीम जावेद कडे असलेली फक्त चार ओळींची एक सूडकथा. पण तिच्यावर बनलेल्या ह्या तीन तासापेक्षा अधिक लांबीच्या चित्रपटाने हिंदी चित्रपटसृष्टीतील यश, किर्ती, पैसा ह्याचे मापदंड व मानदंड बदलले. आजही हिंदी चित्रपटसृष्टीतील एक Cult Classic म्हणून ओळखला जाणारा चित्रपट. असं काय खास आहे त्यात ? चित्रपट निर्मितीमधील अत्यावश्यक व अत्यंत महत्वाच्या अशा अंगांच्या दृष्टीकोनातून, एक एक करून बघू या.

कथा व पटकथा - नायक व खलनायक ह्यांच्यांत नायिकेला मिळवण्यासाठी असलेलं वैर, शेवटी नायकाचा जय अशा पठडीतील कथांवर बनणाऱ्या असंख्य चित्रपटांपेक्षा शोलेमधील वैर वेगळं होतं. मूळ चार ओळींच्या कथेला ठाकूरच्या सूडयात्रेची पार्श्वभूमी देत सलीम जावेदनी भव्य बनवलं. आदर्श पटकथालेखन कसं असावं ह्याचा जणू वस्तुपाठ देणाऱ्या शोलेच्या पटकथालेखनातून त्यांनी शोलेची कहाणी रसिकांपर्यंत अतिशय प्रभावी रीतीने पोहोचवली. चित्रपटाच्या व्यावसायिक यशातील पटकथालेखकाचा वाटा ओळखून त्यास योग्य मान देणारा शोले पहिला चित्रपट.

कलाकारांची निवड - ज्याला शुद्ध मराठीत casting म्हटलं जातं ते चित्रपट निर्मितीमधील अजून एक महत्वाचं अंग म्हणजे कलाकारांची निवड. आंतरजालावरील 14 / 18 Unknown Facts about Sholay किंवा Sholay Trivia इत्यादीवरून आत्तापर्यंत आपल्याला सर्वांना माहिती झालं आहे की संजीवकुमारला गब्बरची तर धर्मेंद्रला ठाकूरची भूमिका करायची होती. जाणकारांच्या मते अमिताभसारख्या नवोदित कलाकाराला जयची भूमिका देण्यापेक्षा शत्रूघ्न सिन्हासारख्या अधिक प्रसिद्ध कलाकाराला द्यायला हवी होती. गब्बरसाठी डॅनी डेंझोग्पा चं नाव पुढे होतं. पण ह्या सर्व हमखास ठोकताळ्यांकडे दुर्लक्ष करत रमेश सिप्पी व सलीम जावेद ह्यांनी आपल्या आंतरिक प्रेरेणेला महत्व देऊन कलाकार निवडले आणि नंतर जे घडलं तो इतिहास आहे.

छायाचित्रण व फाईट कोरीगोग्राफी  - सत्तर एम एम च्या चित्रिकरण माध्यामातून एक अत्यंत प्रभावी चित्रीकरण सिनेरसिकांसमोर केलं गेलं. इन्स्पेक्टर बलदेव सिंगला साथ देत धावत्या गाडीतून डाकूंबरोबरच्या जय वीरूच्या फाईट सिक्वेन्समधले कॅमेराचे ॲंगल्स बघा. बेफाम धावणारे घोडे अंगावरचा स्वार गोळी लागून पडल्यावर सुद्धा अंगात भरलेल्या मस्तीमुळे धावत रहातात ते घोड्यांचे शॉट्स बघा. होळीच्या फाईटच्या वेळेस, दौडणाऱ्या घोड्याच्या टापांखालून आपल्या लेकराला वाचवणारी आई, वरकरणी गब्बरच्या पायावर डोकं ठेवायला निघालेल्या जयचे उभ्या घोड्यांच्या पायांच्यामधून घेतलेले शॉट्स  - उत्कृष्ट छायाचित्रण व उत्कृष्ट फाईट कोरीओग्राफीचा अत्त्युत्तम नमुना.

अभिनय - दिग्दर्शकाने स्वत:च्या अंत:प्रेरणेला चिकटून रहात जी कलाकारांची निवड केली त्याला सार्थ ठरवत प्रत्येक कलाकाराने स्वत:च्या वाट्याला आलेल्या व्यक्तिरेखेला पूर्ण न्याय देणारा अभिनयाविष्कार केला.

संजीवकुमार - शोले ही मूळात ठाकूर बलदेवसिंगची सूडकथा. पोलीस अधिकाऱ्याचा करारीपणा, धाडसी वृत्ती, खानदानी ठाकूरपण, प्रेमळ कुटुंबवत्सल असा कुटुंबप्रमुख, जवळपास पूर्ण कुटुंबाच्या हत्येमुळे व स्वत:वर लादल्या गेलेल्या अपंगत्वामुळे शोकाकुल होऊनही प्रतिशोधाच्या आगीने पेटलेला ठाकूर संजीवकुमारमधील समर्थ अभिनेत्याने अप्रतिम साकार केलाय. दोनच उदाहरणं देतो. 
जयच्या मृत्यूच्या वेळी अभागी राधा आपल्या सासऱ्याच्या - ठाकूरच्या छातीवर डोकं टेकवून हमसून रडत असते तेव्हा तिचं सांत्वन करायला, धीर द्यायला, पाठीवरून हात फिरवायची जी एक नैसर्गिक प्रतिक्रिया आहे, ती व्यक्त करण्यातील असमर्थता, त्यामुळे होणारी एका क्षणातील असंख्य भावनांची आंदोलनं व क्षणात स्वत:च्या त्या दु:खावर मात करत सूनेला दिलासा देण्यासाठी निश्चय करत तिच्या माथ्यावर हलकेच ओठ टेकवत तिचं सांत्वन करण्याचा धीरोदात्तपणा ह्या सगळ्या भावना काही सेकंदात ठाकूरच्या चेहेऱ्यावर तरळून जातात. दुसरं, क्लायमॅक्सला गब्बरचे हात नालबंद चढावांच्या खाली चिरडताना जी सूडाची आग, सूड पूर्ण करतानाचं एक समाधान आणि त्यासाठी कराव्या लागलेल्या प्रदीर्घ प्रतिक्षेमुळे जे भावनिक घाव मनावर झालेत त्यातून अधिक प्रज्वलित होणारी, जवळपास शहाणपण सोडून वेडाकडे झुकणारी अशी ती सूडभावना संजीवनी फक्त चेहरा, डोळे व पायापुरती मर्यादित असलेल्या देहबोलीतून अफाटपणे साकारली आहे. त्यातही पहा, शेवटच्या सीनमधले त्याचे विस्फारलेले डोळे आणि आधी गब्बर त्याचे हात कापतो त्या सीनच्या वेळचे; आपले हात कापले जाणार ह्या जाणीवेतून विस्फारले गेलेले डोळे ह्यातही महदंतर आहे. कलाकाराची ताकद इथे जाणवते.

धर्मेंद्र - एरवी आपल्या अभिनयापेक्षा आपल्या देखण्या मर्दानी सौंदर्यासाठी प्रसिद्ध असलेल्या धरमेंद्रने ज्या काही मोजक्या चित्रपटातून आपल्या  अभिनयाची चुणूक दाखवली आहे त्यात सत्यकाम, जीवनमृत्यू ह्याबरोबरच शोलेचं ही नाव घेता येइल. गुन्हेगारीच्या शाळेतून जीवनाचं शिक्षण घेतलेला, बेधडक वृत्तीचा आणि जिगरी दोस्त जयच्या अप्रत्यक्ष अंकुशाखाली चांगल्या वाईटाची पारख करणारा एक गुंड धर्मेंद्रने सुरेख उभा केलाय. गंभीर प्रसंगांपेक्षा दारू पिऊन पाण्याच्या टाकीवर चढून तमाशा केलेल्या विनोदी प्रसंगात त्याच्यातील अभिनेता अधिक सहज वावरतो. पण एकंदरीतच, वीरूची भूमिका तो समर्थपणे निभावतो.

अमिताभ - शतकांचा अभिनेता  - Millenium Star ही अमिताभची ओळख आत्ता आत्ताची. जंजीर आणि दीवार प्रदर्शित होऊन त्याच्या अभिनय सामर्थ्याचं नाणं खणखणीत वाजलेलं असलं तरी शोलेच्या वेळेस तो त्यामानाने नवोदितच होता. वीरूप्रमाणेच गुन्हेगारीच्या शाळेतून जीवनाचं शिक्षण घेतलेल्या जयकडे समतोल विचारशक्ती, चांगल्या वाईटाची जाण हे अधिक असतं. त्याची वृत्ती त्यामुळेच वीरूच्या विपरीत धीरगंभीर अशी आहे. त्याच्या व्यक्तिरेखेचं हे बेअरिंग त्याने संपूर्ण चित्रपट अप्रतिमपणे सांभाळलं आहे. वीरूसाठी मौसीकडे बसंतीला मागणी घालण्याचा सीन आणि शेवटचा मृत्यूचा सीन हे दोन सीन खरा अमिताभ आपल्याला दाखवतात.

हेमा मालिनी - अखंड बडबड करणारी बसंती हेमा मालिनीने सुरेख उभी केलेय. तिच्या व्यक्तिरेखेतून चित्रपटाच्या सतत दडपण ठेवणाऱ्या हाणामारीच्या प्रसंगांच्या गर्दीत व वेगात, एक ताजवा आणणारा झोका येतो. जय वीरू दोघाना ती पहिल्याने ठाकूरच्या हवेलीवर नेते त्या, आमराईतील कैऱ्या पाडायच्या आणि शंकराच्या मूर्तीसमोरचा अशा विविध प्रसंगात हेमा मजा आणते.

जया - हेमाच्या बसंतीच्या एकदम विरुद्ध टोकाची व्यक्तिरेखा जयाने साकारलेल्या राधाची. जवळपास संपूर्ण चित्रपटभर विधवेच्या अतिशय कमी संवाद असलेली राधा, पूर्वायुष्यात जीवनाने किती रसरसलेली असते ते त्या होळीच्या वेळच्या एका दृष्यात दाखवताना राधाच्या जीवनातला विरोधाभास आणि शोकांतिका जया प्रेक्षकांपर्यंत पोचवते.

अमजद खान - गब्बरसिंगची एकमेव भूमिका करून जरी अमजद खान थांबला असता तरी त्याचं नाव आज आहे तसंच अजरामर झालं असतं. "अरे ओ सांभा" आणि "कितने आदमी थे?" ने लोकप्रियतेचे जे उच्चांक गाठले ते अजूनपर्यंत कोणत्याही चित्रपटाच्या संवादाना तर सोडाच; गाण्यांनाही गाठता आलेले नाहीत,असं म्हटलं तर वावगं ठरू नये. होळीच्या दिवशी गावात येऊन गाववाल्याना दम देणारा गब्बर; ठाकूरला बघून जे विकृत हसतो की तुझे तर हात कापून फेकलेत मी; तू काय माझं उखडणार, ते एका विकृत हास्यातून दाखवून अमजदखानने दिग्दर्शकाने आपल्यावर ठेवलेला विश्वास सार्थ ठरवला. बाकी "कितने आदमी थे?" वाला सीन हा हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वश्रेष्ठ सीन्स पैकी एक आहे ह्यात दुमत नसावं. 

सहकलाकार - ह्याशिवाय; जेलरच्या भूमिकेत विकास आनंद, सूरमा भोपाली बनलेला जगदीप, असरानीचा अंग्रेजोंके जमानेका जेलर, केष्टोचा हरीराम नाईक, सत्येन कप्पूचा रामलाल, इफ्तिकारचा नर्मलाल,  सचिनचा अहमद, ए. के. हनगला चा इमामसाहब, विजू खोटेचा कालिया आणि मॅकमोहनचा सांभा - व्यक्तिरेखेची लांबी व तोंडचे संवाद आणि वाट्याला आलेले सीन्स, ह्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवत प्रत्येक कलाकाराने मिळालेल्या भूमिकेला यथार्थ न्याय दिला.

संगीत - शोले सारख्या मारधाडीच्या चित्रपटात खरं तर संगीताला दुय्यम महत्वच मिळायचं. पण चित्रपटाच्या वेगाचा व ताणतणाव ह्यांचा तोल सांभाळताना रमेश सिप्पी ने अचूक जागी पेरलेल्या गाण्यांचा सुरेख उपयोग करून घेतला आहे. त्यासाठी, संगीताची जबाबदारी आर डी च्या समर्थ खांद्यांवर सोपवून तो मोकळा झाला आणि; प्रत्येक गाण्याच्या सिच्युएशन व मूडला साजेसं संगीत देत आर डी ने ती जबाबदारी अप्रतिमरित्या पार पाडली. मोजून पाच गाणी. पण दोस्तीवरची गाणी म्हटलं की ये दोसती हम नही तोडेंगे शिवाय यादी पूर्ण होत नाही. होळीची गाणी म्हटली की होली के दिन दिल खिल जाते हैं हवच हवं. आणि मेहबूबा मेहबूबा चा हेलनचा कॅबरे आजही थिरकायला लावणारा. 

पार्श्वसंगीत - शोलेचं पार्श्वसंगीत म्हटलं की ह्या पाच  गोष्टींचा उल्लेख केलाच पाहिजे. 
पहिली धून - पडद्यावर गब्बर येतानाची धून देताना तो ध्वनीपरिणाम मिळवायला आर डी नी काय आणि कसं वापरलं हे आज सर्वाना माहिती आहे. गब्बरचा विक्षिप्त व सणकी क्रूरपणा, विकृतपणा, दहशत हे सगळं त्या एका ट्यूनमधून साकार केलय आर डी ने.  स्वत: अमजद खानने एका मुलाखतीत 
म्हटल्याप्रमाणे गब्बरच्या *"गब्बर"* म्हणून प्रसिद्ध होण्यात त्या ट्यूनचाही मोठा वाटा आहे. 
दूसरी धून - एकदम वेगळ्या मूडची. दिवस संपून रात्र उतरत असताना व्हरांड्यात माऊथ ऑर्गन वाजवत बसलेला जय आणि एक एक दिवा विझवत आपल्या खोलीकडे जाणारी राधा. दोघेही आपापल्या आयुष्यात एकाकी. ते एकाकीपणच दोघांच्यात एक अदृश्य नाजूक धागा विणत असतं. त्या वेळेचा तो प्रकाश नैसर्गिक आहे. तो प्रकाशपरिणाम मिळवायला रमेश सिप्पीने म्हणे तब्बल दोन वर्षं वाट बघितली. उदास तरीही कुठेतरी थोडीफार आशा असल्यासारखा तो प्रकाश, माऊथ ऑर्गन वाजवणारा जय, दिवे विझवत जाणारी राधा - आणि जोडीला आर डी ची ती माऊथ ऑर्गनची ती अद्वितीय धून. मनावर कोरलं जाणारं एक अद्भुत जादूई दृष्य. 
तिसरं उदाहरण म्हणजे डाकू हेमा मालिनीचा पाठलाग करतात तेव्हा पार्श्वभूमीला आर डी ने वापरलेला पंडीत सामता प्रसादांचा तबला. त्या पाठलाग दृष्यातील सर्व थरार, उत्कंठा, नाट्य त्या तबल्याच्या तुकड्यातून आपल्यापर्यंत पोहोचतं. 
 चौथं उदाहरण - राधा व नोकर रामलाल सोडून बाकी पूर्ण ठाकूर कुटुंब मारलं जातं त्यावेळी ठाकूर बलदेव घरी येतो त्या संपूर्ण प्रसंगातील पार्श्वसंगीत. त्या प्रसंगातील भयानकता, क्रौर्य, कारुण्य - सगळं सगळं त्या अंगावर येणाऱ्या पार्श्वसंगीतामुळे अधिक परिणामकारकपणे जाणवतं.
पाचवं उदाहरण - शोले ची शीर्षक धून. आजही ही धून कानावर पडली की संपूर्ण शोले डोळ्यांसमोर उभा रहातो.

संकलन अर्थात एडीटींग - फिल्मफेअरच्या एकूण ९ नामांकनांपैकी फक्त एकातच शोले ला फिल्मफेअर पुरस्कार मिळाला - संकलनासाठी. नुकत्याच व्हॉट्सॅपवर व्हायरल झालेल्या किरण मानेंच्या पोस्टप्रमाणे माधवराव शिंदे ह्यांनी जवळपास ३ लाख फूट लांबीच्या फिल्ममधील प्रत्येक सीन पाहून संकलन केलं. त्यातही सेंसॉर बोर्डने बदल सुचवल्यावर ते बदल त्यात समाविष्ट केले. It really must have been a herculean task, ably shouldered by माधवराव शिंदे. 

दिग्दर्शन - चित्रपट काय; नाटक काय - ही दिग्दर्शकाची माध्यमं म्हणून ओळखली जातात. शोलेच्या अभूतपूर्व यशामागे दिग्दर्शक रमेश सिप्प्पीचा अर्थातच सिंहाचा वाटा आहे. अभिनेत्यांच्या निवडीपासून ते चित्रपटाच्या कहाणीत व्यक्तिरेखांच्या प्रवासापर्यंत, तो प्रवास दाखवणाऱ्या लोकप्रिय व प्रसिद्ध आणि अप्रसिद्ध दृष्यांपर्यंत - सगळीकडे सिप्पीची जादू जाणवत रहाते.

जय आणि वीरू पहिल्यांदी रामगढला येतात तेव्हा घडणारं रामगढचं दर्शन आणि फ्रेममधून दूर जाणाऱ्या टांग्याबरोबर बसंतीच्या बडबडीचा कमी होत जाणारा आवाज, टांगा ठाकूरच्या हवेली जवळ येतो तेव्हा फ्रेममध्ये कॅमेऱ्याकडे टांगा येताना बसंतीचा मोठा होत जाणारा आवाज.

कालिया व इतर दोन डाकू रामगढमध्ये येतात त्याच्या आधी एखाद मिनिटासाठी दाखवलेली  खेडेगावातील दैनंदिन जीवनाची झलक - लोहार, पिंजारी, पाथरवट, सुतार, धुणं धुणाऱ्या स्त्रिया - किती बारकाईने संपूर्ण खेडं रमेश सिप्पीने उभं केलय.

फाईट सिक्वेन्सची हाताळणी ही शोलेमधली फार महत्वाची बाब आहे. त्यात अर्थातच fight choreographer चा सिंहाचा वाटा असला तरी दिग्दर्शक म्हणून रमेश सिप्पीच्या हाताळणीचाही तितकाच महत्वाचा वाटा आहे. धावत्या गाडीतील सुरूवातीचा फाईट सिक्वेन्स, होळीचा फाईट सिक्वेन्स, ठाकूर गब्बरला पकडतो तो पाठलागाचा सिक्वेन्स, हेमा मालिनीचा पाठलाग होतो तो सिक्वेन्स - सगळे सीन्स फाईट सिक्वेन्स कसा असावा ह्याचे; आज तंत्रज्ञान इतकं आधुनिक होऊनदेखील, आजच्या सिनेनिर्मितीदाठी देखील वस्तुपाठ आहेत.

जय आणि वीरूची दोस्ती दाखवायला ये दोसती गाणं आहे. पण त्याही पेक्षा प्रत्येक मारामारीच्या प्रसंगात ते ज्या प्रकारे शब्दही न बोलता एकमेकांना पूरक हालचाली करतात, कव्हर देतात त्यावरून त्यांची इतक्या वर्षांची गहरी दोस्ती व साथ दिसते. 

बघा - धावत्या गाडीतील पहिली फाईट - वीरू इंजिनकडे जातो तर जय गार्डसाईडचा एंड सांभाळतो ठाकूरबरोबर. त्यातही, शेवटी परत गार्डच्या डब्याकडे येणाऱ्या वीरू समोर चाकू घेऊन आलेल्या डाकूसमोर त्याचे रीफ्लेक्सेस आणि कोणाच्या तरी उडीचा आवाज ऐकून उताणं झोपून छतावरच्या डाकूला गोळी घालणारा जय.

जय वीरूची परीक्षा घ्यायला ठाकूर स्वत:च्याच माणसांकडून त्यांच्यावर अनपेक्षित हल्ला करवतो तेव्हाच्या फाईटमधल्या दोघांच्या सुरूवातीच्या तीन ते चार मूव्ह्ज बघा - so identical & well timed.

कालिया व दोन डाकूना पाणी पाजताना दोघांनी घेतलेल्या पोझिशन्स.

होळीच्या फाईटच्या वेळी गोल खेळण्यातून आतून बाहेरच्या डाकूना मारणारा जय आणि झोपडीआड लपून त्याला कव्हर करणारा वीरू. जय ने गब्बरच्या डोळ्यात रंग फेकल्यावर ताबडतोब त्याला पूरक हालचाल करणारा वीरू आणि ती फाईट संपायला येताना दोघानी घेतलेल्या पोझिशन्स. 

मला तरी जय वीरूची दोस्ती गाण्यापेक्षा जास्त ह्या गोष्टींमधून जाणवते.

भावनिक वा कौटुंबिक प्रसंगात देखील रमेश सिप्पीमधला दिग्दर्शक जाणवत रहातो. गोळी लागून जखमी झालेल्या जयला येताना पाहून सर्वकाही विसरून धावणारी राधा, सासऱ्याला खाली उभा बघून जागीच थांबते तो सीन आठवा. जया आणि संजीव दोघांनी कमाल केलेय. किंवा इंटर्व्हलच्या आधी ठाकूर आपण बंदूक का उचलली नाही ते सांगतो आणि त्याच्या खांद्यावरची शाल खाली पडते. जय आणि वीरूकडे तिरस्काराने कटाक्ष टाकत राधा पुढे होऊन ती शाल परत ठाकूरच्या खांद्यावर टाकून आपली घरंदाज  सूनेची जबाबदारी अबोलपणे पार पाडत खूपकाही बोलून जाते. ह्या सर्व प्रसंगात जयाची एक अभिनेत्री म्हणून ताकद समजते आणि रमेश सिप्पी मधला दिग्दर्शक देखील दिसून येतो.

सत्येन कप्पूचा रामलाल बघा. सुरूवातीचा "अच्छा घर है! काफी बडा है! और कौन कौन रहता है यहाँपे ?" ह्या जयच्या प्रश्नाला तिऱ्हाईत माणसाला झटकावं तसा "चाबी" असं तुटक उत्तर देऊन तोडून टाकणारा रामलाल नंतर स्वत:च "इसे देखता हूँ तो मुझे हमेशा वही याद आता हैं जब मैं ठाकूरके साथ इसके गाव गया था" म्हणत राधाची सगळी कहाणी सांगून म्हणतो "और अब देखो तो सचमें कैसी बेरंग हो गयी हैं इसकी दुनिया" असं म्हणत जय ला आपल्या माणसात जमा करतो.

ह्या सर्व हाणामारीच्या वा भावनिक प्रसंगांच्या मध्ये हुशारीने पेरलेले, प्रेक्षकांना थोडं relax करणारे विनोदी सीन्स - जगदीपच्या सूरमा भोपालीचे, असरानीच्या अंग्रेजोंके जमाने वाल्या जेलरच्या जेलमधले, धरम व अमित चे वर उल्लेखलेले. 

कितने आदमी थे च्या जोडीने बसलेले "अरे ओ सांभा" , "लोहा लोहे को काटता है", सारखे इतर लोकप्रिय आणि "समाज और बिरादरी इन्सान को अकेलेपनसे बचानेके लिए बनाए गये है; उसे अकेला रखनेके लिए नहीं!" सारखे अर्थपूर्ण संवाद.

ह्या व अशा इतर असंख्य गोष्टीतून रमेश सिप्पीची चित्रपटावरची पकड जाणवत रहाते. यशस्वी स्टार, प्रसिद्ध कलाकार, नवोदित कलाकार, अनेक सहकलाकार ह्या सर्वांचं नियंत्रण करत जवळपास साडेतीन तासाच्या ह्या चित्रपटाचं शिवधनुष्य रमेश सिप्पी लीलया पेलतो. कोणाही एकाच कलाकाराला अधिक महत्वाचे वा भाव खायला मिळणारे सीन्स हेतूपुरस्सर न देता तो शोले हे एक टीमवर्क बनवतो. इतकं की गृप सीन्स मध्ये तोंडी जेमतेम एकेक संवाद असलेले शंकर, काशीराम सारखे व नाव नसलेले गावकरीसुद्धा स्मरणात राहतात. गब्बरची व्यक्तिरेखा तर सोडाच. पण आपल्या तोंडी फक्त एक संवाद व आपला कट झालेला सांभाचा  रोल ह्यामुळे चिडलेल्या मॅकमोहनचा  - तू चिंता करू नकोस. तुझ्या कॅरेक्टरला सगळे ओळखतील हे चित्रपट तयार होतानाच छातीठोकपणे सांगणाऱ्या रमेश सिप्पीने असाच दिलासा नव्हता दिला मॅकमोहनला. त्याला त्याच्या नजरेसमोर संपूर्ण शोले दिसत होता - तितकाच स्पष्ट जितका बंगरूळपासून पन्नास किलोमीटर वरचा रामगढचा सेट. ह्याला दिग्दर्शक म्हणतात.

कथा, पटकथा, कलाकारांची निवड, अभिनय, संगीत, पार्श्वसंगीत, छायाचित्रण, फाईट कोरीओग्राफी, संकलन - अर्थात एडीटींग आणि दिग्दर्शन - ह्या प्रत्येक क्षेत्रातील प्रत्येकाच्या अद्वितीय कामगिरीशिवाय एक अजून महत्वाची गोष्ट - शोलेच्या निर्मितीची वेळ जमून आली होती. सगळ्यानी घेतलेल्या प्रचंड मेहनतीला जोड मिळाली होती कोणत्या तरी अनाम दैवी उर्जेची  ज्यामुळे शोले "शोले" बनला.

आजही जर थिएटरला लागला कुठे तर माझी तयारी आहे - सत्तावीस, अठ्ठावीस .... आणि परत परत बघत रहायची - शोले.

----- मनीष मोहिले 

Saturday, November 18, 2023

हर शिखर तिरंगा - भारतीय गिर्यारोहणाचा नवीन मानांक



दिनांक २ ऑक्टोबर २०२३. भारतीय गिर्यारोहक आणि भारतीय गिर्यारोहण क्षेत्र यांच्यासाठी हा दिवस एक महत्त्वाचं लक्ष्य पूर्ण करणारा दिवस म्हणून अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण १६ ऑक्टोबर २०२२ रोजी सुरू झालेली एक अभिनव गिर्यारोहण मोहीम, जवळपास एक वर्षानंतर २ ऑक्टोबर २०२३ रोजी यशस्वीरित्या पूर्ण झाली. भारतीय लष्कराचे कर्नल रणवीर सिंग जमवाल ह्यांच्या मार्गदर्शन v नेतृत्वाखाली यशस्वीरित्या पार पाडल्या गेलेल्या ह्या अभिनव गिर्यारोहण मोहिमेचे नाव आहे हर शिखर तिरंगा.

काय आहे ही हर शिखर तिरंगा मोहीम ? तर भारताच्या सर्व म्हणजे २८ राज्यातील प्रत्येक राज्यात जे सर्वोच्च शिखर आहे ते शिखर पादाक्रांत करण्याचे उद्दीष्ट असलेली ही मोहीम. ज्याप्रमाणे प्रत्येक खंडातील सर्वोच्च शिखर पादाक्रांत करणे हा आंतरराष्ट्रीय गिर्यारोहण क्षेत्रातील एक आत्यंतिक महत्त्वाचा मानांक आहे त्याप्रमाणे भारतीय गिर्यारोहण क्षेत्रात हा एक समांतर मानांक निर्माण झाला आहे आणि हा मानांक निर्माण व स्थापित करण्याचे श्रेय जाते कर्नल रणवीर सिंग जमवाल ह्यांच्याकडे. अरुणाचल प्रदेश मधील दिरांग येथे स्थित असलेल्या National Institute of Mountaineering and Adventure Sports ह्या संस्थेच्या संचालक पदी असलेले कर्नल रणवीर हे स्वतः एक प्रथितयश गिर्यारोहक आहेत ज्यांनी सातही खंडातील सर्वोच्च शिखरे तर पादाक्रांत केलेली आहेतच. शिवाय जगातील सर्वोच्च शिखर माऊंट एव्हरेस्ट तीन वेळा सर केलेले आहे.
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त काहीतरी विशेष योगदान दिले पाहिजे ह्या विचाराच्या मंथनातून संपूर्ण भारत भरातील सर्व म्हणजे २८ राज्यातील प्रत्येक राज्याचे सर्वोच्च शिखर सर करण्याची एक जंगी मोहीम आखायाची हा अभिनव प्रकल्प जन्मास आला आणि कर्नल रणवीर सिंग ह्यांच्या अथक प्रयत्नांनी तो सिद्धीस देखील गेला.
भारतीय पर्यावरण आणि भूगोल ह्यातील अतिऊंच प्रदेशातील भौगोलिक वैविध्य जगापुढे आणणे, गिर्यारोहणासारख्या साहसी खेळाला आणि पर्यावरण संरक्षण व संवर्धन ह्यास प्रोत्साहन देणे आणि भारतीय तिरंग्याला भारताच्या प्रत्येक राज्यातील सर्वोच्च शिखरांवर फडकावणे ही या मोहीम प्रकल्पामागील काही प्रमुख उद्दीष्टे.
ह्या मोहिमेसाठी कर्नल जमवाल ह्यांनी टीम बनवली. प्रत्यक्षात मोहिमेत सहभागी होणाऱ्या सदस्यां शिवाय पडद्यामागे काम करणारे सदस्यही तितकेच; किंबहुना अधिक महत्त्वाचे होते कारण त्यांच्याकडे संपूर्ण logistics सांभाळणं हे काम होतं. त्यात मोहिमेचा route ठरवणे अर्थात कुठून सुरुवात करून कुठे शेवट करायचा (कारण हिमालयातील ऊंच शिखरे, वर्षाच्या काही विशिष्ट कालावधीतच सर केली जाऊ शकली असती), प्रत्येक ठिकाणचे मार्ग, रेशन (शिधा), स्थानिक गाईड्स, स्थानिक गिर्यारोहण क्लब बरोबर समन्वय, हवामान माहिती, अशी खूप कामे समाविष्ट होती.
हा सगळा आराखडा नक्की करत १६ ऑक्टोबर २०२२ ला अरुणाचल प्रदेशमधील गोरीचेन (६८५८ मी.) सर करून मोहिमेचा नारळ फोडण्यात आला आणि २ ऑक्टोबर २०२३ ला सिक्कीम मधील जोंगसोंग (७४६२ मी.) (Kanchenjunga is closed for climbing) सर करून इतिश्री करण्यात आली. हे शिवधनुष्य उचलणं अजिबात सोपं नव्हतं.
संपूर्ण भारतभर जवळपास ३०-३१००० कि. मी. चा प्रवास करावा लागला. कित्येक ठिकाणी जाण्याचा नक्की मार्ग माहिती नव्हता तर कित्येक ठिकाणी भाषेच्या अडचणीमुळे स्थानिक लोकांची मदत मिळण्यास देखील अडचण येत होती. काही राज्यातील नक्षलवादी प्रभावामुळे जीवाशी गाठ होती. मात्र ह्या सर्वांवर मात करत Core team ने कर्नल जमवाल ह्यांच्या नेतृत्वाखाली हा मोहीम प्रकल्प यशस्वीपणे पार पाडला.
वरील अडचणींशिवाय प्रत्यक्ष गिर्यारोहण करताना देखील अनेक अडचणी आल्या. उदा. हिमाचल प्रदेशातील रियो पूर्गील (Reo Purgyil - ६८१६ मी.) चे शेवटचे ४०० मी. अत्यंत कठीण होते कारण अतीऊंच व अतिशीत वातावरणात प्रस्तरारोहण अर्थात Rock Climbing करावे लागले. नंदादेवी off limits असल्याने (being World Heritage Sight and Biosphere reserve) उत्तराखंड मधील दुसऱ्या क्रमांकाचे कामेत (७७५६ मी.) सर करताना बर्फ आणि खडकाळ जागी चाल (traverses), बर्फ आणि खडक असे मिश्र प्रस्तरारोहण, निसटणारे खडक अशा अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले. गोव्यातील सोंसोगोर (१०२६ मी.) च्या वेळेस जवळपास १२ तासांच्या संततधार पावसाने मार्गक्रमणा कठीण बनवली तर सर्वात छोट्या अशा (८७४ मी.) सोमेश्वर फोर्ट ह्या बिहार मधील शिखरावर जाताना अतिशय घनदाट जंगल आणि हिंस्त्र श्वापदे ह्या अडचणीवर मात करावी लागली. सगळ्यात शेवटी जोंगसोंग सर करताना the window for clear climate was very small. पण हिंमत करून रात्री दहा ते सकाळी दहा अशा बारा तासांच्या summit push मध्ये त्यांनी यशस्वी चढाई केली आणि दुसऱ्याच दिवशी म्हणजे ३ ऑक्टोबर ला सिक्कीम मध्ये नुकत्याच आलेल्या flash floods मध्ये अडकण्याची शक्यता त्यांना भेडसावली. मात्र चांगल्या गिर्यारोहकांची तीक्ष्ण संवेदना आणि समयोचित निर्णय व कृती ह्यामुळे ते बचावले.
अशा पद्धतीने मोहीम यशस्वी रित्या पार पाडत कर्नल रणवीर आणि त्यांच्या टीम ने भारतीय गिर्यारोहणाचा एक नवीन आणि अभिनव मानांक स्थापित केला. ह्याचा काय फायदा होईल ? तर भारतीय गिर्यारोहकांना देशातेल्या देशात अतीऊंच भागात, विविध प्रकारच्या भूस्तर प्रदेशात गिर्यारोहण करण्यास संधी मिळून आपले तंत्र अधिक चांगले बनवता येईल. एक मोठी गिर्यारोहण मोहीम कशी आखावी त्याचे प्रशिक्षण मिळेल. ह्या सर्वांचा आंतरराष्ट्रीय पातळीवर गिर्यारोहण करताना फायदाच होईल. शिवाय स्थानिक पातळीवर ह्या धाडशी खेळात तरुणांना रस निर्माण होईल. आज कित्येक शिखरांना योग्य नाव आणि त्यामुळे ओळख नाही. (उदा. पंजाबमधील नैनादेवी पर्वतरांगांमध्ये असलेले शिखर) ती शिखरे नावासहीत भारतीय गिर्यारोहण नकाशावर अस्तित्वात येतील. हे सारं शक्य व्हावं म्हणून कर्नल जमवाल ह्या मोहिमेतील आपल्या अनुभवांना शब्दबद्ध करून पुस्तक रूपाने जगासमोर घेऊन येणार आहेत.
भारतीय गिर्यारोहण क्षेत्रात कर्नल रणवीर सिंग जमवाल ह्यांच्या जिद्द आणि प्रयत्नांनी एक नवीन अध्याय सुरू झालेला आहे. त्या अध्यायातून पुढे महाकाव्य लिहिले जाईल आणि ज्या तिरंग्याच्या माना करीता त्यांनी हे शिवधनुष्य उचलले, तो तिरंगा अधिकाधिक मानाने अधिक ऊंच फडकत राहील अशी आशा करूया.

---- मनीष मोहिले
माहिती स्त्रोत - आंतरजाल.

छायाचित्र स्त्रोत - कर्नल रणवीर सिंग जमवाल ह्यांच्या Instagram account वरून 



Tuesday, November 14, 2023

सृजनशीलता, अष्टोत्तरशत रामायण, स्वत्व आणि स्वाभिमान

 

टीप : या लेखातील अष्टोत्तर शत रामायणाच्या संपूर्ण माहितीचा स्त्रोत आहे आंतर जालावरील ऐसी अक्षरे नामक संकेतस्थळावरील श्री. अरविंद कोल्हटकर ह्यांचा अतिशय अभ्यासपूर्ण लेख. त्याशिवायचे इतर विचार या लेखाच्या लेखकाचे आहेत.

काही दिवसांपूर्वी काहीतरी वाचत असताना, creativity अर्थात सृजनशीलता ह्याची व्याख्या वाचनात आली. ती व्याख्या होती Creativity is the bridge connecting imagination and reality. कल्पनाशक्ती आणि वास्तव ह्यांना जोडते ती सृजनशीलता. किती यथार्थ व्याख्या आहे. निव्वळ कल्पनेच्या भराऱ्या उपयोगी नाहीत. वास्तवाशी जुळलेली नाळ तुटता उपयोगी नाही. ती तशी जुळलेलीच हवी. नाहीतर कल्पना कल्पनाच राहते. ती कल्पना सत्यात उतरवायची म्हणजे असा काही आविष्कार हवा ज्याकडे पहाता हे लगेच लक्षात येईल की अमुक एका कल्पनेचा हा मूर्तीमंत (साक्षात ह्या अर्थी) आविष्कार आहे. कल्पनाशक्तीचा असा आविष्कार जो जन सामान्यांपर्यंत सहज पोहोचेल. किंवा अमुक एक आधीच अस्तित्वात असलेले किंवा माहिती असलेले ज्ञान एका वेगळ्या आविष्कारामधून जगापुढे आणणे ही देखील एक प्रकारची सृजनशीलता म्हणावी लागेल. उदा. त्याच सात सूरांमधून प्रत्येक संगीत निर्देशक, गायक, वादक वेगवेगळ्या चाली, सुरावटी, आलाप, ताना घेऊ शकतो. किंवा एकाच वृत्तामध्ये भिन्न कवी भिन्न काव्यरचना करू शकतात आणि त्या सूरांशी, त्या वृत्ताशी, रचनाबंधाशी त्यांचं नातं हे त्यांचं वास्तवाशी असलेलं नातं.
ह्यामुळेच creativity किंवा सृजनशीलता हा शब्द कलाक्षेत्रात मग ते साहित्य, काव्य, शिल्प, चित्र, संगीत ह्यापैकी कोणतेही कला क्षेत्र असेल, त्यात काम करणाऱ्याबद्दल वापरला जातो. आता कोणत्याही कलेमध्ये कल्पनाशक्ती असणं ही अत्यावश्यक बाब आहे. पण वर बघितल्या प्रमाणे त्याचा वास्तवाशी संबंध बघणं देखील आवश्यक आहे. कलाकाराची विशिष्ट शैली हा त्याचा दृष्याविष्कार. त्या त्या कलाक्षेत्रातील अभ्यासू व्यक्तींना किंवा त्यात रस असणाऱ्या जाणकार रसिकांना ती विशिष्ट शैली अथवा ते बारकावे जाणवू शकतात, समजू शकतात. जिथे ती शैली, त्या शैलीत त्या कलाकाराने केलेल्या कलाविष्काराची ओळखच असते.
ह्याच ओघात इथे ह्या ठिकाणी मी सांगणार आहे साहित्यक्षेत्रात अफाट सृजनशीलतेचं परिमाण असलेली पण कदाचित फारशी प्रसिद्धी न मिळालेली अशी एक साहित्यकृती - अष्टोत्तर शत रामायण ह्याबद्दल.
काय आहे नक्की हे अष्टोत्तर शत रामायण ? नावावरूनच औत्सुक्य निर्माण करणारी ही कलाकृती म्हणजे काव्यरुपातील एकशे आठ रामायणे आहेत जी एकाच कवीने रचली आहेत. त्या अलौकिक प्रतिभावान कवीचं नाव आहे मोरेश्वर रामचंद्र पराडकर अर्थात मयूर पंडीत अर्थात मोरोपंत.
मला स्वतःला मोरोपंत हे त्यांच्या केकावली की ज्यातील एक कविता आम्हाला दहावीला होती त्या केकावली मुळे स्मरणात आहे आणि त्यातील एक द्वी पदी जी त्यातील छंदामुळे आजही लक्षात आहे -
कुरुकटकासी पहाता तो उत्तर बाळ फार गडबडला
स्वपरबळाबळ नेणूनी, बालिश बहु बायकात बडबडला
तर अशा ह्या मोरोपंतांच्या घराण्याचे प्रभू श्रीरामचंद्र हे आराध्य दैवत. तेव्हा ह्या आपल्या आराध्य दैवताची काव्यपूजा बांधण्याचा संकल्प मोरोपंतांनी केला आणि त्यासाठी एक अभिनव मार्ग चोखाळला. काव्यरचनेला व्याकरणाचे नियम, शब्दलालित्य, ह्यातून वेगवेगळ्या प्रकारे हाताळून लहान मोठ्या अशा एकशे आठ भिन्न रचनातून त्यांनी रामायण लिहिले. त्याच काव्य रचनांचा समूह म्हणजे हे अष्टोत्तर शत रामायण.

आता ह्यामध्ये सृजनशीलता ह्या शब्दाच्या व्याख्येप्रमाणे वास्तवाशी संबंध कसा आला ? तर मुळात रामायण महाभारत ही महाकाव्ये भारतीय संस्कृतीची अविभाज्य अशी पुरातन वास्तव ओळख आहे जिची प्रत्यक्ष प्रमाणे अयोध्येतील राम जन्मस्थान, पंचवटी (अर्थात नाशिक), रामसेतू, लंका, कुरुक्षेत्र, इंद्रप्रस्थ (अर्थात दिल्ली) अशा स्वरूपात उपलब्ध आहेत. तर अशा कालातीत महाकाव्यापैकी एक रामायण; ज्यातील अद्भुत कथेला एकशे आठ वेळा वेगवेगळ्या काव्यात सादर करायचं आणि ते करताना रचनेतील लालित्य, वैविध्य, प्रकृती भिन्नत्व जपायचं ह्यासाठी निश्चितपणे प्रतिभा हवी आणि त्याच बरोबर सृजनशीलता देखील.
काय वैशिष्ट्य आहेत किंवा काय प्रकृती भिन्नत्व आहे ह्या रचनांमध्ये. या पाहूया.
सदर रामायण काव्ये मुख्यत: तीन गटात मोडतात. पहिला ज्यात शाब्दिक रचना चातुर्य हे मुख्य लक्षण आहे. दुसरा गट ज्यात श्री राम जय राम जय जय राम हा त्रयोदशाक्षरी मंत्र वेगवेगळ्या प्रकारे गुंफून काव्यरचना केलेली आहे आणि तिसऱ्या गटात प्रसिद्ध आणि अप्रसिद्ध वृत्त आणि स्तोत्र यावर आधारित काव्य आहेत.
पहिला गट - शब्द रचना लालित्य
दिव्य रामायण - ह्यात गीती वृत्तात बांधणी केली आहे ज्यात द्वीपदी असून प्रत्येक पदा मध्ये सोळा अक्षरे आणि तीस मात्रा असा हिशोब वृत्त नियमानुसार बसवला आहे. प्रत्येक चरणात / ओळीत ११ वे आणि १३ वे अक्षर एका मात्रेचे तर बाकी सर्व दोन मात्रांची अशी मांडणी आहे.
सुख रामायण - ह्यात दिव्य रामायणाच्या उलट मात्रा हिशोब आहे. २८ अक्षरे एका मात्रेची तर २९ वे अक्षर दोन मात्रांचे असा ३० मात्रांचा हिशोब बसवलेला आहे.
कविप्रिय रामायण - ह्यात प्रत्येक चरणात एका अक्षराची पुनरावृत्ती पहिल्या, नवव्या आणि सोळाव्या स्थानी होते.
सौम्या रामायण - प्रत्येक चरणात ३२ मात्रा, तसेच प्रथम चरणात १६ गुरू तर द्वितीय चरणात ३२ लघु मात्रा आणि आठव्या चरणात यति असे शब्द रचना लालित्य साधलेले आहे.
निरोष्ठ रामायण - वास्तविक हा सगळा लेखन प्रपंच होण्यास कारणीभूत Instagram वरील एक reel ज्यात मी निरोष्ठ रामायण हा शब्द ऐकला आणि माझी उत्सुकता चाळवली गेली. त्याबाबत अधिक शोध करता मग ही सगळी माहिती मिळत गेली.
ह्या निरोष्ठ रामायणाचे वैशिष्ट्य हे की ह्यात कोणतेही ओष्ठ्य अक्षर नाही. मराठीत उच्चार आधारित ओष्ठ्य (ज्याचा उच्चार करण्यासाठी ओठ मिटावे लागतात, जसे प, फ , ब, भ, म); दंतव्य (ज्याचा उच्चार करताना जीभेचा स्पर्श वरील दातास होतो, जसे त, थ, द, ध, न); तालव्य (ज्याचा उच्चार करताना जीभेचा स्पर्श टाळ्यास होतो, जसे च, छ, ज, झ) आणि कंठ्य (ज्याचा उच्चार कंठातून होतो जसे क, ख, ग, घ) अशा वर्गात वर्ण किंवा अक्षरे विभागली जातात. आता रामायणात मुळात राम हा शब्द ओष्ठ्य असताना निरोष्ठ रामायण काव्य रचना करायची ह्या विचारातच किती सृजनशीलता आहे. त्यामुळे इथे दशरथकुमार इत्यादी सारखी रामाची इतर नावे वापरली गेली आहेत.
दाम रामायण - ह्यात प्रत्येक चरणातील शेवटची तीन अक्षरे पुढील चरणातील पहिली तीन अक्षरे म्हणून वापरली आहेत जेणे करून एक सूत्र, दोरा अर्थात दाम निर्माण होतो.
सन्नामगर्भ रामायण - ह्यातील प्रत्येक चरणात कोणी एक साधू, संत, भक्त, कवी, पुण्यश्लोक राजा अशा व्यक्तींची नावे गुंफलेली आहेत.
संदर्भ रामायण - १५२ अक्षरांचा एक संच ज्यात देव, संत, पूजनीय व्यक्ती ह्यांची नावे आहेत. ह्या संचातील प्रत्येक अक्षराने सुरूवात होणारी १५२ कडवी ह्यात आहेत.
मात्रा रामायण - मराठीत अ ते ज्ञ ह्या ४६ अक्षरांना मात्रा म्हणतात. त्यातील प्रत्येक मात्रेने सुरू होणारा एक चरण अशी काव्यरचना आहे ज्यात फक्त व, लृ, ञ, ङ, तर आणि ळ ह्या मात्रा नाहीत कारण त्याने सुरू होणारे शब्द नाहीत.
१० उमा रामायण - १२१ कडव्यांच्या या रामायणाची खासियत ही की प्रत्येक कडव्याच्या पहिल्या ओळीची सुरूवात ने तर दुसऱ्या ओळीची सुरूवात मा ने होते. अशा प्रकारे, प्रत्येक चरणात उमा हे नाव गुंफलेले आहे.
११ शिव रामायण - या काव्यरचनेत प्रत्येक चरणाच्या पहिल्या ओळीत एकदाच शि आणि दुसऱ्या ओळीत एकदाच योजलेला आहे. अशा प्रकारे, प्रत्येक चरणात शिव हे नाव गुंफलेले आहे.
१२ गंगा रामायण - या काव्यरचनेत ६३ पैकी प्रत्येक चरणाच्या पहिल्या ओळीत एकदाच गं आणि दुसऱ्या ओळीत एकदाच गा योजलेला आहे. अशा प्रकारे, प्रत्येक चरणात गंगा हे नाव गुंफलेले आहे.
१३ काशी रामायण - या काव्यरचनेत ५५ पैकी प्रत्येक चरणाच्या पहिल्या ओळीत एकदाच का आणि दुसऱ्या ओळीत एकदाच शी योजलेला आहे. अशा प्रकारे, प्रत्येक चरणात काशी हे नाव गुंफलेले आहे.
१४ प्रयाग रामायण - या काव्यरचनेत प्रत्येक चरणाच्या पहिल्या आणि दुसऱ्याओळीत मिळून एकदाच प्र, या आणि योजलेला आहे. अशा प्रकारे, प्रत्येक चरणात प्रयाग हे नाव गुंफलेले आहे.
१५ तीर्थ रामायण - या रामायणात प्रत्येक गीतेमध्ये एका पवित्र नदीचे नाव गुंफत ५९ गीती रचल्या आहेत.
१६ ऋषी रामायण - ८९ चरणांच्या ह्या रचनेत, प्रत्येक चरणात एका प्राचीन ऋषींचे नाव गुंफले आहे.
१७ राज रामायण - ८६ चरणांच्या ह्या रचनेत, प्रत्येक चरणात एका प्राचीन राजाचे नाव गुंफले आहे.
१८ परंतु रामायण - या रामायणात प्रत्येक गीती मध्ये परंतु हा शब्द वापरलेला आहे.

दुसरा गट - मंत्राधारीत रामायण
मंत्र रामायण - "श्री राम जय राम जय जय राम" ह्या त्रयोदशाक्षरी मंत्रातील प्रत्येक आद्याक्षराने, ह्यातील प्रत्येक श्लोकाची सुरूवात होते. अशा १३ गीतींचा एक गट असून अशा ६ गटांचे बालकांड रचले आहे. त्रयोदशाक्षरी मंत्रातील प्रत्येक अक्षर द्वितीय स्थानी अशा १३ गितींचा दुसरा गट. अशा ९ गटांचे अयोध्याकांड, तर त्रयोदशाक्षरी मंत्रातील प्रत्येक अक्षर तृतीय स्थानी अशा १३ गितींचा तिसरा गट. अशा ८ गटांचे अरण्यकांड अशी रचली आहेत. त्याचप्रमाणे गटांची संख्या कमी जास्त करत, किषकींधाकांड, सुंदरकांड व उत्तरकांड रचली आहेत.
बाल मंत्र रामायण - हे मंत्र रामायणाकरता लहान असल्याने ह्यास बाल मंत्र रामायण म्हणतात. ह्यात त्रयोदशाक्षरी मंत्र, प्रत्येक कांडात तीन वेळा फिरवला आहे.
३ व ४ सप्त मंत्र रामायणमंत्री रामायण - ह्यांची रचना मंत्र रामायणा सारखीच आहे. फक्त मंत्र प्रत्येक कांडात एकदाच फिरवला आहे; आणि ही अनुष्ठुभ छंदात आहेत.
मंत्रगर्भ रामायण - हे साकी वृत्तात असून मंत्र प्रत्येक कांडा मध्ये एकदाच फिरवला आहे आणि प्रत्येक कांडात १३ साक्या आहेत.
रम्य मंत्र रामायण - ह्याची रचना मंत्रगर्भ रामायणाप्रमाणेच असली तरी फरक हा की प्रत्येक कांडात १३ च श्लोक असले तरी वृत्ते वेगवेगळी आहेत.
मंत्रमय रामायण - ह्यातील २४ गीतींमध्ये त्रयोदशाक्षरी मंत्र प्रत्येक गीतीत पूर्णपणे गुंफलेला आहे.
त्रि:सप्त मंत्र रामायण - २१ श्लोक असलेले हे रामायण शार्दूलविक्रिडीत वृत्तात असून त्रयोदशाक्षरी मंत्र प्रत्येक श्लोकात पूर्णपणे गुंफलेला आहे.
नामांक रामायण - पहिल्या चरणाचे पहिले अक्षर रा आणि दुसऱ्या चरणाचे पहिले अक्षर अशी १३० कडवी आहेत.
१० शिव रामायण - शिवाष्टरोत्तरशत नामावली नामक श्री शंकराच्या १०८ नावांचा उल्लेख असलेले एक स्तोत्र आहे. त्यातील प्रत्येक नाव एका श्लोकात असे १०८ आणि १०९ व्या श्लोकात याबद्दल माहिती असे या काव्य रचनेचे स्वरूप आहे.
११-२० - स्तोत्र रामायण - प्रथम ते दशम - या दहा रामायणात विष्णु सहस्त्रनाम गुंफलेले आहे. सहस्त्र नावांचे १०० नावांचे १० गट पाडून प्रत्येक रामायणात एका गटातील नावे योजलेली आहेत.


तिसरा गट - विविध वृत्ताधारीत रामायण - 

१) आद्यार्यारामायण. २) आर्यागीति. ३) दोहारामायण. दोहावृत्त. ४) घनाक्षररामायण. घनाक्षरी वृत्त. ५) विबुधप्रियरामायण. विबुधप्रिय (हरिनर्तन) छन्द. ६) सवायारामायण. मदिरा वृत्त. ७) अभंगरामायण. ८) मत्तमयूररामायण. मत्तमयूर वृत्त ९) पंचचामररामायण. पंचचामर वृत्त. १०) पुष्पिताग्रारामायण. पुष्पिताग्रा वृत्त. ११) श्रीप्रियरामायण. वैतालीय वृत्त. १२) रमणीयरामायण. सारंग वृत्त. १३) हररमणीयरामायण. तोटक वृत्त. १४) सुरामायण. भुजंगप्रयात वृत्त. १५) श्रीरामायण. शिखरिणी वृत्त. १६) विचित्ररामायण. जलोद्धतगति वृत्त. १७) सद्भक्तसर्वस्वरामायण. वसंततिलका वृत्त. १८) प्रहर्षिणीरामायण. प्रहर्षिणी वृत्त. १९) श्रीगुरुरामायण. विविध वृत्ते २०) रामायणपंचशती. ५०० साक्या. २१) अनुष्टुप् रामायण. अनुष्टुभ् छंद. २२) कन्यारत्न रामायण. स्रग्धरा वृत्त. २३) कल्याण रामायण. पज्झटिका वृत्त. २४) श्रवणामृत रामायण. नर्कुटक वृत्त. २५) वरद रामायण. प्रमिताक्षरा वृत्त. २६) रामायणकथासुधा रामायण. विद्युन्माला वृत्त २७) दोहासोरठा रामायण. २८) सद्रत्नरामायण. अश्वघाटी अथवा अमृतध्वनि छंद. २९) पृथ्वीरामायण. पृथ्वी वृत्त. ३०) स्रग्विणीरामायण. स्रग्विणी वृत्त. ३१) सद्वित्तरामायण. इंद्रवज्रा, उपेन्द्रवज्रा आणि उपजाति वृत्ते. ३२) रामायणपीयूष. मालिनी वृत्त. ३३) भावरामायण. मन्दाक्रान्ता वृत्त. ३४) सच्छ्राव्यरामायण. हरिणी वृत्त. ३५) एकश्लोकीरामायण. एकच श्लोक जलोद्धतगति वृत्तामध्ये.३६) गदघ्नरामायण. रथोद्धता वृत्त. ३७) सूरारामायण/सुरामायण. सूरावृत्त ३८) सत्स्वरामायण. शार्दूलविक्रीडित वृत्त. ३९) पूतरामायण. (अपूर्ण) शार्दूलविक्रीडित वृत्त ४०) तन्वीरामायण. तन्वी वृत्त. ४१) मंचरामायण. क्रौंचपदा वृत्त. ४२) मंजुरामायण. शुद्धकामदा वृत्त. ४३) दंडकरामायण. दंडक वृत्त. ४४) त्रुटितरामायण. अपूर्ण. अनेक वृत्ते. ४५) साररामायण. अपूर्ण अनेक वृत्ते. ४६) धन्यरामायण. अपूर्ण. प्रत्येक गीतीमध्ये ’धन्य’ हा शब्द कमीअधिक वेळा वापरला आहे.

काही अन्य.

१) सीतारामायण. सीतेच्या मुखातून सांगितलेले रामायण. विविध वृत्ते २) हनुमद्रामायण. हनुमान माता अंजनीला सांगत आहे असे रामायण. गीतिवृत्त. ३) श्रीरामचरितभरितश्रीरामचंद्रप्रार्थना ४) अद्भुत रामायण. ह्या गहाळ झालेल्या रामायणाच्या केवळ चार गीति उपलब्ध आहेत. त्यांमध्ये प्रत्येकीच्या दुसर्‍या चरणामध्ये ’अद्भुत’ ह्या शब्दाचा उपयोग केला आहे.

किती अफाट प्रतिभा, भाषेवरील प्रभुत्व आणि सृजनशीलता ही. इतक्या विविध प्रकारे भाषा लालित्य दर्शवीत एका महाकाव्याचे कथासूत्र केंद्रस्थानी ठेवत ते लोकांपर्यंत नेणे हा केवढा अचाट भगीरथ यत्न आहे. असा यत्न करणारा कवी आणि त्याने ज्या भाषेत हे अफाट कर्तृत्व गाजवले ती भाषा, दोघेही थोर.
दुर्दैवाची गोष्ट ही की आपल्या भाषेच्या, संस्कृतीच्या इतिहासात, अभ्यासात ह्या कशाचाही उल्लेख होताना दिसत नाही. आज संपूर्ण जगात शेक्सपिअर, वर्डस्वर्थ, टाॅलस्टाॅय आणि इतर अनेक परदेशी लेखकांच्या नावाचा डंका वाजत असतो. त्यांच्या महानतेबद्दल शंका नाही. परंतु, त्यांच्या तोडीचे किंवा त्याहीपेक्षा कांकणभर सरस साहित्यिक योगदान असलेल्या कवी / साहित्यिक याबद्दल जागतिक सोडाच पण आपल्या राष्ट्रीय/ स्थानिक/भाषिक पातळीवर देखील अनास्था असावी हा दैवदुर्विलास आहे आणि यात आपले व येणाऱ्या पिढ्यांचे नुकसान आहे.
माध्यमिक किंवा उच्च माध्यमिक शाळेतून कमीत कमी अशा कलाकृती बद्दल काही माहिती असावी आणि महाविद्यालयीन अभ्यासक्रमात साहित्य विषयात तरी ह्याचे अधिक परिशीलन व्हावे. पण दुर्दैवाने हे सर्व काळाच्या ओघात नजरेसमोर येणारच नाही अशा पद्धतीचे शिक्षण आपल्याला देण्यात येते. मुघलांच्या दहा पिढ्यांचा इतिहास शाळेत शिकवला जातो परंतु मराठ्यांचा छत्रपती शिवाजी महाराज ते दुसरा बाजीराव हा इतिहास किंवा छत्रसाल बुंदेला, महाराणा प्रताप ह्यांच्या पूर्वज / वंशजांचे इतिहास आपल्याला माहिती नाहीत.
आजही जगातील सात आश्चर्यात भारतातील ताजमहालच्या नावाचाच उल्लेख होतो. मात्र वेरुळचे कैलास लेणे जे एका अखंड डोंगराच्या माथ्या कडून पायथ्या पर्यंत खोदत नेले गेले, ज्याची निर्मिती १३५ वर्ष चालू होती म्हणजेच कमीत कमी आठ ते दहा पिढ्या जी निर्मिती चालू होती, ते खोदकाम, कोरीव काम, स्थापत्य, बांधकाम ह्याचे तंत्र, कौशल्य, ज्ञान हे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे अचूकपणे दिले गेले त्याबद्दल किती भारतीय राज्यात माहिती आहे ? भारतातील कित्येक मंदिरातील स्थापत्य इतके अलौकिक आहे, त्याच्या निर्मितीमध्ये खगोलशास्त्र, भूगोल, इतक्या परिणाम कारक रित्या वापरले गेले आहे आणि त्या काळात वापरले गेले आहे की जेव्हा समग्र पाश्चात्य विश्व प्रगतीच्या वाटेवर रांगत देखील नव्हते. सोमनाथ च्या मंदिराच्या आवारातील एका विशिष्ट स्थानापासून ते दक्षिण धृव्वापर्यंत जमीन नाही तर फक्त समुद्रच आहे आणि तशा अर्थाचा संस्कृत शिलालेख तिथे आहे. पण आम्ही मात्र गझनीच्या महम्मद ने ते सतरा वेळा लुटले हा पराभूत इतिहासच शिकत आलो. कोल्हापूरच्या अंबाबाईच्या मंदिरातील किरणोत्सव आता कायप्पामुळे सर्वांना माहिती झाला. त्यात शिक्षण पद्धतीचे योगदान शून्य. एका मंदिरात प्रत्येक हिंदू महिन्यासाठी एक असे बारा खांब असून त्या त्या महिन्यात फक्त त्या महिन्याच्या विशिष्ट खांबांवरच सूर्यकिरण पडतात. अशी कित्येक काही ना काही अद्भुत खासियत असलेली मंदिरे आहेत ज्यात शिल्पकला, खगोलशास्त्र, भूगोल, भूस्तरशास्त्र इत्यादींचा संगम घडवून अप्रतिम कलाकृती निर्माण केलेल्या आहेत की ज्यातून सृजनशीलता ओसंडून वाहताना दिसते. (आपल्या खर्डे मध्ये विनीत वर्तक ह्याने भारतातील अशा अद्भुत मंदिरे व त्यातील कला आणि विज्ञान ह्यांचा संगम ह्यावर एक अप्रतिम अभ्यासपूर्ण लेखमाला सादर केली होती).
मात्र, आजची पिढी ह्याबाबत पूर्णपणे अनभिज्ञ आहे आणि त्यांना ह्याबद्दल सांगण्याचा प्रयत्न केला तर उदासीनता समोर येते. त्यामुळे नाउमेद न होता सातत्याने याबद्दल त्यांना माहिती देत रहाणं गरजेचं आहे.
सर्वोच्च न्यायालयातील एक वकील श्री. जे साई दीपक ह्यांच्या एका रील मध्ये ते तृतीय पातळीच्या वसाहत वादाबद्दल बोलतात. ही अशी पातळी की जिथे वसाहतीकरण हे जित राष्ट्राच्या राजकीय आणि सैनिकी वसाहती करणापर्यंत सीमित न रहाता त्यांच्या शिक्षण पद्धती पर्यंत पोचते तिथे त्या जित राष्ट्रातील वर्तमान व भावी पिढ्यांना जेत्यांच्या नजरेतून शिक्षण दिले जाते जेणेकरून आपले ते निम्न दर्जाचे आणि जेत्यांचे ते उच्च अशी मानसिकता तयार केली जाते. त्यामुळे जित समाजाची संस्कृती, शिक्षण, परंपरा, हे सर्व हळूहळू पूर्णपणे अंधारात ढकलले जाते. हे वसाहतीकरण सर्वात धोकादायक आहे कारण त्यात स्वत्व, स्वाभिमान, स्वदेशाभिमान हे पूर्णपणे लयास जाते.
ते स्वत्व, तो स्वाभिमान, तो देशाभिमान जागृत व्हावा, आपली अलौकिक कर्तृत्वशाली व समृद्ध संस्कृती, परंपरा यांच्याबद्दल जन जागृती व्हावी ह्यासाठी कौटुंबिक पातळीवर देखील प्रयत्न आवश्यक आहेत जिथून ते अनुक्रमे स्थानिक शिक्षण, राष्ट्रीय आणि जागतिक पातळीवर पोचवता येईल.
दीपावलीच्या आजच्या शुभदिनी ही आशा करूया आणि आपापल्या कुटुंबात तरी त्या दिशेने प्रयत्न करुया.

---- मनीष मोहिले