Tuesday, July 7, 2020

शिवाजी महाराज व लोकमान्य टिळक - देशकारण व साधर्म्य

प्रत्येक देशाच्या जीवनकालात काही कालखंड असे येतात की त्या कालखंडात देशकारणामध्ये - (राजकारण, समाजकारण, अर्थकारण, धर्मकारण) - एक प्रचंड उलथापालथ होते. सगळं काही समूळ ढवळून निघतं आणि काही आमूलाग्र बदल होतात.

आपल्या भारतभूमीच्या बाबतीत बघितलं तर मौर्य साम्राज्याची स्थापना व विलय, ग्रीकांचं व त्यानंतर इतर परदेशी आक्रमकांचं भरतभू वरील आक्रमण, बऱ्याच मोठ्या भागावरील मोगल अंमल, हिंदवी स्वराज्याची स्थापना, विस्तार व विलय, ब्रिटीशांची राजवट आणि भारतीय स्वातंत्र्यलढा अशा प्रमुख घटना दिसतील जेव्हा काही समूळ बदल होत आपल्या देशाचं देशकारण बदललं.

तर ह्या सर्वांमध्ये मराठी वाचकाला ज्याबद्दल  त्यातल्या त्यात अधिक माहीती आहे व जिव्हाळा देखील असे दोन कालखंड म्हणजे हिंदवी स्वराज्याची स्थापना आणि भारतीय स्वातंत्र्यलढा - विशेषकरून त्यातील टिळक व सावरकर ह्यांचे योगदान. हा लेख म्हणजे; छत्रपती शिवाजी महाराज व लोकमान्य टिळक ह्या दोन थोर राष्ट्रपुरूषांनी दोन सर्वस्वी वेगळ्या कालखंडात जे देशकारण केलं त्या देशकारणाच्या संदर्भात दोघांमधील साम्यस्थळे शोधण्याचा एक प्रयत्न आहे.

आपण सर्व हिंदवी स्वराज्याचे संस्थापक म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा जयजयकार करतो. त्यांनी वयाच्या सोळाव्या वर्षी घेतलेली स्वराज्य स्थापनेची शपथ, अफजलखानाचा वध, शाइस्तेखानाची फजिती, आग्र्याहून सुटका ह्या अतिशय नाट्यमय अशा घटनांबद्दल कौतुकाने बोलतो. पण शिवाजी महाराज म्हणजे फक्त ह्या मोजक्या नाट्यमय घटना का ?
त्याचप्रमाणे लोकमान्य टिळक म्हटले की व्यायामासाठी दिलेलं एक शैक्षणिक वर्ष, सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय, किंवा मंडालेची काळ्या पाण्याची सहा  वर्षांची शिक्षा, हेच  महत्वाचं का ?
एखाद्या देशाच्या देशकारणात बदल घडवून आणायला फक्त अशा मोजक्या नाट्यमय घटना कारणीभूत असतात की अजून काही अधिक सखोल असं त्यामागे असतं?

देशकार्यामागची विचारप्रक्रिया

देशकारण बदलण्यामागे असते एक सखोल, हेतूपूर्वक राबवली जाणारी व नाट्यमयता  नसलेली अस्सल विचारप्रक्रिया. अस्सल अशासाठी की प्रत्येक देशाच्या पुनरुत्थानाचे व स्थित्यंतराचे मार्ग वेगळे असतात. प्रत्येक देशाच्या विशिष्ट कालखंडातील स्थिती ही त्या देशापुरती विवक्षित असते आणि त्या स्थितीला लागू होणारी विचारप्रक्रिया ही इतरत्र कुठूनही उचलून तशीच्या तशी वापरता येत नाही. त्यासाठी ती अस्सलच असावी लागते.

जशी विचारप्रक्रिया जिजाऊ आईसाहेबांनी राबवली आणि शिवाजी महाराजांनी पूर्णत्वास नेली. तीनशेहून अधिक वर्ष मुर्दाड होऊन सुलतानांची गुलामी करणाऱ्या ह्या भारतात स्वातंत्र्याची ठिणगी कोणाच्याही  मनात पेटणे शक्य नाही ह्याबद्दल सुलतानांची खात्री झाली होती.  कारण तोपर्यंत  एतद्देशीयांनी तलवार गाजवायची, मुलूख मारायचा; पण कोणा ना कोणा बादशहाचा सरदार / जहागिरदार म्हणून असाच पायंडा पडला होता. आपल्याकडील जनतासुद्धा, सुलतानांकडून कोणाला  किती मोठी जहागिरी वा मनसबदारी मिळते ह्यावर व्यक्तीचं कर्तृत्व व मोठेपण ठरवायच्या मानसिकतेला सरावली होती. ह्या मानसिकतेला व पायंड्याला  जिजाऊ आईसाहेबांनी सुरूंग लावला आणि त्यांच्या ईच्छेला; हिंदवी स्वराज्याची स्थापना करून, मूर्तरूप दिले शिवाजी महाराजांनी. त्यासाठी त्यांनी एक निश्चित मनोभूमिका तयार करून ती मनोभूमिका विविधप्रकारे जनसामान्यांच्यापर्यंत पोचवून त्याना देशकारणात सहभागी करून घेतले.

अगदी अशाच प्रकारे, ब्रिटीश राजवटीत लोकमान्य टिळकांची स्वातंत्र्याची चळवळ जन्माला येइपर्यंत, कोणालाही असं वाटलं नव्हतं की राष्ट्रव्यापी स्वरूपाची भक्कम अशी स्वातंत्र्य चळवळ उभी राहील. कारण त्या काळातदेखील  मॅट्रीकपर्यंतच्या शिक्षणानंतर सरकारी कार्यालयातून कारकून व अधिक शिक्षण म्हणजे वकिली करून सुखवस्तू जीवन जगणे ह्यातच कर्तृत्व शोधत व ईतिकर्तव्यता मानत. मग जमेल तसे समाजकार्य करून एक मानसिक समाधान मिळवायचे. ह्या मानसिकतेला आपल्या स्वतंत्र बुद्धीने नाकारत लोकमान्यांनी वेगळेच पाऊल उचलले व उदरनिर्वाहापुरते उत्पन्न मिळवून इतर सर्व वेळ देशकार्यासाठी वाहण्याचा संकल्प केला व तो निभावून नेला. आपल्या अस्सल व मूलगामी विचारप्रक्रियेतून लोकमान्यांनी एका भक्कम अशा नि:शस्त्र राजकारणाच्या राष्ट्रीय चळवळीचा पाया घातला. सर्वाना आपली वाटेल अशा प्रकारे चळवळीचे स्वरूप बनवून तिला राष्ट्रव्यापी स्वरूप दिले.

राष्ट्रीयत्वाची जाणीव

देशकारणात बदल घडवून आणायला मुळात जनतेमध्ये देशाची / राष्ट्रीयत्वाची भावना जागृत असावी लागते. शिवरायांचं खरं मोठेपण हे की शेकडो वर्षे गुलामगिरीत काढून मुर्दाड बनलेल्या मराठी मनाला त्यांनी जागं केले आणि त्यात स्वत्व, स्वातंत्र्य, स्वराज्य अर्थात एतद्देशीयांचे राज्य व स्वधर्म ह्याबद्दल  अभिमान भावना व जाणीव निर्माण केली व वाढीस लावली. हे राज्य म्हणजे केवळ एका राजाचे राज्य नसून येथील सर्व जनतेचे आहे व त्यासाठी कष्ट व संघर्ष करणे हे आपले परमकर्तव्य आहे असे महाराष्टातील जनतेस वाटावयास लागले हे शिवाजी महाराजांचे सर्वात मोठे यश म्हणावे लागेल.

अगदी अशाच प्रकारची निद्रीस्त समाज परिस्थिती लोकमान्यांच्या वेळेस देखील होती. त्यावेळेस समाजातील जात पात , धर्म, स्त्री पुरूष असे छोटे छोटे भेदभाव इतके वाढीस लागले होते की, राष्ट्रीयत्वाची जाणीव सोडाच पण आपण एका समाजाचे सदस्य आहोत हे सुद्धा लोकाना पटवणं कठीण होतं. अशा काळात, राजकीय स्वातंत्र्य नसताना, जनतेमध्ये प्रथम एकीची व त्यामागून राष्ट्रीयत्वाची जाणीव जागृत करणाऱ्या लोकमान्यांचे कार्य, शिवरायांच्या कार्याइतकेच मोलाचे होते.

गनिमी कावा - शिवरायांचा व लोकमान्यांचा

सुलतानांच्या प्रचंड सैन्यासमोर सरळ युद्धात टिकाव लागणार नाही हे ओळखून शिवाजी महाराजांनी गनिमी काव्याच्या तंत्राचा यशस्वी वापर करत, कमीत कमी सैन्य व युद्धसाहित्याच्या जोरावर  बलाढ्य अशा चार सुलतानशाह्यांच्या छातीवर पाय रोवून हिंदवी स्वराज्य निर्माण केलं आणि राज्याभिषेक घडवून आणून त्यास जगन्मान्यता देखील देवविली.  शत्रूच्या बलस्थानांनाच त्यांची मर्मस्थाने  बनवणे हा गनिमी काव्याचा मुख्य भाग. शिवरायांनी; हत्ती, तोफा, उंट ह्या बादशाही सैन्याच्या बलस्थानाना त्यांची मर्मस्थाने  बनवण्यासाठी मैदानी प्रदेशांऐवजी सह्याद्रीच्या डोंगराळ मुलूखाला युद्धभूमी बनवलं आणि सगळं चित्र पालटून टाकलं.

अगदी त्याचप्रमाणे लोकमान्यांनी; ब्रिटीशांच्या, आम्ही कायद्याचा आदर करतो ह्या दर्पोक्तीचा आधार घेत सनदशीर रित्या परिणामकारक राष्ट्रीय राजकीय चळवळ करण्याचा यशस्वी प्रयत्न केला.
मिळालेल्या मर्यादित वृत्तपत्रीय स्वातंत्र्याचा आधार घेत स्वातंत्र्याची जाणीव निर्माण करत, सरळ सरळ राजकीय स्वरूप नसलेल्या पण लोकांना एकत्र आणणाऱ्या, त्यांच्यातील एकी वाढवणाऱ्या, नेतृत्वगुणाना वाव देणाऱ्या अशा सार्वजनिक गणेशोत्सव व शिवजयंती उत्सवातून लोकांना एकत्र आणत एक राष्ट्रीयत्वाची जाणीव निर्माण केली. नुसतीच जाणीव निर्माण केली असं नाही तर त्यातून एक प्रचंड कृतीशील चळवळ उभी केली. हा गनिमी कावा अशासाठी की लोकमान्यांचं हे पायाभरणीचं काम चालू असताना त्यांच्या स्वातंत्र्यप्राप्तीच्या विचारांचा सुगावा ब्रिटीश सरकारला नव्हता. उलट लोकमान्याना नामदारकी देण्याइतपत ब्रिटीश राज्यकर्ते त्यांच्यावर खूष होते. आणि केले जाणारे उत्सव इत्यादीना ते सरकारविरोधी कृत्यात टाकू शकत नव्हते. टिळक हा ब्रिटीश सरकारचा खरा बलाढ्य व खऱ्या अर्थाने जहाल शत्रू आहे ही जाणीव ब्रिटीशाना उशीराने झाली.

शत्रूच्या गोटात जाऊन दिलेला शह

आग्र्याहून सुटका ही शिवाजी महाराजांच्या जीवनातील सर्वात जास्त थरारक घटना होती असे म्हणावयास हरकत नाही. स्वराज्याच्या सर्वात बलाढ्य शत्रूच्या ऐन घरात जाऊन तिथून त्याच्या हातावर तुरी देऊन निसटणे हा शत्रूच्या गोटात जाऊन त्याला दिलेला सर्वात मोठा शह म्हणावा लागेल. त्यातून पुरंदरच्या  तहातून पुढे आलेल्या आग्राभेटीचा प्रस्ताव मान्य करण्यात देखील शिवरायांचा दृष्टीकोन होता मुघल साम्राज्य जवळून बघण्याचा व अभ्यासण्याचा. औरंगजेबाच्या मुघल साम्राज्याची बलस्थाने व मर्मस्थाने जवळून हेरता यावी ही दूरदृष्टी ठेऊन महाराज आग्र्यास गेले होते.

तद्वतच लोकमान्यांनी देखील त्यांच्याबद्दल  व क्रांतिकारकांबद्दल; लंडनच्या टाईम्समध्ये लेख लिहून बेजबाबदार विधाने केल्याबद्दल टाईम्सचे सर व्हॅलेन्टाइन चिरोल ह्यांच्या विरूध्द इंग्लंडला जाऊन लंडनच्या न्यायालयात, अब्रूनुकसानीचा दावा लढवून स्वत:च्या लढाऊ वृत्तीची साक्ष देत ब्रिटीशांच्या अरेरावीला शह देण्याचा प्रयत्न केला होता. हा खटला लढण्यामागे लोकमान्यांची देखील अशी दूरदृष्टी होती की वृत्तपत्रीय स्वातंत्र्याच्या आवाक्याची व मर्यादांची व्याख्या व राजद्रोहाची व्याख्या न्यायालयीन चौकटीत नक्की व्हावी जेणेकरून पुढील चळवळ त्याआधारे अधिक प्रभावी बनवता येइल.

बलाढ्य सत्तेविरोधात सर्व विरोधकांची एकत्रित आघाडी

चार पातशाह्यांविरुद्ध लढून स्वराज्य स्थापनेस उभ्या ठाकलेल्या शिवरायांनी मुघल सोडून बाकी शाह्यांना लवकरच जेरीस आणून त्यांच्यावर जबरदस्त वचक बसवला. कुतूबशाहाशी तर त्यांनी मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करून उत्तरेच्या मुघलांविरुद्ध दक्षिणेतील राजवटींची आघाडी उभी करण्याचा प्रयत्न केला. एक द्रष्टा व दूरदर्शी राज्यकर्ता म्हणून हे पाऊल फार महत्वाचे होते. त्याचप्रमाणे त्यांच्या पदरी नोकरी मागावयास आलेल्या छत्रसाल बुंदेल्यास, बुंदेलखंड स्वतंत्र करण्याची प्रेरणा देताना; जशी एका कर्तृत्ववान क्षत्रियाची ओळख जगाला व्हावी ही गुणग्राहकता दाखवली  होती तसाच; राजपुतान्यात देखील मुघलांविरूद्ध एक नवीन आघाडी उघडी होऊन, त्यांची ताकद थोडी का होइना वाटली जाइल; असा धूर्त राजकारणी डाव देखील खेळला होता.

लोकमान्यांनी देखील जवळपास शून्य राजकीय हक्क व स्वातंत्र्य असलेल्या गुलाम देशात प्रभावी व परिणामकारक नि:शस्त्र लढा देण्यासाठी, जास्तीत जास्त लोकांचा सक्रीय सहभाग हीच सर्वात मोठी शक्ती आहे हे ओळखून अधिकाधिक लोकांना चळवळीशी जोडण्याचा प्रयत्न आयुष्यभर सातत्याने केला. लोकमान्यांनी देखील नेपाळ, ब्रह्मदेश अशा ब्रिटीश साम्राज्यांतर्गत असलेल्या इतर देशात ब्रिटीशविरोधी आघाडी उघडता येइल का ही चाचपणी केली होती. हेतू स्पष्ट होता की बलाढ्य ब्रिटीशांविरुद्ध एकत्रित आघाडी उघडता येइल का आणि ब्रिटीशांचं जे सर्वात मोठं बलस्थान - त्यांचं साम्राज्य त्यालाच त्यांचं मर्मस्थान कसं बनवता येइल.

सर्वांगीण देशकारणाचा प्रयत्न

शिवाजी महाराजांनी युद्धात अतुलनीय शौर्य आणि रणनीती व कूटनीतीत अतुलनीय कौशल्य दाखवत स्वराज्य स्थापना केली. पण राज्य संपादनाइतकेच; किंबहुना त्याहूनही महत्वाचं व कठीण काम राज्यसंगोपनाचे आहे ह्याची संपूर्ण जाणीव त्यांना होती. त्यामुळेच सततच्या लढायांमधून जो काही वेळ त्यांना मिळाला त्यात त्यांनी राज्यातील महसूल पद्धती व्यवस्थापन, जमीनधारणेचे कायदे, जमा महसूलाचे स्वराज्य विकास व समृद्धीसाठी सुयोग्य विनिमय व्यवस्थापन, तेव्हाच्या परिस्थितीस साजेशी स्वराज्याच्या स्वतंत्र नाण्यांची निर्मिती, ह्या सर्वायोगे अर्थेव्यवस्थेचे नियंत्रण व सुनियमन, न्यायव्यवस्था, सुनियंत्रित व सुनियमित जबाबदार उत्तरदायी ग्रामीण सेवा तंत्र, कला व सांस्कृतिक विकास इत्यादी सर्व क्षेत्रांचा सर्वांगीण विकास व उन्नयन व्हावे म्हणून प्रयत्न केले. हे सर्व करताना महाराजांनी हिंदवी ह्या शब्दाचा एतद्देशीय असा व्यापक अर्थ घेत, धर्म, जात पात बाजूला ठेवत  गुणांच्या जोरावर माणसांची निवड केली.

लोकमान्यांनी देखील स्वातंत्र्यप्राप्तीसाठी चळवळ हा मूळ हेतू असला तरी सामाजिक पातळीवर दारूबंदी चळवळ, आर्थिक पातळीवर पैसाफंड चळवळ अशा उपचळवळी देखील चालू ठेवल्या. केतकरांसारख्या गुणी गृहस्थाने जेव्हा मराठीत विश्वकोश निर्माण करण्याची महत्वाकांक्षा दाखवली तेव्हा त्यांना उत्तेजन दिले. विष्णूपंत छत्र्यांसारख्या त्याकाळी सर्कस सारख्या धंद्यात नाव कमावणाऱ्या व्यक्तीचे महत्व ओळखून राष्ट्रकार्यात जनसंपर्क वाढवण्यासाठी त्यांचा कसा उपयोग होइल ह्याचा विचार केला. त्यात जनसंपर्क ह्याबरोबरच, छत्र्यांची उद्योगधंद्यातील धडाडी पाहून इतरांनी प्रेरीत व्हावे हा ही विचार होता. राष्ट्रकार्यासाठी माणसे जोडताना लोकमान्यांनी देखील देशभक्ती व देशकार्याची तळमळ ह्या गुणविशेषांखेरीज बाकी जात, पात, धर्म ह्या कडे दुर्लक्ष केले. मात्र दोन धर्मात दुफळी पाडून त्याचा दुरूपयोग ब्रिटीश सरकारने करू नये याबाबत ते जागरूक राहीले.

अद्भुत बुद्धीवैभव

शिवराय व लोकमान्य ह्या दोघांनाही अद्भुत बुद्धीवैभवाची ईश्वरीय देणगी मिळाली होती. ह्या बुद्धीमत्तेमुळेच ते पठडीबाहेरचा स्वतंत्र विचार करू शकले आणि तो विचार कृतीत उतरवून राष्ट्रव्यापी स्तरावर देशकारण बदलू शकले.  शत्रूपक्षाशी दिलेली लढत, शह काटशह, सर्वांगीण विकासाचे प्रयत्न ह्या गोष्टी त्या बुद्धीमत्तेच्या द्योतक आहेत. लोकमान्यांनी तर Orion आणि The Arctic Home of Vedas सारखे विद्वज्जड व खगोलशास्त्र आणि गणिताशी संबंधित ग्रंथलेखन देखील केले. गीतारहस्यासारखा भगवद्गीतेवरील अजोड ग्रंथ लिहून स्वत:च्या राष्ट्रास वाहिलेल्या जीवनकार्यास एक निश्चित अध्यात्मिक बैठक देऊन आपल्या चौफेर बुद्धीचा पुरावाच दिला आणि शिवाजी महाराजांनी तर साक्षात योगेश्वर कृष्णाने ज्या नीरक्षीर विवेकाने कलासुंदर परिपूर्ण राज्य केले असते त्या तोडीचे राज्य करून दाखवले.

दुर्दम्य ईच्छाशक्ती व आत्मविश्वास

अपार बुद्धीवैभवाबरोबरच दुर्दम्य ईच्छाशक्ती व अदम्य आत्मविश्वास ह्या दोन बाबतीत या दोन थोर राष्ट्रपुरूषान्मध्ये साधर्म्य दिसून येते. ह्या ईच्छाशक्ती व आत्मविश्वास ह्यांच्याच जोरावर; सामान्य जन जिथे निराशेच्या  गर्तेत कायमचे फेकले जातील अशा प्रतिकूल परिस्थितीतून दोघांनीही सातत्याने मार्ग काढत वैयक्तिक व सामाजिक पातळीवर आशावाद जागृत ठेवला आणि लाखोंना कर्मरत राहून कर्तव्य करत रहाण्याचे बळ दिले, प्रेरणा दिली. आपापल्या काळात संपूर्ण देशाचं देशकारण प्रभावी व परिणामकारकपणे बदलणाऱ्या शिवाजी महाराजांचं युगप्रवर्तकपण आणि लोकमान्यांची लोकमान्यता ह्यांचं खरं रहस्य ह्या दुर्दम्य ईच्छाशक्ती व अदम्य आत्मविश्वासात आहे.

---- मनिष मोहिले

1 comment:

  1. मनिष तू लिहिलेल्या ह्या लेख आज सकाळी शांत पणे वाचला. लेख नेहमी प्रमाणे अभ्यास पूर्ण तर आहेच पण ज्या पद्धतीने त्याची मांडणी केली आहेस ती फार सुंदर आहे. म्हटली तर संक्षिप्त आणि तरीही अनेक विषयांना हात घालणारी देखिल अशी. थोडक्यात ती कळायला अतिशय सोपी आहे. माझ्या मते तू भारताच्या इतिहासा वर म्हणजे अगदी सुरवाती पासून अशा तुझ्या लेखन शैली द्वारे प्रकाश टाकलास तर तो ऐकायला खूप आवडेल. मुद्दामून ऐकायला म्हणतोय कारण माझ्या मते ह्या विषयी स्तंभ लेखन करण्या पेक्षा तू ह्याचे व्हिडीओज बनव आणि पोस्ट कर. youtube चॅनेल ही तर अतिशय उत्कृष्ट idea. सध्याचं powerful माध्यम आहे ते. 🙂

    ReplyDelete