Thursday, November 19, 2015

एम टी आयवा मारू

माझ्या अत्यंत आवडत्या पुस्तकांपैकी एक. नाव वाचूनच उत्सुकता निर्माण होते की नक्की काय आहे हे पुस्तक ? कशाबद्दल ?

तर एम टी आयवा मारू ही अनंत सामंत यांची एक कादंबरी आहे जी आधुनिक मराठी साहित्यातील एक विशेष उल्लेखनीय कादंबरी ठरावी - तिच्या धीट आधुनिक शैलीमुळे,  पठडी बाहेरच्या हाताळणीमुळे.

एम टी म्हणजे मोटर टॅंकर. तर ही कहाणी  आहे आयवा मारू नावाच्या बोटीची,  तिच्या सागर प्रवासाची आणि त्या प्रवासातील सागरातील वादळे आणि बोटीवरच्या प्रवाशांच्या भावनिक वादळांची.

सेकंड ऑफीसर अनंत सामंत, सेकंड इंजिनीयर दीपक उपाध्याय, चीफ ऑफीसर पॅट्रीक अॅडॅम्स, थर्ड ऑफीसर डालीझे, रेडीओ ऑफीसर चांद, कॅडेट सेनगुप्ता, त्याची आई मिसेस सेनगुप्ता, वृद्ध अनुभवी खलाशी बोसन,  अत्यंत अनुभवी तडफदार कॅप्टन रॉस, अनंतची प्रेयसी अॅना आणि मिसेस उज्ज्वला दीपक उपाध्याय - ही आहेत ती पात्र जी आयवा मारुचा हा प्रवास आणि कहाणी रंगतदार बनवतात.

आयवा मारू - हॉंगकॉंगच्या कॉर्ड्स शिपींग च्या शहात्तर शिप्सपैकी एक. ब्रेकींग यार्डला पाठवायचं नक्की झालेली ही मोडकळीला आलेली शिप परत समुद्रसफरीसाठी बाहेर काढतात कारण तिच्या मालकाला आपली ही पहिली लकी शिप परत नवीन करायची असते.

त्याचसाठी सगळा अनुभवी आणि त्यातूनही आयवा मारू वर पूर्वी कामाचा अनुभव असलेला Crew मुद्दामून गोळा केला जातो.
व्यापारी वृत्तीची कॉर्ड्स आयवा मारूला हॉंगकॉंगहून सरळ योकोहामाला नूतनीकरणासाठी न पाठवता शिंतावला व्यापारी सफरीवर पाठवते - बरीचशी डागडुजी न करताच. पण कॅप्टन रॉसला आयवा मारूच्या दर्यावर्दी असण्याबद्दल जशी खात्री असते तशीच खात्री व सार्थ आत्मविश्वास असतो स्वत:च्या अनुभवाचा व नैपुण्याचा.

सफर सुरू होते. बोटीवरील शिस्तीची दिनचर्या खेळीमेळीत अंगी भिनू लागते. सगळं काही नेहमी प्रमाणेच चालू असतं. पण सगळंच नाही.

मिसेस उज्ज्वला उपाध्याय सफरीच्या सुरूवातीपासून जहाजावर आलेली असते.
एक सरळ साधी सुंदर नवपरिणिता. तिला तिच्या नवऱ्याशिवाय - दीपक उपाध्याय शिवाय दुसरं कुणीच नसतं म्हणून ती जहाजावर येते. जिंदादिल खलाशांचं समुद्रावरचं बेदरकार बिनधास्त धाडशी आयुष्य जवळून बघायला मिळेल अशा भाबड्या विचारानी आलेली असते.

पण प्रवासात घडणाऱ्या घटना वेगळंच वळण घेतात.  खेळीमेळीचं मोकळं वातावरण संशयी बनत जातं. सरणाऱ्या दर दिवसाबरोबर गढूळत जातं; आणि प्रत्येक अशा घटनेचा प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष संबंध असतो उज्ज्वला उपाध्यायशी.

प्रत्येकाची वागणूक मूळ स्वभावाशी दिवसेंदिवस फारकत घेत असते. सर्वात जास्त उज्ज्वलाच्या बाबतीत.

त्यात भरीस भर म्हणून सागरावरची वादळं, मोडकळीस आलेल्या आयवा मारूला तरंगत ठेवण्याचा आणि तिला योकोहामाला नेऊन एखाद्या नववधू प्रमाणे सजवण्याचा  कॅप्टन रॉसचा आत्यंतिक आग्रह आणि कॉर्ड्सची व्यापारी वृत्ती या सगळ्या गोष्टी परिस्थिती अधिकच नाजूक बनवतात.

आणि या सगळ्याच्या मध्यभागी कथानायक अनंत. कॅप्टन रॉसचा विश्वासू, दीपकचा जीवश्च कंठश्च मित्र, अॅनाचा प्रेमी. त्याचे सतत प्रयत्न चालू असतात - सगळ्याना सांभाळण्याचे, उज्ज्वलाबद्दल त्याला वाटणाऱ्या आकर्षणापासून स्वत:ला व स्वत:च्या मैत्रीला वाचवण्याचे. असं आकर्षण जे कधी मैत्री वाटतं, कधी जिव्हाळा, कधी ममता  तर कधी निव्वळ शारीर वासना.

शेवटी काय होतं ? आयवा मारू परत नवीन होते ? समुद्रावर उसळलेलं वादळ आणि बोटीवरील सर्वांच्या मनातील भावनिक वादळ या दोन्ही वादळांचा शेवट काय होतो?

प्रथमपुरूषी कथनातून लेखक अतिशय उत्कंठावर्धक पद्धतीने ही कथा पुढे नेतो. कथा दोस्तीची, प्रेमाची, खलाशांच्या जिंदादिलीची, प्रेमाची, वासनेची, द्वेषाची, मत्सराची, गूढतेची, धाडसाची, भावनिक आंदोलनाची, मानवी मनाच्या अनाकलनीयतेची आणि समुद्राची व खलाशांच्या जिद्दीची.

खलाशांचे मस्करीचे प्रसंग,  बोटीवरील पार्टीचे प्रसंग, अनंत उज्ज्वलामधील संभाषणे, उज्ज्वलाचा भूतकाळ कथनाचा प्रसंग, दीपकची अवघड व अनाकलनीय मानसिकता, काही कामोत्तेजक प्रसंग, अॅना व मिसेस सेनगुप्ता यांच्या बोटीवरील छोट्या भेटीचे प्रसंग , कॅप्टन रॉसच्या शिस्तीचे, अनुभवी नैपुण्याचे दर्शन घडवणारे प्रसंग, वादळाची रौद्र भीषणता, प्रत्येक प्रसंगात  घडणारं मानवी मनाचं नग्न वास्तववादी दर्शन आणि या साऱ्याचा चित्तथरारक शेवट या सगळ्या मधून लेखक एका वेगळ्या आधुनिक आणि धीट लेखनशैलीचं दर्शन घडवत आपल्याला शेवटपर्यंत बांधून ठेवतो.

आणि या सगळ्याच्या मूळाशी एक अंत:प्रवाह -

जहाज लाकडी असू दे; नाहीतर लोखंडी. दर्या जेव्हा आभाळ झोडपू लागतो तेव्हा सागराला आव्हान देणाऱ्या मानवाला दोन हातांनीच झगडावे लागते त्या बेलगाम निसर्गाशी.
एकदा किनारा सोडला की क्षितीजाच्या अतूट वलयात साथीला उरतो फक्त सागर. कधी शांत तर कधी अवखळ. कधी तळहातावर तोलून नेतो तर कधी उचलून आभाळात भिरकावतो. का? कधी? विज्ञानी गणितांत ह्याचे उत्तर कुठेच नसते. असतात बिनचूक चुकणारे आडाखे. चुकून बरोबर येणाऱ्याआडाख्यांवरून आखलेले.

निसर्गाच्या अप्रूपात हरवलेले खलाशी आजही या अज्ञाताला सामोरे जातात. बेलगाम महाभूताच्या ह्या जीवघेण्या खेळात हट्टाने सहभागी होतात. कधी काही मातीची माणसे उघड्या सागरावर स्पष्ट दिसणाऱ्या नग्न सत्यांनी दुभंगतात, हादरतात, बावरतात, निर्माण होणाऱ्या व्यामोहात भिरभिरतात. पण काही सागरपुत्र या अवखळ महाभूतांवरही मांड ठोकतात.  कोसळणाऱ्या आभळाची, उसळणाऱ्या समुद्राची तमा न बाळगता पायाखाली तरंगणाऱ्या निर्जीव पोलादाला वेठीला धरून सागराला वठणीवर आणतात. खांद्याला खांदे लाऊन उभे राहिलेले खलाशी झेपावणाऱ्या लाटेलाही थोपवणारी मानसिक निर्धाराची भिंत उभी करतात. अपुऱ्या पडणाऱ्या निर्जीव पोलादी भित्ताडालासुद्धा मानवी मनाची झिंग पाजतात. त्या तरंगत्या लोखंडी  पिंजऱ्यात स्वत:चे रक्त, मांस, जान ओतत एक प्रचंड पोलादी चेतना जिवंत करतात. कधी जिंकतात. कधी हरतात. पण परत परत लढतात. अज्ञाताच्या अंधारात चाचपडत कोसळणारे आभाळ तोलत रक्तामांसाचे खलाशी ह्या बेगुमान सागरावर आजही राज्य करतात.

मात्र जहाजाला लाडिक स्त्रीत्व बहाल करणाऱ्या शतकानुशतकांच्या पुराण्या सागरी परंपरेने रुढ केलेल्या स्पष्ट आदेशाला झुगारुन जर एखाद्या स्त्रीने जहाजावर सहप्रवासासाठी पाऊलही ठेवले तर सवतीमत्सरामुळे जहाजावर उठणाऱ्या पुढील भयंकर वादळाच्या चाहूलीने मुरलेले खलाशी आजही हादरतात.

कारण ही त्यांच्याच रक्तामांसाच्या आहुतीने जिवंत झालेली बोटीची पोलादी चेतना सवतीमत्सरानी पेटून उठून त्या स्त्रीच्या आडून उघड्या सागरावर कोणते जीवघेणे खेळ खेळेल ह्याची त्यांना शाश्वती नसते. त्या उत्पाती व्यामोहाच्या निर्माण होणाच्या कल्पनेनी ते थरकतात.

पण हे खरंच असं असतं ? आयवा मारू मिसेस उज्ज्वला उपाध्यायच्या आडून काय खेळ खेळते ? त्या खेळात शेवटी काय होतं ? या सगळ्या प्रश्नांच्या उत्तरासाठी वाचायला हवी - आयवा मारू.

-------- © मनिष मोहिले

No comments:

Post a Comment