Sunday, June 28, 2020

सातो बार बोले बन्सी

काही दिवस मनात घोळतय की गुलजार वरती परत एकदा काहीतरी लिहावं.

पण काय लिहावं ? कितीतरी जणांनी गुलजारवर; त्याच्या कवितेवर पुष्कळ काही लिहीलं आहे. त्यातील काही तर दादा मंडळी असतील.

अस्मादिकानी सुद्धा गुलजारवर एकदा लिहीण्याचं धाडस केलेलं आहे. त्या लेखात एक संवेदनशील, शब्दांवर अफाट पकड व प्रभुत्व असलेला, अत्यंत  अभिनव कल्पनाशक्तीचं आपल्या कवितातून दर्शन घडवणारा कवी, एक प्रथितयश गीतकार, दिग्दर्शक, कथा व पटकथा लेखक अशा त्याच्या विविध पैलूंबद्दल व त्या क्षेत्रातील त्याच्या यशस्वी कारकिर्दीबद्दल मी लिहीलं होतं. त्याच्या कविता / गाणी / चित्रपट ह्यातील हाताळल्या गेलेल्या विषयांच्या आवाक्याबद्दल व विविधतेबद्दल लिहीलं होतं.  आता अजून वेगळं काय लिहायचं ?

शेवटी ठरवलं की समग्र गुलजार असा विषय परत हाताळण्याऐवजी गुलजारच्या असंख्य गीतांपैकी अतिशय आवडणारं एखादं गीत निवडून त्याबद्दल लिहायचं.

हा विचार नक्की झाल्यावर मग पुढचा विचार ! कोणतं गाणं निवडावं? हा विचार करताना राहून राहून एक गाणं माझ्या मनात येत होतं.

गुलजार, आर डी व आशा या संगीतक्षेत्रातील दिग्गज त्रयीचा चित्रपटेतर गाण्यांचा एक संग्रह आहे - दिल पडोसी है !
त्यातील सातों बार बोले बंसी.

गुलजारच्या असंख्य आवडत्या गीतांपैकी माझ्या अतिशय आवडीचं, अतिशय जवळचं असं हे गीत.

बासरी सारख्या अप्रतिम वाद्यावरील रुपकातून मानवाबद्दल,  प्रेमाबद्दल सुरेख भाष्य करणारं हे गीत.

*सातों बार बोले बंसी
एक ही बार बोले ना
तनकी लागी सारी बोले,
मनकी लागी खोले ना*

बासरीवरच्या आठ छेदांमधून संगीत निर्माण होतं. सात छेदांमधून सात सूर. बोटांच्या हालचालींप्रमाणे उघडबंद होत सुरावट व संगीत निर्माण करणारी बासरी. पण त्या सात सूरांमध्येच बोलणार. आठवा छेद मात्र न बोलता गप्प. पण त्या आठव्या छेदाशिवाय बाकी सप्तसूरांचं अस्तित्व देखील अशक्य.
मनुष्याचं देखील तसंच आहे. प्रसंगानुरूप वेगवेगळ्या भावभावनांचं प्रदर्शन होइल, माणूस बोलून व्यक्त होइल पण काही प्रसंग असे की तो मूक राहील - त्या आठव्या छेदाप्रमाणे. जेव्हा भावना हृदयाच्या अतीव जवळची असेल तेव्हा. ह्या गीताच्या संदर्भात प्रेमभावना. शरीरावरील घाव व फुंकर ह्याबद्दल बोलेल माणूस. पण मनावरचा घाव आणि फुंकर दोन्ही त्या आठव्या छेदाप्रमाणे मूकच रहातात आणि जीवनातील सप्तसूरांना अस्तित्व देत रहातात.

*चुपके सुर में भेद छुपाये,
फूँक-फूँक बतलाये,
तन की सीधी मन की धुन्नी,
पच्चीस पेंचे खाए,
हाँ बोले ना बोले ना,
हाँ बोले ना बोले ना
तनकी लागी सारी बोले,
मनकी लागी खोले ना*

सात सूरांसाठीचे ते सात छेद. प्रत्येक छेदात एक सूर लपलाय. त्याच्यावरचं बोट उठतं आणि ती फुंकर तिथून बाहेर पडते तेव्हा तो सूर त्या छेदाचा आवाज बनून बोलतो. कोणत्याही सुरावटीत वा गाण्यात आळीपाळीने हे छेद सूरांच्या बोलीभाषेत बोलतात. म्हणजे इतकी सरळसोट असलेली बासरी पण तिचं भाष्य बघा कसं मनस्वी. स्वभाव कसा लहरी.
मनुष्याचं ही तसंच आहे की. वरवर सरळ दिसणारा, व्यवहाराच्या चौकटीत राहून वागणारा नी बोलणारा माणूस, मनाशी नाजूकपणे निगडित व्यक्तीचा, गोष्टीचा संबंध आला की किती मनस्वी होतो नाही !  स्वभावाचे किती कंगोरे ! त्या मनस्वितेवर, लहरीपणावर आणि परिस्थिती (कोणत्या छेदावरचं बोट वर होतय) वर अशा नाजूक क्षणीची प्रतिक्रिया, उक्ती व कृती अवलंबून. प्रेम, माया, आपुलकी, रुसवा, राग, इर्षा, क्रोध, दु:ख - निरनिराळ्या परिस्थितीत व एखाद्या छेदातून फुंकर बाहेर पडते की त्यावर बोट आल्यामुळे दुसऱ्या छेदातून - यावर प्रतिक्रिया, कृती वा उक्ती अवलंबून असते. म्हणूनच कधीकधी ती अपेक्षित तर कधी अनाकलनीय असते. कधी होकार तर कधी नकार आणि कधी मौन. आणि हे सारं  प्रेमाच्या संदर्भात असेल तर अजून गुंतागुंत.

*प्रीत की पीड़ा जाने मुई,
छाती छेद पड़े,
उठ-उठ के फिर मुँह लगती है,
कान्हा संग लड़े,
हो.. हाँ बोले ना बोले ना,
हाँ बोले ना बोले ना
तनकी लागी सारी बोले,
मनकी लागी खोले ना*

राधा कृष्ण हे साक्षात प्रेमाचं जीवंत प्रतीक आणि त्यांच्या प्रेमाची साक्षी ती बासरी जी कायम कृष्णाच्या ओठाशी बिलगलेली. कान्हाच्या मुखातून त्याच्या राधेवरील प्रेमाची कहाणी सूरातून ऐकवणारी. पण खरच का हीच ती बासरी ?

की कृष्ण आपल्यापेक्षा राधेवर जास्त प्रेम करतो म्हणून त्याच्याशी तोंडाला तोंड लावून भांडण करणारी ? सूरासूरातून त्याच्याकडे तक्रार करणारी ! कोणती बासरी खरी ?
की हे राधेचं रुप ? तिला सोडून बासरी ओठाला लावणाऱ्या कृष्णाकडे बासरी बनूनच तक्रार करणारी राधा की काय ही ?
कारण दोघीनाही प्रेमातली गोड पण जीवघेणी वेदना माहितीये. हवीहवीशी असलेली. ती माहितीये म्हणून तर छातीवर ते सात छेद आहेत. कृष्णाशी प्रेमाचं भांडण सप्तसूरातून भांडायला. म्हणून मग मनवायला जरी प्रत्यक्ष कृष्ण असला तरी कधी होकार तर कधी नकार. किती तरल काव्यमयता ही !

कृष्णाच्या कायम ओठाशी असलेली ही बासरी - मूर्तीमंत प्रेमाचं प्रतीक. पण गुलझार चं गुलझारपण ह्यात की तो, ते सरळ साध्या प्रकारचं प्रेम म्हणून श्रोत्यांसमोर आणत नाही तर आणतो प्रेमातील लटक्या भांडणाच्या रुपाने. कुठल्याही नात्यात फक्त गोडगोडपणा असला तर नातं सपक होतं. त्यात लटक्या का होइना, भांडणाचं, रुसव्या फुगव्याचं मीठ हवंच. तरच त्या नात्याला चव येते. भले लटकं असेल भांडण नी त्यातला रुसवा फुगवा. पण त्यानंतर काढलेल्या समजूतीनंतरचा मिलाप अधिक खास नी खुमासदार असतो.

सात सूरातून बोलणारी ती बासरी. ती राधा. आणि तिच्यात प्रेमाच्या प्राणवायूची फुंकर घालणारा कृष्ण. तो आठवा छेद त्या प्राणवायूच्या फुंकरीसाठी राखीव आहे. प्रेमाचा प्राणवायू. म्हणून तो आठवा छेद स्वत: मूक राहून आयुष्याला प्रेमाच्या  सप्तसूरांची सुरावट देतो.

एका कार्यक्रमात सूत्रसंचालिका मंगलाताई खाडिलकर ह्यांनी "मी राधिका मी प्रेमिका" हे गीत गायिकेने गायच्या आधी पार्श्वभूमी तयार करताना सांगितल्याप्रमाणे राधा  जेव्हा बासरीला म्हणते की तू किती भाग्यवान की तू कायम श्रीरंगाच्या ओठांशी असतेस तेव्हा बासरी म्हणते की बाई गं मी तर आतून पूर्ण पोकळ आणि उरावर छेद. तो पोकळपणा स्वत:ला कृष्णरूप करण्यासाठी आहे. माझ्या आत फक्त कृष्ण असावा आणि उरातील छेदातून कृष्णप्रेमच झिरपावं. पण तू सुद्धा तर माझ्या सारखीच आहेस. ह्यावर राधा हसते कारण तिला स्वत:लाही माहिती असतं की श्रीकृष्ण हे चित्-तत्व आहे तर ती स्वत: म्हणजेच राधा हा त्या चित्-तत्वाचा विलास आहे. ती जेव्हा राधेच्या रुपातून त्या परमतत्वाकडे जाते तेव्हा अध्यात्माच्या खालच्या पायरीवरून वरच्या पायरीवर जाते. पण जेव्हा ती त्या तत्वातून निघते तेव्हा धारा असते.
"युगंधर" च्या प्रस्तावनेत श्रीं शिवाजी सावंतानी राधा शब्दाची व्युत्पत्ती सांगितली आहे की रा म्हणजे मिळो / लाभो आणि धा म्हणजे मोक्ष. मोक्ष मिळो वा लाभो अशी प्रार्थना करणारी प्रत्येक व्यक्ती राधा आहे.

मोक्ष मिळो अशी प्रार्थना करणारी व त्यासाठी कृष्णाकडे आकृष्ट होणारी ती राधा आणि त्याच्याशी एकरूप होऊन मोक्ष मिळालेली, कृष्णापासून निघालेली ती धारा.

दोन भिन्न कलाकारांचं हे दोन वेगळ्या संदर्भात निरूपण. पण ह्या सातो बार च्या रसास्वादात दोन्ही निरुपणं कशी चपखल बसतात.

काय म्हणता ? बासरीचा सबंध काय मोक्षाच्या संदर्भात असं ? अहो, संगीत ही अशी कला आहे की जे लाखो शब्दातून समजावता  येणार नाही ते एका तानेतून, एका सुरातून आकळू शकतं. संगीताला नादब्रह्म म्हणतात ते ह्याचमुळे. आणि अशा संगीतातील एक वाद्य असलेली बासरी जी कायम कृष्णाच्या ओठांशी असते तिच्यापेक्षा मोक्ष अधिक कोणाला कळणार आणि मोक्षाप्रत जायला तिच्याहून अधिक सरल नी प्रभावी साधन कोणतं ? फक्त अंतरी राधेप्रमाणेच निस्सीम कृष्णप्रेम हवं.

किती अप्रतिम रुपक आहे हे गाणं - सातो बार बोले बन्सी. आणि हे जादुई शब्द जेव्हा पंचमच्या सूरांचा साज चढवून आशाच्या अलौकिक दैवी आवाजातून गीतरुपाने साकार होतात तेव्हा जणू प्रत्यक्ष राधाकृष्णाच्या लटक्या भांडणातून फुलणारं, जीवाला गोड ओढ नी हूरहूर लावणारं प्रेम आपल्या साक्षीने फुलतय असं वाटतं.

खूप गाणी आपल्याला आवडतात. अतिशय आवडतात. ऐकताक्षणी वाह येतं तोंडातून. पण फार थोडी गाणी ऐकताना आह येतं हृदयातून.

हे गाणं तसं आहे आणि त्यात सगळ्यात जास्त जादू व करिष्मा शब्दांच्या त्या जादूगाराचा आहे - गुलझार नावाच्या जादूगाराचा.

---- मनिष मोहिले

आठवे आश्चर्य - नैसर्गिक की मानवनिर्मित ?

जगातील सात आश्चर्य आपणा सर्वाना माहिती आहेत. इजिप्तमधील गिझाचे पिरॅमिड, चीनमधील ग्रेट वॉल, जॉर्डनमधील पेट्रा, पेरु मधील माचू पिच्चू, रोममधील कलोसियम, युकातान मेक्सिकोमधील चिचेन इत्झा (मायन संस्कृती) रिओ मधील ख्राइस्ट द रेडीमर चा पुतळा आणि आपला आग्र्याचा ताजमहाल. ही सर्व मानवनिर्मित आश्चर्ये. फक्त मानव संस्कृतीचा विचार केला तर प्रचंड व अतर्क्य अशी विशेषणं चपखल बसतात.
पण अफाट, अगाध नी अमर्याद अशा निसर्गाचा व त्यातील आश्चर्यांचा  आपण विचार केला तर त्या आश्चर्यांपुढे आपण केवळ नतमस्तक होतो. माऊंट एव्हरेस्ट, ग्रॅंड कॅनयन, ग्रेट बॅरीयर रीफ, ग्वानबारा बे, पॅरीक्युटीन ज्वालामुखी (मेक्सिको), विक्टोरिया फॉल्स व औरोरा ही सात नैसर्गिक आश्चर्ये.

पण ह्या सर्वापेक्षा अधिक विस्मयचकीत करणारं असं एक आश्चर्य आहे ज्याबद्दल गेल्या वीस एक वर्षातच चर्चा सुरू आहे आणि ती पण शास्त्रज्ञ व संशोधनसंस्था ह्यांच्याच वर्तुळात. ही चर्चा अजून सर्वसामान्य लोकांपर्यंत पोचलेली नाही. काय आहे त्यांच्या चर्चेचा विषय ? आणि हे आश्चर्य मानवनिर्मित की नैसर्गिक ?

आपणा सर्वाना माहीत आहे की पृथ्वीवर जी ३०% जमीन आहे ती एकूण सात खंडात विभागलेली आहे - आशिया, आफ्रिका, उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, अंटार्क्टिका, युरोप व ऑस्ट्रेलिया. (क्षेत्रफळानुसार सर्वात मोठी ते सर्वात लहान).
पण पृथ्वीच्या पृष्ठभागाचा जो ७०% भाग महासागरांनी वेढलेला आहे, त्यात बरीच गुपितं लपलेली आहेत.

असेच एक गुपित आहे झीलॅंडीया Zelandia नावाच्या भूभागाचे जो जवळपास ९४% प्रशांत महासागराच्या पोटात दडलेला आहे. मात्र काही भूगर्भशास्त्रज्ञ व संस्था हा भूभाग पृथ्वीवरील आठवा खंड म्हणून घोषित केला जावा म्हणून  प्रयत्न करीत आहेत.  नक्की काय आहे ह्या Zealandia ची कहाणी ?

साधारण ८३० लाख वर्षांपूर्वी गोंडवाना ह्या (सध्याचे साऊथ अमेरिका, आफ्रिका, अरेबिया, मादागास्कर बेटे, भारत, ऑस्ट्रेलिया व अंटार्क्टिका यांचा एकत्रित महाखंड) महाखंडापासून Zelandia/Tasmantis वेगळा झाला होता. (चित्र १)


अंटार्क्टिका व ऑस्ट्रेलिया ह्यांच्यामध्ये असलेला हा ५० लाख वर्ग किमी क्षेत्रफळाचा भूभाग साधारण २५० लाख वर्षांपूर्वी प्रशांत महासागरात पूर्णपणे बुडाला.  आधुनिक काळात १९९५ साली सर्वप्रथम Bruce Luyendyk  ने ह्या भूभागाचे बारसे करून त्यास Zelandia / Tasmantis हे नाव दिले व हा आठवा खंड म्हणून घोषित करण्याची संकल्पना जगापुढे आणली. त्यानंतर अगदी नजीकच्या भूतकाळात GNS Science ह्या न्यूझीलंडमधील संशोधनसंस्थेने न्यू कॅलीडोनिया व ऑस्ट्रेलियातील काही संस्थांबरोबर काम करून ह्या मागणीचा पुनरूच्चार केला की ज्यानुसार न्यूझीलंड, न्यू कॅलिडोनिया, नॉरफोक बेटे, लॉर्ड होवे द्वीपसमूह व एलिझाबेथ आणि मिडलटन रीफ ह्यानी बनलेल्या व बाकी ९४% भाग समुद्राखाली असलेल्या ह्या भूभागास खंड घोषित करावे. डॉ. निक मॉर्टीमर ह्या संशोधनात प्रमुख शास्त्रज्ञ होते. त्यांच्या म्हणण्यानुसार Zelandia एक खंड म्हणून घोषित केला जाण्यास, भूगर्भीय कवच, क्षेत्रफळ, तेथे वर्तमानात वा भूतकाळात असलेली जैवविविधता, नैसर्गिक साधनसंपत्ती अशा विविध निकषांवर पात्र ठरतो.

या निमित्ताने ह्या संशोधनगटाने  दोन नकाशे प्रसिद्ध केले आहेत. (चित्र २)



या गटाच्या मते न्यूझीलंड व न्यू कॅलीडोनिया हे ह्या भूखंडाचे दोन मुख्य भाग आहेत जे समुद्राच्या वर दृष्यमान झाले आहेत. ह्या शिवाय Zelandia चा Ball's Pyramid हा एकच भाग असा आहे जो समुद्राच्या वर दिसतो. (चित्र ३)



केलेल्या संशोधनानुसार व त्यातील निरीक्षणां नुसार हा भूखंड ऑस्ट्रेलियाच्या अर्ध्या ते दोन तृतीयांश आकाराचा असून प्रशांत महासागरीय भूविवर्ती तल समुद्राच्या पाण्याखाली जाण्यामुळे ९४% Zelandia आज पाण्याखाली असला तरी एकेकाळी त्यावरील  सदाहरित जंगलांमध्ये (rain forests) दिनासूर (Dinosaurs) नांदत होते ज्यांचे जीवाश्म आजही त्याचा पुरावा आहेत.

समुद्राच्या पाण्याखाली असलेल्या ह्या भूखंडाच्या क्षेत्रात आजही मत्स्यशेती मोठ्या प्रमाणावर होते कारण मासे तेथे विपुल प्रमाणात आढळतात. ह्या शिवाय भूगर्भ वायूचे साठे (न्यूझीलंडचे Maui Gas Basin) देखील ह्या क्षेत्रात आढळून येतात.

तर अशी ही  Zelandia ची अद्भुत भूमी. तिला आठवा खंड म्हणून सर्वमान्यता मिळते का ह्याचं उत्तर येणारा काळच देइल.

पण दुसऱ्या एका प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न आपण करू शकतो की जो प्रश्न लेखाच्या शीर्षकात ही आहे आणि तो म्हणजे हे आश्चर्य नैसर्गिक की मानवनिर्मित ?

आता तुम्ही म्हणाल की साहजिकच नैसर्गिक. कारण हा खंड काही मानवाने बनवलेला नाही. बरोबर. पण मानवाने तो शोधला तर आहे. इतर नैसर्गिक आश्चर्यांप्रमाणे समोर दिसत नसताना, विज्ञान व तंत्रज्ञान ह्यांच्या मदतीने मनुष्याने, निसर्गाचे हे गुपीत उघड केले आहे आणि त्यामुळे जर झीलॅंडीयाला आठव्या खंडाचा दर्जा मिळाला तर त्या आश्चर्यात अफाट, अगाध निसर्गाच्या सिंहाच्या वाट्याबरोबरच,  मानवाच्या जिज्ञासू वृत्तीचा व बुद्धीचा देखील खारीचा वाटा आहे.


-- मनिष मोहिले 

शोध

ह्या गुणगुणताना ओळी, तू शोध मला तुजपाशी
तू पूस तुझ्या ओठांना, मी जेथे दडलो आहे

वरील काव्यपंक्तींवरून सुचलेल्या ओळी

शोध

वेचताना बकुळफुले ही, तू शोध मला तुजपाशी
तू पूस तुझ्या श्वासांना, मी तिथेच दडलो आहे

माळताना कुंतली गजरा, तू शोध मला तुजपाशी
तू पूस  चुकार  बटांना, मी तिथेच दडलो आहे

बघताना  इंद्रधनुष  हे, तू शोध मला तुजपाशी
तू पूस तुझ्या डोळ्यांना, मी तिथेच दडलो आहे

सांजेस दिवा करताना , तू शोध मला तुजपाशी
तू पूस  तुझ्या आशेला, मी तिथेच दडलो आहे

मोजताना रात्रीस तारे, तू शोध मला तुजपाशी
तू पूस तुझ्या स्वप्नांना, मी  तिथेच दडलो आहे

---- मनिष मोहिले 

Thursday, June 25, 2020

मानवनिर्मित जंगले - फायदेशीर / नुकसानकारक ?

पर्यावरणाचा बिघडलेला समतोल ही आधुनिक मानवजातीपुढील एक अत्यंत गंभीर समस्या आहे. गेल्या चार एक दशकांपासून मानवाला ही जाणीव झाली आहे आणि त्यावर विविध उपाययोजना देखील केल्या जात आहेत.

वातावरणातील ओझोन थराला पडलेले छिद्र, ध्रुवीय प्रदेशातील बर्फाच्या वितळण्याचा वाढता वेग, समुद्राच्या पाण्यातील वाढते प्रदूषण, वाढते उद्योगधंदे व वाहने यामुळे वाढणारा कर्बवायू आणि घटणारा प्राणवायू, मोठ्या प्रमाणावर झालेला व होणारा जंगलांचा ऱ्हास, अशा विविध समस्यांवर ह्या उपाययोजना केल्या जात आहेत किंवा तसे प्रयत्न होत आहेत.

ह्यापैकीच एक अत्यंत महत्वाची समस्या म्हणजे वृक्षतोड, त्यामुळे होणारा जंगलांचा ऱ्हास, त्याच्याशी संबंधित वन्यजीवन व परिस्थितीकीचा नाश / असमतोल आणि वाढणाऱ्या कर्बवायूच्या संकटात घातली जाणारी भर. अर्थात मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड करून, किंबहुना नवीन जंगले उगवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करून मानव ह्या समस्येशी मुकाबला करण्याचा प्रयत्न करत आहे. झाडे प्रकाशसंश्लेषण करून अन्न तयार करताना वातावरणातील कर्बवायू ग्रहण करतात आणि प्राणवायू वातावरणात सोडतात हे आपण शाळेपासून शिकतो. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर केली जाणारी वृक्ष लागवड आणि जंगल निर्मितीचे प्रयत्न हा वाढता कर्बवायू कमी करण्याबरोबरच प्राणवायूचं प्रमाण वाढवण्यासाठी एक खात्रीलायक उपाय आहे.

पण हे खरंच असं आहे का ? किंवा आपण ज्या पद्धतीने ही झाडांची लागवड करतोय त्यातून अपेक्षित परिणाम अपेक्षित प्रमाणात खरोखरच मिळतोय का ?

हा प्रश्न / ही शंका उद्भवण्याचं कारण आहे की काही शास्त्रज्ञांच्या मते निव्वळ पुष्कळ झाडं लावून अपेक्षित परिणाम तर मिळणार नाहीच पण इतर काही समस्याना तोंड द्यावं लागेल. नक्की काय निरीक्षण आहे त्यांचं ? हे समजण्यासाठी वृक्षसृष्टीची निर्मिती कशी झाली ते थोडंसं पहावं लागेल.

पृथ्वीवर जीवनासाठी आवश्यक वातावरण तयार झाल्यावर प्राणीसृष्टी निर्माण होण्याच्या खूप आधी आपली जंगले व वृक्षसृष्टी निर्माण झाली. (पाईन जातीचे काही वृक्ष हे सर्वात जुने सजीव मानले जातात).

जर आपण शाळेत शिकलेल्या भूगोलाची थोडी उजळणी केली तर आपल्या लक्षात येते की निसर्गाने एका विशिष्ट पद्धतीने व स्थान क्रमाने ही वृक्षसृष्टी निर्माण केली आहे.

धुवीय प्रदेश संपता संपता त्यांच्या कडेवर सूचीपर्णी (सुईसारखी पाने किंवा पानांच्या जागी शंकू असलेली) वृक्षांची जंगले (Coniferous Taiga forests) जी वातावरणातील दोन तृतीयांश प्राणवायूचा स्त्रोत आहेत (as per Planrt Earth BBC). त्यानंतर समशीतोष्ण कटिबंधातील गवताळ प्रदेश (Prairies, Pampas, Steppe, Veldt, Downe), त्यानंतर पानगळीच्या वृक्षांची जंगले (deciduous forests),  त्यानंतर उष्णकटिबंधीय गवताळ प्रदेश (savannas) व त्यानंतर विषुववृत्ताच्या जवळ सदाहरित जंगले (rain forests) अशी साधारण वर्गवारी आहे.

वेगवेगळ्या प्रदेशातील तापमान, पर्जन्यमान, मातीची प्रत व पाणी साठवण्याची क्षमता, जमिनीचा उतार इत्यादी मध्ये जो फरक आहे त्याप्रमाणे कित्येक हजारो लाखो वर्षांच्या कालावधीत निसर्गाने ही मांडणी केली. ह्या विभागवार वृक्ष संरचनेबरोबरच त्या त्या  विभागात एक वैशिष्ट्यपूर्ण जैवविविधता व परिस्थितीकी ह्यांची देखील निर्मिती झाली. निसर्गाने केलेली ही रचना आणि ह्यातील प्राणी व वनस्पती ह्यांचं परस्परावलंबन व प्राण्यांमधील परस्परावलंबन हे अतिशय गुंतागुंतीचे व हजारो लाखो वर्षांच्या उत्क्रांतीचा परिणाम असलेले असे आहे.

वाढत्या लोकसंख्येबरोबर आणि विशेषकरून औद्योगिक क्रांतीच्या सुरूवातीच्या काळात, (जोपर्यंत आपल्या भस्मासूरी कृत्यांचे परिणाम दिसायला सुरूवात झाली नव्हती तोपर्यंत)  मानवाने वरीलपैकी कशाचाही विचार न करता झाडे तोडली व पर्यावरणाला जबरदस्त हानी पोचवली. ह्यात जंगलांच्या नाशाबरोबरच, त्या परिसरातील जैवविविधतेची देखील मोठ्या प्रमाणावर हानी झाली.

झाडे तोडल्यामुळे वातावरणातील वाढत्या कर्बवायू व घटत्या प्राणवायूच्या संकटाची जाणीव झाल्यावर आपण मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवडीला सुरूवात केली. नवीन जंगलं च्या जंगलं निर्माण करण्याचा प्रयत्न आपण करतोय जो स्तुत्य आहे. पण तो अधिक डोळस असणं गरजेचं आहे.

कारण आपण एखाद्या परिसरात खूप मोठ्या प्रमाणावर एकाच जातीच्या झाडांची लागवड करतो ज्यामध्ये वनस्पतीसृष्टीतील विविधतेचा समतोल तर बिघडतोच पण त्या परिस्थितीकीतील इतर जैवविविधतेवर देखील वाईट परिणाम होतो.

नुकतेच यासंदर्भात दोन संशोधन निबंध प्रकाशित झाले. एका निबंधाचा विषय होता २०३० सालापर्यंत जागतिक पातळीवर ३५०० लाख हेक्टर जमिनीवर जंगले निर्माण करण्यासाठी जो प्रकल्प (ज्यात आत्तापर्यंत ४० देश सहभागी झाले आहेत) सुरू झाला आहे तो कितपत यशस्वी व परिणामकारक आहे ? तर या संशोधकांच्या पाहणीप्रमाणे या प्रकल्पांतर्गत जी आर्थिक मदत पुरवण्यात आली त्यामुळे लोकानी, जैवविविधता वा वृक्षगट विचारात न घेता एकाच जातीच्या झाडांची मोठ्या प्रमाणावर लागवड केली व त्यातही निवडीसाठी जे निकष  लावले गेले त्यात व्यापारी तत्वावर कुठली झाडे अधिक फायदेशीर हा निकष सर्वात अग्रक्रमी होता.  उघड आहे की जैवविविधतेचं नुकसान करणारा हा निर्णय होता. या निबंधात चिलीमधील वृक्षलागवड प्रकल्पाचे उदाहरण दिले आहे).

हा लेख लिहून संपला आणि माझ्याकडे माझ्यस मित्राकदून अशी एक चित्रफीत आली की त्या चित्रफितीचा व त्यातील माहितीचा अंतर्भाव करणं मला अतिशय आवश्यक वाटलं.

ह्या चित्रफितीत माहिती आहे की सध्या जागतिक पातळीवर केळ्यांच्या रोपांवर Panama Disease नावाचा रोग हल्ला करतोय व त्यांचा मोठ्या प्रमाणावर नाश करतोय. आज ही परिस्थिती केळ्यांची बागायत व त्यावर आधारीत उद्योग व लोक ह्यांच्यासाठी क मोठी समस्या बनली आहे . ह्यामागचं मुख्य कारण आहे Cavendish नावाच्या एकाच प्रजातीची खूप मोठ्या प्रमाणावर लागवड. Cavendish च्या इतक्या मोठ्या लागवडीमागचं कारण सोप्पे व अपेक्षित असे व्यापारी कारण आहे. ही प्रजाती जास्तीत जास्त उत्पादन देत असल्यामुळे उत्पादनखर्च कमी होऊन नफ्यात वाढ होते. पण एकाच जातीची ही रोपं एखाद्या मातब्बर रोगासमोर एकाच वेळी मान टाकू शकतात. आज हे सिद्ध झाले आहे. त्यातून १९५० साली ह्याच पनामा रोगाच्या आधीच्या अवताराने Big Mike नावाची केळ्याची प्रजाती नामशेष केली होती. तेव्हाच्या रोगाला तोंड देऊ शकणारी व त्यामुळे Big Mike ची जागा घेतलेली Cavendish पनामा रोगाच्या नव्या अवतारापुढे हतबल आहे.
ह्यावर नवीन प्रजाती शोधणे हा एकमेव  उपाय नसून त्याचबरोबर अधिक गरजेचा व मूलगामी उपाय आहे केळीच्या बागातून विविध प्रजातीची रोपं लावणे व जे जमवून घेऊ शकतात अशी इतर झाडे वा झुडपे लावणे जी ज्या fungi मुळे हा रोग पसरतो त्या fungi चा नाश करू शकतात.  नवीन वृक्षलागवड करताना जैवविविधता लक्षात घेणं व त्यास प्राधान्य देणं का आवश्यक आहे हे आपल्याला नक्कीच स्पष्ट होतं.



दुसऱ्या संशोधन निबंधातून संशोधकांनी असं निरीक्षण मांडलं की ज्या जमिनीत सेंद्रीय कर्बघनता (Soil Organic Carbon Density) कमी आहे तिथे नवीन झाडे लावल्याने फायदा होतो व त्या जमिनीतील सेंद्रीय कर्बघनता वाढीस लागते.
मात्र ज्या जमिनीत ही सेंद्रीय कर्बघनता मुळातच भरपूर आहे अशा ठिकाणी नवीन झाडे लावल्यावर त्या जमिनीत ह्या घनतेत घट येते. ह्या निबंधात उत्तर चीनमध्ये वृक्षलागवडीनंतर  मातीच्या नमुन्यांच्या परीक्षणानंतरच्या परिणामांचे विश्लेषण करून त्याआधारे भाष्य केलेले आहे ).

दोन्हीही निबंध Nature Sustainability ह्या science journal मध्ये प्रकाशित झाले आहेत.

(जमिनीतील सेंद्रीय कर्बघनतेचे प्रमाण हे वातावरणातून कर्बवायू किती कमी झाला ह्याचे एक मोजमाप आहे. जर खूप मोठ्या क्षेत्रफळात जमिनीत ह्या सेंद्रीय कर्बघनता प्रमाणात वाढ झाली तर वातावरणातील कर्बवायू मोठ्या प्रमाणात कमी झाला ह्याचे ते निर्देशक आहे).

विचार करण्याची ही एक वेगळी व नवी दिशा आहे पण निश्चीतच अत्यंत महत्वपूर्ण असा हा विचार आहे.
एका समस्येवरील समाधान म्हणून करत असलेल्या उपाययोजनेचे असे काही विपरीत परिणाम होण्याची शक्यता असेल तर त्या उपाययोजनेचा समूळ अभ्यास व त्यात आवश्यक ते धोरणात्मक व कृतीशील बदल करणे व वेळेत करणे गरजेचे आहे.
उदाहरणार्थ, धोरणात्मक रित्या एखाद्या परिसरात वृक्ष लागवड करताना व्यापारी फायद्याच्या ऐवजी त्या परिसरातील नैसर्गिक घटक व जैवविविधता ह्याच्याशी सुसंगत अशा वृक्षगटांना प्राधान्यक्रम देणे व कृतीशील म्हणजे ते प्रत्यक्षात होत आहे ह्याची खात्री करून देणारी व्यवस्था उभारणे.

आणि त्याचबरोबर जरूरी आहे की नैसर्गिकरीत्या ज्या परिस्थितीकी अजूनही मूळ अवस्थेत आहेत वा ज्यांची फार हानी झालेली नाही तिथे मानवाची लूडबूड अजिबात होऊ न देणे.

वरील अपेक्षा हा भाबडा आशावाद असेल पण कितीही अभ्यास व विश्लेषण करून आपण उपाययोजना केल्या तरी असीम शक्तिशाली निसर्गाने हजारो लाखो वर्षांच्या कालावधीत जी गुंतागुंतीची वृक्ष व प्राणीसृष्टी रचना केली आहे त्याच्या किंचितही जवळ जाणे मानवाच्या मर्यादित शक्ती व कालसीमेच्या बाहेरची गोष्ट आहे, हे वेळीच ओळखून आपण स्वत:ला थांबवलं नाही तर; नंतर कितीही उपाययोजना केल्या तरी त्यांचा फायदा होणार नाही.

https://www.bbc.com/news/science-environment-53138178


---- मनिष मोहिले 

Sunday, June 21, 2020

पुन्हा एकदा पंचम - जागतिक संगीत दिनाच्या निमित्ताने

पंचम - जन्माला आल्या आल्या बाळाने जो टाहो फोडला तो सचिनदा त्याच वेळी बसवत असलेल्या चालीमधील पंचमाशी चपखल जुळला म्हणून सचिनदानी लाडानी व कौतुकानी मुलाचं नाव ठेवलं पंचम.  जणू ईश्वरीय संकेतच होता तो. कारण ह्या योगायोगाला, पंचमनी आपल्या अभिजात संगीताच्या कसोटीवर उतरतानाच भारतीय  सिनेसंगीताला नवीन चेहरा देणाऱ्या, लोकप्रियतेचे नवीन उच्चांक गाठणाऱ्या व सगळ्यात महत्वाचं म्हणजे लाखो रसिकांना निखळ संगीतानंद देणाऱ्या संगीतातून पूर्णत्वाला नेलं. योगायोगाला नियतीकडे नेणारा हा अद्भुत संगीतप्रवास हीच पंचम ची खरी ओळख जी काळाला देखील पुसता येणार नाही.

पंचमच्या संगीताचा पिंडच वेगळा होता. चाकोरीबद्ध वाटांवर प्रवास करून त्या वाटांना हमरस्त्यात बदलण्यापेक्षा स्वत:ची वेगळी, अवघड, अनगड पण स्वतंत्र ठसा उमटवणारी वाट चोखाळणारं होतं त्याचं संगीत. ही वेगळी वाट चोखाळताना आजूबाजूच्या जगाकडे त्याचं बारीक लक्ष असायचं. त्यात साध्या साध्या गोष्टींमधून त्याला प्रेरणा मिळायची - मग तो आवाज असेल, सूर असेल, ताल असेल, लय असेल. ह्या प्रेरणेला तो स्वत:च्या अलौकिक प्रतिभेत घोळवून दरवेळी एक नवा प्रयोग करायचा आणि त्यातील नावीन्याबरोबरच त्यातील अस्सल कलाप्रतिभेमुळे तो प्रयोग रसिकांना प्रचंड आवडायचा देखील. त्याच्या जगावेगळ्या लोकप्रियतेचं हेच रहस्य आहे.

जगातील प्रत्येक आवाजात संगीत लपलय, फक्त ते नीट ऐकणारा कान असला पाहीजे हा पंचमचा विश्वास होता. त्याच्याकडे स्वत:कडे तो कान होता आणि प्रत्येक आवाजातून काय घ्यायचे - सूर, ताल, लय, ठेका की ध्वनीपरिणाम - ही उपजत जाण त्याच्याकडे होती.
प्रस्थापित गायकीत न बसणाऱ्या पद्धतीने गायकाला गायला लावून हवा तो ध्वनीपरिणाम साधायचा त्याचा प्रयोग ह्या साध्या आवाजातून संगीत शोधायच्या वृतीची साक्ष आहे. उदाहरण -  सत्ते पे सत्ता मधील बाबूच्या एंट्रीच्या वेळचं संगीत -  पार्श्वसंगीतामधील त्याच्या प्रयोगांचं उगमस्थान हे त्याच्या ह्या संगीत बुद्धिमत्तेत व प्रयोगशीलतेत आहे.

दिल पडोसी है हा त्याचा गुलझार व आशाबरोबरचा चित्रपट संगीतेतर गाण्यांचा अप्रतिम गीतसंग्रह आता बहुतेकाना माहिती असेल. एक से एक अप्रतिम गाणी असलेल्या ह्या संग्रहातील एक असंच अप्रतिम गीत - कोइ दिया जले कही - अतिशय सुरेख, आर्त, व भारतीय चेहरा मोहरा असलेल्या ह्या गीताच्या सुरवातीची जी धून आहे तिची प्रेरणा, पंचमला;  जेम्स बॉंडच्या चित्रपटातील एका दृष्यात, बॉंड पोहण्याच्या तलावातून बाहेर येताना जो म्युझिक पीस वापरला आहे,  त्यावरून सुचली हे ऐकून विश्वास बसत नाही. गाणं ऐकून झाल्यावर तर अजिबात नाही. ह्याला चौर्यकर्म नाही म्हणत. हे खरोखरचं प्रेरित होणं. पंचमचा ठाम विश्वास होता - जगातील संपूर्ण संगीत हे सात सूरांमधूनच निर्माण होतं. प्रत्येक संगीतकारासाठी तेच सात सूर आहेत. त्या सात सूरांच्या मांडणीमधील फरक, वाद्यांच्या हाताळणीमधील फरक, सादरीकरणाच्या पद्धतीमधील फरक हे मोझार्टला मोझार्ट आणि आर डी ला आर डी बनवतात.

ह्याच विचारसरणीमुळे चौकटीबाहेर जाऊन प्रयोग करायला पंचम कधीच घाबरला नाही कारण स्वत:च्या प्रतिभेवर त्याचा सार्थ विश्वास होता.

एकतारी सारख्या एका तंतूवाद्याचा ध्वनीपरिणाम तबल्यासारख्या तालवाद्यातून साधायचा आणि संपूर्ण गाण्याला  या अनोख्या ध्वनीपरिणामाची सहज साथ द्यायची (तेरे बिना जिया जाये ना - घर) किंवा ताल देण्यासाठी गाण्याच्या सुरवातीला गिटारसारख्या तंतूवाद्याचा उपयोग करायचा (ओ माझी रे.. अपना किनारा - किनारा) हे फक्त पंचमलाच सुचू शकतं आणि फक्त पंचमच ते इतक्या सुरेखपणे संगीतात उतरवूदेखील शकतो. आणि ह्याच पंचमनी  तालवाद्य (तुम्बा) व तंतूवाद्य (ऱ्हिदम गिटार) एकत्रित वापरून सुद्धा जबरदस्त ऱ्हिदम दिलेला आहे (यम्मा यम्मा - शान).

प्रस्थापित वाद्यांचा वेगळा व नावीन्यपूर्ण पद्धतीने उपयोग तर पंचमनी केलाच. उदाहरण - शोले मधला, डाकू हेमा मालिनीचा पाठलाग करतात त्या दृष्याच्या पार्श्वसंगीतात पण्डीत सामता प्रसादांचा तबला वापरून एक जबरदस्त परिणाम साधलाय  पंचमनी.
पण त्याचबरोबर मुळातच वेगळ्या व कमी वापरल्या जाणाऱ्या, सामान्य रसिकांना तर अजिबात माहीत नसतील अशा वाद्यांचा वा वस्तूंचा अत्यंत परिणामकारक व गाण्यात चपखल बसून गाण्याचं सौंदर्य वाढवणारा उपयोग करून घेण्यात सुद्धा पंचमचा हात कोणी धरला नसता.
बरं म्हणून प्रस्थापित वाद्य व त्यांचा प्रस्थापित पद्धतीने उपयोग त्याच्या संगीतात वर्ज्य होता असं नाही. तिथे प्रस्थापितता व प्रयोगशीलता दोघी सख्ख्या जुळ्या बहिणी असल्यासारख्या गुण्यागोविंदाने नांदून गाण्याला एक वेगळी गोडी, एक वेगळा आयाम देत रसिकांना डोलवायला लावायच्या . उदाहरण - सामने यह कौन आया - जवानी दिवानी. यात शेकर्स (रेशो रेशो) हे वाद्य अद्भुतपणे वापरलं आहे पंचमनी. आणि छोटा आवाज असणाऱ्या या वाद्याचा ध्वनीपरिणाम व्यवस्थित ऐकू यावा म्हणून ध्वनीमुद्रण करताना  तालवाद्यांचा मोठा आवाज थोडा कमी केलाय - गाण्याचा तोल आणि ताल बिघडू न देता. हा खास पंचमचा ठसा. अजनबी मधल्या हम दोनो दो प्रेमी दुनिया छोड चले मध्ये एक विशिष्ट ध्वनीपरिणाम साधायला त्याने चक्क दोन सॅंड पेपर्स एकमेकांवर घासून अपेक्षित ध्वनीपरिणाम साधलाय.  ज्याला जळी स्थळी काष्ठी पाषाणी संगीत ऐकू येतं, सूर ऐकू येतात, ताल लय व ठेका जाणवत रहातो त्यालाच हे असं काहीतरी जगावेगळं सुचू शकतं व तोच इतकं अप्रतिम अस्सल संगीत निर्माण करू शकतो.

हे प्रयोग केवळ वाद्यांवर वा ध्वनीपरिणाम यावरच थांबले असं नाही. गाणं offbeat सुरू करत, on व off beat ह्यामध्ये खेळत राहून अत्यंत श्रवणीय, डोलायला लावणारं, ठेका धरायला लावणारं संगीत भारतीय सिनेरसिकांना भेट देणारा पंचम हा पहिला संगीतकार असं म्हणता येइल.
अतिशय खालची पट्टी ते अतिशय वरची पट्टी हा दोन टोकांमधला दमवणारा प्रवास सत्ते पे सत्ता मधल्या प्यार हमे किस मोड पे ले आया या एकाच गाण्यात पंचमने लीलया व यशस्वीरीत्या केलाय - एक संगीतकार म्हणून आणि एक गायक म्हणूनदेखील. मुख्य गायक किशोर कुमार व इतर गायक जसे सपन चक्रवर्ती, भूपेंद्र  ह्यांनी तितकीच तोलामोलाची, ताकदीची साथ देऊन एक अफलातून गाणं रसिकाना दिलं जे आज सुद्धा भारतीय सिनेसंगीतातील एक iconic song आहे. अर्थात iconic songs बद्दल बोलायचं तर प्यार हमे च्या जोडीने कारवाँ  मधलं पिया तू अब तो आजा, हरे रामा हरे कृष्णा मधलं दम मारो दम, हम किसी से कम नही मधली संगीतस्पर्धेच्या वेळची सदाबहार medley, यादोंकी बारात मधलं चुरा लिया है तुमने जो दिल को, शोले मधलं मेहबूबा मेहबूबा आणि शोले ची शीर्षक धून व त्याच बरोबर रात्री अमिताभ माऊथ ऑर्गन वर वाजवतो ती धून - किती तरी मोठी यादी होइल. तरी ह्यात आँधी, किनारा, खूशबू, इजाजत, परिचय , नमकीन ही त्याच्या संगीताच्या एका वेगळ्याच व्यक्तिमत्वाची बाजू विचारात घ्यायची पूर्णपणे बाकीच रहाते.

प्रयोग करून पहाणं हा पंचमचा व त्याच्या संगीताचा स्वभाव होता. पण त्यात अट्टाहास नव्हता तर प्रतिभावान मनस्विता होती. या मनस्वी प्रयोगशीलतेमुळेच त्याचं संगीत चाकोरीबद्ध वाटलं नाही कधी.  उलट गाण्याच्या शब्दांशी व स्वभावलहरींशी एकरुप झालं त्याचं संगीत. ह्या चाकोरीत वा साच्यात न अडकण्याच्या त्याच्या वृत्तीमुळेच तो एकीकडे; आजा आजा मै हू प्यार तेरा,
प्यार हमे किस मोड पे , पिया तू अब तो आजा ,धन्नो की आखो मे (किताब) सारखी मस्तीभरी गाणी देतानाच दुसरीकडे तेरे बिना जिंदगी से कोइ (आँधी), दिन जा रहे है या रातोके साये (दूसरी सीता), खाली हात शाम आई है (इजाजत) सारखी आर्त व व्याकूळ करणारी, तिसरीकडे क्या जानू सजन होती है क्या गम की शाम (बहारोंके सपने), कही ना जा आज कही मत जा (बडे दिलवाला), चेहरा है या चांद खिला है (सागर), तुमसे मिल के ऐसा लगा तुम से मिलके (परींदा), यासारखी प्रणयरम्य आणि त्याचवेळी फिरसे आइयो बदरा बिदेसी (नमकीन) सारखी स्वत:तच हरवून गेल्याची भावना देणारी गाणी देऊ शकला. फक्त दोन टोकाच्या पट्ट्यांमध्येच (pitch) नव्हे टोकाच्या भावना व संवेदनांच्या मध्ये देखील विनासायास त्याचा अद्भुत संगीत प्रवास चालत राहिला.

त्याच्या जन्मजात प्रतिभेमुळे आणि सतत सर्वत्र संगीत शोधायच्या त्याच्या जिज्ञासू वृत्तीमुळे कितीही भिन्न प्रकृतीचं संगीत असलेल्या गाण्यात पंचम सहज वावरताना दिसतो.

पण संगीतक्षेत्रामधला हा जादूगार अचानक आपल्याला सोडून गेला. जीवाला चटका लावून गेला. तो राहिला असता अजून; तर अजून कितीतरी अद्भुत गाणी आपल्याला मिळाली असती.  पण दुर्दैवाने तसं घडायचं नव्हतं.

पंचमचा जिगरी असलेल्या गुलझार बरोबर पंचम नी सर्वाधिक अप्रतिम गाणी दिली. इजाजत ची सगळी गाणी ही कदाचित दोघांची सर्वोत्कृष्ट एकत्रित कामगिरी असेल.
ज्या गुलझारच्या मेरा कुछ सामान तुम्हारे पास पडा है च्या गाण्याचा कागद हातात मिळाल्यावर "उद्या तू मला टाईम्स ऑफ इंडियामधल्या बातमीला चाल लावायला सांगशील" म्हणून उखडणाऱ्या पंचमनी त्याच शब्दाना चाल लावून एक अजरामर गीत भारतीय सिनेसृष्टीला दिलं, त्याच गुलझारने पंचम गेल्यावर त्याला स्मरताना म्हटलं

याद है बारीशोंके दिन थे वो...  पंचम !
और पहाडी के नीचे वादी में ;
धुंद से झाँककर निकलती हुयी,
रेल की पटरियाँ गुजरती थी !

धुंद में ऐसे लग रहे थे हम,
जैसे दो पौधे पास बैठे हो !
हम बहुत देर तक पटरियोंपे बैठे हुए
उस मुसाफिर का जिक्र करते रहे
जिसको आना था पिछली शब लेकिन;
उसकी आवत का वक्त ढलता रहा !

हम बहुत देर पटरियोंपे बैठे हुए
ट्रेन का इंतजार करते रहे !
ट्रेन आयी न उसका वक्त हुआ
और तुम यूँही दो कदम चलकर
धुंद पर पाँव रखकर गुम हो गये !

मैं अकेला हूँ धुंद में .. पंचम !

पंचमच्या असंख्य रसिकांना पण असंच वाटलं असेल की धुंद में अकेले हैं हम.

आज पंचम आपल्यात नाही पण; त्याचं संगीत, त्याने दिलेली एक से एक सरस गाणी आणि त्याच्या सख्या सुहृदांनी सांगितलेले त्याच्यातील मनस्वी कलाकाराचे किस्से, त्याच्या संगीतनिर्मितीचे पडद्यामागचे किस्से, त्या कलाकाराच्या आतल्या  सगळ्याना आपलासा वाटणाऱ्या, सगळ्यांची काळजी घेणाऱ्या माणसाचे किस्से  ह्यातून आजही तो आपल्या बरोबर आहे आणि ह्यानंतरही राहील. आणि तोपर्यंत प्रत्येक जागतिक संगीत दिनाला आपण त्याची विशेष आठवण काढत राहू. त्याचा प्रत्येक जन्मदिवस साजरा करत राहू.

कारण तो फक्त आर डी बर्मन नव्हता - तो पंचम होता आणि पंचम आहे - सात सूरातला सर्वात वरचा स्वर - पंचम !

---- मनिष मोहिले

(टीप : माहिती स्त्रोत : हा लेख लिहीताना, विशेषकरून पंचमच्या संगीतामधले बारकावे सांगायला
पंचम अन्मिक्स्ड ह्या पंचम वरील अप्रतिम वृत्तपटामधील माहितीचा खूप उपयोग झाला.)



Thursday, June 18, 2020

भारत चीन सीमारेषा तणाव - जून २०२०

गेल्या तीन चार दिवसात भारत चीन सीमारेषेवरील तणाव व दोन सैन्यांमधील चकमकी, दोन्ही देशांचे धारातीर्थी पडलेले जवान ह्या बातम्यानी कोरोना संबंधित बातम्याना दुसऱ्या क्रमांकावर ढकललं आहे. सोशल मिडीयावर देखील ह्या संदर्भात बरीचशी पोस्ट्स आलेली आहेत व अजूनही येत आहेत.
त्यात आज अजून एक बातमी आली की आपल्या पंतप्रधानानी आपल्या सैन्याला प्रत्यक्ष कर्मभूमी वर तात्काळ निर्णय घेण्याचे निर्णयस्वातंत्र्य दिले आहे.
ह्या बातमीमुळे एक अशी प्रतिक्रिया येणं स्वाभाविक आहे की *आत्ताच्या परिस्थितीत भारताला युद्ध परवडेल का ?*
आज दोन महिन्यांच्या राष्ट्रव्यापी कुलूपबंद कालावधीनंतर दैनंदिन आयुष्य हळूहळू पूर्वीसारखं सुरू होत असलं तरी आपली अर्थव्यवस्था ह्या दोन महिन्यांच्या कालावधीत कमीतकमी दहा वर्षे मागे गेली असण्याची वा जाण्याची शक्यता आहे आणि हे आपल्यापुढील सर्वात कठीण संकट व आव्हान आहे.
अचानक घडलेल्या ह्या घटनेनंतर अजूनही परिस्थिती संपूर्णपणे पूर्वपदावर आलेली नाही आणि ती पूर्वपदावर येण्यास अजून बराच काळ (काही वर्षे सुद्धा ) जावा लागेल. रोजंदारी करून कमावणारे, छोटी दुकाने चालवणारे वा व्यवसाय करणारे, छोटे उद्योगधंदे चालवणारे आणि त्याच बरोबर छोट्या व मोठ्या उद्योगात नोकरी करणारे अशा सर्वांच्याच आयुष्याची आर्थिक घडी थोड्याफार प्रमाणात विस्कटलेली आहे. ही विस्कटलेली घडी लवकरात लवकर नीट बसवणं ह्या गोष्टीला प्राधान्यक्रमात प्रथम स्थान हवं.
अशा परिस्थितीत देशाच्या अजून एका सीमेवर (पाकिस्तान बरोबर तर कायमच सीमेवर चकमकी चालू असतात ) युद्धजन्य परिस्थिती निर्माण व्हावी ही काळजीची गोष्ट आहे. लोकसभेने सैन्याला दिलेलं प्रत्यक्ष कर्मभूमीवरील निर्णयस्वातंत्र्य जरी रणोत्सुक मनोभूमिकेतून उत्साहवर्धक वाटलं वा चीन विरुद्ध भारतीय (व कोरोनामुळे वैश्विक देखील) जनमानसात जे एक प्रक्षोभक जनमत आहे त्याच्याशी सुसंगत भासलं तरी सध्याच्या परिस्थितीत आपल्या अर्थव्यवस्थेला युद्ध परवडणार नाही हे तितकच खरं आहे.
*मग अशा परिस्थितीत सैन्याला असं स्वातंत्र्य देणं कितपत योग्य आहे ?*
जागतिक पातळीवर राजकीय व आर्थिक क्षेत्रात अग्रगण्य बनण्याची चीनची वाढती महत्वाकांक्षा देखील वर उल्लेखलेल्या परिस्थिती इतकीच खरी आहे. आज जगातील कित्येक नावाजलेल्या उत्पादनांची मालकी विविध देशांची असली तर त्यांचे उत्पादन तळ चीनमध्ये आहेत व ते तिथून हलवण्याचा निर्णय जरी बऱ्याच कंपन्यांनी घेतला तरी त्याची अंमलबजावणी सोपी नाही. आज ईटली सारख्या देशात चीनी कर्मचाऱ्यांच्या संख्येचं प्राबल्य आहे आणि प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे त्यांचे आर्थिक आरोग्य चीनच्या धोरणांवर अवलंबून आहे.
आज भारतीय उपखंडात ओ बी ओ आर मार्फत तीन मुख्य रस्ते बनवण्याचा चीनचा प्रकल्प अथक चालू आहे ज्यात भारत सोडता बाकी सर्व देश जसे पाकिस्तान, नेपाळ, बांग्लादेश ,श्रीलंका व उपखंडाबाहेरचा पण नजीकचा म्यानमार (ब्रह्मदेश ) हे सर्व चीनच्या आर्थिक व पर्यायाने सैनिकी सापळ्यात अडकले आहेत वा अडकतील.  साहजिकच ह्या सर्वांची परराष्ट्र धोरणे ही बिजींग वर अवलंबून राहतील. पाकिस्तान तर पहिल्यापासून आहेच भारतविरोधी पण आता नेपाळसारख्या छोट्या देशाने सुद्धा अधिकृतपणे उपखंडाच्या सद्य राजकीय नकाशाविषयी भारताच्या विरोधात वेगळ्या नकाशाला पाठिंबा द्यावा हे ह्याच गोष्टीचं द्योतक आहे. चीनच्या सैनिकी सिद्धतेबद्दल तर सगळ्यानाच कल्पना आहे.
*मग अशा परिस्थितीत नक्की काय व्हायला हवं ?*
कारण जे आपल्याला कळतय ते सरकारला कळत नसेल असं नाही.
माझ्या मते राजकीय पातळीवर चीनला व जगाला एक कणखर व स्पष्ट संदेश पाठवण्याच्या दृष्टीकोनातून सैन्याला प्रत्यक्ष कर्मभूमीवर निर्णयस्वातंत्र्य देण्याचा निर्णय योग्य व आवश्यक आहे. जगातील सर्वोत्तम सैन्यापैकी एक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आपल्या सैन्याचं मनोबल वाढवण्याच्या दृष्टीने देखील ते आवश्यक आहे.
मात्र ह्या पेक्षा पुढे जावं लागण्याची स्थिती निर्माण होऊ नये ह्यासाठी द्विपक्षीय बोलणी, राजनैतिक हालचाली व व्यूहरचनेतून भारतासाठी आंतरराष्ट्रीय सदिच्छा  तर चीनसाठी आंतरराष्ट्रीय दबाव निर्माण करणे, उपखंडातील इतर देश आपल्या कमीतकमी विरोधात जाणार नाहीत ही काळजी घेणे व त्याचवेळी युद्धसज्ज राहून देशांतर्गत अर्थव्यवस्था कशी सुधरत राहील ही दुहेरी कसरत करणे, चीन बरोबरचा balance of trade आपल्याला अधिक फायदेशीर कसा ठरेल हे बघणे.
आपल्या अर्थसंकल्पामध्ये संरक्षणावर दिला जाणारा भर व त्यासाठीच्या आर्थिक तरतूदीमध्ये ठोस वाढ, HDFC मध्ये चीनची गुंतवणूक १% च्या वर जाताच त्यासंदर्भात पावले उचलणे, गेल्या काही वर्षातील परराष्ट्रीय संबंधातील आपल्या हालचाली, अमेरिका, इस्रायल सारख्या देशांबरोबर मैत्रीसंबंध जोपासणे, जागतिक पातळीवर एक मानवतावादी महान देश ही प्रतिमा जपण्यासाठी प्रयत्न करणे ह्या सर्वातून आपले सद्य सरकार विविध आघाड्यांवर एकाचवेळी सफलतेने कामे करू शकते हे दिसून येते आणि त्यामुळे वर उल्लेखलेल्या गोष्टी देखील त्यास जमतील असा विश्वास ठेवण्यास हरकत नसावी.
एक सामान्य नागरीक म्हणून आपली दैनंदिन  कामे चोख करणे, भावना भडकवणाऱ्या सोशल मिडीया पोस्ट्सच्या  (pro war / anti war) आहारी न जाणे ह्या दोन गोष्टीदेखील पुरेशा आहेत.
मात्र सगळ्यात महत्वाचे -  चीनसारख्या बलाढ्य शेजाऱ्याशी प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष सामना कठीणच आहे व त्यासाठी एक देश म्हणून उभे रहाणे गरजेचे आहे.

--  ©️ मनिष मोहिले

Monday, June 15, 2020

Life - Weaving of Human Mind # Depression

The news of Sushant Singh Rajput having committed suicide came as an absolutely shocking & sad news. An actor on the top of his career, having realised his dreams of becoming a successful actor in mainstream hindi cinema, rich, successful, in the prime years of his life, loved by audience for his superb performances in commercial as well as mid-way cinema. In the perception of general public, everything was picture perfect. So, what went wrong that made him take such an extreme step of ending his life ?

Well, life is much complicated than it looks. It is proven yet another time that materialistic achievements & success do not necessarily provide happiness, satisfaction & peace. The pain of loss of a young life is immense.

If we look at the whole scenario, we find many young people choosing this unworthy path - those who are struggling and those also who have established themselves.

Why exactly their mind gives in to the pressure - the pressure of struggle, pressure of competition, pressure of remaining successful & on top constantly, pressure of feeling & being lonely at the top or at the bottom & so many other pressures.

Human mind is a great source of energy - positive as well as negative. A positive mind turns life into a beautiful fabric with perfect combination of colors. It does have bright colors representing happy, satisfied moments. But that does not mean it has only bright colors. It also has dull colors representing sorrow, pain & sombre colors representing combination of both. It is not the individual colors but the combination of them, the way each color is treated & accepted in its place that makes the fabric beautiful. Such a fabric is possible only if the fabric is sturdy enough to withstand the tensions & shocks of life. A mind where negative energy dominates may come up with a very ugly fabric and it may be so weak that it may not be woven completely stopping the process inbetween.

Elaborating on the example of fabric further - A woven fabric is nothing else but interlacing of warp - vertical sheet of so many threads together & weft - the single thread that is thrown into the warp sheet by the loom for interlacing. The whole process happens with high tension & speed of modern looms - symbolising modern life.

Generally, the warp sheet is strong as there are so many threads together and also there is a coating of sizing chemical on that sheet. So it does sustain the tension of weaving. It is the single thread of weft that is inserted which may break and cause momentary stoppage of  loom & hence, weaving stops momentarily. But the moment, broken thread is taken out & new weft inserted, the loom restarts & weaving resumes in a very short time gap. However, if there is a warp break, it may take much more time & at times, there could be multiple thread breaks making the weaving impossible.

Human mind's fabric also is similar. The warp sheet is nothing else but the collective threads of our basic nature, family bonding & bacground, value system with the coating of education. Hence, it is generally strong & sturdy enough to withstand the pressures & tensions. The weft is nothing else but our mind's response to the pressure & magnitude of the situation that life throws at us. At times, if problem is bigger then temporarily we may give a broken response but we recover & insert a new response to the situation & resume life.

However, if there is a warp break ? If we think on those lines, in the first place, why should there be a warp break ?  Why so many threads would break together ?

Well, although it is a sheet of collective threads, each thread is individual and its performance contributes to the behaviour of warp sheet. Each thread's performance depends upon its tenacity & elongation i.e. strength & flexibility in the context of mind & life.

While responding to any problem, one should try to be as strong as possible with the help of nature, family love & bonding, value systems & education & do what is right & convincing to self.
However, only strength won't help because without flexibility it would certainly break beyond a certain tension point. The flexibility is important for accepting things & adapting our responses without compromising basic values.  Mere flexibility also won't work as one has to have strength of character.

If there is any issue with either tenacity or elongation i.e. strength or flexibility or both, the warp threads may break & cause a tragic event.

This may happen due to some historical mental issues or a phase producing continuous bigger problems.

That is why each thread in warp having a proper balance of strength & flexibility with proper coating of education is essential. It works as our emotional support system protecting the warp sheet.

Apart from this, it is also essential to maintain the loom in proper condition by maintaining its crucial parts, maintaing proper lubrication & periodical checks on working etc. In context of life, the crucial parts are relatives apart from immediate family, friends, proper social circle etc and lubrication in the form of hobbies, recreational activities, socialising in right sense, meditation & anything that relieves you from stress even temporarily & gives you peace of mind. This should be a regular activity - a part of your life. Also very important is periodical checks in the form of communication with self & near & dear ones.

With a proper emotional support system & proper maintenance, our mind can produce a life strong enough to withstand pressures & making it beautiful also giving the mind further strength & confidence that the strategy works.

Unfortunately, if anything is amiss, it may lead to a warp break.

Let us hope that it does not happen with anyone and let us try to work towards that at individual as well as collective level.

-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*

Below extension is a result of a suggestion from my niece Oshin (a master in clinical psychology) to elaborate on the remedial part - identifying the trigger signals & seeking help. Points given by her, blending with metaphor & wording is my handiwork.

Thanks for the suggestions Oshin.

*-*-*-*-*-*-*-*-*-*

The question is how to work towards this.

Now, before there is a warp break, is there any warning ? In weaving, if you see one or the other thread breaking in short time frame, it is an indication that there may come a situation of multiple thread breaks. So you try to reduce the loom speed, adjust tension etc. Thus, there is some signal giving warning. The worker who attends to machine has to be vigilant about single threads breaking more frequently in order to take necessary steps like bringing it to the attention of competent officer who can take right action.

In case of life of a person also, such warning signals do flash up.  These warning signals could be varied. Like, certain behavioural patterns can be seen in the person e.g.  being always sad, talking less, eating less or more than normal, getting irritated/ angry at smallest disruptions of any form, insomnia or hypersomnia, anhedonia i.e. things / activities which earlier used to be pleasurable, also tend to be boring, irritating etc.

Also the way the person expresses himself / herself can also show some warning signals.  Like speaking from a negative mindset only, remembering sad/ negative things, social media posts conveying gloomy or negative vibes etc.

The important thing is taking notice of such warnings & acting accordingly. There is no specific worker here. It has to be the person himself/herself (which is difficult obviously) or the immediate family members/ close friends. It must be brought to the notice of that person in a very sensitive & sensible manner. The acceptance by that person & his close ones, about having this psychological issue is the first step. It is so because, in our country particularly the physical diseases are easily accepted but not the psychological ones. Most of the times, they are perceived to be insanity of one type or the other. Another popular belief is depression or any such psychological issues is a sign of weak mind. In fact, as per psychology & psychologists, even creative, intelligent & sensitive mind is equally susceptible to issues like depression tendencies. More successful the person- particularly not having faced with major failures, is more susceptible to depression if faced with one.  With awareness about such facts, the acceptance would be easier.

Then comes the step of seeking help - of near & dear ones or professional therapists depending upon severity of the depression. Professional help is always recommended. There is no need to feel ashamed of it. Just like we go to a physician in case of physical diseases, in case of psychological issues, one should seek help from psychologists / therapists. The immediate family members & close friends should help in taking this decision.

In addition to this immediate step, it is also needed to work on long term solutions like making oneself more resilient to pressures, tensions so that the adversities / failures in life can be tackled with more strength & flexibility - tenacity & elongation. It is here - building up this resilience where professional help is very important & effective. More so if properly supported by care, love, affection & listening ear from the support group.

At the end of the day, everyone should remember that life is too precious & it is meant for living.

---- Manish Mohile

Tuesday, June 9, 2020

विरहिणी



विरहिणी

बाहूंत सख्याच्या रात कधीची सरली
लावण्यवती ही मुग्ध होऊनी बसली

कचपाश मोकळा आठवितो अंगुली
स्पर्शून हनु जी सर्वांगास बिलगली
कथे अधरपाकळी, तिजवरची अन् लाली
अधरांनी कथा जी अधरांना सांगितली

बाहूंत सख्याच्या रात कधीची सरली
लावण्यवती ही मुग्ध होऊनी बसली

कंचुकी तंग  हलकेच सरकली  खाली
प्रीतखूण गुलाबी हळूच आडून हसली
मधुरात कुसुंबी शय्येवरती खुलली
प्रणयात शिणूनही गौर तनू ही फुलली

बाहूंत सख्याच्या रात कधीची सरली
लावण्यवती ही मुग्ध होऊनी बसली

प्रीत भेट सख्याने सरल्या राती दिधली
होऊन विरहिणी सकाळ भेटीस आली
आठवून रात कामिनी लाजली गाली
अन् रातीकडे ती डोळे लावून बसली

बाहूंत सख्याच्या रात कधीची सरली
लावण्यवती ही मुग्ध होऊनी बसली

---- मनिष मोहिले 

Monday, June 8, 2020

ज्ञानेश्वर आणि पिकासो

माझा शाळामित्र राजेश जोशी - एक कलाकार - शाळेपासूनचा एक प्रतिभावान चित्रकार, जे जे स्कूल ऑफ आर्ट्स मध्ये कलाध्यायन केलेला विद्यार्थी आणि व्यवसायाने एक प्रथितयश फोटोग्राफर.

तंत्रज्ञानाचा वर म्हणून व्हॉट्सॅप हे ॲप आपल्या मोबाईल वर आलं आणि शाळा सोडून वीस बावीस वर्षं झाल्यावरसुद्धा  शाळासोबत्यांबरोबर व्हॉट्सॅप शाळा पुन्हा एकदा नित्यनेमाने भरू लागली.

जुन्या सवंगड्यांची नव्याने ओळख झाली. कुणाकुणाचे काही नवीन कलागुण सामोरे आले. ह्याच प्रवासात राजा (राजेश जोशी) चा ब्लॉग वाचनात आला आणि लक्षात आलं की राजा फक्त कुंचला वा कॅमेरा वापरूनच छान चित्र निर्माण करतो असं नाही तर त्याच्या लेखणीतून देखील तो फार सुरेख शब्दचित्र रंगवतो - साध्या सुलभ ओघवत्या आणि बोलक्या शैलीत.

त्याच्या ह्या ब्लॉगवरील एका लेखात त्याने जगप्रसिद्ध कलाकारांच्या अजोड कलेमागील त्यांच्या मनोभूमिकेबद्दल लिहीताना पिकासोचं एक वाक्य उद्धृत केलं होतं - पिकासो म्हणाला होता की मी चार वर्षांच्या सरावानंतर हुबेहूब राफाएलच्या शैलीत चित्र काढण्यात यशस्वी झालो पण एका लहान मुलासारखं चित्र काढण्यासाठी पूर्ण आयुष्य खर्ची घालावं लागेल असं वाटतं.

ते वाक्य वाचलं आणि एकदम काहीतरी चमकल्यासारखं झालं मनात. खरंच किती खोल अर्थ भरला आहे ह्या एका वाक्यात. काय अभिप्रेत असावं पिकासोला हे म्हणताना ? राफाएलच्या थोरपणाविषयी तर शंकाच नाही. पण तरीही तुलनात्मक दृष्ट्या लहान मुलाप्रमाणे चित्र काढणे हे जास्त कठीण ??

त्याचं कारण असं असावं की कलाकार जसा कलाकार असतो तसाच माणूसही आणि वाढत्या वयाबरोबरच त्याच्यातील माणसाप्रमाणेच कलाकार देखील संस्कारबद्ध होत जातो - कलेच्या बाबतीत हे संस्कार त्याच्या नजरेचे, अनुभूतीचे, प्रेरणास्त्रोतांचे आणि शैलीचे. त्याच्यातील माणूस कलाकार घडवत जातो आणि कलाकार माणूस. ह्या घडणीमध्ये कुठेतरी कळत नकळत साचा डोकावू शकतो. त्यामुळे कलाकाराच्या निर्मितीच्या दर्जात कमीपणा येतो असं नाही पण अनुभूतीच्या व्यक्त होण्यात क्वचित एक साचा आढळू शकतो - मग तो माध्यमाचा असो, शैलीचा असो, प्रेरणेचा असो वा त्या कलाविष्कारातून दिसणाऱ्या कलाकाराच्या व्यक्त्तिमत्वाचा असो.

पण लहान मुलांच्या बाबतीत असे कुठलेच संस्कार / प्रभाव नसल्यामुळे त्यांच्या प्रत्येक कलाविष्कारात एक नूतनता आणि सहजता दिसून येते - शैलीची, माध्यमाची, व्यक्तिमत्व प्रतिबिंबाची व प्रेरणेची देखील. एक सहजता व म्हणून सुंदरता - सहजसुंदरता.

मला वाटतं सहज ह्या शब्दाची सह + ज अशी फोड असावी. सह म्हणजे एकत्र / बरोबर आणि ज म्हणजे जन्मणे.  प्रत्येक कलाविष्कारातून कला आणि कलाकार  एकत्र दिसून येतात (जन्माला येतात ) तेव्हा ती कलाकृती सहज आणि म्हणूनच अप्रतिम,  अद्वितीय वाटते कारण त्यात दोघांचं अद्वैत साधलेलं असतं.

म्हणूनच बघा की कोणतीही निसर्गनिर्मिती ही सगळ्यात सुंदर असते. कारण ती सहज असते. कलाकार निसर्ग आणि त्याची कलाकृती एकमेकांपासून वेगळे करताच येत नाहीत. हे अद्वैत साधण्यासाठीच प्रत्येक प्रतिभासंपन्न कलाकाराचा आटापिटा चालू असतो आणि ज्या क्षणी हे अद्वैत साधतं त्या क्षणी अजरामर कलाकृती निर्माण होते. मग ते चित्र असेल, शिल्प असेल, संगीत असेल वा शब्दचित्र असेल. ही सहजता येण्यात सराव हवा पण प्रभाव नसावा वा असलाच तर पडद्यामागच्या कलाकाराप्रमाणे असावा. लहान मुलांच्या बाबतीत हे शक्य असतं कारण त्यांच्या सृजनशीलतेवर कल्पनाविश्वावर साचा, शैली, मनोभूमिका ह्यांचा प्रभाव जवळपास नसतो आणि म्हणून ते मूल त्याच्या मूळ प्रकृतीप्रमाणे  कलाकृतीत दिसतं - त्याच्या कलेबरोबरच्या अद्वैताचा परिपाक. लहान मुलांची कोणतीही कृती ही इतकी सहज असल्यामुळेच एखाद्या कलाकृती प्रमाणे सुंदर असते आणि दिसते.

म्हणूनच बहुतेक पिकासो म्हणाला होता
Every child is an artist. The problem is how to remain an artist once he grows up.

कलाकार, त्याची घडण आणि त्याची कलाकृती  ही एक सतत चालू असलेली निर्मिती प्रक्रिया आहे ज्यात वेगवेगळ्या टप्प्यावर कलाकाराच्या प्रगल्भतेप्रमाणे कलाविष्कार होत रहातात व त्यातून प्रवासालेख दिसत रहतो -  त्या कलाकाराचा एक कलाकार तसेच व्यक्ती म्हणून व त्याच्या कलेचाही. हा प्रवास जितका नूतन दिसत राहील, साधा सहज व सुंदर दिसत राहील तितका तो कलाकार मुक्त, निसर्गाच्या, प्रेरणेच्या व कलेच्या अधिक जवळ, अधिक सहज. आणि म्हणूनच बहुतेक पिकासोने वेगवेगळ्या माध्यमातून, वेगवेगळ्या शैलीत  कलाकृती निर्माण करण्याचा प्रयत्न केला - जाणीवपूर्वक वा सहसा. कारण त्याच्याच म्हणण्यानुसार
Everything you can imagine is real.

मात्र हे नावीन्य, ही नूतनता रहावी ह्यासाठी आवश्यक आहे ते लहान मुलासारखं संस्कारीत / प्रभावित (influenced/processed) नसलेलं मन. पण वाढत्या वयाबरोबर मन अशा प्रकारे संस्कार / प्रभाव ह्यापासून अलिप्त ठेवणं कठीण आणि म्हणून पिकासो म्हणतो Every act of creation is first of all an act of destruction.

प्रत्येक नवीन कलाविष्कार करताना आधीचं सगळं नष्ट करा मनातून - आधुनिक काळातील अनाभ्यास (unlearning) ची संकल्पना इथे दिसते.

पण हा अनाभ्यास देखील एका रचनात्मक सृजनाकडे घेऊन जाण्यासाठी.  वेगवेगळे  संस्कार/ प्रभाव / शैली / प्रेरणा / कल्पना ज्या आधारे आत्तापर्यंत कलानिर्मिती केली; ते सर्व नवीन कलाविष्कारात अशा रीते मदतरूप होतील की कौशल्य प्रभावी करण्यास त्यांचा उपयोग होइल पण अनुभूती , तिचं प्रकटीकरण, त्याची शैली, त्यात प्रतिबिंबीत होणारं कलाकाराचं व्यक्तिमत्व ह्यात नावीन्य व नूतनता राहील आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सहजता राहील. अशी सहजता की ज्यात सराव, तपस्या, अभ्यास, अनाभ्यास (unlearning) ह्या सगळ्यांचा परिपाक असेल  पण तो दिसणार नाही. त्या कलाकारासाठी देखील हे विनासायास व सहजपणे होइल आणि तीच सहजता त्या अजरामर कलाकृतीत दिसेल.
लिओनार्डो द विंची म्हणून गेला त्याप्रमाणे simplicity is the ultimate sophistication.

माझ्या मते हे तेव्हाच होतं जेव्हा कलाकार निसर्गाशी, प्रेरणेशी, कल्पनेशी इतका एकरूप होतो आणि त्यामुळे तो कलाविष्कार इतका सहज बनतो; की जणू तो कलाकारच कलाविष्कार बनून त्या कलाकृतीत प्रकट होतो. कलाकार आणि कलाकृती ह्यांच्यामधील हे अद्वैत. 

ह्याच संदर्भात आठवलं ते पु लं च्या वंगचित्रे  मधील अनमित्र नावाच्या एका बालचित्रकाराला चित्रनिर्मिती करताना जवळून पहाण्याचा जो अनुभव पु लं ना मिळाला त्याबद्दल पु लं नी जे लिहीलय ते. निर्माता आणि निर्मीती ह्यांच्यामधील अद्वैताबद्दल ज्ञानेश्वरांच्या चार ओळींचा उल्लेख त्यात आहे.

तैसे भोग्य आणि भोक्ता
दिसे आणि देखता
हे सरले अद्वैता
अस्फुटामाजी

त्या अस्फुट अद्वैताच्या प्राप्तीसाठी कलाकाराचा प्रयत्न अथक चालत असतो. जीवनभराच्या विद्याध्ययन, सराव, अभ्यास अनाभ्यास, मनन, चिंतन, कल्पनारंजन ह्यातून, लहान मुलाप्रमाणे सहज निर्मिती करायची - सहज, साधी आणि म्हणून अद्वितीय अशी सहजसुंदर .

मात्र एकदा हे साध्य झालं म्हणजे पुढील नवीन आविष्कार आपोआप अजरामर होत नाही. त्यासाठी पुन्हा तीच तपस्या, अभ्यास अनाभ्यास आणि सहजता हा प्रवास व प्रयास अनिवार्य .

हा प्रवास निरंतरचा प्रवास. कलाकार व कला ह्यांच्या द्वैतापासून अद्वैतापर्यंतचा - जिथे प्रयास व सरावातून  आलेली सहजता आणि म्हणून सुंदरता हा स्थायीभाव. जिथे कला स्वत:च कलाकार आणि कलाकार स्वत:च कला.

जेव्हा हे घडतं तेव्हा मायकेल ॲंजेलो म्हणून जातो The true work of art is but a shadow of  divine perfection आणि एक अप्रतिम शिल्प निर्माण होतं. हे घडतं तेव्हा ऐ मेरे वतनके लोगो गाताना लताचा सूर पंडीतजीना रडवतो, हे घडतं तेव्हा मृत्यूंजय मधून कर्ण आपल्याशी बोलतो, हे घडतं तेव्हा शास्त्रीय  संगीताची एखादी मैफील कायमसाठी स्मरणात रहाते आणि हे घडतं तेव्हा ज्ञानेश्वरी निर्माण होते.

-- मनिष मोहिले 

Sunday, June 7, 2020

आव्हान



आव्हान

केलास मुक्त तू विपुल केशसंभार
ही कैद असे परि मजला प्रिय अपार

बिलगले वस्त्र हे मोहक वळस्यांसरसे
अप्सराच जणू अवतरली भू वर, भासे

कमनीय कटी; गळा कातिल, सुरईदार
प्राशिते नजर; परि तृषा चढे अनिवार

मिटल्या डोळ्यातूनी मादकता ओसंडत आहे
आव्हान खुले मदनास रतीचे आहे

---- मनिष मोहिले