Saturday, October 10, 2015

महानायक

शतकाचा तारा ! महानायक ! - अमिताभ बच्चन. सुपरस्टार या पदाचं परिमाण बदलणारा रुपेरी पडद्यावरचा तारा. एक समर्थ अभिनेता.

"सुपरस्टार" म्हणजे काय हे हिंदी चित्रपटसृष्टीला कळायला लागल्यापासूनचा दुसरा "सुपरस्टार". पहिला राजेश खन्ना - पण त्याच्या सुपरस्टार पदाचा कालावधी त्यामानानी लहान होता. अमिताभ मात्र बराच काळ त्या पदावर विराजमान होता. त्याचप्रमाणे महानायक पदाच्या वलयाला साजेशी व्यावसायिकता  दाखवणारा पहिला अभिनेता.

कलकत्त्याची नोकरी सोडून हिंदी चित्रपट सृष्टीत नशीब अजमावायला आलेल्या अमिताभचे पहिले तेरा चित्रपट बॉक्स ऑफीसवर साफ आपटले आणि नंतर सलीम जावेदची कथा असलेल्या प्रकाश मेहराच्या  "जंजीर" नी हिंदी चित्रपटाच्या नायकाला "Angry Young Man"चे रुप दिले आणि अमिताभ ला त्याच्या कारकिर्दीचं पहिलं यश. इथून पुढे त्याच्या कर्तृत्वाचा वारू भरधाव धावू लागला तो आजही धावतोच आहे.

आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत अमिताभ ने अतिशय व्यापारी करमणूकप्रधान मिस्टर नटवरलाल, लावारीस, दोस्ताना, मर्द, कुली, हम, शहेनशाह सारखे चित्रपट दिले. अमर अकबर अँथनी, नसीब, अंधा कानून सारख्या मल्टीस्टारर चित्रपटातून देखील आपल्या अभिनयाची चमक दाखवली आणि त्याचबरोबर दीवार, त्रिशूल, नमक हराम, आनंद, नमक हलाल, काला पत्थर, बेमिसाल, सिलसिला, शक्ती, अग्नीपथ, मैं आझाद हूँ अशा  उत्तमोत्तम चित्रपटातून  राजेश खन्ना, दिलीप साब, संजीवकुमार या सारख्या अभिनयातील दिग्गजांसमोर तेव्हढ्याच ताकदीनी उभा ठाकला आणि नुसताच उभा ठाकला नाही तर स्वत:चा ठसा त्यानी त्या चित्रपटात सोडला. स्वत:ला लाभलेलं "स्टार" वलय आणि निसर्गदत्त अभिनय यांचा सुंदर मिलाफ साधला.  त्या शिवाय वयाच्या दाखल्यात "म्हातारा" गणला जायला लागल्या नंतरचे पा, बाघबान इ. मधून सुद्धा तो आजच्या पिढीच्या सुपरस्टार्स च्या चित्रपटांसमोर समर्थपणे उभा राहिला.

कारकिर्दीच्या सुरूवातीला ऊंची व आवाज (ऑल इंडिया रेडीओ ने अमिताभ चा आवाज आकाशवाणी साठी योग्य नाही म्हणून त्याला नोकरी नाकारली होती म्हणे. AIR चे शतश: आभार कारण त्यामुळे आपल्याला अमिताभ मिळाला) या दोन 'नकारात्मक' गोष्टी अमिताभला आडव्या येत होत्या. हे त्याचं असामान्य कर्तृत्व की नंतर नायकपदासाठी चांगली ऊंची हा एक मापदंड बनला.

आवाजाच्या बाबतीत मात्र त्याच्या त्या देवदत्त 'खर्जा' समोर फार कोणी टिकणं कठीणच. मात्र फक्त त्या नैसर्गिक आवाजावरच तो थांबला नाही. ज्या भाषेत बोलायचं, संवादफेक करायची त्या भाषेचा बाज सांभाळणे, अतिशय शुद्ध व स्पष्ट शब्दोच्चार, लिखित शुद्धलेखना प्रमाणे बोलीचे नियम पाळणे आणि आवाजातले चढ उतार ह्या त्यानी प्रयत्नपूर्वक कमावलेल्या गोष्टी. म्हणूनच त्या त्या भूमिकेप्रमाणे योग्य संवादफेक त्याला जमायची. लांबलचक एकपात्रीप्रमाणे वाटणारे संवाद जमायचे. या लांबलचक संवादांची व त्यातील आवाजाच्या चढ उतारांची दोन तीनच उदाहरणं देतो - दीवार मधला सुप्रसिद्ध देवळातला संवाद, लावारिसमधला रात्रीच्या वेळी अमजद खानच्या कोठी समोर केलेला प्रसंग आणि अंधा कानून मधला कोर्टरूम ड्रामा चा प्रसंग. ह्यातल्या प्रत्येक प्रसंगातले आवाजाचे चढ उतार (voice modulations) पहा. केवळ लाजवाब.

याच आवाजाच्या आणि आवाजावरील हुकूमतीच्या जोरावर त्याने देवाबरोबर भांडणे केली (दीवार), प्रेयसी साठी कविता म्हटल्या (कभी कभी, सिलसिला), विनोद करून आपल्याला हसवलं ( चुपके चुपके, सत्ते पे सत्ता - दारू पिनेसे लीव्हर खराब होता हैं, Amar Akbar Anthony  - दारू पिऊन मार खाल्ल्यावर आरशातल्या प्रतिबिंबाला मलमपट्टी करण्याचा प्रसंग, नमक हलाल मधली क्रिकेट कॉमेंट्री), आपल्याला रडवलं (दीवार, शोले, शक्ती यातील मृत्यूचे प्रसंग) आणि खलनायकासमोर संवादांची आतिषबाजी केली आणि त्यांची धुलाई पण केली.

अभिनयाबद्दल बोलायचं तर चेहे-या वरचे भावप्रदर्शन वादातीत. रेश्मा और शेरा एरवी अनुल्लेखीत चित्रपट पण  - मुक्याची भूमिका करणा-या अमिताभसाठी पहावा. वर उल्लेख केलेल्या आनंद, दीवार, त्रिशूल, काला पत्थर, बेमिसाल, सिलसिला, शक्ती, मैं आझाद हूँ या प्रत्येक चित्रपटातील त्याचे चेहे-यावरचे भाव प्रदर्शन निव्वळ अफाट.अभिमानमधील प्रथितयश गायक, प्रेमी, लग्नानंतर स्वत:च्या गायनाच्या क्षेत्रात स्वत:च्या बायकोलाच प्रतिस्पर्धी म्हणून पुढे जाताना पाहून मत्सरग्रस्त होणारा नवरा आणि शेवटी पश्चात्तापदग्ध होऊन तिच्याशी मीलन करणारा प्रेमळ पती ह्या सगळ्या प्रवासात त्याची face expressions लाजवाब.

आणि देहबोली. त्या बद्दल तर विचारूच नका. दीवार मधला तोंडातली विडी इकडून तिकडे फिरवणारा निर्विकार थंडपणा,  काला पत्थर मधली सुरूवातीलाच एका खाणकामगाराची दिवसभराच्या कष्टाच्या थकव्याची चाल,  सत्ते पे सत्ता मधल्या "बाबू" च्या डोळ्यातील खुनशी थंडपणा, मैं आझाद हूँ मधला तो शेतक-यांच्या आभारप्रदर्शनाचा प्रसंग,  आत्ता आत्ताच्या पिकू मधला बद्धकोष्टानी विचार ग्रासून गेलेला म्हातारा. आनंदमध्ये तर तो निव्वळ डोळ्यांनी अन चेहे-यातून बोललाय असं म्हणण्याइतके कमी संवाद आहेत. बेमिसाल मध्ये शेवटी अरुणा ईराणीला तिने विनोद मेहरा विरुद्ध तोंड ऊघडू नये म्हणून तिला हवेच्या बुडबुड्याच्या इंजेक्शनची धमकी देतानाचा त्याचा तो आगळाच थंडपणा, आखरी रास्तामधला बायकोवरच्या अन्यायाचा सूड घेण्यासाठी स्वत:च्या इन्स्पेक्टर पोराच्या विरुद्ध ऊभा ठाकलेला बाप आणि तो इन्स्पेक्टर  मुलगा यांच्यातले समोरासमोरचे प्रसंग. नवीनपैकी विरुद्ध मधला त्याचा तरुण मुलाच्या अकाली मृत्यूने खचलेला आणि शेवटी अपराध्याला स्वत:च सजा द्यायला निघालेला बाप अथपासून इतिपर्यंत पटतो.

त्याची अजून एक खासियत म्हणजे तो जशी भूमिका असेल तसा वाटू शकतो. तो टपोरी ही वाटू शकतो (दीवार, कुली, लावारिस) खानदानी श्रीमंतही वाटू शकतो (नमक हराम, शराबी, डॉन - यात तो खानदानी नसून स्मगलर असला तरी श्रीमंतीचं खेळणारं पाणी सहज दाखवतो), एक मध्यम वर्गीय (चुपके चुपके, आनंद)  देखील वाटू शकतो, तो मजूर ही वाटू शकतो आणि मालक देखील वाटू शकतो.

मग एव्हढी अभिनय क्षमता असताना, आवाजावर, संवादफेकी वर प्रभुत्व असताना, इतक्या वेगवेगळ्या भूमिका करून सुद्धा त्याच्या समकालीन किंवा मागाहून आलेल्या कलाकारांची अधिक वैविध्यपूर्ण भूमिका करणारे अशी जास्ती प्रसिद्धी का झाली ?

प्रेक्षकांच्या मनातील, प्रत्यक्ष आयुष्यातील अनेक गोष्टींबद्दलच्या असंतोषाला आपल्या "Angry Young Man " च्या  रुपातून रुपेरी पडद्यावर वाचा अमिताभ नी फोडली.
प्रस्थापित अन्यायकारी घटकांविरुद्धचा त्वेष हिंदी चित्रपट सृष्टीतील मारामा-यांच्या प्रसंगात खराखुरा भासेपर्यंत ओतण्याचं काम अमिताभनी केलं आणि त्यामुळे त्याचं ते रुप सर्वात जास्त पसंत केलं गेलं.
त्यामुळे जास्तीत जास्त दिग्दर्शकांनी अमिताभला तशाच भूमिका देणं पसंत केलं. नवनवीन विषय हाताळणारे दिग्दर्शक, लेखक आत्ता आत्ता आले. त्यातून अमिताभ हा दिग्दर्शक सांगेल त्याप्रमाणे चालणारा अभिनेता (director's actor) त्याच्याच म्हणण्या प्रमाणे. पण  तद्दन व्यापारी चित्रपटांना (शक्तीशाली कथा पटकथा याशिवाय)  स्वत:च्या नावावर यशस्वी करण्याइतकी धमक, कुवत व स्टार व्हॅल्यू फक्त अमिताभ बच्चन या एकाच अभिनेत्याकडे होती हे ही तितकंच निर्विवाद सत्य होतं. आणि म्हणूनच स्वत:च्या नावावर थिएटर्स  हाऊसफुल्ल केली कित्येक वर्षं त्यानं.

कुली च्या वेळच्या त्या जीवघेण्या अपघातातून तो वाचावा म्हणून नवस करणारे, उपास करणारे असे लाखो करोडो चाहते त्याला लाभले. क्वचितच एखाद्या कलाकाराला इतकं प्रेम लाभतं लोकांकडून.

इतकं असून तो राजकाराणात का गेला ? एका  वेगळ्या जातीची लोकप्रियता अनुभवायची म्हणून की सत्ता हवी हवीशी वाटली म्हणून ? पण ते तितकसं महत्वाचं नाहीये. महत्वाचं हे आहे की राजकारण हा आपला प्रांत नव्हे हे ओळखून तो परत त्या कडे वळला ज्यासाठी त्याचा जन्म झालाय - अभिनय.

त्यानंतर हिंदी चित्रपट क्षेत्रातील चित्रपट निर्मितीचा पहिला corporatisation चा प्रयत्न त्याने केला आणि जरी अमिताभ त्यात यशस्वी झाला नाही तरी एक नवीन मार्ग त्याने दाखवून दिला हे निश्चित.

या फसलेल्या उद्योगाने त्याला कर्जबाजारी केलं. अमिताभ संपला असं ब-याच जणांना वाटलं. पण राखेतून पुन्हा जिवंत होणा-या फीनिक्स पक्ष्याप्रमाणे तो परतून आला and he came back not with a whimper but with a bang -  कौन बनेगा करोडपतीच्या माध्यमातून लहान पडद्यावर देखील त्यानं आपलं अधिराज्य पहाता पहाता प्रस्थापित केलं. एक सर्वात यशस्वी कार्यक्रम संचालक म्हणून तो घरा घरात जाऊन पोचला. घरातलाच एक सदस्य बनला.  त्याच्या विविध वयाच्या , विविध क्षेत्रातून आलेल्या स्पर्धकांबरोबरची वागाणूक, त्यांच्या बरोबर "connect" करण्याची हातोटी आणि एकूणच वागणूकीतलं सौजन्य व अदब यांनी त्याच्या बद्दल एक वेगळीच आपुलकी व आदरभाव लोकांच्या मनात उत्पन्न झाला.

अर्थात या सगळ्यामागे त्याचं अतिशय व्यावसायिक वागणं हा एक मुख्य घटक होता. तीच व्यावसायिकता जी सुपरस्टार असून सुद्धा त्यानी कधीही सोडली नाही - वक्तशीरपणा, शेड्यूलमध्ये काम पूर्ण करण्याची धडपड ( इंद्रजीत या चित्रपटाच्या climax च्या प्रसंगाच्या चित्रीकरणाच्या वेळी त्याला अपचन व ताप असं असताना देखील हॅलिकॉप्टर आणि अनेक कलाकार असलेल्या त्या प्रसंगाचं चित्रीकरण त्यानं पूर्ण केलं कारण निर्मात्याचे पैसे वाया जाऊ नयेत), "शॉट" परफेक्ट व्हावा म्हणून त्याची मेहनत - या सर्व त्याची स्तुती करणा-या गोष्टी त्याच्या बरोबर काम करणा-या दिग्दर्शक, सहकलाकार यांनी सांगितलेल्या आपण ऐकल्यायत.

आज एका वेगळ्याच ऊंचीवर तो ऊभा आहे जे यशापयशांच्या परिणामांच्या पलीकडे आहे. या वयातही (अनेक विकार असूनही) तो  तब्येत व्यवस्थित राखून आहे.

त्याची तब्येत अशीच धडधाकट राहो आणि अजून काही वर्ष "अमिताभ बच्चन" हा सात अक्षरी चमत्कार आपणा सर्वांना पहायला व ऐकायला मिळो हीच त्याच्या वाढदिवशी ईश्वराच्या चरणी प्रार्थना.

--------  © मनिष मोहिले 

No comments:

Post a Comment