Wednesday, July 29, 2020

हेल्लारो

हेल्लारो

हेल्लारो ह्या गुजराती शब्दाचा अर्थ आहे हवेचा / वाऱ्याचा जोरदार झोत. नोव्हेंबर २०१९ मध्ये प्रदर्शित झालेल्या हेल्लारो ह्या गुजराती सिनेमाने सर्वोत्कृष्ट फिल्मचा राष्ट्रीय पुरस्कार मिळवत गुजराती सिनेसृष्टीत देखील एक ताज्या संवेदनशील व तरीही व्यावसायिक चित्रपटाच्या अपेक्षांना पुरून उरणारा चित्रपट ह्या रुपाने एक ताजा विचारझोत आणला.

कच्छ च्या रणात दूरवर वसलेल्या, स्वत:च स्वत:चं जग असल्याप्रमाणे जगणाऱ्या एका खेड्यात, १९७० च्या दशकात घडणारी ही कथा.  खेडं तरी कसलं ! वस्ती म्हणावी इतकी मोजकी पंधरा वीस घरं आणि अंबा मातेवर विश्वास ठेऊन, तिला मावडी म्हणून साकडं घालणारे, दरवर्षी नियमितपणे रणातील अतिशय अनियमित आणि अपुऱ्या पावसाच्या आगमनाकडे डोळे लावून बसणारे नी वर्षानुवर्षांच्या रुढी परंपरा जपत जगणारे वस्तीवाले ही ह्या कथेची पार्श्वभूमी.
वस्तीच्या सर्व रुढी परंपरा पुरूषप्रधान संस्कृतीच्या अटळ प्रभावाखाली शेकडो वर्षं चालत आलेल्या. पुरषांच्याच काय, स्त्रियांच्याही मनात रुजल्या गेलेल्या. त्याविरुद्ध जाणं म्हणजे पाप. वस्तीच्या निर्णयाची सत्ता मुखीबापाकडे आणि घराघरातील एकाधिकारी निर्णयसत्ता घरातल्या पुरूषाकडे. ते ठरवतील त्या निर्णयाला प्रतिप्रश्न नाही. रुढींचं तर विचारायचच नाही. इतकं की जो गरबा प्रत्येक गुजराती स्त्री पुरूषाच्या धमन्यातून सळसळत वाहत असतो आणि ज्याचा ताल व ठेका ते आईच्या पोटातूनच शिकून येतात, जो शे पाऊणशे किलोमीटर वरच्या भुजसारख्या मोठ्या गावात पोरीबाळी देखील सर्वांसह आनंदाने करतात तो करायला वस्तीतल्या स्त्रियांना मात्र सक्त मनाई. कारण काय तर तसं केलं तर अंबा माता, माऊली (स्थानिक भाषेत मावडी) कोपेल आणि शाप देइल, अडचणी येतील, पाऊस पडणार नाही. 

चित्रपटाची सुरूवातच होते ती मुळी ह्या वर्षीदेखील अर्धा पावसाळा उलटून गेला तरी दर्शन न दिलेल्या वरुणराजानी कृपा करावी म्हणून मातेला साकडं घालण्यासाठी पुरूषांचा गरबा असतो त्या रात्रीपासून.  गोल फेर धरून नाचणाऱ्या बाप्यांचा तलवारींसहीतचा गरबा आणि बाप्यांच्या गरब्याचा ताल, आवाज  आणि गाणं ऐकत घराघरातून 
मन मारून झोपायचा प्रयत्न करताना स्त्रिया पडद्यावर दिसतात आणि पार्श्वभूमीला अर्थपूर्ण गाणं चालू असतं - सपना विना नी रात. - तू तुझ्या नदीला वळवून घे, वीजेला विझवून टाक, पायातले पैंजण थांबवून धर आणि वाटेवर बाभूळ लाव. पण मला स्वप्नाशिवायची रात्र दे. त्या वस्तीच्या स्त्रियांच्या जीवनाचं हुबेहुब चित्र ते गीत आपल्यासमोर उभं करतं. मायेचा ओलावा नाही, नाचऱ्या पावलात वीज नाही, पैंजणांचं सुद्धा संगीत नाही आणि वाटेवर काटेरी बाभळीसारख्या रुढी आणि परंपरा. अशा रुक्ष जीवनात मला कोरी रात्र दे. स्वप्नांशिवायची कारण जाग आली की त्या स्वप्नांची उध्वस्त थडगीच तर दिसणार. त्यापेक्षा स्वप्नच नकोत. 

पहिल्यापासूनच  चित्रपट पकड घेतो आणि कथा पुढे सरकू लागते. पुरूषप्रधान समाजव्यवस्थेमध्ये रहाताना स्वप्नसुद्धा बघण्याचं स्वातंत्र्य नसलेल्या वस्तीवरल्या सर्व स्त्रियांसाठी एकच विरंगुळा असतो - सकाळी उठून वस्तीपासून दूर असलेल्या तळ्यावरून पाणी आणायची वेळ. ह्या थोडक्या वेळातच त्याना; बायको, सून, आई ह्या भूमिकातून  बाहेर पडून एकमेकींशी सुखदुःखाच्या गोष्टी बोलता येत असतात.
अशा त्या प्रभातफेरीत सामिल होते, सैन्यात नोकरी करणाऱ्या अर्जनची नववधू मंजिरी. भुजसारख्या ठिकाणी राहून सातवीपर्यंत शिकलेली मंजिरी स्वतंत्र विचारांची, व्यवहारी, बुद्धीमान असते. त्यामुळे नवरा तर सोडाच ; बाकीच्या बायकानासुद्धा सुरूवातीला ती नाकापेक्षा मोती जड वाटते पण लवकरच त्यांना तिच्या बोलण्यात, विचारात तथ्य जाणवू लागतं. जणू मंजिरीचं त्या वस्तीत आगमन आणि तिचं इतरांपेक्षा वेगळा विचार करणं एका ताज्या सुखद झुळकीसारखा जाणवतो सर्व स्त्रियांना. ह्या सर्व मूळ प्रवाहाबरोबर विधवा झालेल्या केसरच्या उपकथेचा एक छोटा प्रवाहदेखील मिळतो जो मंजिरी व केसर ह्या दोघींच्या व्यक्तिरेखांवर प्रकाश टाकतो.

अशा ह्या अगदी मळल्या पायवाटेसारखं रुळलेलं जीवन जगणाऱ्या स्त्रियांच्या जीवनात हवेचा एक जबरदस्त झोका येतो मूळजी ढोलकियाच्या रुपाने. रणात वणवण फिरत असता तहानेने व्याकूळ होऊन तलावाच्या वाटेवर जवळपास मूर्छित पडलेल्या  मूळजीला मंजिरी व इतर स्त्रिया पाणी पाजून वाचवतात आणि त्यांच्या उपकाराची परतफेड म्हणून तो त्याच्याकडची एकमेव वस्तू त्यांना भेट करतो - त्याचं ढोलवादन.

वस्तीपासून इतक्या दूर, कुणी पहात नाही ही जवळपास खात्रीच असताना कानी पडलेला ढोलाचा आवाज; त्या सर्व स्त्रियांच्यात पिढ्यानपिढ्या भिनलेल्या गरबा नृत्याला, त्यांच्या पायातल्या पैजणांना आणि नाचऱ्या वीजेला, त्यांच्यातल्या खळाळत्या जीवनसरीतेला आवाहन करतो आणि न रहावून त्यांचे पाय मंजिरीच्या पुढाकाराने गरब्याच्या वर्तुळात पदन्यास करू लागतात.  फेर धरला जातो. अचूक तालावर टाळ्या पडू लागतात. पहिला दिवस. दुसरा दिवस.  पहिल्याचीच पुनरावृत्ती. गरबा घुमू लागतो. गाता गळा गात जातो - ढोल वाजतोय. माझ्या खारट रणात ढोल वाजतोय. एका घट्ट पिंजऱ्याची दारं रुंद झालेत  आणि  त्या ढोलाबरोबर हवेत उडू पहाणाऱ्या मला स्वत:ला मीच झेलून घेतेय. खरं तर नाचून मला दमायला होतय. पण नवीनच  मिळालेल्या  ह्या मुक्तीची स्वप्न पहायची आहेत. त्यामुळे मी रात्री न झोपता जागीच रहाते. गाणं चढत जातं. गरबा रंगत जातो.

सुरूवातीला रुढीच्या दडपणाखाली, हे पाप केलं तर मावडी कोपेल ह्या भितीने, वस्तीवर पुरूषांना कळलं तर काय होइल ह्या धास्तीने काही स्त्रिया दूर रहातात. पण दोन तीन दिवसातच ती भिती, धास्ती खाली दबते, पिढ्यानपिढ्या रक्तात भिनलेला गरब्याचा ताल आणि पायातली वीज त्या भितीला बाजूला सारते आणि सर्व स्त्रिया ह्या प्रभातफेरीच्या गरब्यात सामील होतात.
एक उत्फुल्ल, ताजा, मोकळा श्वास - एक हेल्लारो -  जणू त्यांच्यात फुंकर घालून नवचैतन्य जागवतो. आता रोजचा सूर्य उगवतो तो ह्याचसाठी की कधी एकदा तळ्याजवळ पोचतो आणि कधी एकदा गरबा करतो.  मध्यभागी उभा राहून देहभान विसरून मूळजी ढोल वाजवत जातो आणि सगळ्या बायका जगाला, स्वत:ला विसरून गरबा खेळत जातात. वेगवेगळे पदन्यास, मंडलं, तालावर पडणारे पाय आणि फिरणारे हात आणि पार्श्वभूमीला गाणं वाजत असतं - ज्याच्या हातावर माझ्या मनाची घुंगरं वाजतात, ज्याच्या ढोलावरच्या थापेनी माझ्या पायातली वीज चमकते; असा स्वार आला आहे. मी तर जणू त्याच्या डमरूवरची धूळ असल्यासारखी थिरकते. जणू मुक्या भुंग्यांची धाड पडावी तशा त्याच्या ढोलकावरच्या थापा पडतात. जणू तो खारट रणात झाड लावतोय. तो जणू (त्या ढोलावरच्या थापातून) स्वप्न बनवून माझ्या मनाच्या ताटात  वाढतोय आणि मी बसल्या बसल्या त्यांचा आकंठ स्वाद घेतेय. (उघड्या डोळ्यांनी ती अनुभवतेय). तो ताल देतोय नी मी टाळी देतेय. 
किती आमूलाग्र बदल होतो त्या सगळ्यांच्या जीवनात. किती मोकळेपणा, स्वातंत्र्य, स्वप्न आणि आशा यानी भरलेला ताज्या हवेचा झोका येतो त्यांच्या जीवनात - हेल्लारो. आणि तो आणणारा मूळजी - ज्याने अशाच स्त्री पुरूष, उच्च नीच भेदभावांच्या रुढीमुळे आपली पत्नी आणि लहान मुलगी - रेवा, गावकऱ्यांनी लावलेल्या आगीत गमावलेली असते असा मूळजी -  त्या सर्व स्त्रियांच्या नाचणाऱ्या पावलात, फिरून ताल आणि टाळी देणाऱ्या हातात, चेहऱ्यावरच्या आनंदात आणि विमुक्त नाचण्यात शोधत असतो आणि बघत असतो फक्त एकच चेहरा - रेवाचा, त्याच्या लहान मुलीचा. तो गरबा त्याच्यासाठी पण एक स्मरणांचा भावनांचा हेल्लारो घेऊन येतो. नवरात्रींच्या दिवसात तर घरोघरच्या मावड्या त्या जगन्मातेला साक्षी मानून वस्तीपासून दूर पाणवठ्याजवळ धुंद नृत्य करतात. 

पण कुणाची तरी नजर लागल्यासारखं होतं आणि नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी ह्या मुक्तीनृत्याची खबर गावकऱ्यांना लागते. एका वेडपट रुढीपरंपरेपाठी ते रक्तासाठी पेटून उठतात. मूळजीला पकडतात आणि रात्री गरबा सुरू करायच्या आधी त्याचा बळी द्यायचं नक्की करतात. घरोघरच्या बायका आपापल्या नवऱ्याकडून मार खातात. 

रात्री बळी जायच्या आधी मूळजी एकदा शेवटचा ढोल वाजवून द्यावा अशी शेवटची ईच्छा व्यक्त करतो आणि असा ढोल वाजवतो, असा ढोल वाजवतो की ..... घरो घरच्या स्त्रिया, पुरूषप्रधान समाजव्यवस्थेची कुलूपं तोडून सगळ्या वस्तीसमोर गरबा करायला येतात आणि काही बरंवाईट घडायच्या आधीच मावडी मुसळधार पाऊस आणते. मुखीबापा आणि इतर पुरूषाना तो संकेत समजतो आणि भर पावसात विमुक्त गरबा करणाऱ्या स्त्रियांच्या गरगर गिरक्या सुरू होतात.

स्त्रीरुपातील देवतत्वाची पूजा करणाऱ्या, कौल मागणाऱ्या पुरूषाना आपल्या घरच्या स्त्रीमधल्या माऊलीला, त्याच स्त्रीतत्वाला  ओळखण्यासाठी शेवटी कौलाचा चमत्कार व्हावा लागतो. पण तसा तो घडतो आणि स्त्रियाना गरब्याचा, छोट्या आनंदाचा, स्वप्न बघण्याचा, देवाची मनोभावे नाचून अर्चना करण्याचा असे छोटे छोटे आनंद नाकारणाऱ्या सगळ्या रुढी परंपरांना आसमानात उडवून लावणारा एक नवविचारांचा, समविचारांचा झंझावात येतो - ताजा, मोकळा, स्वतंत्र, निर्भय आणि आशावादी हेल्लारो. 

पार्श्वभूमीला गाणं चालू असतं - 

आता मी उंबरठा ओलांडला आहे आणि वस्तीचं पालं पण.  सगळ्या पांघरलेल्या रुढींच्या झुलींचं जंजाळ सोडलं आहे.  नाव, गाव, पत्ता सोडलाय. सीमेवरचं शेवटचं रुढींचं गाव सोडलय. आणि पोचलेय त्या झाडाखाली जिथे माझ्या पैजणांना बोलायची सूट आहे. जिथे माझ्या पैंजणांना बोलायची सूट आहे.  ........  इथे चित्रपट संपतो.

एका गुजराती लोककथेला चित्रपट माध्यमातून प्रभावीपणे जनतेपर्यंत पोचवण्यात निर्माता, दिग्दर्शक, लेखक, पटकथालेखक अभिषेक शहाचा सिंहाचा वाटा आहे. कथालेखनाची वीण घट्ट आहे.  चित्रपटाच्या माध्यमातून कथा पोचवण्याची पटकथालेखनाची जबाबदारी देखील अभिषेक ने व्यवस्थित निभावली आहे. कथेचा काळ, कथा जिथे घडते ती जागा हे लक्षात घेऊन दिग्दर्शक म्हणून त्याने वेषभूषा, रंगभूषा, स्थानिक बोली, ह्यांच्याशी प्रामाणिक रहात चित्रपट बनवलाय. कलात्मक स्वातंत्र्याच्या नावाखाली काहीही प्रेक्षकांच्या माथी मारायचा प्रयत्न नाही केलेला. चित्रीकरण रणातच झालं आहे व  छायाचित्रकार त्रिभुवन बाबू सादीनेनी त्याच्या नजरेतून रखरखीत, रुक्ष व तरीही सुंदर भासणारं रण अतिशय नैसर्गिक, अस्सल व प्रभावी दृष्यप्रतिमांमधून आपल्यासमोर जिवंत करतो. विशेषत: सूर्योदय व सूर्यास्ताची दृष्य आणि वस्तीवरच्या  मशाली व तेलदिव्यांनी उजळलेल्या रात्री. 
सौम्य जोशींच्या अद्भुत लेखणीतून उतरलेल्या,  अर्थपूर्ण, चित्रपटात कथेच्या ओघात येणाऱ्या व  चपखल बसणाऱ्या गीतांना तितकंच सुरेख संगीत दिलय मेहुल सूरतीने. सगळी गरबागीते आहेत आणि पारंपरिक गरबा नृत्यातील अनोखे पदन्यास नृत्यदिग्दर्शक समीर टन्नाने सुरेख सादर केलेत. ह्या सर्व नृत्यांचे चित्रीकरण फारच सुरेख. नादमय. तालमय. पहिल्यापासून शेवटपर्यंत चित्रपट बांधून ठेवतो ह्यात दिग्दर्शकाच्या हाताळणीबरोबरच प्रमुख कलाकार श्रद्धा डांगर (मंजिरी) व जयेश मोरे (मूळजी) ह्या दोघांचा संयत तरीही प्रभावी, संवेदनशील अभिनयाचा देखील महत्वाचा वाटा  आहे. इतर सहकारी कलाकारांची देखील यथाशक्ती साथ आहे.

असा हा हेल्लारो.  रुढींच्या रखरखत्या रणात रुक्ष जीवन जगणाऱ्या स्त्रियांच्या जीवनात येणाऱ्या ताज्या, स्वतंत्र, मुक्त विचारांच्या स्वातंत्र्यझोताची कथा सांगणारा हेल्लारो - जरूर जरूर बघावा असा.

---- मनिष मोहिले.




Friday, July 24, 2020

वृक्ष, शिक्षण आणि ज्ञानांकुर


वृक्ष, शिक्षण व ज्ञानांकुर
आज सकाळी ऑफीसला जाताना एक अतिशय सुरेख विचार अतिशय अनपेक्षितरित्या मला ऐकायला मिळाला - वृक्ष आणि ज्ञान ह्यांच्यातील अन्योन्यसंबंधाबद्दलचा.
तर झालं काय की नेहमीप्रमाणे मी ऑफीसला जाताना रेडीओ मिर्ची लावली होती गाडीत. सकाळच्या त्या वेळात बहुधा आर.जे. म्हणून ध्वनित असतो.  रेडीओ मिर्चीवरचा एक अत्यंत लोकप्रिय व खूप मोठा चाहतावर्ग असलेला आर.जे. मला देखील तो आवडतो आणि ह्याचं कारण तो इतक्या वेगवेगळ्या क्षेत्रातील वेगवेगळ्या विषयांना हात घालणारे विविधस्पर्शी कार्यक्रम सादर करतो की श्रोत्यांना मनोरंजनाबरोबरच माहिती, सकारात्म्कता अशा बऱ्याच गोष्टी मिळतात.
सध्या म्हणजे साधारण जुलै महिन्याच्या मध्यापासून तो त्याचा ट्री इडियट नावाचा जो वार्षिक सार्वजनिक वृक्षारोपण कार्यक्रम असतो त्याच्याशी व पर्यायाने वृक्षसृष्टीशी संबंधित माहिती,  कविता, वनौषधीशास्त्र, मुलाखती असे कार्यक्रम सादर करतोय. ह्याच कार्यक्रमा अंतर्गत आज त्याने वृक्षप्रेमी अशा महादेविया कुटुंबातील डॉ. बन्सुरी महादेविया ह्यांची मुलाखत घेतली.  रेडीओवर मुलाखत घेण्यासारखं काय खास आहे ह्या कुटुंबाच्या वृक्षप्रेमात ?
घराच्या अंगणात, भवतालच्या बागेत पुष्कळ झाडे असलेली बरीच घरं असतात. पण महादेविया कुटुंबाच्या घराच्या मधोमध आकाशावेरी जाणारे  पूर्ण वाढलेले एक सोडून दोन वृक्ष आहेत. एक आहे कदंब आणि दुसरा बिल्व. रहातं घर वाढवताना हे वृक्ष न कापता त्यांच्या भोवताली बांधकाम करण्यामागे ह्या कुटुंबाची नक्की काय भूमिका होती ? काय कारण होतं ?
डॉ. बन्सुरीनी ह्या प्रश्नाचं फार सुरेख उत्तर दिलं. त्या म्हणाल्या हिंदू पौराणिक कथांप्रमाणे विचार करता ही दोन्ही झाडं खूप खास आहेत. कदंबाच्या झाडाखालीच राधा कृष्णाचं सखा सखीचं जगावेगळं आणि सर्वांसाठी आदर्श असं प्रेम फुललं आणि बिल्वपत्र शंकराला किती प्रिय असतात हे आपण सर्वच जाणतो. तेव्हा शंकराच्या सुरक्षाकवचात कुटुंबातील सर्वानी प्रेमाने एकत्र रहावं हे एक कारण. दुसरं महत्वाचं कारण म्हणजे झाडं शिक्षणाचं - education - प्रतीक आहेत. कारण education ह्या शब्दाची व्युत्पत्ती पहाता त्याचा अर्थ आतून वाढ व विकास होणे असा आहे.
हे दुसरं कारण ऐकलं आणि माझे कान टवकारले. मला ते कारण फार आवडलं. अगदी अंत:करणाला भिडलं म्हणा ना !
एज्युकेशन - education हा शब्द educatio / educo ह्या मूळ लॅटीन शब्दापासून आला आहे ज्याचा अर्थ आहे - प्रजनन (breeding), संगोपन (rearing), नेतृत्वातून पुढे नेणे (leading forth), तून / पासून निर्माण करणे - e - from / out of. Duco - building / erecting.
ही व्युत्पत्ती वाचली आणि जाणवलं की शालेय / महाविद्यालयीन पुस्तकी/ प्रत्यक्ष प्रयोग शिक्षण व त्याचा अभ्यासक्रम हा education चा जो रुढ झालेला अर्थ समोर येतो त्यापेक्षा कितीतरी अधिक खोल अर्थ दडला आहे ह्या शब्दात.
ह्या व्युत्पत्तीच्या संदर्भात - त्यातील एक एक अर्थ घेऊन आता आपण एज्युकेशन चा शब्दार्थ व भावार्थ आणि त्या त्या अर्थासंदर्भात वृक्ष कसे चपखल बसतात हे पाहू व पारखू.

एज्युकेशन च्या शब्दार्थात असा कोणताही अभ्यासक्रम ज्यामुळे ज्ञान / कौशल्य मिळते वा वृद्धींगत होते, त्याचा अंतर्भाव तर  होतोच पण त्याही पलीकडे जाऊन अशी कोणतीही कृती, अनुभव, प्रयोग, छंद, साधना ज्यामुळे आपली आंतरिक वाढ व विकास होतो - माहितीचा असेल, कौशल्याचा असेल, चांगुलपणाचा असेल, प्रगल्भतेचा असेल, आनंदाचा असेल - ती प्रत्येक कृती, अनुभव, प्रयोग, छंद, साधना हे शिक्षणच आहे. आपल्या व्यक्तिमत्वाची अशी वाढ व विकास की ज्यामुळे जगात काही सकारात्मक निर्मिती होइल, असा विकास घडवून आणतं ते खरं शिक्षण. त्यासाठी पुस्तकी शिक्षण झालं असलंच पाहीजे असं नाही. आईनस्टाईन, बिल गेट्स ही अशा शिक्षणामुळे झालेल्या आंतरिक विकासातून जगासाठी काय योगदान दिलं जाऊ शकतं ह्याची उत्कृष्ट उदाहरणं आहेत. किंबहुना असे सर्व शास्त्रज्ञ, कलाकार, संत, समाजसेवक, ज्यानी शालेय वा महाविद्यालयीन शिक्षणात मोठ्या पदव्या नसतील मिळवल्या पण स्वत:च्या ज्ञानातून, कलेतून  समाजाला, जगाला युगानुयुगं मदत होइल, आनंद मिळेल असं काम केलं. हे शिक्षण पुस्तकी अभ्यासक्रमाच्या पलीकडचं शिक्षण आहे कारण ते आतून अंकुरून बाहेर आलं आहे. हे अंकुरणं हे तर वृक्षसृष्टीचं सर्वात महत्वाचं व प्राथमिक लक्षण आहे.

हे आतून विषय समजणं व त्यामुळे विकास होणं ही प्रक्रियाच वेगळी असावी.  ह्या संदर्भात माणसे : अरभाट व चिल्लर ह्या जी ए कुलकर्णींच्या आत्मचरित्रपर पुस्तकातील त्यांच्या शालेय जीवनातील दोन आठवणी त्यांनी सांगितल्या आहेत त्यांची आठवण मला होते.
पायथागोरसचा प्रमेय ते जेव्हा शिकले तेव्हा त्यांच्या शिक्षकांची शिकवण्यातील व जीएंची शिकण्यातील एकतानता आणि वैश्विक उर्जा ह्यांचा असा काही मिलाफ झाला की समजवण्यासाठी आणलेले काटकोन त्रिकोण आणि त्याच्या कर्णावर व इतर भुजांवर ठेवण्यासाठी आणलेले भिन्नरंगी चौरस हे कसे आपल्यासमोर फळ्यावर वितळून जाऊन एकमेकात मिसळले व काटकोन त्रिकोणाच्या रंगात व आकारात एकरुप झाले आणि कसे त्यातून परत फुटून निघत आपापल्या रंगात व आकारात नेमलेल्या जागेवर परत गेले ह्याचं ऐकून वा वाचून समजायला अवघड आणि केवळ स्वानुभवातूनच ज्याची अनुभूती शक्य आहे अशा अनुभवाचं फार सुरेख वर्णन जीएंनी केलं आहे.
दुसरा अनुभव आहे राम गणेश गडकऱ्यांनी लिहीलेली चिमुकलीच कविता जेव्हा त्यांना शिकवली गेली तेव्हाचा. त्यातील एका ओळीपाशी त्यांना असाच थरारून टाकणारा अनुभव आला. लहान मुलीचं मोठ्या स्त्रीत होणाऱ्या स्थित्यंतराचं रुपक अशा त्या कवितेत एक अशा अर्थाची ओळ आहे की तिच्या हनुवटीवरील तीळ म्हणजे जणू ब्रह्मदेवाने तिचं विधिलिखित लिहीताना वापरलेलं दशांश चिन्ह आहे. ह्या ओळीपाशी त्यांना असा भास झाला की जणू ब्रह्मदेव लेखणी घेऊन बसलाय विचार करत आणि त्याच्या आज्ञेची वाट बघत ते टिंब त्याच्या समोर तरंगत आहे. आता हे अनुभव अतिशय वैयक्तिक पातळीवरचे आहेत. पण ते असे आहेत की बीजातून कोंब फुटावा तसे ते जीएंच्या जाणीवेतून बाहेर आले असतील की जे ते कधीच विसरणार नाहीत. ते अनुभव व त्याचबरोबर ते पायथाओरसचे प्रमेय व ती चिमुकलीच कविता. हे जे ज्ञान आहे ते झाडं ज्याप्रमाणे आतून उफाळून शब्दातीत अशा सृजनशील उर्जेतून बाहेर येतात, वाढतात त्या सृजनशील ओढीशी व वाढीशी साधर्म्य सांगणारं आहे.

एज्युकॅटीयो चा दुसरा अर्थ आहे breeding - प्रजनन.  आणि rearing - संगोपन. अर्थ म्हणून शिक्षणाचा काय संबंध प्रजननाशी ? हे प्रजनन आहे आपल्याला मिळणारं ज्ञान व कौशल्य ह्यांचा आपल्या  आत्म्याशी / व्यक्तिमत्वाशी होणाऱ्या संकरातून निर्माण होणारं वाढीव व विकसित भरीव
ज्ञान ज्यामुळे एकंदरीत माहितीसाठ्यात, ज्ञानात कौशल्यात अशी भर पडेल की ज्याचा उपयोग करून इतरही स्वत:चा विकास करून घेऊ शकतील - मग तो भौतिक असेल, तात्विक असेल, आध्यात्मिक असेल.  एका ज्ञानदीपकातून अनेक ज्ञानदीपक तेवावेत तसा. म्हणून मला इथे प्रजनन पेक्षा संकर हा शब्द अधिक चपखल बसेल असं वाटतं. ज्ञान, माहिती व कौशल्य ह्यांचा विवेकबुद्धी, संस्कार, कला, व्यक्तिमत्त्व व आत्मा ह्यांच्याशी संकर घडवून वैयक्तिक व सार्वजनिक पातळीवर विकास घडवून आणतं ते खरं शिक्षण - एज्युकेशन.  असा संकर जेव्हा संस्कार व विवेकबुद्धी ह्यांच्याबरोबर होतो तेव्हा एक प्रगल्भ, परोपकारी व्यक्तिमत्व विकसित होतं जे असं शिक्षण इतरांना देण्याचा प्रयत्न करतं. ज्ञान वृध्दिंगत करण्याचा प्रयत्न करतं. असा संकर सुसंस्कारित कलेबरोबर होतो तेव्हा संपूर्ण जगासाठी आनंदनिधान बनणाऱ्या कलाकृती निर्माण होतात आणि; असा संकर जेव्हा आत्म्याबरोबर घडतो तेव्हा आध्यात्मिक उन्नती होते आणि अशी एक एक पायरी वर चढत गेले की आत्मज्ञान प्राप्त होते. गौतम बुद्धाला हे आत्मज्ञान बोधिसत्व वृक्षाखाली झालं; तर गुरुदेव रवींद्रनाथांच्या वडिलांना - महर्षी देवेंद्रनाथांना सप्तपर्णीच्या वृक्षाखाली. वंगचित्रे मध्ये पुलं नी म्हटल्याप्रमाणे सात सूर व सात रंगांचं प्रतीक असलेली सप्तपर्णी. ज्ञानाबरोबर कला असली की ती ज्ञानाला विधायक बनवते. सुसंस्कारित बनवते. आत्मज्ञान तेव्हाच शक्य आहे.
संगोपनाच्या बाबतीत बोलायचं तर प्राणवायू निर्माण करत, जमिनीची झीज कमी करत, तपमान नियंत्रण करत संपूर्ण पृथ्वीवरील पर्यावरणाचं रक्षण करत समस्त सजीवसृष्टीचं संगोपन करणाऱ्या वृक्षांबद्दल अजून काय वेगळं लिहायचं वा बोलायचं?

म्हणजे पहा, कदंब, बोधिसत्व, सप्तपर्णी आणि बेल ह्या रुपातून वृक्षसृष्टी प्रेम, ज्ञान, व संरक्षण / संगोपन ह्याच्याशी प्रतिकात्मक जोडलेली आहे. 

एज्युकेशन शी निगडीत तिसरा अर्थ - नेतृत्वातून पुढे नेणे. जी व्यक्ती व जे व्यक्तिमत्व अशाप्रकारे आतून अंकुरून विकसित झालेलं आहे त्याच्याकडे  सहजीविकांना, समाजाला आंतरिक विकासदायी शिक्षण देण्याची जबाबदारी व नेतृत्व स्वत:हून चालून येते. हे नेतृत्व आहे विधायक व निर्मितीक्षम अशा वाढ व विकासाचं. लक्षात घ्या - तेच शिक्षण खरं जिथे फक्त वाढ नाही तर वाढीबरोबरच विकास देखील होतो आणि ज्यातून विधायक कार्य घडतात . प्राणीसृष्टीच्या आधी निर्माण झालेल्या  वनस्पती सृष्टीचं  नेतृत्वाच्या बाबतीत  महत्व वेगळं विशद करायची गरज नाही.

एज्युकेशनशी निगडीत चौथा अर्थ - तून निर्माण करणे / उभारणे. ही निर्मिती आहे, ही उभारणी आहे सद्भावना/ पत  (goodwill) आणि वारसा (legacy) ची. असं शिक्षण जे आतून विकसित व्हायला मदत करतं;  त्याचा अजून एक मूलभूत हेतू असतो एका व्यक्तीच्या आयुष्यकालानंतर देखील हे सत्-कार्य पुढे चालू रहावं हा. व्यक्ती आणि व्यक्तिमत्त्व आतून विकसित करणारं जे शिक्षण असतं ते अशा भविष्यकालातील पिढ्यांच्या ज्ञानवृद्धी व विकासाचा देखील विचार करतं. जागोजागी काम करणाऱ्या अनेक सेवाभावी शिक्षण / समाजसेवी संस्था ही अशी,  एका व्यक्तीच्या आयुष्यकालानंतरही कार्यरत असलेल्या शिक्षणप्रक्रीयेची व ह्या लेखात विचाराधीन असलेल्या शिक्षणाच्या संदर्भात शिक्षणकेंद्राची प्रतिके आहेत. झाडं देखील कोळशाच्या रुपाने प्रत्यक्ष सृष्टीत आणि विविध सुरेख रुपकातून विचारसृष्टीत असे सद्भावना वारसे कायम ठेऊन देतात.

थोडक्यात, व्युत्पत्तीप्रमाणे एज्युकेशन - शिक्षण हा  पुस्तकी अभ्यासक्रमाच्या पेक्षा खूप काही अधिक अर्थ असलेला शब्द व प्रक्रिया आहे आणि वर बघितलेल्या सर्व अर्थांच्या संदर्भात वृक्ष / झाडं प्रत्येक अर्थात चपखल उदाहरण म्हणून बसतात ज्यात सर्वात महत्वाचं उदाहरण आहे अंकुरणं - आतून होणारा विकास - ज्ञानांकुरातून फुटणारा आणि आतून वाढणारा व विकसित होणारा जो पुढे जाऊन बनतो कदंब, बिल्व, बोधिसत्व आणि सप्तपर्णी.


---- मनिष मोहिले.





Thursday, July 23, 2020

Trees - Symbol of education - literally.

Today I got educated about education while I was on my way to the office. While driving to the office in the morning, I always listen to Radio Mirchi. Like many other people, RJ Dhvanit is my favourite RJ. The reason is simple. He covers so many different topics on varied fields that the listener always stands to gain something - information, positivity & entertainment.

This month, particularly mid July 20 onwards, he has been running his annual campaign called "Tree-Idiots" under which, with the help of the municipal corporation, he arranges to plant thousands of saplings of choice in the backyards of homes of enthusiastic volunteer citizens. So, currently, all his talks, guest interviews are related to trees, plantation, information about the same.

Today i.e. on 23rd July, he was talking to Dr. Bansuri Mahadevia, daughter of famous dentist Dr. Rameshbhai Mahadevia about the family's love for tree.

Now, many people have lots of trees in their garden / courtyard. But, rarely anyone would have a full grown tree right in the middle of their house. However, in case of Mahadevia family, It so happens that they have not one but two grown up trees going up into the sky right from within their home. One tree is of Kadamb (Burflower tree) - the tree under which Shri Krishna's romance with Radha flourished as per mythological legend & another of bael - again a tree which is very dear & close to Lord Shiva as per mythological legend.

During the interview when Dhvanit asked Dr. Bansuri about the logic to expand the residential area of home around the trees without cutting them, she came up with very good & enlightening logic & feelings.

One reason obviously is the trees being dear to Lord Krishna & Lord Shiva. So, by letting the trees grow by remaining inside the home is to prosper with the similar ever lasting affection among family members as between Radha & Krishna & the blessings & protection of Lord Shiva.

The second reason that she came up with struck my chords. She said the trees growing from within / inside the home symbolises education.

Etymologically, education comes from Latin word "educatio" which means breeding, bringing up, rearing / "educo" which means leading forth, taking out, raising up, building / erecting (duco) from / out of (e). So it is basically growing from within. Growing from inside. How wonderful is that.

Looking at education in the light of this definition, it changes the whole perspective about education. It is no longer the curriculum, syllabus, marks & grades. It is about growing from inside, from within. Growing in terms of knowledge, skills, personality, outlook, maturity & last but not the least - humanity. Hence, apart from any course/ syllabus/curriculum that helps you acquire knowledge & skills, any experience, experiment, discussion, hobby that helps one to grow from within is education.  Growth in the stock of information / skill is education.  Growth in one's goodness by helping others is education.  Growth in one's maturity is education - cause all these growths are from within.

There is another word there in the etymology. It is breeding. By itself, it is related to act results in creation of something.  So, anything that helps one conduct an act resulting into some creation is education. The creation however, should happen as a result of breeding of knowledge /  skills one acquires with one's soul / personality & the creation that comes into being should be constructive, furthering growth. This breeding is then education.

It also refers to leading forth. A person who grows from inside by breeding of knowledge & his soul/personality, generally happens to lead - knowingly / unknowingly as he has more matured all inclusive thinking on a subject matter.

It also refers to building. It is about building goodwill & legacy which helps others proceed in similar fashion and get educated.

The trees do good to the whole world by helping conserve the environment. Gautam Buddha got enlightenment sitting under the tree of Bodhisattva. Maharishi Devendranath Tagore also got enlightenment under the tree of Saptaparni - Ditabark.  They grow in most difficult conditions also. Even after they are trimmed, they grow. The trees support so much of other kind of plant & animal environments. Thus, Trees also lead forth by showing the way of living life. They entirely fit into the etymological definition of education. They in fact,  symbolise education & growth from within.

So, grow like trees. Get educated.

------ Manish Mohile

Wednesday, July 22, 2020

इजाजत

इजाजत

१९८७ साली इजाजत प्रदर्शित झाला तेव्हा मी  दहावीत होतो. चित्रपटाचे कथानक, हाताळणी, दिग्दर्शन, काव्यमयता आणि अर्थ; पूर्णपणे समजण्याचं ते वय नव्हतं. इजाजत एक वेगळी प्रगल्भ प्रेमकथा आहे इतकच कळलं होतं. पंचमची गाणी मात्र तेव्हासुद्धा प्रचंड आवडली होती.

नंतर बरेचदा इजाजत तुकड्या तुकड्यात पाहिला. इजाजतच्या गाण्यांची तर अनंत श्रवण-पारायणं केली. वाढत्या वयाबरोबर गुलझारचे भारून टाकणारे शब्द, आशाचा जादुई आवाज आणि पंचमचं अद्भुत संगीत दरवेळी काही नवीन जाणीव करून देत गेले. आणि;  परवा असाच एकदा इजाजत परत बघितला.

एका अनाम स्टेशनच्या वेटींग रूम मध्ये पावसाळी रात्री अचानक समोर आलेल्या  महेंद्र आणि सुधाच्या  भेटीतून सुरू होणारा इजाजत.

महेंद्र आणि सुधाचं लग्न त्यांच्या घरच्यांनी जमवून ठेवलेलं असतं. दोन्ही कुटुंब एकमेकांच्या निकट परीचयाची असतात. त्यामुळे महेंद्र  सेटल होइपर्यंत घरचे आणि सुधा विश्वासाने थांबलेले असतात.  पण महेंद्र मधेच मायाच्या मोहपाशात अडकतो.  योग्य कृतीचच समर्थन करणाऱ्या बडिलाना लग्नाच्या या तिढ्याच्या बाबतीत तोंड कसं द्यायचं म्हणून महेंद्र गोंधळतो. पण ह्या बाबतीत सुधाशीच बोलायचं ठरवून  तो हातचं काही राखून न ठेवता तिला खरं ते सर्व सांगतो. सुधादेखील प्रगल्भ व्यक्तिमत्वाची साक्ष देत महेंद्रला सल्ला देते - जो सच हैं और सही हैं वही करो. त्यामुळे मायाच्या अचानक निघून जाण्याने जेव्हा महेंद्र सुधाशी लग्न करण्याचा निर्णय घेतो तेव्हा झालेलं लग्न ही एकप्रकारची तडजोड असली तरी त्यात गुप्तता वा लपवाछपवी नसते. सत्य स्विकारून निर्णय घेण्यातील सामंजस्य असतं. हे सामंजस्य; महेंद्र व सुधाच्या दांपत्य जीवनातील भावविश्वात, अप्रत्यक्षपणे सतत जाणवत रहाणाऱ्या मायाच्या अस्तित्वाला; दोघेही वैयक्तिकरित्या व एक दांपत्य म्हणून; ज्या पद्धतीने हाताळतात त्या प्रसंगातून दिसून येतं. गुलझार मधला दिग्दर्शक इथे जाणवतो. मात्र ज्या क्षणी महेंद्र मायाचा आत्महत्येचा प्रयत्न सुधापासून लपवून ठेवायचा प्रयत्न करतो त्या क्षणी गैरसमज सुरू होतात. सुधा महेंद्रला सोडून निघून जाते. हृदयविकाराच्या झटक्यातून महेंद्रला सावरायला माया मदत करते. जणू नकळत केलेल्या चुकीचं परिमार्जन ती करत असते. पण त्यानंतर पुन्हा एकदा दैववशात् माया महेंद्रला पुन्हा दुरावते - यावेळी कायमची. नंतर  आयुष्याच्या एका अकल्पित वळणावर महेंद्र व सुधा भेटतात आणि सर्व खुलासा होतो. सत्य समजल्यानंतर आधी न सांगता महेंद्रला सोडून गेलेली व नवीन आयुष्यात स्थिरावलेली सुधा ह्यावेळी मात्र महेंद्रची इजाजत घेऊन आपल्या नव्या आयुष्याकडे वळते आणि चित्रपट संपतो.

हे कथानक तर सगळ्यानाच समजलेलं आहे.  एक अतिशय वेगळी प्रेमकथा जी गुलझार नी फार प्रगल्भतेने हाताळली. त्याच्या दिग्दर्शनातील प्रगल्भता सुधा, महेंद्र व माया ह्या पात्रांच्या प्रगल्भ वागणूकीतून प्रेक्षकांना दिसून येते.  अतिशय प्रगल्भ अशा ह्या प्रेमत्रिकोणाच्या कथेला गुलझारच्या लेखणीतून झरलेल्या मोजक्याच पण  अर्थगर्भ गीतांनी  एक तरल काव्यमयता लाभते. पंचमच्या अद्भुत संगीतानी आणि आशाच्या स्वर्गीय सुरातून एक आगळा माहौल बनतो. सगळं खरं. पण मग ह्यावेळी असं काय वेगळं जाणवलं मला ज्यामुळे हा लेखनप्रपंच मांडला ?

इजाजत मला ह्यावेळी प्रतीत झाला तो निव्वळ  एक प्रगल्भ प्रेमत्रिकोण म्हणून नाही तर एक रुपक म्हणून प्रतीत झाला. कथेतील पात्रांची नावंच हे रुपक आपल्या समोर आणतात. माया हे जीवनातील मोहमयी मनस्वितेचं व सहजस्फूर्त वर्तणुकीचं रुपक आहे. सुधा हे बुद्धीचं - सुसंस्कृत सारासार विवेकबुद्धीचं रुपक आहे आणि महेंद्र हे सहजस्फूर्त मनस्विता व सारासार विवेकबुद्धी ह्या दोघींच्या मध्ये दोलायमान असलेल्या मनुष्याचं रुपक आहे.

महेंद्रला "जो सच हैं और सही हैं वही किजिए" असा सल्ला देणाऱ्या सुधानी; एकपरीने महेंद्रच्या आयुष्यातील तडजोडीच्या रुपात दुय्यम भूमिका स्विकारलेली असली, त्याच्या मनातील मायाबद्दलच्या भावना स्विकारलेल्या असल्या, तरी महेंद्रची पत्नी म्हणून मनात कडूपणा न बाळगता, दांपत्य जीवनाचा पाया असलेला प्रेमभाव जपण्याचा व जोजवण्याचा प्रयत्न करत  ती हे नातं व दांपत्य जीवन प्रामाणिकपणे निभावण्याचा प्रयत्न करत असते.
महेंद्रच्या मनातील मायाचं स्थान अढळ आहे ही जाणीव असल्यामुळे, आपल्या वाटणीला महेंद्र तुकड्या तुकड्यातच येणार हे ती ओळखून आहे.
ह्या तुकड्या तुकड्यात लाभणाऱ्या महेंद्रमुळे ती तृप्त होत नाही,  तहानेली रहातेय. त्याची जाणीव पण ती त्याला देते.  पण त्याचबरोबर तिच्या वाटणीच्या महेंद्रमध्ये तिला पूर्ण भिजून जायचय. अतृप्त रहात भागेल तेव्हढी तहान भागवायची आहे. महेंद्रच्या मनातून मायाला जबरदस्ती काढण्याचा प्रयत्न केला तर तिघांच्या जीवनाचं डबकं होइल हे तिला नकोय . तिला त्यालाही प्रवाही ठेवायचं आहे अन् स्वत:लाही. म्हणून ती म्हणते कतरा कतरा मिलती हैं, कतरा कतरा जीने दो, जिंदगी हैं, बहने दो, प्यासी हूँ मैं प्यासी रहने दो.
ह्या प्रयत्नात महेंद्रची देखील तिला प्रामाणिक साथ असते. पण तिच्या हक्काचं नातं, भावना ह्यात माया मिसळू पाहते आहे अशी जेव्हा तिची भावना होते त्याक्षणी तिच्यातील स्वाभिमानी स्वतंत्र वृत्तीची प्रगल्भ स्त्री बंड करून उठते आणि महेंद्रच्या आयुष्यातून ती निघून जाते. सारासार विवेकबुद्धीच इतक्या स्थिरचित्त प्रगल्भतेने विचार करू शकते आणि निर्णय घेऊ शकते. सुधाचं पात्र संपूर्ण कथेत सातत्याने ही नीरक्षीर विवेकाची प्रगल्भ विवेकबुद्धी दर्शवत रहाते. तिच्यातील संगीत तिच्या विचाराना व वागण्याला एक सुसंस्कृतपणाची जोड देतं.

मायाचं अस्तित्वच जीवनतील रसरसत्या जिवंतपणाचं प्रतीक आहे. त्यामुळे तिचं जगणं हे जीवनाला पूर्णपणे आलिंगून टाकणारं आणि हातातला क्षण भरभरून जगणारं आहे. पण त्याचबरोबर ती स्वाभाविकपणे तितकीच मनस्वी आणि अंत:प्रेरणेनुसार जगणारी आहे. त्यात पुढचा मागचा साधक बाधक विचार नाही. तिची ती प्रवृत्तीच नाही.  हाती असलेला आत्ताचा क्षण भरभरून जगायचा हे तिचं तत्वज्ञान. तिची ही मनस्विता तिच्यातील कवयित्रीला फुलवत,  अप्रतिम आणि काळजाला भिडणाऱ्या कविता जन्माला घालते आणि त्या जगते देखील.
रुकती हैं थमती हैं, कभी बरसती हैं, बादलपे पाँव रखे मचलती रहती हैं हे पावसाप्रमाणेच मायाच्यादेखील जीवनाचं गाणं आहे.  आसमंत धुंद करणाऱ्या, सुंदर ताजा करणाऱ्या पावसासारखी ती आहे - अतर्क्य - नात्यात कधी ऊसळून येणार, कधी धो धो संततधार धरणार तर कधी रिमझिम रिमझिम भिजवत रहाणार आणि कधी न सांगताच गायब होणार.   ती माया आहे - मोहमयी. तसं मोहमयी रहाणं हा तिचा स्थायीभाव आहे. त्यामुळेच ती सर्वाना मोहवते. हवीहवीशी वाटते. पण तिची मनस्विता खऱ्या अर्थानी समजणं व सांभाळणं कोणालाच पूर्णपणे जमत नाही.
अर्थात ह्याचा अर्थ असा नाही की तिला चांगल्या वाईटाची चाड नाही वा जाणीव नाही. तिला ह्याची चांगलीच जाण आहे म्हणूनच सुधा व महेंद्रच्या लग्नानंतर एका मनस्वी क्षणी ती लिहून जाते -  मेरा कुछ सामाँ तुम्हारे पास पडा हैं, सावन के कुछ भिगे भिगे दिन रक्खे हैं ........ मेरा वह सामाँ लौटा दो .

अशा या मोहमयी मनस्वितेच्या आणि सारासार विवेकबुद्धीच्या मध्ये दोलायमान असलेल्या मनुष्याचं महेंद्र हे रुपक आहे. मात्र तो प्रामाणिक देखील आहे.  समोरच्याला होता होइ तो न दुखवण्याचा प्रयत्न तो करतो. त्यामुळेच जणू त्याला आरसा दाखवणारे असे त्याचे वडील - त्यांच्याशी मायाबद्दल बोलायची वेळ येते तेव्हा तो गोंधळतो, डगमगतो आणि सुधाकडे जातो यातून मार्ग काढायला. ह्यात कोणी पलायनवाद सुद्धा शोधेल. पण त्याच्यात खोटेपणा वा अप्रामाणिकपणा जरासाही नाही ही त्याची जमेची बाजू आहे. सुधाच्या मन लावून संसार करण्याच्या प्रयत्नाला तो देखील त्याच्या परीने प्रामाणिक साथ देतो. पण मोहमयी मनस्वितेला नियंत्रित स्थान देण्याच्या प्रयत्नात तो सत्यकथन टाळतो तिथे सारासार विवेक बुद्धी त्याला प्रतिप्रश्न करते . तिथे तो संतापतो आणि त्याची व सुधाची - विवेकबुद्धीची ताटातूट होते.  प्रत्येक क्षण भरभरून सहजस्फूर्त जगू पहाणारी मनस्विता आयुष्याच्या लांबलचक प्रवासात क्षणभंगुर ठरते. काही वेळा काही काळासाठी तर काही वेळा कायमसाठी. खाली हाथ शाम आयी हैं खाली हाथ जायेगी,  आज भी ना आया कोई  खाली लौट जायेगी हे खरं तर तिघांच्या बाबतीत खरं ठरतं
मनस्विता आणि विवेकबुद्धी ह्यांच्यामधील गैरसमजामुळे  समंजस प्रेमाचा अंत होतो.

प्रेमत्रिकोणाच्या रेशमी भावबंधातून गुलझार हे रुपक आपल्यासमोर मांडतो. एका काव्यमय संगीतमय माध्यमातून. पण मग ह्यात चूक कोण ? बरोबर कोण ? चूक कुणाचीच नाही.
मायाची ?  नाही. ती आहेच मनस्वी. विवेकी सुधाची ?  नाही. महेंद्रची ?  त्याची देखील नाही. मनुष्याला मनस्वितेचा मोह पडणं हे स्वाभाविक आहे. गरज आहे ती सत्याची आणि योग्य काय व अयोग्य काय ह्यातील तारतम्य बाळगायची आणि सत्य समजल्यावर सत्याला योग्य तो मान द्यायची. ती शेवटची इजाजत हा विवेकबुद्धीने सत्याचा केलेला सन्मान आहे.

जीवनात वेगवेगळ्या टप्प्यांवर वेगवेगळ्या रुपातील मोहमयी मनस्विता मायाच्या रुपात भेटतच रहाणार. तिला टाळणं हा त्यावर उपाय नाही. काही क्षण मनस्वीपणे भरभरून जगले तर जीवन काव्यमय होतं. ते तसं मोरपंखी कवितेसारखं, बरसणाऱ्या पावसासारखं व्हावं सुद्धा. एकलेपणाची रिकामी संध्याकाळ कोणाच्याच वाट्याला येऊ द्यायची नसेल तर रोजच्या जगण्यासाठी विवेकबुद्धीच  हवी.  म्हणून मनस्वितेला जवळ करताना / भेटताना; सारासार विवेकबुद्धीची साथ मात्र हवी आणि त्यासाठी प्रामाणिकपणा आवश्यक आहे. जितक्या प्रामाणिकपणे मनस्वितेचा मोह होतो तितक्याच प्रामाणिकपणे जे सत्य व योग्य आहे ते निवडण्यासाठी विवेकबुद्धी जवळ हवी.  मला प्रतीत झालेलं इजाजतमधलं हे रुपक.

शेवटी मनस्वितेचं काही सामान तिच्याबरोबरच्या समरसून भरभरून जगलेल्या क्षणांची साक्षखूण म्हणून मनाच्या एका अलवार कोपऱ्यात जपून ठेवलं तरी मागे राहिलेलं बाकीचं सामान विवेकबुद्धीने परत पाठवणं मनुष्याच्या आयुष्यात गरजेचं आहे.

---- मनिष मोहिले 

Saturday, July 18, 2020

ज्ञानियांचा मोगरा

ज्ञानियांचा मोगरा

दोन तीन दिवसापूर्वी रात्री माझ्या मामाचा फोन आला होता. मटा मधील एका लेखाबद्दल मला सांगायला. 
उपरोक्त लेखात पावसानंतरच्या सृष्टीतील सृजनाचे आपल्या लेखणीतून वेगवेगळे सादरीकरण करणाऱ्या ख्यातनाम कवी व साहित्यिकांनी कशाप्रकारे हे वर्णन केले आहे ह्याचे वर्णन होते. ह्या लेखाचा शेवट  ज्ञानेश्वरांच्या एका ओवीने केला होता ज्यात ते म्हणतात "जैसे भूमीचे मार्दव, सांगे कोंबाची लवलव". भूमीचं बहुप्रसवा असणं आणि सृजनातील कोवळेपणा हळूवारपणा हा त्या नाजूक कोंबाच्या लवलवीतून साकार होताना जाणवून ती जाणीव इतक्या मोजक्या शब्दात शब्दबद्ध करायला
ज्ञानेश्वरांचीच प्रतिभा हवी.

निसर्गाचा ज्ञानेश्वरांवर असलेला प्रभाव त्यांच्या अजून एका अशाच ओवीतून दिसून येतो - मोगरा फुलला, फुले वेचिता बहरू कळीयांसी आला - ह्या त्या ओळी.

ह्या ओळींची ओळख खूप लहान असतानाच ऐकलेल्या लताच्या अप्रतिम आवाजातील  अभंगगीतातून झाली आणि तेव्हापासूनच ह्या ओळी हृदयात एक अढळ जागा घेऊन बसल्या. पण  आधी त्या ओळींचा रसास्वाद हा फक्त त्या ओळी नजरेसमोर जो दृष्यसंस्कार उभा करतात त्याच्यापुरताच मर्यादित होता. अर्थात तो दृष्यसंस्कार देखील केवळ अवर्णनीय असाच आहे ह्यात वादच नाही.  एखादं झाड इतकं फुलावं, बहरावं की त्याचा तो बहर वेचता वेचता इतका वेळ जावा की तोपर्यंत, त्याच्या कळ्या पूर्ण फुलून पुन्हा बहर यावा ही कल्पनाच किती सुंदर आणि सृष्टीच्या अफाट सृजनशीलतेबद्दल, नेमक्या शब्दात बोलकं वक्तव्य करणारी आहे; नाही !!

पण आज असं वाटतं की स्वत: ज्ञानदेवांच्या संतकवी मनातील कल्पनादेखील अशाच अमाप ओसंडून जाणाऱ्या बहरासारख्या अनावर झाल्या असतील हे लिहीताना. पैसाच्या खांबाशी बसून ज्या सत्पुरुषाला अवकाश व काल ह्यांचं अध्यात्ममार्गाने ज्ञान प्राप्त झालं आणि आत्मज्ञानी बनून ज्याने जगाला ज्ञानेश्वरी व पसायदान दिलं त्यांच्या बाबतीत आणि त्यांच्याच बाबतीत प्रेम व भक्ती ह्या दोन सरळ मार्गाने मनुष्याला जीवन समजावून सांगणाऱ्या कल्पनांचा असा बहर शक्य आहे.

पण मग मोगराच का दिसला त्यांना ? इतरही अनेक झाडांना व वेलीना फुलांचे असे प्रचंड बहर येतात. मग मोगराच का ? ह्या प्रश्नाचं माझ्या अल्पमतीला जे उत्तर योग्य वाटलं वा जो संबंध मी लावला तो म्हणजे ह्याचं उत्तर मोगऱ्याचा सुगंध, उपयोगिता आणि वर्ण ह्याचा आहे.

मोगऱ्याचा धुन्द करणारा सुगंध हा जवळपास प्रत्येकाने अनुभवला असेल. त्याचं शब्दात वर्णन करणं केवळ अशक्य आहे. ही अनुभव आणि अनुभूती घ्यायची गोष्ट आहे.  सांगून समजावता येणार नाही आणि ऐकून समजणार नाही. तो सुगंध अनुभवायलाच हवा. माझ्या बाबतीत ह्याची एक कायमसाठी श्वासात सामावून गेलेली  सुगंधखूण आहे.

बरेच वर्षांपूर्वी कामानिमित्त मी कोइंबतूरला गेलो होतो. सकाळी लवकर उठून दिंडीगुलला जायचं होतं. तीन साडेतीन तासाचा प्रवास लवकर सुरू करावा म्हणून सकाळी सातला निघालो. चालक गाडी घेऊन तयार होता. मी गाडीचं दार उघडलं आणि आतल्या सुखद वातानुकूलित गारव्यासहीत जाणवला मोगऱ्याचा स्वर्गीय सुगंध. चालकाने पुढे ताज्या टपोऱ्या मोगऱ्याचा गजरा टांगला होता आणि त्याचा तो अप्रतिम सुगंध कोंदून राहिला होता गाडीत. जगातील कुठलेही अत्तर वा परफ्यूम त्यापुढे फिक्कं होतं. तो संपूर्ण दिवस गाडीत त्या अद्भुत सुगंधाचा आनंद घेत मी प्रवास केला. आजही, मोगरा म्हातलं की तो सुगंध माझ्या श्वासात मला जाणवतो. माझ्यासाठी आयुष्यभर मनात ताजी राहील अशी ही सुगंधखूण.

असा हा मोगऱ्याचा सुगंध. अर्थात सुगंधी तर कितीतरी फुलं असतात. इथेच येते मोगऱ्याची उपयोगिता. मोगरा हे एक फूल असं आहे की जे अनेकविध ठिकाणी उपयोगात येतं. ते स्त्रीच्या केसात माळल्या जाणाऱ्या गजऱ्याच्या रुपात शृंगारसाधन आहे.  कलेच्या दालनात कलास्वाद घेताना रसिकांच्या श्रवणेंद्रीयाना सुगंधाची साथ करणारं कलासक्त फूल आहे. संसाराचं अतिमहत्वाचं अंग असलेली "सोज्वळ" शय्यादेखील मोगऱ्याला निषिद्ध नाही आणि; असा हा मोगरा देवाला पूजेत सुद्धा भक्तीभावाने वाहिला जातो. स्वत: संन्यासी असले तरी सामान्यजनाना जीवनाचं मर्म सांगणाऱ्या ज्ञानेश्वराना; साकल्याने जीवन जगण्याचं प्रात्यक्षिक देणारा मोगरा नजीकचा भासावा ह्यात नवल ते काय ?

सुगंध आणि उपयोगिता ह्यांच्या बरोबरच किंवा त्याहीपेक्षा महत्वाचा मोगऱ्याचा वर्ण.

काय आहे असं मोगऱ्याच्या वर्णात ? साधा पांढरा तर आहे रंग. त्यापेक्षा कितीतरी अधिक आकर्षक रंगांची विविधरंगी फुलं आहेत जगात.

पण शुभ्र वर्ण ही रंगांची  उणीव वा अनुपस्थिती नसून तो सर्व रंगांचा मिलाफ आहे. वर मोगऱ्याची जी उपयोगिता वर्णन केली ती जीवनातील ज्या  विविध अंगांशी व आश्रमांशी संबधित आहे, त्या त्या बाबतीतील कर्तव्य यथायोग्य पार पाडून जीवन पूर्णत्वाने जगल्यावर जी सार्थकता लाभते त्या सार्थकतेसारखा शुभ्र व पवित्र. जेव्हा अध्यात्माच्या व आत्मज्ञानाच्या लोलकातून ह्या शुभ्रवर्णी जीवनाकडे बघावं तेव्हा सर्व कला, कौशल्य, ज्ञान ह्या विविधरंगी जीवनसाहित्यांचे सर्व रंग उत्फुल्ल होऊन दृगोच्चर होतात.  असा हा शुभ्र वर्ण.

एका मोगऱ्याचं फूल किती विविधस्पर्शी आहे. मोगऱ्याच्या सुगंधातून सृष्टीतील सौंदर्य, त्याच्या उपयोगितेतून जीवनाची विविध अंग आणि त्याच्या वर्णातून साकल्य हे ज्ञानदेवाना जाणवलं असावं आणि म्हणून जीवनाच्या विविध अंगांचा विचार करत त्याचे मर्म सामान्यांना समजावू पहाणाऱ्या व साकल्याने सर्वरंगी मिलाफाचे पवित्र शुभ्र जीवन कसे जगावे ह्याची जगाला शिकवण देणाऱ्या ज्ञानेश्वरांच्या सुंदर संतकवीकल्पना जेव्हा अनावर बहरून आल्या असतील तेव्हा त्यांच्या मनात प्रथम मोगराच आला असेल.

माऊलींच्या विचारां ना समजण्याइतकी माझी पात्रता नाही, बुद्धी नाही हे मला माहिती आहे. पण निखळ सौंदर्यापुढे अनासक्तपणे नतमस्तक होत मी माझे हे विचार मांडले आहेत आणि त्यामुळे हा औद्धत्याचा अपराध माऊली नक्कीच पोटात घालतील.

जगात सद्विचारांचा मोगरा असाच फुलत रहावा आणि त्याचा बहर इतका अनावर व्हावा की आपले बोल सार्थ झाल्याचा आनंद माऊलीनाही व्हावा ही प्रार्थना माऊलींच्याच चरणी करत हा लेखनप्रपंच आवरता घेतो.

श्री ज्ञानदेवार्पणमस्तु !

---- मनिष मोहिले 

Monday, July 13, 2020

पृथ्वीच्या चुंबकीय धृव्वांचे उत्क्रमण आपल्या उंबरठ्यावर आहे का ?


विश्वभरात सध्या कोविड १९ मुळे भयग्रस्त वातावरण असतानाच भूकंपाच्या छोट्या वा मोठ्या धक्क्यांची वारंवारिता वाढल्यासारखी वाटावी असे तीन एक धक्के फार थोड्या कालावधीत अनुभवास आले.

ह्या मागे पृथ्वीच्या चुंबकीय धृव्वांचं उत्क्रमण (geomagnetic reversal) प्रक्रिया सुरू झाली असण्याची शक्यता आहे का ?

पृथ्वीचे चुंबकीय क्षेत्र

आपणा सर्वाना माहीत आहे की पृथ्वीच्या भोवती चुंबकीय क्षेत्र आहे ज्याचा चुंबकीय दक्षिण धृव्व भौगोलिक उत्तर धृव्वावर असतो आणि चुंबकीय उत्तर धृव्व भौगोलिक दक्षिण धृव्वावर असतो. बरं भौगोलिक व चुंबकीय धृव्व अगदी एकाच बिंदूवर नसतात तर त्यात थोडं अंतर असतं कारण पृथ्वी स्वत:च्या अक्षाशी थोडा अंश करून असते. (सध्या भौगोलिक धुव्व व चुंबकीय धृव्व ह्यात १० अंशांचा फरक आहे ).




(चित्र क्र. १ व २)

चुंबकीय क्षेत्राची उपयोगिता 

ह्या धृव्वांवरील चुंबकीय क्षेत्रांचा प्रभाव सर्व पृथ्वीच्या भोवती असतो. ह्या चुंबकीय क्षेत्रामुळे सौरवात व त्यातील सौरकण तसेच वैश्विक किरणांचा मार्ग बदलला जातो. मात्र जर काही कारणांमुळे ह्या चुंबकीय क्षेत्राची ताकद वा प्रभाव ह्यात कमतरता आली तर सौरवात, सौरकण व वैश्विक किरण ओझोनच्या थराचं नुकसान करून किरणोत्सर्ग वाढवून समस्येत भर घालू शकतात. सध्या आफ्रिका व लॅटीन अमेरिकेच्या मधल्या भागात चुंबकीय क्षेत्राच्या प्रभावात लक्षणीय घट आढळून आली आहे, ज्यास South Atlantic Anamoly (दक्षिण ॲटलांटीक विसंगती) असे म्हणतात आणि ह्यामागील एक शक्यता चुंबकीय धृव्व उत्क्रमणाची असू शकते असं शास्त्रज्ञान्चे मत आहे .


(चित्र क्र. ३)

चुंबकीय धृव्वीय उत्क्रमण म्हणजे काय ?

लेखाच्या सुरूवातीला म्हटल्याप्रमाणे पृथ्वीचे भौगोलिक धुव्व आणि चुंबकीय धृव्व एकाच बिंदूवर नसून एकमेकांपासून थोडे दूर आहेत. तसेच हे चुंबकीय धृव्व स्थिर नसून हलत असतात. ते हलत असतात कारण पृथ्वीच्या भूगर्भाच्या वरच्या थरात (जमिनीखाली २८०० कि. मी. पर्यंत) अग्नीजन्य शिलारसाची जी हालचाल चालू असते त्यामुळे हे चुंबकीय क्षेत्र स्थिर न रहाता हलते रहाते आणि हलणारे चुंबकीय क्षेत्र प्रतिपरिणाम म्हणून अग्नीजन्य शिलारसाच्या हालचालीवर परिणाम करते.



(चित्र क्र. ४ व ५)

चुंबकीय धृव्वीय उत्क्रमणाच्या प्रक्रियेत पृथ्वीचा चुंबकीय उत्तर धृव्व कालांतराने चुंबकीय दक्षिण धृव्व बनतो आणि  स्वाभाविकपणे त्याच वेळेस चुंबकीय दक्षिण धृव्व चुंबकीय उत्तर धृव्व बनतो. ह्यालाच चुंबकीय धृव्वीय उत्क्रमण असे म्हणतात. साधारण दर अडीच लाख ते पाच लाख वर्षात अशी धुव्वीय अदलाबदल होते. म्हणजे पृथ्वीच्या जन्मापासून ते आत्तापर्यंत अनेकदा असं झालं असेल.  आता हे चुंबकीय धृव्व उत्क्रमण का होतं हे कोडं शास्त्रज्ञाना अजून उलगडलेलं नाही. मात्र ते होतं हे नक्की.
यापूर्वीचे चुंबकीय धृव्व उत्क्रमण कधी झाले होते ?
ह्याबाबतचे पहिले प्रायोगिक निरीक्षण १९६० साली फ्रान्समधल्या  Clermont-Ferrand जिल्ह्यातील Laschamp येथील लाव्हारसाच्या प्रवाहामुळे केले गेले. साधारणपणे ४१६०० वर्षांपूर्वी हे अल्पकालीन उत्क्रमण झाले. अल्पकालीन अशासाठी की ह्या उत्क्रमणाचा आयुष्यकाल फक्त साधारणपणे ४४० वर्षांचा होता.  मात्र, दीर्घकालीन उत्क्रमणाचा विचार केला तर आपल्या माहितीतले असे दीर्घकालीन उत्क्रमण  साधारणपणे ७८६००० वर्षांपूर्वी झाले. आधी शास्त्रज्ञ असं मानायचे की ह्या प्रक्रियेस हजारो वर्ष लागतात. पण नजीकच्या काळातील संशोधन असे दाखवते की ७८६००० वर्षांपूर्वीच्या ध्रुवीय उत्क्रमणाची प्रक्रिया १०० वर्षातच पूर्ण झाली. मात्र त्या आधी चुंबकीय क्षेत्रातील अस्थिरतेचा कालावधी जवळपास ६००० वर्षांचा होता. सध्याचे निरीक्षण देखील असे दाखवते की आपल्या अपेक्षेपेक्षा (वर्षाला १ अंश) जवळपास दहापट वेगाने ही धृव्वीय उत्क्रमण प्रक्रिया सुरू असेल.  थोडक्यात पृथ्वीच्या चुंबकीय धृव्वांची जागा वर्षाला १० अंशाने बदलत असण्याची शक्यता आहे . वर उल्लेखलेल्या South Atlantic Anamoly मागे पण हेच कारण असू शकते.

चुंबकीय धृव्वा उत्क्रमणाचा अभ्यास कसा करतात ?

आता हा कालावधी शास्त्रज्ञ कसा नक्की करतात ? ह्या उत्क्रमण प्रक्रियेच्या अभ्यास व निरीक्षणासाठी शास्त्रज्ञ, समुद्रातील गाळ, लाव्हारसाच्या प्रवाहदिशेतील बदल, मनुष्यनिर्मित वास्तू व वस्तूंमधील बदल (हे मला अजून तितकसं स्पष्ट झालेलं नाही) इत्यादी गोष्टींचा अभ्यास करतात. शिवाय  अशावेळेस भूविवर्ती कवचखंड विस्थापित होतात व तयार झालेल्या पोकळीत अग्नीजन्य शिलारस भरला जातो आणि जेव्हा तो थंड होऊन अग्नीजन्य खडक / प्रस्तर तयार होतात तेव्हा त्यातील थरांवरून व थरांच्या दिशांवरून सुद्धा हा अभ्यास केला जातो. स्थिर चुंबकीय क्षेत्र असताना अग्नीजन्य खडकातील थरांची मांडणी विषुववृत्तीय पातळीशी समांतर असते. मात्र उत्क्रमण प्रक्रियेच्या कालावधीत ही दिशा बदलते. जणू खडकात चिरस्थायी झालेली होकायंत्रेच. आधुनिक काळात ह्या सर्व अभ्यासांबरोबरच उपग्रहातून, पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राच्या ज्या प्रतिमा घेतल्या जाताहेत त्यांचा देखील उपयोग केला जातोय.
ह्या वैश्विक घटनेचे परिणाम काय होतील ?
वर उल्लेख केल्याप्रमाणे ही घटना पुष्कळ वर्षे घडत असते. भूकंप, त्सुनामी, चक्रीवादळ, उल्काखंडाशी टक्कर अशी अचानक नसते. पण तरीही ह्या घटनेचे (चुंबकीय क्षेत्राची ताकद कमी होणे व चुंबकीय धृव्वांची अदलाबदल) परिणाम दूरगामी असू शकतात.

परिणाम १ - ओझोन थराचे नुकसान व वैश्विक किरणांचा वाढीव किरणोत्सर्ग.

परिणाम २ - अवकाशातील काही कृत्रिम उपग्रहांच्या परिवलन व कार्यप्रणालीत अडचणी येणे वा ते कायमस्वरूपी बंद होणे.

परिणाम ३ - परिणाम २ चाच एक भाग म्हणून पृथ्वीवरील दूरसंचार संवाद उपकरणात बिघाड / कायमस्वरूपी बिघाड.

परिणाम ४ - स्थलांतर करणारे पक्षी व प्राणी ह्यांच्या स्थलांतरात अडचणी व त्यामुळे त्यांच्या जीवनावर प्रभाव. (काही बॅक्टेरिया मात्र असे असतात की ते ह्या अदलाबदलीप्रमाणे स्थलांतर करतात.)

एक दूरची शक्यता जी माझ्या डोक्यात आली - अग्नीजन्य शिलारसाची हालचाल आणि पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राची हालचाल ह्यांच्या परस्पर परिणामांचा जो संबंध आपण वर पाहिला त्यामुळे अशी शक्यता असू शकते की धृव्वीय उत्क्रमण प्रक्रिया अपेक्षेपेक्षा अधिक वेगाने होत आहे ह्याचाच अर्थ अग्नीजन्य शिलारसाची हालचाल देखील वेगाने होत आहे का ? त्यामुळे भूकंपाचे धक्के बसताहेत का ? अर्थात ही माझी शंका आहे ज्यास वरील माहितीखेरीज कुठलाही शास्त्रीय निरीक्षणांचा वा स्पष्टीकरणांचा आधार नाही . असो.

तर अशी ही एक अत्यंत महत्वाची शास्त्रीय वैश्विक घटना की जिच्या प्रक्रियेची सुरूवात होण्याचे आपण कदाचित साक्षीदार आहोत. अर्थात धृव्वीय उत्क्रमण प्रक्रिया खरोखरच सुरू झाली आहे किंवा काय याबद्दल शास्त्रज्ञ अजूनही माहिती व निरीक्षणे गोळा करत आहेत.

मात्र आपण नाही तरी पुढील कोणत्यातरी पिढीला तो अनुभव येऊ शकेल - जर तोपर्यंत मानवजातीने स्वत:चा विनाश ओढवून घेतला नसेल तर.

---- मनिष मोहिले




Friday, July 10, 2020

सुरा आणि सुरापान

सुरा आणि सुरापान.

सुरा !! सुरा म्हटलं की कसं छान, कलात्मक आणि रसिक बनून रसास्वाद घेत असल्यासारखं वाटतं. जो प्राशनातील रसिकता अनुभवण्यासाठी व मजा घेण्यासाठी पितो तो सुरापानच करतो. ह्या मजेत व रसिकतेत जी हलकी नशा अध्याहृत आहे ती असायलाच हवी. उर्दूत त्यासाठी सुरूर असा अतिशय चपखल बसणारा नशीला व सुरेल शब्द आहे. तर सुरूर हवा. हा सुरूर हा सुराप्राशनाबरोबरच आसमंत, वातावरण, मूड व साथसंगत ह्यावर अवलंबून असतो. ह्यात साथसंगत अतिशय महत्वाची. कोणाबरोबर बसून सुरापान होतं ह्यावर ठरतं की प्राशन केली जातेय ती सुरा आहे की  दारू. म्हणूनच सुरापानात मैत्री अतिशय महत्वाची.

सुरापानाचे स्वत:चे असे काही शिरस्ते आहेत. नियम नाहीत ते. पण नियमांइतके कडक व सक्तीचे नसले, तरी हे शिरस्ते पाळून सुरापान केल्यास अधिक मजा येते. कोणत्या प्रकारची मदीरा कोणत्या चखण्याबरोबर, कोणत्या वेळी, कोणाच्या संगतीत व कुठल्या प्रकारचं संगीत ऐकताना घेतली तर झकास सुरूर चढतो ह्याचे काही सर्वमान्य असे सिद्धांत आहेत. सुरापानाचं हे छोटसं शास्त्रच आहे म्हणा ना. त्या शास्त्राप्रमाणे गेल्यास सुरापान सोहळा होतो. बघा, पटतय का ते !

बिअर - फेसाळती, थंडगार; जिला चिल्डssssअ म्हणावं अशी बिअर. भर उन्हाळ्यात ऐन दुपारी एक अशी तहान लागते जी बिअरनेच भागू शकते. ही तहान त्यांनाच कळते ज्यांनी बिअरचा आस्वाद घेतला आहे. आयुष्यातील सुरापानाच्या अध्यायाच्या सुरूवातीची  ही पहिली अशी सुरा जिची दीक्षा आपल्यापेक्षा अधिक अनुभवी मित्राकडून आपल्याला मिळते -  "घे रे च्यायला ! एका बिअर नी काही होत नाही. ही काही व्हिस्की नाही चढायला" हा  बहुतेकदा त्या दीक्षेचा मंत्र असतो.
आणि जेव्हा तो थंडगार घोट घशाखाली उतरतो - आ हा हा ! तिथे बिअर बरोबर जो ऋणानुबंध जुळतो तो आयुष्यभरासाठी.  हे नातं इतकं घट्ट होतं की बिअर मगमध्ये फेस हवा किंवा नको त्याप्रमाणे ओततानाचा हाताचा ॲंगल आपोआप ॲडजस्ट होऊ लागतो - आपल्याही नकळत.
अशी तर बिअर प्यायला कुठची अमूकच वेळ हवी असं नाही. उन्हाळ्यातली दुपार / संध्याकाळ जास्त प्रेफरेबल असली तरी थंडीतल्या रात्रीसुद्धा बिअर तितकीच मजा घेऊन पिता येते. फक्त बरोबर बसायला भरपूर मोकळा वेळ असलेली दोस्तमंडळी  हवीत. चखण्याला वेफर्स, चीझलिंग्झ अशी हलकी फुलकी मंडळी चालतात. एका बाजूला आर डी ची एक से एक गाणी चालू असावीत आणि दुसरीकडे कुठल्याही विषयावर गप्पा मारू शकणारी दोस्त मंडळी. ही एक जबरदस्त एनर्जी लेव्हलची कॉन्सर्ट चाललेली असते. हॅपी मूडची. ही मैफिल मग घड्याळ विसरायला लावते. आयुष्याच्या सुरूवातीची काही दोस्त मंडळी जशी शेवटपर्यंत साथ देतात तशीच आपल्यासाठी मदीराजगताचं दार उघडणारी बिअर पण शेवटपर्यंत साथ करते.

ओल्ड मंक - ओल्ड मंक म्हटलं की त्या आवाजातूनच आपसूकच धुंद करणारा असा एक थोडासा गोड सुगंध नासिकेला जाणवून जातो. सुरापानाच्या दुसरे पायदान पे येते ओल्ड मंक. मी रम न म्हणता ओल्ड मंकच म्हणतोय लक्षात घ्या. जगात अनेक रम होत्या, आहेत आणि येतील. पण ओल्ड मंक ती ओल्ड मंक. तशा तर किती तरी नट्या होत्या, आहेत नी येतील. पण मधुबाला ती मधुबालाच. हे तसंच प्रेम आहे. हार्ड ड्रिंकची दीक्षा ओल्ड मंक विथ थम्स अप ने होते आणि त्या लालसर पाण्याच्या प्रेमात आपण पडतो ते कायमचे. रम ही सहसा अत्यंत जिगरी अशा एकाच मित्राबरोबर बसून प्यायची चीज. आपण ज्याच्यापुढे सगळं काही ओपनली, काहीही हातचं राखून न ठेवता बोलू नी वागू शकतो अशा मित्राबरोबर. वयानुसार प्रेमातली घालमेल, करीयर, आयुष्य अशा विषयांवर वन टू वन आणि हार्ट टू हार्ट अशा गप्पा. रमबरोबर सगळ्यात उत्तम चखणा म्हणजे घरगुती चिवडा, दाणे आणि चिकन अथवा सुकं मटण. इतर हार्ड ड्रिंक्स मध्ये सहज चालणारा किंबहुना हवाच असलेला बर्फ, ओल्ड मंकच्या  बाबतीत मात्र थोडासा उपराच ठरतो. म्हणजे तो निषिद्ध आहे असं नाही. पण रम चा गरमपणा, घोट घशातून खाली उतरताना अनुभवायचा असेल तर बर्फ नसलेलाच उत्तम. पार्श्वभूमीला  मूडप्रमाणे किशोर / आर डी / लता / गुलझार ह्यांच्यापैकी कोणीतरी किंवा हे सर्व आळीपाळीने हवेत. ओल्ड मंकसाठी आयडियली पावसाळी संध्याकाळ हवी जी ह्या सगळ्या गप्पात, पार्श्वभूमीला चालू असलेल्या गाण्यांत आणि ओल्ड मंकच्या साथीने रात्रीत कधी बदलते ते कळतही नाही. अगदी उघड्यावर घेण्यासाठी सुद्धा ओल्ड मंक सारखं दुसरं ड्रिंक नाही. दुसऱ्या दिवशीची सकाळ पण अगदी फ्रेश.

व्होडका/जिन - स्वत: बिनरंगाची असूनही, "सागराला" (सागर - मदीरेचा प्याला /जाम) अनेक रंग प्राप्त करून देणाऱ्या ह्या भगिनी. विविधरंगी कॉकटेल्स चा लुत्फ उठवायचा असेल तर व्हाइट ड्रिंक सारखं ड्रिंक नाही. नशील्या निळ्या रंगाचं ब्ल्यू कुराकाओ मिसळून निळ्या रंगाचा सागर बनवा किंवा टोमॅटो प्युरे मिसळून लाल रंगाच्या ब्लडी मेरीला पाचारण करा. थोडा झणझणीत झटका हवा असेल तर उभ्या कापलेल्या हिरव्या मिरचीवर मदीरा ओतून जोडीला लेमन ज्यूस, स्वीटनर, क्रश्ड पुदीना आणि ग्लासाच्या कडेला लिंबाची गोल चकती लावून मोहीतो चा बेत बनवा आणि मस्त रोमॅंटीक गुलाबी रंग हवा असेल तर सोलकढी मिसळून बघा. कुणा गुलाबी गालाची लाइटर शेड ग्लासात येते की नाही बघा. बर्फ - हवाच हवा. मस्ट यादीत. आता अशा रंगीतसंगीत, मनमिळाऊ, आर्टिस्टिक मदीरेचं प्राशन करायला ग्लासेस पण तसेच नाजूक कलाकुसरीचे, विविध आकाराचे, सडसडीत ऊंच असे हवेत. चखण्यात देखील व्हेज नॉनव्हेज दोन्हीतले थोडे नवलाईचे आयटम असावेत जे ग्लासातील कलात्मक ड्रिंक ला कॉंप्लीमेंट करतील. आणि सोबतीला - जवळचे मित्र मैत्रिणी आपापल्या जोडीदारांसमवेत. ह्या मैफिलीत स्त्रिया असणं आवश्यक आहे. पण त्यात Gin is a lady's drink असा गैरसमज नसावा. Lady's drink म्हणून प्रसिद्ध असलेली ही सफेद सुरा जोर का झटका धीरे से कधी देते कळत नाही. व्होडका किंवा जिनच्या मैफिलीत पार्श्वभूमीला कोणतं संगीत चालू आहे हा दुय्यम मुद्दा असतो. जमलेल्यांच्या फर्माईशीनुसार ते म्युझिक स्वत:च संगीतखुर्ची खेळत असतं बहुदा. पण ती उणीव; होणाऱ्या गप्पा आणि गोंगाट भरून काढतात.

व्हिस्की - संगीतात जशी शास्त्रीय संगीताची मैफिल तशी सुरापानात व्हिस्कीपानाची बैठक. इथे उतावळेपणा, उच्छृंखल्पणा कामाचा नाही. बिअर वेळप्रसंगी टिन / पाइंट वा वेळप्रसंगी अगदी मोठी बाटलीसुद्धा तोंडाला लावून पिता येते. रम वेळ पडल्यास थम्स अपच्या बाटलीत मिक्स करून पिता येते. पण व्हिस्कीला इतमाम लागतो. ब्लेंडेड व्हिस्की, स्कॉच, बॉर्बान,  सिंगल माल्ट, कॉर्निॲक - जी मदीरा असेल त्याप्रमाणे निवडलेले ग्लासेस, पाण्याचा शक्यतो काचेचाच जग, सोडा, आईस बॉक्स इ. इ. चखण्यात सुद्धा दाणे, पापड, फ्राइड फिश व डिप, एखादा फ्राइड व्हेज आयटम असं सगळं वेगवेगळ्या डिशमधून नीट मांडलेलं हवं. मग व्हिस्कीचा प्रकार आणि पिणाऱ्याची आवड ह्याप्रमाणे नीट, ऑन द रॉक्स, पाणी किंवा सोडा मिक्स केलेली  अशी ती सोनसळी पिवळी व्हिस्की ग्लासात यावी. चिअर्स झालं की हलकेच दोन बोटं बुडवून बैठकीच्या जागेला तिच्या मानाचे दोन थेंब द्यावे आणि एक छानसा घोट घेत ती कडवट, धुरकट चव जिभेवर काही काळ रेंगाळू द्यावी नी मैफिलीला सुरूवात करावी. कोरम - शक्यतो तीन ते चार जणांचा. क्रिकेट, राजकारण आणि तत्वज्ञान हे मुख्य चर्चाविषय आणि पार्श्वभूमीला आशा, किशोरी किंवा गुलाम अली वा जगजीत.

वाईन - पुराणकालापासून वारुणी ह्या नावाने त्रैलोक्यमान्यता लाभलेली ही पुरातन सुरा. तरुणींच्या लत्ताप्रहाराने कुस्करलेली द्राक्षे हिरव्या रंगाची होती की काळ्या यावर वारुणी श्वेत रंगाची की रक्त वर्णाची हे ठरत असलं तरी लत्ताप्रहार करणाऱ्या युवतींच्या सौंदर्यात, वारुणीच्या चवीवरून डावं उजवं ठरवणं कठीण. इतर सर्व सुरा ह्या भोजनपूर्व प्राशन केल्या जात असल्या तरी वाईन अर्थात वारुणी ही एक सुरा अशी की जी भोजनोत्तर आणि रात्रीच्याच वेळी पिणे योग्य. यातील श्वेत वारुणी ही सहसा यश, आनंद साजरा करण्यासाठी योग्य. घटना किती खाजगी यावर उपस्थितांची संख्या अवलंबून. पण रक्त वारुणी मात्र खास सखीबरोबर प्राशन करायची सुरा. तिथे थ्री इज ऑलवेज अ क्राऊड. रक्त वारुणी प्राशन करताना चढणारा सुरूर हा वारुणीचा की सखीच्या सोबतीचा हे असं कोडं की जे  पडावं  जरूर पण सोडवायची ईच्छा होऊ नये. कधी सखी नसेल बरोबर तर एकट्याने घ्यावी रक्तवारुणी. तिच्या संगतीतील आठवणी तिची अनुपस्थिती भासून देणार नाहीत. रक्तवारुणी घेताना पार्श्वभूमीला अगदी मंद आवाजात लता / आशा ह्यांचा आवाज असावा किंवा इंस्ट्रूमेंटल. तरल अशा संगीताच्या साथीने तरलपणे चढणारा तो सुरूर केव्हा आपल्याला जोजवतो ते कळतही नाही. वारुणी ही सुरापानाच्या मैफिलीची भैरवी आहे.

तर मंडळी, अशा ह्या विविध प्रकारच्या सुरा आणि त्यांच्या प्राशनाचं मला पटलेलं शास्त्र. मी सुरूवातीलाच बोललो त्याप्रमाणे, ह्या सर्वात सोबत / संगत महत्वाची. काही वेळेला सर्वच मदीरा एकाच मैफिलीत एकत्र कराव्या लागल्या तर ? तर मित्र व मैत्रीच्या बाबतीत आपण कुबेराहून श्रीमंत आहोत असं मानायचं आणि त्या सर्व मित्रमंडळींबरोबर ती मैफिल यादगार बनवायची.

आमच्या सुदैवाने, आम्हाला असं मित्रमंडळ लाभलं आहे जिथे कॅलेंडरवरील दशकांचे फरक देखील मैत्रीच्या व एकत्रित सुरास्वादाच्या आड येत नाहीत. मैत्र आहे आणि म्हणून मदीरा ही सुरा आहे.

तर मंडळी, असं हे सुरापान शास्त्र. ह्या शास्त्राप्रमाणे सुरापान केलं तर साक्षात अमृतप्राशनाचा आनंद मिळतो आणि अमर होतात ते क्षण, त्या आठवणी आणि त्या मैफिली.

---- मनिष मोहिले 

Tuesday, July 7, 2020

शिवाजी महाराज व लोकमान्य टिळक - देशकारण व साधर्म्य

प्रत्येक देशाच्या जीवनकालात काही कालखंड असे येतात की त्या कालखंडात देशकारणामध्ये - (राजकारण, समाजकारण, अर्थकारण, धर्मकारण) - एक प्रचंड उलथापालथ होते. सगळं काही समूळ ढवळून निघतं आणि काही आमूलाग्र बदल होतात.

आपल्या भारतभूमीच्या बाबतीत बघितलं तर मौर्य साम्राज्याची स्थापना व विलय, ग्रीकांचं व त्यानंतर इतर परदेशी आक्रमकांचं भरतभू वरील आक्रमण, बऱ्याच मोठ्या भागावरील मोगल अंमल, हिंदवी स्वराज्याची स्थापना, विस्तार व विलय, ब्रिटीशांची राजवट आणि भारतीय स्वातंत्र्यलढा अशा प्रमुख घटना दिसतील जेव्हा काही समूळ बदल होत आपल्या देशाचं देशकारण बदललं.

तर ह्या सर्वांमध्ये मराठी वाचकाला ज्याबद्दल  त्यातल्या त्यात अधिक माहीती आहे व जिव्हाळा देखील असे दोन कालखंड म्हणजे हिंदवी स्वराज्याची स्थापना आणि भारतीय स्वातंत्र्यलढा - विशेषकरून त्यातील टिळक व सावरकर ह्यांचे योगदान. हा लेख म्हणजे; छत्रपती शिवाजी महाराज व लोकमान्य टिळक ह्या दोन थोर राष्ट्रपुरूषांनी दोन सर्वस्वी वेगळ्या कालखंडात जे देशकारण केलं त्या देशकारणाच्या संदर्भात दोघांमधील साम्यस्थळे शोधण्याचा एक प्रयत्न आहे.

आपण सर्व हिंदवी स्वराज्याचे संस्थापक म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा जयजयकार करतो. त्यांनी वयाच्या सोळाव्या वर्षी घेतलेली स्वराज्य स्थापनेची शपथ, अफजलखानाचा वध, शाइस्तेखानाची फजिती, आग्र्याहून सुटका ह्या अतिशय नाट्यमय अशा घटनांबद्दल कौतुकाने बोलतो. पण शिवाजी महाराज म्हणजे फक्त ह्या मोजक्या नाट्यमय घटना का ?
त्याचप्रमाणे लोकमान्य टिळक म्हटले की व्यायामासाठी दिलेलं एक शैक्षणिक वर्ष, सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय, किंवा मंडालेची काळ्या पाण्याची सहा  वर्षांची शिक्षा, हेच  महत्वाचं का ?
एखाद्या देशाच्या देशकारणात बदल घडवून आणायला फक्त अशा मोजक्या नाट्यमय घटना कारणीभूत असतात की अजून काही अधिक सखोल असं त्यामागे असतं?

देशकार्यामागची विचारप्रक्रिया

देशकारण बदलण्यामागे असते एक सखोल, हेतूपूर्वक राबवली जाणारी व नाट्यमयता  नसलेली अस्सल विचारप्रक्रिया. अस्सल अशासाठी की प्रत्येक देशाच्या पुनरुत्थानाचे व स्थित्यंतराचे मार्ग वेगळे असतात. प्रत्येक देशाच्या विशिष्ट कालखंडातील स्थिती ही त्या देशापुरती विवक्षित असते आणि त्या स्थितीला लागू होणारी विचारप्रक्रिया ही इतरत्र कुठूनही उचलून तशीच्या तशी वापरता येत नाही. त्यासाठी ती अस्सलच असावी लागते.

जशी विचारप्रक्रिया जिजाऊ आईसाहेबांनी राबवली आणि शिवाजी महाराजांनी पूर्णत्वास नेली. तीनशेहून अधिक वर्ष मुर्दाड होऊन सुलतानांची गुलामी करणाऱ्या ह्या भारतात स्वातंत्र्याची ठिणगी कोणाच्याही  मनात पेटणे शक्य नाही ह्याबद्दल सुलतानांची खात्री झाली होती.  कारण तोपर्यंत  एतद्देशीयांनी तलवार गाजवायची, मुलूख मारायचा; पण कोणा ना कोणा बादशहाचा सरदार / जहागिरदार म्हणून असाच पायंडा पडला होता. आपल्याकडील जनतासुद्धा, सुलतानांकडून कोणाला  किती मोठी जहागिरी वा मनसबदारी मिळते ह्यावर व्यक्तीचं कर्तृत्व व मोठेपण ठरवायच्या मानसिकतेला सरावली होती. ह्या मानसिकतेला व पायंड्याला  जिजाऊ आईसाहेबांनी सुरूंग लावला आणि त्यांच्या ईच्छेला; हिंदवी स्वराज्याची स्थापना करून, मूर्तरूप दिले शिवाजी महाराजांनी. त्यासाठी त्यांनी एक निश्चित मनोभूमिका तयार करून ती मनोभूमिका विविधप्रकारे जनसामान्यांच्यापर्यंत पोचवून त्याना देशकारणात सहभागी करून घेतले.

अगदी अशाच प्रकारे, ब्रिटीश राजवटीत लोकमान्य टिळकांची स्वातंत्र्याची चळवळ जन्माला येइपर्यंत, कोणालाही असं वाटलं नव्हतं की राष्ट्रव्यापी स्वरूपाची भक्कम अशी स्वातंत्र्य चळवळ उभी राहील. कारण त्या काळातदेखील  मॅट्रीकपर्यंतच्या शिक्षणानंतर सरकारी कार्यालयातून कारकून व अधिक शिक्षण म्हणजे वकिली करून सुखवस्तू जीवन जगणे ह्यातच कर्तृत्व शोधत व ईतिकर्तव्यता मानत. मग जमेल तसे समाजकार्य करून एक मानसिक समाधान मिळवायचे. ह्या मानसिकतेला आपल्या स्वतंत्र बुद्धीने नाकारत लोकमान्यांनी वेगळेच पाऊल उचलले व उदरनिर्वाहापुरते उत्पन्न मिळवून इतर सर्व वेळ देशकार्यासाठी वाहण्याचा संकल्प केला व तो निभावून नेला. आपल्या अस्सल व मूलगामी विचारप्रक्रियेतून लोकमान्यांनी एका भक्कम अशा नि:शस्त्र राजकारणाच्या राष्ट्रीय चळवळीचा पाया घातला. सर्वाना आपली वाटेल अशा प्रकारे चळवळीचे स्वरूप बनवून तिला राष्ट्रव्यापी स्वरूप दिले.

राष्ट्रीयत्वाची जाणीव

देशकारणात बदल घडवून आणायला मुळात जनतेमध्ये देशाची / राष्ट्रीयत्वाची भावना जागृत असावी लागते. शिवरायांचं खरं मोठेपण हे की शेकडो वर्षे गुलामगिरीत काढून मुर्दाड बनलेल्या मराठी मनाला त्यांनी जागं केले आणि त्यात स्वत्व, स्वातंत्र्य, स्वराज्य अर्थात एतद्देशीयांचे राज्य व स्वधर्म ह्याबद्दल  अभिमान भावना व जाणीव निर्माण केली व वाढीस लावली. हे राज्य म्हणजे केवळ एका राजाचे राज्य नसून येथील सर्व जनतेचे आहे व त्यासाठी कष्ट व संघर्ष करणे हे आपले परमकर्तव्य आहे असे महाराष्टातील जनतेस वाटावयास लागले हे शिवाजी महाराजांचे सर्वात मोठे यश म्हणावे लागेल.

अगदी अशाच प्रकारची निद्रीस्त समाज परिस्थिती लोकमान्यांच्या वेळेस देखील होती. त्यावेळेस समाजातील जात पात , धर्म, स्त्री पुरूष असे छोटे छोटे भेदभाव इतके वाढीस लागले होते की, राष्ट्रीयत्वाची जाणीव सोडाच पण आपण एका समाजाचे सदस्य आहोत हे सुद्धा लोकाना पटवणं कठीण होतं. अशा काळात, राजकीय स्वातंत्र्य नसताना, जनतेमध्ये प्रथम एकीची व त्यामागून राष्ट्रीयत्वाची जाणीव जागृत करणाऱ्या लोकमान्यांचे कार्य, शिवरायांच्या कार्याइतकेच मोलाचे होते.

गनिमी कावा - शिवरायांचा व लोकमान्यांचा

सुलतानांच्या प्रचंड सैन्यासमोर सरळ युद्धात टिकाव लागणार नाही हे ओळखून शिवाजी महाराजांनी गनिमी काव्याच्या तंत्राचा यशस्वी वापर करत, कमीत कमी सैन्य व युद्धसाहित्याच्या जोरावर  बलाढ्य अशा चार सुलतानशाह्यांच्या छातीवर पाय रोवून हिंदवी स्वराज्य निर्माण केलं आणि राज्याभिषेक घडवून आणून त्यास जगन्मान्यता देखील देवविली.  शत्रूच्या बलस्थानांनाच त्यांची मर्मस्थाने  बनवणे हा गनिमी काव्याचा मुख्य भाग. शिवरायांनी; हत्ती, तोफा, उंट ह्या बादशाही सैन्याच्या बलस्थानाना त्यांची मर्मस्थाने  बनवण्यासाठी मैदानी प्रदेशांऐवजी सह्याद्रीच्या डोंगराळ मुलूखाला युद्धभूमी बनवलं आणि सगळं चित्र पालटून टाकलं.

अगदी त्याचप्रमाणे लोकमान्यांनी; ब्रिटीशांच्या, आम्ही कायद्याचा आदर करतो ह्या दर्पोक्तीचा आधार घेत सनदशीर रित्या परिणामकारक राष्ट्रीय राजकीय चळवळ करण्याचा यशस्वी प्रयत्न केला.
मिळालेल्या मर्यादित वृत्तपत्रीय स्वातंत्र्याचा आधार घेत स्वातंत्र्याची जाणीव निर्माण करत, सरळ सरळ राजकीय स्वरूप नसलेल्या पण लोकांना एकत्र आणणाऱ्या, त्यांच्यातील एकी वाढवणाऱ्या, नेतृत्वगुणाना वाव देणाऱ्या अशा सार्वजनिक गणेशोत्सव व शिवजयंती उत्सवातून लोकांना एकत्र आणत एक राष्ट्रीयत्वाची जाणीव निर्माण केली. नुसतीच जाणीव निर्माण केली असं नाही तर त्यातून एक प्रचंड कृतीशील चळवळ उभी केली. हा गनिमी कावा अशासाठी की लोकमान्यांचं हे पायाभरणीचं काम चालू असताना त्यांच्या स्वातंत्र्यप्राप्तीच्या विचारांचा सुगावा ब्रिटीश सरकारला नव्हता. उलट लोकमान्याना नामदारकी देण्याइतपत ब्रिटीश राज्यकर्ते त्यांच्यावर खूष होते. आणि केले जाणारे उत्सव इत्यादीना ते सरकारविरोधी कृत्यात टाकू शकत नव्हते. टिळक हा ब्रिटीश सरकारचा खरा बलाढ्य व खऱ्या अर्थाने जहाल शत्रू आहे ही जाणीव ब्रिटीशाना उशीराने झाली.

शत्रूच्या गोटात जाऊन दिलेला शह

आग्र्याहून सुटका ही शिवाजी महाराजांच्या जीवनातील सर्वात जास्त थरारक घटना होती असे म्हणावयास हरकत नाही. स्वराज्याच्या सर्वात बलाढ्य शत्रूच्या ऐन घरात जाऊन तिथून त्याच्या हातावर तुरी देऊन निसटणे हा शत्रूच्या गोटात जाऊन त्याला दिलेला सर्वात मोठा शह म्हणावा लागेल. त्यातून पुरंदरच्या  तहातून पुढे आलेल्या आग्राभेटीचा प्रस्ताव मान्य करण्यात देखील शिवरायांचा दृष्टीकोन होता मुघल साम्राज्य जवळून बघण्याचा व अभ्यासण्याचा. औरंगजेबाच्या मुघल साम्राज्याची बलस्थाने व मर्मस्थाने जवळून हेरता यावी ही दूरदृष्टी ठेऊन महाराज आग्र्यास गेले होते.

तद्वतच लोकमान्यांनी देखील त्यांच्याबद्दल  व क्रांतिकारकांबद्दल; लंडनच्या टाईम्समध्ये लेख लिहून बेजबाबदार विधाने केल्याबद्दल टाईम्सचे सर व्हॅलेन्टाइन चिरोल ह्यांच्या विरूध्द इंग्लंडला जाऊन लंडनच्या न्यायालयात, अब्रूनुकसानीचा दावा लढवून स्वत:च्या लढाऊ वृत्तीची साक्ष देत ब्रिटीशांच्या अरेरावीला शह देण्याचा प्रयत्न केला होता. हा खटला लढण्यामागे लोकमान्यांची देखील अशी दूरदृष्टी होती की वृत्तपत्रीय स्वातंत्र्याच्या आवाक्याची व मर्यादांची व्याख्या व राजद्रोहाची व्याख्या न्यायालयीन चौकटीत नक्की व्हावी जेणेकरून पुढील चळवळ त्याआधारे अधिक प्रभावी बनवता येइल.

बलाढ्य सत्तेविरोधात सर्व विरोधकांची एकत्रित आघाडी

चार पातशाह्यांविरुद्ध लढून स्वराज्य स्थापनेस उभ्या ठाकलेल्या शिवरायांनी मुघल सोडून बाकी शाह्यांना लवकरच जेरीस आणून त्यांच्यावर जबरदस्त वचक बसवला. कुतूबशाहाशी तर त्यांनी मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करून उत्तरेच्या मुघलांविरुद्ध दक्षिणेतील राजवटींची आघाडी उभी करण्याचा प्रयत्न केला. एक द्रष्टा व दूरदर्शी राज्यकर्ता म्हणून हे पाऊल फार महत्वाचे होते. त्याचप्रमाणे त्यांच्या पदरी नोकरी मागावयास आलेल्या छत्रसाल बुंदेल्यास, बुंदेलखंड स्वतंत्र करण्याची प्रेरणा देताना; जशी एका कर्तृत्ववान क्षत्रियाची ओळख जगाला व्हावी ही गुणग्राहकता दाखवली  होती तसाच; राजपुतान्यात देखील मुघलांविरूद्ध एक नवीन आघाडी उघडी होऊन, त्यांची ताकद थोडी का होइना वाटली जाइल; असा धूर्त राजकारणी डाव देखील खेळला होता.

लोकमान्यांनी देखील जवळपास शून्य राजकीय हक्क व स्वातंत्र्य असलेल्या गुलाम देशात प्रभावी व परिणामकारक नि:शस्त्र लढा देण्यासाठी, जास्तीत जास्त लोकांचा सक्रीय सहभाग हीच सर्वात मोठी शक्ती आहे हे ओळखून अधिकाधिक लोकांना चळवळीशी जोडण्याचा प्रयत्न आयुष्यभर सातत्याने केला. लोकमान्यांनी देखील नेपाळ, ब्रह्मदेश अशा ब्रिटीश साम्राज्यांतर्गत असलेल्या इतर देशात ब्रिटीशविरोधी आघाडी उघडता येइल का ही चाचपणी केली होती. हेतू स्पष्ट होता की बलाढ्य ब्रिटीशांविरुद्ध एकत्रित आघाडी उघडता येइल का आणि ब्रिटीशांचं जे सर्वात मोठं बलस्थान - त्यांचं साम्राज्य त्यालाच त्यांचं मर्मस्थान कसं बनवता येइल.

सर्वांगीण देशकारणाचा प्रयत्न

शिवाजी महाराजांनी युद्धात अतुलनीय शौर्य आणि रणनीती व कूटनीतीत अतुलनीय कौशल्य दाखवत स्वराज्य स्थापना केली. पण राज्य संपादनाइतकेच; किंबहुना त्याहूनही महत्वाचं व कठीण काम राज्यसंगोपनाचे आहे ह्याची संपूर्ण जाणीव त्यांना होती. त्यामुळेच सततच्या लढायांमधून जो काही वेळ त्यांना मिळाला त्यात त्यांनी राज्यातील महसूल पद्धती व्यवस्थापन, जमीनधारणेचे कायदे, जमा महसूलाचे स्वराज्य विकास व समृद्धीसाठी सुयोग्य विनिमय व्यवस्थापन, तेव्हाच्या परिस्थितीस साजेशी स्वराज्याच्या स्वतंत्र नाण्यांची निर्मिती, ह्या सर्वायोगे अर्थेव्यवस्थेचे नियंत्रण व सुनियमन, न्यायव्यवस्था, सुनियंत्रित व सुनियमित जबाबदार उत्तरदायी ग्रामीण सेवा तंत्र, कला व सांस्कृतिक विकास इत्यादी सर्व क्षेत्रांचा सर्वांगीण विकास व उन्नयन व्हावे म्हणून प्रयत्न केले. हे सर्व करताना महाराजांनी हिंदवी ह्या शब्दाचा एतद्देशीय असा व्यापक अर्थ घेत, धर्म, जात पात बाजूला ठेवत  गुणांच्या जोरावर माणसांची निवड केली.

लोकमान्यांनी देखील स्वातंत्र्यप्राप्तीसाठी चळवळ हा मूळ हेतू असला तरी सामाजिक पातळीवर दारूबंदी चळवळ, आर्थिक पातळीवर पैसाफंड चळवळ अशा उपचळवळी देखील चालू ठेवल्या. केतकरांसारख्या गुणी गृहस्थाने जेव्हा मराठीत विश्वकोश निर्माण करण्याची महत्वाकांक्षा दाखवली तेव्हा त्यांना उत्तेजन दिले. विष्णूपंत छत्र्यांसारख्या त्याकाळी सर्कस सारख्या धंद्यात नाव कमावणाऱ्या व्यक्तीचे महत्व ओळखून राष्ट्रकार्यात जनसंपर्क वाढवण्यासाठी त्यांचा कसा उपयोग होइल ह्याचा विचार केला. त्यात जनसंपर्क ह्याबरोबरच, छत्र्यांची उद्योगधंद्यातील धडाडी पाहून इतरांनी प्रेरीत व्हावे हा ही विचार होता. राष्ट्रकार्यासाठी माणसे जोडताना लोकमान्यांनी देखील देशभक्ती व देशकार्याची तळमळ ह्या गुणविशेषांखेरीज बाकी जात, पात, धर्म ह्या कडे दुर्लक्ष केले. मात्र दोन धर्मात दुफळी पाडून त्याचा दुरूपयोग ब्रिटीश सरकारने करू नये याबाबत ते जागरूक राहीले.

अद्भुत बुद्धीवैभव

शिवराय व लोकमान्य ह्या दोघांनाही अद्भुत बुद्धीवैभवाची ईश्वरीय देणगी मिळाली होती. ह्या बुद्धीमत्तेमुळेच ते पठडीबाहेरचा स्वतंत्र विचार करू शकले आणि तो विचार कृतीत उतरवून राष्ट्रव्यापी स्तरावर देशकारण बदलू शकले.  शत्रूपक्षाशी दिलेली लढत, शह काटशह, सर्वांगीण विकासाचे प्रयत्न ह्या गोष्टी त्या बुद्धीमत्तेच्या द्योतक आहेत. लोकमान्यांनी तर Orion आणि The Arctic Home of Vedas सारखे विद्वज्जड व खगोलशास्त्र आणि गणिताशी संबंधित ग्रंथलेखन देखील केले. गीतारहस्यासारखा भगवद्गीतेवरील अजोड ग्रंथ लिहून स्वत:च्या राष्ट्रास वाहिलेल्या जीवनकार्यास एक निश्चित अध्यात्मिक बैठक देऊन आपल्या चौफेर बुद्धीचा पुरावाच दिला आणि शिवाजी महाराजांनी तर साक्षात योगेश्वर कृष्णाने ज्या नीरक्षीर विवेकाने कलासुंदर परिपूर्ण राज्य केले असते त्या तोडीचे राज्य करून दाखवले.

दुर्दम्य ईच्छाशक्ती व आत्मविश्वास

अपार बुद्धीवैभवाबरोबरच दुर्दम्य ईच्छाशक्ती व अदम्य आत्मविश्वास ह्या दोन बाबतीत या दोन थोर राष्ट्रपुरूषान्मध्ये साधर्म्य दिसून येते. ह्या ईच्छाशक्ती व आत्मविश्वास ह्यांच्याच जोरावर; सामान्य जन जिथे निराशेच्या  गर्तेत कायमचे फेकले जातील अशा प्रतिकूल परिस्थितीतून दोघांनीही सातत्याने मार्ग काढत वैयक्तिक व सामाजिक पातळीवर आशावाद जागृत ठेवला आणि लाखोंना कर्मरत राहून कर्तव्य करत रहाण्याचे बळ दिले, प्रेरणा दिली. आपापल्या काळात संपूर्ण देशाचं देशकारण प्रभावी व परिणामकारकपणे बदलणाऱ्या शिवाजी महाराजांचं युगप्रवर्तकपण आणि लोकमान्यांची लोकमान्यता ह्यांचं खरं रहस्य ह्या दुर्दम्य ईच्छाशक्ती व अदम्य आत्मविश्वासात आहे.

---- मनिष मोहिले

Monday, July 6, 2020

राधा - एक नवा अर्थ

युगंधर मध्ये श्री. शिवाजी सावंत ह्यांनी राधा ह्या नावाचा एक सर्वस्वी वेगळा व नवाच अर्थ सांगितला आहे.
ते म्हणतात राधा हा एक शब्द नसून जोडशब्द आहे. रा म्हणजे मिळो / लाभो आणि धा म्हणजे मोक्ष. या दृष्टीने बघितलं तर मोक्ष मिळो वा लाभो अशी प्रार्थना करणारा प्रत्येक जीव राधा आहे जो सहजच योगेश्वर कृष्णाकडे आकृष्ट होइल - मोक्षप्राप्तीसाठी. या विचाराच्या संदर्भात राधा ही व्यक्ती लिंगनिरपेक्ष ठरते.

मग राधाकृष्णाच्या सर्व कथा प्रणयरम्य अंगानेच का जनमानसात रुढ आहेत ? कारण त्या कविकल्पना आहेत आणि अधिकाधिक जनाना रस निर्माण व्हावा ह्या हेतूने त्या स्त्री पुरूष प्रेमाच्या रुपात (भले अशारीर / आत्मिक असेल ) मांडलेल्या आहेत. त्यात पुढे स्नान करणाऱ्या गोपींची वस्त्रे चोरणे इत्यादी उथळ गोष्टीदेखील सामील केल्या गेल्या. पण जो प्रत्यक्ष परमात्म्याचे रुप होता असा योगेश्वर कृष्ण अशी कृत्ये करेल का ?

म्हणूनच राधा शब्दाची वरील उपपत्ती कळल्यावर कविकल्पनांनी वर्णिलेल्या मर्त्य पातळीवरील कृष्णलीलांचा भगवान श्रीकृष्णाच्या भूमिकेतून मनुष्याने त्या लीलातून काय शिकवण घ्यावी हा अर्थ लावण्याचा मज य:कश्चिताचा हा एक नम्र प्रयत्न.

खेळ आगळा खेळतो कान्हा, प्रिय सखी राधे संगे
चिंब भिजवितो फोडून घट हा, रंग माखितो सर्वांगे

दहीहंडी तो फोडतो केव्हा, द्वाड तया मित्रां संगे
लपवी वस्त्रे मुकुंद जेव्हा, मग्न  राधिका  जलरंगे

मुरली  सुमधूर  वाजवी केव्हा, साद देत  वेणू संगे
जगास  विसरून धावे  राधा,  रंगतसे श्रीरंगा रंगे

भरून रस प्रणयाचा जेव्हा, कविकल्पना पुस्तकी रंगे
प्रश्न उभा हो मनात तेव्हा, नारायण का असेच वागे ?

चिंब भिजवूनी माखणे रंगा, जीवन जगणे पूर्णांगे
प्राशणे दही अन् नवनीता ,  प्रसाद  सेवन अष्टांगे

शिकवण देइ लपवून वस्त्रा, आत्मा वसतो देहांगे
असा प्रभावी स्वर मुरलीचा, जीवन भरतो सतरंगे

कळेल का हो कुणास केव्हा, गूज हरीचे राधे संगे
रा मधूनी प्रार्थिते राधिका, धाचा मोक्ष मिळो हरी संगे

-- मनिष मोहिले 

Sunday, July 5, 2020

पंचम - लेख तिसरा

पंचमवरचा माझा हा तिसरा लेख. पहिल्या लेखात, एस डी सारख्या एका प्रथितयश संगीतकाराच्या पोटी जन्म घेऊन देखील, वडीलांच्या सावलीत लहान होऊन न रहाता; हिंदी चित्रपटसृष्टीला एक नवीन पद्धतीचं संगीत देणारा उद्गाता (trendsetter) संगीतकार म्हणून स्वत:ची ओळख निर्माण करणाऱ्या व वडीलांपेक्षाही कांकणभर अधिक चाहतावर्ग निर्माण करणाऱ्या पंचमच्या कारकिर्दीचा आढावा घेतला होता.

दुसऱ्या लेखात पंचम अनमिक्स्ड ह्या अप्रतिम वृत्तपटातून त्याची  अतिशय गाजलेली गाणी, चाली, पार्श्वसंगीत धून ह्यातील सांगितिक बुद्धीमत्ता व तांत्रिक करामतीबद्दल जी अफलातून माहिती मिळाली त्या माहितीच्या आधारे माझ्या शब्दात पंचमचं वेगळेपण दाखवून देत त्याची मानसपूजा बांधण्याचा प्रयत्न केला होता.

पण पंचमचं कामच इतकं अफाट आणि अप्रतिम आहे की त्याच्यावर लिहू तेव्हढं थोडं अशी परिस्थिती आहे. त्यातून पंचमच्या संगीतावर ज्यांची पौगंडावस्था व तारुण्य पोसलं गेलं , वाढलं अशा माझ्या पिढीतील सर्वच चाहत्यांना पंचमबद्दल अंत:करणात एक विशेष जवळीक आहे. या आमच्या पिढीला पौगंडावस्थेतील तारुण्यसुलभ प्रेम, तारुण्याच्या उंबरठ्यावरची पक्की दोस्ती, ते बिनधास्त आयुष्य, थोडं नंतरचं अधिक अर्थपूर्ण प्रेम, तारुण्य ते प्रौढत्व ह्या टप्प्यावर येणारे आयुषातील अनुभव ह्या सगळ्या भावना अनुभवताना पंचमच्या संगीताची एक विलक्षण सुरेल व अविस्मरणीय साथ मिळाली आणि तिने वाढत्या वयाबरोबर आयुष्य व संगीत ह्या दोन्हीची एक वेगळी प्रगल्भ जाणीव करून दिली. आमच्या दोस्तांच्या जागवल्या जाणाऱ्या रात्री, अचानक मोकळी मिळालेली दुपार अशा कुठल्याही वेळी होणाऱ्या मैफिलींमध्ये पंचम अढळस्थानी होता आणि अजूनही आहे. जसजसे दिवस जातात तसतसं पंचमबद्दलचं प्रेम नी जिव्हाळा वाढत जातोय.

त्या वाढत्या प्रेमाला वाचा म्हणून आता ह्या तिसऱ्या लेखात त्याच्या काही निवडक गाण्यांची खासियत सांगण्याचा व त्या अनुषंगाने त्याच्या संगीतातील प्रतिभावंत प्रगल्भ विविधतेचा आढावा घेण्याचा प्रयत्न करणार आहे मी.

पाश्चात्य संगीताचा पंचमच्या संगीतावर प्रभाव होता असं म्हटलं जातं आणि तसा तो होता सुद्धा. विशेषतः पंचम तरुण असताना त्याच्या संगीतावर हा प्रभाव विशेष दिसतो असं म्हणावं लागेल. पंचमच्या वाद्यवृंदातील पाश्चात्य पद्धतीची वाद्ये, पाश्चात्य पद्धतीचा प्रभाव असलेली स्वरसंमेलन व्यवस्था ह्यामुळे ते अधिकच जाणवायचं. हिंदी चित्रपटसंगीताला एकध्वनी पद्धतीतून बहुध्वनी पद्धतीत घेऊन जाणाऱ्या संगीतकाराच्या वाद्यवृंदात हे असावं ह्यात आश्चर्य कसलं ?

आश्चर्य आहे ते हे की पंचम म्हणजे पाश्चात्य संगीत असा ग्रह असणाऱ्या अनेकांना हे ठाऊक नाही की छोटे नवाब ह्या पंचमने संगीत दिलेल्या त्याच्या पहिल्याच चित्रपटात घर आजा घिर आये बदरा सावरिया हे मालगुंजी रागातलं अप्रतिम गाणं शंभर टक्के भारतीय शास्त्रीय संगीत असलेल्या गीताचा उत्कृष्ट नमुना आहे.
छोटे नवाब मधील ह्या गाण्याशिवाय ही इतर काही गाणी जी पंचमच्या हिंदुस्तानी शास्त्रीय संगीतातील ज्ञानसिद्ध जाणकारीचा पुरावा आहेत - ओ गंगा मैय्या (राग जोगिया, चित्रपट चंदन का पलना), रैना बीती जाये (तोडी व खमाज, अमरप्रेम), बीते ना बितायी रैना (यमन कल्याण, परिचय), मेरे नैना सावन भादो (शिवरंजनी, मेहबूबा), है अगर दुश्मन (कलावती, हम किसी से कम नही - कव्वाली), पिया बावरी (बिहाग, खूबसूरत), हमें तुमसे प्यार कितना (भैरवी, कुदरत), हमें और जीने की (आसावरी, अगर तुम ना होते), क्यूं नये लग रहे (खमाज, १९४२ अ लव्ह स्टोरी).

तरीही वरील यादीत अजून अमरप्रेम, आँधी, इजाजत, लिबास, खूशबू, किनारा, नमकीन ह्या अत्युत्कृष्ट संगीत असलेल्या चित्रपटातील इतर बऱ्याच गाण्यांचा उल्लेखही नाही झालेला. अर्थात ही सर्वच गाणी इतकी अप्रतिम आहेत की एकेका चित्रपटातील गाण्यांवर एक एक स्वतंत्र लेख लिहावा लागेल.

रक्तात संगीत असलेल्या आणि उस्ताद अली अकबरखान व पंडीत सामता प्रसाद यासारख्या शास्त्रीय संगीतातील दिग्गजांकडे तालीम घेतलेल्या पंचमची; सूर, ताल, लय, ठेका, राग, स्वरमाधुर्य, गायक गायिकेचा आवाज व वाद्यांचा ध्वनीपरिणाम यातील व वेगवेगळ्या वाद्यांच्या ध्वनीपरिणामातील सुसंवाद ह्या सर्वांवर कमालीची पकड होती. त्यामुळेच ताल, ठेका, ध्वनीपरिणाम इत्यादीमध्ये तो  अभिनव प्रयोग करू शकला व यशस्वीपणे करू शकला.

इजाजत मधलं छोटीसी कहानी से बारीशों के पानी से गाणं आठवा. ओल्याचिंब हिरव्यागार डोंगरातील पावसाचं अप्रतिम छायाचित्रण असलेल्या ह्या गाण्याची खासियत ही की समोर चित्र नसेल, किंबहुना गुलझारची अफाट कविता जरी नसेल तरी फक्त संगीतातून व चालीतून देखील तो डोंगरातील पावसाच्या पाण्याचा खळाळ व ओला ताजवा आपल्याला जाणवतो. गाण्याच्या शब्दांशी व मूडशी  (स्वभावलहरीशी) इतकं तादात्म्य पावणारं संगीत द्यायला देवाघरूनच झोळी भरून आणावी लागते. पंचमची झोळी ओसंडून जाण्याइतकी भरलेली होती.
पण मी सांगतोय ते ह्या गाण्यातील  दुसऱ्याच खासियत बद्दल. ह्या गाण्यात पंचमने twin track ह्या तंत्राचा फार कुशलतेने वापर केला आहे. एका track वर आशाच्या अलौकिक आवाजातील मुखडा वा अंतरा सुरू असताना त्याचवेळेस दुसऱ्या track वर तिच्या आवाजातील आलापी तितकीच स्वच्छ ऐकू येते. दोन्हीही tracks एकमेकांचा तोल सांभाळत एकमेकांना पूरक व सुसंवादी ठरत समांतर प्रवास चालू ठेवतात आणि एक अद्भुत संगीतानुभव देतात.

आता twin track तंत्राचा हा प्रयोग पंचमने सर्वप्रथम केला होता तब्बल वीस वर्षं आधी १९६७ साली बहारों के सपने मध्ये. क्या जानू सजन होती है क्या गम की शाम हे ते गीत. गायिका होती लता. त्यातही एका track वर लताच्या स्वर्गीय आवाजात मुखडा वा अंतरा आणि दुसऱ्या track वर त्याचवेळेस तिची सुमधुर आलापी असा अद्भुत सूरसिंगार आहे. आजही हे अप्रतिम गाणं ऐकताना श्रवणेंद्रिय तृप्त होतात. फक्त सुमार छायाचित्रणामुळे ह्या गाण्याचा दृष्यपरिणाम कोणाच्याही स्मरणात राहिला नसेल. पण गाणं आज ही ताजं आहे. ही पंचमची थोरवी. पंचम काळाच्या पुढे होता तो असा.

एक असंच उल्लेखनीय गाणं म्हणजे गोमती के किनारे मधील आओ आओ जाने जहा. या गाण्यात पंचम ने  संयत व संयमितपणे twin track तंत्र वापरले आहे. संयत व संयमित अशासाठी की वर उल्लेखलेल्या दोन गाण्यात दोन्ही tracks सारख्याच प्रभावीपणे वाजतात व ऐकू येतात. पण आओ आओ जाने जहा मध्ये मुख्य गायिका वा गायक ह्यांचा आवाज व्यवस्थित मोठा ऐकू येतो तर दुसऱ्या track वरील कोरस हा पार्श्वभूमीला असल्याचं भान राखून हळू पण स्पष्ट ऐकू येतो. त्यातही twin track ला दिलेला twist म्हणजे मुख्य गायक / गायिका मुखडा गात असताना कोरसची चाल अंतऱ्याची आहे आणि मुख्य गायक गायिका अंतरा गात असताना कोरसची चाल मुखड्याची आहे.  तंत्र तेच असलं तरी त्याचा उपयोग करायची पद्धत पूर्णपणे वेगळी, अस्सल. हा खास पंचम टच. जसा मिडास राजा आपल्या मिडास टच ने कोणत्याही वस्तूचं सोनं करायचा तद्वतच पंचम आपल्या अलौकिक संगीतप्रतीभेच्या परीसस्पर्षाने हाती आलेल्या प्रत्येक रचनेचं बावनकशी सोनं बनवायचा.

तांत्रिक बाबींवर आधारीत चमत्कारांशिवाय ताल, गाण्याची पट्टी, वाद्यवृंदव्यवस्था ह्या ज्या निखळ संगीताशी संबंधित बाबी आहेत त्यात देखील पंचमने अतिशय अद्भुत व नवीन पायंडा पाडणारी कामगिरी केलेली आहे.

गायक वा गायिकेला एकाच गाण्यात अगदी खालच्या पट्टीपासून ते अगदी वरच्या पट्टीपर्यंत गायला लावून ते गाणं सिनेरसिकांच्या गळ्यातील ताईत बनवण्याची किमया दोनदा केलीये पंचम नी - जवानी दिवानी मधलं जाने जा ढूँढता फिर रहा मध्ये किशोर आशा आणि सत्ते पे सत्ता मधलं प्यार हमें किस मोड पे ले आया मध्ये किशोर व इतर गायक कलाकार.

ठेक्याबद्दल म्हणातचं झालं तर पती पत्नी ह्या चित्रपटात सुजीतकुमार व शशिकला ह्यांच्यावर चित्रीत केलेल्या मार डालेगा दर्द ए जिगर ह्या गाण्यात पंचमनी पहिल्यांदा हिंदी चित्रपट गीतात bossa nova ह्या ब्राझिलीयन ठेक्याचा सुरेख उपयोग केला. तिसरी मंझिल च्या अफाट लोकप्रिय अशा आजा आजा मैं हूँ प्यार तेरा आणि ओ हसीना जुल्फोंवाली जाने जहा ह्या गाण्यातून हाच ठेका अधिक परिणामकारक पणे जाणवतो. किंवा तिसरी मंझिलच्या यशामुळे तो लक्षात रहातो. इलेक्ट्रिक गिटार, बॉंगो, ड्रम्स, ट्रंपेट्स, कीबोर्ड ह्या वाद्यमेळाने ह्या गाण्यांमधून बोसा नोव्हाच्या ठेक्याच्या जोडीने असा काही जबरदस्त परिणाम साधला की शम्मीच्या बिनधास्त धसमुसळ्या कासानोव्हा प्रतिमेला साजेसं, चपखलपणे शोभून दिसणारं संगीत देणारा संगीतकार म्हणून पंचमची एक नवीच ओळख हिंदी सिनेसृष्टीला झाली. हिंदी चित्रपटसंगीतात एका नव्या युगाचा जन्म झाला आणि आजही पंचमयुगाचा परिणाम ओसरलेला नाही.

तीसरी मंझिल च्या प्रचंड यशामुळे हिंदी चित्रपट संगीताचं अनभिषिक्त सम्राटपद पंचमकडे आपसूक आलं आणि पुढील जवळपास दोन दशकं तो त्या पदावर विराजमान होता.

हम किसी से कम नहीं ची सर्वच गाणी सुरेख असली आणि लोकप्रिय झाली तरी त्यातील medley ही हिंदी सिनेसंगीतातील एक मैलाचा दगड ठरावा इतकी लोकप्रिय झाली. ह्या एका medley करता दहा दहा वेळा तो चित्रपट पाहिलेले लोक आहेत. आजही ही medley कानावर पडली की हातातील आहे ते काम थांबतं आणि कान व मन त्या अद्भुत संगीताकडे खेचले जातात. अशा ह्या medley ची कल्पना सुचली निर्माता नासीर हुसैन ना. हम किसी से कम नहीं बनत असताना ते लंडनला गेले असता तिथे टिफनीजमध्ये त्यांनी बघितलं की मुलामुलींचा एक गृप स्टेजवर एका गाण्यावर डान्स करतोय. पण गाणं संपलं की ना गाणं थांबतय ना डान्स. त्या संपलेल्या गाण्याच्या पाठोपाठ सलगपणे दुसरंच गाणं सुरू होतय आणि तो गृप तितक्याच सलगपणे दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या गाण्यावर डान्स करत जातोय. नासीर हुसैनना ही कल्पना विलक्षण आवडली आणि हम किसी सेकम नहीं मधील डान्स कॉम्पिटीशनच्या सीन मध्ये त्यांनी ह्या नवीन कल्पनेचा वापर करायचं ठरवलं. पंचमला त्यांनी सांगितलं की ह्या सीन साठी मला एक नाही तर चार एक वेगवेगळ्या चालीतली स्वतंत्र गाणी हवीत. पण ती अशी हवीत की एका गाण्यामागून दुसरं गाणं बेमालूमपणे सुरू व्हावं. प्रयोगशीलता हा ज्याच्या स्वभावाचा आणि संगीताचा स्थायीभावच होता अशा पंचमनी हे अवजड शिवधनुष्य लीलया पेलत नासीरसाबना हवी तशी medley दिली. ती ऐकल्यावर बऱ्याच लोकांनी त्यांना सांगितलं की हे खूप रिस्की आहे. एकही गाणं लोकांच्या लक्षात रहाणार नाही वगैरे. पण नासीर हुसैनचा पंचमच्या संगीतावर आणि स्वत:च्या अंत:प्रेरणेवर विश्वास होता. त्यांनी त्या medley सहीतच चित्रपट प्रदर्शित केला आणि स्वत:चं वैशिष्ट्य सांभाळूनही एकमेकाशी सहज व सुरेलपणे संलग्न होणाऱ्या सहा गीतसंगीत खंडांच्या व दहा मिनीटं चालणाऱ्या medley ने - पंचमच्या medley ने इतिहास घडवला.

पावलांनी आपोआप ठेका द्यायला सुरूवात करावी, ते जागच्या जागी थिरकायला लागावेत अशा मस्त धमाल संगीताबरोबरच, पंचमने अतिशय तरल, भावपूर्ण, प्रणयरम्य, आर्त असं संगीतदेखील भरपूर दिलं आहे. गाण्याचे शब्द, चित्रपटात ते ज्या सिच्युएशनला आहे ती सिच्युएशन, गाण्याचा मूड आणि दिग्दर्शकाचा दृष्टीकोन ह्या सर्व गोष्टी ध्यानात घेत सर्वाना सामावून घेत पूरक ठरणारं संगीत देण्यात पंचमचा हात धरू शकेल असा कोणी इतर संगीतकार विरळाच.

गुलझार सारख्या एका अतिशय प्रतिभावान कवी व दिग्दर्शकाने ह्याबाबतची पावती पंचमला दिली आहे. एका मुलाखतीत गुलझार म्हणाला होता की ज्या माध्यमातून पंचमचं संगीत लोकांपर्यंत पोचायचं त्या चित्रपट ह्या माध्यमावर एक संगीतकार म्हणून त्याची विलक्षण पकड होती. तो संगीत देताना चित्रपटातील ज्या जागी गाणं आहे त्या सिच्युएशनचे सीन्स सुद्धा डोळ्यासमोर आणत संगीत द्यायचा. गुलझारनीच दिलेलं हे उदाहरण बघा. किताब मध्ये शाळेतील मुलांच्या दंग्याचं जे धमाल "अ आ इ ई, मास्तरजी की आई चिठ्ठी" हे गीत आहे त्याच्या ध्वनीमुद्रणाच्या वेळेस पंचमनी चक्क शाळेची बाकडी रेकॉर्डिंग रूम मध्ये आणवून ती बडवत त्याच्यावर ह्या गीताचा ठेका व वाद्यवृंदव्यवस्था बसवली. गुलझार त्या मुलाखतीत स्वत: म्हणाला होता की पंचमचं गाणं त्याच्या स्वत:कडून नीट पाच सहा वेळा त्यातील बारकाव्यांसह ऐकावं तेव्हा कुठे त्याचं दृष्यांकन परिणामकारकरित्या कसं करता येइल याबद्दल अंदाज येतो. ह्यात एक दिग्दर्शक म्हणून गुलझारच्या बारीक सारीक गोष्टींकडे लक्ष ठेवणाऱ्या शिकाऊ वृत्तीचं जेवढं कौतुक आहे तितकच किंबहुना त्याहून अधिक कौतुक पंचमच्या संगीताचं व एक संगीतकार म्हणून चित्रपट माध्यमावरील त्याच्या पकडीचं आहे.

तिसरी मंझिल, हम किसी से कम नही, कारवाँ, यादों की बारात, ग्रेट गॅंबलर, शोले, हरे रामा हरे क्रिष्णा सारखे मसाला चित्रपट असोत, पडोसन, अंगूर सारखे धमाल विनोदी चित्रपट असोत, परिचय, खूशबू, किनारा, घर, लिबास सारखे कौटुंबिक विषय हाताळणारे चित्रपट असोत, कटी पतंग, मेरे जीवनसाथी, आ गले लग जा सारखे प्रणयरम्य चित्रपट असोत,  अमरप्रेम, आँधी, इजाजत सारखे प्रगल्भ प्रेमकथा हाताळणारे चित्रपट असोत - पंचम चित्रपटातील गाण्याची जागा व मूड हेरून तिथे चपखल बसणारं संगीत देत आला. तरी बघा; प्यार का मौसम, गोलमाल, झील जे उस पार, झूठा कही का, देवता, दीवार, आप की कसम, जवानी दिवानी, शरीफ बदमाश, जहरीला इन्सान, जमाने को दिखाना हैं, खूबसूरत, अब्दुल्ला, हरजाई, बेमिसाल, कुदरत, रॉकी, सनम तेरी कसम, शक्ती, मासूम - हे तर मोजलेच नाहीत वर. आणि अजून कितीतरी बाकी असतील. नव्हे आहेतच.

ऋषी कपूरची गुलछबू प्रणयी नायकाची व dancing sensation (त्या काळचं) ची प्रतिमा तयार होण्यात पंचमच्या संगीताचा फार मोठा वाटा होता.  संजय दत्त चं रॉकीतलं पदार्पण असो वा सन्नी देओल चं बेताबमधलं पदार्पण - ते यशस्वी ठरून त्यांची पुढची  वाटचाल सुकर होण्यात पंचमच्या धुंद करणाऱ्या संगीताचा मोठा वाटा होता आणि स्वत: अमजदखान ने सांगितल्याप्रमाणे; शोलेच्या ज्या गब्बरसिंगमुळे अमजद खान सुप्रसिद्ध व रजतपटावरील ऑल टाईम ग्रेट असा खलनायक बनला त्या गब्बरच्या भूमिकेला, त्याच्यामधील विक्षिप्त क्रौर्याला सिनेरसिकांपर्यंत परिणामकारकपणे पोचवण्यात मोठा हातभार होता पार्श्वभूमीला वाजणाऱ्या आणि अंगावर काटा आणणाऱ्या त्या विविक्षित धूनचा. जेव्हा जेव्हा गब्बर पडद्यावर येतो तेव्हा तेव्हा ती विवक्षित धून वाजते आणि गब्बर बघणाऱ्याच्या काळजाचा थरकाप उडवतो.
संगीतकाराने दिलेल्या संगीतातून अभिनेत्यांची पडद्यावरील प्रतिमा बनत जावी, वाढत जावी असं संगीत देणारे संगीतकार विरळाच. पंचमचं नाव त्या विरळा प्रभृतींच्या यादीत अग्रक्रमावर आहे.

पडद्यावरील नायक नायिकांच्या कारकिर्दीला यशस्वी करण्यात हातभार लावण्याबरोबरच  पडद्यामागे असलेल्या गायक गायिकांच्या बाबतीत सुद्धा असं म्हणता येइल की पंचम ने त्यांच्या गायकीचं चीज करत त्यावर अद्भुताचा मुलामा चढवणारं असं संगीत दिलं की ज्यामुळे त्या त्या गायक गायिकेच्या अप्रतिम गाण्यांच्या यादीत काही अनमोल गीतांची भर पडली.
पंचमकडे गाताना किशोरचा आवाज काही वेगळाच खास भासतो. एरवी इतर संगीतकारांच्या तुलनेत पंचमकडे कमी गायलेल्या लताची काही अजरामर गाणी पंचमकडे गायलेली आहेत. पंचमची संगीतसंगिनी बरोबरच नंतरच्या काळात त्याची जीवनसंगिनी  बनलेल्या आशाच्या  बाबतीत तर बोलायलाच नको.  शास्त्रीय संगीत ते कॅबरे अशी अफलातून रेंज असलेल्या अष्टपैलू आवाजाची मालकीण जेव्हा हे बोलते की दैय्या ये मैं कहाँ आ फसी या कारवाँमधल्या गाण्याची रेंज अफाट आहे तेव्हा पंचमच्या संगीताच्या रेंजबद्दल ह्यापेक्षा अधिक बोलकं भाष्य असू शकत नाही.

असा हा पंचम. त्याच्याबद्दल बोलावं / लिहावं तितकं थोडं वाटतं. असं वाटतं की इतकं सगळं लिहीलं पण अजून बरंच काही आपण लिहीलच नाही. विशेषकरून रैना बीती जाये, आनेवाला पल, बीती ना बिताये रैना, तेरे बिना जिंदगी से कोइ , कहीं ना जा,  हुजूर इस कदर भी ना, प्यार के मोड पे छोडोगे ह्या सगळ्याबद्दल आणि इतर किती किती गाण्यांबद्दल.

पण हे सगळं लेखमालेच्या पुढील भागात.

- मनिष मोहिले