Wednesday, May 31, 2017

आजची मानसिकता - प्लॅस्टीक कोटेड गोंधळ

आजची मानसिकता  - प्लॅस्टीक कोटेड गोंधळ.

गेले दोन दिवस "निकाल" जाहीर होतायत आणि त्याचबरोबर कुठे कुठे निराशा पदरी पडल्याने किंवा त्याच्या भितीने उमलत्या वयाची तरुणाई, ऊमलण्या आधीच स्वत:ला खुडून टाकतीये.

पुस्तकी शिक्षण हे फक्त एक चांगली वैचारीक व माहितीधिष्ठीत बैठक बनण्यासाठी उपयुक्त ठरतं. त्यानंतर प्रत्यक्ष व्यावसायिक आयुष्यात उपलब्ध माहिती आपण कशी वापरतो (application of available information), आपली मेहनत करण्याची तयारी, सातत्य, लक्ष्यकेंद्री वृत्ती, नवीन कल्पना, नवीन तंत्रज्ञान माहीत करून घेऊन वापरणे व परिस्थितीनुरूप धोरण बदल करायची तयारी, आपली लोकांशी वागण्याची पद्धत, अपयश पचवून त्यातून शिकून पुढे सरकायची तयारी  या व अशा अनेक गोष्टींवर यशापयश अवलंबून असतं.
कित्येक प्रथितयश व्यक्तींना देखील आयुष्यात कधी ना कधी शैक्षणिक आयुष्यात अपयशाचा सामना करावा लागला आहे. माझ्या स्वत:च्या शाळेच्या बॅचमधील दोन उदाहरणं माझ्या समोर आहेत की शालेय जीवनात नापास होऊन वा साधारण गुण मिळून सुद्धा ह्या दोन्ही व्यक्ती आज यशस्वी व्यावसायिक आहेत - पहिला नंबर येणाऱ्या मुलांपेक्षा देखील अधिक यशस्वी.

पण आजकाल शैक्षणिक गुण, त्यासंबंधी वास्तव अवास्तव शक्याशक्यता यांचा विचार न करता केलेल्या अपेक्षा - मुलांच्या स्वत:च्या व पालकांच्या, तात्कालिक यशाची हाव, पाल्य व पालक यांच्यातील संवादाचा अभाव, आत्महत्या करून प्रश्न न सुटता आपल्या पालकांपुढे व कुटुंबापुढे वेगळेच भावनिक तसेच व्यावहारीक प्रश्न उभे राहतील ह्याची मुलाना नसलेली जाणीव, वा जाणीव असून ही समतोल विचार करण्याची अपात्रता  ह्या सगळ्यामुळे ह्या वाढत्या आत्महत्या दिसून येतात.

आता दोन वेगळेच विषय. रविवारी होऊन गेलेल्या मासिक पाळी स्वच्छता दिनाच्या निमित्ताने रेडीयो वर दिल्लीच्या सच्ची सहेली का अशा काही नावाने काम करणाऱ्या एका NGO चालिकेची मुलाखत होती. ही NGO मासिक पाळीबाबत त्या मुलीला सुजाण बनवणं, शास्त्रीय माहिती देणं, तिला त्याकडे बघण्याचा सुयोग्य दृष्टीकोन देणं, मुलीच्या कुटुंबातील इतराना देखील हे सर्व मार्गदर्शन देऊन त्यांना मासिक पाळी व त्या स्थितीतून जाणारी स्त्री हिच्याबद्दल संवेदनशील बनवणे हे काम प्रामुख्याने करते आणि ह्यात सगळ्या वर्गातील (आर्थिक / सामाजिक ) कुटुंबांचा समावेश होतो.

त्याच एक दोन दिवसात रेडीयोवर अशीही एक बातमी होती की आता लग्नाशी संबंधित एक नवीन crash course सुरू झाला आहे. पाठवणीच्या वेळी (बिदाई) व्यवस्थित रडायचं कसं ? म्हणजे मेक अप वगैरे खराब होणार नाही आणि तरीही रडणं genuine असेल.

ह्या तिन्ही गोष्टी बघता एक समाज म्हणून आपण कुठे तरी प्लॅस्टीक कोटेड झालोत असं वाटतं.
संवेदना, नाती गोती, आपुलकी, मैत्री, सकारात्मक दृष्टिकोन ह्या ज्या संवेदनशील मनानी टिपून घ्यायच्या गोष्टी आहेत त्या आपण टिपूच शकत नाही. पण त्याच्या ऐवजी आपण बाह्य देखावा, अपयशाचा बागुलबुवा, संवेदनहीनता या सगळ्याच्या जाळ्यात अडकून प्लॅस्टीक प्रमाणे मोडून पडतो किंवा जळून जाऊन polymer चा एक अर्थशून्य उपयोगशून्य गोळा बनून जातो.

ह्या जंजाळातून स्वच्छ विचार करून बाहेर निघणं आणि आपल्या मानसिकतेच्या संदर्भात प्राथमिकतांचा योग्य क्रम लावणं आणि त्या मानसिकतेवरचं प्लॅस्टीकचं आवरण काढून टाकणं ही आजच्या समाजाची (irrespective of generation) आत्यंतिक महत्वाची गरज आहे.

-- मनिष मोहिले

Sunday, May 28, 2017

निवृत्ती व रीटायरमेंट - एका दृष्टीकोनाचा फरक ??

रीटायरमेंट आणि निवृत्ती - एका दृष्टीकोनाचा फरक

निवृत्ती, Retirement - समानार्थी शब्द. आपल्या व्यावसायिक कार्याला पूर्णविराम देणे म्हणजे निवृत्ती ज्यासाठी इंग्लीशमध्ये retirement हा समानार्थी शब्द आहे. पण ते खरंच समानार्थी आहेत का ? आणि हा शब्द फक्त व्यावसायिक क्षेत्रापुरता मर्यादित आहे का ?

माझ्यामते ह्या दोन्ही शब्दांच्या अर्थात एका दृष्टीकोनाचा फरक आहे.

निवृत्ती यात नि:संग होऊन जायची वृत्ती असा अर्थ अभिप्रेत आहे मला. थोडक्यात व्यावसायिकच नाही तर एकंदरीतच सांसारिक गोष्टीन्मध्ये मला आता रस नाही, मी आता त्या सगळ्या गोष्टीत नाही. त्यातून मी काया वाचा मने बाजूला झालो आहे. पारलौकिक किंवा आध्यात्मिक क्षेत्रात पडून आत्मिक उन्नती करणे आणि कुवतीप्रमाणे कोssहम  चा अर्थ शोधणे, आपल्या जगात येण्याचा हेतू शोधणे आणि या संदर्भात गत आयुष्य तपासून पहाणे हा निवृत्तीचा मार्ग.  हा मार्ग स्विकारताना सहसा उतारवय हेच सर्वमान्य वय असलं तरी सांसारिक जबाबदाऱ्या नसतील तर स्वत:च्या मूळ स्वभावाप्रमाणे, प्रवृत्तीप्रमाणे हा निवृत्तीमार्ग कुठल्याही वयात स्वीकारता येतो. त्यासाठी स्वत:ची तेवढी आध्यात्मिक प्रगती झालेली असणं आवश्यक असतं. पण तो नि:संगपणा खऱ्या अर्थाने वृतीत आलेला असायला हवा. नसेल तर ओढूनताणून आणलेल्या या निवृत्तीला काहीच अर्थ नाही. त्याचप्रमाणे सांसारिक जबाबदाऱ्या टाळून किंवा अर्धवट टाकून ह्या मार्गाला जाण्यातही अर्थ नाही.  जर एखाद्याची तितकीच आध्यात्मिक उन्नती झालीच असेल तर शरीराने सांसारिक जबाबदाऱ्या ऊचलून देखील मनानी नि:संग रहाता येऊ शकतं. पण बहुतांश लोकांना हे जमत नसावं आणि म्हणूनच प्राचीन हिंदू धर्मानी वानप्रस्थाश्रम निर्माण केला असावा भौतिक अंतर असल्यावर मनानी दूर जायला मदत होत असावी.
एकंदरीत प्रापंचिक व व्यावसायिक जबाबदाऱ्या एका पिढीकडून सहजपणे पुढच्या पिढीकडे हस्तांतरित व्हाव्या ह्यासाठी हा एक उत्तम मार्ग होता व आहे.

थोडक्यात काय तर मनाचा नि:संगपणा महत्वाचा. तो आला की खऱ्या अर्थानी निवृत्त झाली ती व्यक्ती.

आता retirement चा विचार करू.

Retirement ह्या शब्दाची Re - tirement अशी फोड केली तर ? Re - tired.? Re - परत एकदा आणि tired - थकलो / थकले. जर व्यावसायिक क्षेत्रातून काया वाचा मने बाजूला झालोय तर मग हे परत थकणं कशासाठी / कोणासाठी ?

तर हे थकणं स्वत:साठी. आयुष्यातील वेगवेगळ्या भूमिका बजावताना उचलाव्या लागणाऱ्या जबाबदाऱ्या बाजूला ठेवून, त्या निभावताना आलेला थकवा बाजूला ठेवून ताज्या मनाने परत एकदा फक्त स्वत:साठी थकायचं - विश लिस्ट वर असलेल्या पण करता न आलेल्या सगळ्या गोष्टी करायच्या. ज्या जागा बघायच्या  बाकी राहिल्या असतील त्या जागा,  ती ठिकाणं बघायची, राहून गेलेली पुस्तकं वाचायची, वेळेअभावी अटेंड न करता आलेल्या गाण्याच्या, संगीताच्या मैफिली ऐकायच्या, मित्रमैत्रिणींच्या घोळक्यात, घड्याळाकडे पूर्ण दुर्लक्ष करून मनसोक्त गप्पा मारायच्या, सहचराच्या हातात हात घालून फिरताना संध्याकाळ रोमॅंटीक बनवायची, मन मोकळं करायचं, साचलेले सल सांगून टाकायचे, बाकी राहिलेली माफी मागून टाकायची, मुला नातवंडाना सल्ला द्यायचा, सोबत द्यायची पण अलिप्तपणे,किंवा एखाद्या समाजपयोगी कामात पडायचं. काही ही करायचं. फक्त एकच अट. जे करायचं ते फक्त स्वत:ला चांगलं वाटतय म्हणून. ईच्छा असो वा नसो, जबाबदारी घ्यावीच लागते. पण इथे या टप्प्यावर पूर्ण ऐच्छिक कामकाज. मात्र जर एखादी जबाबदारी घेतलीच तर ती प्रामाणिकपणे पूर्ण करायची. पण त्यातला थकवा हा समाधानाचा आणि स्वत:च्या समाधानाचा थकवा असेल.

पण मग ह्या रीटायरमेंट मध्ये आध्यात्मिक उन्नतीचं काय ? माझ्या मते पूर्ण समाधानी मनुष्य सुद्धा आपोआप नि:संग होत जातो. शेवटी आपण म्हणतो नं की आता निवृत्त झालो / रीटायर झालो, आता स्वस्थ पणे रहायचं. निवृत्ती वा रीटायरमेंट  या दोन्ही मध्ये शेवटी स्वस्थ रहाणं महत्वाचं. पण स्वस्थ म्हणजे काय ? जो स्वत:मध्ये स्थित असतो स्थिर असतो तो स्वस्थ. ही स्वस्थता कोssहम चं उत्तर शोधूनही मिळते किंवा लौकिक आयुष्यात पूर्ण समाधानानी जगून सुद्धा.

प्रत्येकानी आपापल्या प्रवृत्तीप्रमाणे निवृत्त व्हावं किंवा रीटायर. पु.ल. म्हणतात त्याप्रमाणे सुसज्ज स्नानगृहात बाथ क्रीस्टल्स वापरून ही आंघोळ स्वच्छ आंघोळ होते आणि घाटावरून नदीत दणादण उड्या मारून काठावरच्या दगडानी अंग घासून सुद्धा स्वच्छ आंघोळ होते. ह्यातला कोणत्या आंघोळीचा आनंद लुटावा हे प्रत्येक देहातल्या आत्मारामपंतांनी ठरवायचं. त्याचप्रमाणे निवृत्त व्हायचं की रीटायर हा देखील फक्त प्रवृत्तीचा आणि दृष्टीकोनाचा फरक आहे. रस्ते वेगवेगळे असतील. मुक्कामाचं ठिकाण एकच आहे.

-- मनिष मोहिले

Friday, May 26, 2017

ओ बी ओ आर - चीनचा रेशमी गळफास ?

ओ बी ओ आर

सध्या आंतरराष्ट्रीय राजकारण व अर्थकारण या दोन्ही आघाड्यांवर चीनचा ओ बी ओ आर ( One Belt One Road) प्रकल्प खूपच चर्चेत आहे.

एका भौगोलिक परिसरातील विविध देशांना उपलब्ध असेल असा एक महामार्ग कच्चा व उत्पादित माल, मनुष्यबळ यांची ने आण सुलभ होइल व भौगोलिक नजीकतेने परस्परांशी जुळलेल्या सर्व देशांचे आर्थिक हितसंबध जोपासले जातील व संपूर्ण विभागाची प्रगती होइल, विकास होइल ही या ओ बी ओ आर प्रकल्पामागची मूळ संकल्पना.

भविष्यकाळातआंतरखंडीय स्तरावर पसरला जाणार असलेल्या या प्रकल्पाची सुरूवात होतेय ती भारतीय उपखंडात व आजूबाजूनी असे तीन मार्ग बनवण्यानी.

एक चीनच्या मुख्य भूमीपासून तिबेटमार्गे नेपाळमधील लुंबिनी या गौतम बुद्धाच्या जन्मस्थानापर्यंत लोहमार्ग.
दुसरा चीन बांग्लादेश भारत व म्यानमार (BCIM) असा महामार्ग. या मार्गामुळे आंतरराष्ट्रीय व्यापार अधिक व्यापक होइल, सोपा होइल हे निर्विवाद.
तिसरा चीन पाकिस्तान आर्थिक मार्ग ( China Pakistan Economic Corridor CPEC) - चीनमधील शिशियांग पासून सुरू होऊन पाकव्याप्त काश्मिर मधून सरकत पाकच्या बलुचिस्तान प्रांतातील ग्वदार बंदरापर्यंत जाणारा मार्ग म्हणजे CPEC. हा मार्ग पूर्ण झाल्यास जे खनिज तेल आज चीनला समुद्रमार्गे मोठ्ठा वळसा घालून आयात करावं लागतंय ते CPEC मार्गे खूपच कमी वेळात व कमी खर्चात त्यांना मिळू लागेल. शिवाय तोच मार्ग चीनी उत्पादनाच्या निर्यातीसाठी सुद्धा वापरता येऊ शकतो.

मग भौगोलिक संलग्नता असलेल्या संपूर्ण विभागाच्या आर्थिक प्रगतीचं वास्तववादी आश्वासन देणाऱ्या या प्रकल्पाला भारताचा विरोध का आहे ?

तर हा प्रकल्प निश्चित करताना, भारत हा भारतीय उपखंडातील प्रमुख देश असून सुद्धा आपल्याला डावललं गेलंय ही भारताची भावना आहे जी बरीचशी खरी ही आहे.

कारण हा प्रकल्प राबवण्यासाठी जसं चीन ने संबंधित देशांना सहकार्याचं आवाहन केलं आहे, तसंच आर्थिक मदतीबरोबरच एखाद्या देशाची ईच्छा असल्यास त्यांच्या प्रदेशातून जाणाऱ्या या महामार्गाच्या संरक्षणाची जबाबदारी उचलण्याची तयारी ही चीन ने दाखविली आहे (Is it modern chinese form of East India Company?) आणि शेवटी  या देशांच्या सहकार्याशिवाय देखील हा प्रकल्प आपण पूर्ण करूच असा इशाराही दिला आहे.

थोडक्यात या प्रकल्पामुळे चीनचं भारतीय उपखंडावरील वर्चस्व खूपच वाढेल ही रास्त शंका भारताला आहे. या संदर्भात आपण वर उल्लेख केलेल्या प्रत्येक मार्गाचा विचार करू.

पहिला - चीन ची मुख्य भूमी पासून तिबेट मार्गे नेपाळमधील लुंबिनीपर्यंतचा लोहमार्ग. भारताकडे आपला प्रमुख सहकारी व आधार म्हणून पहाणाऱ्या नेपाळला या मार्गासाठी चीनकडून मिळणारी भरघोस आर्थिक व इतर मदत, मूलभूत सुविधांमधील सुधारणांमुळे होऊ शकणारी आर्थिक प्रगती याचं आकर्षण वाटून तो भारताच्या प्रभावामधून थोडाफार का होइना बाहेर पडून चीनकडे झुकण्याची शक्यता आहे. शिवाय लुंबिनीपर्यंत हा मार्ग न्यायचं ठरवून चीन ने या महत्वाकांक्षी आर्थिक विकास प्रकल्पाला धार्मिक जोड देण्याची चलाखी दाखवलेली आहे.

दुसरा चीन बांग्लादेश, भारत व म्यानमार यांना जोडणारा महामार्ग. चीनला भारताच्या सहकार्याची सगळ्यात जास्त गरज याच टप्प्यासाठी पडणार आहे. यात आपलं कलकत्ता बंदर या महामार्गावरील एक महत्वाचं बंदर ठरेल. भारताच्या ईशान्य राज्यांच्या विकासाच्या दृष्टीने देखील हा मार्ग महत्वाचा आहे. पण अरुणाचल प्रदेशावर हक्क सांगणाऱ्या चीनच्या महत्वाकांक्षेला त्यामुळे खतपाणी मिळून भारताच्या सुरक्षिततेला व अखंडतेला तिथे धोका उद्भवू शकतो.

तिसऱ्या मार्गाबद्दल तर सगळ्यानाच काय समस्या आहेत त्याची कल्पना आहे. मुळात हा मार्ग प्रस्तावित करून आणि त्यावर अर्धअधिक काम पूर्ण करत आणून चीन ने अप्रत्यक्षरित्या POK वरील पाकच्या दाव्याला मान्यता दिली आहे. जर आपण या प्रकल्पाचा हिस्सा बनलो तर आपणही पाकचा पाकव्याप्त काश्मिरवरचा दावा मान्य केल्यासारखं होइल आणि उर्वरीत काश्मिर भारतापासून तोडून आपल्या अधिपत्याखाली आणण्याच्या पाकिस्तानच्या प्रयत्नाना जोर चढेल. काश्मीरमधील विघटनवादी संघटना याची वाटच बघताहेत.

बरं आपण  सहभागी न होताही चीनला जे करायचंय ते ते करतातच आहेत. त्यामुळे धरलं तर चावतं आणि सोडलं तर पळतं अशी गत झालीये भारताची.

या समस्येवरती भारताचा थिंक टॅंक निश्चितीपणे काहीतरी रणनीती ठरवत असेलच पण एक सर्वसामान्य भारतीय माणूस म्हणून मला वाटतं की
भारतानी ह्यात एकाच मुद्द्याला किंवा धोरणाला धरून रहाण्यात अर्थ नाही. कारण आपण कितीही विरोध वा असहकार करायचं म्हटलं तरी या प्रकल्पाचे दृष्य आर्थिक फायदे इतके आहेत की इतर देश त्याकडे आकृष्ट होऊच शकतात. शिवाय ते मुळातच छोटे व मागासलेले असल्यामुळे विकास व आर्थिक प्रगती हीच त्यांच्यापुढची प्राथमिकता आहे. त्यांना विभागीय वर्चस्वक्षेत्र वगैरे सारख्या महत्वाकांक्षा नाहीत किंवा परवडू शकत नाहीत. जर आपण असहकाराचं धोरण चालू ठेवलं तर हे जे काही आपले दुबळे का होइना पण समर्थक देश आहेत त्यांचाही छुपा विरोध / असंतोष आपल्याला सहन करावा लागेल.

आज आंतरराष्ट्रीय परिस्थितीचा विचार केला तर योग्य सहकारी देश निवडण्यात आपले निर्णय किंवा निर्णय घेण्याची वेळ चुकलेली आहे. आधी आपण आदर्शवादी अशा समाजवादाची स्वप्न बघणाऱ्या नेतृत्वामुळे अमेरिका सोडून रशियाच्या कच्छपी लागलो आणि रशियाच्या विघटनानंतर आपण अमेरिकेच्या भजनी लागलो. आत्ता आत्ता त्याचे फायदे मिळायला लागतील असं वाटत असतानाच अमेरिकेतील नेतृत्वबदलामुळे तिथे पण सध्या अनिश्चितताच आहे.  आपण अमेरिकेला जवळ केल्यामुळे दुखावलेल्या रशियानी पाकिस्तानबरोबर संयुक्त लष्करी कवायती करून आपल्या परराष्ट्रीय धोरणाला मोठाच धक्का दिला आहे.

अशा परिस्थितीत चीन सारख्या बलाढ्य शेजाऱ्याला पूर्णपणे व उघडपणे बिथरवणं कदाचित आपल्याला जास्त नुकसान करणारं ठरू शकेल. त्याचबरोबर या महामार्गांमुळे जे फायदे होतील ते ही नजरेआड करण्यासारखे निश्चितच नाहीत. त्यामुळे या प्रकल्पापासून, त्याच्याशी संबंधित आंतरराष्ट्रीय शिखर परिषदा व इतर सभांपासून अलिप्त न रहाता तिथे सशर्त सहकाराचं प्रतिपादन करायचं, प्रकल्पात सहभागी होऊन त्याचे फायदे घ्यायचे पण त्याचवेळी भारताच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनी घातक असणाऱ्या (CPEC)  वा होऊ शकणाऱ्या शक्यता आंतरराष्ट्रीय समुदायासमोर आणून तिथे सहानुभूती व सहकार मिळवण्याचा प्रयत्न करायचा जेणेकरून चीनला त्यांचे इरादे सहजासहजी पूर्ण करता येणार नाहीत व भारताच्या हितसंबंधाना प्राधान्य देणारे बदल या प्रकल्पात होतील अशा शक्यता निर्माण करणं  आणि त्याचवेळी उपलब्ध सुधारणांचा फायदा घेत आपली आर्थिक, रणनैतिक (strategic) व लष्करी  ताकद वाढवत रहायची अशी तिहेरी कसरत भारताला करावी लागेल.

आता जे माझ्यासारख्या सामान्य माणसाला सुचतंय ते आपल्या मुत्सद्द्याना सुचत नसेल असं निश्चितच नाही. तसंच हे सगळं सहजपणे घडू द्यायला चीन पाकिस्तान काही हातावर हात धरून बसणार नाहीत. पण हे मुत्सद्देगिरी दाखवून कसं घडवून आणायचं हे आपला diplomatic think tank च  अधिक चांगलं जाणतो. त्याचप्रमाणे जशी आपली मर्मस्थानं आहेत त्याचप्रमाणे चीनची मर्मस्थानं शोधणं किंवा काही मर्मस्थानं बनवणं ही आपली रणनीती असली पाहीजे.

मात्र, हा प्रकल्प नजरेआड करण्यासारखा अजिबात नाही आणि तो प्रत्यक्षात उतरणार याबद्दल अजिबात शंका नाही.  त्यामुळे त्यापासून अलिप्त न रहाता सतत प्रयत्न करून तो शक्य तेवढा आपल्याला अनुकूल बनवणं हेच भारतीय अधिकाऱ्यान्समोरचं उद्दीष्ट असेल, असायला हवं.

---- मनिष मोहिले 

Wednesday, May 24, 2017

पॉन सक्रीफाइस

२१ मे च्या रविवारी  पॉन सॅक्रिफाइस नावाचा चित्रपट पाह्यला. बॉबी फिशर च्या आयुष्यावरचा.

सुरेख चित्रपट. सत्तरच्या दशकाच्या सुरूवातीला बुद्धिबळाच्या खेळातील रशियाच्या जागतिक वर्चस्वाला आव्हान देणारा अमेरिकन ग्रॅंडमास्टर रॉबर्ट जेम्स "बॉबी" फिशर या अतिशय प्रज्ञावंत बुद्धिबळपटूची जीवन कहाणी सांगणारा.

सत्तरच्या दशकातील अमेरिका व रशिया यांच्या शीत युद्धाच्या पार्श्वभूमीवर खेळातील हार जीत ह्यालापण एक वेगळाच रंग लाभला होता. त्यातून बऱ्याच काळानी , रशियाच्या बुद्धिबळातील जागतिक वर्चस्वाला आव्हान देऊ शकणारा असा कुणी खेळाडू फिशरच्या रुपाने उदयाला येत होता.

अतिशय हुशार पण तेव्हढाच तऱ्हेवाईक आणि विक्षिप्त. रशियन आणि ज्यू वंशीय संपूर्ण जगाला आपल्या अधिपत्याखाली आणायचा प्रयत्न करतायत आणि त्यासाठी ते कोणत्याही थराला जाऊ शकतात हा विचार बॉबीच्या मनात इतका मूळ धरून बसला होता की त्यामुळे आपल्यावर सतत हेरांची पाळत आहे, आपल्या हॉटेल रूम मधील टेलिफोन "bugged" केलेले आहेत अशा शंकांनी फिशरचं डोकं भणाणून जात असे आणि त्यातूनच त्याच्या "मी अमुक अमुक व्यवस्था असेल तरच खेळीन" अशा चमत्कारिक अटी बाहेर पडत असत.

हा तऱ्हेवाईकपणा इतका पराकोटीला गेला की त्याच्या मानसिक स्वास्थ्याबद्दल सर्वत्र चर्चा सुरू झाली. या शंका बऱ्याच अंशी खऱ्या असाव्यात कारण १९७५ साली फिशरनी आपलं जगज्जेतेपद अबाधित / सुरक्षित ठेवण्यासाठी खेळण्या ऐवजी व्यावसायिक बुद्धीबळातून आणि सार्वजनिक जीवनातून अचानक निवृत्ती घेतली आणि रशियाचा अनातोली कारपॉव्ह जगज्जेता बनला - फिशर शी सामना न करताच.  पुन्हा एकदा रशियाचं पारडं जड झालं.

त्यानंतर १९९२ साली फिशर अचानक "बाहेर" आला आणि संयुक्त राष्ट्रानी युगोस्लाव्हिया वर बंधन घातलेलं असून देखील तिथे स्पास्कीविरुद्ध एक अनधिकृत सामना खेळून तो जिंकला आणि अमेरिकन सरकारच्या रोषास पात्र ठरला. पुढे त्याला जपान मध्ये रद्दबातल ठरलेला अमेरिकी पासपोर्ट बाळगून आढळल्याबद्दल अटक झाली आणि अखेरीस आईसलॅण्ड नी आपलं नागरिकत्व देऊन त्याला आयुष्याच्या अखेरच्या वर्षात आसरा आणि देश दिला.

एका अतिशय बुद्धीमान व प्रज्ञावंत बुद्धीबळपटूच्या जीवनाची ही दुर्दैवी कहाणी. बरेच जण म्हणतात की यश फिशरच्या डोक्यात गेलं, त्यामुळे त्याचा मूळचा विक्षिप्तपणा वेडेपणात बदलत गेला.

पण हे असं जरी सगळं असलं तरी बॉबी फिशर हा जगात आजतागायत होऊन गेलेल्या महान बुद्धीबळ पटूंपैकी एक होता हे निर्विवाद.

आजच्या संगणकीय जमान्यात महान खेळाडूंच्या चालींबद्दल माहिती असणं व विश्लेषण करणं इतकं अवघड वाटत नाही पण १९७० च्या दशकात बॉबी फिशरने आपल्या प्रतिस्पर्ध्यांच्या खेळाच्या शैलीचा व प्रत्येक सामन्यातील चालींचा जितका खोलात जाऊन अभ्यास केला होता तितका क्वचितच कोणी त्यापूर्वी केला असेल असं जाणकारांचं म्हणणं आहे.

वयाच्या तेराव्या वर्षी एका स्पर्धेत बॉबी जो गेम खेळला त्याला बुद्धीबळाच्या जगतात " Game of the Century" म्हणून ओळखलं जातं. १९७२ साली ज्या चोवीस सामन्यांच्या शृंखलेत त्याने स्पास्की कडून जगज्जेतेपद खेचून घेतलं त्या शृंखलेतील सहावा गेम हा बऱ्याच तज्ञांच्या मते जागतिक व्यावसायिक बुद्धीबळातला आत्तापर्यंतचा सगळ्यात उत्कृष्ट असा खेळ होता व आहे ज्यात बॉबी फिशरनी पूर्णपणे अनपेक्षित व अचंबित करणाऱ्या चाली करून तो गेम अशा अभूतपूर्व रितीने जिंकला की स्पास्कीने देखील टाळ्या वाजवून त्याचं अभिनंदन केलं.

बुद्धीबळाच्या अभिनव अशा अफलातून शैली व्यतिरिक्त या खेळात बॉबीचं इतर योगदान देखील महत्वपूर्ण आहे. सध्या जागतिक व्यावसायिक बुद्धीबळात चालीसाठी घेतलेल्या वेळेची गणना करण्याची जी पद्धत सर्वमान्य रित्या वापरली जाते ती बॉबी फिशरनी तत्कालीन पद्धतीत सुधारणा करून तयार केलेली आहे. त्याचं My 60 memorable games हे पुस्तक हौशी, व्यावसायिक अशा सर्व बुद्धीबळपटूंसाठी एक must read आहे.

फिशर च्या विक्षिप्तपणाबद्दल बोलणाऱ्या लोकांपैकी किती जणाकडे, बुद्धीबळ सोडा पण;  आपल्या स्वत:च्या क्षेत्रात सुद्धा अशी अभूतपूर्व कामगिरी दाखवण्याचं कौशल्य होतं ?

पण जेव्हा एखाद्या जगप्रसिद्ध व्यक्तीच्या आयुष्याच्या यशस्वीपणाचा आलेख तपासला जातो तेव्हा तो सार्वजनिक आयुष्याबरोबरच वैयक्तिक आयुष्यात कितपत यशस्वी होता, यश पचवू शकला की नाही , अपयश पचवू शकला की नाही इत्यादी अनेक निकष लावले जातात.

त्या संदर्भात आणि रंगांची पारंपारिक रुपकं लक्षात घेऊन, बुद्धीबळाच्या परिभाषेत बोलायचं तर  बुद्धीबळाचा पट हे जीवन, त्यातले पांढरे चौकोन म्हणजे यश, सुख, समाधान, आनंद इ. तर काळे चौकोन म्हणजे अपयश, निराशा, दु:ख इ.

प्रत्यक्ष खेळात दोन्ही रंगाच्या सोंगट्या या निव्वळ सोंगट्या असल्या तरी आयुष्याच्या संदर्भात विचार करता, पांढऱ्या सोंगट्या म्हणजे चांगुलपणा, प्रामाणिकपणा, धैर्य, सचोटी, समतोल विचारसरणी, चिकाटी, आशावाद, बुद्धिमत्ता, नीतीमत्ता इ. सुगुण तर काळ्या सोंगट्या म्हणजे वाईट विचार, निराशा, पलायनवाद, क्रोध, मत्सर इ व इतर अनेक दुर्गुण.

या पटावर पांढऱ्या सोंगट्यांनी काळ्या सोंगट्यांना मात देत शेवटी काळ्या राजाला शह व मात देणं अत्यंत आवश्यक आहे. भले खेळाच्या मध्ये आपण स्वत:ला पांढऱ्या ऐवजी काळ्या चौकोनात पाहिलं तरी पांढऱ्या सोंगट्यांची ताकद पणाला लावून गेम जिंकायचा प्रयत्न करायलाच हवा.

नाहीतर भले तुम्ही बॉबी फिशर असाल आणि बुद्धीबळाचे जगज्जेतेपण असाल पण अपरिहार्यपणे तुमच्याबद्दल बोलताना नंतरच्या पिढ्या तुमच्या कौशल्याबद्दल बोलतानाच तुमच्या बाकीच्या आयुष्याबद्दल कणव, तुच्छता, तिरस्कार या सहित उल्लेख करतील.

तेव्हा जीवनाच्या बुद्धीबळात "काळ्या सोंगट्यांचा"  बळी देत (pawn sacifice) पांढऱ्या सोंगट्यांच्या बळावर सर्व क्षेत्रात यशस्वी होण्याचा प्रयत्न करणं हाच बुद्धीबळाचा सर्वश्रेष्ठ गेम आहे नाहीतर आपल्याच दोषांच्या वा दुर्गुणांच्या हातंचं प्यादं (pawn) बनून बळी जात रहाणं हेच होत राहील.

---- मनिष मोहिले 

Tuesday, May 23, 2017

सचिन सचिन

सचिन रमेश तेंडुलकर या खेळाडूचं मोठेपण यात की त्याच्या संपूर्ण कारकिर्दीत त्याच्याबद्दल जे काही बोललं लिहीलं गेलं (९०% वेळा स्तुती करणारं आणि १०% वेळा त्याच्या खेळातील फॉर्मबद्दल शंका उपस्थित करणारं, कप्तानपद आणि बॅट्समन या दुहेरी भूमिका समर्थपणे न हाताळू शकण्याबद्दल ) ते त्याच्या क्रिकेटबद्दल, त्याच्या क्रिकेटमधल्या फॉर्म बद्दलच होतं.

क्रिकेट व्यतिरिक्त मॅच फिक्सींग, एखाद्या अभिनेत्रीबरोबर नाव जोडलं जाणं, IPL च्या जमान्यातील "इंडियन सुरस कथा" असलेल्या पार्टीजमधील सहभाग याबद्दल ते कधीच नसायचं.

सतत चोवीस वर्ष आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधे देशाचं प्रतिनिधित्व करायचं, करोडो लोकांच्या अपेक्षांचं ओझं सांभाळत स्वत:ला सांभाळायचं, इतकं अफाट यश मिळाल्यानंतर ही कोणत्याही प्रलोभनांना बळी न पडता सातत्यानी आपल्या खेळावर, त्यातील तृटींवर लक्ष केंद्रीत करत खेळ अजून चांगला कसा बनवता येइल हा विचार करायचा आणि हे सगळं करताना एक कुटुंबवत्सल नवरा, बाप, मुलगा ही भूमिका (घरच्यांचा सहभाग आणि आधार १००% मान्य) योग्य पद्धतीनी निभावतानाच एक चांगला नम्र माणूस बनून रहायचं, सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवायची ह्यात त्याच्यातला चांगला खेळाडू आणि चांगला माणूस यातील समतोल दिसून येतो.

सचिन रमेश तेंडुलकर अशा पद्धतीने घडण्यात त्याचे वडील, कुटुंब आणि निर्विवादपणे अजित तेंडुलकर ह्यांचा मोठा सहभाग असला तरी मुळात सचिन या व्यक्तीमधल्या त्याला महान बनवणाऱ्या गुणांना, त्याच्या मेहनतीला, चिकाटीला, खेळातील प्रामाणिकपणाला कमी महत्व आहे असं होत नाही.

रत्नाना पैलू पाडतात त्यात बरेचदा आतले दोष (जिरीम म्हणतात त्याला - एखादी चीर जी प्रोसेस मध्ये मोठी होत जाते किंवा रंग अशा जागी अधिक चांगला असणं जो भाग कापला जाइल ) पैलू पाडताना अथवा घिसाई करताना दिसू लागतात किंवा मोठे व्हायला लागतात. तर असा दोष नसलेला खडा मुळात मिळणं की ज्याला योग्य पैलू पाडता येतील हे ही तितकंच महत्वाचं.

कांबळीची natural cricketing ability सचिनपेक्षा सरस असेल, नव्हे तज्ञांच्या म्हणण्य्याप्रमाणे ती होती. पण temperament या मुद्द्यावर माझा मतभेद आहे मुकुंदा.

Temperament हे फक्त एका मॅचपुरतं किंवा मैदानापुरतं मर्यादित नसतं. ते मैदानाच्या बाहेर असंख्य आशा अपेक्षांची ओझी, प्रलोभनं, मोह, या व इतर अशाच गोष्टींना यशस्वीपणे हाताळण्यासाठी पण लागतं आणि ते ज्याला जमतं त्याचं temperament खरं temperament.

मैदानावर किंवा मैदानाबाहेर कधीही आक्षेपार्ह भाषा नाही, वर्तन नाही, प्रतिस्पर्धी गोलंदाज आणि स्वजन टीकाकार यांच्या गोलंदाजी अथवा शाब्दिक हल्ल्याना प्रत्युत्तर फक्त खेळातून द्यायचं आणि हे वयाच्या सोळाव्या सतराव्या वर्षापासून सांभाळण्याइतकी प्रगल्भता ह्या सगळ्या गोष्टी अजितच्या त्यागा इतक्या आणि अथक अमूल्य मार्गदर्शना इतक्याच महत्वाच्या.

अंगातला शर्ट न काढता, कानात डूल न घालता प्रतिस्पर्ध्यानी (Matthew Hayden) सुद्धा फलंदाजीतल्या देवाचा दर्जा द्यावा, भारतीय जनतेनी तर क्रिकेटचा देवच मानावं, माजी, आजी आणि भावी अशा सगळ्या दिग्गज खेळाडूंनी खेळातील कौशल्याचे आणि त्याच बरोबर एक चांगला माणूस असण्याचे गुण गावेत, प्रत्यक्ष ब्रॅडमन नी "तुला खेळताना पाहून मला माझ्या स्वत:च्या खेळाचा भास झाला" अशी दाद द्यावी - ह्या सगळ्यासाठी नुसता चांगला मार्गदर्शक मोठा भाऊ असून चालत नाही - मूळ नाणं खणखणीत असावंच लागतं.

शेवटी आचरेकर सरांचं "द्रोणाचार्य" पद खऱ्या अर्थानी सार्थ केलं सचिन नीच.

असंख्य महान खेळाडू होऊन गेले आणि होतील ही. पण संपूर्ण देशानी  ज्याच्या नावाचा गजर करावा असा खेळाडू अतिशय विरळा - सचिन रमेश तेंडुलकर असा खेळाडू आहे.

म्हणूनच चोवीस वर्षं तो त्या बावीस यार्डावर असतानाचा गजर पुन्हा एकदा करतो -


सचिन सचिन सचिन सचिन.

--- मनिष मोहिले 

Thursday, May 18, 2017

त्रिमितीय छपाई - अर्थात 3D Printing

त्रिमितीय छपाई अर्थात 3D Printing

एपिस कॉर नावाच्या एका कंपनीने रशियातील स्टुपिनो या जागी अकरा हजार डॉलरच्या खर्चात चारशे चौरस फुटाचं एक खरंखुरं घर बनवलं.  आता तुम्ही म्हणाल की यात नवल ते काय ?

तर नवल हे की त्यांनी हे घर एका दिवसात उभं केलं. शब्दश: २४ तासात. कारण ॲपिस कॉर नी ते घर "छापलं" - अक्षरश: छापलं - त्रिमितीय छपाई तंत्रज्ञानाच्या मदतीने. ह्या प्रिंटरमध्ये शाई होती कॉंक्रीट मिक्ष्चर.

पोर्टेबल 3D प्रिंटरमध्ये कॉंक्रीट मिक्ष्चर ची शाई वापरून प्रथम घराचा मूळ ढाचा (structure), भिंती, आतल्या भिंती, छप्पर इत्यादी बनवलं आणि नंतर जुळणी (assembly) चं काम (दारं, खिडक्या, काचा, interior) करून घर पूर्ण केलं.

एपिस कॉर  ह्या 3D printer बनवणाऱ्या कंपनीने ह्या प्रकल्पात विकास, बांधकाम सामग्री, रंग व मजबूती सामग्री (reinforcement materials), इलेक्ट्रॉनिक्स, वातावरण नियंत्रण इत्यादी विविध क्षेत्रातील अग्रगण्य अशा सहा कंपन्यांकडून सहाय्य घेतलं आणि हा विक्रमी प्रकल्प पूर्ण केला.

एपिस कॉर च्या सुरवातीच्या अंदाजाप्रमाणे फक्त बांधकामाच्या खर्चाचा विचार केला तर 3D छपाईनी केलेलं बांधकाम हे सध्या ज्या पद्धतीने बांधकाम केलं जातं त्याच्यापेक्षा जवळपास ७०% स्वस्त असू शकेल. अर्थात व्यापारी स्तरावर ह्या अंदाजाची सत्यासत्यता पडताळावी लागेल.

पण अशा पद्धतीने बांधलेल्या इमारती या भूकंपासारख्या नैसर्गिक आपत्तीत सुरक्षित आहेत का ? तर निश्चितपणे आहेत असं या इमारती बनवणारे वास्तूशास्त्रज्ञ म्हणतात. कारण इमारतीच्या ढाच्यात ते एकमेकात अडकवू शकण्याजोगे ठोकळे बनवतात जे भूकंप झाला असता पडण्याऐवजी एकमेकांकडे किंवा विरुद्ध सरकतात आणि तो धक्का पचवतात.

इतंकच काय पण 3D printed sand blocks (विटा) मधील छिद्रांचा आकार, डिझाइन संगणक नियंत्रणाप्रमाणे बनवून वातावरणातील बाष्पाचा वापर करून घरातील तपमान नियंत्रण सुद्धा होऊ शकतं.

एपिस कॉर चा प्रकल्प जुना म्हणवेल अशा वेगाने घटना घडतायत. चीन मधल्या हुआशॅंग टेंग्डा HuaShang Tengda या कंपनीने मोठा 3D प्रिंटर वापरून ४५ दिवसात ४३०५ चौरस फुटाचा दुमजली व्हिला बांधला, चुकलो; छापला - जो त्यांच्या मते रिख्टर स्केल वर ८ पर्यंतच्या ताकदीच्या भूकंपाचे धक्के सुद्धा सहन करू शकतो. हुआशॅंग ने तर प्रथम ढाचा, मग भिंती, मग जुळणी असं नं करता फक्त बाह्य ढाचा बनवला प्लंबिंग पाईप सकट आणि नंतर बाहेरच्या आतल्या भिंती इ सहित संपूर्ण घर छापलं. एपिस कॉर च्या खर्चाबद्दलच्या अंदाजात तथ्य असू शकेल असं वाटण्याजोगी ही गोष्ट आहे.

तर अशा अविश्वसनीय वाटणाऱ्या गोष्टी प्रत्यक्षात करून दाखवणारं हे 3D Printing आहे तरी काय नक्की ?

त्रिमितीय छपाई हे एक भविष्यवेधी आणि
भविष्य बदलून टाकणारं तंत्रज्ञान आहे. अधिक व्यापक स्वरुपावर या तंत्रज्ञानाला Additive Manufacturing (मिश्रित पदार्थ निर्मिती) या नावानी ओळखलं जातं.

ढोबळमानाने सांगायचं तर संगणकीय नियंत्रणाच्या मदतीने अंकात्मक त्रिमितीय प्रतिकृती प्रत्यक्षात उतरवण्यासाठी,  नक्की केलेल्या शाईचे म्हणजेच सामग्रीचे (material) अतिशय पातळ थर एकमेकांवर चिकटवून त्या प्रतिकृतीप्रमाणे त्रिमितीय वस्तू बनवणे म्हणजे त्रिमितीय छपाई.

एखाद्या त्रिमितीय मॉडेलींग ॲपच्या (There are professional costly apps for industrial purpose and also apps like Blender which is free open source app available) मदतीने आभासी (virtual) त्रिमितीय प्रतिकृतीची CAD (computer aided design) फाइल बनवून ती 3D printer कडे पाठवायची आणि ती त्रिमितीय वस्तू छापायची हे या प्रक्रियेचं अगदी सोपं वर्णन झालं.

ही CAD फाइल तयार करायची अजून एक पद्धती म्हणजे 3D scanner वापरणे. आजमितीला
मायक्रोसॉफ्ट व गूगल हे दोघेही आपापली सॉफ्टवेअर 3D scanner वापर सुलभ व्हावा अशा पद्धतीने सुधारण्याचा प्रयत्न करताहेत. नजीकच्या भविष्यकाळात smart phones मध्ये 3D scanner उपलब्ध असतील. असो.

तर एकदा का त्रिमितीय प्रतिकृती निर्माण झाली की त्यानंतर slicing ची प्रक्रिया होते - थोडक्यात त्या त्रिमितीय डिझाइनला क्षितीज समांतर पातळीत शेकडो / हजारो थरान्मध्ये विभाजित केले जाते आणि ही संपूर्ण माहिती (CAD फाइल च्या स्वरुपातली त्रिमितीय प्रतिकृती व  त्याच्या क्षितिजसमांतर पातळीवर विभाजित केलेले थर ) 3D printer कडे पाठवून मग त्रिमितीय छपाई केली जाते.

ही छपाई करण्यासाठी ३ प्रकारच्या पद्धती  प्रामुख्याने वापरल्या जातात - Selective Laser Sintering (SLS), Fused Deposition Modeling (FDM) आणि Stereolithography (SLA). (ही फारच जास्त तांत्रिक बाब आहे ज्यात मी फार खोलात शिरलो नाही.)

आणि अशा या त्रिमितीय छपाई च्या मदतीने जवळपास कुठच्याही आकाराची वस्तू छापली जाऊ शकते.

अशा या तंत्रज्ञानाचा वापर कृत्रिम अवयव बनवणारा (bio printing) उद्योग, अवकाश व हवाई संचारण उद्योग, मोटार उद्योग, विविध प्रकारचे उत्पादन उद्योग, पुरातत्व अवशेषांचं पुनर्निर्माण, बांधकाम उद्योग, करमणूक इत्यादी विविध क्षेत्रात व उद्योगात सुरू होतोय व होइल आणि अधिकाधिक वाढत्या प्रमाणावर होइल.

म्हणूनच जिथे 2013 साली जगभरातल्या 3D छपाई उद्योगाचं मूल्यांकन साधारण १९५०० कोटी रुपये एवढं होतं तिथे ते  2018 पर्यंत म्हणजे पुढच्या एखाद दीड वर्षात ८४५०० कोटी रुपये  एवढं तर या दशकपूर्तीपर्यंत (2020) ते १३५०००  कोटी रुपये एवढं वाढणं अपेक्षित आहे.

आपल्याला चक्रावून टाकेल असं हे तंत्रज्ञान हे तिसऱ्या औद्योगिक क्रांतीचा पाया ठरेल असे भविष्यवेधी प्रतिपादन करतात.

पण या अचंबित करणाऱ्या प्रगतीची नकारात्मक बाजू ही आहे की पारंपारिक पद्धतीने चालणाऱ्या ज्या ज्या उद्योगधंद्यात हे तंत्रज्ञान शिरेल तिथे बऱ्याच मोठ्या प्रमाणात बेकारी निर्माण होण्याची शक्यता आहे आणि वर दिलेली यादी पहाता जवळपास प्रत्येक उद्योगात हे तंत्रज्ञान शिरकाव करतंय.

दुसऱ्या औद्योगिक क्रांतीनंतर ही हा प्रश्न उभा राहिला. पण जस जशी वर्षं गेली तस तसं लोकांनी स्वत:ला नवीन परिस्थितीत काम करण्यायोग्य बनवलं, छोटे उद्योग सुरू केले आणि गाडी हळूहळू रुळावर आली. मात्र आताचा प्रश्न तंत्रज्ञानाच्या अत्याधुनिकतेमुळे व क्लिष्टतेमुळे अधिक गंभीर असू शकेल. त्यामुळे आधुनिक संगणकीय व तांत्रिक शिक्षण व ज्ञान अत्यावश्यक ठरणार आहे जर यात टिकायच असेल तर.

पण ते काहीही असलं तरी एक गोष्ट खरी की ही त्रिमितीय छपाई संपूर्ण मानवजातीच्या जीवनावर छाप - आणि ती देखील कायमची उमटवणारच.

-- मनिष मोहिले









Tuesday, May 16, 2017

डार्विन आणि आध्यात्मिक उत्क्रांतीवाद

डार्विन आणि आध्यात्मिक उत्क्रांतीवाद

गेल्या काही दिवसात मुकुंदानी टाकलेल्या पोस्टी एकत्र डोक्यात घोळत होत्या.
वेळीच संवेदना जागृत न झाल्यमुळे वादळात मेलेले पोपट आणि चौऱ्याऐंशी लक्ष योनींचं चक्र, आजकालचे आत्महत्यांचे वाढते प्रमाण इ; आणि एक अतिशय जंगली विचार (wild thought) डोक्यात आला.

डार्विनच्या उत्क्रांतीवादाच्या सिद्धांतानुसार, मनुष्यप्राणी हा जीवसाखळी व अन्नसाखळीतला सर्वात प्रगत व उच्च दुवा आहे. इतर सर्व प्राण्यांपेक्षा मनुष्यप्राणी कैक पटीनी बुद्धिवान, आत्यंतिक समाजशील, भाषेचा शोध लावून अतिशय परिणामकारक रित्या संवाद साधणारा, शास्त्रीय शोध लावून निसर्गाची गुपितं जाणून घेणारा, बऱ्याच बाबतीत स्वत:ला देव मानणारा.

अरे हो, देवावरून आठवलं - मनुष्याची धार्मिक आणि अध्यात्मिक प्रगतीचा उल्लेख राहूनच गेला की वर.

पण ह्या सगळ्या प्रगतीच्या पायऱ्या पार करताना मनुष्याला किंमत मोजावी लांगली - आपल्या संवेदन क्षमतेची. बऱ्याचदा आपण बघतो की प्राण्यांची संवेदनक्षमता आपल्यापेक्षा कैक पटीनी चांगली असते.

इतर प्राणी निसर्गाच्या जास्त जवळ असतात. ज्या नैसर्गिक परिस्थितीकीत ते असतात त्याची वाट लावण्याची अक्कल हुशारी त्यांच्याकडे नसते.  आपलं जीवन ते नैसर्गिक संवेदनांच्या जोरावर जगत असतात. संघर्ष असेल पण तक्रार करण्यासाठी लागणारं तुलनात्मक डोकं त्यांच्याकडे नसतं. साठवण करण्यासाठी शिकार करण्याची प्रवृत्ती नसते.  लढा देतात - इलाखा, मादी, पाणवठा यासाठी. पण एकास एक. उगीच एकाची भूक, प्यास, सत्तापिपासा, वासना भागवण्यासाठी सगळ्या दुनियेला वेठीला नाही धरत. पण हे नैसर्गिक संघर्ष वगळता प्राणी at ease & peace with self असतात. ते त्यांचं त्यांचं आयुष्यमान असतं त्याप्रमाणे जगतात. काही सेकंदांपासून ते दोन अडीचशे वर्षांपर्यंत. पण निसर्गचक्र म्हणून कुणाची शिकार होऊन आयुष्याची दोरी मध्येच नाही तुटली तर सहज जगतात आणि मरतात.

प्राणी जे करत नाहीत, नेमकं तेच सगळं माणूस करतो आणि मन:शांती गमावतो. मग त्याला अध्यात्म, ध्यानधारणा, ईश्वराशी एकरूपता वगैरे गोष्टी सुचायला लागतात.

म्हणजे आधी दूर जायचं आणि मग एकरूप व्हायचा प्रयत्न करायचा. मग आहे तेच आणि तसंच स्विकारून का नाही जगायचं ? पण नाही - शॉट लावायचे - स्वत:च्या नी दुनियेच्या डोक्याला.

आणि मग प्रवृत्तीप्रमाणे आत्महत्या करायची किंवा खून - सिंगल किंवा घाऊक. आणि म्हणे सर्वात उच्च व प्रगत दुवा.

तर या विचार मंथनाच्या पार्श्वभूमीवर माझ्या डोक्यात विचार आला तो हा की आध्यात्मिक उत्क्रांतीवादाच्या साखळीत माणूस एकदम सुरूवातीचा अप्रगत दुवा असावा. संवेदनांच्या सहाय्यानी निसर्गाच्या नियमाप्रमाणे जगणं शिकत शिकत वेगवेगळे प्राणी बनत अखेर आत्मा निसर्गशक्तीशी एकरुप होत असावा - सगळ्यात कमी आयुर्मर्यादा वाला.

त्यामुळे त्या चौऱ्याऐंशी लक्ष योनीन्मधला प्रवास आपल्याला वाटतो त्याच्या उलट असावा.

एक गोष्ट मात्र नक्की - ते पोपट ज्यांच्या संवेदना न जागल्यामुळे मृत्यूमुखी पडले त्यांचा प्रवास मानवयोनीकडे चालू असेल.

-- मनिष मोहिले 

Sunday, May 14, 2017

बहावा फुलतोच आहे.

बहावा

मला बहावा प्रचंड आवडतो. चैत्र वैशाखाच्या भाजून काढणाऱ्या ऊन्हात,  आपल्या अंगभर द्राक्षांच्या घोसासारखे पिवळ्या धम्मक फुलांचे घोस मिरवताना दिसतो - कुठल्याही रस्त्यावर. कुठल्याही वळणावर.

अहमदाबादला माझ्या ऑफीसला जायच्या रोजच्या रस्त्यावर तशी तर बरीच झाडं आहेत. मोठी, भरदार सावली देणारी. त्यात गुलमोहर पांगेरा अशीही झाडं आहेत ज्यांचा बहर सुद्धा या मोसमात ओसंडून जात असतो. पण बहावा तो बहावा. कमीत कमी चारेक जागी हा बहावा माझं लक्ष वेधून घेत उभा असतो - द्राक्षाच्या घोसांसारखे आपल्या पिवळ्या धम्मक फुलांचे घोस मिरवत.

चैत्र वैशाखाचे हे दोन महिने सोडले तर इतर महिन्यात त्याचं अस्तित्वही जाणवत नाही. पण या दोन महिन्यात - ठरवलं तरी त्याकडे दुर्लक्ष होऊ शकत नाही.

त्यातलं एक झाड तर मला विशेष आवडतं. तो रस्ताच सुरेख आहे. त्या संपूर्ण पट्ट्यात रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडं आहेत. उजव्या बाजूला एलिस ब्रिज जिमखाना आणि खादी भवनच्या लाल विटांच्या भिंतींनी आजूबाजूच्या हिरवाईच्या पार्श्वभूमीवर शोभून दिसणाऱ्या बैठ्या इमारती आहेत तर डावीकडे एका पाठोपाठ एक तीन पिढ्यांच्या प्रतिनिधी असल्यासारख्या दिसणाऱ्या तीन इमारती आहेत - एक जुन्या वाड्यासारखी इमारत जी एखाद्या आजोबांसारखी गोष्टीवेल्हाळ, आश्वासक आणि ममताळू वाटते तर दुसरी आहे एक टुमदार, दर्शनी षटकोनी असलेली, त्यावर षटकोनी आकारात लाल कौलांच्या छपरानी डौलदार दिसणारी, पुढे मागे छान हिरवळ असलेली बंगली - जणू घरातला कर्ता पुरूष आणि मग तारुण्याचं प्रतीक असलेली एक आधुनिक पद्धतीची इमारत. आणि ती बंगली आणि ती आधुनिक इमारत यांच्या मध्ये रस्त्यावर समोरच्या बाजूला आहे ते बहाव्याचं झाड.

रणरणत्या ऊन्हात सुद्धा आतून फुलून आल्यासारखं ते नुसतं बहरून डवरून आलेलं असतं - त्या पिवळ्या धम्मक फुलांच्या द्राक्षघोसांनी. इतकं की ना त्या झाडाच्या फांद्या दिसत ना पानं. फक्त फुलांचे घोस. बघणाऱ्याला मोहून टाकणारे. त्याची नजर बांधून ठेवणारे. स्वत:च्याच वजनानी खाली पडतील की काय असं वाटण्याइतके मोठे मोठे घोस लटकत असतात. आणि होतं ही तसंच जणू.
काही दिवस तो दृष्ट लागण्यासारखा बहर टिकतो आणि हळूहळू ते घोस खालून छोटे होत जातात. आणि मग काही दिवसांनी जवळपास काळ्या रंगाच्या वाटणाऱ्या फक्त फांद्या शिल्लक रहातात आणि शिल्लक रहातात त्याच रंगाच्या शेंगा. जणू पराकोटीच्या आसक्ती नंतर पराकोटीची विरक्ती यावी तसं अफलातून बहरानी फुलून आलेलं ते झाड ऊघडं बोडकं होतं - पानंसुद्धा रहात नाहीत. जणू पूर्णपणे नि:संग होऊन जातं; आणि मग एखाद आठवड्यानी परत एकदा ती पिवळी फुलं हळूहळू दिसू लागतात. आणि मग काहीच दिवसात परत एकदा ते झाड फुलून येतं - द्राक्षांच्या घोसासारख्या पिवळ्या धम्मक फुलांच्या घोसांनी आणि इंग्रजीतलं आपलं "Golden Shower Tree" हे नाव सार्थ करतं

पुन्हा एकदा पराकोटीचं आसक्त करणारं सौंदर्य. निसर्गाच्या अगाध शक्तीचं कौतुक वाटायला लावणारं सौंदर्य. तसेच ते पिवळे लांबडे पुष्पघोस आपली नजर खिळवून ठेवतात.
ते एकच झाड असं कमीत कमी दोनदा पूर्ण बहरून येऊन रितं होताना आणि परत बहरून येताना दिसतं - किंवा बाकीचीही झाडं फुलत असावीत दोनदा पण हे झाड जसं आनंद अनावर झाल्यासारखं फुलारून येतं तसे बाकीच्या झाडांचे अनावर बहर नसल्याने लक्षात येत नसतील.

त्या झाडाचं असं जणू स्वत:लाही विसरून पूर्णपणे बहरून येणं आणि रितं होणं हे मला प्रचंड आकर्षित करतं. वाटतं आपल्यात सुद्धा निसर्गाशी इतकं तादात्म्य साधणारी मनस्विता हवी - बहर आणि रितेपण सारख्याच उत्कटतेनी अनुभवू शकणारी.

या वर्षीचा दुसरूनचा बहर यायचाय अजून त्या झाडाचा. मी वाट बघतोय त्या दुसऱ्या बहराची. आणि माझ्या नेहमीच्या रस्त्यावरचे बाकी बहावे पण फुलतातच आहेत.

अहमदाबादच्या असह्य उन्हाळ्यातली ही माझ्या मनाला शांतवणारी ओॲसिस आहेत.

आता मी वाट बघतो उन्हाळ्याची कारण येणाऱ्या प्रत्येक उन्हाळ्यात बहावा फुलतोच आहे.

--  मनिष मोहिले.



ईतिकर्तव्यता

आज ब्रिज ऑन द रिव्हर क्वॉय बघितला. ॲकॅडमी ॲवॉर्ड विजेता गाजलेला चित्रपट. दुसऱ्या महायुद्धात जपान्यांना शरण याव्या लागलेल्या ब्रिटीश युद्धकैद्यांची एका छावणीतली ही कहाणी. जपानी छावणीप्रमुख कर्नल साटोचा हट्टी जुलूम आणि समोर आपल्या संपूर्ण पलटणीसहित युद्धकैदी बनलेल्या ब्रिटीश कर्नल निकोल्सन चा तत्वासाठीचा, सैन्याच्या नियमांच्या काटेकोर पालनासाठीचा लढा आणि त्या पार्श्वभूमीवर जपान्यांसाठी युद्धाच्या हालचालीच्या दृष्टीने अत्यावश्यक असलेली क्वॉय  नदीवरील पुलाची उभारणी. एक जरूर  पहावा असा चित्रपट.

पण मला जे सांगायचय ते या चित्रपटाविषयी नाही. चित्रपटाच्या शेवटी शेवटी कर्नल निकोल्सन च्या तोंडी एक संवाद आहे  त्या संवादाविषयी.

मावळत्या सूर्याकडे बघणाऱ्या, सैन्यात अठ्ठावीस वर्षं काढलेल्या कर्नल निकोल्सनला आयुष्याच्या मावळतीची जाणीव होते आणि त्यावेळी तो कर्नल साटोला बोलतो की तुम्ही आयुष्याला सुरूवात करता, तुम्ही जे काम निवडलं आहे ते काम करत रहाता ज्यात चांगले वाईट आनंदाचे दु:खाचे अनेक अनुभव घेत कित्येक वर्षं जातात आणि अचानक तुमच्या लक्षात येतं की तुम्ही सुरूवातीच्या जवळ नसून शेवटाच्या जवळ आहात.

अशा वेळी असा विचार येतो की मी आत्तापर्यंत केलेल्या कामामुळे त्या कामाच्या, माझ्या सहकाऱ्याच्या दृष्टीने किंवा त्याही पलीकडे जाऊन समाजाच्या दृष्टीने काही लक्षणीय फरक पडला का ? विशेषत: इतरांच्या कामाशी तुलना करता ? मला माहितीये की असा विचार करणं कदाचित योग्य नाही पण तरीही असा विचार आल्याखेरीज रहात नाही.

असा विचार आयुष्याच्या संध्याकाळी कदाचित प्रत्येकाच्या मनात येत असावा का ? असेल ही. पण मग किती जणांना या प्रश्नाचं होकारार्थी आणि समाधान देणारं उत्तर मिळत असेल ?

लौकिकार्थानी पहाता फारच थोड्या लोकांना असं म्हणता येत असेल की त्यांच्या कामामुळे इतरांच्या दृष्टीने लक्षणीय फरक पडला. बाकी अब्जावधी लोक साच्यातलं ठराविक आणि वर्ण्यविषय संदर्भात क्षुल्लक / अनुल्लेखनीय काम करणारे.

मग ह्या अब्जावधी लोकांनी जीवनाची इतिकर्तव्यता कशात समजायची ? तर अनेक वर्षं आपलं काम मनापासून आणि प्रामाणिकपणे करत रहाणे - नजरेसमोर असं कुठलंही सोनेरी रंगात चकाकणारं कौतुक शिखर नसताना हेच खूप थकवणारं काम आहे.

आपल्या व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्यात आपल्या सान्निध्यात येणाऱ्या वगवेगळ्या व्यक्तींसाठी आपण वेगवेगळ्या भूमिका बजावत असतो. या भूमिका योग्य पद्धतीने बजावणं - मग त्यामुळे इतरांसाठी लक्षणीय फरक पडत नसला तरी स्वत:ला सांभाळत नियोजित पथावर चालवताना आपल्या संपर्कात येणाऱ्या इतरांशी मदत, सहकार, धीर देणे, सह अनुभूती इ ची देवाण घेवाण करत छोट्या दैनंदिन समस्या - स्वत:च्या व इतरांच्या सोडवणं हे ही महत्वाचं.

म्हणजे अशी महत्वाकांक्षा धरूच नये का ? तसं नाही. पण तसा विचार करताना हे ही ध्यानात घ्यावं की संपूर्ण जगाला दिसेल असं उल्लेखनीय व समाजावर परिणाम करू शकेल असं काम करता येणं यासाठी तुमचा नैसर्गिक स्वभाव व गुण, तुमच्या आजूबाजूची परिस्थिती या व अशा बऱ्याच गोष्टी कारणीभूत असतात.

त्यामुळे असामान्य न होता जगणं हे ही कमी महत्वस्चं नाही. शेवटी जर तुम्ही जीवन सुंदर आहे असं म्हणू शकलात तर तुम्ही असामान्य, इतरांच्या दृष्टीने फरक पडणारं उल्लेखनीय काम केलंत किंवा नाहीत तरी मागं वळून पहाताना सुंदर दिसणाऱ्या तुमच्या आयुष्याची ईतिकर्तव्यता त्यातच आहे हा विश्वास ठेवा.

-- मनिष मोहिले 

Wednesday, May 10, 2017

निवृत्ती आयोजन

निवृत्ती - एक आयोजन

या पूर्वी एकदा मी या विषयावर कदाचित एक छोटंसं पोस्ट लिहीलं होतं पण आज थोडी सविस्तर चर्चा करण्याचा प्रयत्न आहे.

आजपासून सात आठ वर्षापूर्वी (मी तेव्हा ३७-३८ वर्षांचा असीन) मी निवृत्ती आयोजन ( Retirement Planning ) हा शब्द पहिल्यांदी ऐकला.  गुंतवणूक आयोजनाबद्दल मार्गदर्शन करू शकणाऱ्या योग्य व्यक्तीच्या शोधात होतो त्यावेळी. तेव्हा माझ्या मित्रानी मला ह्या व्यक्तीशी ओळख करून दिली ज्यानं स्वत:चा व्यवसाय Retirement Planner असा आहे असं सांगितलं. त्यावेळी त्यानं एक तासाभराचं presentation दिलं आणि गेली आठ वर्ष मी त्याच्याशी संलग्न आहे. गंमत म्हणजे ज्या मित्रानी आमची ओळख करून दिली तो मात्र अजून ही ह्यात पडलेला नाही. असो.

तर इतक्या वर्षातील आमच्या अनेक भेटी गाठी, त्या व्यक्तीनी दिलेली presentations, आयोजित केलेले seminars / workshops ह्यातून मला जे समजलं ते समोर मांडण्याचा हा प्रयत्न आहे.

निवृत्ती आयोजनाला सुरूवात करताना सर्वात आवश्यक आहे त्याबद्दलची डोळस जाणीव. आपण आपल्या रोजच्या व्यापात इतके गर्क असतो की दिवस किती पटापट जातात हे जाणवत असून आणि आपण बोलत असून सुद्धा निवृत्तीच्या संदर्भात आपण विचारच करत नाही.  पूर्वी एकत्रित कुटुंब पद्धतीत, काटकसरीच्या जीवनशैलीत जिथे एकविसाव्या वर्षापासून ते साठाव्या वर्षापर्यंतच्या नोकरीत चाळीस वर्ष कमाई आणि निवृत्तीनंतर साधारण दहा वर्षांचा आयुष्यावधी असा हिशोब होता त्याच्या जागी सव्वीस सत्तावीसाव्या वर्षी शिक्षण संपवून नोकरी / धंद्यास सुरूवात, प्रगत वैद्यकशास्त्रामुळे वाढलेलं आयुर्मान व त्यामुळे  निवृत्तीनंतर वीसेक वर्षाचा आयुष्यावधी आणि विभक्त कुटुंबपद्धती असा मोठा फरक आहे. चाळीस वर्षांच्या कमाईवर दहा वर्ष काढणं आणि तीस वर्षांच्या कमाईवर तुलनेनी अधिक खर्चिक वीस वर्षं काढणं यात दुसरी परिस्थिती अधिक कठीण आहे. त्यामुळे निवृत्ती आयोजनाचा विचार करणं आणि कमावत्या आयुष्याच्या शक्य तितक्या सुरूवातीस करणं हे फायदेशीर आहे.

ढोबळमानाने, निवृत्ती आयोजन करताना खालील बाबींचा विचार करायला हवा.

आर्थिक - सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे आर्थिक सुरक्षितता. भविष्यात आपण निवृत्त होऊ त्यावेळी एक निश्चित मासिक उत्पन्न नसताना सुद्धा आपल्याला  त्यावेळच्या बाजारभावांप्रमाणे, कमीत कमी आपली आजची जीवनशैली आणि जीवनमान सुलभ आणि सुखद पणे कसे टिकवता येतील हे आयोजन अत्यावश्यक आहे.

त्यासाठी सगळ्यात आवश्यक आहे आजच्या तारखेचा cashflow - उत्पन्नाची आवक जावक. दैनंदिन खर्च भागवल्यानंतर त्या cashflow मधील बचत क्षमतेचा अंदाज. त्यानंतर आपण आपल्या आयुष्याच्या कोणत्या टप्प्यावर आहोत त्याप्रमाणे अपेक्षित पडाव व त्याच्याशी निगडित अंदाजे खर्च - उदा. घर घेणे, गाडी घेणे, लग्न, मुलांचा जन्म, त्यांचं शिक्षण, वार्षिक सहली, मुलांची लग्न, आई वडिल अवलंबून असल्यास त्यांचं औषधपाणी आणि त्यानंतर स्वत:ची निवृत्ती आणि स्वत:च्या पश्चात जोडीदाराच्या उर्वरित आयुष्याची सोय.

या सर्व गोष्टी आणि महागाई दर व विविध प्रकारच्या गुंतवणूकींचा सरासरी परतफेड दर व साधारण आयुर्मर्यादा  लक्षात घेऊन, अपेक्षित पडावांसाठी वेळोवेळीच्या खर्चाची  तरतूद केल्यानंतर,  निवृत्तीनंतरच्या आयुष्यासाठी तेव्हाच्या बाजारभावाच्या संदर्भात कमीत कमी आत्ताच्या जीवनशैली व जीवनमाना प्रमाणे जगता येण्यासाठी किती गंगाजळी असायला हवी हे निश्चित करायला हवं. यासाठी साचेबंद आकडेमोड तक्ते असतात ज्यात आवश्यक माहिती भरली की ही गंगाजळी किती असायला हवी ते आपल्याला कळतं. त्या लक्ष्याच्या दिशेने पद्धतशीर  वाटचाल करणं ही या निवृत्ती आयोजनाची अंमलबजावणी.

यात सर्वात आवश्यक आहे पुरेसा आयुर्विमा जो अनपेक्षित धक्क्यांची काळजी घेऊ शकेल.  त्यानंतर लांब पल्ल्याचे (दीर्घ मुदतीसाठी) बचत आयोजन.

यात महत्वाची गोष्ट म्हणजे Debt आणि equity यातील समतोल - थोडक्यात गुंतवणूकीवरील निश्चित व अनिश्चित परतफेड यातील असा समतोल ज्यायोगे महागाईला मात देऊ शकणारी परतफेड मिळावी.

हे करताना महागाई दर आणि वेगवेगळ्या गुंतवणूक प्रकारांचे भूतकाळातील गुंतवणूक परतफेड दर आणि एकंदरीत अर्थव्यवस्थेच्या संदर्भात त्यांचे भविष्यातील अंदाजित अपेक्षित परतफेड दर यांचा अभ्यास करून गुंतवणूक करणं आवश्यक आहे. सुरूवातीच्या काळात जेव्हा अधिक धोका पत्करण्याची आपली क्षमता असते तेव्हा equity dominant गुंतवणूक आणि निवृत्तीच्या जवळ आल्यावर debt dominant गुंतवणूक हे एक ढोबळ सूत्र आहे.
यामध्ये Systematic Investment Plan (SIP) पद्धतशीर गुंतवणूक योजना हे एक चांगलं गुंतवणूक माध्यम आहे.

दुसरी तितकीच महत्वाची गोष्ट म्हणजे थोडा नफा किंवा तोटा दिसताच गुंतवणूक तोडणे हे अगदी चुकीचं आहे. पैसा जेवढा अधिक काळासाठी गुंतलेला राहील; तेवढा बाजाराच्या चढ उतार चक्राला निष्प्रभ करत, पैशाची चक्रवाढीची ताकद गुंतवलेला पैसा वाढवायला मदत करेल.

अर्थातच यात वेळोवेळी आपल्या एकंदर गुंतवणूकीचे अवलोकन करणे, बाजारस्थितीचे अवलोकन करणे व आवश्यक तिथे आपल्या गुंतवणूक आयोजनात फेरबदल करणे हे ओघानेच आले. यासाठी स्वत: नसल्यास एखाद्या जाणकार व विश्वासू अशा व्यावसायिक तज्ञ व्यक्तीचं मार्गदर्शन आवश्यक आहे - अशी व्यक्ती जी निव्वळ वेगवेगळ्या योजना तुम्हाला विकून स्वस्थ बसणार नाही तर वरील सर्व गोष्टींचा अभ्यास व विश्लेषण करून तुम्हाला योग्य सल्ला देइल व मार्गदर्शन करेल.

आपल्याला कदाचित नोकरदार, व्यावसायिक, उद्योजक व गुंतवणूकदार या चौकोनाबद्दल माहिती असेल. यातील सर्वात वरची पायरी गुंतवणूकदाराची जिथे गुंतवलेला पैसाच गुंतवणूकदारासाठी उत्पन्न मिळवतो. त्या पायरीवर पोचणे हे आपलं उद्दीष्ट असायला हवं आणि त्यासाठी जेवढ्या लवकर सुरूवात करू तेवढं उत्तम.

निवृत्ती काळातील समय नियोजन - निवृत्ती ही सुरक्षित असण्याबरोबरच समाधानी देखील असणं अतिशय गरजेचं आहे. समाधानी निवृत्तीचा विचार करताना नुसती आर्थिक बाजू सुरक्षित करून उपयोग नाही. आपला नोकरी /  व्यवसाय;  ज्यात दिवसातील जास्तीत जास्त वेळ जातो, ती गोष्ट दिनचर्येचा भाग नाही म्हटल्यावर जो भरपूर मोकळा वेळ आपल्याला मिळेल; त्याचा आपल्याला आनंद मिळेल, समाधान मिळेल अशा पद्धतीने व्यय करण्यासाठी काही छंद , एखादं हलकं फुलकं काम ( समाजपयोगी असल्यास उत्तम), समानशील व समवयस्क मित्रपरिवार असे विविध पर्याय उपलब्ध हवेत.  पर्यटन हा ही एक उत्तम पर्याय होऊ शकतो. या गोष्टीचा विचार अगदी सुरूवातीला नाही तरी निवृत्ती जवळ यायला लागल्यावर हवाच हवा.

आरोग्य - वरील सर्व आनंद अनुभवायचे असतील, आणि कष्टानी जमा केलेल्या गंगाजळीचा उपभोग घेत सुखी समाधानी व सुरक्षित निवृत्ती अनुभवायची  असेल तर मुळात आपलं आरोग्य चांगलं हवं. नाहीतर औषधपाण्यावरच पैसा आणि वेळ खर्च व्हायचा. त्यासाठी आत्तापासून आपली जीवनशैली अशी बनवायला हवी ज्यायोगे उतारवयात अनारोग्याची समस्या कमीत कमी भेडसावेल. चांगल्या दिनचर्येच्या सवयी शक्य तितक्या लवकर अंगी बाणवाव्यात आणि ही अशी गोष्ट आहे की जिचा फायदा आयुष्यभरासाठी आहे.

या सगळ्या आयोजनाबरोबरच आवश्यक आहे सर्व गुंतवणूकी, विमे, मालमत्ता ह्यांच्या व्यवस्थित नोंदी आणि आपल्या जोडीदाराला व वारसदाराला त्या नोंदींची माहिती असणं. आजकालच्या काळात कर्त्या पुरूषाबरोबरच गृहिणीला देखील याबाबत पूर्ण माहिती असणं गरजेचं आहे. कमावत्या स्त्रियांनी स्वत:च्या निवृत्तीचं आयोजन करणं हे देखील तितकंच गरजेचं आहे.

विशेषत: भारतासारख्या प्रचंड लोकसंख्येच्या देशात जिथे निवृत्तीपर सरकारी मदत (वैद्यकीय खर्च, निवृत्ती भत्ता) या गोष्टी फारच कमी लोकांपुरत्या उपलब्ध असतात तिथे तर निवृत्ती आयोजनाची विशेष गरज आहे.

-- मनिष मोहिले 

Monday, May 8, 2017

बिटकॉईन - समांतर / पर्यायी चलनव्यवस्था

बिटकॉईन - समांतर / पर्यायी चलनव्यवस्था

आठवड्या किंवा दोन आठवड्या पूर्वीच्या पेपरला बातमी होती - बिटकॉईन चा दर एका बिटकॉईनला बाराशे डॉलर्स इतका वाढला आहे.

बिटकॉईन - हे एक जागतिक अंकात्मक  व आभासी (कारण ते मूर्त स्वरुपात नाही तर फक्त अंकात्मक रुपातच आहे) चलन आहे ज्याचं नियंत्रण विकेंद्रीत आहे. तांत्रिक भाषेत बोलायचं तर बिटकॉईन हे क्रिप्टोग्राफी मधील हॅशींग या तंत्राचा वापर करून बनवलेलं (म्हणजे नक्की काय व कसं हे तज्ञ मंडळीच सांगू शकतील), जागतिक अंकात्मक (digital) आभासी चलन आहे  आणि त्यावर कोणा एका देशाचं अथवा संस्थेचं नियंत्रण नाही.

३ जानेवारी २००९ रोजी बिटकॉईन प्रथम निर्माण केले गेले. सातोशी नाकामोटो बिटकॉईनचा जनक. पण तो एक व्यक्ती आहे का काही लोकांचा गट आहे याबद्दल अजूनही खात्रीलायक बातमी नाही.

एखादं चलन कसं वापरलं जातं - तर त्या देशाचं सरकार रोखे छापून केंद्रीय बॅंकेकडे गहाण ठेवतं (सरकारी तिजोरीतील सोन्याचा साठा व स्थिर आंतरराष्ट्रीय चलनात सरकारी तिजोरीची शिल्लक हे तारण)  आणि त्या बदल्यात केंद्रीय बॅंक चलन छापून वितरण करते. हे चलन शेतकरी, उद्योजक, सेवा पुरवणारे याना मिळून ते त्याच्या मदतीने वस्तू तयार करून विकतात / सेवा विकतात आणि नफा कमावतात. या उत्पन्नातून सरकारला कर्जाची परतफेड होते, आयकर भरला जातो आणि तेवढ्या किमतीचे रोखे सरकार सोडवू शकते. चलनचक्र चालू राहतं.

यात दोन गोष्टी महत्वाच्या - (१) चलनाची किंमत शक्य तेवढी स्थिर राखणे आणि त्यासाठी सरकार स्थिर असणे व त्याही पेक्षा महत्वाचं म्हणजे सरकार बदललं तरी देशाची मूलभूत व व्यापक आर्थिक धोरणे स्थिर असणे आणि (२) चलन निर्मिती वर निश्चित नियंत्रण असणे (भरमसाठ चलन निर्मिती genuine / fake) झाली तर महागाई प्रमाणाबाहेर वाढून अर्थव्यवस्था कोलमडू शकते. (जसं पहिल्या महायुद्धानंतर १९२०-३० च्या दशकात जर्मनीत घडलं). या दोन गोष्टींवर जनतेचा त्या चलनावरचा विश्वास अवलंबून असतो आणि शेवटी कोणत्याही चलनाला तेवढीच किंमत असते जेवढा लोकांचा त्या चलनावरचा विश्वास. त्यामुळे या दोन गोष्टी अतिशय महत्वाच्या.

बिटकॉईन चलनाच्या संदर्भात देखील या गोष्टी महत्वाच्या ठरतात. पैकी चलननिर्मिती - सुरवातीला फक्त एका संगणकावर ही बिटकॉईन चलननिर्मिती झाली. सुरवातीला जगानी याकडे (तारण नसलेले चलन म्हणून) साशंकतेनी पाहिलं.
पण त्यामागचं अंकगणित तपासून ही विकेंद्रित अंकात्मक व आभासी चलनव्यवस्था शक्यतेच्या कोटीत बसतेसं दिसल्यावर त्याची स्वीकृती वाढत गेली.

आज एकापेक्षा अधिक संगणकांवर काही क्लिष्ट गणनविधी प्रक्रिया (complex algorithms) वापरून बिटकॉईन चलननिर्मिती होते. आजच्या तारखेला २१ दशलक्ष बिटकॉईन ही ह्या चलननिर्मितीसाठी वरची मर्यादा आहे. जर अधिक संगणक ह्या प्रक्रियेत सहभागी झाले तर गणनविधी प्रक्रिया अधिक क्लिष्ट बनवली जाते आणि संगणक कमी झाल्यास गणनविधी प्रक्रिया थोडी सोपी केली जाते आणि अशा पद्धतीने चलननिर्मितीचा वेग नियंत्रित केला जातो. ह्या निर्मिती प्रक्रियेला bitcoin mining अशी संज्ञा आहे. (हे तांत्रिकदृष्ट्या नक्की कसं होतं हे मला समजलेलं नाही. कोणाला अधिक माहिती असल्यास प्रकाश टाकावा).

तर अशा ह्या बिटकॉईन चलनातून peer to peer चलन हस्तांतरण होऊ शकतं जे वस्तू किंवा सेवेच्या बदल्यात असेल किंवा निव्वळ हस्तांतरण असेल. अशा प्रत्येक संगणकीय अंकात्मक (digital) व्यवहाराची एक नोंद होत असते आणि बिटकॉईन मध्ये व्यवहार करणाऱ्या सर्वाना ह्या नोंदी तपासता येऊ शकतात - सर्व उपभोक्त्यांच्या सामायिक हितसंबंधाना जोपासणे शक्य व्हावे यासाठी कोणा एकाकडे नियंत्रण नसते आणि सर्वजण "निर्धारित आचरणपद्धती" (protocol) चं पालन करतात.

आज बऱ्याच मोठ्या प्रमाणात बिटकॉईन ची उलाढाल होते आणि त्याची मागणी पुरवठ्यापेक्षा जास्त आहे आणि त्याचमुळे एका बिटकॉईन ची किंमत आज बाराशे डॉलर्स आहे.

मात्र या बाबतीत मला काही मूलभूत शंका / प्रश्न आहेत -

जागतिक विकेंद्रित अंकात्मक व आभासी चलन असलेल्या बिटकॉईनची किंमत अजूनही डॉलर्सच्या संदर्भात सांगितली जात असेल तर ही नवी चलनव्यवस्था आणि पारंपारिक चलनव्यवस्था एकमेकीना पूरक की स्पर्धक की पर्यायी ? आणि जर पारंपारिक चलनव्यवस्था राहणारच असेल तर बिटकॉईनची आवश्यकता काय ?

सोने अथवा स्थिर आंतरराष्ट्रीय चलन ह्यापैकी कुठल्याच तारणाचा पाठिंबा नसताना ही समांतर चलनव्यवस्था इतक्या मोठ्या प्रमाणावर स्विकारली जात असल्यामागचं तर्कशास्त्र काय ?

मात्र काहीही असलं तरी आज bitcoin is not only the next big thing but it is already in, in a big way and the way things look & experts feel, it is the future.

---- मनिष मोहिले

(टीप - वरील लेखात काही तृटी वा चूक असल्यास जाणकारांनी दृष्टोत्पत्तीस आणून द्यावी आणि ती सुधारणा केली जाईल. तसेच शक्य असल्यास उपस्थित केलेल्या शंकांचं निरसन करावं )

Sunday, May 7, 2017

जीवन - प्रेरणा ते अत्यानंद Life - Inspiration to Euphoria

जीवन - प्रेरणा ते अत्यानंद
Life - Inspiration to Euphoria

एका maternity home मध्ये बघितलेली एक चित्रसाखळी - गर्भाशयात जीवन निर्माण होण्यापासून ते बाळ जन्माला येइपर्यंतच्या महत्वाच्या अवस्था दाखवणारी.

संपूर्ण चित्रसाखळी एकाच महत्वाच्या मुद्द्यावर आधारित - जन्माला येणारा प्रत्येक जीव एकमेवाद्वितीय (masterpiece) आहे; आणि त्यातल्या प्रत्येक अवस्थेशी संबंधित एका "punchword" सहीत एक चित्र - भृणावस्थेपासून ते पूर्ण विकसित बाळा पर्यंत.

त्या संकल्पनेनी, त्यातील punchwords नी आणि त्यातील रंगसंगतीनी माझं लक्ष वेधून घेतलं.

पहिली अवस्था : - Inspiration (प्रेरणा) - ज्या अवस्थेला जीवांकुर निर्माण होतो. तेजस्वी पिवळ्या रंगाच्या गोलाकारात शुक्राणूच्या आकारातील लाल रंग ढुशी देतोय.

दुसरी अवस्था - Anxiety (अनामिक हुरहुर / अस्वस्थता) - जीवधारणा झाल्यानंतरची शारिरिक अस्वस्थता आणि मानसिक हुरहुर. त्या लाल पिवळ्या रंगाच्या मीलनातून बाहेर पडणारा एक पिवळसर केशरी रंगाचा फटकारा.

तिसरी अवस्था : - Hope (आशा / उमेद) - जन्माला येणाऱ्या नवीन जीवामुळे, आत्तापर्यंतच्या  फक्त नवरा बायको ह्या भूमिकेतून भावी मात्या पित्याच्या भूमिकेत होणाऱ्या प्रवेशामुळे, एक नवीन अंक जीवनात सुरू होत असल्यामुळे निर्माण होणारी आशा. लाल पिवळ्या रंगाबरोबर दाट हिरव्या रंगाचा कॅनव्हासवर प्रवेश. भरदार पर्णसंभाराचा आशादायी हिरवा रंग.

चवथी अवस्था :- Dream (स्वप्न) - येणाऱ्या जीवाबद्दल, त्यामुळे स्वत:च्या सर्जनाची फुंकर पडून परत नवीन झालेल्या आयुष्याबद्दल स्वप्नं. पिवळ्या, लाल आणि हिरव्या रंगांबरोबर आता निळा रंग अवतरतो. नवसर्जनाच्या आशेला स्वप्नांची निळाई देणारी अवस्था.

पाचवी अवस्था : - Comfort (आश्वासक आराम) - ही नवीन आशा आणि नवीन स्वप्न शक्य तितक्या सुलभपणे साकार व्हावीत यासाठी शारिरिक मानसिक दोन्ही पातळीवरचा आश्वासक आराम.
तो आराम दर्शविण्यासाठी कोवळ्या हिरवळीचा पोपटी रंग - नेत्रदर्शनातून मऊ मखमली स्पर्शाची जाणीव करून देणारा.

सहावी अवस्था : - Realization (जाणीव) - त्या गर्भावस्थेतील जीवाला झालेल्या जाणीवेतून होणारी हालचाल आणि त्याची बाहेर मातेला होणारी जाणीव - गुलाबी रंग - आशा, नाजूकपणा, कोवळेपणा ह्याचा निदर्शक.

सातवी अवस्था : - Bliss - (सुखानंद) - गर्भातील जीव, त्या जीवाचा होणारा विकास आणि त्या सगळ्या स्थित्यंतरातून जाताना मातेला मिळणारा आनंद. सुखकारक जांभळा रंग.

शेवटची अवस्था :- Euphoria (अत्यानंद) - पूर्ण विकसित झालेलं बाळ आणि त्याच्या जगात येण्यामुळे झालेला अत्यानंद. पिवळा, लाल, केशरी, हिरवा, निळा, पोपटी, गुलाबी, जांभळा - सर्व रंगछटाना सामावून घेत दाखवलेलं पूर्ण विकसित बाळ.

या सगळ्यात एक महत्वाचा मुद्दा - जन्मणारा प्रत्येक जीव हा एकमेवाद्वितीय (masterpiece) आहे.

मला अतिशय आवडली ही संपूर्ण साखळी, एकमेवाद्वितीयत्वाची संकल्पना आणि चित्रातील रंगसंगती आणि प्रत्येक अवस्थेशी निगडीत punchword.

पण त्याचबरोबर मनात हा ही विचार आला की जिथे जाणीवपूर्वक पालकत्व स्विकारण्याची विचारधारणा आहे, औत्सुक्य आणि सहआनंद आहे त्या संदर्भातच ही चित्रसाखळी आणि त्याचं अभिप्रेत असलेलं विश्लेषण महत्वाचं. जिथे नाईलाज, जबरदस्ती, "सह" चा अभाव असेल अशा परिस्थितीत काय ?

आणि जिथे पहिली आदर्श परिस्थिती आहे अशा ठिकाणी सुद्धा बाळ जन्माला आल्यानंतर ते खरोखर एकमेवाद्वितीय आहे, त्याला / तिला साच्यात न बसवता मूलभूत नैसर्गिक गुणाना खतपाणी घालून जाणीवपूर्वक संगोपन करण्याची दृष्टी किती पालकाना आहे ?

तो दृष्टीकोन ठेवला तर त्या जीवाला त्याच्या आयुष्यातील प्रत्येक महत्वाच्या टप्प्यावर प्रेरणा देणं, निर्माण होणारी अस्वस्थता / हुरहुर त्या मुला / मुलीला सहन करण्यासाठी मदत म्हणून आशावादी बनवणं, स्वप्नं बघायला शिकवणं आणि त्याच बरोबर ही जाणीव देणं की ही स्वप्नं सत्यात उतरवण्यासाठी त्याला / तिला स्वत: लक्ष्य ठरवणं - अशी लक्ष्यं की जी लौकिक यशापेक्षा आंतरिक समाधान आणि आनंद मिळवून देऊ शकतील - आणि ती लक्ष्यं गाठण्यासाठी स्वत:शी प्रामाणिक राहून निर्णय घेणं व प्रयत्न करणं आवश्यक आहे.

त्या प्रयत्नात त्या प्रवासात आनंद (bliss) शोधणं हे ही गरजेचं आहे.

आणि हे जमलं तर तो जीव खऱ्या अर्थानी एकमेवाद्वितीय masterpiece बनण्याची  अत्यानंदाची (euphoria) अवस्था (irrespective of materialistic gains) त्या मुला / मुलीला आणि जिवीत असल्यास पालकानाही अनुभवता येइल.

मला तरी त्या चित्रसाखळीत हा अर्थ उमजला.

-- मनिष मोहिले.