Wednesday, May 31, 2017

आजची मानसिकता - प्लॅस्टीक कोटेड गोंधळ

आजची मानसिकता  - प्लॅस्टीक कोटेड गोंधळ.

गेले दोन दिवस "निकाल" जाहीर होतायत आणि त्याचबरोबर कुठे कुठे निराशा पदरी पडल्याने किंवा त्याच्या भितीने उमलत्या वयाची तरुणाई, ऊमलण्या आधीच स्वत:ला खुडून टाकतीये.

पुस्तकी शिक्षण हे फक्त एक चांगली वैचारीक व माहितीधिष्ठीत बैठक बनण्यासाठी उपयुक्त ठरतं. त्यानंतर प्रत्यक्ष व्यावसायिक आयुष्यात उपलब्ध माहिती आपण कशी वापरतो (application of available information), आपली मेहनत करण्याची तयारी, सातत्य, लक्ष्यकेंद्री वृत्ती, नवीन कल्पना, नवीन तंत्रज्ञान माहीत करून घेऊन वापरणे व परिस्थितीनुरूप धोरण बदल करायची तयारी, आपली लोकांशी वागण्याची पद्धत, अपयश पचवून त्यातून शिकून पुढे सरकायची तयारी  या व अशा अनेक गोष्टींवर यशापयश अवलंबून असतं.
कित्येक प्रथितयश व्यक्तींना देखील आयुष्यात कधी ना कधी शैक्षणिक आयुष्यात अपयशाचा सामना करावा लागला आहे. माझ्या स्वत:च्या शाळेच्या बॅचमधील दोन उदाहरणं माझ्या समोर आहेत की शालेय जीवनात नापास होऊन वा साधारण गुण मिळून सुद्धा ह्या दोन्ही व्यक्ती आज यशस्वी व्यावसायिक आहेत - पहिला नंबर येणाऱ्या मुलांपेक्षा देखील अधिक यशस्वी.

पण आजकाल शैक्षणिक गुण, त्यासंबंधी वास्तव अवास्तव शक्याशक्यता यांचा विचार न करता केलेल्या अपेक्षा - मुलांच्या स्वत:च्या व पालकांच्या, तात्कालिक यशाची हाव, पाल्य व पालक यांच्यातील संवादाचा अभाव, आत्महत्या करून प्रश्न न सुटता आपल्या पालकांपुढे व कुटुंबापुढे वेगळेच भावनिक तसेच व्यावहारीक प्रश्न उभे राहतील ह्याची मुलाना नसलेली जाणीव, वा जाणीव असून ही समतोल विचार करण्याची अपात्रता  ह्या सगळ्यामुळे ह्या वाढत्या आत्महत्या दिसून येतात.

आता दोन वेगळेच विषय. रविवारी होऊन गेलेल्या मासिक पाळी स्वच्छता दिनाच्या निमित्ताने रेडीयो वर दिल्लीच्या सच्ची सहेली का अशा काही नावाने काम करणाऱ्या एका NGO चालिकेची मुलाखत होती. ही NGO मासिक पाळीबाबत त्या मुलीला सुजाण बनवणं, शास्त्रीय माहिती देणं, तिला त्याकडे बघण्याचा सुयोग्य दृष्टीकोन देणं, मुलीच्या कुटुंबातील इतराना देखील हे सर्व मार्गदर्शन देऊन त्यांना मासिक पाळी व त्या स्थितीतून जाणारी स्त्री हिच्याबद्दल संवेदनशील बनवणे हे काम प्रामुख्याने करते आणि ह्यात सगळ्या वर्गातील (आर्थिक / सामाजिक ) कुटुंबांचा समावेश होतो.

त्याच एक दोन दिवसात रेडीयोवर अशीही एक बातमी होती की आता लग्नाशी संबंधित एक नवीन crash course सुरू झाला आहे. पाठवणीच्या वेळी (बिदाई) व्यवस्थित रडायचं कसं ? म्हणजे मेक अप वगैरे खराब होणार नाही आणि तरीही रडणं genuine असेल.

ह्या तिन्ही गोष्टी बघता एक समाज म्हणून आपण कुठे तरी प्लॅस्टीक कोटेड झालोत असं वाटतं.
संवेदना, नाती गोती, आपुलकी, मैत्री, सकारात्मक दृष्टिकोन ह्या ज्या संवेदनशील मनानी टिपून घ्यायच्या गोष्टी आहेत त्या आपण टिपूच शकत नाही. पण त्याच्या ऐवजी आपण बाह्य देखावा, अपयशाचा बागुलबुवा, संवेदनहीनता या सगळ्याच्या जाळ्यात अडकून प्लॅस्टीक प्रमाणे मोडून पडतो किंवा जळून जाऊन polymer चा एक अर्थशून्य उपयोगशून्य गोळा बनून जातो.

ह्या जंजाळातून स्वच्छ विचार करून बाहेर निघणं आणि आपल्या मानसिकतेच्या संदर्भात प्राथमिकतांचा योग्य क्रम लावणं आणि त्या मानसिकतेवरचं प्लॅस्टीकचं आवरण काढून टाकणं ही आजच्या समाजाची (irrespective of generation) आत्यंतिक महत्वाची गरज आहे.

-- मनिष मोहिले

No comments:

Post a Comment