Tuesday, December 29, 2015

आयुष्याचा उत्सव

वय वाढले तसा मी;
कोवळा होत गेलो
सरणाऱ्या दिवसांनी मी;
रोजचा नवाळत गेलो

रातराणीचा सुगंध
पांघरून झोपी गेलो
श्वासात भरुनी प्राजक्त
आतून फुलत मी उठलो

पाहून फुलांचा उत्सव
चैत्र झेलण्यास मी शिकलो
पाहून वाट मेघांची
श्रावणात भिजाया शिकलो

माघारी गेल्या लाटा
परतूनी स्पर्शती धरती
सागराची पाहून प्रीती
प्रेमात पडाया शिकलो

सागरात सुख दु:खाच्या
मी नाव लोटली माझी
चिंब भिजून गेलो परि मी
नाव वल्हविण्यास शिकलो

छोट्याशा गोष्टींमधला
आनंद लुटत मी गेलो
आनंदाने कसे जगावे
मी जगता जगता शिकलो

हे शिकता शिकता सगळे
माझेच मला ना कळले
मी आयुष्याचा उत्सव
साजरा कराया शिकलो

वय वाढले तसा मी;
कोवळा होत गेलो
सरणाऱ्या दिवसांनी मी;
रोजचा नवाळत गेलो

------  © मनिष मोहिले
@manishmohile.blogspot.com

Tuesday, December 22, 2015

शिल्प

हा उडे पदर वाऱ्यावर
साथीस केशसंभार
काया कमनीय अतीव
अशी रुपवती ही नार

हे उंचावलेले अधर
पहा चुंबनास आतूर
हळूच येइ मग प्रियकर
गाली प्रेमाची फुंकर

ल्याली तलमसे वस्त्र
तरीही भासे जणू निर्वस्त्र
हे रुपवतीचे शस्त्र
ना जरुरी कुठले अस्त्र

कलावंताची ही नजर
पाषाणात प्रीत पाझर
जीव दोन हे प्रेमातूर
पाषाणात सजीव साकार

------ मनिष मोहिले
@manishmohile@blogspot.com

हिमालयाची सावली

अहिल्या झाली शिळा देवत्वी राम पोचला
त्यागावे सर्वस्व परि लागले होते सीतेला

लक्ष्मणाच्या बंधुप्रेमाचा जगती झाला गवगवा
उर्मिलेच्या जीवनी भडके चौदा वर्षांचा वणवा

हरे स्वत:ला जुगारी तथाकथित तो धर्मराजा
मालकी ना स्वत:वरी तरी लावले पणी पत्नीला

बोधिसत्वाच्या तळी गवसले ज्ञान गौतमा
प्रपंचातूनी मुक्त कारण पाठराखी यशोधरा

मानसिकता नाही बदलली आज अजूनी आपुली
किती जरी कर्तृत्ववान, स्त्री हिमालयाची सावली

------ मनिष मोहिले
@manishmohile@blogspot.com

Friday, December 11, 2015

एक डाव भुलण्याचा

एक डाव भुलण्याचा
बाकी प्रत्येक सांभाळण्याचा
फरक जरी तपशिलात
दरेक संसार साच्याचा

पण खरंच असं असतं का ?
भुलून झालं एकदा की
एकमेकांना नंतर फक्त
सांभाळायचं असतं का ?

सांभाळणं म्हटलं की
आला तिथे अहंकार
देऊ साथ म्हटलं की
होतो सुंदरसा सहकार

स्वत: बरोबर जोडीदाराचं
समजून घ्यावं मी पण
बघता बघता मी अन  तू
होऊन जातात " आपण "

संसारात दरेक दिवशी
एकदा तरी भुलावं
रातराणीचा सुगंध
येतो कुठून शोधावं

आपोआप मग फुलतं नातं
मोहरून बहरतं नातं
बघून प्रत्येक डावाकडे
स्वत:लाच भुलतं नातं

------ मनिष मोहिले
@manishmohile@blogspot.com

Wednesday, December 9, 2015

चंद्र कुशीमधे मावळला

आलीस तू माळून जेव्हा
मोकळ्या केसात गजरा
मनाच्या बागेत माझ्या
धुंद पारिजात दरवळला

बोललीस का तू काही
काही ना कळले मजला
तो गोड तुझा आवाज
गुंजारव करीत राहिला

मग बंदिवान मी केले
या ओठांनी तव ओठांना
प्राशले किती जरी अमृत
मी राहीलो तहानलेला

त्या शांत चांदण्या रात्री
दाह चंदनी होइ अंगाचा
तुज मिठीत घेता वाढे
प्रेमज्वर अपुल्या गं दोघांचा

मी विरघळलो तुझ्यात
भिडवून हृदय हृदयाला
बरसवून चांदणे चंद्राने
बेधुंद केले अवनीला

तव चांदण ल्याल्या देही
देह माझा मी पांघरला
चांदणे देहभर लखलखले
आणि
चंद्र कुशीमधे मावळला

------ ------  © मनिष मोहिले
@manishmohile.blogspot.com

नशा

ईक जाम नजर से तेरे
मुझको पिला दे यारा
के बिना पिये भी मुझको
नशे में झूमने दे यारा

जी चाहता हैं चूमू मैं
तेरे होंठ रसीले यारा
अंगूरी रंग में रंग दे
मुझको इन होठोंसे यारा

जी करता हैं पी लू मैं
तेरे कातिल जोबन यारा
यह घुंबज रस से भरे जो
शराबी मिजाज कर दे यारा

यह चाल तेरी मस्तानी
नशीला कर दे माहौल यारा
अरे फिर शराब का क्या काम
जो तू साथमें मेरे यारा


------  © मनिष मोहिले
@manishmohile.blogspot.com

Tuesday, December 8, 2015

लग्नसंस्था

एका गृपवर आलेल्या एका पोस्टमध्ये मांडलेल्या काही मुद्द्यांना उत्तरे देणारा हा माझा लेख नीट समजावा म्हणून लेखाच्या शेवटी मूळ पोस्ट देत आहे.

माणूस हा इतर सर्व प्राण्यांप्रमाणे  स्वभावत: बहुगामी असला तरी संस्कृतीचे टप्पे वर चढताना अनिश्चित बहुगामित्वापेक्षा निश्चित एकगामीत्व त्याला अधिक पटलं असावं.

सांस्कृतिक उत्क्रांती मध्ये निर्माण झालेल्या समाजरचने मध्ये एकगामित्वा मधील परस्पर सहवासामुळे निर्माण होणारे भावनिक बंध व आपुलकी आत्मियता ह्यांचे महत्व निव्वळ शारिरीक आकर्षणापेक्षा अधिक आहे हे नक्की झाले. यात परस्पर मालकी हक्काची भावना देखील महत्वाची ठरली.

यातूनच विवाहसंस्थांचा उदय झाला असावा. दोन व्यक्तींच्या संबंधाना सामाजिक मान्यता निळवून देणारी एक व्यवस्था असे स्वरूप असलेल्या विवाहसंस्थेत कालांतराने बदल होत जाऊन मूळ संबंधाना मान्यताच्या ऐवजी  या संस्थेतून दोन अनोळखी व्यक्तींमध्ये संबंध जुळवले जाऊ लागले.  मात्र यात अजून एक गोष्ट अशी साध्य झाली की उत्कृष्ट तसेच निकृष्ट सर्व दर्जाच्या स्त्री पुरूषाना एक जोडीदार मिळण्याची शाश्वतता येऊन अनाचार माजण्याची शक्यता पुष्कळ कमी झाली.

आता प्रश्न उद्भवतो तो अशा विवाहसंस्थेतून जे जोडीदार एकत्र येतात ते भावनिक, वैचारीक व अनुभूतिक पातळीवर  परस्पराना किती पूरक किंवा अनुरूप आहेत ह्याचा. (कारण सामाजिक आर्थिक धार्मिक इ अनुरूपतेची काळजी ही व्यवस्थाच घेते).

एका घरात वाढलेली भावंडं आई वडिल व मुले ह्यांच्यातही भावनिक वैचारीक अनुभूतिक पातळीवर फरक असतो. व्यक्ती तितक्या प्रकृती असतात. मग विवाहसंस्थेकडूनच या पातळी वर  अनुरूप जोडीदार मिळेल या खात्रीची अपेक्षा का असावी ?

प्रेमविवाहामध्ये सुद्धा या अनुरूपतेची खात्री देता येत नाही कारण प्रेमिक बनून काही तास एकमेकांसोबत घालवणे आणि आयुष्याचे जोडीदार बनून राहणे यात फरक आहे.

विवाह बंधनात असताना दोन्ही बाजूनी प्रथम देण्याची नी मग घेण्याची वृत्ती ठेवली, एकमेकांच्या गुणदोषांसहित एकमेकांचा व्यक्ती म्हणून स्वीकार केला, एकमेकांचे दोष सुधारण्याच्या प्रयत्नातील प्रामाणिकपणा बघितला तर हे नातं उबदार व चिरकाळ टिकणारं होऊ शकतं.

अशा परिस्थितीतही परपुरूष अगर परस्त्री बद्दल विविध कारणांसाठी आकर्षण वाटणं शक्य आहे.ते संबंध मैत्री (शारिरीक आकर्षणाच्या जाणीवेसकट ) पर्यंत ही जाऊ शकतात.  प्रगल्भता आहे ती दोन्ही संबंधांचं एकमेवाद्वितीयपण जाणून दोन्ही नात्यांच्या लक्ष्मण रेषा न ओलांडायची. यात स्वत:शी अप्रामाणिक राहणे वगैरे काहीही नसून उलट पूर्ण जाणीवेनिशी दोन्ही नातेसंबंधाची जपणूक करणे हे महत्वाचं.

दुर्दैवानी वैवाहिक नातं प्रयत्नपूर्वक देखील निभावता येत नसेल तर वास्तविक दृष्ट्या किचकट असली तरी वेगळे होण्याची प्रक्रिया होऊ शकतेच. पण एका नात्यात एकाच नात्याशी प्रामाणिक रहावं. यात मानसिक व्यभिचाराचा भाग नसून आपल्या व जोडीदाराच्या अशा अशारिरीक गरजा ( कारण शारिरीक गरजांची पूर्तता हा वैवाहिक जीवनाचा पाया आहे) ज्या पूर्ण करायला आपल्या शिवाय किंवा ऐवजी दुसऱ्या कोणाची गरज असू शकते हे सत्य स्विकारण्याच्या प्रगल्भतेचा भाग आहे.

या सगळ्या प्रकारात विवाहसंस्था कालबाह्य ठरवता येत नाही. आपण चर्चेला जी सुरूवात केली त्यात मनुष्य हा एक प्राणीच असून तो स्वभावत: बहुगामी आहे असं म्हटले आहे. पण मनुष्याकडे विचार व विवेक असल्यामुळे त्याची सांस्कृतिक प्रगती होऊन तो इतर प्राण्यांपेक्षा वेगळा ठरला. जर एक प्राणी म्हणून बहुगामित्व समर्थनीय असेल तर प्राण्यांमध्ये प्रणयाराधन करताना फक्त एक नर व एक मादी असते. आई बहीण वडील भाऊ असे  नसते. पण ह्या नात्यातील गमन आपल्याला आपल्या सांस्कृतिक बैठकी मुळे पटत नाही. मग फक्त जोडीदाराच्या बाबतीत हे आदीम पशुत्व जागृत झालं तर त्याला विचार व विवेकाचा अंकुश का लावायचा नाही ?

 या माझ्या विचार शृंखलेत स्त्री व पुरूष हे दोघेही व्यक्ती म्हणून समान पातळीवर असणे अभिप्रेत आहे आणि त्यामुळे कालोघात पुरूषप्रधान संस्कृतीचा परिपाक म्हणून जेद असमानता आली तिचा वेगळा उहापोह केला नाही.

------ मनिष मोहिले


एक  जुनी  पोस्ट
 इथेच लिहलेली.
 त्यावर  फेसबुकवर खूप  घमासान  रणधुमाळी झाली आणि मग  मला  त्या  पोस्ट मागची  भूमिका ही  लिहावी लागली. आता सहज आठवली.

मूळ पोस्ट
°°°°°°°°°°°°°

 फेसबुकवर झालेली पुरुष सौंदर्यावरची घनघोर चर्चा .. आणि काही जणांशी / जणींशी केलेली मेसेजा - मेसेजी याचा परिपाक म्हणजे एक दोन निष्कर्ष :

माणूस हा इतर सर्व प्राण्यांप्रमाणेच polygamous आहे.
लग्न ही एक अत्यंत कृत्रीम व्यवस्था आहे.
समाजात अनाचार माजू नये यासाठी काही लोकानी मानवाला चारित्र्य नीती अशा भोंगळ शब्दात करकचून आवळले आहे.
माणूस कधीच monogamous नव्हता.
त्याला तसे बनवू पाहणे हा व्यक्ती स्वातंत्र्याचा गळा घोटणे आहे.
सामाजिक स्वास्थ्यासाठी कुटुंब व्यवस्था स्विकारली तरीही पुढे कधीतरी कोणी तरी आवडल्यास एकमेकांच्या सम्मतीने त्या दोन व्यक्तीस Dating करण्याची मुभा असावी .( अर्थातच या dating चे दुष्परिणाम कुटुंबावर होवू देउ नयेत. ही खबरदारी दोनही व्यक्ती घेतीलच हे गृहीतक.)
यामुळे एकूणच समाजातील / लग्न व्यवस्थेतील स्त्री-पुरुष संबंध सुधारण्यास मदत होइल.
स्त्रीला सुद्धा पर्याय उपलब्ध करून दिल्याने लग्नाचे पुरुष तिची अधिक चांगल्या पद्धतीने काळजी घेतील.

वरील सर्व मते माझी एकट्याची नसली तरी मला स्वत:ला ती पटली आहेत.

आणि ही  वैचारिक भूमिका
°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°
पोस्टमागील वैचारिक मानसिक भूमिकेचा  मी इथे आढावा घेतला आहे . आपले मत बनवण्यापूर्वी तो आपण वाचावा यासाठी तो इथे देत आहे.
आपले बरे वाईट मत आपण स्वत: बनवावे. इतरांच्या प्रभावाखाली येवून मत बनवू नये ही विनंती.

Shrirang Jadhav
तर आता पोस्टमध्ये मांडलेल्या विचारांबद्दल..
लग्न ही कृत्रीम व्यवस्था असल्याचे बहुतेक सर्वानाच मान्य आहे.
दोन अत्यंत टोकाच्या विचारांच्या व्यक्तीना एकत्र आणून त्यानी आयुष्यभर एकत्र नांदावे , ते ही सुखाने , असे म्हणणे अत्यंत हास्यास्पद आहे असे मला वाटते.
केवळ पुरूषच बहुगामी असतो या भोंगळ कल्पनेस पाठिंबा देउन स्त्रियांच्या आदिम आणि नैसर्गिक भावनांचा प्रवृत्तीचा आपण गळा घोटतो आहोत असेच मला वाटते. नैतिकतेच्या खोट्या आणि पुरुषी व्याख्यानी स्त्रियांच्या योनिशुचितेचे अवडंबर विनाकारणच माजवले गेले असल्याचे माझे मत आहे.
योनिशुचितेच्या हिंस्त्र आणि अमानुष समजुतीन्मुळेच सती सारख्या अत्यंत अन्यायकारक आणि पशुला देखील मान खाली घालावी लागेल अशा परंपरा व चालीरीती जन्माला घालण्यात आल्या नि पुरुषानीच त्या अति उत्साहाने पाळायला लावल्या.
जगण्याचा जीवन अनुभवण्याचा स्त्रीचा हक्क तिच्यापासून हिरावून घेण्याच्या सोवळे पाळणे विधवाना क्षौर करावयास लावणे यासारखे रिवाज हा याचाच अतिभयानक परिपाक.
मनुष्य म्हणून जगणे नाकारून केवळ एखाद्या प्राण्याप्रमाणे कोणतीही हौसमौज न करता मन मारून दिवस ढकलत राहून मरणाची वाट बघत राहणे , हे इथल्या विधवांचेच नाही तर बहुतांशी सौभाग्यवतींच्या आयुष्याचे वर्णन आहे असे मला वाटते.
पुरुषी वर्चस्वाखालील स्त्रियांच्या या परिस्थितीवर विचार केल्यास आपल्याला काय पर्याय सापडतो.. तर स्त्रियांचे माणूस म्हणून स्वतंत्र अस्तित्व मान्य करणे , पुरूषां इतकेच मानाचे स्थान त्यानाही मिळावे , दोघानाही समान हक्क असावेत, सध्या प्रचलित असणार्या विवाह व्यवस्थेत पुरुषाइतके त्यांचे ही महत्व असावे , त्याला मिळत असणारे स्वातंत्र्य तिलाही मिळावे.
यात काही चूक आहे असे मला वाटत नाही.
विवाह संस्थेच्या अपरिहार्यते संबंधी मला शंका आहे.. तरीही तिचा स्वीकार करून विवाहीत स्त्रीला एखादा पुरुष आवडू नयेच असे म्हणणे हे व्यक्ती स्वातंत्र्याचा शिरच्छेद करणारेच आहे.
अशा एखाद्या आवडलेल्या पुरुषासोबत
काही काळ व्यतित करावासा वाटणे यामध्ये नक्की गैर ते काय ?
माझ्या पोस्टमध्ये डेटिंग हा शब्द आलेला आहे त्याचा मला अभिप्रेत अर्थ एखादी भावोत्कट क्षणानी व्यतित केलेली रोमॅंटिक संध्याकाळ. अशी संध्याकाळ तिच्या आयुष्यात का नसावी ? आणि जर त्या दोन समविचारी अनुरूप व्यक्तीन्मध्ये सहवासाने प्रेमभावना जागृत होवून सेक्सही घडला तर खूप मोठा गहजब माजविण्याचे कारणच काय ?
बंद दारांच्या आड रोज बलात्कार सहन करण्यातच आयुष्य घालवणार्या स्त्रीला अशी तिच्या मनाजोगी सध्याकाळ मिळू नये का ?
आपली स्त्री असा हक्क मागू शकेल या केव कल्पनेनेच पुरुष भयभित होतील. पुरषी अहंकारा नुसार आपल्या स्त्रीला असा मोह होवु नये यासाठी स्वत: मध्ये सुधारणा करून घेतील अन्यथा परीणामांस तयार राहतील .. अर्थात हे स्वप्न रंजन झाले थोडेसे. हे  नजीकच्या काळात होणे शक्य नाही पण यावर चर्चा झाल्यास सकारात्मक मानसिकता तयार होवू शकेल असे वाटते....

तर ही झाली माझ्या पोस्टमागील माझी मानसिक वैचारिक पार्श्वभूमी.
©श्रीरंग जाधव.

वेगळ्या वाटा

गेल्या आठवड्यातल्या टाईम्सला एका वेलजी देसाई नामक आजपर्यंत माहीत नसलेल्या माणसाचं नाव वाचलं.

त्या वेळेस कळलं की तत्वावर चालून, जीवघेणी स्पर्धा न करता आणि अवास्तव नफ्यावर लक्ष केंद्रीत न करता माणसं यशस्वी उद्योजक बनू शकतात.

गांधीजींच्या ग्रामोद्योग व कुटीरोद्योगाला प्राधान्य द्यायच्या तत्वाची,  प्रमाणातील व मनुष्यबळावर अवलंबून माफक  यांत्रिकीकरणाशी सांगड घालून एक उद्योग उभा राहिला हे वेलजीभाईंच्या जिद्द व चिकाटीचं यश आहे.

१९८३ साली, मेकॅनिकल इंजिनीयर असलेल्या वेलजीभाईंनी नोकरी सोडली आणि Tiny Tech Plants या नावाची छोट्या यंत्रांची - जी एक / दोन माणसांनिशी सहज चालवता येतील - निर्मीती करणारा उद्योग सुरू केला.

आधुनिक औद्योगिकीकरण हे अखेरीस शोषणाकडे नेणारे असून छोट्या उद्योगधंद्याना प्राधान्य देणे गरजेचे आहे या गांधीजींच्या तत्वावर हा उद्योग चालतो. हे तत्व चूक की बरोबर हा जरी विवादास्पद मुद्दा असला तरी Tiny Tech ची गेल्या ३२-३३ वर्षातील  यशस्वी वाटचाल निश्चितच कौतुकास्पद आहे.

या कारखान्यात अनेक अशी छोटी यंत्र बनवली जातात उदा - कुठल्याही तेल बियांपासून तेल काढणाऱ्या तेल गिरण्या, तेल शुद्धीकरण यंत्र, बटाटा व केळ्याचे वेफर्स बनवणारे यंत्र, आंब्याचा गर काढणारे यंत्र, ऊस पिळणारे यंत्र, गूळ बनवायचे यंत्र, सौर कुकर,  सौर ऊर्जेवरचे पाणी पंप, सौर विद्युत यंत्र व इतर बरच काही.

एका यंत्रातून मर्यादित कच्च्या मालाच्या व थोड्या मनुष्यबळाच्या मदतीने छोट्या प्रमाणावर गरजेपुरते व त्यापेक्षा थोडे अधिक जे विकून उत्पन्न मिळेल असे उत्पादन येते.

त्यांचे मुख्य उत्पादन आहे तेल गिरणीचे. Tiny Tech Oil Mill हे एक असे यंत्र आहे की ज्यात काही भाग बदलून एकच यंत्र दोन तीन वेगवेगळ्या जातीच्या बियांमधून तेल काढण्यासाठी वापरता येते - उदा. भूईमूग, खोबरेल, सूर्यफूल, एरंडेल, कपाशी, तीळ, मोहरी, जवस, व्हेजीटेबल ऑइल, पाम तेल इत्यादी. त्याचप्रमाणे हे यंत्र हा एक छोटेखानी कारखाना असून त्यात बियाणे चुरडण्यासाठीची तयारी, बिया शिजवणे, त्या चुरडून त्यातून तेल काढणे आणि ते तेल गाळून शुद्ध नैसर्गिक तेल अंतिम उत्पादन म्हणून बाहेर काढणे ही सर्व कामे होतात.
उदा २०० किलो वजनाच्या व २ हॉर्स पॉवर च्या मोटरवर चालणाऱ्या एका यंत्रातून तासाला 300 किलो भूईमूग आत टाकून तेल काढता येते ज्यात दर १०० किलो भूईमूगामागे ७२ किलो तेल मिळते. याच यंत्राला काही वेगळे भाग जोडले की एरंडेलाच्या बियांपासून तेल काढता येते.

दुसरे यंत्र जे सूर्यफूल किवा पाम तेल काढण्यासाठी वापरतात ते देखील २ हॉर्स पॉवरच्या मोटरवर चालते आणि फक्त ६५ किलो वजनाचे आहे. यात सूर्यफुलाचे बी crush करण्याआधी crack करतात ज्यामुळे तेलाचं उत्पादन जवळपास २% जास्त होते. ह्या यंत्राची क्षमता देखील ताशी  ३०० किलो ची आहे.

Renewable Energy अर्थात अक्षय ऊर्जा या प्रकारात ही कंपनी सौर उर्जेवर चालणारे पाण्याचे पंप,  १० किलोवॅट क्षमतेचे सौर ऊर्जा निर्मीती प्रकल्प (जे वर्षाला १८००० KWH वीजेची निर्मिती करू शकतात) , सौर कूकर, व इतर अनेक उपयुक्त उपकरणे / यंत्रे बनवते.

सोलार बास्केट जे एक प्रकारचे सौर ऊर्जा संग्राहक व परावर्तक आहेत हे एक असेच एक उपकरण जे प्रामुख्याने विविध उद्योगात वाफ निर्मिती, गरम हवा निर्मिती, वीज उत्पादन ह्यासाठी वापरले जाऊ शकते.  ह्याचे सर्वात लहान आकाराचे उपकरण ( which is completely foldable for easy
transport & can be erected easily within one hour) जे ४.५ ते ५ KW उष्णता शक्ती तासाला निर्माण करू शकते ते एक पारवलयिक (parabolic) आकाराचे बास्केट असून त्याची फ्रेम ही channel व square plate foundation base ची बनलेली असते. तिचा केंद्रबिंदू हा जमिनीलगत असतो आणि परवलयाची समांतर किंवा उभ्या अक्षाशी होणारी हालचाल केंद्रबिंदूची जागा बदलत नाही. म्हणजेच बास्केटच्या कोणत्याही अवस्थेत सौर ऊर्जेचे परावर्तन हे केंद्रबिंदूवरच होत असते.
विविध आकारात बनणाऱ्या या सौर बास्केटचा उपयोग हॉस्टेल्स हॉस्पिटल्स अशा ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अन्न शिजवण्यासाठी ऊर्जा निर्मिती, कपडे उद्योगातील विविध प्रक्रियांसाठी ऊर्जा निर्मिती व इतर अनेक ठिकाणी होऊ शकतो आणि बाजारातील इतर उपलब्ध सौर संग्राहकांच्या तुलनेत याला २५% च जागा लागते आणि त्याची किंमत ३०% ते ४०% इतकीच असते.

फक्त १ हॉर्सपॉवर वर चालणारा व ट्रॉलीच्या सहाय्याने सहज एकीकडून दुसरीकडे हलवता येइल असा पाण्याचा पंप हा तर छोट्या शेतकऱ्यांना मिळालेले एक वरदान म्हणता येइल. प्रत्येकी २५० watt क्षमतेची सौर पॅनेल्स व इनव्हर्टर एका दोन चाकी फ्रेमवर असतात आणि सौर पॅनेल्स समांतर तसेच उभ्या अक्षावर हलवून सूर्याच्या दिशेने केंद्रीत केली जाऊ शकतात. दोन चाकी ट्रॉली सहजपणे एका शेतातून दुसऱ्या शेतात नेता येते. Submersible पंप सहजपणे एका व्यक्तीला पाण्यात सोडता येतो किंवा बाहेर काढता येतो. हा पंप ३०० लिटर / मिनीट ह्या वेगाने पाणी उपसू शकतो.

त्याच बरोबर वात ऊर्जेच्या क्षेत्रात ह्या कंपनीचे काम आहे. पवनचक्कीवर चालणारे पाण्याचे पंप हे त्यांचं एक उत्पादन. तसेच घरगुती वापरासाठी ५०० watt पर्यंत वीज निर्मिती करणारी छोटी wind turbines चे उत्पादन देखील ही कंपनी करते.

अशा पद्धतीने छोट्या छोट्या गावातील लोकाना स्वयंरोजगारासाठी मदत होइल अशा प्रकारचे काम या कारखान्याकरवी होते.

गेल्या तेहतीस वर्षात १११ देशात या Tiny Tech ची वेगवेगळी यंत्र निर्यात झालेली आहेत ज्यात प्रामुख्याने तिसऱ्या जगातील देश असले तरी ऑस्ट्रेलिया सारख्या देशाचेही नाव आहे.

माफक नफा तत्वावर गेली तेहतीस वर्षे या कारखान्याने उत्तम प्रतीची छोटी यंत्र बनवून स्वत:ची एक दर्जेदार यंत्रांचे कमी खर्चात  उत्पादन करणारी कंपनी म्हणून नाव कमावले आहे. या कंपनीच्या वेबसाईट वर
ग्राहकांचे त्या विषयीचे अभिप्राय आहेत.

जर एखादी गोष्ट मनात आणून जिद्दीने काम करत राहिले तर असाध्य गोष्टीदेखील साध्य होतात याचंच जणू हे उदाहरण.

नुकताच IIM रायपूर नी वेलजीभाईंचा पुरस्कार देऊन सत्कार केला तर IIM अहमदाबाद व IIM इंदोर येथे सामाजिक उद्योजकता ( Social Entrepreneurship) या विषयाच्या अभ्यासक्रमात Tiny Tech चा समावेश करण्यात आला आहे.

आज ह्या निमीत्ताने ही बातमी वर्तमानपत्रात आली म्हणून आपल्याला कळली. नाहीतर एखाद्या चित्रपटाचं गाणं , एखाद्या सिनेताऱ्याचे उद्गार, एखाद्या मंदिराच्या पुजाऱ्याचे उद्गार व त्यावरून उठणारा वादंग यातच आपण इतके गुंतले जातो की अशी वेगळी वाट चोखाळून काही समाजाभिमुख काम करणाऱ्या लोकांना मात्र अप्रसिद्धीच्या अंधारातच रहावं लागतं ही दुर्दैवाची गोष्ट आहे.

या व अशा प्रकल्पाबद्दल अधिकाधिक लोकाना माहिती मिळणे व निळवून देणे ही आजची किमान गरज आहे.

------ मनिष मोहिले 

Monday, December 7, 2015

संगीत देवाघराचे

कणाकणातून या विश्वाच्या संगीत आहे झरते
जीवनावरी प्रेम जयांचे, ऐकू तयांना येते

मंजुळ किलबिल द्विजगण करती, सुरेल जणू शहनाई
नव दिवसाच्या आरंभाची दशदिशातूनी द्वाही

डोंगर खोरी झाडांमधूनी मंद वाहतो वात
प्रेमधून जणू अवनीसाठी वेणूच्या या बनात

उड्या मारूनी झरा वाहतो खळखळाट खळ खळा
पृथ्वीच्या जणू पायामधला लाडिक घुंगूरवाळा

आगमनाने वर्षा ऋतूच्या येइ मनासी  धुंदी
मेघांच्या पखवाजाशी करे विद्युल्लता जुगलबंदी

देवाघरच्या सूर ताल लयींची सुंदर ही बंदीश
कृतज्ञ होतो मनात मी; अन् झुकते माझे शीश

------  © मनिष मोहिले
@manishmohile.blogspot.com

काही प्रतिक्रियात्मक लेख - पिंगा गाणं , शबरीमाला देवस्थान वादंग व राष्ट्रगीत वादंग

मला स्वत:ला पहिल्या बाजीरावाबद्दल ते अजिंक्य योद्धा होते, त्यांचे मस्तानी बरोबरचे प्रेमप्रकरण ( तिला पत्नीचा दर्जा दिला गेला होता हे मला आत्ता आत्ता येणाऱ्या WA पोस्ट्स वरुन कळलं )  आणि राऊंचा अंत अकाली रावेरखेडी येथे झाला एव्हढीच माहिती होती.

मुद्दा असा आहे की ह्या सगळ्या " historical facts " ज्या सध्या सोशल मिडियावर पुढे येताहेत त्या तशा पुढे येण्यासाठी एका गाण्याच्या trigger ची जरूर का पडावी ?

हेच सत्यकथन आधी केलं असतं तर उत्स्फूर्तपणे सर्वसामान्य समाजाकडून याचा विरोध केला गेला असता. आज ह्याचं स्वरूप काही अभ्यासकांच्या विरोधाला अनुसरणारा विरोध असं रुप येऊन कळत नकळत त्याची धार बोथट झालीये अथवा होणार आहे.
किती मराठी माणसाना शिवाजी महाराजांशिवायचा मराठी इतिहास माहितीये ? तुमच्या राज्यात होऊन गेलेल्या महान ऐतिहासिक व्यक्तीना तुम्ही राष्ट्रीय स्तरावर अशी ओळख का मिळवून दिली नाही की त्यांचं खरं स्वरूप इतकं सर्वज्ञात असावं की असं विपरीत स्वरुप दाखवण्याची कुणाची हिम्मतच होऊ नये.

रिचर्ड अॅटनबॅरो नी गांधी काढला आणि गांधींची जगाला माहीत असलेली प्रतिमा समोर आली. तिथे विपर्यास होण्याला जागाच नव्हती. मग गांधी सर्व गुण संपन्न होते का ? एक व्यक्ती तसेच राजकारणी म्हणून त्यांच्यातही तृटी होत्याच की. पण त्यांच्या प्रतिमेचं marketing इतकं उत्कृष्ट झालय की होणारी निर्मिती करतानाच निर्मात्याला माहिती आहे की इथे वाट्टेल ते कला स्वातंत्र्य घेता येणार नाही.

ही जाणीव आणि जागरुकता सर्व पातळीवर येणं आवश्यक आहे.
याचा अर्थ असा नाही की मी चुकीच्या इतिहासाच्या सादरीकरणाचं समर्थन करतोय. मात्र आजकालची एकंदर विचारसरणी पहाता या नकारात्मक जाहिरातीचा अधिक फायदा भन्साली ला मिळेल कारण पक्की वैचारीक बैठक नसलेले बहुतांश लोक सोशल मिडीयावरील निषेधात हो ला हो मिळवून सिनेमा बघतील ( जर चित्रपट प्रदर्शित होण्यात अडचण आली नाही तर. ) .

टीपू सुलतान इंग्रजांविरुद्ध लढला म्हणून त्याच्यावर सिरीयल बनते आणि लोक बघतात. टीपू हा देशभक्त नव्हता. स्वत:चं राज्य टिकवण्यासाठी केलेली लढाई होती ती. पण आपल्याला कुठे फरक पडला ती सिरियल बघताना.
आपल्याला भव्य दिव्य सेट्स व आवडते कलाकार आणि करमणूक हेच महत्वाचे.

आज ह्या देशाच्या इतिहासात दोनच नावांचा उल्लेख होतो - गांधी आणि नेहरु. आता आता सरदार पटेल. या यादीत जो पर्यंत टिळक, सावरकर, राशबिहारी बोस, नेताजी सुभाषचंद्र बोस, लाला लजपतराय, महादजी शिंदे , मल्हारराव होळकर, राणी लक्ष्मीबाई, तात्या टोपे, पहिले माधवराव व इतर अनेकांचा उल्लेख तितक्याच आदरानी व not as a second line होणे चालू होणार नाही तो पर्यंत ह्या अप्रसिद्ध व्यक्तिमत्वांवरील कलाकृतीत असं स्वातंत्र्य वारंवार घेतलं जाईल.

-------- मनिष मोहिले

शबरी माला देवस्थाना च्या वादग्रस्त निर्णयावरचं प्रिया पाटील यांचं पोस्ट वाचलं. त्यांची ती पोटतिडीक मनाला भिडली. आजच्या स्त्री स्वातंत्र्याची महती गाणाऱ्या काळात असा एखादा मुद्दा उद्भवतो की जिथे समस्त स्त्री जातीच्या मनातील संतापाला वाचा फुटावी ही परिस्थितीच समाज खऱ्या अर्थानी प्रगल्भ झालाय का हा प्रश्न सर्वांसमोर आणते. वर्षानुवर्ष घराघरातून follow होणारी एक वेगळ्या प्रकारची " अस्पृश्यता " आज चव्हाट्यावर आणली गेलीये आणि तिचं तिथून उच्चाटन करताना आपली घरातील मानसिकता बदलणं देखील अतिशय आवश्यक आहे.

आजही घराघरातून स्त्रिया मासिक पाळीच्या काळात देव, धार्मिक कृत्य व स्थळे या पासून दूर रहातात - बालपणापासून मनावर जे संस्कार (??) बिंबवले गेले त्या मुळे. अंजली दीक्षित यांनी लिहील्याप्रमाणे आजही सणवार काळात गोळ्या घेऊन बायका पाळी पुढे ढकलतात. आज शतकानुशतके पिढ्या न पिढ्या ज्या रुढी परंपरा पाळल्या जातात - त्याबद्दल विरोधाचा शब्द न काढता त्याचा हा परिपाक.

माझे स्वत:चे विचार या बाबतीत स्पष्ट आहेत. जे आयुष्यक्रमाचा एक भाग म्हणून निसर्गानी / देवानी स्त्रीला दिलय ते घाण कसं म्हणता येइल ? त्यातूनही हे माहीत असताना की हे चक्र हे स्त्रीच्या शारीरिक तसेच मानसिक आरोग्याचा एक महत्वपूर्ण भाग आहे आणि तो मानवजातीच्या वृद्धीच्या दृष्टीनेही तितकाच महत्वाचा आहे, या मासिकधर्माच्या बाबतीत असा विचार करणं देखील नीच व शिक्षापात्र आहे.

माझ्यामते कोणतही धार्मिक अवडंबर यात माजवलं जाऊ नये. मासिक पाळीच्या वेळी धार्मिक कृत्य करावीत वा करू नयेत हा सर्वस्वी प्रत्येक स्त्रीचा स्वैच्छिक निर्णय असावा. तसं नसल्यास स्त्रियांच्या निर्णयस्वातंत्र्यावर हे एक बंधन आहे व त्यामुळे ते झुगारलच पाहीजे.

या बाबतीत स्त्री मुळात संवेदनशील असते. मासिक पाळी चालू असताना ती अधिक sensitive झालेली असते त्या शारीरिक बदलान्मुळे. अशा वेळी ही गोष्ट कोणाशी शेअर करावी वा नये हे सर्वस्वी तिच्या मनाप्रमाणे व्हावं आणि आपला समाज तर ह्याची जाहिरात करतो. आज ती जाहीर पणे केली गेली पण घराघरात मासिक पाळी चालू असलेल्या स्त्रीला धार्मिक कृत्यातून वगळलं जातं तेव्हा तिची इच्छा असो वा नसो - ती जाहिरात होतच असते.

पूर्वीच्या काळी स्त्रियाना मासिक धर्माच्या काळात विश्रांती मिळावी म्हणून हे सुरू झालं असा एक वरवर पटणारा मुद्दा पुढे आला तरी त्यात ताकाला जाऊन भांडं लपवल्यासारखं होतं. विश्रांती द्यायची तर सरळ विश्रांती म्हणून बाजूला बसवा. त्यात देव कशाला ?
आणि जरी विश्रांती म्हणून बाजूला बसवलं तरी जाहिरात व्हायची थोडीच रहाते ?
खरंच प्रगल्भता असेल तर हा निर्णय त्या त्या स्त्रीवर सोडून तिच्या निर्णयाला सादर स्विकारता यायला हवं.

पण दुर्दैवाने आपल्या समाजाचा पहिल्यापासून हा दुटप्पीपणा आहे. कुठलीही गोष्ट तर्क आणि तत्व व मूल्य यावर चांगली किंवा वाईट कशी हे पूर्णतया तार्किक तात्विक व मूल्याधिष्ठित न समजावता त्यात देव धर्म हे घुसडायचं. का ?

जेव्हा प्रत्येक घरातून या दुटप्पीपणाची उचलबांगडी होइल तेव्हा शबरीमालाचं दर्शन खऱ्या अर्थानी खुलं होइल.

------  मनिष मोहिले

राष्ट्रगीत सुरू झाल्यावर, मग स्थळ कोणतेही असो, आपण जर नैसर्गिक विधी करण्यात बिझी नसलो तर 52 सेकंद उभे राहून राष्ट्रगीताचा योग्य मान राखण्यात काहीच प्रत्यवाय नसावा.

सध्या एक फॅशन आल्यासारखं झालंय - प्रस्थापित गोष्टींच्या विरूद्ध घडणाऱ्या घटनांचं समर्थन करून आम्ही  दोन्ही बाजूंचा साधक बाधक व समतोल विचार करतो अशी स्वत:लाच शाबासकी द्यायची.

देशानी मला काही दिलं नाही की ज्यामुळे मला आदर वाटेल म्हणणाऱ्या मंडळीनी आपण देशाला काय दिलय याचा स्वत:च्या गिरेबान में झाकके विचार करावा.

ज्या देशात तुम्ही राहता, तेथील resources वापरता त्या देशासाठी इतर कुठलंही कृतीशील योगदान करता येत नसेल तरी त्याच्या राष्ट्रगीताचा मान राखण्यासाठी काही सेकंद उभे रहाण्यात प्रश्न का पडावा ?

राष्ट्रीयत्वाच्या भावनेच्या जोपासनेची सुरूवात अशाच non descript गोष्टीतून होत असते.

------ मनिष मोहिले 

Thursday, December 3, 2015

ईश्क

ईश्क वह खेल नहीं, जो छोटे दिलवाले खेले
रुह तक काॅंप जाती हैं, सदमे सहते सहते

ईश्क वह बारीश नहीं, जिसमें कोई भी भीग जाये
हर साॅंस मुश्किल होती हैं,  सैलाब में बहते बहते

ईश्क सिर्फ चांदनी नही,  की ठंडक ही दे हमेशा
रोम रोम झुलसता हैं, अगन में जलते जलते

ईश्क सिर्फ मेहबूबा का आॅंचल नहीं, की ओढ ले
के सारे इर्दगिर्द होके भी, बेपनाह महसूस होता हैं

ईश्क वह जन्नत नहीं, की मिल गयी यहीं पे
इसे पाने की जुनून में कभी, दम भी तोडना पडता है

-------  © मनिष मोहिले
@manishmohile.blogspot.com

Tuesday, December 1, 2015

वेळ

तू सांजफुलांची वेळ
जणू रातराणी परिमळ
भारलेले सुगंधित पळ
तुला शोधण्याचाच खेळ

तू तरुण रात्रीची वेळ
अन अनुरागाचे पळ
चंदनी दाह शितळ
कासावीस चांदणवेळ

तू दवबिंदूंची वेळ
तृप्तावली देह माळ
माझ्या तनावरी दरवळ
तव रती देही परिमळ

------ मनिष मोहिले