Tuesday, May 16, 2017

डार्विन आणि आध्यात्मिक उत्क्रांतीवाद

डार्विन आणि आध्यात्मिक उत्क्रांतीवाद

गेल्या काही दिवसात मुकुंदानी टाकलेल्या पोस्टी एकत्र डोक्यात घोळत होत्या.
वेळीच संवेदना जागृत न झाल्यमुळे वादळात मेलेले पोपट आणि चौऱ्याऐंशी लक्ष योनींचं चक्र, आजकालचे आत्महत्यांचे वाढते प्रमाण इ; आणि एक अतिशय जंगली विचार (wild thought) डोक्यात आला.

डार्विनच्या उत्क्रांतीवादाच्या सिद्धांतानुसार, मनुष्यप्राणी हा जीवसाखळी व अन्नसाखळीतला सर्वात प्रगत व उच्च दुवा आहे. इतर सर्व प्राण्यांपेक्षा मनुष्यप्राणी कैक पटीनी बुद्धिवान, आत्यंतिक समाजशील, भाषेचा शोध लावून अतिशय परिणामकारक रित्या संवाद साधणारा, शास्त्रीय शोध लावून निसर्गाची गुपितं जाणून घेणारा, बऱ्याच बाबतीत स्वत:ला देव मानणारा.

अरे हो, देवावरून आठवलं - मनुष्याची धार्मिक आणि अध्यात्मिक प्रगतीचा उल्लेख राहूनच गेला की वर.

पण ह्या सगळ्या प्रगतीच्या पायऱ्या पार करताना मनुष्याला किंमत मोजावी लांगली - आपल्या संवेदन क्षमतेची. बऱ्याचदा आपण बघतो की प्राण्यांची संवेदनक्षमता आपल्यापेक्षा कैक पटीनी चांगली असते.

इतर प्राणी निसर्गाच्या जास्त जवळ असतात. ज्या नैसर्गिक परिस्थितीकीत ते असतात त्याची वाट लावण्याची अक्कल हुशारी त्यांच्याकडे नसते.  आपलं जीवन ते नैसर्गिक संवेदनांच्या जोरावर जगत असतात. संघर्ष असेल पण तक्रार करण्यासाठी लागणारं तुलनात्मक डोकं त्यांच्याकडे नसतं. साठवण करण्यासाठी शिकार करण्याची प्रवृत्ती नसते.  लढा देतात - इलाखा, मादी, पाणवठा यासाठी. पण एकास एक. उगीच एकाची भूक, प्यास, सत्तापिपासा, वासना भागवण्यासाठी सगळ्या दुनियेला वेठीला नाही धरत. पण हे नैसर्गिक संघर्ष वगळता प्राणी at ease & peace with self असतात. ते त्यांचं त्यांचं आयुष्यमान असतं त्याप्रमाणे जगतात. काही सेकंदांपासून ते दोन अडीचशे वर्षांपर्यंत. पण निसर्गचक्र म्हणून कुणाची शिकार होऊन आयुष्याची दोरी मध्येच नाही तुटली तर सहज जगतात आणि मरतात.

प्राणी जे करत नाहीत, नेमकं तेच सगळं माणूस करतो आणि मन:शांती गमावतो. मग त्याला अध्यात्म, ध्यानधारणा, ईश्वराशी एकरूपता वगैरे गोष्टी सुचायला लागतात.

म्हणजे आधी दूर जायचं आणि मग एकरूप व्हायचा प्रयत्न करायचा. मग आहे तेच आणि तसंच स्विकारून का नाही जगायचं ? पण नाही - शॉट लावायचे - स्वत:च्या नी दुनियेच्या डोक्याला.

आणि मग प्रवृत्तीप्रमाणे आत्महत्या करायची किंवा खून - सिंगल किंवा घाऊक. आणि म्हणे सर्वात उच्च व प्रगत दुवा.

तर या विचार मंथनाच्या पार्श्वभूमीवर माझ्या डोक्यात विचार आला तो हा की आध्यात्मिक उत्क्रांतीवादाच्या साखळीत माणूस एकदम सुरूवातीचा अप्रगत दुवा असावा. संवेदनांच्या सहाय्यानी निसर्गाच्या नियमाप्रमाणे जगणं शिकत शिकत वेगवेगळे प्राणी बनत अखेर आत्मा निसर्गशक्तीशी एकरुप होत असावा - सगळ्यात कमी आयुर्मर्यादा वाला.

त्यामुळे त्या चौऱ्याऐंशी लक्ष योनीन्मधला प्रवास आपल्याला वाटतो त्याच्या उलट असावा.

एक गोष्ट मात्र नक्की - ते पोपट ज्यांच्या संवेदना न जागल्यामुळे मृत्यूमुखी पडले त्यांचा प्रवास मानवयोनीकडे चालू असेल.

-- मनिष मोहिले 

No comments:

Post a Comment