Sunday, May 14, 2017

ईतिकर्तव्यता

आज ब्रिज ऑन द रिव्हर क्वॉय बघितला. ॲकॅडमी ॲवॉर्ड विजेता गाजलेला चित्रपट. दुसऱ्या महायुद्धात जपान्यांना शरण याव्या लागलेल्या ब्रिटीश युद्धकैद्यांची एका छावणीतली ही कहाणी. जपानी छावणीप्रमुख कर्नल साटोचा हट्टी जुलूम आणि समोर आपल्या संपूर्ण पलटणीसहित युद्धकैदी बनलेल्या ब्रिटीश कर्नल निकोल्सन चा तत्वासाठीचा, सैन्याच्या नियमांच्या काटेकोर पालनासाठीचा लढा आणि त्या पार्श्वभूमीवर जपान्यांसाठी युद्धाच्या हालचालीच्या दृष्टीने अत्यावश्यक असलेली क्वॉय  नदीवरील पुलाची उभारणी. एक जरूर  पहावा असा चित्रपट.

पण मला जे सांगायचय ते या चित्रपटाविषयी नाही. चित्रपटाच्या शेवटी शेवटी कर्नल निकोल्सन च्या तोंडी एक संवाद आहे  त्या संवादाविषयी.

मावळत्या सूर्याकडे बघणाऱ्या, सैन्यात अठ्ठावीस वर्षं काढलेल्या कर्नल निकोल्सनला आयुष्याच्या मावळतीची जाणीव होते आणि त्यावेळी तो कर्नल साटोला बोलतो की तुम्ही आयुष्याला सुरूवात करता, तुम्ही जे काम निवडलं आहे ते काम करत रहाता ज्यात चांगले वाईट आनंदाचे दु:खाचे अनेक अनुभव घेत कित्येक वर्षं जातात आणि अचानक तुमच्या लक्षात येतं की तुम्ही सुरूवातीच्या जवळ नसून शेवटाच्या जवळ आहात.

अशा वेळी असा विचार येतो की मी आत्तापर्यंत केलेल्या कामामुळे त्या कामाच्या, माझ्या सहकाऱ्याच्या दृष्टीने किंवा त्याही पलीकडे जाऊन समाजाच्या दृष्टीने काही लक्षणीय फरक पडला का ? विशेषत: इतरांच्या कामाशी तुलना करता ? मला माहितीये की असा विचार करणं कदाचित योग्य नाही पण तरीही असा विचार आल्याखेरीज रहात नाही.

असा विचार आयुष्याच्या संध्याकाळी कदाचित प्रत्येकाच्या मनात येत असावा का ? असेल ही. पण मग किती जणांना या प्रश्नाचं होकारार्थी आणि समाधान देणारं उत्तर मिळत असेल ?

लौकिकार्थानी पहाता फारच थोड्या लोकांना असं म्हणता येत असेल की त्यांच्या कामामुळे इतरांच्या दृष्टीने लक्षणीय फरक पडला. बाकी अब्जावधी लोक साच्यातलं ठराविक आणि वर्ण्यविषय संदर्भात क्षुल्लक / अनुल्लेखनीय काम करणारे.

मग ह्या अब्जावधी लोकांनी जीवनाची इतिकर्तव्यता कशात समजायची ? तर अनेक वर्षं आपलं काम मनापासून आणि प्रामाणिकपणे करत रहाणे - नजरेसमोर असं कुठलंही सोनेरी रंगात चकाकणारं कौतुक शिखर नसताना हेच खूप थकवणारं काम आहे.

आपल्या व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्यात आपल्या सान्निध्यात येणाऱ्या वगवेगळ्या व्यक्तींसाठी आपण वेगवेगळ्या भूमिका बजावत असतो. या भूमिका योग्य पद्धतीने बजावणं - मग त्यामुळे इतरांसाठी लक्षणीय फरक पडत नसला तरी स्वत:ला सांभाळत नियोजित पथावर चालवताना आपल्या संपर्कात येणाऱ्या इतरांशी मदत, सहकार, धीर देणे, सह अनुभूती इ ची देवाण घेवाण करत छोट्या दैनंदिन समस्या - स्वत:च्या व इतरांच्या सोडवणं हे ही महत्वाचं.

म्हणजे अशी महत्वाकांक्षा धरूच नये का ? तसं नाही. पण तसा विचार करताना हे ही ध्यानात घ्यावं की संपूर्ण जगाला दिसेल असं उल्लेखनीय व समाजावर परिणाम करू शकेल असं काम करता येणं यासाठी तुमचा नैसर्गिक स्वभाव व गुण, तुमच्या आजूबाजूची परिस्थिती या व अशा बऱ्याच गोष्टी कारणीभूत असतात.

त्यामुळे असामान्य न होता जगणं हे ही कमी महत्वस्चं नाही. शेवटी जर तुम्ही जीवन सुंदर आहे असं म्हणू शकलात तर तुम्ही असामान्य, इतरांच्या दृष्टीने फरक पडणारं उल्लेखनीय काम केलंत किंवा नाहीत तरी मागं वळून पहाताना सुंदर दिसणाऱ्या तुमच्या आयुष्याची ईतिकर्तव्यता त्यातच आहे हा विश्वास ठेवा.

-- मनिष मोहिले 

No comments:

Post a Comment