Friday, November 13, 2015

थोडासा रुमानी हो जाये

थोडासा रुमानी हो जाये -  नावातच काव्यमयता असलेला हा चित्रपट, चित्रपट माध्यमातून पडद्यावर साकारलेली एक मूर्तिमंत कविता आहे.

रुमानी म्हणजे romantic - प्रणयरम्य. चला थोडे प्रेमात पडू या , प्रणयरम्य होऊया असं सांगणारा हा चित्रपट.

१९९० साली प्रदर्शित झालेला अमोल पालेकर दिग्दर्शित हा चित्रपट म्हणजे एक सुरेख रुपक आहे.

एक छोटं गाव जिथे बरेचदा दुष्काळी परिस्थिती असते. अशा त्या गावात एक कुटुंब रहात असतं - कलेक्टर जयदीप दासगुप्ता (विक्रम गोखले), त्याचे दोन मुलगे (मोठा दिलीप कुळकर्णी)  आणि एक मुलगी बिन्नी (अनिता कंवर).

ही बिन्नी मुलगी असून सुद्धा तिच्या दिसण्यात व एकंदर व्यक्तिमत्वात स्त्री सुलभता फारच कमी असते. त्यामुळे स्वत:च्याच विश्वात ती रहात असते. वडीलांचा जरी तिला पाठींबा असला तरी एकंदरीतच घरातील सगळेच जण (आणि विशेष करून प्रेमळ पण अतिशय वास्तववादी विचार करणारा मोठा भाऊ)  तिला सतत एक मुलगी म्हणून तिनं कसं असलं पाहीजे, कसं दिसलं पाहीजे, कसं वागलं पाहीजे याबद्दल सतत उपदेशाचे डोस पाजत असतात. सतत होणाऱ्या या भडीमारामुळे आपलं मी पण आणि लोकांना अपेक्षित रुप यातील विसंगतीमुळे बिन्नी हळूहळू रुक्ष बनत चाललेली असते. या सगळ्या ताण तणावामुळे सगळ्यांच्याच आयुष्यात एक ऊजाडपणा भरुन राहीलेला असतो. अगदी तसाच रुक्ष आणि ऊजाड जसा तो पावसाविनाचा परिसर.

आणि अशा वेळी तिथे येतो नटवरलाल उर्फ धृष्टद्युम्न पद्मनाभ प्रजापती नीळकंठ धूमकेतू बारीशकर. तो येतो एक नवीन स्वप्न एक नवीन आशा घेऊन - त्या दुष्काळग्रस्त भागात पाच हजार रुपयांच्या बदल्यात पाऊस पाडण्याचे आश्वासन घेऊन.

हां मेरे दोस्त, वही बारिश,
वही बारिश जो आसमान से आती है, बूंदों मैं गाती है
पहाड़ों से फिसलती है, नदियों मैं चलती है
नहरों मैं मचलती है, कुंए पोखर से मिलती है
खप्रेलो पर गिरती है, गलियों मैं फिरती है
मोड़ पर संभालती है, फिर आगे निकलती है
वही बारिश

ये बारिश अक्सर गीली होती है
इसे पानी भी कहते हैं
उर्दू में आप, मराठी में पानी,तमिळ में कन्नी,
कन्नड़ में नीर, बंगला में… जोल केह्ते हैं
संस्‍कृत में जिसे वारि नीर जीवन पै अमृत पै अम्बु भी केह्ते हैं ! ग्रीक में इसे aqua pura, अंग्रेजी में इसे water,  फ्रेंच में औ’,  और केमिस्ट्री में H2O केह्ते हैं !

ये पानी आंखों से ढलता है तो आंसू कहलता है  लेकिन चेहरे पर चढ़ जाये तो रुबाब बन जाता है !  हां…कोई शर्म से पानी पानी हो जाता है और कभी कभी यह पानी सरकारी फाइलों में अपने कुंए समेत चोरी हो जाता है

पानी तो पानी है पानी जिन्दगानी है
इसलिए जब रूह की नदी सूखी हो
और मन का हिरण प्यासा हो
दीमाग में लगी हो आग
और प्यार की घागर खाली हो

तब मैं….हमेशा
ये बारिश नाम का गीला पानी लेने की राय देता हूं
मेरी मानिए तो ये बारिश खरीदिये
सस्ती सुन्दर टिकाऊ बारिश
सिर्फ 5 हज़ार रुपये में
इस्से कम में दे कोई तो चोर की सज़ा वो  मेरी
आपकी जूती सिर पर मेरी
मेरी बारिश खरीदये
सस्ती सुन्दर टिकाऊ बारिश

 इकोनॉमिक्‍स का एक सिद्धांत है कि मांग ज्‍यादा हो और आपूर्ति कम हो तो चीजें अपने आप महंगी हो जाती हैं. फिर भी इस महंगाई में बारिश सिर्फ पांच हजार रुपये में! चौंकिये मत ये कीमत हौसले की है, उम्‍मीद की है, जिस पर दुनिया कायम है...

या "sales talk" मधून सर्वाना माहीत असलेल्या पावसाचं साध्या शब्दातून एक सुरेख काव्यमय चित्र बारीशकर उभं करतो.

आत्तापर्यंतच्या निराशेनी भरलेल्या,  रुक्षपणाची, दुष्काळाची सवय झाल्याप्रमाणे असलेल्या सगळ्यांच्या आयुष्यात एक नव्या आशेची थंड झुळूक येते - पावसाच्या आधी जशी ओलसर थंड झुळूक येते तशी आणि बऱ्याच काळानंतर सगळ्याना एक सुखद ओलावा जाणवतो.

पावसाच्या आधी पडणाऱ्या गर्मीप्रमाणेच आयुष्यात देखील अडचणी येतात पण शेवटी पाऊस येणार आहे या आशेवरच आपण ऊन्हाळा सहन करतो त्या प्रमाणे या कठीण परिस्थितीला तोंड द्यायचं असतं. आयुष्यात देखील हवाहवासा पाऊस येतोच.

बारीशकर परिस्थिती बदलत नाही, दृष्टीकोन बदलतो - आहे त्याच परिस्थितीकडे सकारात्मक व आशावादी बनून बघण्याचा दृष्टीकोन बहाल करतो.

तो म्हणतो दोन रात्रींच्या मध्ये एक दिवस नाही तर दोन दिवसांच्या मध्ये एक रात्र असते. आज आणि उद्या दोन्ही तुमचे आहेत. आयुष्यात जे हवं ते बना.

दोन किनाऱ्यांच्या मधून एक छोटीशी धारा वाहते पाण्याची. कितीही छोटी असली तरी ती वाहती असते. किनारे जागच्या जागीच असतात. वाहती धारा समुद्राला जाऊन मिळते आणि समुद्राला घाट नसतात.

एकेका संवादातून एक एक अर्थपूर्ण आशावादी कविता आपल्यासमोर उभी रहाते - कमलेश पांडेच्या चतुरस्त्र लेखणीतून.
हाच आशावाद, हाच सकारात्मक दृष्टीकोन बारीशकर बिन्नीला देतो. तिला सांगतो - जगाच्या चष्म्यातून स्वत:ला बघू नकोस. स्वत:च्य नजरेतून स्वत:कडे बघ आणि जशी आहेस तशी स्वत:ला स्वीकार. आशावादी बन. स्वप्न बघ. स्वत:वर विश्वास ठेव आणि मग बघ फरक. तुझ्या रुक्ष बनलेल्या स्व वर हा आशेचा, स्वप्नांचा, विश्वासाचा पाऊस पडून दे. भीज त्यात मनसोक्त्त. त्यातल्या थेंबांप्रमाणे थुई थुई नाचून दे तुझं मन. त्याच्या ओघोळासारखं वाहून दे स्वत:ला स्वच्छंद. त्यातल्या ओलसर गारव्याच्या  सुखद अनुभवाची कडकडून गळाभेट घे आणि मग बघ तुला जग सुंदर झालेलं दिसेल कारण तुझ्या नजरेत तू स्वत: सुंदर झाली असशील. प्रेमात पड स्वत:च्या आणि रोमॅंटीक होऊन जा. प्रणयरम्य हो आणि प्रणयाच्या कल्पनेतली रम्यता अनुभव.

असह्य उन्हाळ्यानंतर आलेल्या पावसात चिंब भिजून ही धरती जशी स्वत:तला रुक्षपणा विसरुन मोहरते, गंधाळते, फुलून येते आणि जगाला तो मृद्गंध देते , हिरवळीनी सुखावते तशी तू जगाला मुग्धावशील कारण तू स्वत:वर प्रेम करशील.

शेवटी बारीशकरच्या प्रयत्नांना यश येतं. त्या दुष्काळग्रस्त भागातील लोकांच्या मनात जाग्या झालेल्या आशावादाचा विजय होतो आणि तिथे पाऊस पडून ती तहानेली धरती ओलेती होते, वरुणाच्या वर्षावात चिंब भिजते आणि तिची तिला जणू नवीन ओळख होते. तशीच ओळख होते बिन्नीला स्वत:ची बारीशकर नी आणलेल्या आशेच्या पावसामुळे. ती पण आतून फुलून येते आणि स्वत:चं अंतस्थ सौंदर्य तिला दिसतं आणि त्याच बरोबर तिच्या घरच्याना. अशी ही नवी नवेली बिन्नी स्वत:च्या प्रेमात पडते आणि चित्रपट संपतो.

ही सगळी काव्यात्मकता चित्रपटाच्या माध्यमातून आपल्या समोर साकार करण्यात लेखक कमलेश पांडे, दिग्दर्शक अमोल पालेकर आणि सर्वच कलाकार कमाल कमाल करतात.

विक्रम गोखले, दिलीप कुळकर्णीसहीत सर्वांचीच कामं अफलातून सुंदर आणि सहज. पण आपल्याला आठवत रहातात दोनच व्यक्ती - बारीशकर आणि बिन्नी. बारीशकरच्या भूमिकेत नानाची एंट्री उशिरा होते थोडी पण जिथे होते तिथून नाना छा जाता है. अफलातून मुद्राभिनय, संवादफेक आणि आवाजातील चढ उतारांच्या जोरावर नाना मूर्तिमंत आशावाद बनून आपल्या समोर येतो.  आयुष्यातील सकारात्मकतेवर आशावादावर श्रद्धा असलेली माणसं वेगळीच सुंदर वाटतात तसा नानाचा बारीशकर वाटतो आणि ह्याचा पुरावा देतात त्याचे " आयुष्यानी " भरलेले डोळे. Nana is simply awsome, fabulous
amazing & unbelievably believable as Barishkar.

आणि त्याच्या बारीशकरला तेव्हढ्याच ताकदीनी साथ देते अनिता कंवरची बिन्नी. सुरूवातीची स्वत:च्या कोषात स्वत:ला बंद करणारी, स्वत:चं मूळ व्यक्तिमत्व आणि जगाला अपेक्षित बिन्नी यातील विसंगती, सतत हे असं कर, तसं वागू नकोस म्हणून मिळणारा उपदेश वजा सल्ल्यांचा भडीमार यातून गोंधळून जाऊन रुक्ष बनलेली बिन्नी आणि बारीशकर आल्यानंतर सकारात्मक व आशावादी बनणारी बिन्नी हा प्रवास व त्यातील भावनिक आंदोलनं तिनी कमालीच्या ताकदीनी साकारली आहेत. अखेरीस मनाच्या रुक्ष भूमीला आशावाद, सकारात्मकता याच्या पावसात चिंब भिजून स्वत:ची नवीन ओळख झालेल्या बिन्नीला जगातलं आणि त्याहीपेक्षा महत्वाचं स्वत:तलं सौंदर्य दिसतं आणि ती स्वत:च्याच प्रेमात पडून रोमॅंटीक होते - रुमानी होते आणि चक्क सुंदर दिसते - प्रेक्षकांना सुद्धा. त्या शेवटच्या प्रसंगात अनिता कंवरच्या सर्व साधारण चेहेऱ्यातलं सौंदर्य त्या रुपेरी पडद्यामधून आपल्याला दिसतं आणि भावतं यात एक कलाकार म्हणून अनिताचं जेव्हढं कौतुक आणि कर्तृत्व आहे तेव्हढीच कमाल आहे दिग्दर्शक अमोल पालेकरची. संपूर्ण अडीच तास हा म्हटलं तर नीरस वाटणारा विषय इतक्या तरल काव्यमय पद्धतीनी हाताळायचा आणि सगळा माहौल एव्हढा रुमानी करायचा की बिन्नीचं अंतस्थ सौंदर्य सर्वांसाठी दृष्यमान व्हावं ही अमोल पालेकरच्या दिग्दर्शनाची कमाल.

चित्रपट संपता संपता एक भारावले पणा येऊन  माझे  डोळे पाणावले होते - त्याच पाण्यानी जे पावसात पण असतं -  खरच कितीही जरी अडचणी असल्या तरी  जीवन किती सुंदर आहे , आशेनी नवसर्जनानी उत्फुल्ल आहे ह्या जाणीवेतून आलेला तो पाणावलेपणा आणि मनात वाजणारं ते एक गाणं -

मुश्कील हैं जीना, उम्मीदके बिना
आओ कुछ सपने सजाये
थोडासा रुमानी हो जाये !

-------- मनिष मोहिले

No comments:

Post a Comment