Friday, August 17, 2018

समस्यापूर्ती पर्व दुसरे - भाग ३

ओठात नाव ज्याचे श्वासासमान यावे
नात्यामध्ये असेही कोणीतरी असावे
*****************************

समस्यापूर्ती पर्व दुसरे - भाग ३

पहिला प्रयत्न
************
किर्ती, धन, प्रतिष्ठा; काही न आड यावे
कृष्णासमान कोणी, मैत्रीतही असावे

गुरूदक्षिणा म्हणूनी, अंगठ्यास सहज अर्पावे
एकलव्यासमान कोणी, शिष्यांमध्ये असावे

निरपेक्ष प्रेम मनीचे, अद्वैत रुप व्हावे
राधेसमान कोणी, हृदयी असे वसावे

ओठात नाव ज्याचे श्वासासमान यावे
नात्यामध्ये असेही कोणीतरी असावे

------ © मनिष मोहिले
#######################

दुसरा प्रयत्न
***********

हातांनी ज्या घडविले, आधार तयांसी व्हावे
म्हाताऱ्या अधू नयनांना, तेज सार्थकतेचे द्यावे

ते प्रेम असे बहुरुपी, सहोदर कधी मित्र असावे
अन् नाते बंधुत्वाचे, जगी विशाल या पसरावे

डोळ्यात पाहता डोळे, शब्दांविण भाव कळावे
अलगूज मनीचे एका, मनी अलगद दुज्या झरावे

ह्या सुंदर नात्यांमधूनी, जगण्याचे शिल्प घडावे
प्रत्येकाने सखा कुणाचा वा सखी कुणाची व्हावे

ओठात नाव ज्याचे श्वासासमान यावे
नात्यामध्ये असेही कोणीतरी असावे

------ © मनिष मोहिले
#######################

Monday, August 13, 2018

तू भेटलीस आणि


Before you came, world was prose. Now, poetry is born.

या मूळ ओळींवरून -

रोज फुलं फुलतच असायची, तू भेटायच्या आधी सुद्धा
पण तू भेटलीस आणि; मी आतून उमलून आलो

रोज पहाट केशरी व्हायचीच, तू भेटायच्या आधी सुद्धा
पण तू भेटलीस आणि; मी प्राजक्ताचा सडा झालो

रोज संध्याकाळ रंगीत व्हायचीच, तू भेटायच्या आधी सुद्धा
पण तू भेटलीस आणि; मी शुक्राचा तारा झालो

दरवर्षी पाऊस पडायचाच, तू भेटायच्या आधी सुद्धा
पण तू भेटलीस आणि; मी स्वत:च श्रावण झालो

जगत होतोच मी गद्यातल्या उताऱ्यासारखा, तू भेटायच्या आधी सुद्धा
पण तू भेटलीस आणि; कविता बनून गेलं; माझं जगणं सुद्धा.

-- © मनिष मोहिले

Wednesday, July 25, 2018

चिरंतन सत्य - समस्यापूर्ती भाग ५

समस्यापूर्ती भाग ५

केव्हा हसणे, केव्हा रडणे,
कधी सोसणे कळा;
असा चालला ईथे सनातन
सृजनाचा सोहळा
***********************
माझी समस्यापूर्ती -

केव्हा हसणे, केव्हा रडणे,
कधी सोसणे कळा;
असा चालला ईथे सनातन
सृजनाचा सोहळा

केव्हा असणे, केव्हा नसणे
कधी दिसे चंद्रिका
टिपूर चांदणे पुनवेला
अवसेच्या लक्ष तारका

भरतीचे कधी आलिंगन
कधी पदस्पर्श ओहोटीचा (***)
असा धरेशी प्रीतखेळ हा
नित्य सागराचा

फुटती पाने कोवळी केव्हा
गळती येता 'जरा'
वसंतातूनी शिशिरी जाता
ऋतूचक्राचा फेरा

विलीन होइ अँकारी, ये
अँकारातून जन्मा
जीवा शिवाचे मीलन होता
मोक्ष मिळवितो आत्मा

( *** या कडव्यातली मूळ कल्पना बाबा आमटे यांची - भरतीच्या हातांनी मी जीवनाला आलिंगन देतो तर ओहोटीच्या हातांनी मी त्याला पदस्पर्श करतो - ज्वाला आणि फुले.
प्रीत ही बहुरुपी व बहुआयामी असते - म्हणून कधी आलिंगन तर कधी पदस्पर्श .)

-------- © मनिष मोहिले

Sunday, July 22, 2018

बोलावा विठ्ठल - जुलै २०१८ - अहमदाबाद चौथे वर्ष

बोलावा विठ्ठल - जुलै २०१८

पंचम निषाद प्रस्तुत "बोलावा विठ्ठल" चा
अहमदाबाद मधला चौथा प्रयोग काल २१ जुलै २०१८ रोजी  संपन्न झाला.

दरवर्षी प्रमाणेच अहमदाबादला उशीरापर्यंत हुलकावणी देत रहाणाऱ्या पर्जन्यराजाने दोन दिवसापासून अहमदाबादला मुक्काम ठोकला होता. जणू स्वत: पाऊस देखील बोलावा विठ्ठलच्या भक्तीरसपूर्ण संगीतात चिंब भिजण्याची वाट बघत थांबला होता.

आणि पर्जन्यराजाचे तसेच सर्वसामान्य रसिकांचे हे वाट पहाणे सार्थकी लागावे असाच हा कार्यक्रम झाला.

देवकी पंडीत, राहुल देशपांडे व आनंद भाटे यांच्या तप:सिद्ध गळ्यातून निघणाऱ्या सूरब्रह्मानी मिळणाऱ्या अलौकिक आनंदाचे वर्णन करायला नवीन शब्द, उपमा कुठून शोधून आणाव्या ? अप्रतिम, अद्भुत, अलौकिक - अभिजात शास्त्रीय संगीताच्या तप:पूत माध्यामातून दैदीप्यमान ऐश्वर्य भक्तीरसातून श्रोत्यांना लाभावे अशी ही कलासाधना - त्यात त्याना साथ करणारा, तितक्याच तोलामोलाचा वाद्यवृंद - संवादिनीवर आदित्य ओक, तबल्यावर प्रसाद पाध्ये, पखवाजवर सुखद मुंडे , बासरीवर वरद कथापूरकर आणि झांज व इतर सहाय्यक तालवाद्यांवर सचिन भांगरे  या सर्वानी मिळून मूर्तीमंत नादब्रह्माला सभागृहात पाचारण केले म्हटल्यास अतिशयोक्ती ठरू नये.

प्रत्येक गायकाने स्वत:च्या शैलीत सादर केलेले विविध अभंग आणि अप्रतिम वाद्यमेळ या साऱ्यातून या वर्षी एक रसिक म्हणून मिळणाऱ्या संगीतानंदाशिवाय मला एक माणूस म्हणून काय मिळालं - तर माझ्या अल्पमतीप्रमाणे एका  समान धाग्याचं आकलन / समज  - तोच धागा,  ज्या धाग्याने सर्व संतमंडळी देखील एकत्र ओवली गेली - ईश्वरावर असलेली आत्यंतिक भक्ती - जो ईश्वर सर्व संतांनी विठ्ठलाच्या  स्वरुपात बघितला आणि काल संगीताच्या माध्यमातून सर्व रसिकांच्या मनात भरून राहिला.

असा ईश्वर ज्याचा अंत व पार वेदांना देखील नाही लागला. सृष्टीच्या निर्मितीपासून अनेक शास्त्रीय व आध्यात्मिक अंगांचे रहस्य बुद्धीच्या अंगाने जाणून घेऊन ईश्वरप्राप्तीचा मार्ग दाखवणाऱ्या आणि निखळ बुद्धीचं प्रतीक मानल्या गेलेल्या वेदांच्याही आकलनापलीकडले हे निराकार आणि निर्गुण ईशतत्व संताना मात्र सहजप्राप्त झाले - इतके की त्या संतांसाठी त्या निराकार निर्गुण ईशतत्वाने पंढरीच्या विठ्ठलाच्या रुपात स्वत:स साकार केले. वरकरणी कटीवर हात ठेवून विटेवर मूक उभे रहातानाच ह्या कानड्याने कुणाची खीर चाखली, कुणाची गुरे राखली तर कुणासाठी राजदरबारी द्रव्याच्या राशी ओतून आपल्या भक्ताच्या भक्तीची आणि स्वत:च्या ऐश्वर्याची बूज राखली आणि मूक मूर्तीरुपातून साक्षात चैतन्य साकार केले. संतांच्या मनीचे हे साकार भावरूप आजही लाखो करोडो भक्तांसाठी शेवटचे विश्वासस्थळ आहे.

ज्ञानाची प्राप्ती हीच ईश्वरप्राप्ती असली आणि ज्ञान मिळवणे हा त्यासाठीचा ईश्वरानेच सांगितलेला मार्ग असला तरी त्या मार्गावर अनेक अडथळे आहेत - प्राप्त झालेल्या ज्ञानाला अंतिम ज्ञान समजण्याची चूक, ज्ञानमार्गावर प्राप्त झालेल्या सिद्धींमध्ये अडकून अंतिम साध्यापासून मार्गच्युत होण्याची शक्यता, निव्वळ चौकसपणात अडकून ईश्वरीय तत्वाबद्दलच  अविश्वास निर्माण होण्याची शक्यता - या व अशाच इतर अनेक अडथळ्यातून मार्ग काढत शेवटपर्यंत चिकाटीने प्रयत्न करत राह्यलास या मार्गावर देखील ईश्वर भेटू शकतो.

पण संतांनी यापेक्षा सोपा मार्ग शोधला - भक्तीचा. त्या परम ईशतत्वाच्या चरणी अनन्यसाधारण भक्ती. आयुष्यातील सुख दु:ख अनुभवतानादेखील त्याच एका भक्तीच्या आणि विश्वासाच्या आधारावर सर्व प्रसंगातून पार पडण्यासाठी त्याच ईश्वरावर निखळ भक्ती ठेवत संतांनी ईश्वरप्राप्ती करून घेतली. अहं ब्रह्मास्मि हे ज्ञान या मार्गावर त्यांना सहजप्राप्त झाले - अशा रितीने की ते परब्रह्म स्वत: संतांच्या भक्तीमुळे त्यांना येऊन भेटले. आणि ईश्वरभेटीमुळे लाभलेल्या स्वाभाविक आत्मानंदातून लाभलेल्या ज्ञानाचा परिपाक म्हणजे हे परम ज्ञान, आत्मानंद स्वत:च्या मुक्तीपुरते मर्यादित न ठेवता अखिल मानवजातीच्या कल्याणासाठी संतांनी प्रयत्न केले - स्वत:च्या वागणूकीतून मार्गदर्शन केले, स्वत:ची भकीसाधना अभंगान्मधून सर्वसामान्य जनांपर्यंत पोहोचवण्याचा अथक उद्योग केला.

हे सगळं शक्य झालं कारण संत स्वत: त्या ईशतत्वाशी समरस झाले, एकरूप झाले; आणि ही समरसता / एकरूपता त्याना शक्य झाली कारण ते ईश्वराच्या चरणाशी समर्पित झाले होते - लक्ष्मी वल्लभा - सुख तुझे पायी, तेथेच आम्हा ठेव ही ती समर्पणाची भावना.

समर्पण असल्याखेरीज समरस होता येत नाही, एकरूप होता येत नाही. आणि तेच समर्पण असलं की अशी एकरूपता होते की वेगळं अस्तित्व ऊरत नाही.

हे आकलन, ही समज जेव्हा आपल्या  आचरणाचा एक भाग बनतात तेव्हा त्या भक्तीमार्गावर आपला प्रवास सुरू होतो -  त्या अंतिम सत्याप्रत पोहोचण्याचा.

ज्ञान अथवा भक्ती - मार्ग भिन्न आहेत - मुक्काम एकच आहे. पण भक्तीमार्ग अनुसरला तर अक्षरओळख नसली तरी निव्वळ भावाच्या जोरावर भवसागर तरून जाता येते - अशा ईश्वराप्रत ज्याचा अंत वा पार योग्य त्या भावाशिवाय प्रत्यक्ष वेदांनाही नाही कळला.

हे माझं भाग्य की एक रसिक आणि एक माणूस म्हणून प्रत्येकवेळी मला स्वत:ला समृद्ध व प्रगल्भ बनवणारा हा संगीतानुभव घेण्याची संधी मला सातत्याने तीन वर्ष मिळाली.

ही अशी श्रवणभक्ती हे कदाचित त्या परमात्म्याने आपल्यासाठी ठरवलेल्या मार्गावरचं एक पाऊल असू शकेल. ह्या पावलांची मजल वाढत जावो हीच त्या विठ्ठलाच्या चरणी प्रार्थना.

ठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल !!

------ © मनिष मोहिले

Friday, July 20, 2018

आषाढ

आषाढ

चैत्री फुलला बहावा
देइ मेघांस  सांगावा
सरे वैशाखवणवा
आणे आषाढ गारवा

आणे आषाढ गारवा
मनी झिरपे ताजवा
मृद्-गंधाचा गोडवा 
मना मनात रुजावा

मना मनात रुजावा
कोंब आशेचा हिरवा
कवी मनाच्या हृदयी
शब्दफुलोरा फुलावा

शब्दफुलोरा फुलावा
भक्तीभाव प्रकटावा
मुखी विठ्ठल बोलावा
मनी विठो विराजावा

मनी विठो विराजावा
कानी विठ्ठल गुंजावा
जागा नको दुजाभावा
जगी विठ्ठल दिसावा

जगी विठ्ठल दिसावा
डोळी आषाढ वर्षावा
मुक्त आनंद मिळावा
असा आषाढ सजावा

------ © मनिष मोहिले 

Wednesday, July 11, 2018

सदीयाँ

तू वह लम्हा है मेरा, जिसमें सारी सदीयाँ कैद हैं मेरी

यावरून सुचलेल्या काही ओळी --

तू वह इबादत हैं मेरी, जिसमें सारी खुदाई समायी हैं मेरी

तू वह नाजूक सुंदरसी हैं कली, जिसमे सारी बहारे खिलती हैं मेरी

तू गझल सुरीली वह मेरी, जिसमे दास्ताँ ए जिंदगी हैं मेरी

तू पलकोंपर सम्हाला वह आँसू, जिसमें सारी खुशियाँ झूमती हैं मेरी

तू वह साँस हैं मेरी, जिसमे सारी जिंदगी पलती हैं मेरी

------ © मनिष मोहिले








Monday, July 9, 2018

एकतारी - समस्यापूर्ती ४

समस्यापूर्ती ४
*************************
नको विठ्ठला त्या नगारे तुतारी
अभंगा पुरेशी असे एकतारी
*************************

नको विठ्ठला त्या नगारे तुतारी
अभंगा पुरेशी असे एकतारी

तुझ्या दर्शनाची विठू; आस एक ऊरी
देह संसारात परि; चित्त तुझ्या द्वारी

सगुण साकार तू वा; निर्गुण निराकारी
मला ना ते ठावे विठू; एक तू अंतरी

काम, क्रोध, माया आदी सहा रिपू भारी
विठू माऊली तू माझी; नेइ मज तारी

थकूनिया गेलो करूनी, देहांची ही वारी
रंगो तुझ्या रंगी रंगा; मुक्त आता करी

स्वार्थी असा मी रे विठो; स्वार्थच विचारी
दीन अनाथांचा जगी; कोण रे कैवारी ?

जात, पात, धर्म, वर्ण; भेदांची ही दरी
वाळवंटी गाडू देता; डोळा दिसे हरी

आषाढ आभाळी डोळी; आषाढाच्या सरी
चराचरी दिसता विठ्ठल; तीच मुक्ती खरी

नको विठ्ठला त्या नगारे तुतारी
अभंगा पुरेशी असे एकतारी

© ------ मनिष मोहिले

Monday, July 2, 2018

ऋतुगंध - समस्यापूर्ती ३

समस्यापूर्ती ३
***************************
पाहता ऋतुगंध कांती सांडलेली
पाखरांशी खेळ मी मांडून गावे
**************************

पाहता एकुटवाणा, मेघ नभी हा
बनूनी चातक, मी नभाला आळवावे

साद देती जलद आणि होई वर्षा
मयूर बनूनी, नृत्य मी मोदे करावे

दैवी ओजाचे धरेशी मीलन होता
जन्मतो ऋतुगंध, मी साक्षी असावे

पाहता ऋतुगंध कांती सांडलेली
पाखरांशी खेळ मी मांडून गावे

स्नान करुनी तृप्त होई अवनी जेव्हा
रंग बनूनी, सतरंगी मी; नभ रंगवावे

उदरी धरेच्या अंश रुजता पावसाचा
कोंब फोडून मी हवेवर थरथरावे

------ मनिष मोहिले

Tuesday, June 26, 2018

अंतिम सत्य

समस्यापूर्ती उपक्रम 2

हेच होते जाणले मी सत्य अंती
चार खांद्यांचा पुरा व्यवहार आहे

या पंक्तींची माझी समस्यापूर्ती अशी -


अपुरे पडे आकाश ; पिल्लांस पंख फुटता
थकलेल्या पंखांवरती, घरट्याचा भार आहे

शुद्धता सिद्ध केली; करुनिया अग्निदिव्या
धोब्यांनीच * परि हा; भरला समाज आहे

(* हा रामायणावर आधारित प्रसंगानुरूप योजलेला शब्द आहे. तो कुठल्याही अर्थाने जातीवाचक हेतूने वापरलेला नाही.)

उद्धरे जगास अवघ्या; पाजे गीतामृताला
त्याच्याही अंगठ्यात; पारध्याचा बाण आहे

हेच होते जाणले मी सत्य अंती
चार खांद्यांचा पुरा व्यवहार आहे

प्रत्येक वसंताचा शिशीरात अंत आहे
परि झडती पाने तेव्हा (च); पालवीला जागा आहे

---- © मनिष मोहिले

Monday, June 25, 2018

श्रावण

"रंग नवा मैत्रीचा" नावाच्या माझ्या एका व्हॉट्सॅप गृप मधील दोघा मैत्राना एका काव्यस्पर्धेत पारितोषिक मिळाले. दोघांच्याही कविता अप्रतिम होत्या.

त्यांच्या कविता वाचून असं लक्षात आलं की पहिल्या दोन काव्यपंक्ती सर्वांसाठी सारख्या असाव्यात.

माझा स्वभाव ग्रीष्माचा
तुझा श्रीमंत श्रावण

ह्या त्या ओळी.

ह्यावरून पुढील कविता प्रत्येकाने स्वतंत्रपणे रचायची होती. तर ह्या दोन ओळींवरून मला सुचलेली कविता --


माझा स्वभाव ग्रीष्माचा
तुझा श्रीमंत श्रावण
भस्मीभूत अनंगाला
पुनर्जन्माचं आंदण

माझा स्वभाव काटेरी
तुझा सुगंधी गुलाब
तुझ्या देखण्या रुपाचा
मिरवितो मी रुबाब

माझी रात अवसेची
तुझी पूनम रुपेरी
तुझ्या गळ्यात शोभती
माझ्या चवदा गं कोरी

माझा वैशाखवणवा
तुझी श्रावणाची वृष्टी
आलिंगता एकमेका
अवघी मोहरते सृष्टी

---- © मनिष मोहिले

Friday, June 22, 2018

राधा, कृष्ण, प्राजक्त आणि ग्रेस

ह्या लेखाच्या सुरूवातीलाच ग्रेसच्या अद्भुत काव्यपंक्ती व त्याचं तितकच अद्भुत रसग्रहण , जे व्हॉटसॅप वरती निनावी मिळालं ते तसेच्या तसे उद्धृत करत आहे कारण मला जे काही सुचलं त्याची प्रेरणा ह्या काव्यपंक्ती व हे रसग्रहण आहे.

मूळ काव्यपंक्ती व रसग्रहण जिथे पूर्ण झालय, तिथून पुढे परत माझे विचार आहेत.
---- मनिष मोहिले

***************************
मूळ काव्यपंक्ती व रसग्रहण

राधेस जो मिळाला तो एकटाच उरला!
स्वर्गातून आणलेला प्राजक्त सत्यभामेने
एकदा असाच बळजोरीने
आपल्या अंगणात लावून घेतला
जीवाला आलेलं पांगळेपण
हव्यासपूर्तीच्या कुबडीने सावरण्यासाठी
पण ते स्वर्गीय रोप देखील हिरीरीने फोफावले
आणि भिंतीवरून झुकून
रुक्मिणीच्याअंगणात फुले ढाळू लागले
सत्यभामेचा चडफङाट तर झालाच
पण रुक्मिणीलाही झाडाचे मूळ
मिळाले नाही ते नाहीच
स्वर्गीय वृक्षाच्या अवयवांचे पृथ्थकरण करून
कृष्णाने त्या पांगळ्या बायकांना एक खेळ देऊन टाकला
आणि स्वत: मोकळा झाला
प्रेमापेक्षा प्रेमाच्या खुणाच शिरोधार्य मानल्या दोघींनी
कृष्णाने हे पुरते ओळखले असणार
म्हणूनच त्याने या विकृत मत्सराचे प्रतीक अंगणात खोचून दिले!
राधेसाठी त्यानी असला वृक्ष कधीच आणला नसता
कारण राधा स्वत:च तर कृष्ण-कळी होती
तिचा बहर वेचलेल्या हातांनी तिलाच कसे श्रुंगारणार ?
तिच्या आत्मदंग बागेत प्रतीक-प्राजक्त कसे काय रुजणार?
कृष्णाने एक स्वर्गीय रोप लावले
आणि अष्टनाईकांच्याही पूर्वीची ती अल्लड पोरगी
राधा हीच शेवटी कृष्ण प्रीतीचे प्रतीक होऊन बसली
असतील लाख कृष्ण कालिंदीच्या तटाला
राधेस जो मिळाला तो एकटाच उरला!
- ग्रेस
****************************
****************************

ग्रेसच्या कवितेचे हे अचूक, वेचक, नेमके आणि तरीही अनंतार्थी शब्द आणि ह्या सुंदर काव्यपंक्तींचं इतकं सुरेख रसग्रहण - एक सुरेख साहित्यानुभव.

हे जितके वेळा वाचतो तितक्या वेळी राधा कृष्ण नात्याबद्दल काही नवीन उमगतं, आकळतं ; आणि त्याचवेळी मनात अनेक कल्पना शब्दरुप घ्यायला गर्दी करू लागतात.

हे असं बरेचदा घडलय. पण त्या कल्पना शब्दरुप घेऊन बाहेर पडू धजल्या नाहीत - दोन कारणानी असावं - एक तर प्रत्यक्ष ग्रेस च्या शब्दांसमोर आपले शब्द आणायचे - सामना वा तुलना ह्याचा प्रश्नच नाही. पण त्यांच्या काव्यपंक्तीपासून स्फूर्ती घेऊन आलेल्या माझ्या शब्दांच्या व कल्पनेच्या खुजेपणामुळे मूळ काव्यपंक्तीचं सौंदर्य शबलित होऊ नये ह्या इच्छेमुळे.
आणि दुसरं - मूळ काव्यपंक्तीसारखच सुंदर असलेल्या, अप्रतिम असलेल्या रसग्रहणाची देखील बूज राखली जायला हवी ह्या इच्छेमुळे.

पण आज शब्द इतके अनावर झाले की परवानगीवाचून बाहेर पडून कागदावर उतरले. तेव्हा ग्रेसच्या प्रतिभेला व कवितेला नमस्कार करून आणि त्यांची माफी मागून व वरील रसग्रहणाला नमस्कार करून माझे शब्द तुमच्यापुढे ठेवण्याचं औद्धत्य करतो.


असतील लाख कृष्ण कालिंदीच्या तटाला
राधेस जो मिळाला तो एकटाच उरला!
- ग्रेस
****

सत्यभामा अन् रुक्मिणी ; प्रिय दोघी जरी हरीला
अंतरीच्या सखा रुपाने , हरी राधेलाच गवसला

सतवी एक प्रश्न भार्याना, प्राजक्त कुणा लाभला
कान्हासंगे अद्वैत, मनी राधेच्याच बहरला

प्रेम एकाधिकारी नाही, हे नाते कथे जगाला
राधेला घ्या उमजूनी, तेव्हाच आकळे कान्हा

येती राधा नी कान्हा, हर एक क्षणी जन्माला
मी हरी ना ठावे मजला; परी माझ्या मनी तू राधा

--- मनिष मोहिले

तळटीप - रसग्रहण स्वत: ग्रेसचं आहे वा कुणा अज्ञात लेखक / लेखिकेचं हे दुर्दैवाने मला माहीत नाही. पण त्याचा आवर्जून सादर उल्लेख हवा म्हणून ही तळटीप.

Monday, March 26, 2018

अजून एक प्रेमकविता

दे सखे सोडून तू हे आरशाला मनविणे
दीदार खुद के हुस्न का, कर ले मेरी इन आँखोमें

गुच्छ पुष्पांचे सुगंधी, हार अपुली मानती
खूशबूसे साँसोंके तेरी, चाँदनी जो महकती

ओठ डाळिंबी तुझे हे, पाहूनी वाढे तृषा
चूमू इन्हें यह सोचकर, छाये शराबीसा नशा

नागिणीसम घेत वळसे, वेणी नितंबांवर डुले
घायाल होना तय है, कातिल; जुल्फें है या चाल है

बहरे तुझे यौवन सखे, लावण्य ह्र्दया मोहवे
छायी जो बाग ए बहार; मौसम नही; तेरा हुस्न है

------ मनिष मोहिले

Sunday, March 11, 2018

देवाजीची करणी

गेल्याच आठवड्यात सिक्कीम ट्रीप करून आलो. अप्रतिम निसर्गसौंदर्यानी नटलेल्या सिक्कीम मध्ये पाच सहा दिवस आम्ही फिरत होतो आणि दरक्षणी आम्ही त्या अप्रतिम निसर्गा समोर मनोमन विनम्र होत होतो. परतीच्या दिवशी निघताना सकाळी सकाळी चित्रीत केलेला हा व्हीडिओ म्हणजे सिक्कीमची आम्हाला जणू परतभेट होती.


त्या व्हीडिओत चित्रीत झालेला तो अनुपम नजारा बघून सुचलेली कविता खाली देत आहे.

देवाजीची करणी

धुक्यात ओल्या हरवून गेली; घरे छोटीशी इवली इवली
उचलून पाहती दुलई धुक्याची; बालरवीची किरणे इवली

झाडांच्या शेंड्यात अडकती; मेघ पांढरे, मऊ सावरी
अद्भुताचे दर्शन घडते;  स्वर्ग जणू अवतरे भूवरी

अंग झटकती, पंख पसरती; रानपाखरे इवली इवली
मंजुळ किलबिल त्यांची ऐकूनी; जणू पालवी फुटते इवली

वाहे नदीचे खळखळ पाणी; वारा गाई मधुर गाणी
मनास करते संमोहीत ही; देवाजीची अद्भुत करणी

------- मनिष मोहिले