Monday, December 14, 2020

एक ही ख्वाब क‌ई बार

 


फिल्मी रोमान्स म्हटला की आपल्या डोळ्यासमोर थेट टायटॅनिकमधले बोटीच्या अगदी टोकाशी हात पसरून ऊभे असलेले नायक नायिका येतात किंवा हिन्दी चित्रपटातली शिफ़ॉनच्या साडीतली मादक नायिका आणि टर्टलनेकचा फुल स्वेटर घातलेला नायक आणि पार्श्वभूमीला आल्प्स ची शुभ्रता हे येतं. ते दृश्य कितीही मोहून टाकणारं असलं, तरी हे स्वप्न सत्यात उतरणं कठीण आहे हे वास्तव, नजरेआड करता येत नाही.

पण चित्रपटातला असूनही सत्यात उतरण्याची शक्यता असलेला अतिशय तरल काव्यात्म रोमान्स बघायचा असेल तर किनारामधलं हे गाणंं ऐकायचं - एकही ख्वाब कई बार देखा हैं मैने. बघता आलं तर उत्तमच. मर्दानी देखणेपणाचं मूर्तीमंत उदाहरण धर्मेंद्र आणि गोड, काळजात गुदगुल्या करणारी हेमा ह्यांनी पडद्यावर साक्षात रोमान्स जिवंत केलाय.

पण निव्वळ गाणंं ऐकलं तरी एक अवर्णनीय अशी रोमँटीक अनुभूती आपल्याला होते हे गाणं ऐकताना. कारण ह्यातला रोमान्स सामान्यातल्या सामान्याला सुद्धा अनुभवता येण्यासारखा आहे. ह्या गीताचे शब्द, संगीत आणि गायकी तो अनुभव आपल्याला देण्यास समर्थ आहेत.

तो : एक ही ख़्वाब कई बार देखा है मैं ने
तूने साड़ी में उरस ली है मेरी; चाबियाँ घर की
और चली आयी है; बस यूँही, मेरा हाथ पकड़ कर
एक ही ख़्वाब कई बार ...

आजकालच्या उत्तान श्रुंगारयुगात हे चित्र थोडं मागासलेपणाचं वाटेल कदाचित. पण त्याची सखी त्याचा हात धरून, त्याच्या घराची स्वामिनी आणि जीवनसंगिनी बनून त्याच्या घरी येतेय, ही त्याच्या स्वप्नाची सुरूवात आहे. तिने तिच्या साडीला त्याच्या घराच्या चाव्या बांधल्या आहेत. किती अलवारपणे ही ओळ तिच्या ग्रुहस्वामिनी बनण्याची आणि त्या दोघांंच्या सहजीवनाची कल्पना श्रोत्यांना देते पहा.

मेज़ पर फूल सजाते हुए देखा है कई बार
और बिस्तर से कई बार जगाया है तुझको
चलते फिरते तेरे कदमों की वह आहट भी सुनी है
एक ही ख़्वाब कई बार ...

त्याची जीवनसंगिनी व् त्याची  ‌ग्रुहलक्ष्मी बनलेली ती मग त्याच्या स्वप्नात, घरात  रोज वावरताना त्याला दिसत रहाते, जाणवत रहाते - कधी मेजावरच्या फुलदाणीत फुलं सजवताना; तर कधी बिछान्यात निर्धास्त व् निरागस  झोपलेल्या तिला जागं करणारा तो आणि विश्वासाने झोपलेली ती; तर कधी तिच्या घरातील वावराची नुसती चाहूल येत रहाते. त्याला तिचा तो वावर, तिचं घर सजवणं; ते तसं विश्वासाने निजणं, ह्या गोष्टी एक अनामिक समाधान देत राहतात आणि त्यातून त्याची तिच्यावरची प्रीत मनात फुलारत रहाते, मनाचा कोपरा न् कोपरा सुगंधित करत रहाते.

तो : क्यों? चिट्ठी है या कविता?
ती : अभी तक तो कविता है

ती : ला ल ला ल ला

तो : गुनगुनाती हुई निकली है नहा कर जब भी
और? अपने भीगे हुए बालों से टपकता पानी
मेरे चेहरे पे छिटक देती है तू,टिकु की बच्ची;

एक ही ख़्वाब कई बार ...

सकाळच्या वेळी, रात्रीची धुंदी तनामनात साठवून आळसावत लोळत पडलेल्या त्याच्या चेहेऱ्यावर, न्हाऊन ताजी टवटवीत झालेली ती, आपलें ओले केस झटकून, त्याच्यावर पाण्याचे थेंब उडवून त्याला छेडत जागा करते आणि तो परत तिला खेचून मिठीत घ्यायच्या आत ती, त्याच्यापासून थोsss डीशी दूर पळते. कोणाही नवपरिणित जोडप्याच्या घरकुलातील हे दृश्य असू शकतं. ह्यात कामुकता आहे पण ती सभ्यतेच्या व् शालीनतेच्या मर्यादेत आहे. भडक, बीभत्स वा ऊच्छ्रुंखल नाही. त्यात एक गोडवा आहे जो त्या कामुकतेच्या आड असलेल्या सहवासाच्या गोडव्याला अधोरेखित करतो.

ताश के पत्तों पे, लड़ती है कभी कभी खेल में मुझसे
और कभी लड़ती भी है ऐसे के बस खेल रही है मुझसे
और आग़ोश में नन्हे को लिये

ती : Will you shut up?
दोघे : ला ल ल ला ...

हा सहवास व् त्या सहवासाची ओढ हे तर दांपत्यजीवनात अतिशय महत्वाचे. तो सहवास आणि एकमेकांना एकमेकांची होणारी सवय - दैनंदिन घटनांतून ती सवय वाढत जाते - कळत नकळत. छोट्या छोट्या गोष्टीतून. जशी पत्ते खेळताना होणारी खेळातली खरीखुरी पण निरागस तेव्हढ्यापुरतीच टिकणारी भांडणं. तर कधी सगळ्या संसाराला एक निरागस खेळाप्रमाणे बनवून नीरसता, तोचतोचपणा घालवणारी जणू खेळच अशी लटकी भांडणं - आणि ही खरीखोटी भांडणं भांडणारी ती. काय सहजतेनी काव्य बहरतय पहा.
म्हटलं तर एक संवाद, एक गद्य संवाद. म्हटलं तर एक कविता - त्या सहजीवनाचा आत्मा असलेल्या सहजतेला, प्रीतीला, प्रणयाला, खोडकर लटक्या भांडणाना नेमक्या शब्दांच्या कोन्दणात बसवणारी कविता - जी ह्या नात्याचा गाभा असलेल्या अलवारतेला, हळूवारपणाला जपते.

आणि मग त्या सहजीवनातला तो हवाहवासा वाटणारा व्रुद्धीचा टप्पा जिथे  दोघांचं विश्व तिघांचं होतं. आणि त्याच्या स्वप्नातसुद्धा ह्या टप्प्याच्या शक्यतेवर ती लाजते. काय अफलातून प्रणयरम्यता आहे. ते लाजणं आहे म्हणून नवजीवनाबद्दलची ती सूचना इतकी सुंदर वाटते. तिथे अपार्थिवाची जाण नकळत मनात आहे. स्रुजनाची सुन्दरता त्या लाजण्यामुळे आहे. (ते कालबाह्य होणं हा समाजाचा करंटेपणा आहे.)

तो: और जानती हो टिकु, जब तुम्हारा ये ख़्वाब देखा था,
अपने बिस्तर पे मैं उस वक़्त पड़ा जाग रहा था

आणि हा खास गुलज़ार टच. हे सगळं स्वप्न तो पहातोय त्याच्या बिछान्यात पडून उघड्या डोळ्यांनी. हे उघड्या डोळ्यानी बघितलेलं स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्याची त्याची मनिषा आहे.

तशी तर इतरही गाणी असतील तत्कालीन घरगुती वातावरणाच्या पार्श्वभूमीवर आधारित चित्रपटातून ज्यात सोज्वळ प्रणय दाखवला असेल. काव्य, संगीत सुरेख असतील.

पण जवळपास गद्य संवाद ह्या प्रकारात बसणारं हे काव्य. ते इतकं सहज आहे की ते कुणालाही सुचू शकतं. त्यासाठी शब्द नाहीत तर सन्वेदनशीलता हवी. मग ओठातून बाहेर पडणारं वाक्य आपोआप कविता बनत जातं. ही सहजता, आणि सन्वेदनशीलता ही ह्या गाण्याच्या गीतकाराची खासियत. ह्या साध्या शब्दातून तो एक अप्रतिम प्रणयरम्य स्वप्नचित्र उभं करतो जे वास्तववादी असूनही त्यातील स्वप्नीलता वास्तवाने शबलित होत नाही.

अशा ह्या साध्या, सहज शब्दातील अद्भुत् कवितेला, गीतात परिवर्तित करणारं संगीतदेखील तितकच साधं, सहज आणि म्हणूनच अद्भुत. जवळपास संपूर्ण गाण्यात संगीत म्हणून फक्त गिटार वापरलेली आहे. गिटारच्या तारांच्या खालच्या ते मधल्या पट्टीतील सुरावटी - कुणी हळूच गुणगुणत असावं अशा, ज्यांचंअस्तित्व वेगळं असं सांगितल्याखेरीज जाणवत नाही, पण त्या थांबल्या काही क्षण, की क्षणांपूर्वीचं त्यांचं अस्तित्व मनात जाग्रुत होतं.

त्या कवितेतील भावनांंप्रमाणेच हळूवार, शब्दांप्रमाणेच सहज आणि अंतरंगात प्रणयरम्यता असलेलं ते संगीत - फक्त एका वाद्यातून अकल्पनीयपणे अप्रतिम ध्वनीपरिणाम साधणारं. संगीतकाराची, गीतामधील शब्द, चित्रपटातील गीताची जागा व पार्श्वभूमी आणि गीताचा, कथेचा व पात्रांचा मूड ह्यांची एकत्रित समज; हे ह्या  गीताचं संगीत अद्भुत बनवतात. गुलज़ारच्या शब्दांच्या संवेदनशीलतेला पंचमचं संगीत आवाज देतं आणि भूपेंद्रच्या अप्रतिम भारदस्त आणि तरीही मखमली मुलायम गळ्यातून बाहेर पडत ते एका दैवी कलाक्रुतीला जन्म देतं.

हा खरा अजरामर रोमान्स. कारण, ह्या गीताचे शब्द, संगीत व आवाज ह्यांचा स्थायीभाव आहे तो स्वप्नील रोमान्स.

एक ही ख्वाब कई बार देखा हैं मैने.

-------- मनिष मोहिले

Friday, December 4, 2020

फिर से आइयो बदरा बिदेसी

 

फिरसे आइयो बदरा बिदेसी

नमकीन चित्रपटातील माझंं एक अतिशय आवडीचं गाणं. कदाचित राहपे राहते है किंवा आंकी चली बांकी चली चौरंगी में झांकी चली या अधिक प्रसिद्ध गाण्यांपेक्षा कमी प्रसिद्ध असलेलं. But it is one gem of a song.

ह्या गाण्याचे शब्द, संगीत, चित्रीकरण आणि पार्श्वगायन सगळं निव्वळ अफलातून. गुलज़ार, आर डी आणि आशा - ह्या जादूगार त्रयीची अजून एक अप्रतिम पेशकश की जी दरवेळी हे गाणं ऐकताना / बघताना मनावर एक जबरदस्त गारुड करून जाते.

चित्रपट बघितलेल्या मंडळींना गाण्याची पार्श्वभूमी माहीत असेलच. निमकी, मिठ्ठू आणि चिनकी ह्या तीन बहिणींपैकी मधली मिठ्ठू. मुकी असली तरी कल्पना आणि शब्द तिच्या सेवेत. तिच्या कवितांमधून ते जाणवतं. अशी ही मिठ्ठू ट्रक ड्रायव्हर जंगीच्या प्रेमात पडते. मुळात मुकी. त्यातून पहिलं वहिलं प्रेम. शिवाय प्रेमी पण असा की घर सोडाच, गाव देखील नसलेला. रस्त्यावर रहाणारा. त्याला आपल्याबद्दल काय वाटतं ह्याची पण तिला खात्री नाही. पण मिठ्ठू त्याच्या प्रेमात पडलेली.

अशा, गावातल्या मुलीच्या लेखणीतून  झरलेली कविता - तिच्या भावविश्वासारखीच तरल, ,तिच्या स्वभावासारखी साधी आणि गोड. गुलझारचे शब्द ही वैशिष्ट्ये सहज ओघातून आपल्यापर्यंत पोचवतात.

फिर से अइयो बदरा बिदेसी
तेरे पंखों पे मोती जड़ूँगी ।
भर के जइयो हमारी कलैया
मैं तलैया के नारे मिलूँगी ।
तुझे मेरे काले कमली वाले की सौं ।।

ट्रकबरोबर रस्त्यावर प्रवास करत जास्तीत जास्त जीवन व्यतीत करणाऱ्या आपल्या भटक्या प्रेमिकाला ती ढगांच्या रूपात बघते आणि धुकंं व ढगांनी भरलेल्या डोंगरातून फिरत त्या ढगाच्या रुपातल्या मनातल्या साजणाला मनीचं गूज ऐकवते.

वाऱ्याबरोबर रानोमाळ जगभर फिरणाऱ्या सजणा, परतून ये ना मला भेटायला. तुला जगभर घेऊन जाणाऱ्या तुझ्या पंखांना मोती जडवून सजवीन. मोती - आपल्या प्रीतीचे, माझ्या मनातल्या तुझ्यामाझ्या, आपल्या आठवणींचे. तू मला भेटायला ये. माझ्या मनगटात सौभाग्यचुडा भर तर मी तुला तलावाच्या काठी भेटेन. आपल्या संकेतस्थळी. बघ हं, नक्की ये. तुला काले कमलीवालेची - देवाची शपथ.

बघा तर किती तरल काव्य आहे हे. वाऱ्याबरोबर वाहू शकण्याइतक्या हलक्या ढगाला मोती चिकटवते ती. बहाणा सजवण्याचा. पण खरं तर ती त्याच्या हलक्या पंखांना जड करतेय. त्याच्या पंखांवर मोती जडवून. तिच्या आठवांचे, हळूच डोळ्यात तरळणाऱ्या आसवांचे मोती. तिच्या भोळ्या मनाला खात्री आहे की ह्यामुळे तिच्या सजणाच्या फिरतीचा वेग थोडा का होइना मंदावेल आणि तो अधिक थोडा वेळ तिच्या वाट्याला येईल. तळ्याकाठच्या संकेतस्थळी भेटून त्याने आपल्या हातात चुडा भरावा अशी तिची ईच्छा आहे. पण  तो येईल की नाही ह्याची खात्री नसते म्हणून ती त्याला देवाची शपथ घालते. इथे गुलझारच्या अद्भुत लेखणीची करामत दिसते. ही शपथ मिठ्ठू काले कमलीवाले की सौं म्हणून घालते. देव किंवा देवाशी एकरुप होण्याइतकी जवळ असलेली देवमाणसं - त्यांना काले कमलीवाले म्हणून संभोदलं जातं. कवितेचा आणि गाण्याचा बाज आणि ताल देखील किती छान जपला जातो ह्या शब्दरचनेतून.

तेरे जाने की रुत मैं जानती हूँ ।
मुड़ के आने की रीत है कि नहीं ?
हो~ काली दर्गाह से पूछूँगी जाके
तेरे मन में भी प्रीत है कि नहीं ?
कच्ची पुलिया से होके गुजरियो कच्ची पुलिया के नारे मिलूँगी..
तुझे मेरे काले कमली वाले की सौं ।।

तुझ्या कधीही निघून जायच्या सवयीची मला सवय आहे रे. पण तू परत नक्की कधी येणार हे काही मला कळत नाही. आता ज्या देवाची तुला शपथ घातली नं,त्या देवालाच आता दर्ग्यावर जाऊन विचारते, की तुझ्या मनात माझ्याबद्दल प्रीत तरी आहे की माझ्याच मनाचे खेळ आहेत. निदान ही खात्री करून द्यायला तरी लाकडी पुलाजवळ भेट. तुझी वाट बघत ऊभी, मी तुला तिथेच भेटीन. बघ हं, नक्की ये. तुला काले कमलीवालेची - देवाची शपथ.

तू जो रुक जाए मेरी अटरिया
मैं अटरिया पे झालर लगा दूँ
डालूँ चार ताबीज़ गले में
अपने काजल से बिंदिया लगा दूँ
छूके जइयो हमारी बगीची
मैं पीपल के आड़े मिलूँगी..
तुझे मेरे काले कमली वाले की सौं ।।

तू जर माझ्या छज्ज्यावर थांबलास ना घडीभर जरी, तर मी सगळा छज्जा श्रुंगारीन . तुला आणि आपल्या प्रेमाला कोणाची नजर लागू नये म्हणून तुला चार  तावीज बांधीन. तुला माझ्या काजळाचा टीका लावीन. माझ्या बागेत येऊन भेट. मी तुला तिथेच दिसीन - पींपळाच्या झाडाआड. बघ हं, नक्की ये. तुला काले कमलीवालेची - देवाची शपथ.

संपूर्ण गाण्यात ते ढग, धुकंं, त्या वातावरणातील प्रणयरम्यता एका वेगळ्या अपार्थिवशा जगातून आल्यासारखी जाणीव देत रहाते आणि मिठ्ठू बरोबर आपल्यालाही हूरहूर लावते.

पण गुलझारच्या लेखणीची ताकद ही की सर्वसाधारणपणे एक प्रीतीकाव्य असलेल्या ह्या गीतातून स्मरणरंजनाची देखील अनुभूती येऊ शकते - आयुष्याच्या गडबडीत मागे कुठेतरी राहून गेलेल्या छंदांच्या बाबतीत. ते छंद जोपासण्यात सोनेरी होऊन गेलेल्या दिवसांच्या बाबतीत.

बघा ना, रोजच्या आयुष्याच्या धकाधकीच्या धुक्यात फिरताना त्या छंदाची, आणि त्याला जोपासताना घालवलेल्या वेळाची, त्याच्याबरोबरच्या प्रेमाची सय येते आणि ही कविता तिथे पण चपखल बसून जाते.

फिरसे आइयो बदरा बिदेसी.

तो छंद, ती वेळा ह्यांनी परत यावे आयुष्यात. जुन्या आठवणींचे मोती लावून त्या वेळेला थोडीशी आपल्याबरोबर रहायला लावू. ते एका विवक्षित आठवणीचं संकेतस्थळ आहे तिथे नक्की भेटेल ती वेळ, तो छंद. शपथ आहे त्यांना आणि मलासुद्धा - काले कमलीवाले की सौं.

आयुष्यातून तो छंद , ती वेळ निघून गेले तो काळ, तो ऋतू आठवतोय, पण; त्यांच्या परत येण्याचा ऋतू असलाच तर मला माहीत नाही. मला जसं त्या गेलेल्या दिवसांबद्दल आणि त्या छंदांबद्दल वाटतं, त्यांना पण माझी आठवण येत असेल ? स्वत:च्या मनाच्या अलवार कप्प्यात जपलेल्या त्या कप्प्यापर्यन्त जाणाऱ्या कच्च्या पुलापाशीच भेट होईल कदाचित.
शपथ आहे काले कमलीवाले की सौं.

पुन्हा ते दिवस मिळाले तर मनाच्या सज्जाची आपसूकच सजावट होणार आहे. हो, फक्त ह्या पुनर्भेटीला नजर लागू नये म्हणून ताईत, तीट असं काहीतरी लावावं लागेल. मनातली ती स्मृतींची बाग अजून तशीच आहे आणि त्यातलं ते अश्वत्थाचं झाडसुद्धा. अश्वत्थ म्हणे अधिक प्राणवायू सोडतो वातावरणात. तो जास्तीचा प्राणवायू जिवंत  ठेवेल त्या सोनेरी दिवसांच्या आठवणींना. मी अजून तिथे उभा आहे त्या दिवसांची, छंदांची वाट बघत. त्यांना शपथ पण घातलीये. काले कमलीवालेकी सौं. स्वत:ला पण घातलेय ती शपथ मी. पण भेटतील का ते ?

ह्या धकाधकीच्या आणि संभ्रमाच्या धुक्यात फिरत मी हाक मारतोय - त्या बदरा बिदेसी छंदाला आणि वेळेला; आणि परत ये म्हणून आवतण देतोय

फिरसे आइयो बदरा बिदेसी ।

- - मनीष मोहिले

Wednesday, September 30, 2020

महाभारत - काही उत्तरे

विनीत, महाभारत - एक प्रश्नोपनिषद ह्या शीर्षकाखालील तुझ्या अभ्यासपूर्ण लेखात तू उभ्या केलेल्या प्रश्नांची उत्तरे  मी माझ्या अल्पमती व समजुतीनुसार देण्याचा प्रयत्न केला आहे.


महाभारत हा एक असा महाग्रंथ आहे जो कालातीत अशा स्वरुपात महर्षी व्यासांनी लिहीला आहे म्हणूनच स्थल, काल, देशमान ह्यात फरक होऊनही तात्विक दृष्ट्या महाभारतातील गुणावगुण आजही कार्यरत आहेत व विविध समांतर प्रसंगांसाठी कारणीभूत होण्यास विद्यमान असू शकतात. ह्या गुणावगुणांचं हे असं कालानुरूप थोडंफार बदलणारं पण मूलत: मानवी स्वभावविशेष असणारं रुप हे युगानुयुगं वेगवेगळ्या स्वरूपात महाभारत घडवू शकते ह्यातच महाभारताची कालातीतता आहे.


१ महाभारत हा दाजी पणशीकरांनी म्हटल्याप्रमाणे मूलत: एक सूडप्रवास आहे जो एक प्रकारे भीष्मांच्या प्रतिज्ञेपेक्षादेखील, त्या प्रतिज्ञेनंतरही कुरूकुलाचे संवर्धन व संरक्षण ह्याचं जे उत्तरदायित्व भीष्मानी स्वत:वर घेतलं होतं; त्यामधून जे अंबा, अंबिका, अंबालिका प्रकरण उद्भवलं त्यातील अंबेच्या सूडापासून सुरू झाला व अश्वत्थाम्याच्या सूडपूर्तीने मुख्य कथाप्रवाहापुरता अंतिम चरणावर पोचला. 

ह्या सूडास पुढे पार्श्वभूमी लाभली ती राज्यसत्ता हव्यासाची. द्रौपदीची द्यूतसभेतील विटंबना ही कामवासनेशी निगडीत नसून, जेत्याच्या राजसभेतील जित दासीचे स्थान अशा सत्तेचा दर्प असलेल्या भावनेशी निगडीत होती. (अर्थात त्यामुळे त्यातील भयानकता, संताप, विवशता व पुढील संहाराची नांदी ह्यांची व्याप्ती व खोली अजिबात कमी होत नाही). पण महाभारताच्या मूळाशी सूड व सत्तालोलुपता ह्याच दोन गोष्टी प्रामुख्याने दिसतात की ज्यानी पुढे अनेक प्रासंगिक विकृती / विसंगतीना जन्म देतात.


२ "अंध पित्याचे पुत्रही अंधच असतात" हे द्रौपदीच्या तोंडचे उद्गार स्वयंवराच्या वेळचे नसून राजसूय यज्ञाच्या वेळचे मयसभेतील आहेत. माझ्या मते मानवी मनोव्यापारास व्यास इथे सुरेखपणेउलगडून दाखवतात. दुर्योधनाने विकृत बुद्धीने खांडववन देऊन देखील आपल्या पतीनी (कृष्णाच्या मदतीने का होइना), तिथे हस्तिनापूरपेक्षाही सुंदर नगरी वसवून दाखवली ह्यातील अभिमानाचे द्रौपदीसारख्या रुपगर्वितेच्या मुखातून असे प्रगटन शक्य आहे आणि मुळातच अविचारी व पांडवद्वेषावरच ज्याचं संपूर्ण जीवन आधारलेलं आहे अशा दुर्योधनाच्या मनाचा पांडवद्वेषाचा पीळ ह्या अपमानकारक उद्गारान्मुळे अधिक घट्ट होणं हे स्वाभाविक आहे. भारतीय युद्ध हा भारतीय महाकाव्याचा शेवटचा सर्वाधिक नाट्यमय प्रसंग (Climax) आहे,ज्याचा build up, ज्याची त्या मुक्कामाकडची वाटचाल अशा छोट्या परंतू सशक्त प्रसंगातून व्यासांनी नक्की केली आहे.


३ लहानपणापासूनच भीमाने खेळाच्या नावाखाली चार चार पाच पाच दुर्योधनबंधूना पाण्याखाली गुदमरवून टाकण्याचे खेळ (???) अनेकदा खेळले होते. त्यामुळे भीमाच्या अचाट बलाबद्दल दुर्योधनासहीत प्रत्येक कौरवाच्या मनात भिती होतीच. शिवाय अर्जुनाचे धनुर्बल. अशा परिस्थितीत दुर्योधनाला नि:शंक विजयाची खात्री फक्त एकच योद्धा देऊ शकत होता - कवचकुंडलधारी कर्ण जो जन्मजात कवचकुंडलांमुळे अवध्य होता. शिवाय त्याचा पराक्रम निखळ व तावून सुलाखून निघालेला होता. कवचकुंडलांशिवायचा कर्ण देखील अशरण होता. खात्रीचा विजय देणारा कर्ण एकमेव हे माहीत असल्यानेच दुर्योधन त्याच्या हिमतीवरच आव्हान देऊ शकत होता. अन्यथा नाही.


४ महाभारतातील कहाण्यांचा आधार घेतला तर पाशुपतास्त्र प्राप्त करताना अर्जुनाने किरात रुपातील प्रत्यक्ष शंकराचा पराभव केला होता. उणीव अर्जुनाच्या पराक्रमात नव्हती तर ती त्याच्या वारंवार ढासळणाऱ्या मनाच्या उभारीत होती. त्यामुळेच, युद्ध सुरू व्हायच्या आधीच श्रीकृष्णाने मी हे महायुद्ध का पेटवतो आहे ही स्वत:ची भूमिका स्पष्ट करूनसुद्धा ऐनवेळी रणांगणात अर्जुनाने कच खाल्ली आणि कृष्णाला गीता सांगावी लागली. युद्ध संपून काही काळ उलटल्यावर अर्जुनास पुन्हा उपदेशाची गरज भासली. तोपर्यंत गीतेतील सटीक उपदेश पूर्ण लक्षात राहिला नव्हता. म्हणून अनुगीतेचा जन्म झाला. (हा भाग मलाही नवा आहे).


५ धर्माचे एकंदर व्यक्तिमत्त्व हे सामोपचाराने समस्या सोडवण्याकडे असायचे. द्यूत खेळताना एक राजा म्हणून द्यूताचे आमंत्रण स्विकारल्यावर शेवटपर्यंत निर्णायक द्यूत खेळणे हा धर्म त्याने निभावला. इतर भावांच्या पराक्रमावर धर्माच्या विवेकाचा अंकुश रहावा म्हणून कुंतीने फार पूर्वीपासून ही अट बाकी पांडवांना घातली होती की युधिष्ठिराच्या उजव्या पायाचा अंगठा वर उचललेला असेल तरच आक्रमण करायचं; अन्यथा नाही. ही अट द्यूतप्रसंगी पांडवांवर उलटली. शिवाय कितीही गुणसंपन्न व्यक्ती असली तरी एका अवगुणामुळे सर्वनाश ओढवू शकतो हे व्यासाना वाचकांच्या मनावर बिंबवायचे असावे आणि भारतीय युद्धाच्या कडे जी मार्गक्रमणा आहे ती नाट्यमय पद्धतीने चालू ठेवायची असावी.

बाकी संपूर्ण महाभारतात द्रौपदीवर सर्वाधिक प्रेम करणारा नवरा भीमच दाखवलेला आहे. त्यामुळेच अर्जुनाने पणात जिंकूनही द्रौपदी भावनिक दृष्ट्या भीमाच्या अधिक जवळ होती.


६ व ७ राज्यात वाटा मिळावा ह्या पांडवांच्या मागणीस उत्तर म्हणून प्रथम खांडववनाचे राज्य त्याना मिळाले. कृष्णाच्या संमतीने ते स्विकारल्यावर युद्धाची आवश्यकता नाहीशी झाली.

खांडववनाला जाळून इंद्रप्रस्थ निर्माण केल्यावर जेव्हा राजसूय यज्ञ पांडवांनी केला तेव्हा पण कौरवांबरोबर युद्धाची गरज नव्हती. आपल्या पूर्वजांचे मूळ सिंहासन असलेल्या हस्तिनापूरास पांडवांनी आक्रमणापासून दूर ठेवले. नंतर मग द्यूत, वनवास, अज्ञातवास हे सर्व प्रसंग आले आणि अज्ञातवासाच्या शेवटी पांडवांनी युद्ध करण्याचे नक्की केले.


८ द्रौपदीचा विवाह झाला आणि तत्कालीन परिस्थितीप्रमाणे तिचे भाग्य सासरशी जोडले गेले. अगदी आजही किती ठिकाणी ही मानसिकता दिसून येते. ह्यापलीकडे ह्यास दुसरे उत्तर नाही. कारण जर पांचालांनी द्रौपदीच्या अपमानाच्या या घटनात हस्तक्षेप करायचा ठरवलाच असता तर कौरवांच्याही आधी पांडवाना का बडवायला नको होते ह्याचे सन्युक्तिक उत्तर नाही.


९ कुंतीचा संघर्ष राज्यप्राप्तीचा नसून तिच्या संततीच्या औरस असण्याचा व त्यामुळे त्यांचा राज्यावरील हक्क मान्य व्हावा याबाबतचा होता. दैववशात्, हा हक्क मान्य केला जाण्याचा, युद्ध करून राज्य मिळवणे हा एकच मार्ग शिल्लक राहिला. मात्र, इतक्या दीर्घ शोकमग्न आयुष्यानंतर राज्य उपभोगण्याची लालसा शिल्लक रहाणे अशक्य होते. तरीही ती धृतराष्ट्र व गांधारी ह्यांच्यासोबत वनवासात गेली कारण शंभर अपत्य्यांच्या मृत्यूनंतर निपुत्रिक झालेल्या त्या दांपत्याचे दु:ख आपल्या दु:खापेक्षा तिला अधिक अवजड प्रतीत झाले.


१० शंभर कौरव असणे आणि त्यातील ९८ भावांना दुर्योधन व दु:शासन ह्या सत्ता हाती केंद्रीत करून घेतलेल्या दोन भावांशिवाय वेगळे अस्तित्व नसणे हा महाभारतातील महाकाव्याचा प्रतीकात्मक भाग वाटतो. दोन्ही माद्रेयाना देखील नाट्याच्या मध्यभागी स्थान नसण्यात हेच तर्कशास्त्र असावे की हा प्रामुख्याने कुंतीचा लढा होता, माद्रीचा नाही. तिने स्वत:पुरते आयुष्य संपवून तो संघर्ष मुळातच निपटला होता. कर्णाला जन्मत: सोडावे लागले ह्या चुकीचे अंशत: परिमार्जन कुंतीने नकुल सहदेवाना पोटच्या पोराप्रमाणे वागवून केले ह्या दुर्गाबाईंच्या वाक्यातून ह्यावर प्रकाश पडतो असं मला वाटतं.


११ महायुद्ध पेटवून काय मिळवले ह्या प्रश्नाचे उत्तर युगंधर मध्ये श्रीकृष्ण जी स्वत:ची युद्ध पेटवण्यामागची मनोभूमिका समजावतो त्यात स्पष्ट होते. द्रौपदीची विटंबना वा पांडवांवरील अन्याय ह्याचा प्रतिशोध, कृष्ण एकटा सुदर्शनाने कौरवाना वधून घेऊ शकला असता. पण मग त्या व्यक्तिनिष्ठ वा एक राजपदनिष्ठ समस्या बनून राहिल्या असत्या. एक युगांत आणि युगांतर होतानाची सत्, असत्, धर्म , अधर्म, योग्य, अयोग्य, ह्यांची संपूर्ण समाजव्यवस्थेच्या स्तरावरील निवड हे जे त्याचं स्वरूप होतं ते कधीच जगासमोर आलं नसतं आणि कलीयुगात आज दिसते त्याहीपेक्षा भयानक परिस्थिती प्रथमपासूनच सामोरे आली असती. म्हणून प्रश्नाची भव्यता जगाला कळण्यासाठी महायुद्धासारखं महाभव्य उत्तर कृष्णाला शोधावं लागलं. 


१२ ब्रह्मास्त्राला थांबवणे मर्त्य मानवाच्या शक्तीपलीकडचे होते त्यामुळे कृष्णाला स्वत:ला ते थांबवावे लागले. भीम प्रथमपासूनच परिणामांचा विचार न करता कृती करण्याबाबत प्रसिद्ध होता.


१४ रामायण हे निश्चितपणे स्त्रीबद्दलच्या मोहातून घडले तर महाभारत हे राज्यसत्तेच्या लालसेतून. हा फरक प्रथमपासूनच स्पष्ट आहे. द्रौपदीच्या विटंबनेमुळे नियतीचे आव्हान अधिक उग्र झाले इतकेच म्हणता येइल.


१५  हा हेतू अंशतः सफल झाला कारण कर्णाने कुंतीला स्वत: किंवा अर्जुन व इतर चार पांडव ह्यांच्या जिवीत रहाण्याविषयी अभय दिले.  अर्जुनाशी लढताना कर्णाकडून त्वेष, स्पर्धा ह्यात तडजोड होणे अशक्य होते कारण पुत्रवध, आयुष्यभराचा अवमान ह्यासोबत "नि:संशय सर्वश्रेष्ठ धनुर्धर कोण?" ह्या प्रश्नाचे उत्तरही दोघांच्या निर्णायक धनुर्युद्धावर अवलंबून होते. मात्र अर्जुन वगळता इतर कोणताही पांडव कर्णासमोर टिकणे अशक्य होते. त्यामुळे दोन भेटीतून चार पांडवांचे जीवनदान कर्णाने देणे हे ह्या भेटीन्मागचे अंशत: साफल्य म्हणायला हवे.


१६ दोन्ही प्रश्नांची उत्तरे होय अशी आहेत.


१७ कुंतीचा कर्णाची भेट घेण्याचा मुख्य हेतू त्यास युद्धापासून परावृत्त करणे हा होता ज्यायोगे युद्ध टळून तिला सहाही पुत्र लाभले असते. अर्जुनासहीत वा शिवाय पाच पुत्रांचे कर्णाने दिलेले जीवनदान हा मैत्रीला शेवटपर्यंत जागणाऱ्या कर्णाने सुचवलेला तोडगा आहे ज्यात मातेचा अपमानही टाळला गेला आहे.


१८ कृष्णावर १७ वेळा आक्रमण केले जरासंधाने. ह्यात जरासंध मथुरेवर चालून आल्यावर दरवेळी विजयी झाला असे नाही. खरं तर नाहीच झाला आणि म्हणून त्याला सतरा आक्रमणे करावी लागली.  जरासंधाचा हेतू मथुरा जिंकायचा नसून कृष्णाला पकडायचा / मारायचा होता - सासरा कंसाच्या वधाचा सूड म्हणून. आपल्याkमुळे मथुरेच्या प्रजेला दरवेळेस त्रास होतो तो टाळण्यासाठी शेवटी कृष्ण पश्चिम सागरकिनारी गेला व द्वारका वसवली. कालयवन हा आर्यावर्ताबाहेरील शासक. जशी जरासंधानी त्याची मदत घेतली कृष्णाने कालयवनाचा वध केला.


१९ हे उत्तर शोधावे लागेल.


२० महाभारत हे महाकाव्य आहे ज्यात साहित्यिक मूल्य ह्या दृष्टीने नाट्यनिर्मिती, संघर्ष, नीतीतत्वांबद्दलचे मूलभूत प्रश्न व त्यांचा उहापोह अध्याहृत आहे व त्यामुळे कथानकात असे धागे असणे संभवते. 


२१ सर्पकुळाचा प्रत्यक्ष नाश अर्जुनाने केला हे एक. दुसरं, यादवांचा निर्वंश गांधारीच्या शापाने होण्यात दाखविण्यात व्यासांनी एक वेगळा काव्यात्मक न्याय दाखवला असं म्हणता येइल.


२२ हा नियम असण्याइतका नियमित असावा असा प्रकार नव्हता. तत्कालीन राजकीय व सामाजिक परिस्थितीत स्वीकार्य अशा पद्धतीने पण जिंकून व हरण करून विवाह घडवणे व राज्याराज्यातील परस्पर राजकीय संबंधांच्या समस्या सोडवणे वा निर्माण करणे हे ह्या पद्धतीचे परिणाम होते.


२३ पुन्हा एकदा एक महाकाव्य, त्यातील नाट्यमूल्य, सुरूवातीपासून प्रतिशोधाने सुरू होणारी महाकथा सूडाच्या अंतिम चरणावर पोचणे ह्यासाठी आवश्यक व योग्य पार्श्वभूमी निर्मिती.


२४ स्वत:चा मृत्यू झाला तरी पांडवाना यशश्री मिळू देणार नाही व त्यानाही मृत्यूमुखी पडायला भाग पाडीन हा दुर्योधनाच्या द्वेषाचा पीळ होता. म्हणूनच चिरंजीव अश्वत्थाम्यावर त्याने पांडवांच्या निर्वंशाचे शेवटचे नीच कर्म सोपवले. दुर्योधनाच्या ह्या पीळामुळेच एक प्रकारे गोष्टी युद्धाच्या थरापर्यंत आल्या होत्या.


२५ कृष्णाच्या अवतारी असण्याच्या एका सोप्या गृहीतकाने ह्या प्रश्नाचे उत्तर मिळू शकते.


माझ्या अल्पमतीप्रमाणे जी उत्तरे मला सुचली व योग्य वाटली ती देण्याचा मी प्रयत्न केला.  हा वादविवाद नाही चर्चा असू शकते.


बाकी रामायण काय वा महाभारत काय - ह्या महाकाव्यांची कालातीतता नि:संशय आहेच आहे व देशकालमानाप्रमाणे बदलत्या परिस्थितीत ही महाकाव्ये नवीन प्रश्न जन्माला घालू शकतात व नवीन उत्तरे देखील शोधू शकतात.


---- मनिष मोहिले








Saturday, September 26, 2020

अतरापी

 अतरापी


अतरापी ह्या गुजराती शब्दाचा अर्थ आहे तिऱ्हाईत. धृव भट्ट ह्यांच्या मी वाचलेल्या चौथ्या कादंबरीचं हे शीर्षक ज्याचा मराठीत अनुवाद केलाय सुषमा शाळीग्राम ह्यांनी.


समुद्रान्तिके (सागरतीरी), तत्वमसि आणि अकूपार ह्या तीन कादंबऱ्या एकाच आकृतीबंधात आहेत. पण अतरापीचं तसं नाही. अतरापी ही एक स्वप्नरंजनात्म्क (fantasy) आकृतीबंधातील कादंबरी आहे. स्वप्नरंजनात्मक अशासाठी की ह्या कहाणीत माणसे व श्वान एकमेकांशी बोलून संवाद साधू शकतात. दोन श्वानबंधूंच्या ह्या कहाणीतून देखील , धृव भट्ट काही जबरदस्त विचार मांडून जातात.


एका श्रीमंत घरात पाळीव असलेल्या सद्भाविनी नावाच्या शुनी (श्वानचे हे स्त्रीलिंगी रुप मला अतरापी वाचूनच कळले). च्या पोटी दोन श्वानबालके जन्म घेतात. मोठा कौलेयक आणि धाकटा सारमेय. 


कौलेयक पहिल्यापासूनच आदर्श वर्तनाचा. आई, मालक, मालकीण ह्यांचे व मोठा झाल्यावर त्याचे श्वानप्रशिक्षक ह्या सर्वांच्या सूचनांचे तंतोतंत पालन करत ते देतील ते ज्ञान ग्रहण करत जातो. आपण जातिवंत श्वान आहोत हे त्याच्या मनावर जे लहानपणापासूनच बिंबवले गेले असते त्याप्रमाणे वागून आईला आपला अभिमान वाटेल व आपल्या इतर श्वानबंधूंसाठी आपण कार्य करू हे त्याने ठरवलेलेच असते. त्यानुसार प्रशिक्षकांकडून सगळे शिकून घेतल्यावर तो शहरातल्या मठीत एका आध्यात्मिक गुरूंच्या आश्रयास जाऊन साधक बनतो व तेथे देखील अमाप ज्ञान संपादन करतो. आपल्या श्वानबांधवाना ते ज्ञान देण्याचा प्रयत्न करतो की त्यांनादेखील आपल्यासारखे सन्मार्गावर, मोक्षाच्या मार्गावर चालण्यास योग्य बनवावे.


इकडे धाकटा सारमेय मात्र स्वत:तच मग्न असतो. आपण जन्मजात श्वान असल्यामुळे, ज्या गोष्टी नैसर्गिक प्रेरेणेने करू शकतो त्या प्रशिक्षकांकडून का शिकायच्या, कुंपणाच्या बाहेर का जायचे नाही, इतर कुत्र्यांशी का बोलायचे नाही, आपण जातिवंत श्वान आहोत आणि बाहेरचे इतर कुत्रे तसे नाहीत म्हणजे नक्की काय फरक आहे आपल्यात व त्यांच्यात - सारमेयाला पडणाऱ्या ह्या सर्व प्रश्नांची समाधानकारक उत्तरं ना त्याची आई सद्भाविनी देऊ शकत, ना कौलेयक, ना मालक व ना प्रशिक्षक. त्यामुळे या सर्वांच्या सूचना धाब्यावर बसवत सारमेय त्याच्या उनाडक्या चालू ठेवतो. ह्या सर्व मंडळीत अपवाद दोनच व्यक्ती - एक मालकीण की जी बाकी मंडळी कशाबद्दलही सारमेयला कितीही रागावली तरी स्वत: त्याला न रागावता त्याच्या कलाने वागायची. कुठल्याही सूचना न देता. दुसरा माळीदादा. सारमेयाच्या मस्तीमुळे अनेकदा त्याच्या वाफ्यांची व कुंड्यांची नासधूस होत असूनही, त्या वेळेला त्याला रागावणारा पण नंतर त्याला मायेने जवळ घेणारा माळीदादाच त्याला रोपांचा आवाज ऐकायला शिकवण्यात कारणीभूत होतो. इथून सारमेयाचं आयुष्य एक वेगळं वळण घेतं. तो घराबाहेर पडतो  आणि पूर्ण जीवन त्याचा प्रवास कौलेयकाच्या जीवनप्रवासाच्या विपरीत होत रहातो.


ह्या जीवनप्रवासात त्याला जीवनाबद्दल, स्वत:बद्दल, इतरांबद्दल, नात्यांबद्दल जी समज येत जाते ती समजच त्याला घडवत जाते. ह्या प्रवासात त्याला भेटतात शकू, सरमा नावाची शुनी आणि सरमा ज्या मेंढपाळाकडे असते असा मामदू. कुठलीही बंधनं वा विधीनिषेध - जोपर्यंत त्यातील तथ्य स्वबुद्धीला पटत नाही - न मानत जगलेलं सारमेयाचं आयुष्य कुठल्याही लौकिक साधनेशिवायच त्याला कौलेयकाच्याही पुढे घेऊन जातं जे स्वत: कौलेयकाच्या गुरूंचंही मत असतं. अशी काय समज येते सारमेयाला ?


स्वत:मधला स्व म्हणजे जन्माला येतानाचं नैसर्गिक स्वत्व जपावं.  निसर्ग आणि ईश्वर ह्यांच्या जवळ रहाण्यात मदत होते. लक्षात घ्या - जवळ जाण्यात नाही. जवळ रहाण्यात. कस्रण दूर गेलोच नाही तर जवळ जायची गरज काय ? 

प्राणी म्हणूनच प्रेरणा, संवेदना ह्यांच्या बळावर जगू शकतात. माणसाने भाषेचा शोध लावत संवाद वाढवला, साहित्य निर्माण केलं, कला जोपासल्या पण प्रेरणा व संवेदनांची किंमत मोजून.  म्हणूनच कुणालाही शिकवताना तो जसा आहे तसा त्याचा विकास होण्यात अडचण येत नाही इतकच पहावं. त्याला अमुक "बनवू" वा "करू" असा अभिनिवेश आला की शिक्षणाच्या हेतूचा तिथेच पराभव नक्की होतो.


नदी कधीच नसते. कारण एक क्षणापूर्वी पाहिलेली नदी दुसऱ्या क्षणी त्याच जागी नसून पुढे सरकलेली असते. जीवनाचंही तसंच आहे. ते एका क्षणापूर्वी होतं तसच दुसऱ्या क्षणी कधीच नसतं. जशी नदी शेवटी समुद्र बनते तसंच जीवनही जिथून आलं होतं त्याच उर्जास्त्रोतात विलीन होतं.


मंदीरातील सुवर्णपात्र चोरल्याचा खोटा संशय मामदूवर येऊन त्याला अटक करून पोलीस नेत असतात तेव्हा सरमाच्या आता तुम्हाला कुठे नेणार ह्या प्रश्नाला मामदूचं "मी कुठे जातोय वा मला नेतायत ? मी तर आहे तिथेच आहे - माझ्यात" ह्या उत्तरात एक फार मोठं सत्य सामावलेलं आहे.


आपण ज्याला सत्य समजतो ते जीवन हे कदाचित स्वप्न असेल आणि कुठेतरी दुसरीकडेच आपलं सत्य असेल जिथल्या झोपेत आपण हे स्वप्न पहात असू.


सारमेयाच्या जीवनप्रवासात त्याची संगिनी बनलेली व पिल्लांसाठी गुरूजींच्या आश्रमात शेती राखण करणारी सरमा, बंधनात न अडकता मुक्त रहाण्याची सारमेयाची प्रवृत्ती जाणून त्याला मुक्त करते. नात्यातून नाही तर नात्याच्या सारमेयाला वाटणाऱ्या बंधनातून. पुढे अंध झालेली सरमा मृत्यूसमयी गुरूजी व कौलेयकाला सांगते "सारमेयाला सांगा की अंधारच शाश्वत आहे कारण प्रकाशाप्रमाणे तो करावा लागत नाही. तो असतो. त्याला दूर करायला प्रकाश करावा लागतो. ह्या अंधारात मला मी दिसतेय. मीच सरमा आहे. मीच सारमेय. मीच कौलेयक आणि मीच गुरूजी आणि आता मीसुद्धा नाहीशी झाले." 


आणि शेवटी "ज्ञान एव बंधनम्" . ज्ञान म्हणजे बंधन. जाणीव, उमज आणि समज ह्या ज्ञान, माहिती ह्यापेक्षा मोलाच्या.  त्या सुटल्या की माहिती, ज्ञान, समज, उमज आणि जाणीव असा उलटा प्रवास करावा लागतो ज्यात ज्ञान हाच सगळ्यात मोठा अडथळा ठरतो कारण जाणीवेच्या पातळीवर जे सहजस्वीकार्य होतं अशा प्रत्येक गोष्टीसाठी ज्ञान पुरावा, सिद्धांत, तर्क मागत रहातं.


मात्र इतकी जबरदस्त जाणीव निर्माण करणारे जीवनानुभव घेणाऱ्या सारमेयाला देखील एक समज शेवटी मालकिणीकडून मिळते की पट्ट्याच्या बंधनातून मोकळं व्हायला पट्टा निघायची वा काढून टाकायची गरज नसते. थोडक्यात, बंधनातून सुटण्यासाठी, ते बंधन शारीर / भौतिक पातळीवर दूर व्हायला हवं असं नाही.


असे हे दोघे भाऊ आपापल्या नक्की केलेल्या मार्गाने प्रवास चालू ठेवत जीवनाच्या शेवटच्या टप्प्यावर येतात. कौलेयक, युधिष्ठीराबरोबर सदेह स्वर्गप्रवेश केलेल्या श्वानानंतर, आपल्या जीवनभराच्या साधनेच्या जोरावर असा सदेह स्वर्गप्रवेश करणारे पहिलेच श्वान बनू ह्या दृढ निश्चयाने स्वर्गाच्या दारापर्यंत पोचतो. पुढे काय होतं ? कौलेयकाचा सदेह स्वर्गप्रवेश होतो ? त्याला सारमेय तिथे भेटतो ?  सारमेयाचं शेवटी काय होतं ? ह्या सर्व प्रश्नांच्या उत्तरासाठी वाचायला हवी अतरापी.


वरवर पहाता स्वप्नरंजनात्मक आकृतीबंधातील ही कादंबरी एक रुपक आहे. मानवी जीवनाचं. मालकांसारखे कुत्र्याने मालकाचं ऐकायलाच हवं असा विचार करणारे म्हणजे प्रस्थापित समाजव्यवस्था जी प्रत्येकासाठी प्रगती, वाढ, विकास ह्याची एकच व्याख्या नक्की करत असते.  प्रशिक्षक हे प्रत्येक विद्यार्थी वेगळा असतो आणि नारळाच्या झाडाला आंबे येणार नाहीत ह्याची जाणीव नसलेली  व त्यामुळे नारळाला आंब्यात बदलायला बघणारी शिक्षणपद्धती. मालकीण व गुरूजी हे समाजातील ते घटक ज्याना प्रत्येक व्यक्ती एकमेवाद्वितीय आहे ही जाणीव आहे. शकू, सरमा ह्या आपापल्या मैत्री व जीवनसाथी भूमिकेत असूनही व्यक्तीस्वातंत्र्यावर आणि नाती मुक्त ठेवतात, बंधन वा भार देत नाहीत ह्यावर विश्वास असलेल्या व्यक्ती आहेत. स्वत: कौलेयक आणि सारमेय हे अनुक्रमे, समाजाने ठरवून दिलेल्या व्याख्येप्रमाणे जगणारा व त्यात जीवनाची इतिकार्तव्यता शोधणारा व समाजाच्या व्याख्यांनाच प्रतिप्रश्न करून त्यांची वैधता व योग्यता, सत्य पडताळणारा. स्वत:चं सारमेय हे स्वप्रवृत्तीशी निगडीत नाव सार्थ करणारा. 


एका वेगळ्या पद्धतीचं भटांचं हे पुस्तक आपल्याला सुरूवातीपासून शेवटपर्यंत सारमेयाच्या जीवनप्रवासात गुंतवून ठेवतं आणि असा विचार आल्याखेरीज रहात नाही की हा लेखक खरच किती out of the box पद्धतीचे विचार त्याच्या पुस्तकातून मांडतो जे वाचकाला विचार करायला लावतात आणि अंतर्मुख बनवतात. 


अतरापी बद्दल बोलायचं तर माणूसपण आणि त्या बरोबर मिळवलेलं ज्ञान, लावलेले शोध, विकसित केलेल्या कला, एका विवक्षित पातळीपर्यंत मिळवलेली निर्मात्याची भूमिका आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे एका संस्कृतीची निर्मिती हे सगळं जरी कौतुकास्पद असलं तरी एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी की संपूर्ण मानवजातीला आपण जन्म , धर्म, जीवनपद्धती, वर्ण, भौगोलिक परिस्थिती इत्यादीनुसार त्यांच्यातील समानता व विरोधाभास ह्याप्रमाणे त्यांचे वर्गीकरण केले तरी एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की प्रत्येकाची वाढ व विकास ही त्याच्या / तिच्या स्वभाव व स्वप्रवृत्तीनुसार होऊन वरीलपैकी कोणत्या वर्गात सामील व्हायचं किंवा कोणातच सामील न होता ॲकला चालो रे म्हणत स्वतंत्रपणे मार्ग काटायचा हे स्वातंत्र्य प्रत्येकाला हवं कारण जगात येताना व जगातून जाताना प्रत्येक जण एक तिऱ्हाईतच असतो. एक अतरापी.


---- मनिष मोहिले 


Monday, September 21, 2020

श्रीमद् भगवद्गीता - अध्याय २ - सांख्ययोग

अध्याय दुसरा - सांख्ययोग 


या अध्यायापासून भगवान श्रीकृष्णाचा अर्जुनाला जागृत करणारा उपदेश सुरू होतो. श्रीकृष्ण सुरूवातीलाच अर्जुनाला सांगतात की ज्यांना वधावे लागेल अशा भयाने तू युद्धापासून परावृत्त झाला आहेस असे तुझे सर्व आप्तेष्ट , गुरूजन, मी स्वत: आणि तू देखील आधी नव्हतो व नंतर नसू असे मुळीच नाही कारण तुला समोर दिसताहेत ती निव्वळ शरीरे आहेत. मात्र त्यांच्या आत वसत असणारा आत्मा अविनाशी आहे. त्याला जन्म नाही, मृत्यू नाही. तो एकदा उत्पन्न झाला म्हणजे परत उत्पन्न होत नाही. तो चिरंतन व सनातन आहे. ज्याप्रमाणे एका शरीरात वसणारा आत्मा शरीराच्या बाल्य, तारुण्य व वार्धक्य ह्या अवस्था पाहतो तोच आत्मा दुसरे शरीरही प्राप्त करून घेतो. असा हा आत्मा अव्यक्त, अचिंत्य, अवध्य, अशोच्य व विकाररहित आहे. त्यामुळेच स्वत:च्या मनातून मी कोणाचा  मृत्यू घडवण्यास कारणीभूत ठरू शकतो हा भ्रम काढून टाक. प्रत्येक जीव जन्मापूर्वी आणि मृत्यूनंतर अप्रकटच असतो. फक्त मध्ये थोडाकाळच तो प्रकट असतो.  थोडक्यात आत्मा हा नित्य आहे तर देह आणि त्याच्या इंद्रियांसमवेत जडलेले सुख दु:ख इत्यादी अनित्य आहेत.


आत्म्याच्या अमरत्वाचे, अविनाशीत्वाचे वर्णन केल्यानंतर पुढे जे श्लोक येतात ते आत्ममा व देह ह्यांच्यातील परस्पर संबंध उलगडून दाखवणारे गीतेतील काही सर्वाधिक प्रसिद्ध श्लोकांपैकी आहेत जसे - वासांसि जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोऽपराणि । तथा शरीराणि विहाय जीर्णान्यन्यानि संयाति नवानि देही ॥२-२२॥ आणि नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः । न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः ॥ २-२३ ॥

थोडक्यात काय तर आत्मा अविनाशी आहे. त्याला शस्त्र मारू शकत नाही. अग्नी जाळू शकत नाही, पाणी भिजवू शकत नाही वा वारा वाळवू शकत नाही. असा हा अविनाशी आत्मा, ज्याप्रमाणे मनुष्य वस्त्रे जुनी झाली की ती त्यागून नवी वस्त्रे धारण करतो त्याप्रमाणे आत्मा, शरीर जीर्ण झाले की जीर्ण शरीर त्यागून नवे शरीर धारण करतो. म्हणूनच जर तू असे मानीत असलास की आत्मादेखील मरण पावू शकतो तर मग हेही तू लक्षात ठेव की जो मृत्यू पावला तो जन्माला येणे निश्चित आहे आणि जो जन्माला आला त्याचा मृत्यू निश्चित आहे. तेव्हा आत्मा असो वा देह, तू कोणालाच (कोणाच्याही अस्तित्वाला) मारू शकत नाहीस.  हा शोक करणे म्हणूनच व्यर्थ आहे.

यानंतर श्रीकृष्ण धर्मानुसार युद्ध करणे हाच क्षत्रियाचा खरा धर्म असे सांगून अर्जुनाला म्हणतात की जर तू युद्धात मृत्यू पावलास तर तुला स्वर्गप्राप्ती होइल आणि जर तू जिंकलास तर पृथ्वीचे राज्य उपभोगशील. जर तू युद्ध टाळलेस तर तुझी अपकिर्ती होइल.  तुला भ्याड म्हटले जाईल आणि कोणाही मानी व्यक्तीस अपकिर्ती मरणापेक्षाही वाईट वाटते.


तेव्हा ज्या आत्म्याला मरण नाही, अथवा जो मृत्यू पावला तरी पुनश्च जन्माला येणार आहे असा अविनाशी व अवध्य आणि म्हणून अशोच्य आहे अशा आत्म्याला तू मारूच शकत नाहीस तेव्हा तुझ्या क्षात्रधर्माप्रमाणे युद्ध कर. 

सुख, दु:ख, जय, पराजय, फायदा तोटा ह्याबद्दल समभाव बाळगून युद्ध केलेस तर तुला पाप लागणार नाही.  अजून एक प्रसिद्ध श्लोक - सुखदुःखे समे कृत्वा लाभालाभौ जयाजयौ । ततो युद्धाय युज्यस्य नैवं पापमवाप्स्यसि ॥ २-३८ ॥


येथपर्यंत भगवान सांख्ययोग वा ज्ञानयोगाच्या सहाय्याने अर्जुनाला आत्मा व देह ह्यातील संबंध आणि आत्म्याच्या अविनाशी, अवध्य, अशोच्य, अव्यक्त, अचिंत्य, अविकार्य, नित्य व सनातन असण्याचे वर्णन करतात व नंतर कर्मयोगाकडे वळतात. कारण नैराश्य व कर्तव्यमूढता यामुळे अर्जुनाचे मन संन्यासमार्गाचा विचार करत होते. त्यामुळे त्या मार्गाप्रमाणे त्याच्या शंका संभ्रम ह्यांचे निरसन करणे योग्य ज्यासाठी सांख्ययोग सुयोग्य आहे. त्यानंतर परत जवळपास संपूर्ण गीतेत कर्मयोगाची उकल करण्याचे कारण असे की सांख्यमार्गानुसार आयुष्यात केव्हा ना केव्हा कर्माचा त्याग करून ज्ञानप्राप्ती आवश्यक असे प्रतिपादन आहे. मग अर्जुनाने त्याचक्षणी युद्ध सोडून संन्यास का घेऊ नये ह्याचे उत्तर सांख्ययोगातून देता येत नाही आणि भगवान,  गीता तर अर्जुनास युद्धास प्रवृत्त करण्यासाठी सांगत होते. म्हणून समभावाने आचरलेला कर्मयोग ज्यात जीवनातील भूमिकेस अभिप्रेत कर्तव्ये समभावाने करत राहूनही ज्ञानप्राप्ती होते त्या कर्मयोगाच्या आधारे भगवंत अर्जुनाच्या शंकांचे निरसन करतात.

(गीतारहस्यातील हा तर्क अगदी पटण्याजोगा. वास्तविक ह्याच प्रश्नामुळे - अमुक श्लोका पर्यंत सांख्य योग व त्यानंतर कर्मयोग असे का - माझा मी गीतेचा मराठी अनुवाद वाचताना अडलो. अडलो म्हणून गीतारहस्य वाचायला घेतला. त्यात हे तार्किक स्पष्टीकरण मिळाले. एक अनुपमेय ग्रंथ.)


आत्म्याचे अविनाशीत्व त्याच्या मनावर ठसवल्यावर भगवान कर्मयोगाकडे वळतात. सांख्ययोग व कर्मयोग ह्या दोहोंच्या मार्गे होणारी ब्रह्मज्ञानप्राप्ती जरी एकच असली तरी कर्मकाण्डे न करता वा स्वधर्मास (धर्म ह्याचा व्यापक अर्थ - स्वत:च्या स्वभाव, संस्कार आणि जीवनातील भूमिका ह्यास अपेक्षित सुयोग्य कृती व उक्ती म्हानजे धर्म) अपेक्षित कर्म समभावाने करत राहून जे ब्रह्मज्ञान प्राप्त होते तो मार्ग अधिक श्रेयस्कर आहे.

आधुनिक काळात ह्यातील धर्माप्रमाणे युद्ध कर हे कसे लागू होते ? तर जीवनात जी भूमिका आपण निभावतो आहोत त्यातील अभिप्रेत कर्तव्ये समभाव व निष्ठेने अशा रितीने पार पाडणे की संस्कार, मूल्य, जीवनाची वाढ व विकास ह्यास बाधा येणार नाही. ह्यात समभाव बाळगणे हा जो भाग आहे तो समभाव आपल्या ठायी निर्माण करण्यात आत्म्याच्या अविनाशीत्वाचे व नित्यत्वाचे ज्ञान आपणास आवश्यक ती वैचारिक व आध्यात्मिक बैठक पुरवू शकते.

कशी ? माझ्यापुरते ह्याचे उत्तर आहे ते असं की आपण दिवसभरात ज्या प्रार्थना करतो की मला आरोग्य, आयु, सुविचार व सद्बुद्धी दे ते आपण देहासाठी न मागता आपल्या आत्म्यासाठी मागावे. दररोज अशा पद्धतीने प्रार्थना केल्यास मनाच्या शक्तीमुळे आपण हळूहळू आत्म्याच्या उन्नयनाकडे वाटचाल सुरू करू शकतो. आधीच्या जन्मातील आपल्या कृतींप्रमाणे ठरलेले प्राक्तन, ह्या जन्मातील कृती व उक्ती ह्यांचे संचित व योग्य गुरूकडून मार्गदर्शन ह्याच्या योगे आपण वर उल्लेखलेला समत्वभाव आपल्या ठायी बाणवू शकतो. ह्या पूर्वतयारीखेरीज कर्मयोग आचरणात आणणे कठीण आहे.


येथून पुढे भगवंत सांगतात की सुख दु:ख, सिद्धी असिद्धी समान मानत मनुष्याने कर्तव्ये केली पाहीजेत. असा समभाव राखण्यासाठी कार्य-अकार्य, सत्-असत्, योग्य-अयोग्य, श्रेयस्कर-अश्रेयस्कर हे समजणारी जी बुद्धी ती बुद्धी स्थिर असायला हवी. स्थिर कशाठायी ? तर कर्मामुळे प्राप्त होणारे सुख दु:ख, त्रिगुणात्मक संसारासाठी आवश्यक कर्मे ही अनित्य असून सर्वव्यापी असा परमात्मा हा त्यापलीकडे आहे ह्या विचाराठायी स्थिर असणे.  त्रिगुणात्मक संसारातील कर्मे म्हणूनच योगक्षेमापुरती पार पाडावीत. बुद्धी त्या कर्मात वा त्याच्या परिणामात अडकता कामा नये. जिथे मनुष्याची बुद्धी अशी अडकते तिथे ती अस्थिर होते व तिला फाटे फुटतात. त्यामुळे जी कर्मे होतात ती सकाम कर्मे होतात जी सद्गती वा मोक्षाच्या मार्गातील अडथळा आहेत. पण स्थिर, निश्चयी बुद्धीने कामनारहीत कर्म करत राहिल्यास संसारात राहून संन्यास न घेताही मोक्षप्राप्ती मिळू शकते. एका नाही तरी अनेक जन्मातील समभावाने केलेल्या कर्मातून.

ह्यानंतर गीतेतील सर्वात प्रसिद्ध श्लोक येतो. अ. २ श्लो. ४७ 

कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन । मा कर्मफलहेतुर्भूर्मा ते सङ्गोऽस्त्वकर्मणि ॥ २-४७ ॥

ह्या श्लोकाचा सर्वमान्य अर्थ जो आपण सामान्यजन जाणतो तो असा  की तू (मानव) फक्त कर्म कर. फळाची आशा धरू नकोस. इतके म्हणून आपण म्हणतो की हाच निष्काम कर्मयोग. 

पण सामान्य व्यक्तीसाठी अशाप्रकारे फळाचा विचार न करता कर्म करणे कसे शक्य आहे ? कारण योगमार्गावर चालायचे एकमेव साधन देह. तो सुस्थितीत रहावा ह्यासाठी योगक्षेम कर्मही आवश्यक.  सांख्याप्रमाणे ज्ञानप्राप्तीसाठी कर्म त्यागावे लागते. मेळ कसा बसणार ? इथेच समत्वबुद्धी महत्वाची ठरते आणि ती कशी बाणवावी ह्याचे उत्तर ह्या श्लोकात आहे.


गीतारहस्यात लोकमान्यांनी स्पष्ट केल्याप्रमाणे या श्लोकात कर्मयोगाची चतू:सूत्री भगवंतांनी सांगितली आहे. ते म्हणतात हे अर्जुना,


१ तुला कर्म करण्याचाच अधिकार आहे.

२ कर्माच्या फलाचा अधिकार नाही.

३ त्यामुळे कर्म करताना तू फलाशा ठेऊ नकोस.

४ मात्र, त्याचबरोबर कर्म करण्याचे सोडू नकोस.


लोकमान्य म्हणतात की फलावर अधिकार नसणे व फलाशा न ठेवता कर्म करणे ह्याचा अर्थ असा नाही की फलाचा त्याग करावा. कर्म कर ह्याचा अर्थ असा नाही की फलाशा धर आणि फलाशा धरू नकोस ह्याचा अर्थ असा नाही की कर्म करणे सोड. फलाशा धरायची नाही पण कर्म करणे सोडायचे नाही. कारण फल मिळणे हे कर्माबरोबरच इतर अनेक गोष्टींवर अवलंबून असते ज्या गोष्टींवर कर्त्याचा ताबा नसतो. हा अर्थ सामान्यजनास कर्माचे फल प्रथम यत्नात मिळाले नाही तरी कर्म करण्यापासून परावृत्त न होता कर्म करत रहाण्यास उद्युक्त करतो. अर्थात त्यात फलाची आशा ठेवा असे सांगितलेले नाही. पान त्याचबरोबर मिळालेल्या फलाचा त्याग करा असेही सांगितलेले नाही. त्यामुळे फलाशा न ठेवता समत्वबुद्धीने कर्म करत राहिल्यास जे फल मिळते त्याचे उत्तरदायित्व कर्त्यावर येत नाही. थोडक्यात तो पाप वा पुण्याचा धनी होत नाही. कारण फलाशा नसलेल्या समत्वबुद्धीने ते कर्म केले आहे. म्हणूनच ही समत्वबुद्धी (येथे बुद्धी म्हणजे ज्ञान नव्हे) कर्मापेक्षा श्रेष्ठ.

असा समत्वबुद्धीने कर्मफलाशा त्यागून कर्म करणारा ज्ञानी पुरूष जन्मबंधनातून मुक्त होऊन, मोहापासून मुक्त होऊन  मोक्षपदास पोचतो. परमात्म्यात विलीन होतो.

यानंतर अर्जुन अशा स्थिरबुद्धी पुरूषाची लक्षणे विचारतो तेव्हा भगवान ५५ ते ७२ या श्लोकात स्थितप्रज्ञ व्यक्तीची लक्षणे सांगतात.


भगवंत म्हणतात की हे पार्था, जो मनुष्य कामनांपासून मुक्त होत आत्मा म्हणूनच आत्म्यातच संतुष्ट असतो तोच स्थितप्रज्ञ होय. जो सुखदुःखादी भावना आणि क्रोध, मोह, मत्सर, काम इत्यादीपासून मुक्त आहे तो स्थिरबुद्धी आहे. ही स्थिरबुद्धी प्राप्त होण्यासाठी मानवाने सर्व इंद्रियांवर ताबा ठेवत माझ्या आधारे ध्यानास बसावे. हा ताबा फक्त इंद्रियसहाय्याने विषयोपभोग थांबवण्यापुरता नसावा तर विषयांची आसक्ती / कामना ह्यापासून मुक्त व्हायला हवे. नाहीतर विषयसेवन नाही पण आसक्ती आहे असे झाल्यास ज्या विषयाची आसक्ती त्याची कामना. कामना पूर्ण न होण्यामुळे क्रोध. क्रोधामुळे अविचार व मूढता. मूढतेमुळे स्मरणशक्ती भ्रष्टता. त्यामुळे ज्ञाननाश व ज्ञाननाशामुळे अध:पात होतो. त्याला शांती मिळत नाही आणि त्यामुळे तो सुखी होऊ शकत नाही.

मात्र ज्याचा इंद्रिये व आसक्ती ह्या दोहोवर ताबा आहे असा साधक राग लोभ ह्याशिवाय इंद्रियानी विषयाचा उपभोग घेत असताही अंत:करणी प्रसन्न राहतो. त्यामुळे त्याची बुद्धी इतर सर्व गोष्टीतून निवृत्त होऊन परमात्म्यात स्थिर होते. थोडक्यात इंद्रिये व मनावर ताबा असलेला स्थिरबुद्धी असतो.

यानंतर अजून एक प्रसिद्ध श्लोक येतो.

या निशा सर्वभूतानां तस्यां जागर्ति संयमी । यस्यां जाग्रति भूतानि सा निशा पश्यतो मुनेः ॥ २-६९ ॥ 

सर्व प्राण्यांच्या दृष्टीने जी रात्रीसारखी असते, अशा नित्य ज्ञानस्वरूप परमानंदाच्या प्राप्तीत स्थितप्रज्ञ योगी जागतो आणि ज्या नाशिवंत सांसारिक सुखाच्या प्राप्तीत सर्व प्राणी जागतात, ती परमात्मतत्त्व जाणणाऱ्या मुनीसाठी रात्रीसारखी असते. ॥ २-६९ ॥

ज्याप्रमाणे सर्व नद्या समुद्रात सामील होतात पण समुद्र विचलीत होत नाही तद्वतच स्थितप्रज्ञ व ज्ञानी पुरूषात सर्व भोग सामावतात पण विकार उत्पन्न करू शकत नाहीत. जो पुरूष अशा प्रकारे कामना, मोह , अहंकार त्यागतो त्यालाच शांती मिळते आणि ब्रह्मज्ञान प्राप्त होऊन अखेरीस तो ब्रह्मात एकरुप होतो.


मी वर केलेल्या ह्या संपूर्ण विवेचनास लोकमान्यांनी गीतारहस्यात फार परिणामकारकपणे दोन शब्दात मांडून मग त्याचे विवेचन केले आहे. ते म्हणतात इंद्रियदमनाऐवजी जो इंद्रियसंयमन करू शकत तो खरा स्थितप्रज्ञ. कारण इंद्रियदमनात विषयोपभोग थांबतो पण विषयवासना निर्माण होणे थांबत नाही. तेच इंद्रियसंयमनामुळे विषयवासनेवर ताबा येतो आणि त्यामुळे कर्मानुरूप इंद्रियसंयोगाने विषयोपभोग घेऊनही मनुष्य त्यापासून नि:संग राहून बुद्धी स्थिर ठेऊ शकतो. असा मनुष्य मनाने विरक्त होऊनही कर्माने सक्रीय राहून लोककल्याणार्थ कार्य करू शकतो. सांख्ययोग्याप्रमाणे त्यास कर्म त्यागण्याची गरज पडत नाही. शेवटी जे ब्रह्मज्ञान सांख्ययोगमार्गावरील स्थितप्रज्ञास मिळते तेच कर्मयोगमार्गावरील स्थितप्रज्ञास मिळते. पण तो कर्म करत राहून ते प्राप्त करतो. त्यामुळे बुद्धी (समत्वबुद्धी) कर्मापेक्षा श्रेष्ठ असली तरी कर्मयोगी स्थितप्रज्ञ हा सांख्ययोगी स्थितप्रज्ञापेक्षा श्रेष्ठ वा श्रेयस्कर आहे. लोकमान्यांच्या मते स्थितप्रज्ञाची ही लक्षणे महत्वाची आहेत कारण तोच कर्मयोगाचा पाया आहे.


आजच्या परिस्थितीत जेव्हा संपूर्ण जग भोगवादी बनत आहे व त्याचे समर्थन करण्याचाही प्रयत्न होतो आहे अशा काळात स्थितप्रज्ञाची ही लक्षणे लक्षात ठेवणे अत्यावश्यक आहे. देहधर्म व जीवनात निभवायच्या भूमिकेत अभिप्रेत कर्म करण्यासाठी इंद्रियानी भोग घ्यावा पण मनात त्या भोगाची आसक्ती नसावी हे आवश्यक तत्व मनावर बिंबले पाहीजे. ह्या आसक्तीमुळेच विविध भोग भोगायची ईच्छा धरून आपण निसर्गतत्वाविरुद्ध जाऊन अनेक गोष्टी करत आहोत. त्यामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडतो आहे. आपल्या बिघडणाऱ्या मानसिक समतोलामुळे आपण त्याची पर्वा करत नाही. त्यामुळे मनाची शांती व स्थिरबुद्धी तर दूर, आपण भौतिक पातळीवर देखील खूप अशांतता व उलथापालथ घडवतो आहोत. बुद्धी स्थिर करण्यासाठी आसक्तीवर ताबा मिळवण्याच्या प्रयत्नाने आसक्ती कमी होऊन कमीतकमी निसर्गतत्वाविरुद्ध जाण्याची प्रवृत्ती कमी झाली तरी बुद्धी स्थिर होण्याच्या दिशेने आधुनिक मानव एक पाऊल पुढे जाइल. कारण निसर्गाशी जवळीक ही अखेर त्या ब्रह्मतत्वाकडे जाण्याचाच एक मार्ग आहे. 

Sunday, September 20, 2020

श्रीमद् भगवद्गीता - अध्याय १ - अर्जुन विषादयोग

भारतात हिंदूंच्या समाजजीवनात, समाजमानसात, राजकीय जीवनात, धार्मिक जीवनात आणि  अध्यात्म जीवनात श्रीमद् भगवद्गीता या ग्रंथाचे स्थान आणि महत्व अनन्यसाधारण आहे.


भारतीय महायुद्धाच्या समयी रणभूमी कुरूक्षेत्रावर भगवान श्रीकृष्णाने आपल्या दिव्य वाणीतून जे उपदेशाचं अमृत शिष्योत्तम अर्जुनाला पाजून त्याला  युद्धकर्माला प्रवृत्त केलं ते बोधामृत अर्थात श्रीमद् भगवद्गीता हा हिंदूंचा धर्मग्रंथ. समस्त हिंदूंच्या जीवनाला एक धार्मिक विचारबैठक व आचारसंहिता देणारा हा ग्रंथ. स्वत: शंकराचार्यांनी भगवद्गीतेचा अर्थ जनास कळावा ह्या हेतूने सांगितलेला आहे. तेव्हा धार्मिक जीवनातील गीतेचं महत्व ह्यातून स्पष्ट होतं.


भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात स्वत:चं सर्वस्व वाहिलेले अनेक क्रांतिकारक छातीशी गीता धरून निधड्या छातीने मृत्यूला सामोरे गेले. आत्म्याच्या अविनाशीत्वाचं ज्ञान जणू त्यांनी पचवलं होतं. अशा प्रकारे राजकीय जीवनात गीतेचं स्वत:चं एक वेगळं स्थान होतं.


आजपर्यंत अनेक समाज सुधारकानी, राजकीय नेत्यांनी आपल्या जीवनाच्या सार्वजनिक व वैयक्तिक लक्ष्याकडच्या वाटचालीत योग्य मार्ग मिळावा, त्यास योग्य वैचारिक, तात्विक व आध्यात्मिक बैठक लाभावी  म्हणून गीतेचा आधार घेतला. साहजिकच, त्यांच्या समाजकारणाचा समाजजीवनावर देखील परिणाम झाला ज्यात प्रत्यक्षाप्रत्येक्षपणे गीतेचे योगदान आहे. लोकमान्यांसारख्या अलौकिक बुद्धी व चारित्र्याच्या राष्ट्रपुरूषाने तर गीतारहस्य लिहीत गीतेचे निवृत्तीपर नव्हे तर कर्तृत्वपर रूप जगासमोर मांडले.


संत ज्ञानेश्वरांसारख्या विभूतीने भावार्थदीपिका लिहीत गीतेचे अध्यात्मजगतातील योगदान सुलभ करून दाखवले.

याशिवाय, तत्वज्ञान, साहित्य, कला या व इतर समाजाभिमुख क्षेत्रातील असंख्य विद्वान लोकांनी आपापल्या परीने गीतेचा अर्थ लावण्याचा व त्यावर भाष्य करण्याचा प्रयत्न केला आहे व तो अजूनही अव्याहतपणे चालू आहे.

ह्या पार्श्वभूमीवर माझ्यासारख्या एका य:कश्चिताने श्रीमद् भगवद्गीतेवर काही लिहायचा विचार करणे धार्ष्ट्याचे व औद्धत्याचे आहे. मात्र सुहृदांच्या प्रेमळ सूचनेपुढे मान तुकवून मी प्रयत्न करीत आहे.


अँ श्रीकृष्णाय नम: ! 


अध्याय पहिला - अर्जुन विषादयोग

समरभूमीवर आपले शत्रू म्हणून समोर आपले आप्त, गुरूजन, इष्टमित्र ह्या सर्वाना पाहून अर्जुनाच्या मनात विचार येतो की आपलेच आप्त, गुरू, मित्र अशा या सर्वांबरोबर युद्ध करून, त्यांचा वध करून मिळणाऱ्या राज्यलक्ष्मीचा काय उपयोग ? त्यापेक्षा भिक्षा मागून जगावं लागलं तरी ते अधिक श्रेयस्कर व योग्य आहे. अर्जुनाच्या मनाला ग्रासलेल्या या नैराश्य, क्लैब्य, यामुळेच श्रीकृष्णाला गीता सांगावी लागली हे आपणा सर्वानाच माहिती आहे.

मात्र ह्या अध्यायात आप्तेष्टांविरुद्ध युद्ध करणे कसे योग्य नाही हे सांगतानाच श्लोक ३८ ते ४४ मध्ये अर्जुन युद्धाच्या अधिक भयावह व सार्वात्रिक दुष्परिणामांबद्दल भाष्य करतो. हे सांगताना तो म्हणतो की युद्धात कुळाचा नाश होइल व त्यामुळे कुळधर्म नष्ट होऊन पाप वाढेल. पाप वाढले म्हणजे कुळातील स्त्रिया वर्णसंकर करतील व अंती कुळनाश होइल.

ह्यातील वर्णसंकरासारख्या आज कालबाह्य वाटणाऱ्या बाबी बाजूला ठेवल्या तरी आजच्या काळातही युद्धादरम्यान व युद्धानंतर जबरदस्तीचे अवैध संबंध, अनौरस संतती, एकूणच वीण उसवलेलं व जागोजागी जीर्ण झालेलं समाजवस्त्र  असे सामाजिक प्रश्न मोठ्या प्रमाणावर दिसून येतात. 

महर्षी व्यासांसारख्या प्रतिभेच्या व्यक्तीकडून जेव्हा लिखाण होतं तेव्हा ते व्यक्तीनिष्ठ वा कालसापेक्ष नसून त्रिकालाबाधित सत्याच्या कसोटीवर उतरेल असंच असणार हे स्वाभाविक आहे.

भारतीय युद्धाच्या सुरूवातीला अर्जुनाच्या मनात निर्माण झालेला संभ्रम, निराशा , क्लैब्य ही  प्रातिनिधिक स्वरुपात प्रत्येक युगात लागू होणारी अवस्था आहे. अर्जुनासारखा "नर" असो वा आपल्यासारखे सर्वसामान्य मानव. प्रत्येकासाठी रोजचे जीवन हाच एक असा संघर्ष आहे जिथे योग्य अयोग्य, सुष्ट दुष्ट, नैतिक अनैतिक, धार्मिक, धर्मबाह्य ( धर्माच्या धारयते इति धर्म: ह्या व्यापक व्याख्येच्या संदर्भात ), संस्कृत असंस्कृत असे असंख्य भेद ओळखून योग्य उक्ती व कृतीचे निर्णय घ्यावे लागतात. अर्जुनासारख्या नरोत्तमासाठी पराकोटीचा संभ्रम व नैराश्य निर्माण होण्यास  महायुद्ध व्हावं लागतं तर आपल्यासारख्यांसाठी दैनंदिन जीवनातील अनेक प्रसंग हेच समरप्रसंग ठरतात आणि नक्की कोणती उक्ती वा कृती योग्य ह्या संभ्रमात आपण पडतो. निराश होतो. ज्या विषादयोगाने अर्जुनास ग्रासले त्याचा अनुभव आपणास देखील अनेकदा होतो. तुकोबांनी म्हटलेलं रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग हे षड्रिपूंबरोबरच सभ्रम, नैराश्य, किंकर्तव्यता याबाबतीत देखील लागू होते. असा विषादयोग निर्माण करणाऱ्या प्रत्येक परिस्थितीत, भगवद्गीता आपल्याला योग्य मार्ग दाखवू शकते. गीतेच्या ह्यापुढील अध्यायात प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णांच्या दैवी वाणीतून निर्माण झालेल्या बोधामृतातून योग्य बोध आपल्याला मिळू शकतो.


----- मनिष मोहिले 

Wednesday, September 16, 2020

सागरतीरी

सागरतीरी - समुद्रान्तिके 


समुद्रान्तिके ही खरं तर धृव भट्ट ह्यांची पहिली कादंबरी. त्यानंतर तत्वमसि लिहीली त्यांनी. मात्र, माझा स्वत:चा वाचनाचा क्रम थोडा ऊलटसुलट झाला. मी तत्वमसि पहिले वाचली. मग अकूपार आणि त्यानंतर समुद्रान्तिके अर्थात सागरतीरी. म्हणजे लेखकाच्या मानसिक प्रवासाप्रमाणे माझा वाचनप्रवास झाला नाही. अर्थात त्यामुळे वाचनाच्या आनंदात काहीच बाधा आली नाही, आणि त्यांच्या विचारशृंखलेला मी माझ्यापुरतं समजून घेण्याचा प्रयत्नदेखील केला आहे. पण ते नंतर पाहू. आधी समुद्रान्तिके अर्थात सागरतीरी विषयी.


शहरातील एक तरुण इंजिनीयर, दोन वर्षांच्या बेकारीनंतर मिळालेल्या नोकरीनिमित्त अगदी दूरच्या समुद्रकिनारी वसलेल्या एका गावी येतो. अतिशय उजाड अशा त्या जागी फारच थोडी झाडी व शेतजमीन असते. त्यामुळे तिथे रसायन निर्मितीचा कारखाना उभारण्याचे नक्की झालेले असते आणि जागेची पहाणी, मोजमाप, नकाशे बनवणे ह्या कामावर कथानायकाची नेमणूक होते.


अनिच्छेने व नाईलाजाने त्या ठिकाणी आलेला कथानायक, पुढील तीनेक वर्षं कशी जाणार अशा चिंतेत व निराशाजनक मनस्थितीत तेथील वास्तव्याची सुरूवात करतो आणि नंतर अशा काही व्यक्ती त्याला भेटतात की त्या उजाड जागेत लपलेलं निसर्गाचं आणि तेथील माणसांचं सौंदर्य, वेगळेपण त्याला जाणवतं. जसजसे दिवस जातात तसतशी त्याला त्या जागेबद्दल, त्या व्यक्तींबद्दल एक वेगळीच आपुलकी वाटायला लागते आणि एक नैतिक प्रश्न त्याला सतवायला लागतो की भले उजाड असेल, पण ह्या जागी विषारी रसायनांचा कारखाना उभारणं कितपत योग्य आहे ? 


उजाड का होइना पण स्वत:च्या मालकीचा जमिनीचा तुकडा असावा अशी ईच्छा असलेला हातावर पोट असलेला, मिळेल ते काम करणारा सबूर, बालपणीच्या जंगलाना आठवत, उजाड सागरतीरीच्या बाभळीच्या वनात पक्षी निरीक्षाणाचा छंद जीवंत ठेवणारा नूरभाई, विक्षिप्त वाटणारा व कधीतरी अगम्य बोलणारा बंगाली बाबा, दर्याशी गुजगोष्टी करणारा निधड्या छातीचा कृष्णा तांडेल, एका गावाचा सरपंच आणि उन्हाळ्यात रोजंदारीवर रस्ता दुरूस्ती कामावरचा मजूर अशा सर्वस्वे भिन्न भूमिका स्थितप्रज्ञाप्रमाणे जगणारा खेरा गावचा सरपंच, स्थानिक लोकांच्या कथातून दृष्टीस पडणारे हादाभट की ज्यांच्या हवेलीत कथानायकाचं वास्तव्य असतं आणि त्या हवेलीशी काहीतरी जवळचं नातं असलेली पण हवेलीच्या बाजूला झोपडीत रहाणारी अवल.


दिवसाच्या प्रत्येक प्रहरागणिक रूप बदलणारा समुद्र आणि माथ्यावरचं आकाश, त्या यक्षभूमीच्या नैसर्गिक सौंदर्याचे जितके विभ्रम दाखवतं; तितकीच ही सर्व माणसं त्या निसर्गात राहून जगणाऱ्या मनुष्यस्वभावाचे अनेकविध पैलू कथानायकाला दाखवतात. शहरातला नायक आणि निसर्गपुत्र व कन्या असल्यासारखे जगणारे हे स्त्री पुरूष ह्यांच्या एकमेकांशी होणाऱ्या भेटी, परिचय आणि संवाद ह्यातून समुद्रान्तिकेची कथा उलगडत जाते.


नूरभाईची पक्षीसृष्टीशी असलेली जवळीक आणि त्यातून त्याने सांगितलेली माहिती जी नायकाला ह्या विचारात पाडते की कोतवाल पक्ष्याप्रमाणे आपल्यापेक्षा बलवानाना न घाबरणारी आणि आपल्यापेक्षा दुर्बलाना न घाबरवणारी अशी किती माणसं असतील ?


निसर्गाशी मैत्री म्हणजे निसर्गतत्वाशी इतकं एकरुप होणं की जणू तो आपल्याशी बोलतोय हे सहजपणे दाखवणारा कृष्णा तांडेल. 


आपल्याला कळलं नाही तरी निसर्ग त्याच्या भाषेत आपल्याशी कायमच संवाद साधत असतो हे सांगणारे आणि कथेच्या शेवटी फार वेगळ्या व परिणामकारकपणे ते पटवून देणारे बंगाली बाबा नायकाला सांगतात की तू तुझं काम कर. तू काही निर्माण करू शकत नाहीस वा काही नष्ट करू शकत नाहीस. काल असीम आहे. अनंत आहे. एकीकडे काही नष्ट झालं तर काही नवीन निर्माणही होतंच.


बंगाली बाबाची ही गूढवाणी कथेच्या शेवटी नायकाला समजावून सांगणारी सबूरची भगीरथ गाथा.


धर्म आणि संवेदनशील तत्वनिष्ठा ह्याचं मूर्तीमंत उदाहरण अशी हादाभटांची जीवनकहाणी आणि त्यांच्या व स्वत:ला पटणाऱ्या, ऐकायला सोप्या पण त्यानुसार जगायला अतीशय कठीण अशा तत्वांनुसार जीवन जगणारी, बुद्धीमान, सुशिक्षित अवल.


आणि ह्या सर्व प्रकारात मूकपणे नायकाची साथ करणारा कबीरा.


एखाद्या दुर्गम प्रदेशातील, निसर्गाच्या कुशीत जगणारं व स्पंदणारं मानवी जीवन, शहरी सुखांच्या तुलनेत तेथील कठीण जीवनक्रम, तुटपुंजी संपत्ती आणि तरीही आनंदी, समाधानी, परस्पर प्रेम व सहकार्याचं जीवन जगणारी, साध्या शब्दात अफाट तत्वज्ञान सांगून जाणारी माणसं व त्यातून नायकाचं होणारं विचारमंथन व त्याच्यात घडणारं परिवर्तन हा धृव भटांच्या आत्तापर्यंत वाचलेल्या तीनही पुस्तकांचा आकृतीबंध. शिवाय मुख्य व्यक्तीरेखांचं साधर्म्य हा अजून एक मुद्दा. शहरात वाढलेला आणि  दुर्गम व दूरस्थ जागी येऊन रहाणारा कथानायक - जसा तत्वमसि मधला परदेशात राहून मनुष्यविकास व संसाधन क्षेत्रात काम करणारा नायक मध्यप्रदेशच्या नर्मदेकाठच्या जंगलातील आदिवासींमध्ये काम करायला येतो किंवा अकूपार मधला चित्रकार जो गीरच्या जंगलात पृथ्वीचं तत्वरुप शोधून चित्रबद्ध करायला येतो किंवा समुद्रान्तिकेचा हा रसायन कारखान्यात नोकरी करणारा नायक जो सागरतीरी येतो.  कथानायकाच्या मनात तात्विक व चिंतशील पातळीवर खळबळ माजवणारी तरुण, तत्वनिष्ठ, बुद्धीमान, स्वतंत्र विचार व व्यक्तीमत्वाची नायिका जिच्याबद्दल नायकाला सुप्त आकर्षण आहे पण ते शारीर नसून आंतरिक पातळीवरचं आहे. जशी तत्वमसि मधली सुप्रिया भारत, अकूपार मधली सांसाई आणि समुद्रान्तिके मधली अवल. याशिवाय एक वयोवृद्ध व्यक्तीरेखा जी आयुष्याच्या शाळेत असं काही शिकली आहे की तिच्या साध्या साध्या वाक्यातून जीवनाचं तत्वज्ञान उलगडत जातं आणि ते ही सोप्या शब्दात. तत्वमसि मधले शास्त्रीजी, अकूपार मधल्या आईमा आणि सागरतीरी मधले बंगाली बाबा ही एकाच मानसिक अवस्थेची भिन्नभिन्न शारिरीक रुपे वाटतात.


मात्र कथेची पार्श्वभूमी असलेल्या प्रदेशाचं भौगोलिक रूप भिन्न, नायकाची विचारयात्रा व शोधयात्रा वेगळ्या रस्त्यावरची पण शेवटी कुठेतरी आत्मशोधापाशी येऊन पोचणारी.


समुद्रान्तिके अर्थात सागरतीरी ह्या पहिल्या कादंबरीच्या मध्ये नायकाला प्रश्न पडतो की भौतिक सुखसोयी, संपत्ती ह्यांची इतकी कमतरता असताना समोरच्याला सच्चाई जाणवेल अशा एका विलक्षण आंतरिक समाधान व आनंदाने माणसं कशी जगू शकतात आणि लौकिकार्थाने गरीब लोकच श्रीमंतांपेक्षा दानशूर / समोरच्याचा विचार करून कसे जगू शकतात ? माझ्या मते ह्यातील दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे की  शहरात पैशानी मिळणाऱ्या सुखाची व पैशात मोजल्या जाणाऱ्या संपत्तीची खरी किंमत आहे त्यासाठी गमावलेला वेळ, निसर्गापासून दूर जाणं आणि सहानुभूतीला पारखं होणं. म्हणून शहरी माणूस सहसा आत्मकेंद्रीत असतो. 


जो आनंद व समाधानाचा पहिला प्रश्न आहे तो निसर्गाच्या सान्निध्यात राहिलं की आपोआप  उलगडायला लागतो आणि काही अंशी दुसऱ्या  प्रश्नाच्या उत्तरात त्याचंही उत्तर दडलय.


समुद्रान्तिकेतला हा प्रश्न तत्वमसि ह्या दुसऱ्या कादंबरीमध्ये पुढच्या टप्प्यावर येतो की जीवनातील मोठं तत्वज्ञान सोप्या भाषेत सांगून जाणाऱ्या अशिक्षित वा अल्पशिक्षित लोकांचा संस्कृतीशी नक्की काय संबंध ? 


तर अकूपार मध्ये हा प्रश्न अजून थोडा बदलतो की निसर्गाकडून जर ही मंडळी हे भन्नाट जीवनविषयक तत्वज्ञान शिकतात तर ही माणसं आणि निसर्ग ह्यांच्यातला समतोल व समन्वय नेमका कशामुळे आहे.


हा अन्वयार्थ लावणं माझ्यासाठी आवश्यक होतं कारण मी उलटसुलट क्रमाने त्यांची पुस्तकं वाचली. 


फक्त एकच गोष्ट माझ्या अन्वयार्थाच्या तर्कात बसवायला वेळ लागला व ती म्हणजे अनुवादाचं शीर्षक.  मूळ गुजराती कादंबरीचं शीर्षक समुद्रान्तिके आहे ज्याचा मी लावलेला अर्थ समुद्रात अंत होतो अशी ती. प्रत्येक नदी शेवटी समुद्राला मिळते. त्याचप्रमाणे प्रत्येक जीवनसरिता ही कालाच्या अथांग समुद्रात विलीन होते. पण हा अंत नाही. कारण बंगाली बाबा म्हणतो त्याप्रमाणे ह्या असीम कालात काही नष्ट होतानाच काही निर्माण होतं. सागरालासुद्धा जेव्हा एका किनाऱ्यावर ओहोटी लागते तेव्हा विरुद्ध बाजूला भरती सुरू असते. त्याचप्रमाणे आत्म्याच्या अमरत्वावर विश्वास ठेवणाऱ्या भारतीय संस्कृतीप्रमाणे अंत हा अंत नसून शरीररुपी वस्त्राचा बदल आहे आणि आधुनिक विज्ञानाच्या उर्जा अक्षय्यतेच्या नियमानुसार उर्जेचे रुपांतरण आहे.  हा जीवनाचा व कालचक्राचा नियम आहे. मात्र प्रत्येक नदीचं सागरात वा जीवनाचं असीम कालात विलीन होणं आणि नवीन जीवन सुरू होणं हे निश्चित आहे. समुद्रान्तिके ह्या शीर्षकात हे अध्याहृत आहे. सागरतीरी ह्या मराठी नावात अंत शब्दामुळे निर्माण  होऊ शकणारा संभम टाळला आहे. अर्थात ही संपूर्णपणे माझी समज आहे.


एक गोष्ट मात्र खरी की लेखनाच्या क्रमाप्रमाणे वाचनाचा क्रम नसला तरी तत्वमसि मधील नर्मदातटी घडणाऱ्या व अकूपार मधील गीरच्या जंगलात सिंहांच्या सहवासात घडणाऱ्या कथेप्रमाणेच, समुद्रान्तिकेची ही सागरकिनारी घडणारी कथा आपल्याला तितकीच अंतर्मुख करते आणि तितकीच भावते.


---- मनिष मोहिले 

Monday, September 14, 2020

अमीबाच्या भुतांची भविष्यवाणी

अमीबाच्या भुतांची भविष्यवाणी

भविष्यवाणी करणारी भुतं आणि त्यातून अमीबांची ! बुचकळ्यात पडलात ? की हसून उडवून लावताय विषय ? पण इतकी घाई करू नका विषय उडवून लावायची. ह्या भुतांच्या अस्तित्वाला आणि त्यांच्या भविष्यवाणीला भरभक्कम शास्त्रीय आधार आहे.

कित्येक दशके खोल व अतीखोल समुद्रात खनन करत राहून त्यातून जी निरीक्षणं मिळाली त्यांचा अभ्यास करत जवळपास २१ शास्त्रज्ञानी मिळून एक संशोधन निबंध प्रसिद्ध केलाय Science ह्या विज्ञानाला वाहिलेल्या जगप्रसिद्ध नियतकालिकात - ह्या भुतांच्या भविष्यवाणी संबंधी.  ज्या कालावधीसाठी ही खनन आकडेवारी जमा केली गेली तो कालावधी आहे ६६० लाख वर्षांचा.

काय आहे नक्की हा संशोधन निबंध ? तर गेल्या ६६० लाख वर्षात पृथ्वीच्या वातावरणात जे बदल झाले व त्यामुळे या कालखंडात तिची  ऊबदारनिवास (Warmhouse), ऊष्ण निवास (Hothouse), शीतनिवास (Coolhouse) व अतीशीतनिवास (Icehouse) अशी जी रुपांतरे झाली त्याबद्दल भूतकाळातील माहिती गोळा करून व सध्याच्या वातावरणाचा अभ्यास करून अपेक्षित वातावरण बदलाबद्दल भाष्य / भविष्यवाणी करणारा हा संशोधन निबंध.

"दिनासूरांचा नाश व अमीबांची थडगी"

साधारण ६६० लाख वर्षांपूर्वी एक प्रचंड उल्का पृथ्वीवर आदळून पृथ्वीवरील सजीवसृष्टीचा विनाश झाला.  अनेक अणूबॉम्बइतकी उर्जा ह्या प्रलयंकारी घटनेत निर्माण झाली आणि पृथ्वीच्या आकाशात मैलोनमैल धूर, धूळ आणि वितळलेल्या दगडांचा व कर्बग्रहवायूचा जणू अभेद्य पडदा तयार झाला. भूतलावरील यच्चयावत जीवसृष्टी - दिनासूरांपासून ते छोट्यात छोट्या जीव व वनस्पतींपर्यंत -  नामशेष झाली. मात्र त्यावेळी सुद्धा अतीखोल समुद्रात Foraminifera (Forams in short) नावाचे अमीबा प्रजनन करतच होते. कॅल्शिय्म व इतर समुद्रखनिजांपासून स्वत:भोवती कवचं बनवत बनवत तेदेखील यथावकाश मृत झाले. मात्र समुद्रातील गाळात त्यांचे जीवाश्म बंदिस्त झाले जे विज्ञानाला आज वातावरण बदलाबद्दल उपयुक्त माहिती पुरवत आहेत.

"अमीबांच्या जीवाश्मातून वातावरण बदलाची माहिती"

कशी मिळते ही माहिती ? तर खननात मिळालेल्या कवचात Oxygen 18 व Oxygen 16 ह्या प्राणवायूच्या समस्थानिकांचे (isotopes)  एकमेकांशी असलेले प्रमाण जितके जास्त तितका सागराच्या पाण्याचा थंडावा जास्त. त्याचप्रमाणे, या कवचातील Carbon 13 व Carbon 12 ह्या कर्ब समस्थानिकांचे एकमेकांशी असलेले प्रमाण जितके जास्त तितके वातावरणातील Greenhouse gases चे प्रमाण जास्त. जितकं खोल खनन तितकी अधिक थडगी उकरली जातात  अमीबांची आणि त्यातून बाहेर निघणारी भुतावळ असं भाकित वर्तवते की सध्याचा जागतिक तापमानवाढीचा वेग असाच राहिला तर पृथ्वी ऊष्ण निवासात (Hothouse) परिवर्तित होण्याचा समय फारच लवकर आपल्यासमोर दत्त म्हणून ऊभा राहील.

"ऊबदार निवास ते ऊष्ण निवास - पृथ्वीची स्थित्यंतरे"

अवकाशातील उल्काखंडाशी पृथ्वीची टक्कर होऊन जीवसृष्टी नष्ट झाली या घटनेपासून ते आजपर्यंतचा ६६० लाख वर्षांचा हा काळ हा नवजीवन युग (Cenozoic Era) म्हणून ओळखला जातो. दिनासूर पृथ्वीतलावरून नामशेष झाल्यानंतर १०० लाख वर्षांनी Paleocene-Eocene Thermal Maximum या नावाने ओळखल्या जाणाऱ्या घटनेमुळे ज्यात उत्तर ॲटलांटीक मधील  ज्वालामुखीचा प्रचंड विस्फोट होऊन टनावारी कर्बवायू वातावरणात सोडला गेला तेव्हा पृथ्वी ऊबदार निवास (Warmhouse) अवस्थेमधून ऊष्ण निवास (Hothouse) अवस्थेत गेली. या वेळेचं पृथ्वीवरील सरासरी तापमान स्तर सध्याच्या सरासरी तापमानापेक्षा जवळपास १६ अंश सेल्शियस जास्त होता.  पुढील २०० लाख वर्षं  वातावरणातील हा कर्बवायू नाहीसा होत होता. त्यानंतर अंटार्क्टिका मध्ये बर्फाचे थर बनण्यास सुरूवात झाली आणि पृथ्वी शीतनिवास (Cool house) अवस्थेत आली. यावेळेसचं सरासरी तपमान हे सध्याच्या तुलनेत ४ अंश सेल्शियस अधिक होतं.

साधारण तीस लाख वर्षांपूर्वी अंटार्क्टिकामधील बर्फाचे थर वितळायला लागले आणि पृथ्वीची अतीशीत अवस्था सुरू झाली.  त्यानंतर पुढील बदल होत होत आजमितीला आपण जिथे आहोत तिथे हे चक्र येऊन पोचलं.

वातावरणातील महत्वाचे व दूरगामी परिणाम करणारे बदल हे मुख्यत्वे पृथ्वीच्या अंशाचं कलंडणं (tilting of axis) व तिच्या सूर्याभोवतीच्या भ्रमणकक्षेतील (Orbit) बदल आणि वातावरणातील Greenhouse gases चं प्रमाण ह्यावर अवलंबून असतात.

मात्र, गेल्या ६६० लाख वर्षांच्या गोळा केलेल्या माहितीवरून हे नक्की झालय की अंशाचं कलंडणं वा भ्रमण कक्षेतील बदलामुळे होणारे वातावरणातील बदल हे ठळक व जाणवणारे असले तरी परिणाम ह्या दृष्टीने ते लहान असतात. मात्र तापमानात लक्षणीय वाढ, खूप मोठी वाढ असे बदल हे मुख्यत्वे Greenhouse gases च्या प्रमाणात होणाऱ्या वाढीमुळेच होतात आणि Green house gases मध्ये सध्या ज्या वेगाने वाढ होतेय ते पहाता पृथ्वी अतीऊष्ण निवास (Hothouse) अवस्थेत जायला लक्षावधी नाही तर फक्त काही शेकडो वर्ष पुरतील.

"अमीबाच्या भुतांचा इशारा"

आपल्या पुढील पिढ्यांना ह्या सुंदर वसुंधरेवर रहाता यावं अशी जर आपली ईच्छा असेल तर अमीबांच्या ह्या भुतावळीच्या भविष्यवाणीकडे लक्ष देणं व ती खरी ठरू नये यासाठी वेगानी ठोस पावलं उचलणं अत्यावश्यक आहे.

नाहीतर अवकाशातून दिसणाऱ्या एका सुरेख शांत निळ्या रंगाच्या कुटुंबवत्सल ग्रहाचं एका निर्जीव अशा आगीच्या गोळ्यात होणाऱ्या स्थित्यंतराचं अमीबाच्या भुतांचं भाकीत खरं ठरण्याचा दिवस दूर नाही.

---- मनिष मोहिले

माहिती स्त्रोत - Science ह्या विज्ञानविषयक नियतकालिकाच्या Live Science विभागात प्रसिद्ध झालेला संशोधन निबंध. संशोधक शास्त्रज्ञांच्या नावाची यादी मूळ लेखात आहे व त्या लेखाचा आंतरजाल दुवा खाली दिला आहे.

https://science.sciencemag.org/content/369/6509/1383.full

Sunday, September 13, 2020

कृष्ण श्रुंगार

आंतरजालावर मध्यंतरी एक सुरेख चित्र बघितलं. एक छोटीशी सुरेख एकतारी आणि त्याला लगटून असल्याप्रमाणे एक सुरेख मोरपीस.


ते चित्र बघताच मीरा आणि कृष्णच डोळ्यासमोर आले. आपल्या संस्कृतीत ही सुरेख प्रतीकं इतकी खोलवर रुजली आहेत की ते प्रतीक पहाताच नेमकी व्यक्ती वा नातं डोळ्यासमोर येतं. म्हणजे पहा ना की एकतारी म्हटलं की मीरा, बासरी म्हटलं की राधा, प्राजक्त म्हटला की रुक्मिणी. 


पण ह्या चित्रातल्या एकतारी आणि मोरपीसाची जवळीक प्रत्यक्ष आयुष्यात मीरा आणि कृष्ण ह्यांच्या वाट्याला फक्त भावनिक स्तरावरच आली. राधा, द्रौपदी ह्या जशा कृष्णाच्या प्रत्यक्ष संपर्कात आल्या तशी मीरा येऊ शकली नाही आणि तरीही ती कृष्णमय जीवनच जगली.  काय असेल तिची भावावस्था आणि भावभूमिका ह्याच्यामागे ? आणि तसं बघितलं तर राधा, द्रौपदी ह्या सख्यांची सुद्धा कृष्णावरील प्रेमामागची नेमकी मनोभूमिका काय असावी ? आणि एक पत्नी म्हणून रुक्मिणीची ?  


पूर्णपुरुषोत्तम श्रीकृष्णाच्या आयुष्यातील ह्या स्त्रिया की ज्यांनी योगेश्वराच्या मानवावतारातील जीवनात अहम् भूमिका निभावल्या.  त्यांनी जर कधी आपलं मनोगत एकमेकीना आणि जगाला सांगितलच तर काय असेल ते ?


त्यात पराकोटीचं, ओसंडून दुथडी भरून वाहणारं प्रेम आहे ह्याबद्दल वादच नाही. कारण श्रीकृष्णाने स्वत: जीवनभर प्रेमयोगच आचरला. पण त्याच्या आयुष्यातील ह्या स्त्रियांच्या नजरेत तो प्रेमयोग कसा होता ? प्रेम हे श्रुंगाररसाचं मूळ. तेव्हा यातील प्रत्येक नात्यात श्रुंगार तर नक्कीच आहे. मात्र प्रत्येक नात्यात त्या श्रुंगाराचं रुप एकच आहे की भिन्न.


बघूया - त्या काही बोलतात का आपल्याशी ? किंवा त्याहीपेक्षा, आपल्याला त्या बोललेलं ऐकू येतं का ?


मीरा - मी मीरा. राजा रतनसिंहांची कन्या. मेवाडची राजकन्या. उदयपूरच्या राणा संगांची सून आणि राणा भोजांची पत्नी. पण ही सगळी ओळख या जगानी मला दिलेली ओळख आहे. नागाचा पुष्पहार होणं आणि विषाचा प्याला चरणामृतात बदलणं ह्या चमत्कारांनंतर मला जगानी कृष्णभक्त मीराबाईची ओळख दिली.


पण मला स्वत:ला माझी ही ओळख फार लहानपणीच झाली होती जेव्हा एक वरात बघताना मी माझ्या आईला विचारलं होतं की माझा पती कोण ? आणि; ह्यावर उत्तर म्हणून तिने मला श्रीकृष्णाची एक सुरेख मूर्ती दिली होती. त्या एका क्षणात अंतरीची खूण पटली. माझं लहान वय कृष्णमय होण्याच्या आड नाही आलं.  म्हणतात ना की संसारात एक क्षण भाळण्याचा नी बाकी सगळे सांभाळण्याचे. मी त्या एका क्षणात श्रीकृष्णावर भाळले आणि त्याने जीवनभर मला सांभाळलं. 


तुम्ही म्हणाल कृष्णभक्त संत मीराबाई आणि संसार ?? कसं शक्य आहे ? तुम्ही नं शब्दांच्या व्याख्या फार तोकड्या बनवता. कोणी सांगितलं की संसार हा फक्त अग्नीनारायणाच्या साक्षीने विवाहबंधनात बद्ध झालेल्या पतीपत्नीं मध्येच असतो ? मनानी एकमेकात बद्ध होणंही तेवढच किंवा अधिकच महत्वाचं नाही का ? आणि माझ्या श्रीकृष्णाचा तर त्याच्यावर निरपेक्ष प्रेम करणाऱ्या प्रत्येकाबरोबर संसार आहे. तरीही तो प्रत्येकाच्या वाट्याला संपूर्णपणे येतो. शेवटी संसार म्हणजे काय ? आप्तेष्टांची काळजी घेणं आणि त्यांच्यावर प्रेम करणं आणि हे जीवनभर करणं म्हणजेच तर संसार. 


राजस्त्री असूनही किंवा राजस्त्री असल्यामुळेच माझ्या गिरीधरावर प्रेममय भक्ती करण्यापासून मला रोखणाऱ्या माझ्या राजकैदेच्या आयुष्याची कहाणी बघता श्रीकृष्णाइतका इष्ट आप्त दुसरा कोण होता माझ्या जीवनात ? 


माझ्या त्याच्या नात्यातही हे प्रेम, हा श्रुंगार आहेच की. अगदी भरभरून आहे. त्याशिवाय का जीवनभर एकमेकांना प्रत्यक्ष न भेटता आम्ही एकरुप होऊन जगलो ?  श्रुंगार  तर आमच्याही नात्यात आहेच. फक्त तो भक्तीचं रूप घेऊन साकार झालाय. म्हटलं नव्हतं की तुम्ही मंडळी शब्दांच्या फार तोकड्या व्याख्या करता म्हणून ? श्रुंगारातही हीच गल्लत केलीत नं ? 


आमच्यातला हा भक्तीमय श्रुंगार तर युगातीत आहे. म्हणून तर द्वापारातील श्रीकृष्णाबरोबर कलीयुगातली ही मीरा एकरुप झाली नं ?  कारण माझा गिरीधर युगातीत आहे, कालातीत आहे. 


"मेरे तो गिरीधर गोपाल; दुसरा न कोय" हा श्रुंगाराचाच तर आविष्कार आहे. कृष्णमूर्तीतच विलीन होत इहलोकीची माझी यात्रा, मी देवलोकी माझ्या गिरीधराबरोबर कायमसाठी चालू ठेवली हे आमच्यातील श्रुंगाराचच तर सार्थक आहे.


फक्त आमच्यातला हा श्रुंगार एकाच रुपात होता - भक्तीच्या. म्हणून तर कृष्णाच्या बासरीतल्या सूरांना मी माझ्या एकतारीवर साथ दिली. एकच सूर - भक्तीचा. बासरीतल्या सात सूरांवर आधीपासूनच कुणाचा तरी अधिकार आहे आणि तो मला पूर्णपणे मान्य आहे कारण प्रेम म्हणजे स्वीकार. माझ्या एकतारीतून माझा श्रीकृष्ण मला एकटीला पूर्णपणे भेटला. हे काय माझ्या एकतारीला बिलगून त्याचं मोरपीस ऊभं आहे ! 


राधा - नमस्कार मंडळी ! मला ओळखलंत ? आत्ताच मीरा बोलून गेली नं की मुरलीधराच्या बासरीतल्या सूरांवर दुसऱ्या कुणाचा आधीपासूनच अधिकार आहे  म्हणून. मीच ती. माझाच अधिकार आहे त्या सात सूरांवर. माझा .... ह्या राधेचा.


सगळ्या जगाला वेड लावणाऱ्या श्रीहरीच्या वेणूवर 

माझा एकटीचा अधिकार कसा? असा प्रश्न पडलाय नं तुम्हाला ?  हा अधिकार मी प्राप्त करून घेतलाय . माझ्या त्याच्यावरच्या प्रेमाने. मी त्याला दिलेलं मोरपीस जे त्याने आयुष्यभर स्वत:च्या माथ्यावर प्रेमाने वागवलं ती माझ्या त्याच्यावरच्या प्रेमाची खूणच तर आहे. म्हणूनच  गोकुळ सोडून माझा कान्हा जेव्हा भगवान श्रीकृष्ण बनायच्या प्रवासाला निघाला तेव्हा त्याची ती बासरी त्याने मला देऊ केली होती. मीसुद्धा त्याची आठवण, आमच्या प्रेमाची आठवण  म्हणून हक्कानी ती ठेवून घेतली. फक्त तिच्यातले सात सूर मी मोकळेपणानी त्याला दिले. जगात प्रेमाचा प्रसार करायला, त्याच्या अद्भुत वर्तणूकीतून जगात प्रेम व सूर पसरवायला. मगाशी मीरा म्हणाली नं की प्रेम म्हणजे स्वीकार. तसंच प्रेम म्हणजे मुक्तता. म्हणूनच एकदा गोकुळ सोडलेला माझा कान्हा परत येणार नाही हे ठाऊक असूनसुद्धा मी त्याला जाऊ दिलं. त्या मुक्तपणामुळेच केव्हाही तो मला व मी त्याला भेटू शकतो. प्रत्यक्ष संपर्काशिवाय.


आणि; तसा तर मला भरपूर संग लाभला माझ्या कान्हाचा. तो गोकुळात असेपर्यंत अगदी रोज भेटायचो आम्ही. त्याच्या संगतीतले ते त्याच्या निळ्या रंगात, कमलनयनात आणि बासरीच्या सप्तसुरात विरघळून जाणारे कित्येक तास कसे पळांसारखे निघून जायचे. आमच्यातलं प्रेम, आमच्यातला श्रुंगार होताच मुळी तसा. प्रेमानी आणि जीवनानी अगदी रसरसून भरलेला. उत्कट. पण जगानी पुढे त्याला जे आंघोळ करताना कपडे चोरण्याचं वगैरे थिल्लर रूप दिलं ना; तसा थिल्लर मुळीच नव्हता आमचा श्रुंगार. अहो शेवटी मी एक विवाहिता होते. माझा पत्नीधर्म होता अनयाप्रती - माझ्या पतीप्रती. आणि त्याला बाधा येइल असं आमच्या श्रुंगारात काहीच नव्हतं. ना माझ्या कडून ना माझ्या कान्हाकडून. आमचं नातं कळून घ्यायला हे कळून घेतलं पाहीजे की विवाह झाला तरीही पत्नीला सख्याची आणि पतीला सखीची गरज असते. अगदी पतीपत्नीना एकमेकांमध्ये असे सखा सखी लाभले तरी दुसरी व्यक्ती सखा वा सखी असू शकते.  समाज, रुढी, परंपरा, रीतिरिवाज ह्यांच्या चौकटीपलीकडे आणि कोणत्याच एका भूमिकेला चिकटून न रहाणारं असं जे नातं असतं नं ते सखा व सखीचं नातं. त्यात प्रेम असतो, श्रुंगार असतो, परस्परांच्या रूपाचं व गुणांचं आकर्षण असतं आणि तरीही सर्व नात्याना कवेत घेणाऱ्या व इतर सर्व नात्यांचा आदर करणाऱ्या व त्यांचं पावित्र्य अबाधित राखणाऱ्या स्वत:च्या मर्यादा त्या नात्याला ठाऊक असतात. हे तुम्हाला जेव्हा कळेल नं; तेव्हा तुम्हाला राधाकृष्णाचं प्रेम कळेल.  किती रंग, किती सूर आहेत नं ह्या सखा सखीच्या नात्यात. त्याच्या त्या बासरीतल्या सात सूरांसारखेच.  सात छिद्रातून बाहेर निघणारे सात सूर. गोकुळात त्या सात सुरांच्या अनेक सुरावटी मी ऐकल्या. मात्र कान्हा गोकुळ सोडून गेल्यानंतर मी त्या आठव्या छिद्राप्रमाणे जगले. त्यातून कुठलाच सूर निघत नाही. पण त्याच्याशिवाय इतर सात छिद्रदेखील सूर नाही निर्माण करू शकत. ते आठवं छिद्र बनत मी अशा प्रत्येक व्यक्तीत जगले की जी मोक्षप्राप्तीसाठी माझ्या कान्हाकडे , भगवान श्रीकृष्णाकडे आकृष्ट होइल आणि त्यामुळे जगभर बासरीतले सात सूर पसरून आनंद देत राहीले. त्यामुळे आता मी कायमच त्याच्या सहवासात आहे. मी म्हणाले होते नं तुम्हाला की प्रेम म्हणजे बंधन नाही; तर प्रेम म्हणजे मुक्तता. आहे असा दुसरा कुठला मुक्त श्रुंगार तुमच्या पहाण्यात ? 


म्हणून त्या बासरीवर माझाच अधिकार आहे. पुढे ज्या हातात त्याने बासरी धरली होती त्याच हातात त्याने सुदर्शन धरलं तरी बासरीतले ते सात सूर तो जीवनभर आळवत राह्यला. हेच आमच्या राधा कृष्णाच्या श्रुंगाराचं सार्थक.


द्रौपदी - राधेनी सुदर्शनाचा उल्लेख केला आणि मलाही बोलावसं वाटलं. तुम्ही म्हणाल की ही कोण ? आणि हिचा काय संबंध सुदर्शनाशी ? मी - याज्ञसेनी द्रौपदी. कृष्णाची सखी. तशी तर राधा त्याची परमसखी हे मलाही ठाऊक आहे. पण जगासमोर सखी हे संबोधन कृष्णानी मलाच उद्देशून वापरलं. म्हणून तर जगासाठी भगवान, द्वारकाधीश, वासुदेव आणि श्रीकृष्ण असलेल्या त्याला मी मात्र कृष्णच म्हणते.


आमच्या श्यामल वर्णात साम्य होतं. पण आमच्या स्वभावप्रकृती मात्र भिन्न. तो नेहमीच अगदी धीरगंभीर, प्रशांत सागरासारखा किंवा अथांग निळ्या आकाशासारखा. क्वचितच कधी त्याचं प्रलयंकारी रूप दाखवणारा. त्याच्या अगदी उलट मी. यज्ञातून उपजलेली. यज्ञाच्या लवलवत्या अग्नीशिखांसारखी सतत तळपणारी आणि कशाशी तरी झगडणारी.


कशाशी झगडा ? स्वयंवरात अर्जुनाने पण जिंकूनही पाच पतींच्या मध्ये पत्नीधर्म वाटावा लागला ह्या विचाराशी, स्वत:ला हरल्यानंतर माझ्यावर हक्क उरला नसता मला पणावर लावून माझ्या अपमानाला कारणीभूत होणारा  माझा ज्येष्ठ पती व ज्येष्ठ बंधू म्हणून त्याच्या आज्ञेत रहाणारे  माझे  इतर पती ह्याना काय अधिकार होता असं वागण्याचा ह्या विचाराशी , भर सभेत माझ्या वस्त्राना हात घालणाऱ्या अधम हातांशी, उघडी करून दाखवण्यात आलेल्या उन्मत्त मांडीशी आणि अशावेळी मौन पत्करणाऱ्या षंढ पौरूषाशी नी अधर्मी वृद्धत्वाशी. 


कृष्णाच्या गरगर फिरणाऱ्या सुदर्शनाप्रमाणेच माझं जीवनही ह्या संघर्षात / संग्रामात गरगर फिरलं. अर्थात कृष्णाच्या प्रेमानेच माझ्या जीवनभराच्या विविध संघर्षात माझं रक्षण केलं. मला त्या संघर्षाना तोंड द्यायची ताकद दिली. समजून घेण्याची प्रगल्भता दिली. आणि ही प्रेमाची साथ त्याने सुरूवातीपासून ते शेवटपर्यंत दिली.


त्याने समजावलं म्हणून मी पाच पतींची पत्नी होण्यास होकार दिला. त्याच्याच प्रेमामुळे बहुपतीत्व असलेली एकमेव स्त्री असूनही; आजही, पाच पतिव्रतांमध्ये माझं नाव घेतलं जातं हे का मला ठाऊक नाही ? . द्यूतसभेतील भयानक प्रसंगात तर त्याने माझं, समग्र स्त्री जातीच्या सन्मानाचं रक्षण केलं. अर्थात निव्वळ लज्जारक्षणामुळे माझ्यातील याज्ञसेनेच्या मनातील आग विझणार नाही हे ही त्याला माहीत होतं. म्हणून तर प्रचंड पराक्रमी असूनही स्वभावप्रकृती भिन्नत्वामुळे माझ्या प्रतिशोधाला परिणामापर्यंत पोचवण्यात असमर्थ असलेल्या माझ्या पाच पतीना एकत्र करून त्यांच्या मनाचं सारथ्य करत त्याने भारतीय युद्ध पेटवलं आणि माझ्या आत जळणारा प्रतिशोधाचा अग्नी शांत केला. भारतीय युद्ध हे त्याच्या त्या अन्यायाचा समूळ उच्छेद करणाऱ्या सुदर्शन चक्राचच अधिक भव्य विश्वरूप दर्शन नव्हतं का ? म्हणून म्हणाले की सुदर्शन म्हटल्यावर मला बोलावसं वाटलं .


आता तुम्ही म्हणाल की ह्या सर्व संघर्ष व संहारात श्रुंगार कुठे आला ? उत्तर ऐकायचय ? ऐका. आपल्या प्रिय व्यक्तीच्या मनाला अपमानाचा प्रतिशोध घेतल्याची शांती मिळावी म्हणून असं प्रचंड महायुद्ध पेटवणं त्यालाच शक्य आहे ज्याच्या मनात आपल्याबद्दल अपार प्रेम आहे.  आणि लक्षात ठेवा की हे प्रेम सखा व सखीचच आहे. उगीच आमच्या नात्याला भाऊ बहीण ह्यांचं नातं बनवू नका. पती पत्नीखेरीज स्त्री पुरूष ह्यांच्यामधील प्रेमाची मर्यादा, पावित्र्य, सखोलता आणि व्याप्ती असलेलं असं सखा आणि सखीचं हे नातं आहे जे सख्याला, सखीच्या सन्मानासाठी सर्वंकष असं युद्ध पेटवायला ही प्रेरित करू शकतं. 


श्रुंगाराचं हे सर्वस्वी अनोखं असं संरक्षण करणारं रूप आहे. सुदर्शनाप्रमाणेच ते संहारक आहे आणि त्याचवेळी संरक्षक सुद्धा. अजूनही नसेल कळलं तर सांगते की भीमाने सूड घेण्याची प्रतिज्ञा घेतल्यावर सुद्धा मी माझ्या कृष्णाला, मधुसूदनाला, अच्युत, मिलींद, माधवाला शपथ घ्यायला लावली की माझ्या प्रतिशोधाचा प्रवास अंतिम लक्ष्याप्रत नेण्यात तो स्वत: मदत करेल आणि त्याने ती तशी घेतलीसुद्धा. माझ्यावरील प्रेमाखातर. कितीही झालं तरी माझ्या पाच पतींबरोबरच्या एकांतवासाची आचारसंहिता बनवण्यात राजमातेबरोबर सहभागी होण्याइतका मला जवळचा होता तो - माझा कृष्ण. माझा सखा. हा विश्वास आणि परस्परांवरचं हे प्रेम हेच आमच्या नात्यातील श्रुंगाराचं सार्थक आहे.  माझ्या देहाला असणाऱ्या जन्मजात सुगंधासारखा आमच्या नात्यातील श्रुंगार देखील अद्भुत आहे, अलौकिक आहे. माझ्या देहसुगंधापुढे एका पारिजातकाच्या फुलांचा स्वर्गीय सुगंधच काय तो टिकू शकेल. पण एखाद्या नात्यातील श्रुंगाराचं असं विलक्षण अद्वितीय व भव्य रूप इतर कोणत्या नात्यात कसं असेल ?


रुक्मिणी - द्रौपदीनं पारिजातकाचा उल्लेख केला आणि मी आले म्हटल्यावरच तुम्ही मला ओळखलच असेल. बरोबर. अगदी बरोबर. मी रुक्मिणी. द्वारकाधीशांची पहिली पत्नी. माझ्यानंतर सात वेगवेगळ्या स्त्रियांबरोबर ते विवाहबद्ध झाले. पण प्रत्येकीच्या वाट्याला मात्र ते पूर्णपणेच आले. हे असं स्वत:ला समोरच्याला पूर्णपणे देऊन टाकणं त्यांना कसं काय जमत असे मला अजूनही कळत नाही. बरं एकाला पूर्ण मिळाले म्हणून दुसऱ्याला कमी मिळाले असंही नाही. मग त्यात आम्ही आठ पत्नी, झालंच तर राधा, द्रौपदी, उद्धवभावजी, अर्जुन, सुदामाभावजी आणि इतर किती किती जण होते. पण स्वामी प्रत्येकाच्या वाट्याला सारखेच संपूर्णपणे आले. मला ह्यामागचं रहस्य कधीच कळलं नाही. पण त्यांची अर्धांगी म्हणून त्यांच्यासारखं वागायचा प्रयत्न मात्र मी कायम करत राह्यले. माझ्या सातही सवतीना; सवती न मानता धाकट्या बहिणी मानत, सासू सासऱ्याना माता पित्याच्या जागी मानत आणि प्रजेला अपत्यवत मानत जीवन जगण्याचा व द्वारकाधीशांच्या प्रथम पत्नीला साजेसं वागण्याचा प्रयत्न केला. अर्थात आईशी असलेला संपर्क सोडता माहेर जवळपास कायमसाठी सुटलेल्या मला सर्वांकडूनच तितकच प्रेमही मिळालं. अगदी माहेराची आठवणही होऊ नये इतकं. 


अर्थातच, स्वत: स्वामींचं माझ्यावरील निरतिशय प्रेम हे त्यामागील प्रमुख कारण. पतीपत्नीच्या ह्या परमपवित्र नात्यात अतिशय महत्वाचे असलेले परस्परांबद्दलची प्रीती, विश्वास व परस्परसन्मान आमच्या नात्यात काठोकाठ भरून होते. प्रत्यक्ष पूर्णपुरूषाशी विवाहबद्ध झालेली असल्यामुळे सुखी वैवाहिक जीवनाचा पाया असलेलं वैवाहिक सुख मला अपरंपार मिळालं. आजही त्या मधुर मीलनांची आठवण झाली तरी स्वामी समोर उभे असावेत इतकी लज्जा वाटते मला.


प्रेमाच्या या वर्षावाबरोबरच त्यांनी माझ्या बुद्धीचा, व्यक्तिमत्वाचा सन्मान केला.  माझ्यावर विश्वास ठेवला. एखाद्या प्रसंगातील स्वामींच्या वर्तणूकीचा अंदाज करावयास, माझ्याकडून असलेल्या त्यांच्या अपेक्षा ओळखून त्याप्रमाणे वागण्यास मी आपसूकच शिकले. आमच्या एकमेकांवरील प्रीतीने मला ते शिकवलं. स्वामींचा सहेतुक कटाक्ष वा स्मितहास्य वा पसंतीने हलकेच हलवलेली मान ह्यातून मला माझ्या योग्य कृतीची वा उक्तीची पोचपावती मिळायची. मी धन्य व्हायचे.


आणि का नाही होणार ? ऊभ्या त्रिभुवनातील स्त्रियानी हेवा करावा असा पती लाभला होता मला. सार्वजनिक जीवनात विलक्षण शूर, बुद्धीमान, प्रजाहितदक्ष, द्रष्टा असलेला आणि वैयक्तिक जीवनात अतिशय प्रेमळ, कुटुंबदक्ष असलेला पती. तो ही असा लोकविलक्षण की आर्य असून वनवासी राजकन्या जांबवंतीला पत्नीपदी बसवणारा, कामरुपातील सोळा सहस्त्र स्त्रियाना स्वत:च्या नावाचं मंगळसूत्र अर्पण करत मुख्य जीवनप्रवाहात त्यांचं पुनर्वसन करणारा आणि तरीही निगर्वी. का नाही अभिमान वाटणार ?


काय म्हणालात ? सात सवती आणि वर राधा, द्रौपदी इतक्या स्त्रिया त्यांच्या जीवनात असून मला कधीच मत्सर कसा वाटला नाही वा संशय कसा आला नाही ? अहो, प्रत्येक व्यक्ती विविध नात्यांच्या लोलकात जगत असते. नात्यांच्या संदर्भातही जीवन एक आयामी कधीच नसतं. 


पुरूषाला माता, भगिनी, पत्नी, कन्या ह्यांच्याबरोबरच तितकीच प्रिय अशी सखी असूच शकते आणि स्त्रीला पिता, बंधू, पती, पुत्र, ह्यांच्याबरोबरच तितकाच प्रिय सखादेखील असूच शकतो. हा परस्पर विश्वासाचा प्रश्न आहे. या  नात्याच्या मर्यादा ते नातं स्वत:च ठरवतं आणि त्या मर्यादेत राहण्यातच त्या नात्याचं सौंदर्य आहे. 



आता जरूरच काय म्हणाल तर एक सांगू ? विवाह झाला म्हणजे आपल्या सगळ्या अपेक्षा त्या एकाच व्यक्तीने पूर्ण कराव्यात अशी चुकीची अपेक्षा आपण  करतो. ती व्यक्ती प्रेमामुळे शक्य तितके प्रयत्न करते त्या अपेक्षा पूर्ण करण्याचा. पण सगळ्याच पूर्ण करणं स्वाभाविकच शक्य होत नाही. अशा वेगवेगळ्या अपेक्षा बंधू, भगिनी, मित्र, मैत्रीण, गुरू, अशा विविध नात्यात पूर्ण होतात. त्यातीलच एक नातं सखा सखीचं. हे नातं पतीपत्नीच्या नात्याला धोका नसून पूर्णत्व देणारं आहे कारण ते पुरूषाला व स्त्रीला दोघानाही पूर्ण करतं.  हे एकदा कळलं की मग संशय, मत्सर ह्याला जागा रहात नाही.


अर्थात मला माझ्या स्वामींमध्येच माझा सखादेखील मिळाला. पण स्वामीना असलेल्या सख्यांमुळे मला कधीच असुरक्षित वाटलं नाही. कारण आम्ही पती पत्नी होतो आणि त्या नात्यात सखा व सखीचं नातं हे स्वाभाविकपणेच अंतर्भूत असतं.  त्यामुळे दुसऱ्या सखा वा सखीमुळे असुरक्षित वाटण्याची गरजच नसते.


कुठून आला हा विश्वास ? स्वामींवरील प्रेमामुळेच ना ? हा श्रुंगारच तर आहे. पतीपत्नींच्या नात्याचं मूळच तर श्रुंगार आहे.  ह्या श्रुंगाराच्या सुगंधापुढे पारिजातकाच्या देखण्या नाजूक फुलांचा स्वर्गीय सुगंध देखील दुय्यम ठरावा. मी म्हणूनच पारिजातकाचा हट्ट धरला नाही स्वामींपुढे. मात्र चौदा रत्नांपैकी एक असलेल्या त्या दिव्य वृक्षाने माझं मनोगत जणू ओळखलं. भामेच्या बागेत रुजून वाढलेल्या पारिजातकाने माझ्या अंगणात स्वत:ची फुलं वर्षावली ही त्या स्वर्गीय वृक्षाची आमच्या अलोट प्रेमाच्या, विश्वासाच्या आणि श्रुंगाराच्या सुगंधाला दिलेली दाद आहे.


श्रीकृष्ण - नमस्कार मंडळी. मी कृष्ण बोलतोय. अरेच्चा ! इतकं का आश्चर्य वाटलं बरं तुम्हाला ? अहो श्रुंगाराबद्दल बोलतोय आणि ऐकतोय नं आपण ! आत्ताच मीरा, राधा, सखी आणि रुक्मिणी बोलून गेल्या नं तुमच्याशी ? आणि श्रुंगाराचं नातं वा नात्यातला श्रुंगार दोन्ही व्यक्तींच्या नजरेतून कळायला हवा. खरय नं ? 


तसं बघितलं तर प्रेमयोगाचा प्रसार विश्वात करण्यासाठीच जन्मलेल्या माझ्या जीवनात, माता, भगिनी ह्यांच्याशिवाय स्त्रीबद्दलचं प्रेम  प्रथम प्रवेशलं ते राधेच्या पावलांनी. तिच्या निरागस, स्वाभाविक प्रेमाला मी तितक्याच उत्कट प्रेमाने स्वाभाविक प्रतिसाद कधी दिला ते मलाही कळलं नाही. किशोरावस्था, पौगंडावस्था आणि यौवनाचा ऊंबरठा ह्या जीवनातील अशा अवस्था आहेत की तिथे कोणतीही भावना खूप तीव्र असते आणि या वळणावर व्यक्ती घडते किंवा बिघडते. त्यातून स्त्री पुरूष प्रेमासारखी नाजूक आणि तितकीच समर्थ भावना. अशा वेळेस राधेकडून मला ह्या नात्यातील प्रेमाची फार सुरेख पृथ्वीमोलाची भेट मिळाली. तिच्यामुळे स्त्रीत्वाचे एकएक विशेष मला जाणवले. ह्या आविष्काराचा सर्वोच्च बिंदू होता तिने भेट दिलेलं मोरपीस. स्त्रीजीवनातील सर्वोच्च विशेषाचं - तिच्यातील जननशीलतेचं प्रतीक अशा योनीसदृश आकाराचं मोरपीस. ही आगळीवेगळी भेट मला देण्यामागची तिची ईच्छा जाणूनच मी अत्त्युच्च सन्मानाने कायम ते माझ्या माथ्यावर वागवलं - हा संदेश जगाला द्यायला की स्त्रीचा व तिच्या स्त्रीत्वाचा सन्मान करा. म्हणूनच मला शक्तीची - तिच्या स्त्री रुपाची ओळख करून देणारी राधा गोकुळ कायमसाठी सुटल्यावर देखील कायम माझ्या जवळच राह्यली. राधेबरोबरचं माझं प्रेम आणि श्रुंगार म्हणूनच आजही आमच्या दोघांच्याच नाही तर समस्त जगाच्या मनात ताजे आहेत. आज तुमच्यासमोर बोलून आम्ही फक्त त्याच्या मूळ स्वरुपाला तुमच्यापुढे स्पष्ट केलं.


स्त्रीच्या सन्मानाला माथ्यावर स्थान देणाऱ्या मला, माझ्या सखीच्या - द्रौपदीच्या स्त्रीत्वाचा अपमान करणाऱ्या उन्मत्त जीवांना धडा शिकवणं आवश्यकच होतं. ती म्हणाली नं मगाशी की भारतीय युद्ध हे अन्यायसंहारक सुदर्शनाचच भव्य रूप होतं, ते बरोबरच आहे. फक्त एक गोष्ट मला स्पष्ट करावीशी वाटते. एकट्या द्रौपदीच्या अपमानाच्या प्रतिशोधाचा प्रश्न असता तर एकटं सुदर्शन चाललं असतं. पण समस्त स्त्रीत्वाचा प्रश्न असल्यामुळे त्या प्रश्नाची भव्यता जगाला कळावी म्हणून मला त्याचं उत्तरही भव्य शोधावं लागलं - भारतीय युद्धाचं. 

हे करणं हे माझ्यातील सख्याचं दायित्व होतं सखी द्रौपदीप्रती. श्यामलवर्णा, सुगंधी देहाची ही बुद्धिमान व अनुपम लावण्यवती तिच्या ज्वलंत आणि यज्ञशिखेसारख्या व्यक्तिमत्वामुळे मला कायमच  भावली. माझ्या अंत:करणात वसली. स्वत:बद्दल आणि स्वत:च्या निवडीबद्दल ती कायमच चोखंदळ व आग्रही होती. तिच्यामधील हा ज्वलंतपणा मला जसा जाणवला तसा तिच्या पाच पतींनादेखील नाही आणि म्हणूनच, सहजच ती माझी सखी बनली. आजही तिचा आग्रही पण तितकाच प्रेमळ स्वभाव मला आतून साद घालत असल्यासारखा वाटतो.


जगाला ज्ञात अशा माझ्या या दोन  सख्यांशिवाय माझी अजून एक सखी होती व आहे - माझी प्रथम भार्या रुक्मिणी. पण मी ऊघडपणे तिला कधीच सखी म्हणून संबोधलं नाही कारण ती माझी अर्धांगी आहे. तिचं स्थान हे तिचं एकटीचं आहे. माझ्याशी एकरुप होणाऱ्या माझ्या दोन्ही सख्या, माझं अर्धांग वगळून तर एकरुप होऊ शकत नव्हत्या. ही जाणीव त्या तिघीनाही होती आणि म्हणूनच कोणाच्याच मनात संशय, मत्सर निर्माण झाला नाही. संपूर्ण आर्यावर्तातील जीवनाची वाढ आणि विकास व्हावा म्हणून मी जीवनभर आर्यावर्तभर फिरू शकलो कारण माझं घर माझ्या गृहलक्ष्मीच्या हाती सुरक्षित आहे, सुखरूप आहे ही खात्री मला होती म्हणूनच. मला ती पत्नी म्हणून आणि पत्नीमधली सखी म्हणून कायमच सर्वात प्रिय होती व आहे. माझी अर्धांगिनी - माझी रुक्मिणी.


आणि शेवटी राह्यली मीरा. निव्वळ भक्तीरूप प्रेमाच्या बळावर द्वापारातल्या मला तिने कलीयुगात यायला भाग पाडलं आणि ती माझ्यात विलीन झाली ह्यापेक्षा अधिक तिच्या प्रेमाबद्दल काय बोलावं ? भक्तापुढे भगवंत देखील लीन होतो आणि आनंदाने लीन होतो इतकंच म्हणेन मी.


काय म्हणालात ? श्रुंगाराबद्दल मी बोललोच नाही ? अहो, दुतर्फा सारखच उत्कट असल्याखेरीज का प्रेम एव्हढं फुलतं की युगानुयुगं त्या प्रेमाच्या कहाण्या एका पिढीकडून दुसऱ्या पिढीला वारसा म्हणून सांगितल्या जाव्या ?


श्रुंगाराचा दुसरा अर्थ स्त्रीचं सजणं, सजावट करणं. सुंदर बनवणं. माझ्यावरच्या उत्कट आणि निरपेक्ष प्रेमाने ह्या चौघीनी आमची नाती इतकी सुरेख श्रुंगारली आहेत की मी परत परत त्यांच्या आणि आमच्या नात्यांच्या अजूनही रोज नव्याने प्रेमात पडतो. श्रुंगार श्रुंगार तो अजून वेगळा काय असतो ? 

---- मनिष मोहिले 

Thursday, September 10, 2020

अकूपार

 अकूपार 


अकूपार. वाचूनच ऊत्सुकता निर्माण होते. काय आहे हे ? नाव ? विशेषण ? की अजून काही ? अर्थ काय अकूपारचा ?


महाभारताच्या वनपर्वात पुष्कळ कथा आहेत. त्यातील एका कथेत इंद्रद्युम्न राजाला त्याचा पुण्यसंचय संपतो म्हणून स्वर्गातून बाहेर जाण्यास सांगण्यात येते. देवदूत म्हणतात की जर तू पुरावे वा साक्षीदारांच्या सहाय्याने हे सिद्ध करू शकलास की भूतलावरील तुझ्या काही कृत्यांचा पुण्यसंचय अजूनही तुझ्या गाठीशी आहे; तर तुला स्वर्गात पुन:प्रवेश मिळेल.

इंद्रद्युम्न राजा अशा साक्षीदारांच्या शोधात कित्येक युगांनंतर पृथ्वीवर येतो. बरेच जण स्वाभाविकपणे त्याला ओळखत नाहीत. शेवटी तो ह्याला विचार त्याला विचार करत करत अकूपार नावाच्या कासवापर्यंत येऊन पोचतो. जवळपास चिरंजीव असावं इतक्या आयुष्याचं ते कासव त्याला ओळखतं. इंद्रद्युम्नच्या घोडदळाच्या टापांमुळे तयार झालेल्या सरोवरात राहणारे अकूपार त्याच्या पुण्यकृत्यांची साक्ष देते आणि इंद्रद्युम्नाला स्वर्गात सन्मानाने पुन:प्रवेश मिळतो. 


गीरचं जंगल व आसपासच्या प्रदेशात अशी मान्यता आहे की पृथ्वी ज्या शेषनागाच्या फण्यावर स्थित आहे, तो शेषनाग स्वत: एका कासवाच्या पाठीवर स्थित आहे. पृथ्वीला शेषनागासहीत स्वत:च्या पाठीवर तोलणारं कासव चिरंजीव असंच असणार. तर असा हा कासव, त्याच्या पाठीवर शेषनाग आणि त्याच्या फण्यावर पृथ्वी हा डोलारा तोपर्यंत स्थिर आहे जोपर्यंत शेषनाग आणि कासव पृथ्वीवरील पापांचा भार सहन करू शकतात. हा भार निर्माणच होऊ नये वा वाढू नये हे बघणं हे काम माणसाचं कारण भार वाढवणारा तोच. गीरने ह्या बिकट समस्येवर फार साधं सोपं उत्तर शोधलं आहे. म्हणून गीरच्या जंगलातील जंगली श्वापदं - विशेषकरून सिंह जो येथील जंगलाचा राजा आहे आणि तेथील रहिवासी ह्यांच्या एका विशेष अशा प्रकारच्या सहजीवनावर आधारितअशा ह्या धृव भट्ट लिखित कहाणीचं शीर्षक आहे अकूपार. अंजनी नरवणे ह्यांनी मराठी अनुवादाचं शीर्षकदेखील तेच ठेवलं आहे - अकूपार.


अकूपारची कहाणी थोडक्यात अशी की राजकोट मध्ये रहाणारा एक चित्रकार एका वास्तू सुशोभन प्रकल्पांतर्गत त्याच्याकडे आलेल्या चित्र काढण्याच्या कामाच्या निमित्ताने गीरला भेट देतो. ह्या भेटीदरम्यान व नंतर काय होतं ह्याची कहाणी म्हणजे अकूपार.


चित्र काढायला गीरपर्यंत का लांब जायचं ? तर चित्रमालिकेचा विषय असतो तत्वरुपा पृथ्वीची चित्रं काढायची. पंचमहाभूतांपैकी एक अशा पृथ्वीचं तत्वरुप दाखवायचं तर मुळात ते तत्व काय आहे ते समजायला हवं आणि त्यासाठी निसर्गाच्या जवळ जायला हवं. म्हणून गीर. 

विस्तीर्ण पसरलेलं मुख्यत्वे सागाच्या झाडांचं जंगल, मधून मधून असलेल्या टेकड्या, तीस पस्तीस किलोमीटरवरचा समुद्रकिनारा आणि अशा बहुरंगी बहुढंगी जमिनीवर वास्तव्य करून असलेली जीवसृष्टी व त्याच जीवसृष्टीचा भाग बनून असलेली  माणसं. म्हणून गीर.


कथानायक गीरमध्ये येतो आणि विविध व्यक्तींशी त्याचा परिचय होतो. पहिल्याच दिवशी त्याला नकळतपणे सिंहांच्या जवळ जात असण्यापासून वाचवणारी सांसाई नावाची तरुणी जी वरकरणी तडकफडक बोलणारी पण गीरची जमीन, तिथली वन्यजीव सृष्टी, विशेषकरून सिंह आणि तिथला निसर्ग ह्यांच्याशी एकरुप झालेली आहे. निसर्गाशी असलेली ही एकरुपता, सिंहांबद्दलचं स्वाभाविक प्रेम / आपलेपण हे सांसाईकडे तिच्या अंध पणजोबांकडून वंशपरंपरागत चालत आलेलं आहे. 


दुसऱ्या आईमा. ऐंशीच्या पुढच्या वयाच्या ह्या वृद्धेकडे असलेला पारंपारिक कथांचा खजिना, त्या कथांना वाट देणारी तिची चित्रकला आणि निसर्गाच्या सान्निध्यात इतकं आयुष्य घालवल्यामुळे आयुष्याची असलेली एक आगळी समज. 


त्याशिवाय मग जंगलखात्यात बीटगार्डची नोकरी करणारे अहमद व धानू, गुराखी विक्रम, सांसाईची मैत्रीण लाजो, रविभा, गोविंदभाई व कोळ्यांची सरपंच राणी अशा इतर अनेक व्यक्ती.


मात्र ह्या सगळ्यांच्यामध्ये नायकाला एक समान धागा दिसून येतो आणि तो म्हणजे गीरबद्दल, तिथल्या जमिनीबद्दल, निसर्गाबद्दल, प्राणीसृष्टीबद्दल व परस्परांबद्दल असलेली आपुलकी व अहेतुक प्रेम.


इथे कोणीही माणूस अल्प परिचयावर किंवा कोणा ओळखीच्या व्यक्तीचा संदर्भ घेऊन आला तरी जेवू घालायला, रहायला जागा द्यायला लोक अनमान न करता तयार होतात. अशा व्यक्तीसमोर स्वत:च्या दैनंदिन आयुष्याचा पट, एखाद्या जुन्या आठवणीसहीत उलगडून दाखवण्यात देखील ते कचरत नाहीत. हे कसं शक्य आहे ? शहरी औपचारिक रिवाजांची सवय असलेल्याना तर हे विचित्रच वाटेल. पण ही आहे एक प्रकारची लोभस अनौपचारिकता.  माणसातील चांगूलपणावर विश्वास असला की आपोआप आतून येणारी. एकमेकांचा सहज स्वीकार असला की येणारी.


बरं, हा स्वीकार फक्त मनुष्यापुरता मर्यादित नाही तर तेथील इतर प्राणी व सजीव सृष्टीबद्दल देखील आहे. म्हणूनच गीरच्या जंगलात एकमेकांच्या इतक्या जवळ राहून सुद्धा सिंह व माणूस दोघेही गुण्यागोविंदाने राहतात कारण ते एकमेकांच्या अस्तित्वाचा आदर करतात. शक्यतो दुसऱ्याच्या जीवनात ढवळाढवळ करत नाहीत. कर्मधर्मसंयोगाने क्वचित असा प्रसंग आलाच तर नाईलाज म्हणून हे घडलं असेल व क्वचितच असं कधी घडू शकतं, त्यामुळे परस्पर विश्वास व आदर गमावण्याची गरज नाही हे प्राण्यांना तर अंत:प्रेरणेने कळतच पण स्वत:च्या बुद्धीवर जास्तच विश्वास असलेल्या मानवाच्या गीरमधल्या प्रतिनीधींना देखील कळतं.


म्हणूनच लाजोच्या लाडक्या गाईवर सिंहीण हल्ला करते तेव्हा लाजो विचार करते की सिंहीणीच्या हल्ल्यात जखमी गाय वाचवली तरी हाल होऊन मरेल. त्यापेक्षा, पोटाला काही हवं म्हणून शेवटचा पर्याय म्हणून सिंहीणीने गायीवर हल्ला केला असेल तेव्हा तो घास तिच्या तोंडून काढून घेऊ नये. 


एका प्रवाशाच्या बेजबाबदार वर्तनामुळे, त्याच्यावर हल्ला करणाऱ्या सिंहाच्या समोर धानू जीवावर उदार होत स्वत:ला घालतो आणि जखमी होतो तेव्हा त्याच्या मनात सिंहाबद्दल वा प्रवाशाबद्दल यत्किंचीतही कटूपणा नसतो. तो म्हणतो प्रवासी त्याला वागायचं होतं तसं वागला आणि सिंह त्याच्या नैसर्गिक प्रेरणेप्रमाणे. पण सिंहाला मला मारायचं नव्हतं म्हणून खांदा पकडला माझा, गळा नाही.


पिल्लांना जन्म देण्यासाठी गीरजवळच्या समुद्रकिनारी येणाऱ्या व्हेल शार्कना मच्छीमारांनी पकडू नये व त्यांच्या संवर्धनात मदत करावी हे त्याना समजावताना सरपंच असलेली राणी अगदी सोप्या शब्दात सांगते की बाळंतपणासाठी माहेरी आलेल्या मुलीला तुम्ही माराल का ? 


सांसाई तर गीरची कन्या असल्यासारखीच लहानाची मोठी झालेली.  कुवांडिया नावाचं गुरांना व इतर प्राण्याना चरण्यास लायक नसलेलं गवत गीरमध्ये उगवताना दिसतं तेव्हा परंपरागत कथेनुसार ज्या टेकडीवर गुरं चरायला नाही न्यायची तिथे कोणीतरी गुरं चरायला नेली म्हणून सगळीकडे कुवांडिया उगवतय म्हणून सांसाई चिडते त्यात परंपरेबरोबरच गीरमधील निसर्गाने जो समतोल सांभाळला आहे तो समतोल ढळण्याची शक्यता आहे ह्याची ती चीड आहे. 

जंगलातील पुष्कळ सिंहाना स्वत: ठेवलेल्या नावांनी ओळखणाऱ्या सांसाईला ते सिंह सुद्धा ओळखतात इतकी ती गीरच्या जीवसृष्टीशी एकरुप झालेली आहे.  गीरची ही निसर्गकन्या जणू गीरची ओळख आहे कारण निसर्गाशी असलेल्या एकरुपतेचा वारसा तिच्याकडे पिढीजात चालत आला आहे.


निसर्गाशी असलेली ही एकरुपता जी सांसाईकडे जन्मजात आहे तीच आईमांकडे पण आलेली आहे त्यांच्या दीर्घ आयुष्यातील अनुभवातून. सूर्य सुद्धा जन्माला यायच्या आधी उत्पत्ती मातेनी अवतार घेऊन जग निर्माण केलं आणि गीरच्या भूमीत सिंह आणि माणूस ह्या दोघांना एकमेकांचा योग्य आदर राखून रहायची परवानगी दिली ह्या आईमांच्या कथेत विलोभनीय दंतकथेबरोबरच मनुष्य व इतर प्राणीसृष्टी व सजीवसृष्टी ह्यांच्या सहजीवनातून समतोल साधण्याचं जे शास्त्रीय सत्य आहे त्याची पण रोजच्या जीवनातून मनात भिनलेली जाणीव आहे. अशी जाणीव ज्यामुळे सांसाई सिंहीणींना एखादी व्यक्ती व्यक्तीला ओळखेल तशी ओळखू शकते वा राणी व्हेल शार्कच्या माद्यांची बरोबरी सहजपणे बाळंतपणाला माहेरी येणाऱ्या मुलीशी करू शकते.  

त्याचबरोबर हीदेखील जाणीव आहे की हा समतोल टिकवणं हे ह्या भूमीवरील जीवनासाठी अत्यावश्यक आहे. नाहीतर पापांचा भार वाढेल आणि कासव तो भार पेलू शकणार नाही. म्हणूनच तो समतोल सांभाळण्याची निसर्गाने, उत्पत्ती मातेनी दिलेली जबाबदारी ते पिढ्यानपिढ्या आत्मीयतेने पुरी पाडत जगतात. 


ह्या निसर्गाने दिलेल्या जाणीवेनुसार जगण्यामुळेच भौतिक सुखाच्या कमतरतेमध्ये देखील गीरच्या लोकात परस्पर आपुलकीआहे, स्वीकार आहे, अनौपचारिकता आहे. तीच प्राण्यांबद्दल ही आहे. म्हणूनच कोणाला आयत्या वेळी जेवायला बोलावण्यात वा रहायला जागा देण्यात, इंजिनला नवस बोलण्यात तेथील लोकाना शंका येत नाहीत. त्यांच्या जीवनातील विश्वास व श्रद्धा हे अजून कायम आहेत जे भौतिकदृष्ट्या कठीण जीवन सहज व सोपं करून जगायची प्रेरणा त्याना देतात.


इतक्या सर्व मंडळीना भेटल्यावर. त्यांच्याशी बसल्या बोलल्यावर कथानायकाला जाणवतं की हे नैसर्गिक सहजीवन व समतोल हेच पृथ्वीचं तत्वरूप. बहुप्रसवा मेदिनीचं तत्वरुप म्हणजे विविध प्रकारात फुललेलं हे जीवन.


जेव्हा हे त्याला कळतं तेव्हा त्याला हे जाणवतं की सुरूवातीला चाचपडणारा त्याचा कुंचला जसजशी त्याची स्थानिक लोकांशी व गीरच्या भूमीशी ओळख होत गेली तस तसा तो कुंचला अशा सफाईदारपणे 

कॅनव्हासवर फिरायला लागला की जणू त्या जागेची, त्या व्यक्तीची, त्या प्रसंगाची कहाणी त्याच्यासमोर कुणी उलगडत न्यावी. 


अशा ह्या आतून जाणवलेल्या तत्वरुपा पृथ्वीची त्याची चित्र तो विकतो की नाही ? तत्वरुपा पृथ्वीचं सर्वात सुंदर प्रतीक वाटावं अशा गीरशी त्याचा भावनिक ॠणानुबंध किती खोलवर रुजला आहे ह्याची उत्तरं मिळतात धृव भट्ट लिखित अकूपार मध्ये.


धृव भट्ट ज्या प्रादेशिक पार्श्वभूमीवर लिहीतात त्या प्रदेशात ते स्वत: जाऊन राहतात. तेथील मूळ व स्थानिक लोकांशी संवाद साधतात. त्यांच्या रुढी, परंपरा, चालीरीती, परंपरागत चालत आलेल्या कथा ह्यांची माहिती करून घेतात आणि मग त्या प्रदेशाच्या भूगोलाचं बारकाव्यांसहीत वर्णन करत, तिथे भेटलेल्या व्यक्तींना / स्वभावविशेषांना आपल्या कहाणीत गुंफत, त्यांच्या परंपरागत कथांशी आपल्या कथेचा धागा बेमालूमपणे असा काही मिसळत जातात की वाचकाला जणू ते त्या प्रदेशाच्या भूगोलातून फिरवता फिरवता त्या त्या व्यक्तींशी समक्ष भेटवतात आणि वर्तमानातील आपल्या जाणीवा व समज ह्याना पुरातन काळापासून निसर्गाने शिकवलेल्या पण आता विस्मरणात जाऊ लागलेल्या जाणीवांचा धक्का देत वाचकाला विचार करायला प्रवृत्त करतात.  अद्भुताचा, कल्पनारम्यतेचा वेश धारण करून आलेलं वास्तव एखाद्या वाक्यातून अचानक समोर येत वाचकाला जबरदस्त धक्का देत अंतर्मुख बनवतं. ही त्यांची शैली अगदी खास त्यांचीच.


गीरला मी स्वत: चार वेळा गेलोय आणि प्रत्येक सफारीत जंगलचा राजा सिंहाचं त्याच्या राण्या व युवराज युवराज्ञी अशा पूर्ण कुटुंबकबिल्यासमवेत वा कधी एकटाच मस्तीत असा फिरताना मनसोक्त दर्शन घेतलं आहे. स्वत:च्या राजा असण्याची जाणीव त्याच्या रुबाबदार चालीतून व आजूबाजूच्या उपस्थितांच्या न घेतल्या गेलेल्या दखलीतून जाणवत राहते. आणि तरीही वाटतं की आपल्या प्रत्येक हालचालीवर त्याचं लक्ष आहे. आपण त्याच्या राज्यात आहोत. हा अनुभव अद्भुत आहे. तो तिथे जाऊनच मिळेल.


पण ह्या चारही भेटीत मी प्रवाशाच्या नजरेतून गीर अनुभवलं. गीरच्या भूमीपुत्रांच्या व भूमीकन्यांच्या नजरेतून जसं गीरदर्शन धृव भट्टानी अकूपार मध्ये घडवलं आहे ते अनुभवणं हा एक आगळाच अनुभव असेल. 


स्वर्गातील प्रवेशाबद्दल मला आत्ता फार काही उत्सुकता नाही. मात्र गीरच्या भूमीतील कथात भरून राहिलेल्या अकूपारला भेटायची ऊत्सुकता मात्र आता अपार आहे.


---- मनिष मोहिले

Monday, August 24, 2020

तत्वमसि

 तत्वमसि


(मूळ गुजराती लेखक - धृव भट्टमराठी अनुवाद - अंजनी नरवणे)


सहसा एखाद्या पुस्तकाबद्दल आपण लिहीतो तेव्हा पुस्तकाच्या विषयाबरोबरच, लेखनाची शैली, पात्र असल्यास पात्रांच्या स्वभावाचे विश्लेषण, पुस्तकातील जाणवणारं साहित्यसौंदर्य, दुसऱ्या एखाद्या साहित्यकृतीशी समानता वा विरोधाभास असे काही मुद्दे आपण विचारात घेतो.


मात्र; काही पुस्तकातील मूळ विचार वा सार इतकं अस्सल, मूलगामी, विचार करायला प्रवृत्त करणारं आणि भारून टाकणारे असतात की ह्या सगळ्या बाकीच्या गोष्टी निमित्तमात्र ठराव्यात. त्या पुस्तकाचं सगळं सौंदर्य त्या सारसर्वस्वात, त्या मूलगामी विचारात असतं . तो विचारच इतका प्रभावी असतो की तुम्ही त्या पुस्तकाबद्दल बोलू लागलात की त्या विचारापुढे इतर गोष्टी आपोआप दुय्यम ठरतात. माझ्या बाबतीत तरी असं होतं.


अर्थात, वर्ण्यविषय असलेल्या पुस्तकाची ओघवती शैली, मूळ गुजराती भाषेतील रसास्वाद, मराठी अनुवाद वाचताना त्यात अजिबात बाधा वा कमीपणा येऊ नये अशा पद्धतीने केलेला मराठी अनुवाद, वाचकाला गुंगवून ठेवायची कथानकाची व लेखकाची ताकद ह्या सर्व गोष्टी निश्चितच स्पृहणीय व कौतुकास्पद. मूळ गुजराती पुस्तकाला गुजराती साहित्य अकादमीचं मिळालेलं पारितोषिक व इतर पुरस्कार ह्याबद्दल ग्वाही देतातच. पण ह्या सर्वांपेक्षा जी विचारधारा पुस्तकातून दिसते त्या अप्रतिम विचारधारेबद्दल लेखकाला त्रिवार वंदन.

सुरूवातीलाच आभारप्रदर्शन केल्यासारखा हा भाग मी आधीच उद्धृत केला कारण पुस्तकाबद्दल बोलायला सुरूवात केल्यावर मध्ये वा ते संपल्यावर शेवटी - इतर कोणत्याही गोष्टीकडे लक्ष देणे शक्य नाही आणि अशा पुस्तकाच्या बाबतीत उचितही नाही.


तत्वमसि 

भारतात मुंबईत झालेला जन्म, लहान असतानाच आईचं देहावसान, एखाद वर्ष गुजरातमधील एका खेड्यात आजीजवळ घालवलेलं एक वर्ष आणि त्यानंतर वडिलांबरोबर परदेशी जाऊन तिथेच शिक्षण घेतलेला, स्थायिक झालेला, मानव संसाधन क्षेत्राशी संबंधित नोकरी करणारा अशा पार्श्वभूमीचा कथानायक, वरीष्ठांच्या ईच्छेपुढे मान तुकवून बराचसा अनिच्छेनेच भारतात परत येतो - नर्मदेच्या किनाऱ्यावरील घनदाट जंगलातून रहाणाऱ्या आदिवासी लोकांच्या विकासासाठी, त्यांच्या जीवनशैलीचा अभ्यास करून त्याना विकासाभिमुख बनवण्यासाठी. ह्या कथानायकाच्या तोंडून, त्याच्या ह्या वास्तव्याची व त्या दरम्यानच्या आदिवासी जीवनशैलीच्या निरीक्षणाची  व त्यातूनच सुरू झालेल्या आत्मशोधाची कथा म्हणजे धृव भट्ट लिखित तत्वमसि.  


पुस्तकाच्या सुरूवातीलाच लेखक पुस्तकाचं सार सांगून जातो आणि तरीही, कथानायकाच्या रोजनिशीतील प्रथमपुरूषी कथनाच्या आकृतीबंधात सादर केलेल्या ह्या कहाणीत आपल्याला सुरूवातीपासून शेवटपर्यंत गुंतवून ठेवतो. 


लहानपणापासून परदेशात राहून, शिक्षण घेऊन कळत नकळत उपयुक्ततावादी बनलेला, आपला धर्म, संस्कृती, परंपरा ह्यांना फारसं महत्व न देणारा पण तरीही कुठेतरी त्याची बैठक मनात असलेला,  कथानायक कामानिमित्त नर्मदेच्या काठच्या जंगलातील आदिवासी आणि त्यांच्यासाठी काम करणारी व त्या कार्यालाच जीवन वाहिलेली आधुनिक सुशिक्षित तरुण सुप्रिया भारतीय, तिचे वैचारिक, नैतिक व नैष्ठिक गुरू असल्यासारखे असलेले शास्त्रीजी, व्यवसायाने सावकार पण वृत्तीने समाजसेवी असे गुप्ताजी, एका चर्च मधील फादर,आदिवासीना  मधुमक्षिकापालन शिकवण्याचा प्रयत्न करणारा लक्ष्मण शर्मा, स्वत:च्या पोटाला चिमटा घेऊन ह्या जंगलात आदिवासींसाठी शाळा चालवण्याचा प्रयत्न करणारे व वणवा विझवण्यात मदत करणारे विष्णू आणि विद्या, नर्मदा परिक्रमा करणारे एक दोन परिक्रमावासी, आदिवासींपैकीच जणू एकाच व्यक्तीचं वा जागेचं नाव असावशा नावाचे वाटणारे बित्तुबंगा नावाचे भाऊ, एक आदिवासी तरुणी पूरिया, वेडा फकीर आणि कालेवाली माँ ह्या सर्वांना भेटतो आणि आत्तापर्यंतच्या आयुष्यात विकास आणि संस्कृती ह्याबद्दल ज्या कल्पना त्याच्या मनात असतात त्यातील काहींना समूळ हादरे बसतात तर काही बदलायला लागतात.


भगवान शंकराने आपल्या लाडक्या मुलीसाठी, नर्मदेसाठी खेळाय बागडायला घनदाट अरण्य निर्माण केलं आणि मग पार्वतीला सांगितलं की अरण्यातील सर्व वृक्ष झाडं झुडूपं आणि प्राणी पक्षी ह्यांच्या रक्षणासाठी एक वृक्षप्रमुख नेम. त्या आदेशानुसार पार्वतीने अरण्याच्या मध्यभागी चारी बाजूला टेकड्या असलेल्या एका मैदानातील एका ऊंच पर्वतावर ऐन माथ्यावर एक सागाचं रोप लावलं जो आज नर्मदा काठच्या अरण्यातील सर्वात ऊंच विशाल असा सागाचा वृक्ष आहे जो संपूर्ण वर्ष हिरव्यागार पानांनी बहरलेला रहातो व सर्व प्राणी पक्षी ह्यांचं व निष्पाप माणसांचं रक्षण करतो ह्यासारख्या पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या दंतकथेतील जिंदा सागबान बघितल्यावर, शहरातील माणसं सोडाच पण इतर आदिवासींमध्ये सुद्धा न मिसळणाऱ्या साठसाली लोकांच्या मृग नक्षत्र, व्याधाचा तारा ह्याबद्दलचं आधुनिक खगोलशास्त्रीय माहितीशी मिळतजुळतं ज्ञान ह्या गोष्टी कथानायकाला अजून अंतर्मुख बनवत जातात. 


आदिवासींची वरवर अडाणी व अशिक्षित आणि आधुनिक शहरी समाजाच्या दृष्टीकोनातून जंगली वाटणारी संस्कृती प्रत्यक्षात निसर्गाच्या किती जवळ आणि मूलभूत नैसर्गिक चांगुलपणाशी नाळ टिकवून आहे हे जसजसं नायकाला कळतं तसतसं शास्त्रीजींनी त्याला विचारलेला प्रश्न - "तुला किंवा मला ह्या आदिवासींना 'सुधारण्याचा' खरोखर अधिकार आहे का?" हा प्रश्न त्याला कळू लागतो.  प्रामाणिकपणा, सहज प्रेमातला धर्म, अतिथी ला देव मानणं ह्या संकल्पना त्यांच्या जीवनात किती सहज आहेत, त्यांना शिकायची वा शिकवायची गरज नाही हे त्याला कळतं काही प्रसंगातून - आठवड्याच्या बाजाराला अर्ध्या रस्त्यापर्यंत येऊन (कारण शहरात वावरताना बावरायला होतं) भले खरेदी काही न करता पण कर्जाऊ रकमेची मध, धान्य अशा रुपात परतफेड करायला गुप्ताजींच्या जीपची वाट बघत थांबणारे आदिवासी बघून त्याला कळतं की प्रामाणिकपणे जगतात कसे ते.

दुसरा प्रसंग - आई लहानपणीच गेल्यावर लहान भाऊ बंगाला आई बनून वाढवलेला बित्तु, ज्या वाघिणीच्या हल्ल्यात बंगा मरतो त्या वाघिणीला, तिला मारून बंगाच्या मृत्यूचा सूड उगवण्याची शपथ घेतलेली असूनसुद्धा; सोडून देतो कारण तिचे बच्चे जंगलात आईविना राहू शकणार नाहीत. हाच बित्तु,वाघिणीला सोडलं म्हणून चर्च मध्ये जाऊन कन्फेशन देऊ ईच्छितो की धाकट्या भावाला मारणाऱ्या वाघिणीला मी सोडलं. भावाच्या मारेकरी वाघिणीला मारायचं की बच्च्यांची आई असलेल्या त्याच वाघिणीला सोडायचं ही अतिशय कठीण निवड करून वाघीण व मृत भाऊ दोघांच्या प्रती प्रेम आणि प्रामाणिकपणा राखायचा अशा पद्धतीने जीवन जगायला शिकवणाऱ्या संस्कृतीपुढे जगातील कोणता धर्म श्रेष्ठ ठरेल तरी का ?

तिसरा प्रसंग - नायक, सुप्रिया, वेडा फकीर एकदा जंगलातून जात असता दुपारी जेवायच्या वेळेला एका म्हाताऱ्या आदिवासीच्या झोपडीजवळ येतात. मूर्तीमंत दारिद्र्याचं दर्शन असा तो आदिवासी, दारी आलेल्या अतिथीना भुकेलं जाऊ द्यायचं नाही म्हणून हट्टाने थांबवून मडक्यातली दारू आणि मीठ देतो तो प्रसंग. केंद्राच्या एका कारखान्यात काम करणाऱ्या एका आदिवासीचा हात कापला जातो तेव्हा पैशाची मदत मागणारी त्याची पत्नी ज्या प्रामाणिकपणे मजूरी करून त्या कर्जाची परतफेड करायची तयारी दाखवते तो प्रामाणिकपणा.


एक ना दोन अनेक प्रसंगातून नायकाला प्रश्न पडत रहातात की वरवर पहाता इतकं मागासलेलं, अंधश्रद्धेवर आधारलेलं, कठीण व दरिद्री जीवन जगणाऱ्या ह्या आदिवासींकडे हा मूलभूत पक्का व चांगुलपणा असलेला नैतिक जीवनाचा पाया कुठून आला ?


अनेक प्रश्न त्याला पडत रहातात. सुप्रिया, शास्त्रीजी ह्यांच्याबरोबरच्या संवादातून ह्या प्रश्नांची उत्तरं मिळाल्यासारखी वाटतात आणि नाहीदेखील.


शास्त्रीजी म्हणतात त्याप्रमाणे अनेक धर्म, जाती, पंथ ह्यात वरवर पहाता विभागले गेलेले, अडाणी अशिक्षित आदिवासी ते प्राचीन काळचे ॠषी व अर्वाचीन काळचे अत्याधुनिक प्रगत लोक इतक्या विशाल सामाजिक स्तरावर पसरलेले हे कोट्यावधी लोक एक देश म्हणून राहू शकतात कारण त्यांना एकत्र ठेवते त्यांची संस्कृती जी धर्मापेक्षा अध्यात्माला महत्व देते. ही संस्कृतीच त्यांना निसर्गाच्या जवळ व निसर्गाच्या नियमाप्रमाणे रहायला शिकवते. त्यासाठी असंख्य परंपरा निर्माण करते, धर्माला लवचिक बनवते. कारण आपणा सर्वातील निसर्गतत्व, ईशतत्व एकच आहे ह्या जाणीवेचा आध्यात्मिक सांस्कृतिक वारसा कळत नकळत पिढ्यानपिढ्या जन्मजात ह्या जनतेकडे चालत आला आहे.


म्हणूनच सुप्रिया म्हणते की ती परिक्रमावासींची नाही तर परिक्रमेची सेवा करते. ती आणि तिच्यासारखे नर्मदाकाठचे असंख्य लोक जे परिक्रमावासी पुरूष की स्त्री, त्याचा वा तिचा धर्म, जात ह्याचा विचार न करता त्या परिक्रमावासीला आपल्याकडून होइल ती सर्व मदत - अन्न, वस्त्र, निवारा ह्याची करतात; कारण त्यांना परिक्रमेची परंपरा जीवंत ठेवायची आहे. तुम्ही नर्मदा मातेवर श्रद्धा ठेऊन परिक्रमा उचललीत तर नर्मदामाई तुम्हाला कधीच काही कमी पडू न देता तुमची परिक्रमा पूर्ण करवेल हा विश्वास ही ह्या संस्कृतीची व परंपरेची देणगी आहे. ह्याच मुळे कित्येक लोक आजही रात्री दाराबाहेर तेलाची वाटी ठेवतात की अश्वत्थामा आलाच जखमेवर लावायला म्हणून तेल शोधायला तर त्याला तेल मिळावं. ह्यातील चिरंजीवित्वाच्या कल्पनेपेक्षा, अश्वत्थामा येवो वा न येवो, आपण  सांस्कृतिक परंपरेने दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे निभावायची ही जी जीवनपद्धती आहे ती जास्त विलोभनीय व उदात्त आहे.


त्याचमुळे सुप्रियाला व शास्त्रीजीना एकाच गोष्टीची काळजी आहे की बदल, विकास व परिवर्तन ह्या नावाखाली ह्या जनतेला त्यांच्या ह्या सुसंस्कारित जीवनपद्धतीत बदल करायला भाग पाडलं जातय वस जाईल. ती जीवनपद्धती, संस्कृती हीच ह्या देशाची खरी ओळख आहे जी अनादि अनंत कालाच्या अग्नीपरीक्षेला पूर्णपणे उतरली आहे. 

म्हणूनच शास्त्रीजी म्हणतात की धर्माचं काय होइल ह्याची मला चिंता नाही. पण सध्या जे चाललय त्यामुळे ह्या देशातील लोकांच्या  जीवनपद्धतीत, जीवनाकडे बघण्याच्या दृष्टीकोनात फरक पडत चालला आहे त्यामुळे संस्कृतीची त्यांना चिंता वाटते.

सुप्रियाला प्रश्न पडतो की नष्ट होण्याच्या मार्गावर असलेल्या एखाद्या पक्ष्याच्या वा प्राण्याच्या प्रजातीबद्दल तथाकथित सुशिक्षित व आधुनिक लोक इतके जागरुक असतात व त्यांचं अस्तित्व टिकावं ह्यासाठी लोकजागृतीसहीत प्रत्यक्ष कृतीचे प्रयत्न करतात तेच लोक एखाद्या जनसमूहाची संस्कृती, परंपरा, जीवनपद्धती ह्यांचा नाश होत असेल तर त्याला परिवर्तन वा विकास असं नाव देऊन ह्या नाशाची भलावण का करतात ?


ईच्छा नसताना अंगावर पडलेलं हे काम पटकन ऊरकून पुन्हा परत जावं असा बेत करून आलेला कथानायक ह्या सगळ्या परीकथेसारख्या वाटणाऱ्या कथा, परीकथेतल्यासारखे वाटणारे पण जीवनाचा खरा अर्थ समजल्यासारखे वाटणारे बित्तुबंगा, पूरीया सारखे आदिवासी, वेषभूषा, भाषा, शिक्षण इत्यादी बाबतीत नायकासारखेच असलेले पण प्रत्यक्षात ज्यांची नाळ अजून ह्या आदिवासींशी व इथल्या संस्कृती व परंपरांशी आणि अध्यात्माशी अधिक जुळलेली आहे अशा सुप्रिया, शास्त्रीजी, लक्ष्मण शर्मा, विष्णू आणि विद्या इत्यादीना आणि ह्या दोहोंच्या पलीकडले असे वेडा फकीर, कालेवाली माँ आणि अनोळखी परिक्रमावासी ह्यांच्या भेटी व त्यांच्या बरोबरीची संभाषणे ह्यातून नायकाला ओढ लागते ती सत्यशोधनाची. पुरातन काळापासून ज्या नर्मदेच्या सदेह अस्तित्वाला आणि पर्यायाने ईशतत्वाला ही संस्कृती मानत आली आहे त्या नर्मदेने सदेह दर्शन देऊन स्वत:च्या तोंडून स्वत:ची ओळख दिली तर हे सगळं - ह्या कथा, परंपरा, संस्कृती आपण खरी मानू असा विचार त्याच्या मनात बळावत जातो. 


दैववशात्, त्याच्यावर निष्कांचन अवस्थेत, नेसल्या वस्त्रानिशी नर्मदाकाठाने प्रवास करायची वेळ येते. पण खरच दैववशात् की सत्याशी ओळख व्हायची त्याची वेळ होते म्हणून ? कारण; आत्तापर्यंत त्याच्या खाती आदिवासींसाठी जे काही काम केलं ते काम आणि मनातील प्रचंड खळबळ आणि ह्या जीवनसंस्कृतीला जीवंत ठेवणाऱ्या तत्वाची ओळख करून घ्यायची प्रचंड ओढ इतकी पुंजी तर जमा झालेली असते.


आणि अशा वळणावर परिक्रमेच्या मार्गावर भिल्ल जे लूट करतात त्याचा अनुभव त्याला येतो. अगदी नेसती वस्त्र सुद्धा त्याच्याकडून ते भिल्ल काढून घेतात. ते त्याला हुकूम देतात " दे, दे, देऊन टाक." 

शहराजवळ जाऊन पैसा अडका न लुटता, आडवाटेच्या वाटसरूचे अंगावरचे कपडे हे लोक का लुटतात हा प्रश्न त्याला पडतो आणि आत्तापर्यंत घेतलेल्या अनुभवातून, केलेल्या विचारमंथनातून त्याच्या समोर ह्या प्रश्नाचं विराट उत्तर उभं रहातं. हा हुकूम ते भिल्ल स्वत: देत नाहीत. त्यांच्या तोंडून स्वत: माता नर्मदा देतेय. इथल्या हजारो वर्षांची परंपरा आणि संस्कृती देतेय. तुझ्या जवळचं सगळं देऊन टाक आणि नि:संग हो म्हणून. 

अंगावर कपडा नाही, पोटात अन्नाचा कण नाही असा तो काही अंतर चालून जातो आणि बेशुद्ध पडतो. शुद्धीवर येतो तो एका छोट्या मुलीच्या आवाजाने, जी हातातलं मक्याचं कणीस पुढे करून त्याला सांगत असते " घे, हे घे". त्या मुलीला तो विचारतो की "माई , तू कोण आहेस ?"  आणि जागृती व बेशुद्धीच्या सीमारेषेबरच्या त्याला कुठूनतरी खोल पण स्पष्ट अशा संपूर्ण आसमंत भरून टाकणाऱ्या आवाजात उत्तर मिळतं 

" रेssवा"


स्वत:ला "दे - त्यागून दे" आणि ईशतत्वाला "घे - अंगिकार" ह्या दोन शब्दात आणि मूलभूत तत्वात ही संस्कृती आहे आणि म्हणूनच इतके बदल, परिवर्तन होत असूनसुद्धा ती टिकून आहे.


अध्यात्म मार्गावर प्रगती असेल तर "अहम् ब्रह्मास्मि" ची जाणीव होऊ शकेल ज्यात जाणीवेचा भर, अहम् वर नसून ब्रह्मावर असेल. पण अध्यात्ममार्गावर फार प्रगती नसताना देखील आत्मशोध व सत्यशोधाची तळमळ ही जाणीव नक्कीच करून देऊ शकते की " हे जे सर्वकाही सजीव निर्जीव जग तुला दिसतय त्यात भरून असलेलं ब्रह्मतत्व तूच तर आहेस - तत् त्वम् असि.  तत्वमसि ! 


-- मनिष मोहिले